मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 378

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली, 15 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  होणार आहे.

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.  भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार, संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे.

असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. 22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छानणी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत असेल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.

महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती

महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर  29 जागा  या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत.

यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नांदेड, केरळ आणि  उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.

भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे, मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे – विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत  असल्याची खातरजमा, ‘पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट’ अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व  सोशल मीडियावर लक्ष ठेवून, खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, सी-विजिल अॅपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.

उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी, आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे. या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

****

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.136/ दि.15.10.2024–

 

 

ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा नवीन पिढीने आदर्श घ्यावा – डॉ.सदानंद मोरे

मुंबई, दि. 15 : लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र वाङ्मय हा विद्वत्तेच्या क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक त्यांच्या कार्याविषयीचे साहित्य 18 खंडांमध्ये एकत्रित केले असून नवीन पिढीने अशा साहित्यिकांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांनी केले.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन डॉ.मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या चर्चेत डॉ.लवटे आणि डॉ.अशोक चौसाळकर हे चर्चक म्हणून सहभागी होते.

डॉ.मोरे म्हणाले, वाचकांनी दर्जेदार साहित्य वाचावे यासाठी अशी साहित्य निर्मिती होणे आणि ती वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. साहित्य आणि संस्कृती मंडळ सातत्याने असा प्रयत्न करीत असून यापुढेदेखील अशी उत्तमोत्तम विषयांवर आधारित साहित्य निर्मिती केली जाईल. मंडळाकडे अतिशय कमी मनुष्यबळ असतानादेखील दर्जेदार साहित्य प्रकाशित होत असल्याबद्दल कौतुक करुन साहित्य प्रेमींचे प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत रहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.लवटे यांनी तर्कतीर्थांवरील 18 खंड हे प्रचंड कार्य असल्याचे सांगून यासाठी हजारो हातांनी संदर्भ पुरविल्याचे सांगितले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या साहित्य जीवनाविषयीचे विविध पैलू उलगडून सांगताना त्यांनी भाषण आणि इतर साहित्यिकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिण्यासाठी कधीच नकार दिला नसल्याचे तथापि पुस्तक परिक्षण मात्र ते अतिशय चोखंदळपणे करीत असल्याचे डॉ.लवटे यांनी नमूद केले. तर्कतीर्थांवरील 18 खंडांच्या प्रकाशनासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळासह शासकीय मुद्रणालयाचे आभार व्यक्त केले. विश्वकोश मंडळाच्यावतीने मराठी विश्वकोशाचे लेखन कसे झाले याबाबतचे दस्तऐवज संग्रहित व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.चौसाळकर यांनी देखील तर्कतीर्थ आणि त्यांच्या साहित्याबाबत माहिती दिली. डॉ.लवटे यांनी केवळ 3-4 वर्षात त्यांचे कार्य एकत्रित करुन हे प्रचंड कार्य पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याचप्रमाणे राजारामशास्त्री भागवत तसेच आचार्य जावडेकर यांचे समग्र वाङ्मय प्रकाशित व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

प्रारंभी मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. मंडळामार्फत आतापर्यंत 688 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मंडळामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकावर वाचन प्रेरणा दिनानिमित्त चर्चा केली जाते, त्यानुसार आज तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

सोलापूर, दि. १५ (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्याचा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी, सिंचन ,शैक्षणिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवून आणून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

           शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्या आढावा बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस  अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

           राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणासह विविध मोठे, माध्यम व लघु पाणी प्रकल्पाची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्राची माहिती घेऊन त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध पिकांविषयी जाणून घेतले. तसेच जास्तीत जास्त सिंचन सुविधा उपलब्ध केल्यास शेतकरी वर्गाला त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

           जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती घेताना सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयामधील एमआरआय, सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे यासह अन्य यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू असली पाहिजे यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. या मशीन वेळोवेळी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक तरतूद करून ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी वर्गाची असल्याचे निर्देश राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी दिले.

           पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामांची माहिती घेतली. भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सूचित केले.

          सोलापूर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना उजनी धरणातून सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या कामाचाही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आढावा घेतला. तसेच महापालिकेला करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच पोलीस विभाग जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी राबवत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

           प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकासात्मक कामाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली. यामध्ये जिल्ह्याची सर्वसामान्य माहिती, कृषी, आरोग्य, सिंचन, पाणी प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पर्यटन आराखडा आरोग्य, शैक्षणिक तसेच पारधी समाजाच्या वंचित नागरिकांना मतदार कार्ड वाटप आदी बाबत माहिती दिली. तसेच महापालिका आयुक्त श्रीमती उगले तेली यांनी हे महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे सादरीकरण यावेळी केले. शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी शहरी भागातील तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. त्याप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या वतीने राबवण्यात आलेले विविध अभ्यासक्रमाची माहिती सादर केली. तसेच विद्यापीठास शैक्षणिक उपक्रम राबवताना येत असलेल्या अडचणीची माहिती देऊन त्या सोडवण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी केली.

याप्रसंगी उद्योजक, वकील, आय एम ए, संपादक व अन्य मान्यवरांशी संवाद साधला.

सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन भुजबळ, श्रीमती मनीषा कायंदे, इद्रिस इलियास नाईकवाडी, विक्रांत पाटील, धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड, श्रीमती चित्रा किशोर वाघ यांना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सदस्यत्वाची शपथ दिली.

विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात दुपारी १२ वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न झाला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नाशिक, दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : नागरिकांच्या मूलभुत गरजा लक्षात घेवून आवश्यक त्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज देवळाली मतदार संघातील सय्यद प्रिंपी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार आमदार सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माजी खासदार देविदास पिंगळे, सरपंच भाऊसाहेब ढिकले माजी यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देवळाली मतदारसंघ हा ग्रामीण, शहरी व कॅन्टोमेंट अशा तीन भागात विभागलेला आहे. या तीनही भागातील रस्ते, आरोग्य सेवा व आवश्यक विकासकामांसाठी गेल्या अडीज वर्षात कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. नाशिकरोड येथे दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयास मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे मान्यता मिळाली आहे. या न्यायालयाच्या उभारणीतून नागरिकांची सोय होणार असून वेळ वाचणार आहे. 1 हजार 500 कोटी रूपयांच्या नदीजोड प्रकल्पासही मान्यता मिळाली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी भागाला जलसंजीवनी मिळणार आहे असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या  रस्त्यांचे क्राँकीटीकरण कामांचे आज भूमिपूजन झाले असून आवश्यक निधीही यासाठी मंजूर झाला आहे. या रस्त्यांचे दर्जेदार काम दिड वर्षाच्या कालावधीत  पूर्ण केले जाणार आहे. यासह आवश्यक ठिकाणी पाणंद रस्त्यांचे कामेही केली जाणार आहे. येणा-या काळात एकलहरे येथील विद्युत संच दुरूस्ती तसेच संत श्रेष्ट निवृत्तीनाथ महाराज 660 कोटींच्या आरखडा प्रस्तावास मंजूरी देण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले सर्व घटकांच्या विकासाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहे.  44 लाख शेतकऱ्यांचे 15 हजार कोटी रूपयांचे वीज बिल शासनाने भरून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. 1 ऑक्टोबर पासून  गाईच्या दुधाला रूपये 35 हमीभाव देण्यात आला आहे. शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे ४६ हजार कोटी रुपयांचा निधीचा २ कोटी चाळीस लाख महिलांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन निर्यातबंदी उठवली. येणाऱ्या काळात सौर वीज पंपाच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिवसा सौर वीज उपलब्धेतचा पर्याय उपलब्ध होणार असून याद्वारे 91 हजार 500 मेगावॅट वीज शेतक-यांना उपलब्ध होणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालय 34 कोटी निधीतून साकारले जाणार असून  या रूग्णालयांच्या माध्यमातून नाशिक-पुणे  महामार्गावर होणाऱ्या अपघातातील रूग्णांना वेळेत प्राथमिक  उपचार मिळणार आहेत. देवळाली कॅन्टोमेंट बोर्डालाही यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून रूपये 5 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून  या निधीतून लॅमरोड, देवळाली शहर या भागात रस्त्यांच्या कामांसह विविध कामे करणे शक्य झाले आहे. तसेच भगूर येथील स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकासाठी रूपये 40 कोटींच्या निधीस मान्यता प्राप्त झाला असल्याचे आमदार सरोज आहेर यांनी  प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे व सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनीही  मनोगत व्यक्त केले.

या कामांचे झाले भूमिपूजन

• राज्य महामार्ग 37 दहावा मैल- पिंपरी सैय्यद- लासलगाव- हिंगणवेढे- कोटमगाव- जाखोरी- चांदगिरी- शिंदे एन एच 50 ला जोडणाऱ्या  रस्त्यांचे क्राँकीटीकरण (मंजूर निधी रक्कम रूपये 172.89 कोटी)
• मौजे शिंदे येथे ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम करणे (मंजूर निधी रक्कम रूपये  34.51 कोटी)
• देवळाली मतदार संघातील 122 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
000000

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत राज्यात चार लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात १२३ कोटी रुपये अनुदान वर्ग

मुंबई, दि. १५ : राज्यातील ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धावस्थेत मदत करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदीसाठी, मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत दि.१४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या ४ लाख १२ हजार ११३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे प्रति लाभार्थी तीन हजार प्रमाणे १२३.६३ कोटी रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या  योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार २२० पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीव्दारे निधी वर्ग करुन करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त आहेत. या अर्जाची छाननी व आधार प्रमाणीकरणाचे काम सुरु आहे.

0000

शैलजा पाटील /वि.सं.अ

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रेरणेने मुलांनी सक्षम वैज्ञानिक बनावे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई,दि.15 : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखले जाते. शास्त्रज्ञ असलेले डॉ.कलाम हे उत्तम साहित्यिक होते. मुलांनी डॉ कलाम यांचे कार्य आणि अग्निपंख पुस्तकातून प्रेरणा घेऊन सक्षम वैज्ञानिक बनावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

15 ऑक्टोबर हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो, यानिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, अवर सचिव उर्मिला धारवड, कक्ष अधिकारी ऐर्श्वया गोवेकर, आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले, जो सर्वाधिक वाचन करतो, तो सर्वोत्कृष्ट बनतो. यामुळे मुलांमध्ये वाचन प्रवृत्ती वाढीस लागावी, यासाठी शासनाने वाचन चळवळ सुरू केली आहे. हा महावाचन उत्सव मराठी भाषा विभागामार्फत राबविण्यात येत असून मागील वर्षी राज्यातील ५१ लाख मुलांनी सहभाग नोंदविला होता. यंदा एक कोटी मुले सहभागी होतील, असे नियोजन केले आहे. मुलांनी पुस्तकाचे वाचन केल्यास जगाचे नेतृत्व करतील.

मराठी आणि जर्मन भाषेत साधर्म्य असून मराठीचे महत्व ओळखून जर्मन शिकविणाऱ्या संस्थेशी करार केला आहे. मराठी ही साहित्य आणि संस्कृतीने समृद्ध भाषा असल्याने तिला अभिजात दर्जा मिळाला आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री. केसरकर यांनी आभार व्यक्त केले.

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठीचा आणि मुंबईचा नागरिकांनी अभिमान बाळगायला हवा. मराठीमध्ये साहित्य, संशोधन करण्यासाठी मुंबईत मरीन ड्राईव्हजवळ एकाच छताखाली चारही कार्यालये आणण्याचा प्रयत्न आहे. मराठी भाषा भवन या सर्वात मोठ्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. साहित्यिक हे राज्याचे वैभव असल्याने त्यांची मुंबईत कामानिमित्त आल्यास या इमारतीमध्ये राहण्याची सोय करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुस्तकांचे गाव संकल्पना राबविली. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे एक गाव करण्याचाही संकल्प आहे. विश्वकोष निर्माते लक्ष्मणशास्त्री यांचे वाई (जि.सातारा) येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगाव कवितांचे गाव म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

यावेळी मंत्री श्री. केसरकर यांनी मराठी भाषा विभाग आणि इतर प्रकाशकांनी लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलला भेट देवून माहिती घेतली. आभार आणि सूत्रसंचालन वासंती काळे यांनी केले.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी मंत्रालयात अभिवादन कार्यक्रम

मुंबई, दि. 15 :- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे, नितीन राणे आदींसह मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना पुष्प अर्पण करून वंदन केले.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

सर्वस्पर्शी महाराष्ट्र सरकार…दोन वर्षं महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची!

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी  साधला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद

मुंबई दि. १४ :- राज्य शासनामार्फत अनेक विकास कामे व प्रकल्प राबविण्यात येत आहेत. विकास कामांतून नागरिकांचे  जीवनमान उंचावणार असल्याने या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधतांना केले.

राज भवन येथे झालेल्या या बैठकीस माजी राज्यपाल राम नाईक, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार पराग शहा, सुभाष देसाई,  विद्या चव्हाण, माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन अनेक विकास कामे, योजना राबवित आहे. या योजनांमधून नागरिकांचे जीवनमान नक्कीच उंचावेल. या योजनांच्या, प्रकल्पांच्या पूर्तीसाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. विकास कामांबाबत ज्यांना काही सुचवायचे असल्यास त्यांनी त्यांचे म्हणणे लेखी घ्यावे,असे  ते म्हणाले.

विविध क्षेत्रातील मान्यवरांशी राज्यपालांनी साधला संवाद

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज भवन येथे उद्योग, आदिवासी, अल्पसंख्यांक डीआयसीसीआय, तृतीयपंथी, दिव्यांग, खेळाडू आणि मागासवर्गीय यांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार केला जाईल. या मान्यवरांनी उपस्थित केलेल्या सूचना, मांडलेले प्रश्न सोडवण्यास  संबधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे,अशा  सूचना त्यांनी  दिल्या. तृतीयपंथी यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबत निर्देश दिले जातील, असे राज्यपाल महोदयांनी सांगितले. जे प्रश्न स्थानिक पातळीवरचे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवावेत, असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतला आढावा

नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने अनेक महत्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाची कामे संबधित यंत्रणांनी निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना चांगल्या सेवा द्याव्यात, अशा सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेताना दिल्या.

बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, एमएमआरसीएएल च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार,

कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मेरी टाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असाव्यात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण असावीत. ही कामे करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त  वापर करावा. प्रकल्प मुदतीत पूर्ण व्हावेत. विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. मुंबई उपनगर जिल्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सुयोग्य नियोजन व्हावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत राज्यपाल महोदयांनी मेट्रो, रेल्वे, रस्ते, म्हाडा, वन, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था या विषयीचा आढावा घेतला. मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सादरीकरणातून मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरू असलेली विकास कामे व उपक्रमांची माहिती दिली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके

0
नवी दिल्ली, दि. १३ :  खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून आपली क्षमता...