सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 419

दुर्बल, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 2 : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बल, वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतला. यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे,  संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या महासंचालक प्रेरणा देशभ्रतार, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहसचिव सो.ना.बागुल, महात्मा फुले विकास महामंडळाचे लहुराज माळी व अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची कामे गतीने करावी. यावेळी 2025-मधील अर्थसंकल्पीय तरतूद, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ,विभागातील रिक्त पदे, वसतिगृहे, रमाई घरकुल योजनांचा तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

0000000

मोहिनी राणे/स.सं

 

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावली बैठक

मुंबई, दि. 2 : मुंबई शहर व परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 6 जानेवारी रोजी मंत्रालय येथे ही बैठक होणार आहे.

प्रदूषण कमी करणे यासह प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाच्या विविध उपाययोजना या विषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसअं

 

विदर्भातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत कृषी सिंचन क्षमता वाढवावी – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि ०२ : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील सिंचन प्रकल्पाअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन क्षमता वाढवून शेतीपर्यंत पाणी पोहोविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. यांनी मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाडाच्या बैठकीत दिले.

मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी सचिव (लाक्षेवि) व सचिव (प्रकल्पसमन्वयक) संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाड नागपूरचे संचालक रा.श्री.सोनटक्के, मुख्य अभियंता तथा सह सचिव अभय पाठक, मुख्य अभियंता पाटबंधारे संजीव टाटू,जलसंपत्ती विभागाचे अभियंता प्रसाद नार्वेकर,नागपूरचे मुख्य अभियंता डॉ.प्र.खं.पवार,उपसचिव प्रविण कोल्हे यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाडाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.गिरीश महाजन म्हणाले की, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करून जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत ते पूर्ण क्षमतेने पाणी शेतीला पोहोचविण्यासाठी नियोजन करा.धरणातील गाळ काढणे,शेतीला पाणीपुरवठा करणारे कालवे स्वच्छ करणे या सर्व कामाना प्राधान्य देवून लोकसहभाग वाढवून शेतीला पाणी पोहोचवा.शेतीला पाणी पोहोचवताना पाण्याची गळती होवू नये,धरणांची सुरक्षितता म्हणून भविष्यकालीन उपाययोजनाही करण्यावर भर द्या.जलसंपदा विभागातंर्गत राबविण्यात येणा-या योजना प्रभावीपणे राबवा.महामंडळातंर्गत प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडून लागणा-या मान्यता तसेच सुरु असलेल्या कामांचे काटेकार नियोजन करून प्रकल्पांसाठी लागणा-या आर्थिक तरतदीचे प्रस्ताव तातडीने पाठवा. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी काटकसरीने कसा करता येईल या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत,पर्यटन विभागाशी संलग्न असलेले प्रकल्पही गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना मंत्री श्री.गिरीश महाजन यांनी केल्या.

यावेळी महामंडळातंर्गत पूर्ण झालेले मोठे,मध्यम व लघु प्रकल्पांची सद्यस्थिती,महामंडळातील उपलब्ध मनुष्यबळ, केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्तावित प्रकल्पांची सद्यस्थिती,कब्जेहक्क रक्कम भरणा करण्याबाबत मान्यता घेणे,महामंडळाकडील नदीजोड प्रकल्पांची सद्यस्थिती व भविष्यकालीन नियोजन, भुसंपादन प्रलंबित प्रकरणे यासह महामंडळातंर्गत प्रकल्पनिहाय निर्माण झालेली सिंचन क्षमता,प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना,बळीराजा जलसंजीवनी योजना यासह विभागाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

****

पणन विभागाने आधुनिक तंत्रज्ञान वापरावे – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि.2 : पणन विभागामध्ये मार्केटींगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यपध्दती राबवण्यावर भर द्यावा, शेतमालाची साठवणूक, वाहतुक व विक्री यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे, त्यादृष्टीने पुढील काळात नियोजन करण्याचे निर्देश, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पणन विभागाच्या आढावा बैठकीत पणन मंत्री श्री. रावल बोलत होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणाले की, केंद्र सरकारने शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार ( ई-नाम) ही योजना सुरू केली आहे .राज्यातील 133 बाजार समित्या ई-नामला जोडण्यात आल्या आहेत .राज्यातील उर्वरित बाजार समित्याही लवकरात लवकर ई-नाम योजनेला जोडण्यात याव्यात. प्रचलित लिलाव पद्धतीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता आणून शेतमालास रास्त भाव मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल यावर विभागाने भर दयावा.कृषी उत्पन्न बाजार समित्या या पणन विभागाचे महत्वाचे अंग आहे, त्यादृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पूरक बदल कसे करता येतील याबाबत नियोजन करावे. शेतमालाचे  योग्य त-हेने मार्केटिंग व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा. विभागाच्या कायदे व नियम यामध्ये काळानुरूप काय बदल करता येतील का यादृष्टीने विभागाने अभ्यास करावा.शेतमालास आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळण्यासाठीही प्रयत्न व्हावेत.पणन विभागाच्या योजना लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मॅग्नेट प्रकल्पांचे नांव कृषी पणन प्रकल्प करून त्यांची व्याप्ती वाढविण्यासंदर्भातील सूचनाही श्री. रावल यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगांवकर, राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अप्पासाहेब धुळाज, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र कृषी राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, उपसचिव संतोष देशमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी आपआपल्या शाखासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले.

0000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई,दि. 2 : कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून ज्याठिकाणी अडचणी आहेत. तेथे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्रालयीन दालनात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी म्हणाले की, अपुर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.सुरु असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यात यावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी यांनी दक्ष रहावे. प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मंत्री श्री महाजन यांनी महामंडळाच्या भविष्यकालीन प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे,कोकण पाटबंधारे  विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, सहसचिव तथा मुख्य अभियंता अभय पाठक, संजिव टाटू, प्रसाद नार्वेकर, मिलिंद नाईक, यांच्यासह महामंडळाचे व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे प्रकल्पाविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

अपारंपरिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल – अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरासाठी आग्रही असून महाराष्ट्र हे 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून 50 टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

अपारंपरिक ऊर्जा मंत्री श्री.सावे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अपारंपरिक ऊर्जा व दुग्धविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे म्हणाले, उपलब्धतेबाबत पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना मर्यादा आहेत, त्या तुलनेत अपारंपरिक ऊर्जास्त्रोत अमर्याद आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रदूषण विरहीत असतात. भविष्यात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका आहे. शासकीय इमारतीत 2025 अखेरपर्यंत संपूर्णपणे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावयाचे आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय इमारतीत सौर विद्युत यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. विभागामार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देणारी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप मिळावेत, यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा वार्षिक योजनेत पाच टक्के निधी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर आधारित वीज निर्मितीसाठी राखीव ठेवण्यात आला पाहिजे, यासाठी  विभागाने प्रस्ताव तयार करावा. राज्यातील महानगरपालिकांमध्ये  घनकचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्याचे निर्देशही श्री.सावे यांनी दिले.

बैठकीस ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, ऊर्जा विभागाचे सहसचिव नारायण कराड तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महाऊर्जा यांनी तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन श्री. सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

दुग्ध विकास विभागाचा आढावा

दुग्धविकास मंत्री श्री. सावे यांनी दुग्ध विकास विभागाचा आढावा घेतला. राज्यातील खासगी, सहकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. अनेक दूध विकास संस्था राज्यात कार्यरत असून त्यांनाही भेट देऊन आढावा घेतला जाईल, असे श्री. सावे यांनी सांगितले. दूध भेसळ रोखण्यासाठी दुग्धविकास विभाग स्वतंत्र कायदा करण्याच्या तयारीत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या  बैठकीला अपर मुख्य सचिव राजेशकुमार तसेच दुग्धविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 2 : राज्याच्या काना-कोपऱ्यातून कामाच्या पूर्ततेसाठी नागरिक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण पडतो. मंत्रालयात येणारे नागरिक, येथील अधिकारी व कर्मचारीवृंद यांना विनासायास, सुलभ प्रवेश मिळावा आणि सुरक्षा अबाधित देखील अबाधित रहावी, यासाठी कृत्रिम बुद्धमतेचा उपयोग करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्रालय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इक्बालसिंग चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मंत्रालय प्रवेश ते बाहेर पडेपर्यंतची व्यवस्था कार्यरत करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मंत्रालयातून विधान भवनात कार्यालयीन कामकाजासाठी अधिकारी व कर्मचारी जात असतात.  अधिवेशनादरम्यान तर विधान भवन ते मंत्रालय वर्दळ वाढलेली असते. विधान भवनात नियमित कार्यालयीन कामासाठी जात असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना सर्व ठिकाणी प्रवेश असलेले सुरक्षा पासेस देण्यात यावेत. मंत्रालय ते विधान भवन भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. या भुयारी मार्गाद्वारे विधान भवनात जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेश उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही श्री. फडणवीस यांनी दिले.

मंत्रालयात प्रत्येक मजल्यावर सुरक्षा जाळीचे काम पूर्ण करावे. काम पूर्ण झाल्यावर मध्यभागी लावलेले सुरक्षा जाळे काढून टाकण्याची कार्यवाही करण्यता यावी. मंत्रालय प्रवेशद्वारावर वस्तू व साहित्याची चोख तपासणी करण्यात यावी. कुठलीही आक्षेपार्ह वस्तू व साहित्य मंत्रालयात येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वीकारला पदभार

मुंबई, दि. 2 : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात विभागांचा पदभार स्वीकारला.

सर्व संबंधित विभागाचा आढावा घेवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आणि त्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासंदर्भात कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही  राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

000

श्रद्धा मेश्राम,स.सं

 

इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी स्वीकारला विभागाचा पदभार

मुंबई, दि. २:  इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा तसेच दुग्धविकास विभाग मंत्री अतुल सावे यांनी विभागाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच श्री.सावे यांनी अपारंपरिक ऊर्जा विभागाचा आढावा घेतला.

मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन करून श्री. सावे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

अपारंपरिक ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. पुढील शंभर दिवसांत या योजनांना गती देण्यात येईल, असेही अपारंपरिक ऊर्जामंत्री श्री.सावे यांनी सांगितले. यावेळी ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

 

ग्रामीण भागात नळाद्वारे पाणीपुरवठ्याच्या योजनांना गती देणार – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 2 : पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार श्री.पाटील यांनी स्वीकारला.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या विभागाच्या योजना यापूर्वीही प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून प्रगतीपथावरील योजनांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात येईल. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन विविध कामांना गती देणार आहे. विभागाच्या माध्यमातून पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/ विसंअ

ताज्या बातम्या

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

0
मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली. विधानसभा सदस्य सर्वश्री अमित साटम, किशोर आप्पा...

‘वंदे मातरम्‌’ व ‘राज्यगीता’ने पावसाळी अधिवेशनाच्या विधानसभेच्या कामकाजास प्रारंभ

0
मुंबई, दि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,...

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...