रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 445

मराठी व्यावसायिक बाल नाटकांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : राज्याचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करून मराठी भाषेचे संवर्धन करण्याचे महत्वपूर्ण कार्य रंगकर्मी, कलाकार करीत असतात. अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाआयुष्याला त्यांच्या बालपणीच सुरूवात झालली असते. बाल नाटकांचे महत्व लक्षात घेता राज्यातील बाल नाटकांना अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने 62 वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा नाट्य गौरव सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, दादर येथे झाला. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे,  सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, अवर सचिव बाळासाहेब सावंत उपस्थित होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करीत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, संयुक्त राष्ट्र संघ एखाद्या देशाची प्रगती पाहण्यासाठी जीडीपी, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आदी निकष लावत. मात्र आता एखादा देश आर्थिक सक्षमतेपेक्षा आनंदी किती हे पाहण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने हॅपीनेक्स इंडेक्सचा निकष लावला आहे. हा इंडेक्स वाढविण्याची ताकद केवळ कलावंतांमध्येच आहे. असे गौरवोद्गारही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी काढले.

राज्यनाट्य स्पर्धेतील परीक्षकांचे मानधन प्रती नाटक 900 रूपये करण्यात आले असल्याचे सांगत सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, व्यावसायिक नाटक परीक्षकांचे मानधनही दुप्पट करण्यात आले आहे. मराठी व्यावसायिक बाल नाटकांच्या सर्वंकष अभ्यासासाठी शासनाने ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या केंद्रामध्ये 19 वरून 24 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. शासनाने या सांस्कृतिक वारशाची उर्जा अशीच कायम ठेवण्यासाठी विविध निर्णय घेतले आहे. यामध्ये विविध पुरस्कारांची रक्कम दुप्पट करून ती पुरस्काराला साजेशी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ७५ नाट्यगृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापैकी 6 नाट्यगृहांना मान्यताही देण्यात आली आहे. नाटक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना नाट्यगृहाच्या भाड्याची मोठी अडचण येते. यासाठी नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये सूट देण्याबाबत शासन विचार करीत आहे. नागपूरमध्ये भाड्यामध्ये सूट देण्यास मान्यताही देण्यात आली आहे.

यावेळी अप्पर मुख्य सचिव श्री. खारगे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे आपल्या मायबोली मराठी भाषेचे संवर्धन व भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी वाढली आहे. नाटक हे मराठी संवर्धनाचे काम प्रभावीपणे करीत आहे. ही पंरपरा अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धा महत्वाची भूमिका निभावत आहे.  यावेळी नाट्यनिर्मिती क्षेत्रातील विविध पारितोषिक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रकमेचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एकूण 189 पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला नाट्य, कला क्षेत्रातील कलावंत, दिग्दर्शक, अभिनेते, पुरस्कारार्थी उपस्थित होते.

विविध पारितोषिकांचे वितरण

यावेळी बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य, हिंदी, संस्कृत, संगीत नाट्य, हौशी, व्यावसायिक या स्पर्धेत उत्कृष्ट अभिनय, संगीत नाट्य स्पर्धा उत्कृष्ट गायन, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, संगीत दिग्दर्शन, नाट्यलेखन, दिग्दर्शन, नाट्यनिर्मितीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात आले.

*****

निलेश तायडे/विसंअ/

इयत्ता १२ वीच्या परीक्षांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत ३० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेस वरून ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावेत, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाचे आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्ज भरण्यापूर्वी कॉलेज प्रोफाइल मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठवावी, असेही या अनुषंगाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल वरदान ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. ९ (जिमाका): ट्रक टर्मिनल हे व्यापारी आणि छोट्या – मोठ्या उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून याचा उद्देश केवळ वाहतूक सोयीसाठी नसून, हे एक महत्त्वाचे केंद्र बनणार आहे. उद्योग भवनामुळे व्यापाराच्या नोंदणी, परवानग्या आणि इतर औद्योगिक प्रक्रियेतील किचकट कामे सुलभ होतील, तर ट्रक टर्मिनलमुळे माल वाहतूक आणि साठवणीतील अडचणी दूर होतील. या दोन्ही गोष्टींमुळे व्यापारी आणि लघु उद्योजकांसाठी उद्योग भवन व ट्रक टर्मिनल हे वरदान ठरेल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी व्यक्त केला.  40 कोटींचे उद्योग भवन व ट्रक टर्मिनल भूमिपूजनप्रसंगी  जिल्हा उद्योग केंद्रात मंत्री श्री. पाटील बोलत होते.

यावेळी खासदार स्मिता वाघ व आमदार संजय सावकारे यांनी  सांगितले की,  उद्योग भवनाच्या स्थापनेमुळे जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. हे भवन छोटे उद्योग आणि नवीन उपक्रमांना प्रोत्साहन व उद्योजकतेला चालना मिळणार असून बेरोजगारांसाठी उद्योग भवन ठरणार आशेचा किरण असून रोजगार निर्मितीचे केंद्रस्थान ठरेल.

असे असेल उद्योग भवन व ट्रक टर्मिनल

३८९२ चौ.मी.जागेत तीन मजली इमारत उभी राहणार असून यात जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्राम उद्योग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगीक सुरक्षा व आरोग्य आणि उद्योजकता विकास केंद्राच्या इमारती एका छताखाली येणार आहे. तसेच सभागृह, व्यापारी गाळे व कॅन्टीन देखील असणार आहे. २२७०० चौ, मी. जागेत ट्रक टर्मिनलमध्ये १०० ट्रकसाठी भव्य पार्किंग, ऑफीस, गरेज, विश्राम गृह, हायमास्ट व पथ दिवे रस्ते डांबरीकरण, कॅन्टीन, पूर्ण भूखंडासाठी संरक्षक भिंत बांधकाम असेल.  यासाठी उद्योग भवनसाठी २१ कोटी तर ट्रक टर्मिनल साठी १९ कोटी असा एकूण ४० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी जिल्ह्यात एमआयडीसीमध्ये केलेल्या सुमारे २०० कोटींच्या कामांचा लेखा – जोखा मांडून उद्योग भवन व ट्रक टर्मिनल कसे असेल याबाबत सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खादी ग्रामोद्योगचे ज्येष्ठ पर्यवेक्षक जगदीश पाटील यांनी केले. आभार DIC चे व्यवस्थापक आर.आर. डोंगरे यांनी मानले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजू भोळे, आमदार संजय सावकारे, डी.आय.सी.चे महाव्यवस्थापक चेतन पाटील,  व्यवस्थापक आर.आर.डोंगरे, व्यवस्थापक प्रशांत पाटील,  एम.आय.डी.सी.चे प्रादेशिक अधिकारी सुनील घाटे,  कार्यकारी अभियंता नितीन पाटील, लघु भारतीचे अध्यक्ष समीर साने, जिंदा असोसिएशनचे रवी लढ्ढा, मॅट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. रायसोनी व इतर सर्व औद्योगिक असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड जिमाका दि. 9- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  तसेच सद्यस्थितीत असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे रायगड जिल्ह्यातील मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.  या कार्यक्रमास  उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्ग पहिवहन महामंडळ,भरत गोगावले,  अध्यक्ष स्थायी समिती, पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालय, भारत सरकार सुनिल तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, सचिव, महिला व बाल विकास विभाग डॉ.अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त कोकण डॉ.राजेश देशमुख, आयुक्त महिला व बाल विकास विभाग डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना डॉ.कैलास पगारे,जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका पनवेल मंगेश चितळे आदी उपस्थित होते.

महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, हा आहेर थांबणार नाही असे भावनिक आश्वासन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही योजना सुपरहिट असून दिवाळीपूर्वीच महिलांना भाऊबीज देण्यात आली आहे. आज सर्व महिला भगिनीच्या खात्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर चे पैसे जमा झाले आहेत. आज राज्यातील महिलांच्या खात्यात 17 हजार 200 कोटी रुपये जमा केले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री  म्हणाले, माझी महिला भगिनी कष्ट करते, कुटुंबासाठी राबते याची आम्हाला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखहुन अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे कौतुक करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले महिला व बालविकास विभागाने सचिव अनुपकुमार यांच्या नियंत्रणाखाली अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

राज्य शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे.  महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे.  ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे.  लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना,  मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

जखमी महिलांवर तात्काळ उपचार करण्याचे निर्देश

रायगडमधील या कार्यक्रमासाठी येणाऱ्या बसला गोरेगावमध्ये  अपघात झाला आहे. एक एसटी बस घसरली आहे. या सर्व महिलांवर तात्काळ उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्य शासन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय ठरली आहे.
राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास सुरुवात केली. तसेच महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याची योजनाही सुरू आहे त्यामुळे राज्यातील महिला समाधानी असून लाडकी बहीण योजनेतून ते आपले व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असल्याने पुढील काळातही योजना अशीच चालू राहील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विज बिल माफी योजना आणलेली असून या अंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 15 हजार कोटींची वीज बिल माफी देण्यात आली आहे.शासन सर्वसामान्य व शेतकऱ्यांचे असल्याने त्यांच्या हितासाठी अधिक लक्ष दिले जात आहे. हे शासन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक भाषणात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,  आजचा दिवस हा महिला व बालविकास  विभाग म्हणून अभिमानाचा दिवस आहे नवरात्रीत सर्व देवींची पूजा केली जाते. येथे उपस्थित सर्व महिला देवींच्या लेकी आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिनही लाडक्या भावांनी राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक बळ दिले आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येक स्त्री ही आपल्या परिवारासाठी संसारासाठी जगत असते, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे आता महाराष्ट्रातील स्त्री ही स्वतःसाठी जगणार आहे. ही योजना भविष्यात निरंतर चालावी यासाठी  शासनाने आर्थिक नियोजनासह तरतूद केली आहे.

लाडक्या बहिणींना विविध लाभांचे वाटप
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण 17 हजार 200कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत, त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात 10 महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री   यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच पिंक ई- रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलेंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. व्यासपीठावर ते चालत येत असताना दोन्ही बाजूच्या उपस्थित शेकडो महिलांनी दोघांना राख्या बांधल्या व ही योजना अशीच निरंतर चालू ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व रमाईमाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करावी – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. ९ (जिमाका): सार्वजनिक आरोग्याचा खरा मंत्र हा स्वच्छता असून स्वच्छतेमुळे गावाच्या विकासासोबत ग्रामस्थांचा विकास देखील साधला जातो त्यामुळेच ग्रामीण भागात स्वच्छतेला महत्त्व देऊन ग्रामपंचायतीनी स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.  शाहू महाराज सभागृहात, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित ट्राय सायकल वाटप कार्यक्रमात मंत्री श्री. पाटील बोलत होते.

या वेळी खासदार स्मिता वाघ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  रणधीर सोमवंशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश भोगावडे, अनिल भदाणे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, स्वच्छ परिसर व स्वच्छ गाव ही प्रत्येकाची वैयक्तिक व  सामूहिक जबाबदारी आहे. गावाच्या स्वच्छता मोहिमेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तीन चाकी सायकलिंगचे वितरण करण्यात येत आहे. या ई-बाइक सायकलींच्या वापरामुळे गावातील स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविता येणार आहे. या सायकलींमुळे कमी खर्चात व सोप्या देखभालीत उत्तम प्रकारे गावातील स्वच्छता करता येणार आहे. वाटप करण्यात येत असलेल्या सायकलीमध्ये ओला आणि सुका कचरा साठविण्यासाठी दोन कप्पे करण्यात आलेले असल्याने कचरा संकलनासोबतच कचऱ्याचे विलिनीकरण करणे देखील सोपे होणार आहे. जिल्हा परिषदेतंर्गत अलीकडेच मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांची भरती करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील ग्रामसेवकांची कमतरता देखील दूर झाली आहे.  सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी ग्रामस्थांच्या सोबतीने स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी करण्याची आवश्यकता असून या कामासाठी सर्वानी योगदान देण्याची गरज असल्याचेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.

खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अनेकदा कचरा संकलनाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागासाठी घनकचरा व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रामपंचायतीना उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कचरा संकलनासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीना अशा प्रकारच्या घंटा गाड्या उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी श्री.अंकित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या माध्यमातून अनेक वस्तूंची निर्मिती होऊ शकते. या बाबींकडे ग्रामपंचायतीनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कचऱ्याचे संकलन आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीनी पाऊले उचलून कचरा व्यवस्थापनाकडे  दिले पाहिजे.

०००

पुढील वर्षापासून महिला गणेशोत्सव मंडळांना विशेष पुरस्कार देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्रात गणेशोत्सवात महिला मंडळाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास पुढील वर्षीपासून विशेष पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झालेल्या मंडळास मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आज पारितोषिक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव सुमंत पाष्टे रंगमंचावर उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सांस्कृतिक वारसा पुढे जावा, यासाठी शासन काम करत आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून ज्या संस्था, समूह, गणेश मंडळ उत्तम काम करतात, त्यांना शासनामार्फत पुरस्कार देण्यात येत असला तरी तो महाराष्ट्राच्या साडेतीन कोटी गणेश भक्त व शिवभक्तांच्या वतीने देण्यात येत असल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव विकास खारगे यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी जे योगदान करत आहेत, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. जे चांगलं काम करतात त्यांना शाबासकी दिली पाहिजे, हा विचार करून सांस्कृतिक विभागाने ही गणेशोत्सव स्पर्धा आयोजित केली असून हे तिसरे वर्ष आहे. यामध्ये आपल्याकडील काही सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यात ज्यांनी काम केले त्यांच्याही कामाची दखल घेण्यात आली असल्याचे श्री खारगे यांनी सांगितले.

या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत भारतमाता गणेश मंडळ, परभणी यांना प्रथम, जय भवानी मित्र मंडळ ठाणे यांना द्वितीय तर वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव मंडळ, लातूर यांना तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मंत्री श्री मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. त्याचप्रमाणे एकूण 36 जिल्हास्तरीय पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.गणेश तरतरे, प्रताप जगताप आणि सतीश कोलते यांनी काम पाहिले.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन

मुंबई दि. 9 : राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश झाला असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

राज्यातील अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी राबविण्यात येतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत  लाभार्थी निवड निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा  ७/१२  दाखला व ८  अ उतारा, आधार कार्ड, आधार संलग्न बँक खाते .किमान 0.40 हे. ते कमाल ६.००  हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे. मात्र दुर्गम भागात 0.40 पेक्षा कमी जमीनधारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दारिद्र्य रेषेखालील  लाभार्थ्यांना कमाल ६.००  हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू असणार नाही.

दि. 1 आक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी /घटकांचे आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. घटक आणि अनुदान मर्यादा पुढील प्रमाणे. नवीन विहीर यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये) 2,50,000/- नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 4,00,000/-. जुनी विहीर दुरुस्ती यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-नवीन अनुदान मर्यादा (रुपये)1,00,000/-‌. इनवेल बोअरींग यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये) 20,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 40,000/-. विद्यूत पंप संच यापूर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)20,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये)40,000/-. वीज जोडणी आकार यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)10,000/- नवीन अनुदान मर्यादा (रुपये)20,000/-. सोलर पंप (वीज जोडणी आकार व विद्यूत पंपसंच ऐवजी) यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)30,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-. शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)1,00,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये)2,00,000/-. ठिबक सिंचन संच यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये) 50,000/-. नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 97,000/-. तुषार सिंचन संच यापुर्वीची अनुदान मर्यादा (रुपये)25,000/-, नवीन अनुदान मर्यादा (रुपये)47,000/-. डिझेल इंजिन नवीन अनुदान मर्यादा (रुपये)40,000/- एचडीपीई / पीव्हीसी पाईप नवीन अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-. यंत्रसामुग्री (बैलचलित / ट्रॅक्टर चलित अवजारे)नवीन अनुदान मर्यादा (रुपये)50,000/-. परसबाग नवीन अनुदान मर्यादा (रुपये) 5,000/-.

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) या योजनेत फक्त वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी विंधन विहीर रु. 50,000/- आर्थिक मर्यादेत मंजूर केली आहे.

क्षेत्रीयस्तरावर योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत करण्यात येते. योजनांतर्गत अर्ज स्विकृती, लाभार्थी निवडीपासून ते अनुदान अदा करणेपर्यंतची कार्यवाही महा-डीबीटी पोर्टलव्दारे सुरु आहे. योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, सर्व सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न- मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. ९ (जिमाका): गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आदिवासी विभागाच्या माध्यमातून राज्यभरात 3 हजार 750 कोटींच्या आश्रमशाळा, वसतीगृहांच्या इमारती बांधून आदिवासी विद्यार्थ्यांना या इमारतींमधून गुणवत्तापूर्ण आणि सोयीसुविधांनीयुक्त शिक्षण देण्याचे काम आदिवासी विकास विभागाने केल्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

नंदुरबार मधून राज्यातील 120 आश्रमशाळा, वसतिगृहांच्या इमारतींचे लोकार्पण, भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रमात बोलत मंत्री डॉ. गावित बोलत होते.

शहरातील पटेलवाडीस्थित आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाच्या प्रांगणातून त्यांच्या हस्ते आज राज्यातील 2 हजार 300 कोटी रुपये किमतीच्या 120 इमारतींचे ई- भूमिपूजन, पायाभरणी आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, तर आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त नयना गुंडे, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांसह राज्यातील सर्व अधिकारी दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.

यावेळी मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आदिवासी बांधवांना जोपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध होत नाही, त्याबद्दल जागृती होत नाही, आलेल्या संधीचा उपयोग आदिवासी बांधवाना घेत नाही तोपर्यंत त्यांचा विकास होवू शकत नाही, त्यामुळेच शिक्षणाची अद्यायवत दालने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभी करण्यात आली.  यापूर्वी आदिवासी विकास विभागाचा मंत्री असताना आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, निवासाची सोयी उपलब्ध करुन दिल्या तर आज सर्व इमारतींमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम केले. आज राज्यातील आदिवासी विकास विभागाची ज्या ठिकाणी स्वमालमीची जागा उपलब्ध आहे त्या प्रत्येक ठिकाणी इमारतींना निधी उपलब्ध करुन दिले आहेत. आज राज्यात एकाच वेळी 2 हजार 300 कोटी रुपयांच्या 120 इमारतींचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले आहे. यातील 46 इमारती या एकट्या नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. तर या 46 पैकी 30 इमारती ह्या अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील असल्याने शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पुरवण्याचा ध्यास आहे.

महाराष्ट्राचा आदिवासी विकास विभाग निर्माण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इमारतींवर पहिल्यांदाच खर्च हेात आहे. जिल्ह्यामधील विभागाच्या 90 टक्के इमारती बांधकामासाठी घेतल्या असून दहा टक्के राहीलेल्या इमारतीमध्ये या पुढच्या काळामध्ये आश्रम शाळांमध्ये सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने बांधली जातील. पुढील दोन वर्षांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे आश्रमशाळा आहे तिथे सर्व कर्मचारी, शिक्षकांची  निवासस्थाने त्या ठिकाणी बांधून पुर्ण होतील, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी चांगल्या रितीने फायदा होऊ शकेल, असेही मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले. या सोबत विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण पाहता विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही संस्थासोबत करार देखील केला असल्याचे यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर येण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. विभागाच्या आश्रमशाळांमध्ये डिजीटल लायब्ररीची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. आदिवासी विद्यार्थीनींना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. विभागाच्या वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम् योजनेतून देखील आर्थिक मदत देण्याचे काम विभागाकडून केले जात आहे. विभागाने काही विषय तज्ज्ञ शिक्षकांची विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी निवड देखील केली आहे. सुट्टीच्या दिवशी हे विषय तज्ज्ञ ऑनलाईन पद्धतीन आदिवासी विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्याचे काम करणार आहेत. पाचवीपासूनच काही गुणवंत विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत स्पर्धा परिक्षांसाठी तयार केले जाणार असून याचा फायदा त्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये होणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील अभिरुची पाहता आदिवासी विकास विभागातील प्रत्येक अप्पर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात एक स्वतंत्र खेळाडूंची आश्रमशाळा तयार करुन याठिकाणी आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांना त्याच्या अभिरुचीच्या खेळात प्रशिक्षित करण्याचा निर्णय देखील विभागाने घेतला आहे. यासोबत 1 हजार 497 क्रीडा, कला, संगणक शिक्षकांच्या भरतीसही मान्यता देण्यात आली असून एक दोन दिवसात त्यांच्या भरतीची जाहिरात निघणार असल्याचे सांगत विभागात मागच्या काळातील 835 क्रिडा शिक्षकांना मान्यता देण्याचे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी वित्तीय महामंडळाला यंदा आदिवासी विकास विभागाने 50 कोटीं दिले असून यातून आदिवासी बांधवांना उद्योग धंदे, विविध व्यवसाय सुरु करण्यास चालना मिळणार आहे. पेसा उपयोजना क्षेत्राची 40 वर्षानंतर पुर्नरचना करुन राज्य सरकारने त्याला मान्यता देत राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविल्याचे देखील मंत्री डॉ. गावित म्हणाले. जिल्ह्यातील 16 सोंगाड्या पार्टीना प्रोत्साहण देण्यासाठी त्यांना साहीत्य खरेदी करण्यासाठी मदत निधी दिला आहे.

राज्यातील आश्रमशाळांमध्ये 72 नमो केंद्र उभारले जात असल्याचे सचिव विजय वाघमारे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

०००

 

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा बीड जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद

बीड दि. ९: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज बीड जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम, उद्योजक तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या जिल्ह्यांच्या विकासाबाबत असलेल्या अपेक्षा, अडचणी व संकल्पना जाणून घेतल्या.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार ॲड. उषा दराडे यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक  अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर मान्यवर व्यक्तींनी  शेतकरी प्रश्न, सिंचन अनुशेष,  जिल्हयातील पायाभूत सुविधा. ‘उद्योगांसाठी पोषक वातावरण, ऊसतोड मजूरांचे स्थलांतर, आरोग्याच्या सुविधा, शहरातील पाणी प्रश्न यासारखे विषय मांडले.

बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूरांचे कामासाठी काही कालावधीसाठी स्थलांतर होते, त्यामुळे जिल्हयातच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन भाषेचा गौरव करण्यात आला आहे. या मराठी भाषेतील प्रथम आद्य कवी हे बीड जिल्ह्यातील आहेत या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे  विद्यापीठ व्हावे, बीड शहरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सोडविण्यासोबतच कापूस उद्योगाला सहकार्य करावे. कापूस, सोयाबीनसह शेतीमालाला चांगला दर मिळावा, घरकुल योजना, शेतीसाठी वीज यासह विविध विषयावर चर्चागटात सहभागी मान्यवरांनी आपली मते मांडली. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी विविध घटकातील मान्यवरांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्हयाचा ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थिती व  उद्योग तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांबाबत माहिती दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ४६ हजार विद्यार्थ्यांना ४२ कोटी रूपये विद्यावेतन – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ९ : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ या महिन्यात रुजू होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना मासिक विद्यावेतनाचा पहिला हफ्ता आज अदा करण्यात आला.  प्रातिनिधिक स्वरूपात आज मंत्रालयात सहा प्रशिक्षणार्थींना मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते विद्यावतेन अदा करण्यात आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदिप डांगे, उपायुक्त डी. डी. पवार, अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, एकूण तीन लाख ६९ हजार ७९८ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली असून, एक लाख ७९ हजार ३१८ प्रशिक्षणार्थींना नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये ८७ हजार १४९ प्रशिक्षणार्थी रुजू झाले असून, १०,५८६ आस्थापनांनी याकरिता नोंदणी केली आहे. अधिकाधिक युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासन प्रयत्न्‍ाशील असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, १४६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नामकरण करण्यात आले असून, उर्वरित २७१ संस्थांना नावे देण्यासाठी सूचना मागविण्यात येत आहेत. तसेच या संस्थांमध्ये संविधान मंदिर प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणे आणि युवकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सर्व प्रलंबित बाबींचा निपटारा जलदगतीने करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करु शकतील, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या या योजनेचा महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असूनही बेरोजगार उमेदवारांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजना सुरु केली.

योजनेद्वारे राज्यातील युवकांना उद्योजकांकडे ऑन जॉब ट्रेनिंग देऊन रोजगारक्षम करण्यात येईल. उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या योजनेकरिता राज्य सरकारकडून ५५०० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

 

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...