शुक्रवार, जून 27, 2025
Home Blog Page 401

दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महसूल विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई-मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामीत्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोनद्वारे जीआयएस सर्वेक्षण व गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत.

जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी सुलभ वाळू धोरण आणण्यात येईल. लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. रेडी रेकनरचे दर पीडीएफ स्वरुपात राहते मात्र हे दर आता गाव निहाय, प्लॉट निहाय मिळविता येणार आहे. वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठी अधिमूल्य व कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम बनविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. महसूल विभागातील चार कॅडरची संपूर्ण माहिती पोर्टलवर आणण्यात येणार असून महसूल अधिकाऱ्यांसाठी मॅन्युअल तयार करण्यात येणार आहे. केंद्राच्या ‘अभिनव पहल’ या पोर्टलमध्ये राज्यातील अधिकाऱ्यांच्या चांगल्या प्रॅक्टिस टाकण्यात येत आहे. नवीन जिल्हा करताना प्रशासकीय यंत्रणा यापूर्वीच तयार करावी. संपूर्ण यंत्रणेला अतिरिक्त स्वरूपात तयार करून ठेवावे असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

‘आपले सरकार’ सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये वाढ करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार’ सेवा पोर्टलद्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना आज दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित राज्य सेवा हक्क आयोगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  सांगितले की, गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या आपले सरकार सेवा पोर्टल द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. या पार्श्वभूमीवर या पोर्टलवरील ऑनलाईन सेवांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. तसेच अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात या पोर्टलद्वारे नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन सेवा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करण्याचे ही निर्देश यावेळी संबंधितांना  दिले.

राज्य सेवा हक्क मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य  सेवा हक्क आयोगाच्या कार्यपद्धती बाबत तसेच भविष्यकालीन योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

बैठकीस, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार , वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी , राज्यातील सर्व राज्य सेवा हक्क आयुक्त आणि संबंधित उपस्थित होते.

0000

वंदना थोरात/विसंअ/

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्णकेंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसात मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखडा बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, क्षयरोग मुक्त भारत अभियानामध्ये महाराष्ट्राने नेतृत्व करावे. या अभियानात क्षय रुग्ण शोधून त्यांच्यावरती उपचार करण्यात यावे. स्तन व गर्भाशय कर्करोग निदान करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. रुग्णवाहिका व्यवस्थेमध्ये 108 रुग्णवाहिका महत्वाची आहे. रुग्णवाहिका खरेदीच्या न्यायालयीन प्रकरणी महाधिवक्ता यांचा सल्ला घेवून प्रकरण तातडीने निकाली काढावे.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, बॉम्बे नर्सिंग कायद्यात सुधारणा करून उपचाराचे दर निश्चित करण्याचा मानस आहे. राज्यातील खाजगी प्रयोगशाळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी कायदा करून विभागाचा आकृतीबंध निश्चित करण्याचे नियोजन आहे. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात करण्यात येणाऱ्या चाचण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नसल्याबाबत चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई  करण्यात येणार आहे.

बैठकीस अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक उपस्थित होते.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्याव्यात; औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्ययावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे  वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी  झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, वैद्यकीय  शिक्षण विभागाअंतर्गत रक्तदान मोहीम, अवयव दान, स्तनाचा कर्करोग जनजागृती आणि उपचार, लठ्ठपणा जनजागृती आणि उपचार, मिशन थायरॉईड, अंधत्व  प्रतिबंधात्मक उपाय योजना, मिशन मौखिक आरोग्य मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय परिसरातील विद्यार्थी आणि परिसर सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत प्रकृती परीक्षण अभियान, योगा सेंटरची स्थापना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या छतावरती सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करणे, वैद्यकीय संशोधन केंद्रांचे बळकटीकरण करणे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक लोकाभिमुख करा व योजनेत सुधारणा करणे, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते उत्तीर्ण होईपर्यंतच्या शैक्षणिक प्रक्रियेचे व्यवस्थापन पुढील शंभर दिवसात प्राधान्याने करा.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागात  ऍलोपॅथी  औषध निर्माते, रक्तपेढ्या, शासकीय रुग्णालयातील सर्व औषधांच्या नमुन्यांची गुणवत्ता तपासणी,फूड टेस्टिंगसाठी लॅबोरेटरी सुरू केली आहे तेथील कामकाज सुरू करणे या सर्व बाबी प्राधान्याने पूर्ण कराव्यात. दुध भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा,अन्न व औषध अंतर्गत नोंदणी व परवाने तपासणी,मंदिर व देवस्थाने येथील प्रसाद गुणवत्ता तपासणी ही कामे प्राधान्याने करा.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की,राज्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांशी निगडित सेवा अधिक सुलभ होण्यासाठी भर  देण्यात यावा. कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी वेगवेगळे प्रशिक्षण व उपक्रम राबवा. विभागांतर्गत परीक्षा, नियुक्ता वेळेत देणे, बदल्या, गोपनीय अहवाल, स्थायित्व लाभ, सेवानिवृत्ती प्रकरणाबाबतची कार्यपद्धती सुलभता आणणे, वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती आणि पदोन्नतीचा मानीव दिनांक देणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांशी निगडित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावी. भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि प्रशासन गतिमान करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन सायबर सुरक्षितता, सांख्यिकीय माहिती गोळा करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांना द्या असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (वित्त) विभाग ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते.

***

संध्या गरवारे/विसंअ/

भुसावळ रेल्वेनी निर्माण केलेल्या अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जळगाव दि. 8 ( जिमाका ) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील तसेच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ हे रेल्वेच्या डब्यात उभं केलेलं रुग्णालय ही अभिनव संकल्पना असून यामुळे सर्व सामान्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

आज भुसावळ रेल्वे विभागाच्या ‘हॉस्पिटल ऑन व्हील’ आणि भुसावळ रेल्वे ग्राउंडवरील ‘नवीन सिंथेटिक ट्रॅक’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता, भुसावळ मंडळ विभागीय व्यवस्थापक ईटी पांडे उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भुसावळसाठी अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक ही सुविधा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही सुविधा आपल्या खेळाडूंना आणि क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातावरणात सराव करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करून जागतिक स्तरावर स्पर्धा करणे खर्चीक आहे, कारण क्रीडा साहित्य, प्रशिक्षण आणि प्रवास यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. नवीन निर्माण झालेली ही सुविधा या समस्यांवर काही प्रमाणात तोडगा काढेल आणि भुसावळला क्रीडा उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यास मदत करेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी यांनी केले.

भारतीय रेल्वेच्या खेळाडू घडविण्याच्या परंपरेचा केला गौरव

भारतीय रेल्वेला देशासाठी उत्कृष्ट क्रीडापटू घडविण्याचा अभिमानास्पद वारसा आहे. अनेक महान खेळाडू रेल्वेमधून पुढे आले आहेत आणि रेल्वेने आश्वासक क्रीडापटूंना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, ती परंपरा इथेही निर्माण होईल अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

‘हॉस्पिटल ऑन व्हील’ संकल्पनेचे केले कौतुक

भुसावळ रेल्वे विभागाकडून हॉस्पिटल ऑन व्हील ही क्रांतिकारक योजना सुरु झाली ती अत्यंत अभिनव संकल्पना असून जुन्या रेल्वे डब्यांचा वापर करून हॉस्पिटल तयार करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून यामुळे जुन्या डब्यांचा पुनर्वापर होऊन दुर्गम भागांतील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवता येणार असल्याचे सांगून या संकल्पनेचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कौतुक केले.

रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा केला गौरव

सुनील शंकरम, एसएसई पथवे, बुरहानपूर दक्षिण, अनिल कुमार, एसएसई पथवे, बोदवड, छबिनाथ फौजदार, एसएसई पथवे, चाळीसगाव उत्तर रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव झाला. त्या विषयी बोलताना राज्यपाल म्हणाले, भुसावळ विभागाने रेल्वेतील अनाम नायक – ट्रॅक देखभाल करणारे, म्हणजेच ‘की-मेन’ यांच्यावर काढलेले कॉफी टेबल बुक आणि त्यांचा माझ्या हस्ते केलेला सन्मान ही बाब मला खुप आनंद देणारी वाटली.त्यांचे मूक पण महत्त्वाचे कार्य कठीण परिस्थितीतही रेल्वे गाड्यांची सुरक्षितता आणि सुचारू संचालन सुनिश्चित करते. त्यांच्या मेहनतीमुळे अपघात टळतात आणि असंख्य जीव वाचतात. त्यांचा आजचा सन्मान त्यांच्या मौल्यवान योगदानाची योग्य पावती असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

आमचं लहानपण ज्या ग्राउंडवर गेले आहे, त्याचे हे पालटलेले रूप पाहुन आनंद झाल्याची भावना वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बोलून दाखविली. तसेच या ग्राउंडवर एकेकाळी देशभरातील फुटबॉल, हॉकीचे खेळाडू येथे येत होते. इथे रणजी क्रिकेट सामनाही खेळला गेल्याचे स्मरण करून पुन्हा ते वैभव या मैदानाला प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आणि रेल्वे कडून होत असलेल्या या कार्याबद्दल कौतुक केले.

यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता,आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक ईटी पांडे यांनी रेल्वे कडून होत असलेल्या कामाची सविस्तर माहिती दिली.

सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन राज्यपालांनी ‘मशाल’ पेटवून ‘ज्योती’ प्रज्वलित करून केले. ही मशाल रेल्वे शाळेतील बालक्रीडापटूंनी ट्रॅकवर फिरवत नेली, ज्यामुळे क्रीडांगणाचा उज्ज्वल भविष्यकाळ प्रतीत झाला. यावेळी धावणे आणि रिले रेस स्पर्धाही घेण्यात आली.

प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावीत – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 8 :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाकडे वाटचाल करणे ही आपल्या राज्याची परंपरा आहे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी युवा पिढीने योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत प्रबळ इच्छाशक्ती, कष्टाच्या जोरावर यशाची शिखरे पादाक्रांत करावी, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पी. पी. टी. चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघातील युवकांशी सह्याद्री अतिथीगृहात क्रीडामंत्री श्री. भरणे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या उत्स्फूर्त शैलीत उपस्थित युवकांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले की, दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांना राष्ट्रीय स्तरावरील संस्मरणीय असा अनुभव मिळणार आहे. खरंतर आपल्या युवकांचे उज्ज्वल भविष्य हेच आपल्या देशाचे आणि राज्याचे भविष्य आहे. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आपणच राष्ट्राची खरी शक्ती आहात. युवा पिढी सक्षम होण्यासाठी, युवकांच्या नेतृत्व गुणाला वाव मिळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले की, पी. पी. टी. चॅलेंज स्पर्धेमध्ये दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. मिळालेल्या या संधीचे आपण सोनं करावे. युवा पिढीचा देशाच्या प्रगतीत सहभाग वाढावा या उदात्त हेतूने असे उपक्रम राबविले जातात. या उपक्रमासाठी आपली निवड झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो असे स्पष्ट करत सर्वांना या पुढच्या काळात लागेल ती मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, सहसचिव मंगेश शिंदे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे उपस्थित होते.

000000

राजू धोत्रे/विसंअ/

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्द

नवी दिल्ली, दि. ८ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे उपस्थित होते.

मराठी भाषेला मान मिळाल्याचा अभिमान

मंत्री श्री. सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना सांगितले की, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसूचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री मोदींचे महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार

महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, मंत्री श्री. सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये मंत्री श्री. सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला केंद्रीय मंत्री श्री.शेखावत यांनी येण्याचे मान्य केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षीही तेवढीच मदत दिली जाईल, असे मंत्री श्री. सामंत म्हणाले. दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

००००

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे-  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ८ : शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते.  विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात  यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुंबईत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर आहेत. या विद्यार्थ्यांची मंत्री श्री.पाटील यांनी विचारपूस केली.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २१ व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. यामध्ये आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भर, शिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षणामध्ये प्रवेश, मातृभाषेमध्ये शिक्षण,जागतिक एकात्मतेवर भर यावर अधिक लक्ष केंद्रित करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे.त्याची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची व्यावहारिक उपयुक्ततता शिकवते, जे पुढे जाऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे सांगून मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असेही सांगितले.

००००

‘जागतिक स्पर्धेसाठी जग खुलं आहे, संधीचे सोने करा’ – राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

जळगाव, दि. 8 जानेवारी (जिमाका) : सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना शिक्षण आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनपर अभ्यासक्रमावर भर द्यावा. कारण आता जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे वेळ वाया न घालविता संधीचे सोने करा असा कानमंत्र राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिला.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. केतकी पाटील सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंचावर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, संचालिका केतकी पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पो.अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराव दराडे, जळगाव उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ एन. एस. आर्विकर, डॉ. माया आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके उपस्थित होते.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले की, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था उभारून भविष्यातील नेतृत्व घडविण्याचे कार्य केले आहे. देश आणि राज्यातील सरकारने आता दुर्गम भागातही शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नवीन शैक्षणिक धोरण देखील आता अंमलात येत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असा कानमंत्रही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षण हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून ते व्यक्तिमत्त्व घडवणे, मूल्ये रुजवणे आणि समाजाची करुणा व समर्पणाने सेवा करण्यासाठी असते असे सांगून डॉ. उल्हास पाटील यांच्या नेतृत्वात यांची महाविद्यालये प्रभावी शिक्षण देत असल्यामुळे ‘नॅक’ नी नामांकन देऊन त्यांच्या अभ्यासक्रमांना प्रभावी श्रेणी दिल्याचे राज्यपालांनी यावेळी अधोरेखित केले.

सप्टेंबरमध्ये जळगावला भेट दिल्याचे केले स्मरण

सप्टेंबरमध्ये जळगावला आपण भेट दिली तेव्हा या भागाच्या प्रगतीसाठी असलेल्या अपार संधींनी मला प्रभावित केले. येथील विमानतळ लवकरच विस्तारित होणार असून त्यामुळे या भागाच्या दळणवळणात मोठी सुधारणा होऊन विकासाच्या अधिक संधी चालून येतील असे सांगून उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा प्रगती आणि विकासाचे केंद्र म्हणून जलद गतीने पुढे येत आहे. अशा वेळी हे वैद्यकीय महाविद्यालय आधुनिक आरोग्यसेवेचे केंद्र बनू शकते, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

आपली आरोग्य सेवा जगभरात नावाजली जात आहे मात्र, उत्कृष्टतेसोबतच आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ व परवडणारी असणे आवश्यक आहे. आपल्याला आरोग्यसेवेची उत्कृष्टता आणि परवडणारा दर्जा यांचा समतोल साधावा लागणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी विशद केले.

राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेले प्रश्न राज्यपालांना विचारले, राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावर अधिक वेळ न घालवता अधिकाधिक ज्ञान अवगत करून घेण्याचा सल्ला दिला.

राज्यपालांनी केली नेत्र विभागाची पाहणी

राज्यपाल राधाकृष्णन यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ.एन.एस.आर्विकर यांच्याकडून नेत्ररोग विभागातील रूग्णांची माहिती जाणून घेतली व येथील रुग्णांशी संवाद साधला. याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.सुहास बोरले, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.नि.तु.पाटील, डॉ.रेणुका पाटील आदी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0 0 0 0 0

अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करावी- मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ८ :– अल्पसंख्याक समाजाचा  सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे यांनी आज मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचा आढावा घेतला. यावेळी सचिव रुचेश जयवंशी, सहसचिव मोईन ताशिलदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहीत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना महत्वपूर्ण आहेत. या विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, अशी सूचनाही त्यांनी केली.

0000

ताज्या बातम्या

पणन महामंडळाच्या योजनेची कमाल; देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार शेतमाल!

0
महाराष्ट्राचा शेतकरी मेहनतीचा मानबिंदू आहे. अपार कष्टाच्या घामातून ओली झालेली त्याची कपाळरेषा केवळ अन्नधान्य नाही, तर अखिल देशासाठी जीवनाधार निर्माण करते. मात्र हा शेतमाल...

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल

0
स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे....

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन...

0
ठाणे, दि.26 (जिमाका) : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन...

0
नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे...