गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 42

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि.२९ : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर  विवाह सोहळे आयोजित केले जात असून या मुहूर्तावर बालविवाह मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.

निर्मल भवन येथे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बालविवाह रोखणेबाबत करावयाच्या कार्यवाही संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, सह आयुक्त राहुल मोरे व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुली आणि २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे बेकायदेशीर आहे. परंतु आजही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह होतांना दिसतात. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी याबाबत कार्यपद्धती ठरवून काम करावे. गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष ठेवून बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही  राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी असल्याचे सांगून बाल विवाहाबाबत तक्रार आल्यास त्यावेळी  सरपंच, पोलीस पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात यावे. आदिवासी भागातही बालविवाहाचे प्रमाण अधिक असून त्या भागात कार्यरत अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्याला आढावा घ्यावा, असेही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

परभणी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक दिसून येते त्यामुळे तिथे विशेष मोहीम राबवण्यात यावी,  अशी सूचनाही श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिली.

00000

मोहिनी राणे/ससं/

थॅलेसेमिया मुक्तीसाठी ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियान

मुंबई, दि. २९ : थॅलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृती ही सर्वात महत्वाची आहे. तसेच या आजाराविषयीच्या तपासण्याही होणे गरजेचे असल्याने थॅलेसेमिया आजार रोखण्यासाठी जनजागृतीसह तपासण्यांवर भर द्यावा. तसेच या आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियान’ ८ मे २०२५ पासून सुरू करण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या दिवशी राज्यातील सर्व थॅलेसेमिया  ग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

थॅलेसेमिया  रुग्णांचा राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा डॉ. महेंद्र केंद्रे, अवर सचिव अविनाश जाधव यांच्यासह परभणीचे थॅलेसेमिया  प्रतिसाद केंद्राचे डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर आदी उपस्थित होते.

थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक अजार असून याविषयी पालकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे सांगून राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, यासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करावे. या आजाराची कारणे आणि लक्षणे याविषयी लोकांना माहिती द्यावी. या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी  आशा सेविकांना प्रशिक्षण द्यावे. राज्यात विविध विभागांचे समन्वयक नेमण्यात आलेले आहेत. त्यांनाही यामध्ये सहभागी करावे. तसेच याविषयी केलेल्या कामाचा नियमित आढावा घेण्यात यावा. गरोदर मातांची सिकलसेलसह थॅलेसेमिया ची तपासणी करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी सीएसआर फंड मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. सध्या अस्तित्वास असलेल्या १०४ या टोल फ्रि कमांकावरही या आजाराविषयीची माहिती  व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, याकरिता संकेतस्थळ तयार करावे, अशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई, दि. २९ : – पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत केली. तत्पूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाकडे, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांपैकी ज्यांच्या कुटुंबात रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या थेट वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या विशेषाधिकारात जाहीर केला. हल्ल्यातील मृतांपैकी जगदाळे यांच्या कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय कालच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाहीर केला होता.

000

महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर १ मे रोजी मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी ध्वजवंदन राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे यांनी केले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आली.

सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार), महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी गृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक (प्रशासन) मल्लिकार्जुन प्रसन्न यांच्यासह वरिष्ठ शासकीय तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

रंगीत तालमीत राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, पुरुष व महिला नागरी सुरक्षा दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक यांनी संचलनात सहभाग घेतला.

या कार्यक्रमात 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन समारोहात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अपर पोलिस महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्न यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यामध्ये सशस्त्र दलांना दोन तर नि:शस्त्र दलास एक पारितोषिक देण्यात आले. सशस्त्र दलांमध्ये प्रथम पारितोषिक राज्य राखीव पोलीस दल आणि द्वितीय पारितोषिक मुंबई पोलीस सशस्त्र पुरुष दल यांनी पटकाविला. त्याचप्रमाणे या संचलनामध्ये शालेय पथके सहभागी झाली होती. यामध्ये प्रथम पुरस्कार रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर यांना तर द्वितीय पुरस्कार सी कॅड कॉर्प यांना मिळाला.

याशिवाय केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या वतीने सरकारी शाळांमधील आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सशस्त्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या 43 शाळांमध्ये हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. या शाळांमधून स्टूडंट पोलिस कॅडेटचा प्रथम पुरस्कार काळाचौकी येथील अभ्युदय नगर म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, द्वितीय पुरस्कार विलेपार्ले पूर्व मुन्सिपल सेकंडरी स्कूल आणि तृतीय पुरस्कार माहीम मुन्सिपल सेकंडरी स्कूल, मुंबई यांनी पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोकाशी आणि मृण्मयी भजक यांनी केले.

00000

नीलेश  तायडे/विसंअ/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि.२९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे महिला विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य हे केवळ कायदेशीर सुधारणा नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली,  असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना दिलेले अधिकार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे नुकतेच करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक  म्हणून राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.  चर्चासत्रात माजी आमदार भाई गिरकर, माजी खासदार मनोज कोटक, बार्टीचे महासंचालक  सुनिल वारे, ॲङ माधवी नाईक, डॉ. मेधा सोमय्या आणि  रश्मी जाधव उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  एक व्यक्ती नव्हे तर एक विचार होते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे शोषित, वंचित, मागास आणि विशेषतः महिलांच्या हक्कासाठीचा संघर्ष होता. त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली असून वारसा हक्क, विवाह, घटस्फोट, पुनर्विवाह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे.

बाबासाहेबांचे ठाम मत होते की, “शिक्षित स्त्री म्हणजे परिवर्तनाची खरी शक्ती.” आणि म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणावर विशेष भर दिला.  आज  स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात, प्रशासकीय सेवांमध्ये, सामाजिक चळवळीत, व्यवसायात आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहेत, ते केवळ बाबासाहेबांच्या दूरदृष्टी आणि कार्यामुळेच आहे. या साऱ्या संघर्षात, जिच्या मूक साथीनं बाबासाहेब आज “बोधीसत्त्व” ठरले, ती म्हणजे माता रमाई. रमाईंचा त्याग, त्यांची सहनशीलता, बाबासाहेबांसाठी त्यांनी घेतलेली कष्टांची वाट हे सगळं आपल्याला विसरता येणार नाही, असेही श्रीमती. मिसाळ यांनी सांगितले.

राज्यशासन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना राबवत आहे. महिलांचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे या सर्व योजनांचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या प्रयत्नांमुळे अनेक महिला आज नव्या क्षितिजांकडे वाटचाल करत आहेत. पण अजूनही प्रवास पूर्ण झालेला नाही. बाबासाहेबांच्या स्वप्नातील समाज घडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितरित्या सलोख्याने काम करणे गरजेचे असल्याचेही श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रमुख वक्त्यांनी संविधानातील महिलांच्या हक्कांबाबत सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत करण्यात आली. उद्घाटकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिलांविषयीच्या कार्याचा गौरव केला आणि संविधानामध्ये महिलांसाठी केलेल्या महत्वपूर्ण तरतुदींबाबत प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन  योजना ठोकळे,  समिता कांबळे आणि  क्रांती कुंदर यांनी केले.  दरम्यान “मी रमाई” या नाट्यप्रयोगाद्वारे डॉ. आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईंच्या महत्त्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.

00000000

श्रध्दा मेश्राम/विसंअ/

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. २९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७, ८, ९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य योगीराज बागुल, ज.वि. पवार, डॉ. संभाजी बिरांजे आदींसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

‘जनता’ हे वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली १९३० ते १९५६ पर्यंत प्रकाशित झाले होते. ‘जनता’ हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज आहे. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्व लक्षात घेऊन त्यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनताचे ६ खंड प्रकाशित केले आहेत.

खंडांमध्ये काय असणार

‘जनता’ खंड ७ – या खंडात १२ फेब्रुवारी १९३८ ते २८ जानेवारी १९३९ पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

‘जनता’ खंड ८ – या खंडात ४ फेब्रुवारी १९३९ ते २७ जानेवारी १९४० पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

‘जनता’ खंड ९ – या खंडात ३ फेब्रुवारी १९४० ते १ फेब्रुवारी १९४१पर्यंतच्या एकूण ४८ अंकाचा समावेश आहे.

0000

धोंडिराम अर्जुन/ससं/

उदंचन जलविद्युत प्रकल्पांतील वीज निर्मितीतून राज्य ऊर्जा संपन्न बनवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.२९ :- राज्य ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा निर्मितीसाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हरित ऊर्जा निर्मितीसह राज्याला ऊर्जा संपन्न बनविण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. जलसंपदा विभाग, महाजेनको, महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज प्रा. लि. या कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र ऊर्जा निर्मितीत अधिक सक्षम होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या पुढील काळात ऊर्जा क्षेत्रातील कामे विहित कालमर्यादेत संबंधित यंत्रणांनी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात जलसंपदा विभागसोबत नऊ साईटसाठी तीन सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन  मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील  वैशिष्ट्यपूर्ण व अद्ययावत तंत्रज्ञान आहे. या जलविद्युत प्रकल्पांव्दारे शेती, उद्योग व व्यावसायिक क्षेत्रासाठी विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच शाश्वत आणि हरित उर्जा निर्मिती होणार असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होईल.  राज्याच्या एकूण ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या ५० टक्के क्षमता अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याच्या शासनाचा मानस असून त्यादृष्टीने नियोजन व काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आज झालेल्या सामंजस्य करारामुळे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून ५७ हजार २६० कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात ८ हजार ९०५ मेगावॅट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० इतकी रोजगार निर्मिती होणार आहे.

जलसंपदा विभाग आणि महाजेनको यांच्यासोबतच्या उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी ३१४५ मेगावॅट क्षमतेच्या, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत २११० मेगावॅट क्षमतेच्या  तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरिज यांच्यासोबतच्या ३६५० मेगावॅट क्षमतेच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

महाजेनको मार्फत घाटघर येथे १२५ मेगावॅट, कोडाळी येथे २२० मेगावॅट, वरसगाव येथे १२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १६०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. महाजेनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॅट, निवे  येथे १२०० मेगावॅट आणि  येथे वरंढघाट येथे ८०० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना फल्याण येथे २४०० मेगावॅट आणि सिरसाळा येथे १२५० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

या सामंजस्य करारप्रसंगी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर आणि अभय हरणे, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, प्रविण तायडे, राजेश वानखडे, नवनीत राणा, सुनिल देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी विविध पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचे कामे प्रामाणिकपणे करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंडळ स्तरावर होणाऱ्या महाराजस्व अभिनायात आलेल्या नागरिकांच्या अर्जावर त्याच ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जनतेचे कल्याण करण्याचा संकल्प करण्यात आला असून प्रशासनाचे सहकार्य यात घेतले जात आहे.

नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढविण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.अमरावतीच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती विमानतळ आणि त्याची धावपट्टी वाढविणे, पायलट प्रशिक्षण केंद्र, आयटी पार्क, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क येत्या काळात पूर्ण करण्यात येतील. त्यासोबतच येत्या काळात पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करून अमरावतीला पुढील 50 वर्षे पाणी पुरेल याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच जाहिरनाम्यात दिलेले शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण आदी योजनांच्या अंमलबजावणीसोबत मेळघाटातील रस्ते जोडणीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. बोंडे, रवि राणा यांनी मनोगत व्यक्त केले. तहसिलदार विजय लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बचतगटांना स्वनिधी, ट्रॅक्टर, कृषी अवजारे, तीनचाकी सायकल, विहिरीचे कार्यादेश आदी लाभांचे वाटप करण्यात आले.

०००

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्त सेवा प्रमाणपत्र वितरण पार पडले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री काशिराम पावरा, श्रीमती मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, शरद मंडलीक आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी यापुढे प्रत्येक महसुल मंडळात वर्षांत चारवेळा महाराजस्व अभियान राबविण्यात यावे. अॅग्रीस्टॅकमुळे शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार असल्याने जिल्ह्यात अॅग्रीस्टॅकची 100 टक्के नोंदणी पुर्ण करावी. ग्राम महसूल अधिकाऱ्यापासून महसूल मंत्री हे एका परिवारातील असल्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिवंत सातबारा हा उपक्रम चिखलीचे तहसिलदार यांच्या अभिनव उपक्रमातून पुढे आलेला उपक्रम असल्याचे सांगून जे महसूल अधिकारी, कर्मचारी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवतील त्यांचा येत्या काळात गौरव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लवकरच राज्यातील प्रत्येक मंजूर घरकुल धारकांना 5 ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार असून तलाठी ते अपर जिल्हाधिकारी पदाच्या पदोन्नतीचे एकही प्रकरण प्रलंबित ठेवणार नाहीत. तसेच जिल्ह्यात चांगला उपक्रम राबविल्यास तो संपूर्ण राज्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येईल. धुळे जिल्ह्यात चांगले काम होत असल्याने जिल्हा प्रशासनाचे कौतुक करुन राज्याच्या महसूल विभागात धुळे जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहावा, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री रावल म्हणाले की, राज्यात सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे. सामान्य माणसाला त्यांचे हक्क देण्याचे काम हे सरकार करीत आहेत. महाराजस्व अभियान हा उपक्रम एक दिवसापुरता मर्यादित राहू नये. वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस पाटील सेवा अभिलेख प्रणालीचे लोकार्पण,  मंडळस्तरावरील ई-ऑफिस प्रणालीचे लोकार्पण, भूमिअभिलेख विभाग ऑनलाईन सेवा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब अनुदान वाटप, जिवंत सातबारा वाटप मोहीम, अॅग्रीस्टक योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी वाटप, प्राधान्य कुटूंबातील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना अनुदान वाटप, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, वनहक्कधारक लाभार्थीना वनहपट्टांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप यावेळी करण्यात आले. तर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

सर्व उपस्थितांना सेवा हक्क हमी कायद्याची शपथ देण्यात आली.

०००

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध
  • गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर
  • परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार
  • औद्योगिक गुंतवणूक परिषद उत्साहात

धुळे, दि. २८ (जिमाका) : राज्यात उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक वाढण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य आहे. या उद्योगांना आवश्यक त्या सोईसुविधा व सवलती देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. धुळयातील गुंतवणूक परिषदेत झालेले 8436 कोटी रुपये गुंतवणूकीचे करार हे जिल्ह्यासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आकर्षिंत करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने  हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट, धुळे येथे एक दिवसीय औद्योगिक गुंतवणूक परिषद पार पडली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री बावनकुळे बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री काशिराम पावरा, श्रीमती मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालक वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांचेसह विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक, गुंतवणूकदार उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, धुळे जिल्हा हा संस्कार, संस्कृती, किर्तीच्या शिल्पकलाकार, इतिहासकार, संशोधक, कलावंताचा जिल्हा असून अनेक अष्टपैलू कर्तुत्वाचे लोक जिल्ह्याने दिले आहे. जिल्ह्यात उद्योग व्यवसायिकांसाठी मोठा वाव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्यामुळे भविष्यात भारत हा जगातला सर्वात मोठा उद्योजकता निर्माण करणारा देश होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी उद्योजकांसाठी विविध सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सद्या आपल्याला कमर्शियल ग्राहकांकडून क्रॉस सबसीडी घेऊन शेतकऱ्याला वीज देतो. पुढच्या तीन वर्षांमध्ये राज्यातील 45 लाख शेतकरी सोलर उर्जेवर शिफ्ट होणार असल्याने यापुढे उद्योजकांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करुन देण्यास मदत होणार  आहे.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. त्यानुसार दावोसमध्ये 15 लाख कोटी रुपयांचे करार केले आहे. धुळे जिल्ह्यात उद्योगांसाठी रावेर येथील 2 हजार एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. तसेच राज्यात कुठलेही बांधकाम करण्यासाठी आता नदीची वाळू (नैसर्गिक रेती) लागणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दगडापासून रेती तयार करण्याच्या 50 क्रशरला मंजूरी देण्यात येणार आहे. येत्या काळात साक्रीला औद्योगिक विकास महामंडळ, तसेच धुळ्यात ड्रायपोर्टसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच सर्व उद्योजकांना सर्व परवानग्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

उद्योजकांनो धुळ्यात या, गुंतवणूक करा, तुमचे रेड कार्पेटने स्वागत आहे – पालकमंत्री रावल

धुळे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या, पायाभूत सुविधांनी युक्त जिल्हा आहे. उद्योग उभारण्यासाठी राज्यातील एक उत्तम डेस्टीनेशन असलेला धुळे जिल्हा आहे. मुबलक रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा तसेच कुशल-अकुशल मनुष्यबळ, रोड, एअर, रेल्वे, पोर्ट या सर्व कनेक्टिव्हिटी, उद्योगांना लागणारा कच्चा माल, उद्योगांना संरक्षण व त्याची भविष्यातील सुरक्षितता या सर्वच बाबतीत सक्षम असल्याने उद्योजकांनो धुळ्यात या, गुंतवणूक करा, तुमचे रेड कार्पेटने स्वागत असल्याचे आवाहन पालकमंत्री रावल यांनी यावेळी उद्योजकांना केले. धुळे हे ठिकाण गुजरात, मध्य प्रदेश या राज्याच्या केंद्रस्थानी आहे. दोन्ही राज्यांच्या सीमा धुळे जिल्ह्याला लागून असल्याने एक मोठा फायदा उद्योग वाढीसाठी आहे. सात राष्ट्रीय महामार्ग धुळे जिल्ह्यातून जातात. धुळे जिल्हा हा उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम भारताला जोडणारा महत्त्वाचा जिल्हा आहे. यामुळे उद्योजकाला आपला माल देशात कुठेही ट्रान्सपोर्ट करायचा असेल किंवा कच्चा माल आणायचा असेल तर त्याला सहज आणि सुलभ हे ठिकाण आहे.

पूर्वीच्या काळी धुळे जिल्हा हा मुंबईपासून दूर वाटत होता. परंतु, काळाच्या ओघात हायवे आले. द्वारकेपासून तर बंगालपर्यंत प्रवास करायचा असेल तरी धुळे जिल्ह्यामधून जावं लागतं आणि काश्मीर पासून कन्याकुमारी जायचं असेल, तरी धुळे जिल्ह्यातूनच जावं लागत. म्हणून अत्यंत स्ट्रॅटजिक लोकेशनवर असलेला धुळे जिल्हा आहे. ज्याच्या माध्यमातून कच्च्या मालाला आणण्यासाठी, त्याचबरोबर आपला माल पाठविण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध आहे. दरवर्षी 10 हजार कोटी रुपयाची निर्यात धुळ्यातून होते. राज्य सरकारच्या विविध योजना, प्रकल्प खान्देशात राबविण्यात यावेत असे त्यांनी सांगितले. येथील उद्योजकांना 24 तास येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी मदतीसाठी उभे राहतील तसेच सर्व प्रकारचे सहकार्य त्यांना करण्यात येईल, असेही पालकमंत्री रावल यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शांती स्पिन्टेक्स लिमिटेड 1 हजार कोटी, एच.डी. वायर प्रा.लि. 2 हजार कोटी, बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड 460 कोटी, सनस्टॉर लिमिटेड 320 कोटी, आशिर्वाद इलेक्ट्रॉनिक्स 20 कोटी, पियुष लाईफस्पेस प्रा. लि. 110 कोटी यासह 119 विविध कंपन्यांचे 8436 कोटी 41 लाख रुपंयाचे सामंजस्य करार करण्यात आला. यातून 11506 जणांना रोजगार निर्मिती होणार आहे.

या परिषदेला मध्यप्रदेश, गुजरात राज्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील उद्योजक, गुंतवणूकदार, निर्यातदार, व्यापारी, तसेच इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...