सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 418

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई, दि. ०३:  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.

०००

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला तक्रारीचा तात्काळ निपटारा

बुलढाणा, दि. 2(जिमाका) : केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे आज बुलढाणा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसुन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांना येणाऱ्या अडचणी संदर्भात त्यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून तक्रारींचा ऑन द स्पॉट निपटारा केला.

या दरम्यान केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून शासनाच्या योजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. वन्यप्राण्यापासून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात उपाययोजना करावे. शेतकऱ्यांचे विज प्रश्न मार्गी लावण्यासाठी सौर उर्जा प्रकल्पाना गती द्यावी. शासकीय जमीनीवर फळबाग लागवड, शेततळे निर्माण करुन शासनाच्या उत्पन्नात वाढ करण्यासंदर्भात नियोजन करावे. मानव व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी झटका मशीन उपलब्ध करुन द्यावे. त्यासाठी शेतकऱ्याचे सामूहिक अर्ज स्विकारुन त्यांना झटका मशिन उपलब्ध करुन द्यावे, आदी निर्देश यावेळी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

000000

महाराष्ट्र शासनाचे १८ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 02 : महाराष्ट्र शासनाच्या 18 वर्षे मुदतीच्या २ हजार कोटींच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

07 जानेवारी, 2025 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  07 जानेवारी, 2025 रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान 08 जानेवारी, 2025  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्ज रोख्याचा कालावधी १८ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी 08 जानेवारी, 2025 पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक 08 जानेवारी, 2043 रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ०८ आणि जानेवारी ०८ रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

 

००००

 

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ ची ५.८ टक्के दराने परतफेड

मुंबई, दि. २ : राज्य शासनामार्फत ५.८ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. 02 फेब्रुवारी 2025 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. १ फेब्रुवारी, २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. ०२ फेब्रुवारी, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँक शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे,  त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबंधित तपशिलाच्या/ इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ५.८ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.” असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घ्यावी.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील, असे  सचिव  (वित्तीय सुधारणा) शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

०००

 

खेलरत्न, अर्जून, द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 2 :- केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराॲथलिट सचिन खिलारे यांच्यासह सर्व खेळाडूंचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या दिपालीताई देशपांडे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, या पुरस्कारविजेत्या खेळाडूंना जाहीर झालेला पुरस्कार हा या खेळाडूंनी भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा गौरव आहे. नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून भारतवासियांना दिलेल्या आनंदाची, अभिमानस्पद क्षणांची तुलना होऊ शकत नाही. डी गुकेश यांने नुकतंच बुद्धीबळातल्या विश्वविजेतापदावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेता होताना त्याने केलेला खेळ संस्मरणीय होताच, त्याचबरोबरीनं विश्वविजेता जाहीर झाल्यानंतरचं शांत, संयमी, सभ्य वर्तनानं केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मान उंचावली. भारतीय हॉकी संघासाठी सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणारा हरमनप्रित सिंह आणि पॅराॲथलिट प्रवीणकुमार यांचीही कामगिरी खेलरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

खेलरत्न, अर्जून, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू, संस्था, संघटनांचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

——-००००००

पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उभाराव्यात – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि 2 : नागरी भागाचा विकास करताना पायाभूत सोयी सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात याव्यात. मल:निस्सारण केंद्र उभारणी, नाल्यांचे प्रदुषित पाणी एकत्रित करून संकलनासाठी वाहिन्या, जलपर्णी निर्मूलन या संदर्भातील कामांना गती देण्यात यावी. स्वच्छतेबाबतही जनजागृती करण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या.

नगरविकास विभागाच्या विविध विकासकामांचा आढावा मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला. बैठकीत प्रकल्पांची सद्यस्थिती व आगामी कामांची रुपरेषा याबाबत चर्चा झाली.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण, पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या यशस्वी कामांची माहिती तसेच प्रगतीपथावरील कामकाजाचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा पुरविणे, पूल बांधणे, रस्ते विषयक कामकाज, पाणीपुरवठा, सोशल कल्चरल सेंटर उभारणे, एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी उभारणे, क्रीडा संकुल, नगर रचना योजनांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करणे, अर्बन ग्रोथ सेंटरमध्ये वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्ते विकसित करणे, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, तलाव सुशोभीकरण, रस्ते चौपदरीकरण, मल्टीमोडल हब विकसित करणे, गृह योजना प्रकल्प उभारण्यासंदर्भातील कामांचाही यावेळी आढावा घेतला.

सांताक्रझ-चेंबूर लिंकरोड, मुंबईच्या धर्तीवर ठाणे येथे तयार करण्यात येणाऱ्या कोस्टल रोडबाबत तसेच नगरविकास विभागाच्या इतरही प्रकल्पांबाबतही चर्चा झाली.

‘एमएमआरडीए’चे सह आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त योगेश म्हसे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ‘एमआयडीसी’च्या मुख्य नियोजक सुलेखा वैजापूरकर उपस्थित होते.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

 

बंदरांची कामे दर्जेदार व कालमर्यादेत पूर्ण करावीत – मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे

मुंबई,दि.2 : महाराष्ट्र सागरी  मंडळाच्या अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या बंदरांची कामे दर्जेदार,  गुणवत्तापूर्ण आणि कालमर्यादेत पूर्ण व्हावीत यासाठी दक्ष रहावे, गुणवत्तेत तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले.

महाराष्ट्र सागरी मंडळ येथे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक झाली. पुढील १०० दिवसांमध्ये बंदरे विकास विभागाने करावयाच्या कामांचाही श्री. राणे यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी वाढवण बंदराच्या कामासंदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. राणे म्हणाले, महाराष्ट्र सागरी मंडळ ही महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी लहान बंदरांच्या विकासासाठीची शिखर संस्था आहे.राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून या बंदरांचा विकास होणे अपेक्षित आहे.बंदरांचा विकास करतांना पारदर्शकता असावी.महाराष्ट्र राज्यातील लघु आणि मध्यवर्ती बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिनाभरात काही बंदरांचे उद्घाटन व काहींचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. कामांमध्ये त्रुटी असतील तर तातडीने पूर्ण कराव्यात. विविध उपक्रम राबविण्यासाठी धोरण ठरविण्यात येईल. रेडिओ क्लबचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही मंत्री श्री. राणे म्हणाले.

मत्स्यव्यवसाय विभागाने महसूल निर्मिती आणि उत्पादन याबाबत प्रभावी अंमलबजावणी करावी

१०० दिवसांचा आराखडा तयार करताना मत्स्यव्यवसाय विभागाने जास्तीत जास्त महसूल निर्मितीसाठी प्रयत्न करावे. तसेच उत्पादन वाढीसाठीही प्रभावी अंमलबजावणी करावी. मत्स्यव्यवसाय विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. काही देशांचे 90 टक्के महसूल मत्स्यव्यवसायातून मिळतो. त्या धर्तीवर आपल्या राज्याचाही महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळून महसूल निर्मितीसही चालना मिळेल. मुंबई शहरात विविध भागांमध्ये मत्स्यालय उभारणी करावी, त्या ठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून पर्यटन व्यवसाय वाढेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बंदरे विकास विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, मा.मु.का.अ.माणिक गुरसाळ, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, मुख्य अभियंता राजाराम गोसावी, वित्तीय नियंत्रक नि. मुख्य लेखाधिकारी सुरेश सारंगकर मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास मंडळ पंकज कुमार, सहायुक्त युवराज चौगुले, अभय देशपांडे, महेश देवरे, उपायुक्त श्रीमती हृता दीक्षित, योगेश देसाई, कार्यकारी अभियंता  ललिता गौरी गिरीबुवा, सहाय्यक संचालक लक्ष्मण धुळेकर, सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील, सुभाष भोंबे  हे देखील उपस्थित होते.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

मुंबई, दि. २: कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा  योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व हरित क्षेत्र विकास इ. पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येत आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी दिली होती. त्यास अनुसरून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अमृत अभियानाची प्रकल्प विकास व व्यवस्थापन सल्लागार (PDMC) असणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केलेल्या तांत्रिक बदलाच्या ३५७.१६ कोटी रुपयांच्या प्रकल्प किंमतीस मान्यता उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली आहे.

या योजनेमुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्याबरोबरच १०५ दलघमी साठवण क्षमता देखील निर्माण होणार आहे. या योजनेला मान्यता देण्याचा शब्द उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना दिला होता.

००००

 

दुर्बल, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणावे – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 2 : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बल, वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचा आढावा घेतला. यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे,  संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या महासंचालक प्रेरणा देशभ्रतार, समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, सहसचिव सो.ना.बागुल, महात्मा फुले विकास महामंडळाचे लहुराज माळी व अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, सामाजिक न्याय विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची कामे गतीने करावी. यावेळी 2025-मधील अर्थसंकल्पीय तरतूद, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ,विभागातील रिक्त पदे, वसतिगृहे, रमाई घरकुल योजनांचा तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.

0000000

मोहिनी राणे/स.सं

 

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावली बैठक

मुंबई, दि. 2 : मुंबई शहर व परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 6 जानेवारी रोजी मंत्रालय येथे ही बैठक होणार आहे.

प्रदूषण कमी करणे यासह प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाच्या विविध उपाययोजना या विषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसअं

 

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...