मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 393

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्त कविता स्पर्धेस उत्तम प्रतिसाद

नवी दिल्ली, 23 : राजा शिव छत्रपती शिवाजी……, मनाचे श्लोक……, मराठी महिन्याचे महत्व सांगणारी कविता, माझ्या पप्पांनी गणपती आणला… बहीण माझी छोटीशी…. अशा सुप्रसिद्ध मराठी कविता, गाणी व श्लोक अस्खलितपणे  अमराठी भाषिक विद्यार्थ्यांनी कविता स्पर्धेत सादर केल्या.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील नूतन मराठी शाळेत कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पाचवी ते नववीपर्यंतच्या एकूण 20  विद्यार्थी सहभागी झाले. शाळेचे प्राचार्य गुलशन नागपाल यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका श्रीमती वर्षा बावने आणि श्रीमती सुषमा पानसे यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  व विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला.

अमराठी  भाषिक असणाऱ्या या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी अभिनयासह पाठांतर करून मराठी कविता उत्तम रीतीने सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षी तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  तसेच, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

इयत्ता आठवीच्या वर्गातील निखल या विद्यार्थ्यांने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज….. या कवितेचे अभिनयासह उत्कृष्टपणे सादरीकरण केले.  इयत्ता आठवीतील तन्मय याने आई करना ग भेळ…. ही बाल कविता अभिनयासह सादर केली. तो द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. इयत्ता सहावीतील अनु या विद्यार्थीनीने मराठी महिन्याचे महत्त्व सांगणारी  कविता उत्साहात  सादर केली. तर इयत्ता सातवीतील आकांक्षी हिने ‘माझ्या पप्पांनी गणपती आणला’….. हे गाणे सादर केले. या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

या कविता स्पर्धेस परीक्षक म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक भागवंती मेश्राम आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होते.

0000

अंजु  निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.16 /दि. 23.01.25

ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेद अभियान वचनबद्ध – मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर

मुंबई, दि. 23 : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू असलेल्या अनेक प्रयत्नांना यश येत आहे, उमेद अभियानांतर्गत स्थापित शेतकरी महिला उत्पादक कंपन्यांच्या उत्पादकांना किंवा मालाला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी महालक्ष्मी ट्रेड सरस म्हणजेच खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे संमेलन सिडको कन्व्हेन्शन सेंटर, वाशी येथे झाले.  या कार्यक्रमाचे उद्घाटन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) निलेश सागर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, उपसंचालक संदीप जठार, अभियानाचे अवर सचिव  धनवंत माळी,  उपसंचालक  मनोज शेटे  यांच्यासह FDRVC चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन बिहारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी चे उपसचिव  उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निलेश सागर म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या उत्पादनांच्या शुद्धता, गुणवत्ता आणि पारंपरिकतेला आम्ही प्राधान्य देत आहोत. तसेच, ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिला उद्योजकता वाढवण्यासाठी नव्या संधी निर्माण केल्या जात आहेत.”

उमेद अभियानाच्या यशस्वी कामगिरीबाबत श्री. सागर म्हणाले, महाराष्ट्रात सध्या ४५० पेक्षा  जास्त  शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC) सक्रिय आहेत. आतापर्यंत ५ लाख स्वयं सहाय्यता समूहांना जवळपास  १,००० कोटींचा समुदाय निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. बँकांमार्फत ग्रामीण महिलांना ३०,००० कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात १९ लाख लखपती दीदी अभियानाने तयार केल्या आहेत असेही श्री.सागर यांनी सांगितले.

उमेद अभियानाचे नवे आयाम

अभियानाचे मुख्य परिचालन  अधिकारी श्री. परमेश्वर राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले, “उमेद अभियान हे फक्त ग्रामीण महिलांसाठी आर्थिक मदतीचे साधन नाही, तर त्यांना सन्मान देणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारे व्यासपीठ आहे. उमेद अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारात पोहोचवणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे. या अभियानाद्वारे ग्रामीण महिलांचे यश भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवा आयाम ठरले आहे.

महालक्ष्मी ट्रेड सरस प्रचंड यशस्वी

राज्यस्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले. तसेच राज्यभरात उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य वा थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य नफा मिळावा ह्या उद्देशाने एक दिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला हार्वेस्ट प्लसचे, प्रोग्राम मॅनेजर स्वाधीन पटनाईक, ADM चे अमोल धवन,सलाम किसनचे अक्षय खोब्रागडे देहात कंपनीचे अनुराग पटेल असे एकूण विविध कंपनीचे २५ खरेदीदार व ७० महिला शेतकरी उत्पादक यांनी सहभाग नोंदवला. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतमालाची खरेदी विक्री करावी हा प्रमुख उद्देश होता. यामध्ये प्रामुख्याने तूर डाळ, चना डाळ, उडीद डाळ, नाचणी, कांदा, तांदूळ , मिरची, हळद यासारखे ३५ उत्पादनाचा समावेश करण्यात आला. या संमेलनात खरेदी-विक्री मधून दिवसभरात एकूण १.७० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. या संमेलनात झालेल्या वेगवेगळ्या करारांमधून आणि बोलणीतून भविष्यामध्ये ७ ते ८ कोटीची उलाढाल होणे अपेक्षित आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील ४२ कामांना प्रशासकीय मान्यता; ९ बांधकामे पूर्ण

मुंबई, दि. 23 : राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल प्राप्त करून देणाऱ्या विभागापैकी तिसरा महत्वाचा विभाग आहे. या विभागातील निरीक्षक व अधिक्षकांच्या कार्यालयांचे बांधकाम टाईप प्लॅननुसार करण्यात येत आहे. शासनाने विभागाच्या राज्यातील 42 ठिकाणच्या विविध बांधकामासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यापैकी 9 बांधकामे पूण झालेली आहेत.

पूर्ण झालेल्या बांधकामांमध्ये राज्य उत्पादन शुल्क भवन मुंबई, नाशिक अधीक्षक यांचे निवासस्थान, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जालना, हिंगोली, अमरावती, कर्मचारी निवासस्थान वाशिम, निरीक्षक कार्यालय संरक्षक भिंत तळेगांव दाभाडे जि. पुणे, निरीक्षक कार्यालय व निवासस्थान संगमनेर जि. अहिल्यानगर, भरारी पथक निरीक्षक कार्यालय सटाणा जि. नाशिक यांचा समावेश आहे. विभागातील सर्व कार्यालये अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नविन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. विभागासाठी मंजूर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची एकूण संख्या 3 हजार 842 इतकी आहे. विभागामार्फत सन 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण अंदाजे 23,289 कोटी  इतका महसूल प्राप्त झाला आहे. विभागाची आयुक्त कार्यालयाची फोर्ट, मुंबई येथे सात मजली इमारत असून या इमारतीच्या बांधकामास सन 2024 ची उत्कृष्ट शासकीय इमारत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. गत 4 ते 5 वर्षापासून या विभागातील जिल्हा व उपविभागीय स्तरावरची बांधकामे सुरू आहेत. शासनाने सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी उत्पादन शुल्क विभागातील बांधकामासाठी 110.47 कोटी निधीची तरतूद केली आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेऊन नियोजन करावे – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि.23 : राज्यातील शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया उद्या (दि.24 जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी. तसेच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण  येणार नाही याची काळजी घ्यावी. असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

हमी भावाने 300 केंद्रावरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे तूर खरेदी प्रक्रिये संदर्भातील आढावा बैठक झाली. बैठकीस एन.डी.श्रीधर दुबे पाटील, कार्यकारी संचालक (मार्फेड), भाव्या आनंद, राज्यप्रमुख (नाफेड),प्रशांत बसवकर, उपव्यस्थापक, एमएसडब्लुसी, डी.आर.भोकरे, व्यवस्थापक(मार्फेड) यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

‘नाफेड’ अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन तसेच विर्दभ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले की, राज्यभरात सुरवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्‍यांना विनाअडथळा तूर खरेदी नोंदणीची तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यात तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी यंत्रणेने घ्यावी. वेअर हाऊसिंग कार्पोरेशनने  खरेदी प्रक्रियेतील काम जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पेमेंट जमा करण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. याकामी अधिकचे मनुष्यबळ लागत असल्यास त्याची व्यवस्था करावी. त्याचसोबत खरेदी केंद्रांवर शेतकऱ्याना पाण्याची,बसण्याची सुयोग्य व्यवस्था, तक्रार निवारण केंद्राची सुविधा उपलब्ध करावी. याठिकाणी शेतक-यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. जिल्हा मार्कैटिंग अधिकारी यांनी या सर्व बाबींचे नियंत्रण करुन तक्रारींचे निवारण करावे. तूर खरेदीच्या दृष्टीने वेअर हाऊसची नियोजन व्यवस्था तयार ठेवावी. त्यासाठीची आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतक-यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात यावी. शेतक-यांनी डेटा एन्ट्री केल्या नंतर पुढच्या 72 तासात नाफेड मार्फत नियमानुसार त्यांना पैसे प्राप्त होतील, याची काळजी घ्यावी. खरेदी नोंदणीची तसेच खरेदी सुरु झाल्यानंतर त्या बाबतची प्रक्रिया गतीने सुव्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या सूचना यावेळी पणन मंत्री श्री.रावल यांनी दिल्या.

०००

वंदना थोरात/विसंअ

नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा, दि. 23 :  जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सर्व सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ ठेवा,  टाकाऊ साहित्य वेळोवेळी निर्लेखित करा, नेमून दिलेल्या वेळेत वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजेत. रुग्णांना बाहेरिल वैद्यकीय सेवा घेण्यासाठी अनावश्यक संदर्भ टाळा, माता व नवजात शिशुंच्या मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.   बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक व जयंत शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) निलेश घुगे यांच्यासह सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

स्वच्छतेबाबत सर्व विभागांसाठी विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी नेमले असल्याचे सांगून विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले, येत्या काळात विविध शासकीय कार्यालये, ठिकाणे यांना अचानक भेटी देण्यात येणार आहेत. कोणत्याही स्थितीत गावे, रस्ते स्वच्छ व सुशोभितच दिसली पाहिजेत.  प्लास्टीक कचरा पसरविणाऱ्यांच्या बाबतीत प्लास्टीक बंदी नियमांतर्गत कठोर कारवाई करा.  रस्त्यांवर, रिकाम्या जागांवर प्लास्टीक, घाण, कचरा आढळल्यास सर्वांनीच त्याची छायाचित्रे काढून प्रशासनाच्या निदर्शनास आणावीत.  रस्ते प्राधिकरणाने महामार्गावरील दोन्ही बाजूला दिसणारा कचरा त्वरीत हटवावा.

नागरीकांना वेळेत व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी  व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी कोणत्याही परिस्थीतीत दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही.  प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दीष्ट पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी.  मंजूर घरकुले लवकर पूर्ण होण्यासाठी कर्जपूरवठा विना अडथळा होईल, यासाठी बँकाना आवश्यक ते निर्देश द्यावेत.  31 जानेवारीपर्यंत जीपीडीपी अपलोड होणे आवश्यक आहे. अधिकारी लोकांच्या भेटीसाठी वेळेत उपलब्ध असले पाहिजेत. नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा गुणवत्तापूर्ण असल्या पाहिजेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

सर्व प्रशासकीय विभागांनी आपआपल्या विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या  मालमत्तेची माहिती घेऊन त्यावर आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री  करुन घ्यावी.  कार्यालयात व परिसरात मोडके तोडके फर्निचर असल्यास निर्लेखित करा.  कार्यालयाचे वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटी नीटनेटकी ठेवा,  पडीक डोंगर हिरवेगार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन करा.  पोषण आहार उत्तम दर्जाचा असावा असे सांगून रस्त्यावर विकलांग स्थितीत पडलेले निराश्रित, निराधार यांना योग्य ठिकाणी संदर्भीत करा.  असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी  जिल्हा परिषदचे उपमुख्य  कार्यकारी अधिकारी  (प्रशासन) निलेश घुगे यांनी जिल्हा परिषद विभागामार्फत येत्या शंभर दिवसात प्राधानाने करावयाच्या कामाबाबत सादरीकरण केले.
या बैठकीत विविध विभागांकडील जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या प्रकल्पांचा आढावाही विभागीय आयुक्त् डॉ. पुलकुंडवार यांनी घेतला.   यामध्ये सैनिकी स्कूल सातारा नुतनीकरण प्रकल्प, सातारा येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 500 खाटांचे रुग्णालय व अनुषंगिक बांधकाम, श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखडा, इको टुरीझम आराखडा, सह्याद्री व्याघ्र वनक्षेत्रातील पर्यटन आराखडा, कोयना हेळवाक वनझोन अंतर्गत् कोयना नदी जलपर्यटन विकास आराखडा, शिवसागर जलाशयावरील तापोळा केबल पुल, कोयना जलाशयावर मुनावळे येथील जलपर्यटन, गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजना, जिल्हा विकास आराखडा आदी सर्वांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यंत्रणांनी सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक माणसाची समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढा, सर्वसामान्य माणसाचे जीवन सूकर करण्यासाठी संवेदनशिलतेने काम करा, सर्व जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी आपण सामान्य माणसासाठी काम करत आहोत याची जाणीव ठेवून समन्वयाने काम करावे, आपापसात चांगला समन्वय असल्यास जनतेचे प्रश्न सुलभतेने सुटतील, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.   बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे,  उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व विभागांचे उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. चंद्रकांत पुलकुडंवार म्हणाले, सातारा जिल्हा हा देशात सर्वाधिक सैनिक देणारा जिल्हा म्हणून गौरविला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील सैनिक व त्यांच्या वारसांशी संबंधित असणारी प्रकरणे तातडीने निपटारा करा.  कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या सैनिक व त्यांचे वारस यांच्याशी सौजन्याने वागा, संवेदनशिलतेने त्यांच्या समस्या हाताळा.   महसूल कार्यालयाची वेबसाईट अद्ययावत करा, ही वेबसाईट सर्वसामान्य माणसाला हाताळण्यासाठी सुलभ असावी.  माहिती अधिकारात मागितली जाणारी सर्व माहिती व 1 ते 17 मुद्यांची प्रकाशीत करण्यात येणारी माहिती ही सविस्तर व सखोल असली पाहीजे, अशी माहिती वेबसाईटवरही उपलब्ध करुन द्या.   जिल्ह्याचे संकेतस्थळ जलद प्रतिसादात्मक असावे,  अद्ययावत माहितीने परीपूर्ण असावे तसेच सायबरदृष्ट्या ते सुरक्षित राहीलही याची दक्षता घ्या. प्रशासनाशी संबंधित दैनंदिन माहिती सुलभरित्या समाजमाध्यमातून उपलब्ध असावी.

शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता असावी.  कार्यालयातील अस्ताव्यस्त अभिलेखे, साहित्य यांचे वर्गीकरण, निर्लेखन, याबाबतची कार्यवाही करुन कार्यालयीन परिसर स्वच्छ व प्रसन्न राहील, याकडे लक्ष द्या.  अभ्यांगतांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, बैठक व्यवस्था असावी.  क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी नियमितपणे क्षेत्रीय भेटींच्या डायरीत नोंदी घ्याव्यात.   आपले सरकार, पीजी पोर्टल, लोकशाही दिन, सीमओ पोर्टल अशा विविध व्यासपीठावर मांडण्यात आलेल्या जनतेच्या तक्रारी, गा-हाणी याशी संबंधित अर्जाचा निपटारा तातडीने करावा.  प्रलंबित कामांची संख्या शुन्यावर आणावी,  अधिकारी नागरकिांशी कधी उपलब्ध असतील याबाबतची माहिती फलकावर नमुद करावी, अशा सुचनाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या.

नागरीकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर, तालुका अथवा जिल्हास्तरावर सोडवावेत.  कोणत्याही स्थितीत नागरिकांना प्रलंबित कामासाठी मंत्रालयात विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी दक्षता घ्या, असे सांगून ते म्हणाले, निवारा नसलेल्यांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) यासह सर्व आवास योजनांना गती देत आहे.  त्यामुळे या उपक्रमात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी काढून अडथळे निर्माण करु नयेत.  घरकुल उपक्रमांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करावेत.  त्यासाठी खाजगी वाटाघाटीद्वारे  प्रयत्न करा तसेच शासकीय जमिनी उपलब्ध असल्यास त्वरीत हस्तांतरीत करा.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले,  सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 जानेवारीपर्यंत निश्चित करण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत.  यावर सुप्रीम कोर्टाच्या सूचनानुसार विहीत  मुदतीत कार्यवाही करा.  भविष्यात कोणत्याही प्रकारची तक्रार निर्माण होऊ नये यासाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या मालकीच्या जमीनीबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना त्वरीत द्यावी.

गौण खनिजांच्या अनुषंगाने आढावा घेत असतांना विभागीय आयक्त् म्हणाले, कंत्राटदार गौण खनिजांची खाजगी विक्री करत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.  कोणत्याही परिस्थितीत गौणखनिजांच्या अनुषंगाने चुकीच्या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पायाभूत प्रकल्पांमध्ये सरकारची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असते तसेच जनहिताच्या दृष्टीने ते महत्वाचे असतात, त्यामुळे असे प्रकल्प रेंगाळणार नाहीत याची दक्षता घ्या.  ज्या ठिकाणी अडवणूक होत असेल तेथे पोलीस बंदोबस्त घेऊन काम करा.  विविध सेवा केंद्रावर सर्व सामान्यांचे अर्ज आल्यानंतर ते विहीत मुदतीत निकाली काढा, लोकांची कोणत्याही प्रकारे अडवणूक व फसवणूक होणार नाहीत याची काळजी घ्या.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी शंभर दिवसात सातारा जिल्ह्यात प्राधान्याने करावयाच्या कामांच्या माहितीचे सादरकरण केले.  वेबसाईटमध्ये सुलभता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, कार्यालयीन सोयी सूविधा, ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूलतेबाबत तपशील तयार करणे, विविध स्तरीवरील विविध् प्रकल्पाची भूसंपादन प्रकरणांबरोबर आदी सर्व बाबींची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच दाखले देणे, ई-आफीस, ई-दरबार यासारखे उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबिण्यात येणार आहेत, असे सांगून भूसंपादन दाखले नाहरकत प्रणाली विकसित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

वाई तालुक्यातील खानापूर गावातील पांडवनगरी भागात असलेल्या मेढंगी तसेच जोशी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळण्यास येत असलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी स्थानिक चौकशी करुन जातीचे दाखले तयार केले. याचे वितरण विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याहस्ते 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी करण्यात आले.  या या समाजातील लोकांना जातीचे दाखले निर्गमित झाल्याने शिक्षण तसेच रोजगारामध्ये त्याचा उपयोग होणार आहे.  विविध योजनांचा लाभ घेण्यासही मदत मिळणार आहे.
प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याहस्ते नेताजी डॉ. सुभाषचंद्र बोस व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फोटोस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  (७.११ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३८) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २८ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २९ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी ८ जानेवारी २०२५ पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी २०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जूलै ८  आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

****

 

वंदना थोरात/विसंअ/

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे २,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र शासनाच्या १२ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या  (‘७.११ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३६’) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २८ जानेवारी, २०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २९ जानेवारी, २०२५  रोजी रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १२ वर्षांचा असून, रोख्यांचा कालावधी २५ सप्टेंबर २०२४  पासून सुरू होईल, तर कर्जरोख्याची परतफेड दिनांक २५ सप्टेंबर २०३६ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक मार्च २५ आणि सप्टेंबर २५  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम, १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

*****

वंदना थोरात/विसंअ/

भारत रंग महोत्सवात तीन मराठी नाटके

नवी दिल्ली, दि. 23 : रंगमंचाच्या चाहत्यांसाठी राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) च्यावतीने भारत रंग महोत्सवाचे आयोजन 28 जानेवारी पासून सुरू होत आहे. यामध्ये मराठीतील तीन नाटके सादर होणार आहेत.

जगातील सर्वांत मोठा रंगमंच महोत्सव म्हणून ओळखला जाणारा भारत रंग महोत्सव (भारंगम) यंदा २८ जानेवारी ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या २५ व्या आवृत्तीत भारतासह नेपाळ, श्रीलंका आणि देशातील १३ शहरांमध्ये हा रंगोत्सव आयोजित केला जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व एनएसडीचे माजी विद्यार्थी राजपाल यादव यांची “रंगदूत” (महोत्सव राजदूत) म्हणून निवड करण्यात आली आहे. २० दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नऊ देशांतील २००हून अधिक अनोख्या सादरीकरणांचा समावेश असेल.

८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘गोष्ट संयुक्त मानपानाची’  हे नाटक अभिराम भडकमकर लिखित व हृषीकेश जोशी दिग्दर्शित आहे. नाट्य संपदा कलामंच आणि शौर्य प्रोडक्शन्स, मुंबई या समूहांद्वारे या नाटकाची मांडणी केली जाईल.

९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे “कलगीतुरा”  हे नाटक दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित आहे. नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स, मुंबई या समूहाने याची निर्मिती केली आहे.

१४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सादर होणारे ‘38 कृष्णा व्हिला’  हे नाटक श्वेता पेंडसे लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित आहे. १२० मिनिटांचे हे नाटक रॉयल थिएटर, मुंबई या समूहाद्वारे सादर होईल. तीनही नाटके मंडी हाउस जवळ असणाऱ्या श्रीराम सेंटर सभागृहात सादर केली जाणार आहेत.

0000

अंजु निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.14 /दि. 23.01.2025

शासकीय वसतिगृहातील सोयी-सुविधा सुधारण्यावर भर – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 23 :- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये  सुधारणा  करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील, असे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.

मुंबईतील सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह वरळी 116, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 116,  मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वरळी 118 या वसतिगृहांना सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदिप कांबळे, समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहाय्यक आयुक्त मुंबई शहर, उज्ज्वला सपकाळे, सहाय्यक आयुक्त मुंबई उपनगर प्रसाद खैरनार उपस्थित होते.

वरळी  येथील  शासकीय वसतिगृहाच्या इमारतीचा पुर्नविकास करताना विद्यार्थ्यांसाठी कमीत कमी 200 ते 250 चौ.फूट इतकी जागा प्रत्येक खोलीत उपलब्ध करुन देण्यात येईल, जेणेकरुन विद्यार्थी पुरेशा जागेत राहू शकतील. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारच्या कॉट, गाद्या व कपाटे, अद्ययावत कॉम्प्युटर, स्पर्धा परिक्षेची अद्ययावत पुस्तके उपलब्ध करुन देण्यात येतील. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्‍या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्यात येईल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी  सुद्धा सामाजिक न्याय विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातील, असेही श्री. शिरसाट यांनी सांगितले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी श्री. शिरसाट यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. वसतिगृहातील  विद्यार्थ्यांशी संवाद साधून श्री.शिरसाट यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना उज्वल भविष्यासाठी  शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या वसतिगृहातील अचानक भेटीमुळे विद्यार्थ्यांनी  समाधान व्यक्त केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 23 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला गती देण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून जिल्ह्यात होणारा ताज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर घ्या व जिल्ह्यातील पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करा असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, दूरदृश्यप्रणालीव्दारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, पर्यावरण विभागाचे संचालक अभय पिंपरकर,अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, कोकण विभागाचे उपसंचालक हणमंत हेडे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.देसाई म्हणाले की, सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने अनेक पर्यटन प्रकल्प सुरू आहेत. पर्यटनाच्या उपलब्ध असलेल्या विविध योजना व सवलती याच्या अनुषंगाने समन्वय साधण्यासाठी राज्यस्तरावर समिती स्थापन करून सर्व पर्यटन योजनांना गती देण्यात येईल. जिल्ह्यात होणाऱ्या ताज प्रकल्पासाठी पर्यावरणासह आवश्यक त्या परवानग्या घेऊन स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करा. चांदा ते बांदा प्रकल्पातील मंजूर कामांसाठी वर्ग करण्यात आलेल्या निधीची कामे गतीने करा. सिंधुरत्न योजना, जिल्ह्यात सुरू होणारी सबमरीन, दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पाटबंधारे प्रकल्पातील वॉटर स्पोर्टस या कामांना विभागाने गती द्यावी, अशा सूचना मंत्री श्री.देसाई यांनी केल्या.

यावेळी आमदार श्री. केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाने विशेष लक्ष द्यावे.जिल्ह्यातील प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, पर्यटन प्रकल्पांसाठी पर्यटन विभागाने जास्तीत जास्त निधी द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...