रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 454

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी ५ सौर उर्जा प्रकल्पांचे लोकार्पण

वाशिम, दि. 5 :  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी येथे करण्यात आले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन ऊर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड व कृषीमंत्री धनंजय मुंडे यावेळी उपस्थित होते.

कृषी फीडर्सना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून ते टप्प्या टप्प्याने सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यापैकी धोंदलगाव (जिल्हा छत्रपती संभाजीनगर), बामणी बुद्रक (जिल्हा नांदेड), हरोली (जिल्हा कोल्हापूर), जलालाबाद (जिल्हा अकोला), पलशी बुद्रुक (जिल्हा बुलढाणा) या एकूण १९ मेगावॅट क्षमतेच्या पहिल्या पाच प्रकल्पांचे लोकार्पण झाले. सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना प्रधानमंत्र्ंयाच्या हस्ते २०.५५ कोटी रुपये विकासनिधी ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला.

शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी सध्या दिवसा व रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. केवळ दिवसा भरवशाचा वीज पुरवठा करावा अशी त्यांची मागणी आहे. पीएम कुसुम अर्थात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. या योजनेत सौर ऊर्जा निर्मितीसाठी दरवर्षी सव्वा लाख रुपये प्रती हेक्टर दराने जमीन भाड्याने देण्याचीही सुविधा शेतकऱ्यांसाठी आहे.

0000

बंजारा समाजातील संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

  • प्रधानमंत्र्यांच्याहस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन
  • नमो शेतकरी महासन्मान योजनेचा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता
  • 23300 कोटीच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा आरंभ
  • कृषी पायाभूत सुविधेंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प समर्पित
  • पशुधनासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ
  • राज्यातील 19 मेगावॅटच्या पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण

वाशिम, दि.5 : –  बंजारा समाजाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका निभावली. देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात या समाजाने काम केले. समाजाने खूप संत दिले. या संतांनी देशाच्या आध्यात्मिक क्षेत्राला उर्जा दिली. बंजारा विरासत संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचीन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन, किसान सन्मान संमेलन तथा विविध विकासकामांचे लोकार्पण, लाभाचे वितरण झाले. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंग चौहान, मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खा.अनुप धोत्रे, आ.चंद्रशेखर बावनकुळे, आ.निलय नाईक, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.लखन मलिक, आ.वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आदी उपस्थित होते.

  

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले ,बंजारा समाजाच्या विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. उद्गाटनानंतर समाजातील काही लोकांना भेटलो. संग्रहालयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांनी या संग्रहालयाला भेट द्यावी, असे आवाहन करतो. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या संग्रहालयाच्या विकासासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो. संग्रहालयामुळे समाजाची महान संस्कृती, प्राचिन परंपरा देशाच्या नवीन पिढीला परिचित होईल, असे प्रधानमंत्री म्हणाले.

बंजारा समाजातील महापुरुषांनी देशासाठी  खूप मोठे योगदान दिले. राजा लकी सिंग, संत सेवालाल महाराज, स्वामी हाती राम, संत रामराव बापू महाराजांसह अनेक संत, महंतांनी समाजाला निर्णायक नेतृत्व दिले व उत्तम मार्गदर्शन केले. केंद्र शासन या समाजाच्या विकासासाठी कार्य करीत आहे. राज्य शासनाने संत सेवालाल तांडा समृद्धी अभियान राबवून या समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले, असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले.

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याचे भाग्य मला मिळाले आहे. केंद्राच्या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेतून निधी देत असल्याने येथील शेतकऱ्यांना दुप्पट लाभ होत आहे. केंद्र सरकारचा प्रत्येक निर्णय विकसित भारताच्या दिशेने कार्यरत आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्यादृष्टीने विविध पावले उचलण्यात येत आहेत. आज शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांचे व योजनांचे लोकार्पण झाले हे या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

महाराष्ट्र सरकारने ५० हजार करोड रुपयांच्या वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाला मंजूरी दिली आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार मदत करत आहे. अमरावती येथील नुकतेच टेक्सटाईल पार्कचे उद्घाटन  झाले. राज्य शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नारी शक्तीला सशक्त करणारी योजना असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.

संग्रहालयामुळे बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन घडेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नगारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन हा ऐतिहासिक व सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. खऱ्या अर्थाने पोहरादेवी येथे काशी उभी राहिली असून बंजारा संस्कृती, परंपरांचे दर्शन होणार आहे. जगण्यासाठी भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा मार्ग दाखविला. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाने आपली संस्कृती जपली. आता त्यांच्या या संस्कृतीचे जतन संग्रहालयाच्या माध्यमातून होणार आहे. संत सेवालाल यांच्या स्मारकामुळे राज्याला पुढे घेवून जाण्यासाठी प्रेरणा मिळेल. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी 700 कोटीचा निधी वितरित केला आहे.

‘सबका साथ सबका विकास’  हे ब्रीद घेऊन चालणारे नरेंद्र मोदी यांनी संत सेवालाल महाराजांचे तत्व स्वीकारले आहे. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे, ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम  करण्याचे कार्य सुरू असून ही योजना बंद होऊ देणार नाही. या योजनेतून राज्यातील २ कोटी पेक्षा अधिक महिलांना तीन महिन्यांचे सहाय्य वितरण करण्यात आले आहे. राज्य सरकार समाजातील शेतकरी, कष्टकरी, युवक अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे राज्य सरकार हे आता आपले लाडके सरकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट केला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्यांनी बाबा विश्वनाथाच्या काशीचा कायापालट केला ते  आज बंजारा समाजाच्या काशीचा कायापालट पाहण्याकरिता व त्याच्या उद्घाटनासाठी आले आहेत. मोदीजींचे बंजारा समाजाशी एक घट्ट नाते आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी हे पोहरागडाला भेट देणारे पहिले प्रधानमंत्री आहेत.

राज्याचा मुख्यमंत्री असताना रामराव बापूंनी मला पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी दिली होती. या ठिकाणी आज बंजारा विरासत संग्रहालय उभे राहिले आहे. मंदिराचा विकास झाला आहे. पाहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण केले. मोदीजींनी किसान सन्मान योजना आणि राज्य शासनाने नमो किसान महासन्मान योजना आणली. या योजनांचे हप्ते प्रधानमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना  दिवसा वीज देण्याचे आश्वासन राज्य शासनाने पूर्ण केले. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पाच सौर उर्जा प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल श्री.फडणवीस यांनी देखील प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

विरासत संग्रहालय गौरवाचे प्रतिक – उपमुख्यमंत्री अजित पवार

बंजारा विरासत संग्रहालय हे बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा, वारसा, अस्मिता, इतिहास याचे गौरवशाली प्रतीक ठरेल. या संग्रहालयाच्या रूपाने एक वैभवशाली व भव्य वास्तू येथे उपलब्ध झाली. संग्रहालयाच्या माध्यमातून निसर्गपूजक लढवय्या बंजारा समाजाच्या संस्कृती, परंपरांचे सर्वांना दर्शन घडेल असा मला विश्वास आहे.

या संग्रहालयासह विकास आराखड्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी 2017 मध्ये 25 कोटी रुपये देऊन केली होती. नंतर श्री.फडणवीस यांनी 100 कोटीचा निधी जाहीर केला. त्यानंतर आता 700 कोटींचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे  उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे आभार मानले.

बंजारा समाजाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न व्हावे – पालकमंत्री संजय राठोड

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे पोहरादेवी येथे आगमन म्हणजे बंजारा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बंजारा समाजाचा इतिहास गौरवशाली आहे. देशातील या समाजाला राज्यघटनेच्या एका सूचित आणण्यासाठी सहानुभूतीपूर्वक विचार होणे आवश्यक आहे. देशभर बंजारा समाजाची संस्कृती व भाषा एकसारखी आहे. त्यामुळे बंजारा भाषेला संरक्षित करण्यासाठी तिचा राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचित समावेश करण्यात यावा, असे पालकमंत्री म्हणाले.

बंजारा तांड्यांचा चतुरस्त्र विकास होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तांडा विकास महामंडळ स्थापन करण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. स्वदेश योजनेंतर्गत पोहरादेवीच्या विकासासाठी केंद्र शासनाची मदत आवश्यक आहे. यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांत रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी जीएसटीसह अन्य करांमध्ये सूट मिळणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासन सातत्याने शेतकरी हिताचे उपक्रम राबवत आहे. सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन तेलाच्या आयात निर्यातीच्या दरात आवश्यक बदल करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी उत्पादन खर्चाच्या ५० टक्के अधिक दर देऊन किमान आधारभूत किंमत ठरविली जात आहे. युरीया आणि डीएपीचे दर शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत, त्यामुळे यावर शासन मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून देते, असे श्री.चौहान म्हणाले.

केंद्रीय मत्स्यपालन व पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग म्हणाले, पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंगवर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आरंभ होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनात वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत लिंग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. यामुळे वीर्याची मात्रा सुमारे २५० रुपयांपर्यंत उपलब्ध होतील. देशी पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप, गौचिप आणि म्हशींसाठी माहीचिप जिनोटायपिंग सेवांसह विकसित करण्यात आल्या आहे. जनुकीय निवडीच्या अंमलबजावणीमुळे तरुण उच्च दर्जाच्या बैलांची कमी दरात निवड करणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

विविध उपक्रमांचा आरंभ, लोकार्पण व लाभाचे वितरण

प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीस बंजारा विरासत संग्रहालयाचे लोकार्पण केले व पाहणी केली तसेच बंजारा बांधवांशी संग्रहालयात संवाद साधला. मुख्य समारंभात 9.4 कोटी शेतकऱ्यांना 20 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित केला. सोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या 5 व्या हप्त्याचेही वितरण केले. सुमारे 23 हजार 300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा आरंभ केला.

प्रधानमंत्री कृषी पायाभूत सुविधा निधी निधी अंतर्गत 1 हजार 920 कोटी रुपयांचे 7,500 हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांची एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राष्ट्राला समर्पित केल्या. पशुधनासाठी युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा आरंभ  करण्यात आला. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना – 2.0 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘बंजारा विरासत’ संग्रहालयाचे लोकार्पण

वाशिम, दि. 5 : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी, प्रधानमंत्री मोदी यांनी नगारा भवन परिसरातील बंजारा विरासत संग्रहालयाची पाहणी करुन बंजारा समाजाच्या संस्कृती व इतिहास यासंदर्भात माहिती जाणून घेतली. तसेच नगारा वाद्याचे वादनही त्यांनी केले. यावेळी बंजारा समाजातील परंपरागत नृत्य प्रधानमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले.

श्री. संत सेवालाल महाराज, पोहरादेवी तीर्थश्रेत्र विकास आराखड्यांतर्गत 723 कोटी रुपये खर्चून या तीर्थश्रेत्राचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात बंजारा समाजातील रुढी-परंपरा, पारंपारिक वेशभूषा, सांस्कृतिक इतिहास आदीबाबत विविध कलाकृतींच्या माध्यमातून माहिती प्रतिबिंबीत केली आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री महोदयांनी बंजारा समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि संतमहंत यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला.

यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांचे स्वागत

आज सकाळी प्रधानमंत्री महोदयांचे हेलिकॉप्टरने वाईगौळ येथील हेलिपॅडवर आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड तसेच अपर पोलीस महासंचालक नवल बजाज, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी पोहरादेवी येथील जगदंबा मातेचे तसेच संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधींचे दर्शन घेतले.

0000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुनर्वसित इर्शाळवाडीला भेट 

रायगड जिमाका दि.4-  इर्शाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.  सिडकोमार्फत या दरडग्रस्तांच्या 44 घराचे बांधकाम हे अंतिम टप्प्यात आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणी कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसात या घराचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे दौरा आटोपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इर्शाळवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, सिडको अधिकारी गणेश देशमुख यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जुलै 2023 साली खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उध्वस्त झाली होती.  अनेकजण मृत्यू पावले होते.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाल वाडीला भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले होते. जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून चालू असलेले बांधकाम पूर्ण झाले असून येथे 44 घरांची  बांधणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी इर्शाळवाडी येथील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना  दिले. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून  येथील महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे देखील कबूल केले.  तसा फोनही त्यांनी उद्योगमंत्र्यांना केला असून उद्योग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन तेथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे देखील सांगितले.

इर्शाळवाडी येथे नव्याने उभारलेल्या घरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिल्यानंतर येथील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.

००००

श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ४ :  मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर,  तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री, अजित पवार यांनी केले.

मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर व  तीर्थक्षेत्र विकास  भूमिपूजन समारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, मध्यप्रदेशचे रवी किरण साहू, सुदुंबरेच्या सरपंच मंगल गाडे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, श्री संत संताजी जगनाडे महाराज समाधी मंदिर व  तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचे विचार कार्य सर्व नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे काम शासन करत आहे.

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येत आहे. त्यांचे स्मारक राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्धा तालुक्यातील सेलू येथील आयटीआयचे श्री संत संताजी जगनाडे महाराज आयटीआय असे यांचे नामकरण करण्यात आले आहे. नागपूर येथे आर्ट गॅलरी त्यांच्या नावाने उभारण्याचे काम सुरू आहे.

संत महात्म्यांनी समाजाला एकता, समता आणि बंधुताची शिकवण देवून राज्य समृध्द केले आहे. संतांनी कधीही संकुचित विचार केला नाही. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाचे प्रबोधन केले. त्यांचे विचार हे शाश्वत आहेत, असेही त्यनी सांगितले.

यावेळी आमदार श्री. शेळके परिसरात होऊ घातलेल्या विकास कामांची माहिती दिली.

००००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा

अकोला दि. 4: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा जाणून घेतल्या.

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती व बुलढाणा जिल्हा दौऱ्यानंतर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले.  जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख  व इतर अधिका-यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे भेट देऊन तेथील पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली. आगमनानंतर राज्यपालांना जिल्हा पोलिस दलाकडून मानवदंना देण्यात आली.

राज्यपालांनी शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रारंभी राज्यपालांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याची वैशिष्ट्ये, विकास कामे स्थितीबाबत जाणून घेतले. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सादरीकरण केले.

लोकप्रतिनिधींशी चर्चा

राज्यपालांनी जिल्ह्यातील आजी व माजी विविध लोकप्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली. खासदार अनुप धोत्रे, विधान परिषद सदस्य वसंत खंडेलवाल, अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य रणधीर सावरकर, हरिश पिंपळे, माजी विधानसभा सदस्य नारायण गव्हाणकर, लक्ष्मणराव तायडे, तुकाराम बिरकड माजी विधान परिषद सदस्य वसंतराव खोटरे आदी उपस्थित होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्गठनाबाबत निश्चित कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लोकप्रतिनिधी, तसेच विविध गटांनी यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्या, सिंचन अनुशेष, विविध कार्यालयांतील रिक्त पदे यासारखे विविध विषय मांडले. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

अकोला येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी सकारात्मकपणे कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. कृषी क्षेत्रात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबवावीत.   शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रत्येक तालुका, तसेच स्थानिक क्षेत्राचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना केल्या पाहिजेत.  शहरालगतच्या नद्या स्वच्छ राखण्यासाठी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रयत्न व्हावेत. नद्या प्रदूषित होणार नाहीत, यासाठी वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करावी. कृषी विद्यापीठातील मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

पक्ष प्रतिनिधी, तसेच उद्योजकांशी चर्चा

अकोला इंडस्ट्री असोसिएशन, लघुउद्योग भारती, एमआयडीसी इंडस्ट्री असोसिएशन, विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींशी चर्चा करून राज्यपालांनी उद्योग क्षेत्रापुढील अडचणी जाणून घेतल्या. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून त्यांनी विकासप्रक्रियेबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कला, साहित्य, वाणिज्य, संस्कृती, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात उमेद जीवनोन्नती अभियानात महिला बचत गटाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलला राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी भेट दिली व तेथील उत्पादनांबाबत माहिती घेतली.

00000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन

पुणे, दि. ४: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येरवडा येथील भाजी मंडईच्या नूतनीकरण कामाचे तसेच शास्त्रीनगर चौक येथील उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर आदी उपस्थित होते.

शास्त्रीनगर चौक येथील नियोजित उड्डाणपूल :

पुणे महानगर पालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या शास्त्रीनगर चौक येथील नियोजित उड्डाणपूलाचे काम झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होऊन चौकातील वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होणार आहे. या पुलाचा अंदाजित बांधकाम खर्च ९७ कोटी रुपये आहे.

नियोजित मंडई इमारतीची वैशिष्ट्ये :

येरवडा येथील सद्या अस्तित्वात असलेल्या भाजी मंडईच्या ठिकाणी पार्किंग, तळमजला आणि पहिला मजला अशी तीन मजली नवीन इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. नियोजित प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे १० कोटी रुपये इतका आहे.

नियोजित इमारतीत पार्किंग मजला सेमी बेसमेंट स्वरूपाचा असून त्यात ३७० दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच शीत साठवण गृह (कोल्ड स्टोरेज), लोडींग, अनलोडींगची व्यवस्था केलेली आहे. तळ मजल्यावर भाजी मंडई व फळ मंडई प्रस्तावित असून प्रत्येकी १०० गाळ्यांची व्यवस्था असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर मटण व मच्छी मार्केट प्रस्तावित आहे. पहिल्या मजल्यावर येण्यासाठी लोकांसाठी लिफ्टची सोय केली आहे. मालासाठी स्वतंत्र गुड्स लिफ्टची सोय केलेली आहे.

पार्किंग मजला, तळ मजला आणि पहिला मजला यांचे बांधकामाखालील एकूण क्षेत्र (बिल्ट अप एरिया) ७ हजार ५२ चौरस फूट प्रस्तावित आहे.

0000

महाराष्ट्र आणि जर्मनीचे परस्पर संबंध अधिक मजबूत होतील – मंत्री दीपक केसरकर

मुंबई दि. ४:  भारत आणि जर्मनीमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याचप्रमाणे मुंबई आणि स्टुटगार्ट या सिस्टर सिटी असून महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग या राज्यांमध्ये झालेल्या कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या करारामुळे भविष्यात हे संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ‘डे ऑफ जर्मन युनिटी २०२४’ निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जर्मन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, जर्मनीमधील व्यावसायिक शिक्षण उच्च दर्जाचे असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात देखील व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे. दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण होत आहे. सर्व क्षेत्रात प्रगती साध्य करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर समन्वयाने काम करूया, असे सांगून श्री. केसरकर यांनी मुंबईतील जर्मन नागरिकांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी महाराष्ट्र आणि बाडेन वुटेनबर्ग राज्यांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी झालेल्या करारामध्ये मंत्री श्री. केसरकर यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन ‘डे ऑफ जर्मन युनिटी’ साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद

मुंबई, दि. ४ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठीजनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी  विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी शुक्रवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे , शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री नामदेव कांबळे , कवी प्रवीण दवणे, कौशल इनामदार, गायिका वैशाली सामंत, नरेंद्र पाठक, अभिनेत्री मधुरा वेलणकर, आदित्य दवणे, निकिता भागवत, कवी दुर्गेश सोनार, बळीराम गायकवाड, कवी प्रवीण देशमुख, ग्रंथालीच्या प्रा. लतिका भानुशाली, अरुण जोशी या नामवंतांनी श्री. फडणवीस यांची भेट घेऊन निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी श्री. फडणवीस यांनी नम्रपणे सांगितले की, आपण जे माझे स्वागत केले ते मी आपला एक प्रतिनिधी म्हणून स्विकारत आहे. सर्व मराठीजनांनी एकमेकांचे अभिनंदन करण्याचा आजचा हा दिवस आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा विषय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत बहुप्रतिक्षीत असा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. शतकानुशतकं ज्या मराठी भाषेने प्रेरणा, विश्वास, शौर्य, करुणा आपणां सर्वांना दिली, अशा आपल्या मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्यानंतर आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले. मराठी भाषा प्रसार आणि प्रचारासाठी राज्य शासन म्हणून जी भूमिका घ्यायला हवी आणि काम करायला हवे ते आम्ही निश्चित करु अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. मात्र त्याचवेळी मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा न राहता, ती ज्ञान भाषा कशी होईल तसेच आजच्या युगात मराठी भाषेला ज्ञान भाषा म्हणून कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल याचा आपण विचार करून त्यादिशेने सर्वांनी प्रयत्न करुया असेही त्यांनी सांगितले.

 

००००

मावळ तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ४:  मावळ तालुक्यात लोणावळ्यासारखे पर्यटनस्थळ आहे, श्री.एकवीरा देवी सारखे तीर्थ क्षेत्र असून तालुक्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

मावळ तालुक्यातील कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुनील शेळके, तहसिलदार विक्रम देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मावळ तालुक्याच्या विकासासाठी शासनाने ४ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे केली आहे. त्या तरतुदीतून अनेक विकास कामे सुरू आहेत. नदी सुधार प्रकल्प अंतर्गत पीएमआरडीएकडून इंद्रायणी नदी साठी ७९३ कोटी रुपये तर पवना नदीसाठी १५७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

लोणावळ्यासारख्या पर्यटनस्थळी अधिकचे पर्यटक आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. कार्ला येथील श्री एकवीरा देवी तीर्थ क्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना विविध सुविधासाठी,सर्व उपाय योजना करण्यात येत आहे. या तालुक्याचा विस्तार होत आहे. उद्योगांची वाढ होत असून अतिरिक्त सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

काल मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची ऐतिहासिक बाब घडली आहे. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा दिवस आहे. राज्य शासनाने यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा क्षण प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या भाषेची समृद्धी आणि वारसा जपण्यास हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते दसरा दिवाळी सण लक्षात घेऊन १० ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात  जमा होतील.

शासनाने सर्व सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली.मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र योजना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

राज्यात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसेसमधून प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली जाते. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवासादरम्यान वाहक शून्य मूल्य वर्ग तिकीट देण्यात येते. महिला सन्मान योजनेअंतर्गत ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.  सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत या सारख्या संस्थेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील विद्यार्थांना शैक्षिणक मदत करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी आमदार श्री. शेळके यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील विविध कामाचे लोकार्पण तर विविध विकासकामाचे भूमिपूजन केले.

०००

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...