मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 394

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

नवी दिल्ली, दि 23 : प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळ्यात  महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावची दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणुन कार्यरत असून राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात ‘परेड कमांडर’ म्हणून  जबाबदारी सांभाळणार आहेत.

दामिनीचे वडील न्यायधीश दिलीप देशमुख हे पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त असून त्यांचा कुटुंबियांचा सामाजिक आणि शैक्षणिक वारसा दामिनीने आपल्या मेहनतीने पुढे नेला आहे. वर्ष 2019 मध्ये देशपातळीवरील कॉमन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पद मिळवले. दामिनीने अश्वारोहन, कराटे, योगा, रायफल शूटिंग, खो-खो आणि व्हॉलीबॉलमध्येही प्राविण्य मिळवले असून कराटेमध्ये ब्लॅक   बेल्टची  सुवर्णपदक विजेती आहे.

0000

नंदा मुंदे यांना सेंद्रिय शेतीतील ‘जैविक इंडियन’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.23 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयं सहाय्यता गटात सदस्य असलेल्या भामदेवी ता. कारंजा जि. वाशिम येथे कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या नंदा संतोष मुंदे यांना  सेंद्रिय शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्पादन आणि लक्षवेधी नफा मिळवल्याबद्दल नुकताच इंटरनॅशनल कॉम्पिटन्स सेंटर फॉर ऑरगॅनिक ॲग्रीकल्चर या  (ICCOA) राष्ट्रीय स्तरावरील जैविक इंडियन हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

सेंद्रिय शेतीमध्ये क्रांतिकारक कार्य केल्यामुळे आणि कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात नफा मिळवल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये 50 हजार आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे नंदाताई मुंदे करत असलेली शेती ही सेंद्रिय शेती प्रकल्प  प्रमाणीकरण प्राप्त आहे.

2022 ते 2024-25 या वर्षामध्ये ताईंनी सोयाबीन, तूर, गहू, हरभरा या पिकांचे दोन एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती केली. एकूण 26 हजार रुपयांच्या भांडवलात ताईंनी ही सेंद्रिय शेती केली त्यातून 22 क्विंटल सोयाबीन, 8 क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले. या उत्पादनातून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ताईंनी एकूण 1,45,624 रुपये नफा मिळवला आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि मुख्य संचालन अधिकारी यांनी अभिनंदन केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 23 : राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.  बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर,  वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

नीलेश तायडे/विसंअ/

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

दावोस, दि. 23 : – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांच्या निधनाने सामूहिक वनहक्क, पर्यावरण तसेच ग्रामस्वराज क्षेत्रात हिरीरीने काम करणारे एक महनीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे. या क्षेत्रात त्यांची पोकळी कायम जाणवेल, अशा शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा या राज्यातील पहिल्या ‘आमच्या गावात आम्हीच सरकार’ या कल्पनेला मूर्तरूप देण्याचे काम त्यांनी केले. मोहन हिराबाई हिरालाल यांनी गावकऱ्यांमध्ये जंगलावरील यांच्या कायदेशीर हक्काबद्दल जागृती निर्माण केली. त्यामुळे वन व्यवस्थापन लोकप्रिय करण्यात मदत झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे मेंढा (लेखा) व मर्दा या गावांत त्यांनी मोठी चळवळ उभी केली. गडचिरोली जिल्ह्यात वृक्षमित्र या संस्थेची स्थापना करून वन व पर्यावरण ग्रामस्वराज्य संकल्पनेसाठी त्यांनी निस्वार्थपणे आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जमनालाल बजाज फाऊंडेशनचा पुरस्कारही त्यांना मिळाला. महाराष्ट्र ग्रामराज्य अधिनियमाअंतर्गत लेखा-मेंढा हे ग्रामदान गाव म्हणून घोषित झाले. हे देशातील पहिले गाव ठरले. स्वता:च्या नावासामोर आईचे नाव लावून त्यांनी फार पूर्वीच मातृशक्तीचा सन्मान केला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विद्यापीठाने कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

परभणी, दि.23 (जिमाका): हरितक्रांतीचे जनक तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने दिमाखात परभणीत उभ्या असलेल्या मराठवाड्यातील कृषी विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी संशोधनावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यपाल तथा वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती  सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या 26 व्या दीक्षांत समारंभात आयोजित मुख्य कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे प्रति कुलपती ॲड. माणिकराव कोकाटे, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषि विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. (डॉ.) इंद्र मणि, आमदार  व कार्यकारी परिषद सदस्य डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, कृषि अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी हे प्रमुख अतिथी यांच्यासह जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना राज्यपालांनी डॉक्टरेट ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्याबाबत विनंती करण्यात आली.  दरम्यान, कार्यक्रमास उपस्थित श्री. विखे-पाटील यांना राज्यपाल यांच्या हस्ते डॉक्टरेट ऑफ सायन्स ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल म्हणाले की, जागतिक तापमान वाढीमुळे निसर्गाच्या लहरीपणाने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेत येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल, अशा प्रकारच्या बि-बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा विद्यापीठाने भाग बनावे. कृषि संशोधन आणि त्यातून साधल्या जाणाऱ्या विकासाला विद्यापिठातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्राधान्य द्यावे.

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात आहे. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सद्यस्थितीत देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे. भारतीय स्वातंत्र्यावेळी 50 दशलक्ष टन कृषि उत्पन्नात वाढ होऊन आता ती ३३२ दशलक्ष टनापर्यंत पोहचली आहे. देशाने आजपर्यंत हरित (अन्नधान्य), धवल (दूध), नील (मत्स्य), पिवळी (तेलबिया), गुलाबी (कांदा), सुवर्ण (फळे) आणि करडी (रासायनिक) क्रांती म्हणजेच सप्तक्रांति घडवून आणली असल्याचे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सांगितले.

महाराष्ट्र हा कृषि क्षेत्रात नेहमीच देशामध्ये अग्रस्थानी राहिला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीने पर्जन्यमानावर आधारित विविध पिकांमध्ये नवनवे संशोधन केले आहे. येथे ऊस, कापूस, सोयाबीन, संकरित आणि संशोधित वाण आहे.  लहरी निसर्ग, पाण्याची चणचण असतानाही डाळी, तेलबिया, कापूस यातून ग्रामीण अर्थकारणाला मिळत असलेली चालना आणि त्यातून होत असलेली प्रगती आदिंचा उल्लेख करून कृषिक्षेत्रातील मूल्यसाखळी मजबूत करण्यात येथील शेतक-यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. राज्याने नुकताच दिल्लीत कृषि क्षेत्रात उल्लेखनीय  कार्य केल्याबद्दल २०२४ चा अँग्रीकल्चरल टूडे ग्रूप, दिल्लीचा पुरस्कार पटकावला असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाने जागतिक बँकेच्या सहकार्याने मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवस्थापन आणि ग्रामीण बदल (स्मार्ट) प्रकल्पातून विकास साधण्यावर भर दिला आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरासुद्धा याकामी शेतक-यांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे. डिजीटल तंत्रज्ञानात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला असल्याचे सांगताना राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी ड्रोन, रोबोट आदि नवतंत्रज्ञानामुळे कृषि क्षेत्रात शेतक-यांच्या कौशल्यात वृद्धी होत असल्याचे सांगितले. विद्यापीठाला कृषि पदवीधर, शेतकरी आणि ग्रामीण भागातील युवा वर्गाची सांगड घालण्यात यश मिळत असून ग्रामीण युवकांना रिमोट पायलट आणि पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सेंटरसोबत ड्रोन उद्योगाशी समन्वय साधून देण्याचे काम विद्यापीठ करत असल्याचे  त्यांनी सांगितले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पदवी, पदव्युत्तर पदवी, डॉक्टरेट अशा पदवी देणारे 16 कॉलेज आणि 43 अफिलेट कॉलेज सात शाखांच्या माध्यमातून शिक्षण देत आहे. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी 2020 च्या नव्या शिक्षण धोरणानुसार शिक्षण आणि त्याची योग्य अंमलबजावणी,  संशोधन आणि विकासातील सहभाग, विस्तारित शिक्षणातील शेतकरी देवो भव, कृषि क्षेत्रातील कौशल्य विकासात विद्यापीठाचा पुढाकार, कृषि जमीन विकास आणि संशोधित बीज उत्पादन, या विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीसाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय  हरित विद्यापीठ (इंटरनॅशनल ग्रीन युनिर्व्हसिटी) हे पारितोषिक मिळविले असल्याचा आनंद होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाने नवी ओळख निर्माण केली असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आपल्या संबोधनात सांगितले.  दीक्षात समारंभात सर्व पदवीधारकांचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी  दिल्या.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मानले विद्यापीठाचे आभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली डॉक्टरेट ही पदवी मी नम्रपणे स्वीकारत असल्याचे सांगून, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाची गणना होते. हरितक्रांतिचे जनक, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कृषी विद्यापीठाने ही पदवी दिल्यामुळे त्याचे वेगळेच महत्त्व असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी आभार मानले.

सध्या जागतिक तापमानवाढ, बदलता आणि लहरी निसर्ग  ही नवी आव्हाने शेतीपुढे आहेत. शेतक-यांचे कृषि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विद्यापीठाने वाणांमध्ये नवनवीन संशोधन करून शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश आवश्यक – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अनेक पिकांमध्ये संशोधन केले आहे, ही आनंदाची बाब असून कृषी उत्पादन वाढीत विद्यापीठाचा मोलाचा वाटा आहे. सोयाबीन, तूर पिकांमध्ये नवतंत्रज्ञानातून क्रांति घडविण्यात आली आहे. विद्यापीठ करीत असलेले संशोधन हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणेही  गरजेचे आहे. त्याचबरोबर शालेय शिक्षणात बदल करताना कृषि हा विषय त्यामध्ये नव्याने समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.

कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिकांवर अधिक भर द्यावा. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दोन-तीन एकर शेती देऊन प्रात्यक्षिकाकडे वळविण्याची गरज कृषिमंत्री श्री. कोकाटे यांनी व्यक्त केली. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी निश्चितपणे चांगले निर्णय घेतले जातील, असे सांगून शेतकऱ्यांनी  सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहनही  श्री. कोकाटे यांनी केले.

यावेळी कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी प्रास्ताविक केले तर कृषि अभियंता तथा भारतीय तंत्रज्ञान संस्था खडगपूरचे माजी संचालक विरेंद्र कुमार तिवारी यांचेही समयोचित भाषण झाले.

महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष तुषार पवार, परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, माजी कुलगुरु तथा कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. व्यंकटराव मायंदे, कार्यकारी परिषद सदस्य प्रवीण देशमुख, डॉ. दिलीप देशमुख, भागवत देवसरकर, डॉ. आदिती सारडा, सुरज जगताप, आणि विठ्ठल सकपाळ, कुलसचिव संतोष वेणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दयानंद मोरे, प्रा. विणा भालेराव यांनी केले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यापिठाकडून २९ जणांना पीएचडी प्रदान; सुवर्ण पदकाचे २० मानकरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठाचा आज दीक्षान्त समारंभ कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सुवर्णजयंती दीक्षांत सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यापिठातील विविध विषयात 29 जणांना विद्यावाच्यस्पती पदवी प्रदान करण्यात आली तर विविध शाखांचे 20 विद्यार्थी सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.

अशोका के. एस., एस. एम. कविभारथी, बोडखे गणेश महादेव, पल्लवी लालासाहेब कोळेकर, लिओना गुरुल्ला, सचिन लक्ष्मण धारे, श्रीराम तुकाराम शिंदे, शेंडे संतोष सुभाष, कौसडीकर किशोर दत्तराव, बन्ने श्रीधर श्रीनिवास, चौधरी सुवर्णा दत्तराव, कदम सृष्टी संभाजीराव, उगले महेश विलास, सत्वधर प्रिया प्रभाकर, गावडे राजू नामदेव, देशमुख कल्याणी दिलीपराव, पाचखंडे ज्ञानेश्वरी नारायण, चव्हाण कोमल अंकुश, चव्हाण किशोर मल्हारी, सावंत ध्रुवराज नरसिंगराव, राठोड अर्चना श्रीराम, वायकुळे प्रिती कोंडीबा, होळमुखे संगिता सुरेश, भालेराव ज्योत्स्ना भीमराव, गिरडेकर शुभम भानुदास, साटले भिमाशंकर, ठाकूर निरंजन रविंद्र, सरगर प्रमोद रामचंद्र आणि ए. पोशद्री यांनी विविध विषयांमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे.

मयुरी संतोष गुंड, प्रिती बाबासाहेब भोसले, आकाश मुंजाभाऊ माने, आरती गुलाबराव सुर्यवंशी, प्रिती कोंडीबा वायकुळे, श्वेता गणपती भट, पिता सिरीशा, कैरी प्रतीक्षा पॅट्रो, अन्सारी गौसुद्दिन मोहम्मद नुरोद्दिन, शुभम राजकुमार सुर्वे, शिवानी हनुमंत थोरात, जयेश राजेंद्र बोबडे, सिमी देवकांत शुक्ला, श्रावणी चित्रसेन लोमटे, श्वेता वसंतराव निलवर्ण, ऋतुजा विजयकुमार तापडिया, तेजश्री पंढरीनाथ अनारसे, जी. गोपिका अनिलकुमार, श्रुती अनिल गरड आणि बी. साई चंदना यांचा सुवर्ण पदकाच्या मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.

सत्वधर प्रिया प्रभाकर, बोबडे जयेश राजेंद्र, साक्षी विजय कटाईत, राजपाल संजय कुटुंभरे, मोहिनी भिमराव खरवडे यांनी विविध संस्थांकडून जाहीर केलेली रोख रकमेची पारितोषिके पटकावली आहेत.

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0000

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. २३ :  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी विधानभवनात अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेच्या सदस्या आमदार मनीषा कायंदे तसेच विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव सुनिल वाणी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार व विशेष कार्य अधिकारी सोमनाथ सानप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत २८ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. २३ : अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य, भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटीवर सिंचन साधने (पाईप व पंप) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. तरी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर २८ जानेवारी, २०२५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

तसेच कडधान्यामध्ये  बीज प्रक्रिया ड्रम (seed treatment drum), पौष्टिक तृणधान्य अंतर्गत (pulveriser) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-गळीतधान्य अंतर्गत मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler), मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील (Seed drill), छोटे तेल घाणा सयंत्र (oil extraction unit ) या घटकांचे  लक्षांक भरण्यात आले आहेत. बाबींसाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यांत्रिकीकरण व सिंचन (Mechanization and Irrigation) या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.  अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक दर्जाचे करावे – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 23 : संपूर्ण जगासाठी आकर्षण आणि प्रेरणादायी ठरणारे, दादर येथील इंदू मिल येथे उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करावे. एप्रिल 2026 पर्यंत या स्मारकाचे अनावरण करण्याचा मानस असून स्मारकाचे काम दर्जेदार करावे, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या. तसेच स्मारकासाठी लागणारा निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जात असल्याचेही मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले. दादर इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाची आज मंत्री श्री. शिरसाट यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी स्मारकामध्ये उभारण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा, स्मारकाचे तीव्र वादळापासून संरक्षण होण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली.

सध्या येथील इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले असून स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. या स्मारकामध्ये शंभर फूट उंच पीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य धातूने आच्छादित ३५० फुट उंचीचा पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण परिसर हरित असेल, या ठिकाणी एक हजार आसन क्षमता असलेले सभागृह, संशोधन केंद्र, ध्यानधारणा केंद्र, ग्रंथालय व भूमिगत वाहनतळ असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

दरडप्रवण गावांचे पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

मुंबई, दि. २३ :  दरडप्रवण गावांच्या पूनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिल्या. याबाबत शासनाचे ऑक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या उपस्थितीत दरडप्रवण गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडके, सह सचिव संजय इंगळे, अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

अतिवृष्टी, पूर, भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधित तसेच आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरविणे, पुनर्वसनासाठी पात्र लाभार्थ्यांचे निकष या धोरणात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच पुनर्वसित ठिकाणी १२ नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत धोरणात तरतूद करण्यात आली आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले की, या धोरणाची अंमलबजावणी करताना क्षेत्रीय स्तरावर काही समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी तज्ज्ञ आणि संबंधित विभागांच्या सल्ल्यानुसार, या धोरणात आणखी काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे या धोरणात सुधारणा करणे व आणखी काही बाबींचा समावेश करणेबाबत क्षेत्रीय स्तरावरून सूचना घेणे आवश्यक आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...