शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 446

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न – आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. ९ : गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात ३ हजार ७५० कोटींच्या आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापूर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले. आज नंदूरबारमधून राज्यातील १२० आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात श्री. गावित बोलत होते.

शहरातील पटेलवाडी स्थित असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाच्या प्राणंगणातून आदिवासी विकासमंत्री यांच्या हस्ते राज्यातील २ हजार ३०० कोटी रुपये किमतीच्या १२० इमारतींचे दृरदृश्य प्रणालीद्वारे राज्यभरात भुमीपुजन, पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, दृकश्राव्य प्रणाली द्वारे आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त नयना गुंडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांसह राज्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, धुळ्याचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, आदिवासी बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता निरज चौरे आदिंसह विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि वसतिगृहांचे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाचा मंत्री झाल्यानंतर शिक्षण विभागात कशी सुधारणा करता येईल यासाठी  योजनांचे काही नियोजनबद्ध आराखडे तयार करुन त्याच्या पुर्णत्वासाठी काम केले.  आदिवासी बांधवांना जोपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत नाही, त्याबद्दल  जागृती होत नाही, आलेल्या संधीचा उपयोग आदिवासी बांधवांना घेत नाही तोपर्यंत आदिवासी विकास विभागाचा विकास होवू शकत नाही, त्यामुळेच शिक्षणाची अद्यायवत दालने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभी केली.  यापूर्वी आदिवासी विकास विभागाचा मंत्री असताना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, निवासाची सोयी उपलब्ध करुन दिल्या तर आज सर्व इमारतींमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम केले.  आज राज्यातील आदिवासी विकास विभागाची ज्या ठिकाणी स्वमालमीची जागा उपलब्ध आहे त्या प्रत्येक ठिकाणी इमारतींना निधी उपलब्ध करुन दिले आहेत. आज राज्यात एकाच वेळी 2 हजार 300 कोटी रुपयांच्या 120 इमारतींचे भूमिपूजन आणि उद्घाटन आपण केले आहे. यातील 46 इमारती या एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. तर या 46 पैकी 30 इमारती ह्या अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील असल्याने शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुरवण्याचा आमचा ध्यास असल्याचे यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले.

महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग निर्माण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात इमारतींवर पहिल्यांदा खर्च करण्यात येत आहे. या जिल्ह्यामधील विभागाच्या 90 टक्के इमारती बांधकामासाठी घेतल्या असून दहा टक्के राहीलेल्या इमारतीमध्ये या पुढच्या काळामध्ये आम्ही आश्रम शाळांमध्ये सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत. पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे आश्रमशाळा आहे तिथे सर्व कर्मचारी, शिक्षकांची  निवासस्थाने त्या ठिकाणी बांधून पुर्ण होतील, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी चांगल्या रितीने फायदा होऊ शकेल. या सोबत विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण पाहता विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही संस्थासोबत करार देखील केला असल्याचे यावेळी मंत्री श्री. गावित यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. विभागाच्या आश्रमशाळांमध्ये डिजीटल लायब्ररीची सोय उपलब्ध करुन दिली जाणार असून यातून विद्यार्थ्याचे ज्ञान वृद्धींगत होण्यासोबतच त्याच्या शंकेचे निरसरण देखील होणार आहे. राज्य शासनाने मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे. मात्र आदिवासी विद्यार्थीनी ह्या खऱ्या अर्थाने भाग्यवान असून त्यांना याआधीच आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  तसेच विभागाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम् योजनेतून देखील आर्थिक मदत देण्याचे काम विभागाकडून केल्या जात आहे. विभागाने काही विषय तज्ञ शिक्षकांची विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी निवड देखेली केली आहे. सुट्टीच्या दिवशी हे विषय तज्ञ ऑनलाईन पद्धतीन आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्याचे काम करणार असल्याचे देखील यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले. पाचवीपासूनच काही गुणवंत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत स्पर्धा परिक्षांसाठी तयार केले जाणार असून याचा फायदा त्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये होणार असल्याचे देखील यावेळी ते  म्हणाले.

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील अभिरुची पाहता आदिवासी विकास विभागातील प्रत्येक अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक स्वंतंत्र खेळाडूंची आश्रमशाळा तयार करुन याठिकाणी आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांना त्याच्या अभिरुचीच्या खेळात प्रशिक्षित करण्याचा निर्णयदेखील विभागाने घेतला असल्याचे यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. यासोबत 1 हजार 497 क्रिडा, कला, संगणक शिक्षकांच्या भरतीसही मान्यता देण्यात आली असून एक दोन दिवसात त्यांच्या भरतीची जाहिरात निघणार असल्याचे सांगत विभागात मागच्या काळातील 835 क्रीडा शिक्षकांना मान्यता देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्तीय महामंडळाला यंदा आदिवासी विकास विभागाने 50 कोटीं दिले असून यातून आदिवासी बांधवांना उद्योग धंदे, विविध व्यवसाय सुरु करण्यास चालना मिळणार आहे. पेसा उपयोजना क्षेत्राची 40 वर्षानंतर पुर्नरचना करुन राज्य सरकारने त्याला मान्यता देत राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविल्याचे देखील मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. जिल्ह्यातील 16 सोंगाड्या पार्टीना प्रोत्साहण देण्यासाठी त्यांना साहीत्य खरेदी करण्यासाठी मदतनिधी दिला आहे. सोंगाड्याच्या माध्यमातून संस्कृती टिकण्यासोबत समाज प्रबोधनाचे काम देखील होणार असल्याचे मंत्री डॉ. गावित यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. गावित यांनी विद्यार्थ्यांना विभागाच्या विविध योजनेच्या माध्यमातून गुणवत्ता पुर्ण शिक्षण घेवून जिल्ह्याचे आणि समाजाचे नावे उंचावण्यासाठी ध्येय बाळगण्याचे आवाहन केले. आदिवासी विकास विभागामार्फत पहिल्यांदाच अशा पद्धतीने दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात भुमीपुजन आणि लोकार्पण सोहळा होत असल्याने आदिवासी विकास विभाग विकासाची कास धरत असल्याचे हे उदाहरण असल्याचे डॉ. गावित म्हणाल्या.

यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रस्तावना करतांना विभागाचे सचिव यांनी विभागाच्या विविध योजनांसोबत विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण आणि आहार देण्यासाठी आदिवासी विकास विभाग विविध योजना राबवत आहे, यासाठी अधिकारी, कर्मचारी चांगले काम करत असल्याचे यावेळी सचिव विजय वाघमारे म्हणाले. बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या चांगल्या समन्वयाने बांधल्या गेलेल्या इमारती या उत्कृष्टतेचे उदाहरण असून राज्यातील आश्रमशाळांमध्ये ७२ नमो केंद्र देखील उभारले जात असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पायाभरणीसाठी असे निर्णय महत्वाचे असल्याचे देखील यावेळी बोलतांना सचिव विजय वाघमारे म्हणाले.

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच.ई.डी.मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. ९ : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच.ई.डी.मोहम्मद मुईज्जू यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने प्रयाण झाले.

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी निरोप दिला. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त मुनु महावर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव अंशू सिन्हा, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गावंडे तसेच पोलीस दलाचे व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पोहरा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ९५७ कोटींचा प्रकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 9 : दक्षिण सिवरेज झोनमधून वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे पोहरा नदी अत्यंत प्रदूषित झाली आहे. या नदी मध्ये होणारे प्रदूषण कायम स्वरूपी बंद करण्यासाठी तसेच नैसर्गिक जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता 957 कोटी रूपयांचा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे  दक्षिण सिवरेज झोनमधील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात सुमारे 1 हजार 300 कोटींच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार  सर्वश्री प्रविण दटके, डॉ.परिणय फुके, आशिष जसस्वाल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, मनपाच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पामुळे दक्षिण सिवरेज झोनमध्ये वाहणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामुळे नागनदीप्रमाणेच पोहरा नदी सुध्दा प्रदूषणमुक्त होईल. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर निघणाऱ्या पाण्याचा इतर प्रयोजनासाठी पुर्नवापर करणे शक्य होणार आहे. सिवरेज लाईनचा प्रश्न  पूर्णपणे सुटणार असल्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न  सोडवण्यासाठी तसेच अधिक सक्षम करण्यासाठी ‘इंटिलिजेंट इंटीग्रेटेड ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ सुरु करण्यात येत असून या व्यवस्थेमुळे शहरातील सर्व १६४ स्वयंचलित वाहतूक नियंत्रकाचे नुतनिकरण करण्यात येणार आहे. त्यांना मुख्य सर्व्हरशी जोडल्यानंतर वाहतुक नियंत्रण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. या बदलामुळे वाहतुकींच्या नियमांचे कठोरपणे पालन होवून वाहतुक सुरळीत होण्यास मदत होईल. या प्रणालीसाठी 197 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

शहरातील विविध विकास कामांमध्ये नवीन टाऊन हॉल इमारतीचे बांधकाम, बाळासाहेब ठाकरे प्राथमिक  शिक्षण, कला व सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम, कृत्रिम विसर्जन कुंड्याचे बांधकाम, शहरातील सौंदयीकरण, दक्षिण -पश्चिम क्षेत्रातील जयताळा व गायत्रिनगर जलकुंभाचे लोकार्पण  तसेच चंद्रनगर, सर्वत्रनगर, वैभवनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

शहराच्या सर्वच भागात चोवीस तास पाणी पूरवठा

नागपूर शहरातील नागरिकांना काही भागात चोवीस बाय सात पाणी पुरवठा करण्यात येत असून शहरातील अपुर्ण जलकुंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या चार महिन्यात सर्व शहराला चोवीस बाय सात पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल. अशी माहिती केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नागपूर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे तसेच जल, वायू व ध्वनी प्रदर्शनापासून मुक्त करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटींची कामे सुरु करण्यात येत आहेत. या कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण होतील. शहरात लहान ड्रेनेज लाईन असल्यामुळे या व्यवस्थेत बदल करुन ही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठीचे कामे उच्च दर्जाची व्हावी तसेच नागनदी प्रदूषणमुक्त करण्यासोबत शहरातील नागरिकांनी  सीएनजी व इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.

 

प्रारंभी महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी प्रास्ताविकात विविध विकास कामांची माहिती दिली.

यावेळी रामबाग येथील झोपडपट्टीधारकांना कायम स्वरुपी पट्टे वाटप, शबरी आदीवासी घरकुल योजनेंतर्गत घराचे वाटप , आशासेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन मनिष सोनी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त अजय चारखाणकर यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

चिंचवड महानगर पालिकेअंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमिपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जवळपास १ हजार ७०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन घेण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी असून हे शहर चहूबाजूंनी वाढले आहे. पिंपरी चिंचवडकडे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जाते. मुंबईप्रमाणेच हे शहर कोणाला उपाशी ठेवत नाही, निराश करत नाही. त्यामुळे मुंबई प्रमाणेच हे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ होप’ आहे.

या शहरात सांस्कृतिकदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथे आयोजन करण्यात आले. आपली मातृभाषा मराठीचा अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर प्रधानमंत्री यांनी अभिजात भाषेत समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

लोकसंख्या जास्त असल्याने या शहरात पायाभूत सुविधा देण्यासह शहर नियोजनबद्ध वाढले पाहिजे या दृष्टीकोनातून रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहराला योग्य दाबाने पुरेसे पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनीही वाहतूक शिस्त राखून सहकार्य करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने तसेच अन्य आवश्यक बाबी देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सर्व समाजघटकांना लाभ देण्याच्या दृष्टीने लाडकी बहिण योजना, मोफत ३ गॅस सिलेंडर, गरीब मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याची योजना आणली. तसेच शेतकऱ्यांसाठी वीजमाफीची योजना, दुधाला अनुदान देण्याची योजना, जन्माला आलेल्या मुलीला १ लाख १ हजार रुपये टप्प्या टप्प्याने देण्याची योजना, केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेंतर्गत देशात करावयाच्या ३ कोटी पैकी महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी करण्यात येणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या सर्व योजना सुरूच राहतील

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा होत असल्याने राज्याचा सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळतो. राज्याला आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे, अनावश्यक खर्च थांबविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, वस्तू व सेवा कर (जीएसटी), उत्पादन शुल्क आदी कराची रक्कम शासनाच्याच तिजोरीत यावी, नोंदणी शुल्काचे उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या कोणत्याही योजना थांबणार नाहीत, सर्व योजना चालूच राहतील.

चुकीचे प्रकार, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत. या शहरात माय माता, मुली, बहिनी सुरक्षित रहाव्यात, चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी शहरात सीसीटिव्हीची नजर आहे. कोणतेही चुकीचे प्रकार, दहशत, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. मुली, स्त्रियांनी देखील काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींची सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार काम व्हावे, असेही ते म्हणाले.

माता रमाईंचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही

पिंपरी चिंचवड येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या पीएमपीएमएलच्या जागेत माता रमाईंचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विविध समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आदीवासी समाजाकरिता टार्टी संस्था, मातंग समाजाकरिता आर्टी, मराठा समाजाकरिता सारथी, इतर मागासवर्गीय समाजाकरिता महाज्योती, आर्थिक मागास समाजाकरिता अमृत संस्था, बंजारा समाजाकरिता वनार्टी, अल्पसंख्य समाजाकरिता मार्टी या संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या माध्यमातून या समाजातील मुला-मुलींना शिक्षण, प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

याशिवाय अनेक समाजांकरिता वेगवेगळी महामंडळे काढलेली आहेत. अजून काही घटक समज राहिलेले असतील त्यांचाही यासाठी विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुळा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा टप्पा 1 चा शुभारंभ होत असताना नदीच्या एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका असल्याने पुणे महानगरपालिकेलाही त्याचवेळी निविदा करण्यास सांगितले असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी होऊन चांगले काम होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रास्ताविकात आयुक्त श्री. सिंह यांनी पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. पूल, रस्ते, भुयारी मार्ग, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आदींबाबत माहिती दिली.

त्यापूर्वी श्री. पवार यांच्याहस्ते कळ दाबून विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पांची माहिती असलेली आणि आयसीसीसी प्रकल्पाच्या माहितींच्या  चित्रफीती दाखविण्यात आल्या.

झोपडपट्टीधारकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी सदनिकांची चावी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. महानगरपालिका आणि सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी व १२ वीच्या मुलींसाठी सुरू केलेल्या कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमांतर्गत मुलींना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले.

राज्यातील फळांना जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ९:  राज्यातील शेतकऱ्यांच्या फळांना व पिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना चांगला बाजारभाव मिळवून देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. द्राक्ष, केळी, हापूस आंबा आणि डाळिंब आदी फळांना जागतिक जागतिक स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, याकरिता राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

झारगडवाडी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने येथे मंगळवारी (दि. ८ ऑक्टोबर)  आयोजित नवीन उपबाजार आवार भूमिपुजन आणि महाराष्ट्र शासन आणि आशियाई विकास बँक अर्थसह्ययीत मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे जळोची उपबाजार येथे फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक तथा सरव्यवस्थापक विनायक कोकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बाजार समितीचे उपसभापती निलेश लडकत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, सरपंच अजित बोरकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची असून त्यांच्या कष्टाचा सन्मान करुन शेतमालाला योग्य प्रकारे मोबदला मिळाला पाहिजे. ग्राहकाला दर्जेदार सेवा दिली पाहिजे, व्यापारी आणि हमालमापडी यांची सोय व्हावी असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

राज्यात १ हजार १०० कोटी रुपयांचा मॅग्नेट प्रकल्प २०२१-२२ ते २०२७-२८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत  तालुक्यातील डाळिंब, पेरु, द्राक्ष, केळी, आंबा अशा पिकांना चांगली बाजारपेठ मिळावी, निर्यातक्षम चांगले व्यापारी मिळावे, शेतमालाची व्यवस्थितपणे साठवणूक व्हावी या उद्देशाने बारामतीच्या वैभवात भर पडणारी अतिशय देखणी आणि अत्याधुनिक सोई-सुविधायुक्त फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधा केंद्राचा शेतकरी व ग्राहकाला मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून ग्राहकाला ताजी, दर्जेदार फळे व पीके मिळणार आहेत. परिसरातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

राज्य शासनाने पुढाकार घेऊन कांदा व तांदूळ पीकांची निर्यातबंदी उठवली आहे. दूधउत्पादक शेतकऱ्याला 7 रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. उत्पादन क्षेत्राजवळ शेतमालांचे संकलन आणि प्रतवारीची सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्याकरीता कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उत्पादन घ्यावे, असेही ते म्हणाले.

अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्रित येवून सामूहिक विक्रीवर भर दिला पाहिजे, अत्याधुनिक संशोधन परदेशातून आयात केल्यास तसेच मूल्यसाखळी, विमा संरक्षण, निर्यात प्रोत्साहन, उत्पादन संस्थांना प्रोत्साहन आणि व्यासायिक दृष्टीकोन विकसित करुन राज्यातील फळे जागतिक पातळीवर नेण्यास साध्य येईल, असे सांगून भाजीपाल्याचे होणारे नुकसान टाळण्याकरिता शीतसाखळीगृह उभारणीवर दिला पाहिजे.

झारगडवाडी येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन उपबाजाराकरीता १ रुपये  नाममात्र दराने शासनाने दिली असून बाजार समितीची ८ कोटी रुपयांची बचत झाली आहे. याकरिता झारगडकरांनी २१ एकर जमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. नवीन उपबाजारामुळे परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

 

यावेळी श्री. कदम यांनी फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्रातील सुविधेबाबत माहिती दिली. सभापती श्री. पवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

फळे व भाजीपाला हताळणी सुविधा केंद्राविषयी माहिती

या केंद्रात प्रत्येकी १०० मे.टनाचे ७ कोल्ड स्टोरेज, ३० मे.टन क्षमतेचे प्रिकुलींग युनिट, पॅक हाऊस,  द्राक्ष, केळी व डाळिंबासाठी ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकिंग लाईन, फ्रोजन फ्रुट स्टोरेज, ब्लास्ट फ्रिजर, सोलर सिस्टीम, फायर फायटिंग व विद्युतीकरण, मटेरिअल रिसिविंग व डिसपॅच एरिया, स्वच्छता गृह, कॅन्टिन व निवास व्यवस्था, पॅकिंग मटेरिअल स्टोरेज, टेस्टिंग लॅब आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू

छत्रपती संभाजीनगर दि. ८ (जिमाका ):  केंद्र सरकार देशातील सर्व घटकांची प्रतिष्ठा जपत, त्यांचा विकास ,सक्षम करण्यासाठी अल्पसंख्याकांसह दुर्बल व गरजू घटकांच्या समृद्धीसाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनी सिल्लोड येथे केले.

सिल्लोड येथे प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत राज्यातील पहिले अल्पसंख्याक मुलां – मुलींसाठी 36 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या वसतिगृह बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजीजू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, राज्याच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव रिचा बागल, उपसचिव श्याम वर्मा, उपसचिव मोईन ताशीलदार, औकाफ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद बशीर सय्यद, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री श्री. रिजीजू म्हणाले की, केंद्र सरकार, अल्पसंख्याक समुदायांसह समाजतील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अभियानांच्या माध्यमातून सर्व घटकांना समान लाभ आणि सुविधा मिळवून दिल्या जात आहे.सरकारच्या या दृष्टीकोनामुळे देशातील अल्पसंख्याक समुदायांना शैक्षणिक आणि सामाजिक-आर्थिक विकासात साथ लाभत आहे. महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. केंद्र सरकार गरिबांचे आहे.

सिल्लोड येथे अल्पसंख्याक समाजाच्या मुलां – मुलींसाठी स्वतंत्र राज्यातील पहिले वसतिगृह उभारण्यात येत असून  प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत यासाठी  35 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या वसतिगृहात 250 मुलं तर 250 मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणार असून यामध्ये केंद्राचा हिस्सा 21 कोटी 36 लाख तर राज्याचा हिस्सा हा 14 कोटी 24 लाख रुपयांचा असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीची कमतरता भासू दिली नाही असे सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार मानले.

अल्पसंख्याक प्रवर्गातील लाभार्थी व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना विभागातर्फे राबविण्यात येतात. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची हमी रक्कम 30 कोटीवरून 500 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे  व्यवसाय, उद्योग, शिक्षण यासाठी कर्ज मागणाऱ्या प्रत्येकाला कर्ज उपलब्ध होणार आहे. शैक्षणिक कर्जासाठी शासकीय अधिकारी हमीदार असावा, अशी अट आहे. ही अट काढून टाकू. यामुळे कर्ज मिळणे अधिक सोपे झाले, असे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी संगितले.

अल्पसंख्याक प्रवर्गाला इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. विभागाची आर्थिक तरतूद देखील वाढविण्यात आली आहे. या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यात येत असल्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाचे प्रमाण 3 लाखावरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. परदेशात नामांकित विद्यापिठात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना भविष्यात 40 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. अल्पसंख्याक प्रवर्गातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी गटाच्या महिलांना 2 लाख रुपये कर्ज देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम 25 हजारावरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वाटप केली जावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले, देवेंद्र सूर्यवंशी यांनी सुत्रसंचालन तर माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आभार मानले.

०००

जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘अमरावतीचे वनवैभव’ कॉफी टेबल बुकचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

अमरावती दि. (जिमाका): जिल्ह्यातील वनराईने नटलेले वनवैभव, त्यातही मेळघाट परिसरातील निसर्ग वनसंपदा व वन्यजीव असा नैसर्गिक ठेव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यास खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलीस उपायुक्त  शिवाजी शिंदे, सागर पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्हा माहिती कार्यालयनिर्मित ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल बुकच्या निर्मितीसाठी माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांचा पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते  सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले,  ‘अमरावतीचे वनवैभव’ या कॉफी टेबल पुस्तकात मेळघाटातील नयनरम्य निसर्ग सौंदर्य, अरण्यसंपन्न मेळघाटातील वन्यजीव, जैवविविधता यासह आदिवासी संस्कृती यांची उत्तम छायाचित्रासह माहिती देण्यात आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक वारसा, वनसंपदा, कोरकू बांधवांची संस्कृती, चालीरीती यांची दुर्मिळ छायाचित्रे ही कॉफी टेबल बुकची वैशिष्ट्य आहेत.

अमरावतीचे वनवैभव हे कॉफी टेबल पर्यटन क्षेत्राला सहाय्यभूत तसेच संदर्भग्रथ म्हणून निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. पर्यावरणीय मूल्य जाणून जीवसृष्टीचे स्वरूप आणि वनसंपत्तीचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. यामुळे यावर आधारित कॉफी टेबल बुक हे महत्त्वाचे पाऊल आहे .जिल्ह्यामध्ये येणारे पर्यटक अभ्यासक यांनाही हे पुस्तक फायदेशीर ठरणार आहे, असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.

कॉफी टेबल बुकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

 

चंद्रपूरला औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ८ : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. देशाच्‍या विकासात चंद्रपूरची भूमिका महत्‍त्त्वाची आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पुढे जावा या दृष्टीने मार्च महिन्यामध्ये ॲडव्हान्टेज चंद्रपूरचे आयोजन केले गेले. या ॲडव्हान्टेज चंद्रपूरमध्ये विविध कंपन्यांनी सामंजस्य करार (MOU) केलेत. त्याचा लाभ स्थानिक परिसराला प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मितीतून होईल. यातून देशाच्‍या विकासात हातभार लागणार असून चंद्रपूर औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा कल्पना पलीकुंडवार, उपाध्यक्ष पदमकुमार नायर, राहुल पावडे, मनोज सिंघवी, सुभाष कासनगोट्टूवार तसेच इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील विकासासाठी योगदान देण्याची इच्छा मनात होती, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, ‘पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर एमआयडीसी स्थापन करण्यात येत आहे. लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात. त्‍या माध्‍यमातून प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, त्यादृष्टीने प्रवास सुरू झाला आहे. या माध्यमातून हा जिल्हा महाराष्ट्रात निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या जिल्ह्यातील महामार्ग, समृद्धी महामार्ग पोंभुर्णा ते गडचांदूरपर्यंत जोडण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल यादृष्टीने कार्य केले जात आहे. तेलंगणा राज्याशी व्यावसायिक, व्यापारी आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी नागपूर-हैदराबाद ही वंदे भारत ट्रेन जोडण्याचे कार्य केले. वंदे भारत ट्रेनला नागपूर-सिकंदराबादच्या मध्ये चंद्रपूर व बल्लारशा येथे थांबा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कौशल्य विकास उद्योगांमध्ये यावे या दृष्टीने एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे 600 कोटी रुपयांचे उपकेंद्र तयार होत आहे. ज्यामध्ये महिलांना 62 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील आय.टी.आय. मधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी आय.टी.आय. अत्याधुनिक करण्यात येत आहे. बल्लारपूरचे आय.टी.आय. मॉडेल करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल मनुष्यबळ उद्योगधंद्यांना पुरविण्यात येत आहे, औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या ज्ञानाचा, परिश्रमाचा आणि कष्टाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करू शकतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आणल्या. सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. चंद्रपूरमध्ये होणारे कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा बघितल्यास अभिमान वाटेल. अशी सर्वोत्तम कामे करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याकरिता गौरवाची बाब

चंद्रपूरमध्ये दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले असून आता चंद्रपूरचे नाव देखील देशाच्या बाहेर जात आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या गर्भगृहापासून तर प्रत्येक द्वार बल्लारपूरच्या काष्ठापासून तर संसदेचा प्रत्येक दरवाजा बल्लारपूरच्या काष्ठापासून तयार झाले आहे. पुन्हा एक पाऊल पुढे टाकत पीएमओचे संपूर्ण कार्यालय बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होत आहे. पंतप्रधानांची सर्वोच्च खुर्ची देखील बल्लारपूरच्या लाकडापासून निर्मित असेल ही गौरवाची बाब असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी   

जोधपूर हे देशातील सर्वात जास्त फर्निचर एक्सपोर्ट करणारे केंद्र आहे. येथून साधारणत: वर्षाला 300 कोटी रुपयांचे फर्निचर एक्सपोर्ट केल्या जाते. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एम.आय.डी.सी.तील 10 एकर जागेमध्ये जगातील सर्वात उत्तम फर्निचरचे काम सुरू करण्यात येत असून चंद्रपूरच्या एफ.आय.डी.सी.मधून फर्निचर एक्सपोर्टमध्ये चंद्रपूर जोधपुरलाही मागे टाकेल, या दृष्टीने काम करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण

बारामती, दि.८: बारामती वकील संघटनेच्यावतीने आयोजित संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शक्ती अभियानाअंतर्गत शहरातील शाळेस प्रातिनिधिक स्वरुपात ‘शक्ती पेटी’ चे वितरण करण्यात आले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर बर्डे, उपाध्यक्ष ॲड.प्रिती शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.

शहरातील विद्या प्रतिष्ठान हायस्कुल,  विद्या प्रतिष्ठानचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज हायस्कुल, सातव हायस्कुल, न्यायालय परिसर, या ठिकाणी ‘शक्ती पेटी’चे वितरण करण्यात आले. यावेळी शक्ती पेटी पथकाला किटचेही वाटप करण्यात आले.

०००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या राज्यातील विविध प्रकल्पांचे ई -भूमिपूजन, उद्घाटन

मुंबई, दि. ८ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या ९ ऑक्टोबर रोजी राज्यात ७ हजार ६४५ कोटी रुपयांहन अधिक किंमतीच्या विविध प्रकल्पांच्या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर व शिर्डी विमानतळ येथील कामांचे भूमिपूजन आणि राज्यातील नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथील विविध कामांचे व शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील नवीन टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आणि नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उ‌द्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नवीन १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन

केंद्र सरकारने नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली असून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 900 नी वाढ होणार आहे. एकूण 35 महाविद्यालयात प्रतिवर्ष 4850 एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. एकाच शैक्षणिक वर्षात मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि अंबरनाथ (ठाणे) अशा 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीच्या ऐतिहासिक निर्णयांमुळे ग्रामीण व दूरस्थ भागात विशेषोपचार आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत अंदाजे 7000 कोटी रुपये असून

सर्व आकारांच्या विमानांसाठी योग्य स्वतंत्र संचालनासह दोन समांतर धावपट्टी, विद्यमान धावपट्टीचे विस्तारीकरण आणि नवीन धावपट्टीचे निर्माण, दरवर्षी 14 दशलक्ष प्रवाशांच्या हाताळणीसाठी 3 लाख चौ. मी. च्या नवीन टर्मिनल इमारतीचा विकास, अंदाजे 9 लाख मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन कार्गो कॉम्प्लेक्सचा विकास करण्यात येणार आहे. एकाच वेळी सुमारे 100 विमाने सामावून घेण्यासाठी पार्किंग बे करण्यात येणार आहे.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवीन एकीकृत टर्मिनल इमारतीची अंदाजित किंमत – अंदाजे 645 कोटी रूपये असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे. प्रवासी वहन क्षमतेमध्ये वाढ आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. विस्तारित टर्मिनल इमारतीमुळे शिर्डीमधील स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.

०००

 

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...