सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 420

खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराॲथलिट सचिन खिलारे यांच्यासह सर्व खेळाडूंचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या दिपालीताई देशपांडे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, या पुरस्कारविजेत्या खेळाडूंना जाहीर झालेला पुरस्कार हा या खेळाडूंनी भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा गौरव आहे. नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून भारतवासियांना दिलेल्या आनंदाची, अभिमानस्पद क्षणांची तुलना होऊ शकत नाही. डी गुकेश यांने नुकतंच बुद्धीबळातल्या विश्वविजेतापदावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेता होताना त्याने केलेला खेळ संस्मरणीय होताच, त्याचबरोबरीनं विश्वविजेता जाहीर झाल्यानंतरचं शांत, संयमी, सभ्य वर्तनानं केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मान उंचावली. भारतीय हॉकी संघासाठी सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणारा हरमनप्रित सिंह आणि पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांचीही कामगिरी खेलरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

खेलरत्न, अर्जून, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू, संस्था, संघटनांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

——-००००००

पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उभाराव्यात – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि 2 : नागरी भागाचा विकास करताना पायाभूत सोयी सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात याव्यात. मल:निस्सारण केंद्र उभारणी, नाल्यांचे प्रदुषित पाणी एकत्रित करून संकलनासाठी वाहिन्या, जलपर्णी निर्मूलन या संदर्भातील कामांना गती देण्यात यावी. स्वच्छतेबाबतही जनजागृती करण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या.

नगरविकास विभागाच्या विविध विकासकामांचा आढावा मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला. बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती व आगामी कामांची रुपरेषा याबाबत चर्चा झाली.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या यशस्वी कामांची माहिती तसेच प्रगतीपथावरील कामकाजाचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा पुरविणे, पूल बांधणे, रस्ते विषयक कामकाज, पाणीपुरवठा, सोशल कल्चरल सेंटर उभारणे, एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी उभारणे, क्रीडा संकुल, नगर रचना योजनांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करणे, अर्बन ग्रोथ सेंटरमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते विकसित करणे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, तलाव सुशोभीकरण, रस्ते चौपदरीकरण, मल्टीमोडल हब विकसित करणे, गृह योजना प्रकल्प उभारण्यासंदर्भातील कामांचाही यावेळी आढावा घेतला.

सांताक्रझ-चेंबूर लिंकरोड, मुंबईच्या धर्तीवर ठाणे येथे तयार करण्यात येणाऱ्या कोस्टल रोडबाबत तसेच नगरविकास विभागाच्या इतरही प्रकल्पांबाबतही चर्चा झाली.

‘एमएमआरडीए’चे सह आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त योगेश म्हसे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ‘एमआयडीसी’च्या मुख्य नियोजक सुलेखा वैजापूरकर उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

बंदरांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करावीत – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे

मुंबई,दि.2 : महाराष्ट्र सागरी  मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंदरांची कामे दर्जेदार,  गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी दक्ष रहावे, गुणवत्तेत तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी मंडळ येथे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक झाली. पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचाही श्री. राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वाढवण बंदराच्या कामासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळ ही महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लहान बंदरांच्या विकासासाठीची शिखर संस्था आहे.राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून या बंदरांचा विकास होणे अपेक्षित आहे.बंदरांचा विकास करतांना पारदर्शकता असावी.महाराष्ट्र राज्यातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिनाभरात काही बंदरांचे उद्घाटन व काहींचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. कामांमध्ये त्रुटी असतील तर तातडीने पूर्ण कराव्यात. विविध उपक्रम राबविण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल. रेडिओ क्लबचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही मंत्री श्री. राणे म्हणाले.

मत्स्यव्यवसाय विभागाने महसूल निर्मिती आणि उत्पादन याबाबत प्रभावी अंमलबजावणी करावी

१०० दिवसांचा आराखडा तयार करताना मत्स्यव्यवसाय विभागाने जास्तीत जास्त महसूल निर्मितीसाठी प्रयत्न करावे. तसेच उत्पादन वाढीसाठीही प्रभावी अंमलबजावणी करावी. मत्स्यव्यवसाय विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. काही देशांचे 90 टक्के महसूल मत्स्यव्यवसायातून मिळतो. त्या धर्तीवर आपल्या राज्याचाही महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळून महसूल निर्मितीसही चालना मिळेल. मुंबई शहरात विविध भागांमध्ये मत्स्यालय उभारणी करावी, त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून पर्यटन व्यवसाय वाढेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मा.मु.का.अ.माणिक गुरसाळ, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्तीय नियंत्रक नि. मुख्य लेखाधिकारी सुरेश सारंगकर मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळ पंकज कुमार, सहायुक्त युवराज चौगुले, अभय देशपांडे, महेश देवरे, उपायुक्त श्रीमती हृता दीक्षित, योगेश देसाई, कार्यकारी अभियंता  ललिता गौरी गिरीबुवा, सहाय्यक संचालक लक्ष्मण धुळेकर, सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील, सुभाष भोंबे  हे देखील उपस्थित होते.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. २: कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा  योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इ. पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी दिली होती. त्यास अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अमृत अभियानाची प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार (PDMC) असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किंमतीस मान्यता उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली आहे.

या योजनेमुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिला होता.

००००

 

दुर्बल, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 2 : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बल, वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतला. यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे,  संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या महासंचालक प्रेरणा देशभ्रतार, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहसचिव सो.ना.बागुल, महात्मा फुले विकास महामंडळाचे लहुराज माळी व अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची कामे गतीने करावी. यावेळी 2025-मधील अर्थसंकल्पीय तरतूद, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ,विभागातील रिक्त पदे, वसतिगृहे, रमाई घरकुल योजनांचा तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

0000000

मोहिनी राणे/स.सं

 

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावली बैठक

मुंबई, दि. 2 : मुंबई शहर व परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 6 जानेवारी रोजी मंत्रालय येथे ही बैठक होणार आहे.

प्रदूषण कमी करणे यासह प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाच्या विविध उपाययोजना या विषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसअं

 

विदर्भातील पाटबंधारे प्रकल्पांतर्गत कृषी सिंचन क्षमता वाढवावी – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई दि ०२ : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील सिंचन प्रकल्पाअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन क्षमता वाढवून शेतीपर्यंत पाणी पोहोविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. यांनी मंत्रालयातील दालनात पार पडलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाडाच्या बैठकीत दिले.

मंत्रालयात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन बोलत होते. यावेळी सचिव (लाक्षेवि) व सचिव (प्रकल्पसमन्वयक) संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाड नागपूरचे संचालक रा.श्री.सोनटक्के, मुख्य अभियंता तथा सह सचिव अभय पाठक, मुख्य अभियंता पाटबंधारे संजीव टाटू,जलसंपत्ती विभागाचे अभियंता प्रसाद नार्वेकर,नागपूरचे मुख्य अभियंता डॉ.प्र.खं.पवार,उपसचिव प्रविण कोल्हे यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाडाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मंत्री श्री.गिरीश महाजन म्हणाले की, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करून जे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत ते पूर्ण क्षमतेने पाणी शेतीला पोहोचविण्यासाठी नियोजन करा.धरणातील गाळ काढणे,शेतीला पाणीपुरवठा करणारे कालवे स्वच्छ करणे या सर्व कामाना प्राधान्य देवून लोकसहभाग वाढवून शेतीला पाणी पोहोचवा.शेतीला पाणी पोहोचवताना पाण्याची गळती होवू नये,धरणांची सुरक्षितता म्हणून भविष्यकालीन उपाययोजनाही करण्यावर भर द्या.जलसंपदा विभागातंर्गत राबविण्यात येणा-या योजना प्रभावीपणे राबवा.महामंडळातंर्गत प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडून लागणा-या मान्यता तसेच सुरु असलेल्या कामांचे काटेकार नियोजन करून प्रकल्पांसाठी लागणा-या आर्थिक तरतदीचे प्रस्ताव तातडीने पाठवा. धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी काटकसरीने कसा करता येईल या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत,पर्यटन विभागाशी संलग्न असलेले प्रकल्पही गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना मंत्री श्री.गिरीश महाजन यांनी केल्या.

यावेळी महामंडळातंर्गत पूर्ण झालेले मोठे,मध्यम व लघु प्रकल्पांची सद्यस्थिती,महामंडळातील उपलब्ध मनुष्यबळ, केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्तावित प्रकल्पांची सद्यस्थिती,कब्जेहक्क रक्कम भरणा करण्याबाबत मान्यता घेणे,महामंडळाकडील नदीजोड प्रकल्पांची सद्यस्थिती व भविष्यकालीन नियोजन, भुसंपादन प्रलंबित प्रकरणे यासह महामंडळातंर्गत प्रकल्पनिहाय निर्माण झालेली सिंचन क्षमता,प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना,बळीराजा जलसंजीवनी योजना यासह विभागाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

****

पणन विभागाने आधुनिक तंत्रज्ञान वापरावे – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि.2 : पणन विभागामध्ये मार्केटींगसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यपध्दती राबवण्यावर भर द्यावा, शेतमालाची साठवणूक, वाहतुक व विक्री यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे, त्यादृष्टीने पुढील काळात नियोजन करण्याचे निर्देश, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पणन विभागाच्या आढावा बैठकीत पणन मंत्री श्री. रावल बोलत होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणाले की, केंद्र सरकारने शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषी बाजार ( ई-नाम) ही योजना सुरू केली आहे .राज्यातील 133 बाजार समित्या ई-नामला जोडण्यात आल्या आहेत .राज्यातील उर्वरित बाजार समित्याही लवकरात लवकर ई-नाम योजनेला जोडण्यात याव्यात. प्रचलित लिलाव पद्धतीमध्ये सुसूत्रता व पारदर्शकता आणून शेतमालास रास्त भाव मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

शेतकरी हा आपल्या राज्याचा कणा असून पणन विभागाच्या माध्यमातून शेतकरी, आडते, व्यापारी, ग्राहक यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांचे हित कसे जोपासता येईल यावर विभागाने भर दयावा.कृषी उत्पन्न बाजार समित्या या पणन विभागाचे महत्वाचे अंग आहे, त्यादृष्टीने बाजार समित्यांमध्ये शेतकरी पूरक बदल कसे करता येतील याबाबत नियोजन करावे. शेतमालाचे  योग्य त-हेने मार्केटिंग व्हावे, यासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तंत्रज्ञानावर भर ठेवावा. विभागाच्या कायदे व नियम यामध्ये काळानुरूप काय बदल करता येतील का यादृष्टीने विभागाने अभ्यास करावा.शेतमालास आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळण्यासाठीही प्रयत्न व्हावेत.पणन विभागाच्या योजना लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. मॅग्नेट प्रकल्पांचे नांव कृषी पणन प्रकल्प करून त्यांची व्याप्ती वाढविण्यासंदर्भातील सूचनाही श्री. रावल यांनी दिल्या.

या आढावा बैठकीस पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगांवकर, राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अप्पासाहेब धुळाज, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र कृषी राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, उपसचिव संतोष देशमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी विभागाच्या कार्यालय प्रमुखांनी आपआपल्या शाखासंदर्भातील विभागाचे सादरीकरण केले.

0000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

 

कोकण पाटबंधारे विकास महामंडळातील प्रकल्पांच्या कामांना गती देणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई,दि. 2 : कोकण पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत असणाऱ्या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात येणार असून ज्याठिकाणी अडचणी आहेत. तेथे समन्वयाने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जलसंपदा (विदर्भ,तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्रालयीन दालनात कोकण पाटबंधारे विकास महामंडळाविषयी आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांनी म्हणाले की, अपुर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.सुरु असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यात यावी. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी अधिकारी यांनी दक्ष रहावे. प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मंत्री श्री महाजन यांनी महामंडळाच्या भविष्यकालीन प्रकल्पांचाही सविस्तर आढावा घेतला.

यावेळी सचिव (लाक्षेवि) डॉ. संजय बेलसरे,कोकण पाटबंधारे  विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, सहसचिव तथा मुख्य अभियंता अभय पाठक, संजिव टाटू, प्रसाद नार्वेकर, मिलिंद नाईक, यांच्यासह महामंडळाचे व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे प्रकल्पाविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

००००

राजू धोत्रे/विसंअ

अपारंपरिक ऊर्जेचा सर्वाधिक वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरेल – अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे

मुंबई, दि.२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरासाठी आग्रही असून महाराष्ट्र हे 2030 पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून 50 टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

अपारंपरिक ऊर्जा मंत्री श्री.सावे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अपारंपरिक ऊर्जा व दुग्धविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे म्हणाले, उपलब्धतेबाबत पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना मर्यादा आहेत, त्या तुलनेत अपारंपरिक ऊर्जास्त्रोत अमर्याद आहेत. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत प्रदूषण विरहीत असतात. भविष्यात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका आहे. शासकीय इमारतीत 2025 अखेरपर्यंत संपूर्णपणे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावयाचे आहे. त्यामुळे प्रत्येक शासकीय इमारतीत सौर विद्युत यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. विभागामार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देणारी पीएम कुसुम योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप मिळावेत, यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा वार्षिक योजनेत पाच टक्के निधी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवर आधारित वीज निर्मितीसाठी राखीव ठेवण्यात आला पाहिजे, यासाठी  विभागाने प्रस्ताव तयार करावा. राज्यातील महानगरपालिकांमध्ये  घनकचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी प्रकल्प सुरू करण्याचे निर्देशही श्री.सावे यांनी दिले.

बैठकीस ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, ऊर्जा विभागाचे सहसचिव नारायण कराड तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत महाऊर्जा यांनी तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे प्रकाशन श्री. सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

दुग्ध विकास विभागाचा आढावा

दुग्धविकास मंत्री श्री. सावे यांनी दुग्ध विकास विभागाचा आढावा घेतला. राज्यातील खासगी, सहकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. अनेक दूध विकास संस्था राज्यात कार्यरत असून त्यांनाही भेट देऊन आढावा घेतला जाईल, असे श्री. सावे यांनी सांगितले. दूध भेसळ रोखण्यासाठी दुग्धविकास विभाग स्वतंत्र कायदा करण्याच्या तयारीत असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. या  बैठकीला अपर मुख्य सचिव राजेशकुमार तसेच दुग्धविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

ताज्या बातम्या

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून विविध विषयांचा आढावा

0
सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जलप्रकल्प, पुनर्वसन आदी कामांचा आढावा मुंबई दि. ३०: जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा ‘ईव्ही’ कारमधून विधानभवनापर्यंत प्रवास

0
मुंबई, दि. ३० : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानभवन परिसरात इलेक्ट्रिक वाहनाने प्रवेश केला. प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ५७ हजार ५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर

0
मुंबई, दि. ३० : विधिमंडळाच्या जून 2025 च्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी 57 हजार 509 कोटी 71...