शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 447

कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. ८: जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृहपयोगी साहित्याचे वाटप करुन त्यांच्या संसाराला हातभार लावण्यात येत आहे. या ठिकाणी 4 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली असून एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन तत्पर असून कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्लारपूर येथे कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला कामगार विभागाचे नोंदणी अधिकारी सचिन अरबट, चंदनसिंह चंदेल, अजय दुबे, काशीनाथ सिंग, राजीव गोलीवार, दिनेश गोंदे, अशोक सोनकर, रामजनम चक्रवती, आकाश ठुसे आदी उपस्थित होते.

एकमेकांना सहकार्य केल्याशिवाय विकासाच्या बाबतीत पुढे जाता येणार नाही, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘याठिकाणी 4 हजार कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. येथून साहित्य घेवून जाताना बहीण चेहऱ्यावर आनंद घेऊन जावी, हा प्रयत्न आहे. राज्य सरकारकडून सर्वांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली. या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विशेष लक्ष देत जिल्ह्यातील 4 लाख 70 हजार बहिणींचे अर्ज मंजूर केले. काही बहिणींचे आधार लिंक नसल्याने पैसे जमा होऊ शकले नाही. मात्र, कोणतीही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आश्वासित केले.

आर्थिक अडचणींमुळे गरीब कुटुंबातील मुली शिक्षण घेऊ शकत नाहीत. आता सर्व प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 100 टक्के मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक वाचनालये उभारण्यात आलीत. तसेच मुली व महिलांमध्ये आकाशाला गवसणी घालण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी कौशल्य विकासाचे दालन उघडण्यात आले आहेत. राज्यशासन बहिणींच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभे आहे. लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांचा हाताला काम मिळेल, याचा विचार देखील शासन करीत आहे.

ते पुढे म्हणाले, मतदारसंघात दोन विशेष योजना केल्यात. यामध्ये सर्व जातींना घरकुल देण्याचा निर्णय घेतला. शबरी आवास योजना फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित होती, आता शहरी भागातही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही घरकुलांच्या अनुदानाची मर्यादा 2.50 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. ज्या कुटुंबांकडे स्वतःच्या हक्काची जमीन नसेल अशा कुटुंबांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजना आणली. त्यासोबतच, चंद्रपूरमध्ये 10 हजार तर बल्लारपूर मध्ये 3 हजार घरे बांधण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांसाठी आयुष्मान भारत, जीवनदायी योजना तसेच मतदार संघातील सर्व हॉस्पिटल उत्तम करण्यात येत आहे. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये, मोफत धान्य, दिवाळीचा आनंदाचा शिधा, महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत, आरोग्याची सुरक्षा आणि घरकुलावर पहिले नाव पत्नीचे राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल

काही दिवसापूर्वी कोरपना येथे बारा वर्षाच्या मुलींवर अत्याचार करण्यात आला. जिल्ह्यात अत्याचारांसारख्या घटना घडू नये यासाठी “लाडकी बहीण सुरक्षित बहीण”अंतर्गत पहिला टप्प्यात सर्व शाळांमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव, संपर्क क्रमांक उपलब्ध असेल. जेणेकरुन, मुली तक्रार करू शकतील व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता येईल. त्यामुळे मुलींची छेडछाड व अत्याचारासारख्या घटना थांबविता येतील. “डायल 112” च्या माध्यमातून गरीब कुटुंबातील कामकाजी महिलांचे संरक्षण व सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. एखादी कामकाजी महिला रात्रीच्या वेळी घरी जात असल्यास तिच्या सुरक्षिततेसाठी पोलीस मित्रांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात येत असून कामकाजी महिलांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यात येईल. यासोबतच, लाडक्या बहिणींच्या समस्या सोडविण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.  मुनगंटीवार म्हणाले.

बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप

रवींद्र सोनटक्के, छाया वैरागडे, आकांक्षा चांदेकर, पिंकी हजारे, मनोज वैरागडे, छाया साळवे, रवी टोंगे, नरेश वाटकर, मारुती टोंगे, आकाश गिरडकर आदी बांधकाम कामगारांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

०००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात सणांच्या कालावधीत अन्न व पूरक उत्पादने खरेदीबाबत घ्यावयाची खबरदारी या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागचे आयुक्त डी. आर. गहाणे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

सणासुदीच्या दिवसांत गोडधोड खाद्यपदार्थंची रेलचेल असते. या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप इत्यादी अन्न पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ व उत्पादने उपलब्ध व्हावीत, नागरिकांची कोणतीही फसवणूक होवू नये यासाठी शासनस्तरावर वेळीच विशेष खबरदारी घेण्यात येते. अन्न भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात येणारी देखरेख, नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना घ्यावयाची खबरदारी याबाबत डी. आर. गहाणे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 9 ऑक्टोबर, गुरूवार दि. 10 आणि शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

महाराष्ट्र राज्य लॉटरीची मासिक, साप्ताहिक सोडत जाहीर

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक व ११४ साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र गणपती मालिकेचे ५० लाखाचे तर सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी सोडतीमधून प्रथम क्रमांकाचे सात लाखांची एकूण आठ बक्षीसे जाहीर झाली आहेत. तसेच एकूण एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या विविध रकमेच्या तिकिटांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उपसंचालक (वित्त व लेखा) यांनी दिली आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १० हजारावरील बक्षिसाची मागणी वाय ए -१, अतिरिक्त शॉप कम गोडऊन, एपीएमसी मार्केट, सेक्टर १९ बी, वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे करावी. रक्कम दहा हजाराच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडे करावी. अधिक माहितीसाठी ०२२-२७८४६७२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे उपसंचालक यांनी सांगितले आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र गणपती, महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गणपती विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती जाहीर करण्यात आल्या आहेत.  महाराष्ट्र गणपती मालिका तिकिट क्रमांक GBOO/29466 या समित एजन्सी, मुंबई यांचेकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू. ५० लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्र सोडतीमधून रक्कम रू सात लाखाचे प्रथम क्रमांकाचे आठ बक्षिसे जाहीर झाली आहेत. २२६०७ तिकीटांना रू. एक कोटी पाच लाख ६४ हजार व साप्ताहिक सोडतीतून १८६१४ तिकीटांना रूपये एक कोटी पाच लाख एक हजार ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चा

मुंबई, दि. 8 : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस शासनाच्यावतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने यावर्षीही ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येणार असून ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय ग्रंथावर साहित्य चर्चाʼ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात चर्चक म्हणून डॉ.सुनीलकुमार लवटे व डॉ.अशोक चौसाळकर यांचा सहभाग असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांकरता खुला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांचा पाश्चिमात्य आणि भारतीय ज्ञान परंपरांचा मोठा व्यासंग होता. त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य निर्मिती केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचे हे सर्व दुर्लभ वाङ्मय एकत्रित स्वरुपात 18 खंडांमध्ये प्रकाशित केले आहेत. या ग्रंथावर रविवार, दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यू मिनी थिएटर (करिश्मा थिएटर), पाचवा मजला, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी परिसर, सयानी मार्ग, मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विद्यापीठे, साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कथांचे अभिवाचनʼ हा कार्यक्रम, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन, मराठी विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्याभिवाचनʼ हा कार्यक्रम, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्याख्यान व अभिवाचनʼ हा कार्यक्रम, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी, जि.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्याखान, परिसंवाद व ग्रंथप्रदर्शनʼ हा कार्यक्रम, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवलेखक कथालेखन कार्यशाळाʼ, धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर, जि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवलेखक नाट्यलेखन कार्यशाळाʼ, नारायण देसाई फाऊंडेशन, पवई, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवलेखक कथालेखन कार्यशाळाʼ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

याबरोबरच 1) अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मुंबई 2) मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर 3) मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई 4) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे 5) विदर्भ साहित्य संघ, नागपूर 6) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी 7) दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या सात साहित्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने देखील वाचन प्रेरणा दिनानिमित्त साहित्यविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

‘सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या प्रदर्शनाला मंत्री छगन भुजबळ यांची भेट

मुंबई, दि. 8 : ‘सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ हे शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शासनाच्या सर्व विभागांची माहिती देणारे हे प्रदर्शन अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल मंत्री श्री.भुजबळ यांनी कौतुक केले. चित्रकार नरेंद्र बोरलेपवार यांनी यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांना प्रदर्शनाबाबत माहिती दिली.

*****

बी.सी.झंवर/विसंअ/

डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

सांगली, दि. : दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला आहे. साहित्यप्रेमी म्हणून डॉ. भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्यक्तिशः आनंद झाला असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. भवाळकर यांच्या निवासस्थानी भेटून डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

माणसाचे मन आणि स्त्रीचे हृदय जाणवून देणारे असे वेगळेच रसायन म्हणजे डॉ. भवाळकर आहेत. संतसाहित्य, स्त्री संतांचे मनोगत, सीतेचे मनोगत त्यांनी समर्थपणे मांडले आहे, असे सांगून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विचारांची बीजं रूजून परत आपल्यापर्यंत पोहोचायला हवीत. स्त्रियांच्या समुहाबरोबर साहित्य पुढे नेणे, विचार पुढे नेणे, प्रश्न समजून घेण्याची क्षमता तयार होणे आणि अश्रूंच्या पलीकडे पोहोचून अश्रू बदलण्याचे सामर्थ्य मिळण्याचे काम साहित्यातून होत असते. डॉ. भवाळकर यांच्या रूपाने झालेली ही निवड आनंददायी असल्याचे त्या म्हणाल्या.

मराठी पाऊल पडते पुढे…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, या माध्यमातून मराठी पाऊल पडते पुढे, अशी आनंदाची प्रतिक्रिया डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी 2013 पासून प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाने सातत्याने पाठपुरावा केल्याने आपले स्थान, शक्ती समोर आली. दर वेळीच्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत ठराव असायचा. मात्र, आगामी साहित्य संमेलनात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, आता पुढील नियोजन करायचे आहे. ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्या राज्य शासन आणि केंद्र सरकारचे ऋणनिर्देश व्यक्त केले.

०००

देगाव शाखा कालवा अंतर्गतची कामे पूर्ण झाल्यानंतर १६ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  

सोलापूर, दिनांक 8 (जिमाका):- भीमा उजनी प्रकल्प अंतर्गत देगाव शाखा कालवा वितरिका क्रमांक एक व वितरिका क्रमांक दोन अंतर्गत 352 कोटीच्या कमांचे भूमिपूजन झाले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील दहा गावे व अक्कलकोट तालुक्यातील 25 गावांना लाभ होणार आहे. तसेच या दोन्ही तालुक्यातील गावांमधील एकूण 16 हजार 129 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन या भागातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन व उजनीचे पाणी कुरनुर धरणात आल्याचे प्रीत्यार्थ जलपूजन प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी माजी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. समाधान आवताडे, आ. राम सातपुते, माजी आ. प्रशांत परिचारक, शहाजी पवार, यांच्यासह विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, बाजार समिती संचालक, ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की विविध विकास कामाचे उद्घाटन करताना एक समाधान होत आहे की या कामातून सर्वसामान्यांना लाभ मिळणार आहे. उजनीचे पाणी कुरनूर धरणात आणले त्यामुळे पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे सोय झाली.  27 वर्षापासून बंद असलेली एकरूख योजना सुरू झाली. या योजनेमुळे दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांना फायदा होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 365 दिवस वीज पुरवठा केला जाणार आहे. या अंतर्गत शेतकऱ्याला सौर कृषी पंप घेताना फक्त एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम भरावयाचे आहे उर्वरित 90% रक्कम राज्य शासन देणार आहे. शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप बसवल्यानंतर त्याच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पुढील पाच वर्ष खर्च शासन करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात त्यांना कृषी पंपाचे वीज बिल भरण्याचीच आवश्यकता राहणार नसल्याचे प्रतिपादन श्री. फडणवीस यांनी केले.

राज्य शासन अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लेक लाडकी योजना मुलींना उच्च शिक्षणात शंभर टक्के शुल्क सवलत आदी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये ते म्हणाले की अक्कलकोट तालुक्याला मागील 75 वर्षापासून पाणी मिळालेले नाही परंतु या योजनांच्या भूमिपूजनामुळे हा तालुका पाणीदार होणार असून येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनेल असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देगाव शाखा कालवा अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. तसेच अमृत 2.0 योजनेअंतर्गत अक्कलकोट पाणीपुरवठा योजना, नगरोत्थान  महा अभियानांतर्गत दुधनी शहर पाणीपुरवठा, मैंदर्गी पाणीपुरवठा, नगरोत्थान अंतर्गत अक्कलकोट शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन, अक्कलकोट दुय्यम निबंधक श्रेणी एक मुख्य इमारतीचे भूमिपूजन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत टप्पा दोन कामाचे भूमिपूजन, पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

000000

अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे 

सांगली, दि. ७: नवी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान सांगलीला मिळाल्याचा अभिमान आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या रूपाने योग्य निवड झाल्याचे समाधान व्यक्त करत कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमात डॉ. भवाळकर यांच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

नवी दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. याबद्दल पालकमंत्री डॉ. खाडे यांनी डॉ. भवाळकर यांच्या निवासस्थानी भेटून त्यांचे अभिनंदन केले. डॉ. भवाळकर या सहाव्या महिला साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत.

०००

व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. ८:  बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासात व्यापारी वर्गाचे मोलाचे योगदान असून व्यापारी वर्गाशी निगडीत प्रलंबित प्रश्न आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती व्यापारी महासंघ आणि दि बारामती मर्चंट असोसिएशनच्यावतीने सोमवारी (दि. ७ ऑक्टोबर) रात्री आयोजित व्यापारी मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, संस्थापक नरेंद्र गुजराथी, दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, शहर व परिसरात आगामी ५० वर्षाचा विचार करुन सार्वजनिक विकास कामे सुरू आहेत. नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याकरीता रुग्णालयाची उभारणी, रस्ते, पूल, सेवा रस्ते, कालवा सुशोभीकरण, नदी सुधार कार्यक्रम, क्रीडासंकुल इमारत, दशक्रिया विधी घाट, पाण्याची साठवण व्यवस्था, श्रीमंत बाबू नाईक वाडा परिसर सुशोभीकरण, नवीन भाजीपाला विक्री केंद्र, वनसमृद्धी कण्हेरी वनोद्यान आदी विकास कामे सुरू आहेत. शहराचा विस्तार होत असताना नागरिकांना वाहतुकीची शिस्त पाळावी लागेल.

बारामतीच्या एमआयडीसीत ५० एकर जागेत २ हजार कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प येणार आहे. त्यातून परिसरातील दीड हजार मुलांना रोजगार उपलब्ध होईल. त्याबाबत मंत्रालय स्तरावरील यंत्रणेला सूचना दिल्या असून तात्काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन काम करीत असून नागरिकांनी जबाबदारीने त्यांना सहकार्य करावे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, परिसरात गुंडगिरी, दादागिरी, दहशत  खपवून घेतली जाणार नाही, कायदाचा भंग करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे पोलीस यंत्रणेला निर्देश दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

आगामी काळात सार्वजनिक विकास कामांच्या माध्यमातून बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासोबतच परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सर्वांच्या सहकार्याने सर्वांग सुंदर बारामतीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले.

0000

मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. ८ : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष एच. ई. डी. मोहम्मद मुईज्जू यांचे सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायू सेनेच्या विमानाने आज दुपारी आगमन  झाले.

मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे तसेच पोलीस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते. पुढील कार्यक्रमासाठी ते हॉटेल ताज पॅलेस, मुंबई येथे रवाना केले.

0000

 

 

ताज्या बातम्या

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. ७ :  महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या...

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

0
रायगड दि. ७ जून : रोहा-अष्टमी नगर परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या ‘शिवसृष्टी’ या भव्य प्रकल्पाचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री ...

तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0
सार्वजनिक ठिकाणी कचरा आणि अस्वच्छता करणाऱ्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने येत्या आठ दिवसांत कार्यवाही करावी अन्यथा संबंधित संस्थेवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याचे थेट निर्देश...

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...