शुक्रवार, जून 27, 2025
Home Blog Page 400

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यमापन करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

मुंबई, दि. 8 :- राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई, चर्चगेट येथे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते.

या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.उज्ज्वला चक्रदेव, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण  राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, सदस्य अनिल राव व संबंधित अधिकारी  उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक यांच्यात अधिकाधिक संवाद वाढवावा. ज्या महाविद्यालयामध्ये, विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत असे महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडून त्यांच्या कार्यपद्धतीचा एकत्रित अहवाल तयार करावा. त्यामुळे राज्यातील शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणीवर हा अहवाल मार्गदर्शक ठरेल. तसेच  सुकाणू समितीच्या अभ्यास गटाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भातील सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून येणाऱ्या सूचना संदर्भात राज्याचा अहवाल तयार करून आयोगाला कळवावे, अशा सूचनाही मंत्री. श्री. पाटील यांनी यावेळी  दिल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/

महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन

मुंबई,  दि. 8  : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत आज कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे स्नानगृह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

मंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील भगिनींना स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार असून, यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, “झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते, हे आम्ही जाणतो. तो त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आले. या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे आहेत, शॉवर आहेत, २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे.

पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी यासाठी या स्नानगृहात महिला कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत.

****

संध्या गरवारे/विसंअ/

कृ‍षिविषयक योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

मुंबई, दि. 8 : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित विविध योजना आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे निर्देश वित्त व नियोजन, कृषी विभागाचे राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिले.

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कृषी व नियोजन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी शासनस्तरावरून आवश्यक ती मदत करण्यात येईल. पानमळ्याच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाकडून नवीन योजना राबवण्यात यावी. राज्यात कृषी क्षेत्रात लक्ष केंद्रीत कार्यपद्धतीने काम करण्याची गरज असून पीक पद्धतीनुसार उद्दिष्ट ठरवले पाहिजे. पडीक शेतीच्या प्रश्नसंबंधी कोणत्या उपाययोजना करता येतील व त्याची अंमलबजावणी कशी करता येईल यासंबधी बैठकीत चर्चा करण्यात आली.

नियोजन विभागामार्फत राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजनांचा आढावा घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही याप्रसंगी त्यांनी दिले.

नियोजन व कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली.

या  बैठकीस कृषी व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

सोयाबीन खरेदीतील अडचणी तातडीने दूर कराव्यात – पणन मंत्री जयकुमार रावल

सोयाबीन खरेदीचे पेमेंट जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश

मुंबई दि. ८ : राज्यात नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (एनसीसीएफ) मार्फत करण्यात येणारी सोयाबीन खरेदी बारदाना अभावी रखडू नये, शेतकऱ्यांना यासाठी कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. बारदान तुटवडा सोयाबीन खरेदीत अडचण ठरू नये यासाठी तात्काळ उपाय योजना करावी. सोयाबीनची खरेदी वेळेत करून महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघाने खरेदी रक्कम तीन ते सात दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या. अडचणीतील तात्पुरती उपाययोजना म्हणून सोयाबीन खरेदीसाठी सुस्थितीत असलेले बारदाण शेतकऱ्यांकडून स्विकारले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हंगाम २०२४-२५ अंतर्गत सोयाबीन हमी भावाने खरेदीबाबतच्या अडचणींवर उपाययोजना आणि खरेदीच्या कामकाजाचा आज पणन मंत्री श्री. रावल यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार रामराव वडकुते, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे आप्पासाहेब धुळाज, अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, नाफेडचे राज्यप्रमुख भव्या आनंद यांच्यासह 26 जिल्ह्यांचे पणन अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले की, नाफेड, मार्केटिंग फेडरेशन, वखार महामंडळ, व संस्था यांनी समन्वयाने काम करून सोयाबीन खरेदीतील अडचणी सोडवाव्यात. तसेच आतापर्यंत खरेदी केलेल्या सोयाबीनची पेमेंट दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. पुढे होणाऱ्या खरेदीचे देयके दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याचे नियोजन करावे. बारदाण खरेदी बाबत पारदर्शक व जलद पद्धतीने प्रक्रिया राबविण्यात यावी. सुस्थितीत असलेले बारदाण शेतकऱ्यांकडे असल्यास त्यांच्याकडून ते स्वीकारण्यात यावे. गोडावून उपलब्धता व सुस्थितीबाबत उपाययोजना करावी. सोयाबीन खरेदी वेगाने होईल, अशा पद्धतीची यंत्रणा कार्यान्वित करावी. पोर्टलची तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोयाबीनची खरेदी वेगाने व पारदर्शक कशी होईल या संदर्भात तात्काळ उपययोजना कराव्यात असे निर्देश मंत्री श्री. रावल यांनी दिले.

गरज असल्यास ग्रेडरची संख्या वाढविण्यात यावी. तसेच ५० किमी पेक्षा जास्त अंतरावर गोडाऊन असल्यास अतिरिक्त निधी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देशही मंत्री श्री. रावल यांनी दिले. वखार महामंडळाशी समन्वय साधून गोडाऊन संदर्भातील समस्या सोडविण्यात याव्यात. नाफेडसोबत समन्वय साधून प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना मंत्री श्री. रावल यांनी दिल्या.

सोयाबीन विक्रीसाठी आतापर्यंत एकूण सात लाख ४४ हजार ७५७ शेतकऱ्यांची नोंदणी केली असून, दोन लाख सहा हजार ९९० शेतकऱ्यांकडून ४ लाख २६ हजार ०८७ मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे.

0000

बांधकामाधीन प्रकल्पाची कामे गतीने करून सिंचन क्षेत्र वाढवावे – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. ७ :-  जलसंपदा  विभागाने बांधकामाधीन सिंचन प्रकल्पाची कामे गतीने करून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र क्षमता वाढवावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडील कामांच्या आढावा बैठकीत दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता तथा सह सचिव सर्वश्री अभय पाठक, संजीव टाटू, अभियंता प्रसाद नार्वेकर, मुख्य अभियंता ह. वि. गुणाले व ह. तु. धुमाळ, उपसचिव प्रवीण कोल्हे, अलका अहिरराव यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना करून मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, महामंडळांतर्गत प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाकडून लागणाऱ्या मान्यता तसेच सुरु असलेल्या कामांचे काटेकोर नियोजन करावे. प्रकल्पांसाठी आर्थिक तरतुदीचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत.

धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचा वापर शेतीच्या सिंचनासाठी काटकसरीने कसा करता येईल या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. सिंचनासाठी सोडलेले पाणी, त्याचा झालेला वापर यानुसार पाणीपट्टी वसुली होणे आवश्यक आहे. यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर नियमित भेटी देऊन याबाबतचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले.

मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजना विस्तार व सुधारणा, विशेष दुरुस्ती अंतर्गत कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण  व्हावीत. संबधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील योजनांच्या कामांचे रोडमॅप तयार करावेत. योजनांची कामे निर्धारित वेळेत झाल्यास सिंचनाचे क्षेत्र वाढून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.

नदीपात्र स्वच्छ ठेवणे, गाळ काढणे याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे असे सांगून मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनाही गतीने राबवाव्यात. सिंचन व पिण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी असेही ते म्हणाले.

साकळाई योजना, जिहे कठापूर कुकडी प्रकल्पाचा आढावा

या बैठकीनंतर साकळाई जलसिंचन योजना, कुकडी प्रकल्प, सोळशी धरण प्रकल्प, जिहे कठापूर योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

आंधळी योजनेच्या (जिहे कठापूर) योजनेतील उर्वरित कामे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करणेबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या योजनेतील कामांसाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करावेत. यावेळी औंध उपसा सिंचन योजनेबाबतही चर्चा करण्यात आली.

दौंड विधानसभा मतदार संघातील सिंचन योजनांचा आढावा

आमदार राहुल कुल यांनी दौंड विधानसभा मतदार संघातील जनाई  शिरसाई, पुरंदर उपसा सिंचन योजना, उजनी बॅक वॉटरसह अन्य उपसा सिंचन योजनेच्या कामांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

००००

कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई दि. ८ : पाणी पुरवठा व  स्वच्छता विभागाच्या योजनांतर्गत  मंजूर विविध कामांची विहीत कालमर्यादेत  पूर्तता न करणाऱ्या  कंत्राटद्वारांवर  नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले.

मंत्रालयात आयोजित ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कामांच्या आढावा बैठकीत मंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस विभागाचे  सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशन अभियानाचे संचालक ई. रविंद्रन यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर प्रामुख्याने भर द्यावा, असे सूचित करून त्यांनी विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे कामात दिरंगाई करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचित केले.  त्याचप्रमाणे कामांची वेळोवेळी पाहणी करुन त्याबाबतचा अद्यावत क्षेत्रीय पाहणी आणि आर्थिक प्रगती अहवाल ठेवावा. कामांची पाहणी करून त्यानतंरच प्रमाणिकरण द्यावे. तसेच पूर्ण झालेल्या योजना हस्तांतरित करुन योजना अंमलबजावणीच्या कामांची टप्पे निहाय जबाबदारी निश्चित करण्यात यावी.  योजनांची अमंलबजावणी दर्जेदाररित्या वेळेत पूर्ण  होण्याच्या दृष्टीने यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्यास्तरावर कटाक्षाने लक्ष देऊन तालुका निहाय आढावा घ्यावा,असे सूचित केले.

बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत  कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी सद्यस्थिती, हर घर जल प्रमाणीकरण, आर्थिक खर्चाची सद्यस्थिती, योजना पूर्ण व हस्तांतरण सद्यस्थिती, प्रलंबित योजनांची माहिती, स्वच्छ भारत मिशन, (ग्रा.) 2.0 या योजनेच्या अंतर्गत विविध कामांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

0000

वंदना थोरात/विसंअ/

पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करावी – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई दि. ८ : राज्यात पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करून देशी व परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी बैठक झाली. यावेळी बैठकीला पर्यटन विभागाचे सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्यातील गड – किल्ले पर्यटन वाढीसाठी  पुरातत्व विभागाच्या सहकार्याने आवश्यक त्या सुविधांसह बळकटीकरण करून गड – किल्ले यांची माहिती जागतिक पातळीवर पोहचवा.पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेता पर्यटन वाढीसाठी पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अंमलबजावणी करावी.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, राज्यातील प्रत्येक विभाग व हंगामानुसार विविध महोत्सवांचे नियोजनूपर्वक आयोजन करणे, जिथे पर्यटन वाढू शकते अशा ठिकाण शोधून अशा पर्यटनस्थळांचा विकास करणे यावर पर्यटन विभागाने भर द्यावा.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सुरू असलेल्या उपक्रमांना गती द्यावी. सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनावर आधारित पर्यटन उपक्रम राबवावे, असेही ते म्हणाले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण वाढविण्याचा निर्धार – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जळगाव दि. ८ जानेवारी (जिमाका ) : उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यत वाढविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्यासाठी शिक्षणक्षेत्रातील सर्व घटकांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धेारणाच्या माध्यमातून हा निर्धार पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा दीक्षान्त समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा.एम.जगदीश कुमार, कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत आपण परिवर्तनाच्या युगाला प्रारंभ केला आहे. उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचे सद्याचे प्रमाण २८.४ % असून सन २०३५ पर्यंत हे प्रमाण ५०% पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थी, समाज आणि उद्योगांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावे लागतील. आजच्या डिजीटल युगात ऑनलाईन शिक्षण हे एक महत्वाचे साधन बनले आहे. शिक्षक हा प्रतिभावान आणि चारित्र्यवान पिढी निर्माण करीत असतो. एक चांगला शिक्षक केवळ माहितीच देत नाही तर नवनिर्मिती, सृजनशिलता आणि संशोधनाचा मानसिकतेला प्रेरणा देत असतो. शिक्षकांनी तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रूजवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे ग्रामीण व आदिवासी भागात असूनही उत्तम प्रतीचे उच्च शिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठातील चार वर्षीय ऑनर्स डिग्री प्रोग्रॉम, ॲप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॉम तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी काही पुस्तकांचे मराठीत केलेले भाषांतर, विद्यापीठातील इनोव्हेशन – इन्क्युबेशन केंद्रामार्फत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी राबविले जाणारे उपक्रम याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे कौतुक केले.

पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, भविष्यात येणाऱ्या आव्हानांचा आत्मविश्वासाने सामना करा, पालक, शिक्षक यांचे योगदान विसरू नका. या विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले असून बहिणाबाईंचा वारसा पुढे नेण्यात विद्यार्थिनींचा सहभाग सुवर्णपदकातील संख्या बघता अधिक दिसून येतो, ही आनंदाची बाब असल्याचे ते म्हणाले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी आपल्या दीक्षांत भाषणात भारताला सन २०४७ पर्यंत विकसित देश बनविण्यासाठी पदवीधरांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या वर्गाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न असून आर्थिक कारणांमुळे शिक्षणात बाधा येवू नये यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय, समानता तसेच सांस्कृतिक वारसा याबद्दल मांडलेल्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून हे शैक्षणिक धोरण राबविले जात आहे. भारतीय भाषा व भारतीय ज्ञानाला प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून कौशल्याधारीत शिक्षण देण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे असे प्रा. जगदीश कुमार म्हणाले. सन २०४७ पर्यंत भारताला महासत्ता करण्यासाठी एकत्रित काम करावे, भारतीय असल्याचा अभिमान बाळगा, आपल्यातील क्षमतांचा शोध घ्या आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य ओळखा असे आवाहन पदवीधरांना उद्देशून त्यांनी केले.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली. यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनील पाटील होते. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान विद्याशाखा, आणि डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.

मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.म.सु. पगारे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ. कपील सिंघेल, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपाल तथा कुलपती यांच्या हस्ते सुवर्णपदक देण्यात आलेत. त्यानंतर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. जगदीश कुमार यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले.

या समारंभासाठी एकुण २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १०५५६ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४१२८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ५२७३ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २५५७ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३६६, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १३२८, प्रताप महाविद्यालयाचे ७५९, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७९३ व आर.सी.पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन रिसर्च १४८ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील ११९ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले. यामध्ये ८७ विद्यार्थिनी व ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात १६४ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.

मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन

दीक्षांत समारंभ सुरु होण्यापूर्वी सकाळी विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत नव्याने बांधकाम केलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले.

यावेळी कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एम. जगदीश कुमार यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच विद्यापीठ बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठास रुसा अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून २११ विद्यार्थिनी क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्र.४ चे बांधकाम करण्यात आले आहे. या वसतिगृहाच्या बांधकामाकरीता ८ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाला असून रुसा अंतर्गत ५ कोटी ७० लाख रुपये निधी प्राप्त झाला तर उर्वरित रक्कम विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून खर्च करण्यात आलेली आहे.

0000000

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महसूल वाढविण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थित होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या विभागातील सेवा हमी कायद्यांतर्गत सुचित केलेल्या १३४ सेवा पैकी ६२ सेवा कार्यान्वित असून उर्वरित ७२ सेवा ऑनलाइन करण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्यात यावा. मद्यार्क वाहतूक करणाऱ्या वाहनावर डिजिटल लॉक बसविण्याची कार्यवाही करावी. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार,  मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामीत्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोनद्वारे जीआयएस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत.

जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी सुलभ वाळू धोरण आणण्यात येईल. लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. रेडी रेकनरचे दर पीडीएफ स्वरुपात राहते मात्र हे दर आता गाव निहाय, प्लॉट निहाय मिळविता येणार आहे. वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अधिमूल्य व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. महसूल विभागातील चार कॅडरची संपूर्ण माहिती पोर्टलवर आणण्यात येणार असून महसूल अधिकाऱ्यांसाठी मॅन्युअल तयार करण्यात येणार आहे. केंद्राच्या ‘अभिनव पहल’ या पोर्टलमध्ये राज्यातील अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रॅक्टिस टाकण्यात येत आहे. नवीन जिल्हा करताना प्रशासकीय यंत्रणा यापूर्वीच तयार करावी. संपूर्ण यंत्रणेला अतिरिक्त स्वरूपात तयार करून ठेवावे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल

0
स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे....

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन...

0
ठाणे, दि.26 (जिमाका) : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन...

0
नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे...

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

0
सातारा दि. 26 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव...