मंगळवार, मे 13, 2025
Home Blog Page 375

सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त, यापैकी ४१४ निकाली; १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि.१८ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ साठी दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजी आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ४२० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१४ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. यापैकी १०० मिनिटांत २५६ तक्रारींचा निपटारा करण्यात आल्या आहे. राज्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वात जास्त तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण १०६४ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
००००००

मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी; मतदान करण्यासाठी यादीत नाव आवश्यक

मुंबई, दि. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी.

आजच electoralsearch.eci.gov.in ह्या दुव्याला (link) भेट देऊन किंवा Voter Helpline ॲपवर मतदार  यादीत आपले नाव तपासून घ्यावे. नाव नसेल तर त्वरीत मतदार नोंदणी करावी, तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव यांचे निर्देश

मुंबई, दि. १८ : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करून मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर देण्यात यावा. निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे. या उत्सवात मतदारांनी सहभागी होण्यासाठी मतदारांना अभिमान वाटेल अशा पद्धतीने मतदान केंद्रनिहाय सूक्ष्म नियोजन करा, असे निर्देश मुंबई शहर जिल्हा जिल्हाधिकारी तथा अति. निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी  संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्व विभागाचे समन्वय अधिकारी, सहायक समन्वय अधिकारी उपस्थित होते.

श्री.यादव म्हणाले, मे महिन्यात तापमान अधिक असल्याने  निवडणुकीत राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून निरंतरपणे मतदार जागृतीसाठी SVEEP (सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन) नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून जनजागृती करावी, यामध्ये शाळा, महाविद्यालय यांच्यासह सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, अशा सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर निश्चित किमान सुविधा (Assured Minimum Facilities) पुरविण्यात याव्यात, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास त्याठिकाणी मतदारांना बसण्यासाठी वेटिंग व्यवस्था, खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी, पंखे या सुविधा उपलब्ध करून मतदारांना फार काळ रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही, आणि गर्दी होणार नाही यासाठी टोकन सिस्टीम, कलर कोड अशी व्यवस्था करण्यात यावी. याच बरोबर आरोग्य सुविधा सुद्धा पुरविण्यात याव्यात, असेही श्री.यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदानाच्या दिवशी कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक आहे. याबाबत खासगी संस्था,औद्योगिक संस्था, हॉटेल असोसिएशन यांच्या सोबत चर्चा करावी. तसेच जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे तसेच उत्तुंग इमारतीमधील (Highrise Building) मतदान केंद्र आणि सहकारी गृहनिर्माण सोसायटीमधील मतदान केंद्रावरील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे करावी असेही बैठकीत सांगितले.

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात याव्यात. दिव्यांग आणि ८५ वर्षे वयाच्या नागरिकांना घरून मतदानाचा पर्याय दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना टपाली मतपत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

नागरिकांकडून मतदारयादीत नाव नसल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे सद्य:स्थितीत नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात यावी. तसेच नाव नोंदणीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्यात यावे. अर्जाबाबत शंका असल्यास बीएलओमार्फत स्थळ पाहणी करून याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती याबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.

000

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक; नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुंबई, दि. १७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही, त्यांना अजूनही दि. १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव आवर्जून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही त्यांनी  तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी केले.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19.10.2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

राजधानीत महर्षी वाल्मिकी जयंती साजरी 

नवी दिल्ली, १७ : महर्षी वाल्मिकी यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंह यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त  डॉ. राजेश आडपावार व स्मिता शेलार उपस्थित होत्या. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

 

राज्यपालांचे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

मुंबई, दि. १७ : आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

Governor offers floral tributes to Maharishi Valmiki

Mumbai, 17th Oct : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Aadi Kavi Maharshi Valmiki on the occasion of the birth anniversary of the legendary poet and author of the epic Ramayana at Raj Bhavan, Mumbai on Thursday.

 

आदर्श आचारसंहिता व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे

मुंबई, दि. १६ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाली असून प्रशासनाने सर्व आवश्यक ती तयारी केली आहे. मतदानाचे प्रमाण वाढावे, अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा विशेष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान वाढण्यासाठी राजकीय पक्षांनीदेखील आपापल्या स्तरावर सहकार्य करावे, तसेच आदर्श आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १६ ऑक्टोबर २०२४) बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,  महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी बैठकीत सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ कार्यक्रम जाहीर झाला आहे. काल दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. विद्रूपीकरण कायदा १९९५ नुसार सर्व बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर, जाहिरात फलक इत्यादी तात्काळ काढण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी देखील यामध्ये सहकार्य करावे. ज्या ठिकाणी नियमानुसार परवानगी आहे, त्या ठिकाणी विहित पद्धतीने परवानगी घेतल्यानंतरच राजकीय पक्षांनी बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी लावणे अपेक्षित आहे, असे श्री. गगराणी यांनी नमूद केले.

पुढे ते म्हणाले की, नागरी क्षेत्रात मतदानाचे कमी प्रमाण हा माननीय निवडणूक आयोगाच्या दृष्टीने काळजीचा विषय आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदा देखील माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या उपाययोजना आणि जनजागृती देखील करण्यात येत आहे. ज्या पात्र मतदारांनी अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही त्यांना, निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत सहा क्रमांकाचा अर्ज करून नोंदणी करता येते. या नियमानुसार, यंदा दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदारांना नाव नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे याबाबत देखील समान प्रक्रिया आणि मुदत आहे, अशी माहिती देखील श्री. गगराणी यांनी बैठकीत दिली.

आपले मतदान केंद्र जाणून घ्या या अभियानाविषयी माहिती देताना श्री. गगराणी म्हणाले की, लोकसभा निवडणूक २०२४ नंतर सर्वत्र मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये वाढ आणि बदल झाले आहेत, त्या सर्व ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे प्रत्येक कुटुंब आणि मतदार यांच्यापर्यंत पोहोचून मतदान केंद्रांची माहिती लेखी स्वरूपात पोचवत आहेत. त्यासाठी आपले मतदान केंद्र जाणून घ्या अर्थात Know Your Polling Station ही मोहीम व्यापक स्तरावर राबवली जात आहे. राजकीय पक्षांनी देखील आपापल्या स्तरावर याबाबत खात्री करावी. बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती करून घ्यावी आणि मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती पोहोचवून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गगराणी यांनी केले.

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर म्हणाले की, मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच, प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे इत्यादी निश्चित किमान सुविधांची (Assured Minimum Facility) पूर्तता करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची गैरसोय होऊ नये, याची विशेषत्वाने काळजी घेण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर करावयाच्या कार्यवाही बाबत स्वतंत्रपणे बैठका घेण्यात येतील. त्यामध्ये नामनिर्देशन, निवडणूक कार्यक्रम, मतदान संयंत्र आणि इतर मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, अशी माहिती श्री. क्षीरसागर यांनी दिली.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार व सूचना जाणून घेतल्यानंतर समारोप करताना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गगराणी यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ७७ व ७८ नुसार खर्च मर्यादा आणि निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे इत्यादी बाबत तरतुदी आहेत. तसेच कलम १२७क नुसार छपाई करावयाच्या पोस्टर्स, बॅनर्स इत्यादींबाबत तरतुदी आहेत. कलम १२८ नुसार मतदानाची गोपनीयता ठेवण्यासंदर्भात तरतूद आहे. विविध कायदे आणि माननीय भारत निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचनांचे देखील पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. सर्व राजकीय पक्षांना त्याबाबत वेळोवेळी अवगत केले जाते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक विषयक कायदे व तरतुदी याचे सर्वांनी योग्य पालन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील श्री. गगराणी यांनी बैठकीच्या अखेरीस केले.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान

मुंबई,दि.१६ : राज्यात विधानसभेसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हेदेखील मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघातील मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या पार्श्वभूमीवर १८५ मलबार हिल मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब मुरलीधर वाकचौरे यांनी राजभवन येथे  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना त्यांचे मतदान ओळखपत्र प्रदान केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर तथा  महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच जिल्हाधिकारी मुंबई शहर तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घटकातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्वच स्तरातील मतदारांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. याशिवाय मतदार यादीतील मतदारांची नावे व त्यांचा तपशीलही अद्ययावत करण्यात येत आहे. राजकीय, शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती मुंबई शहर जिल्ह्यात मतदार असून येत्या २० नोव्हेंबरला ते मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील १८५ मलबार हिल मतदार संघात एकूण २६०५६० मतदार असून त्यापैकी १३५०९४ पुरुष, १२५४५४ महिला तर १२ तृतीयपंथी मतदार आहेत. राज्यात एकूण २८८ जागांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२४ असून, उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबर २०२४आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज मतदानाचा टक्का वाढवावा – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

मुबंई, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये   दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना  दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जुन बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.

निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.

एकूण  9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार

राज्यात दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत  एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये  सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.  अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी  47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-

अ.क्र.

 

तपशील

 

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार

 

दि.30 ऑगस्ट, 2024

रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील

मतदार

दि.15.10.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या

 

1 पुरुष 4,67,37,841 4,93,33,996 4,97,40,302
2 महिला 4,27,05,777 4,60,34,362 4,66,23,077
3 तृतीयपंथी 2,593 5,944 6,031
एकूण 8,94,46,211 9,53,74,302 9,63,69,410

 

मतदान केंद्रात वाढ

सन 2019 च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 2019 मध्ये 96 हजार 653 असलेली मतदान केंद्रांची संख्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 186 आहे. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42 हजार 604 तर ग्रामीण मतदान केंद्र 57 हजार 582 आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 हजार 500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तसेच शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1 हजार 181 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इत्यादी किमान सुविधा, प्रसाधन सुविधा, इ.पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत, फक्त मुंबई प्रादेशिक विभागामध्ये उद्वाहन असेल तर वरच्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे.

मतदानाची टक्केवारी

सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

विधानसभा / लोकसभा निवडणूक पुरूष मतदान  (%) महिला मतदान (%) तृतीयपंथी मतदान (%) एकूण (%)
विधानसभा सन 2014 64.33 61.69 37 63.08
विधानसभा सन 2019 62.77 59.26 25.48 61.1
लोकसभा सन 2024 63.45 59.04 25.35 61.33

 

यंत्रणेची सज्जता

महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2 लाख 26 हजार 624 मतदान यंत्र,  एकूण 1 लाख 26 हजार 911 कंट्रोल युनिट आणि एकूण 1 लाख 37 हजार 118 व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि. 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावरील सोयीसुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आदर्श आचारसंहिता

भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात कालपासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचार संहिता विधानसभा नविन सभागृह स्थापन होण्याची घटनात्मक अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत लागू राहिल. त्यामुळे या कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिरात प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.

राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती

राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.

सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी  माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात करावयाच्या आहेत.

तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts) याची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणूक संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

मतदारांसाठी सुविधा

दिव्यांग मतदार (PwDs) :- भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे अॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) च्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबीरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 6 लाख 36 हजार 278 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.

ही सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. दि.30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्यापपर्यंत 69 लाख 23 हजार 199 इतकी वाढ झाली आहे.

प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 6 लाख इतके कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हीडिओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणाऱ्या मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.

मतदारांसाठी उपयुक्त  संगणक प्रणाली  (IT Application):-

 यंदाच्या निवडणूकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने विकसीत केलेली संगणक प्रणाली पुढील प्रमाणे आहे.

सी व्हिजील (c Vigil) :- आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हीजील (c Vigil) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

सक्षम (App) :- पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लीकेशन (IT Application) उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

केवायसी (Know Your Candidate) App :- मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.

इएसएमएस (ESMS App/Portal) निवडणूक अधिक मुक्त व निःपक्ष वातावरणात व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहेत. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी इएसएमएस (ESMS App/ Portal) वरुन कळविण्यात येत आहे.

1950 क्रमांकाची हेल्पलाईन

राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येईल.

विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – २०२४ दि. 25 जुन 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत. विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – 2024 अंतर्गत स्वीप उपक्रम :- या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.

परिशिष्ठ 1

दि.15.10.2024 रोजीच्या मतदार यादीतील विविध मतदारांची संख्या

अ.क्र.

 

तपशील

 

सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार

 

दि.30 ऑगस्ट, 2024

रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील

मतदार

दि.15.10.2024 रोजीच्या अद्यावत मतदारांची संख्या

 

1 पुरुष 4,67,37,841 4,93,33,996 4,97,40,302
2 महिला 4,27,05,777 4,60,34,362 4,66,23,077
3 तृतीयपंथी 2,593 5,944 6,031
एकूण 8,94,46,211 9,53,74,302 9,63,69,410
अ.क्र.

 

मतदारांचा प्रवर्ग

 

संख्या

 

1. दिव्यांग 6,36,278
2. सेनादलातील मतदार 1,16,355
3. 18-19 वर्ष वयोगट 20,93,206
4. 85+ वर्षावरील जेष्ठ नागरीक 12,43,192

००००

वंदना थोरात/विसंअ/

राजधानीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, १५ : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.

दिल्लीतील कॉपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अपर निवासी आयुक्त नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश आडपवार, स्मिता शेलार तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

परिचय केंद्रात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली.

0000

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.135/ दि.15.10.2024

ताज्या बातम्या

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
वर्धा, दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजनांच्या...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा दि. 12 (जिमाका) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार...

‘कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
वर्धा, दि.१२ (जिमाका)  : ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई,...

येत्या काळात आरोग्य क्षेत्रातील सर्वच विभागांसाठी पुरस्कार सुरु करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. १२ मे : ‘ज्याप्रमाणे परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते, त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट...

मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय मदत कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते...

0
धुळे, दिनांक 12 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालयांमार्फत नागरिकांना द्यावयाच्या मदतीसाठी कार्य करणाऱ्या जिल्हास्तरीय मदत कक्षाचे आज राज्याचे...