रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 371

सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

सांगली, दि. २३ (माध्यम कक्ष) : मा. भारत निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. कवठेमहांकाळ – तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप (आय. आर. एस.) सी व सीई व सांगली, मिरज, वाळवा, शिराळा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी खर्च निरीक्षक म्हणून करणी दान  (आय.आर.एस.) यांची नियुक्ती मा. भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी प्रत्यक्षात आणि सर्व विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काटेकोरपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यास व आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. सर्व पथकांनी सतर्क राहावे, असे खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आठही मतदारसंघात मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हीडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. राजा दयानिधी यांनी सूचित केले.

यावेळी शिरीष धनवे यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांतील कार्यवाहीचा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केला.

०००

 

अमरावती जिल्हा परिषदेतील स्वीप कक्षाचे उद्घाटन

अमरावती, दि. २३ (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात स्वीप कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या सभागृहात वॉल ऑफ प्राऊड वोटरची संकल्पना साकारण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहूणे म्हणून स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्रा, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी वॉल ऑफ प्राऊड वोटर ही संकल्पना अभिनव आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असल्याने सर्व विभागांचा यात सहभाग महत्वाचा आहे. मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शी पद्धतीने आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय राबविल्या जाते. त्यामुळे या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. मतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदानासाठी यावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात पिंक आर्मी, वीज देयकावरील मतदानाची आवाहन, विविध सामाजिक संघटनांना मतदार जागृती अभियानात सामावून घेण्यात आले. यामुळे जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली आहे. यावेळीही मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यासाठी सर्व विभागांनी पुढे यावे. सहयोगासाठी नागरीक चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे यात त्यांचा सहभाग घ्यावा. नागरिकांपर्यंत वोटर स्लीप पोहोचविल्यास त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

मनपा आयुक्त श्री. कलंत्रे यांनी, शहरी भागात मतदानाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. कर्मचारी आणि नागरिकांचे मतदान होणे आवश्यक आहे. यासाठी महापालिकेत विशेष सुविधा केली जाईल. यावर्षी नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यांचे मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा, असे आवाहन केले.

पोलिस आयुक्त श्री. रेड्डी यांनी मतदान जागृतीसाठी पोलिस विभागातर्फे संपूर्ण सहकार्य केल्या जाईल. तसेच सर्व पोलिसांचे मतदान होण्यासाठी यंत्रणा तयार केली जाईल. पोलिसांचा सक्रिय सहभागामुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढण्यास मदत होईल, असे सांगितले.

जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. आनंद यांनी लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढे येऊन मतदान करावे. मतदानासाठी पोलिस विभागातर्फे सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.

श्रीमती मोहपात्रा यांनी प्रास्ताविकातून स्वीप उपक्रमात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी 80 टक्के मतदानाचे उद्दीष्ट ठेवले असल्याचे सांगितले. मतदारांना समर्पित असे वॉल ऑफ प्राऊउ वोटर तयार करण्यात आले आहे. यामुळे जनजागृती होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. सुरवातीला जनजागृती कक्षाची फीत कापून उद्घाटन करण्यात आले. ज्ञानेश्वर घाटे यांनी सूत्रसंचालन केले. संजय राठी यांनी आभार मानले.

०००

 

मलबार हिल निवडणूक कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांची भेट

मुंबई, दि. २३: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाला केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली.

केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत यांनी कंट्रोल रूमची पाहणी करून आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश दिले. स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमशी लवकरच त्या भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनकुमार पोतदार,सहायक खर्च निरीक्षक संजय गोरे, केंद्रीय खर्च निरीक्षक अमन प्रीत  यांचे संपर्क अधिकारी श्याम दडस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मतदार जागरूकतेसाठी लाला लजपतराय महाविद्यालयात ‘टाऊनहॉल’ कार्यक्रम

मुंबई, दि. २३ : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज लाला लजपतराय महाविद्यालयात ‘टाऊनहॉल’ हे मतदार जागरूकता अभियान राबविण्यात आले. मुंबई शहराचे जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीप सेल, लाला लजपतराय महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना दल तसेच एनजीओ मार्क युवर प्रेझेन्स (MYP) यांनी संयुक्तपणे हे अभियान राबविले.

नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान हाती घेतले आहे. मुंबई शहर जिल्ह्यांतील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरचे ‘स्वीप’विभागाचे समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवणे, मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढवणे, आणि प्रत्येक मतदारापर्यंत त्या प्रक्रियेची माहिती पोहचवणे आहे. या माध्यमातून लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक बनविणे हे अभियानाचे मुख्य लक्ष्य आहे.

मुंबई शहरातील सुमारे १५ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) ७०० स्वयंसेवक आजच्या या अभियानात सहभागी झाले. लोकशाही बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करत डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, मतदारांच्या मतदानाला चालना देण्याची गरज आहे आणि ह्यामध्ये देशातील युवकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. त्यांनी युवकांना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ‘लोकशाही दूत’ होऊन आपला हातभार लावण्याचे आवाहन केले. यावेळी सभागृहातील उपस्थितांना मताधिकार बजावण्याची शपथही देण्यात आली.

मुंबई शहर स्वीप प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, लाला लजपतराय महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. हरमीत कौर भसीन, मुंबई शहर स्वीप समिती सदस्य आणि एनएसएस जिल्हा समन्वयक  क्रांती उके इंदूरकर, मुंबई विद्यापीठाचे एनएसएस सेलचे ओसडी सुशील शिंदे, चैतन्य प्रभू  ह्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज….

विधानसभा निवडणूक २०२४: विशेष लेख 

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यात एका टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याची निवडणूक यंत्रणा कार्यवाही करत आहे.

राष्ट्रीय कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग  तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक  यांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सोय देण्यात येते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २ लाख ६७ हजार २५० टपाली मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांना टपाली मतदान करता यावे यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत आहे.

निवडणूक  कामासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेव्दारे (postal ballot Paper) मतदान करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र ‘१२’ किंवा ‘१२ अ’ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.तर  संबधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करून मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते. प्रपत्र १२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे.तर १२ ‘ड’ हा ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी उपलब्ध करून  दिला जातो.

निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची व सुरक्षेसाठी तैनात अधिकारी यांची संपूर्ण माहिती  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून तयार  करण्यात येते. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशासोबत संबंधित कर्मचाऱ्यांची आगाऊरित्या माहिती भरलेले (pre- filled) प्रपत्र -१२ व १२-‘अ’ संबंधित  निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येतात.

पोस्टाद्वारे मतदानाचा हक्क बजाऊ इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांनी प्रपत्र-१२ मध्ये आपला मतदान करण्यासाठी असलेला अर्ज संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे, मतदानाच्या तारखेच्या आधी किमान ०७ दिवसांपर्यंत सादर करावा असा नियम आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांच्या पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी संपूर्ण माहिती भरुन सही केलेले प्रपत्र-१२  जमा करुन घेण्यात येते. कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रपत्र-१२ तसेच १२ ‘अ’ चे वितरण व संबंधित कर्मचाऱ्यांकडून भरण्यात आलेल्या प्रपत्रांची माहिती संकलित करण्यात येत असते.

कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रपत्र-१२ विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळे करणे व स्वतंत्र पाकिटांमध्ये त्या त्या मतदारसंघाचे नाव व जिल्ह्याचे नाव लिहून त्यामध्ये ठेवणे, प्राप्त झालेले ‘प्रपत्र-१२’ स्कॅन करुन त्या सोबतच्या प्रपत्र-४ मधील यादीसह त्या – त्या मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमलेल्या समन्वय अधिकारी यांच्याकडे पाठविले जातात.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पुढील ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत  विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी पडताळणी केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका, निवडणूक कर्तव्यार्थ प्रमाणपत्र व त्या सोबतचे आवश्यक प्रपत्र व लिफाफे तयार करणे व संबंधित कर्मचाऱ्यांबाबत मतदार यादीमध्ये (Marked copy) आवश्यक नोंद घेणे आवश्यक असेल.

जिल्हा समन्वय केंद्रास दिलेल्या पहिल्या भेटी वेळी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर चौथ्या दिवशी दि.८ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिताच्या टपाली मतपत्रिका जिल्हा समन्वय अधिकाऱ्याकडे देण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर पाचव्या दिवशी दि.९ नोव्हेंबर २०२४ सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा समन्वय अधिकारी यांनी राज्य स्तरावरील समन्वयन केंद्रामधील (State Clearing Centre) एकत्र येऊन त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभानिहाय टपाली मतपत्रिका तसेच त्या सोबतच्या आवश्यक प्रपत्र व लिफाफ्यांची देवाणघेवाण अन्य जिल्ह्यातील समन्वय अधिकाऱ्यांबरोबर केली जाते. पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे पुरेशा सुरक्षा व्यवस्थेसह रवाना केली जाईल.

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी (दि. १० नोव्हेंबर २०२४ ते १४ नोव्हेंबर २०२४या कालावधीत) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी हे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेण्यात येते. मतदान संपल्यानंतर सुविधा केंद्रामध्ये सर्व मतदारांनी (निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचारी) मतदान केल्यानंतर सुविधा केंद्राच्या प्रमुखाने राजकीय पक्ष अथवा उमेदवार यांच्या उपस्थितीत मतपेट्यांमधील टपाली मतपत्रिका असलेले लिफाफे बाहेर काढून संबंधित विधानसभानिहाय त्याची विभागणी करून ते स्ट्रॉगरुमध्ये ठेवतील.

त्यानंतर मतदानाच्या पाच दिवस आधी  म्हणजे दि. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जिल्हा समन्वय केंद्रात (District Clearing Centre) संबंधित जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या समन्वय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ असलेले स्वतंत्र लिफाफे/बॅग हे त्या त्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय किंवा अन्य जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाकरिता मतदान करण्यात आलेल्या मतपत्रिकांचे लिफाफे संबंधित जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडे सुर्पूद करतील. त्यानंतर मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्य समन्वय केंद्रात सर्व जिल्ह्यांचे जिल्हा समन्वय अधिकारी टपाली मतदान पत्रिका व उशीरा प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ यांचे आदानप्रदान करून व पुन्हा त्यांच्या जिल्ह्याकडे रवाना होतील.

मतदानाच्या तीन दिवस ते एक दिवस आधीपर्यंतचा कालावधी ( १७ नोव्हेंबर २०२४ते १९ नोव्हेंबर २०२४) सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी यांच्या मार्फत मतदान कर्मचाऱ्यांचे तिसऱ्या प्रशिक्षणानंतर राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या दुस-या भेटी वेळी त्या त्या दिवशी प्रशिक्षण केंद्रावरील मतदान सुविधा केंद्रामध्ये (Facilitation Centre) संबंधित कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकांवर मतदान करुन घेतली जाते व दुसऱ्या प्रशिक्षणानंतर मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकांच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही पूर्ण होईल.

राज्य समन्वय केंद्राला दिलेल्या तिसऱ्या भेटीत मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघाचे समन्वय अधिकारी व जिल्हा समन्वय अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील विधानसभा समन्वय अधिकाऱ्यांकडून टपाली मतपत्रिका जमा करुन घेतील व त्या राज्य समन्वय केंद्रामध्ये घेऊन जाणे व तेथे अन्य जिल्ह्यांच्या समन्वय अधिकाऱ्यांशी टपाली मतपत्रिकांचे लिफाफे व बॅग यांचे आदानप्रदान करण्याची कार्यवाही होते.

प्रत्येकाचे मत मोलाचे आहे राज्याची निवडणूक यंत्रणा हे जाणून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही कार्यवाही करत आहे. तरी लोकशाहीच्या उत्सवातील आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या निभावताना कामासोबत मतदान करण्याचीही जबाबदारी पार पाडण्यासाठी ज्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी जरूर मतदान करावे.

०००

  • संध्या गरवारे, विभागीय संपर्क अधिकारी

 

 

मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची नियुक्ती

मुंबई, दि. २३ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १७८ – धारावी, १७९- सायन कोळीवाडा, १८० – वडाळा, १८१- माहीम, १८२ – वरळी या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, १८३ – शिवडी, १८४- भायखळा, १८५ – मलबार हिल, १८६- मुंबादेवी, १८७ – कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रीत यांची भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता आणि अमन प्रीत  यांनी जिल्हा माध्यम संनियंत्रणासाठी माध्यम देखरेख नियंत्रण कक्षास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी माध्यम कक्ष व सी-व्हिजील कक्षातील कामकाजाविषयी माहिती दिली. माध्यम कक्षाद्वारे इलेक्ट्रॉनिक, मुद्रीत व समाजमाध्यमांवर  बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगितले. सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

२८८ विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती

  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

मुंबई, दि. २३ : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून केंद्र निरीक्षक (Central Observer) यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी १३९ सामान्य निरीक्षक (General Observer), ४१ पोलीस निरीक्षक (Police Observer) व ७१ खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९८ टक्के तक्रारी निकाली

१५ ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात ‘सी-व्हिजिल ॲप’(C-Vigil app)वर एकूण १०११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ९९५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९८ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे ‘सी-व्हिजिल ॲप’ (C-Vigil app) हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपव्दारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाव्दारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ४४ कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचे मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा जिल्हानिहाय तपशील :

अ.क्र. जिल्हा एकूण दाखल तक्रारी निवडणूक अधिकारी यांनी निकाली काढलेल्या तक्रारी
1. अहमदनगर ३९ ३९
2. अकोला
3. अमरावती ३२ ३१
4. औरंगाबाद २१ १९
5. बीड
6. भंडारा ११ ११
7. बुलडाणा
8. चंद्रपूर २६ २६
9. धुळे १८ १२
10. गडचिरोली ०० ००
11. गोंदिया
12. हिंगोली १४ १३
13. जळगाव १३ १३
14. जालना १२ १२
15. कोल्हापूर
16. लातूर
17. मुंबई शहर १९ १८
18. मुंबई उपनगर १२७ १२६
19. नागपूर २९ २९
20. नांदेड २८ २८
21. नंदुरबार
22. नाशिक
23. उस्मानाबाद
24. पालघर
25. परभणी
26. पुणे २१४ २११
27. रायगड १० १०
28. रत्नागिरी
29. सांगली ०० ००
30. सातारा २५ २५
31. सिंधुदुर्ग ०० ००
32. सोलापूर ३९ ३९
33. ठाणे २१८ २१७
34. वर्धा
35. वाशिम
36. यवतमाळ ५१ ५१
  एकूण १०११ ९९५

 

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एकूण ३६६ दखलपात्र गुन्हे दाखल झाले आहे. सदर दखलपात्र गुन्ह्यांमध्ये मतदान कर्मचारी, निवडणूक साहित्य (EVM/VVPAT), आचारसंहिता, सोशल मीडिया/फेक न्यूज व इतर बाबींशी संबंधित आहे. या ३६६ गुन्ह्यांपैकी ३६ गुन्हे अंतिम झाले असून ३०६ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत, तसेच १६ गुन्हे तपासाधीन असल्याची माहिती मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

०००

 

आयआयएम नागपूर आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या चर्चासत्राचे राज्यपालांच्या ई-उपस्थितीत उद्घाटन

मुंबई, दि. २३ : नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम नागपूर) यांनी आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावरील एक दिवसीय पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या दूरस्थ उपस्थितीत पार पडले.

या परिषदेला आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित मान्यवर उपस्थित होते.

०००

 

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची  तयारी सुरू आहे.  विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने  दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून आज २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आजपासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून २९ ऑक्टबर नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबर रोजी होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

०००

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/10/Nominations-and-Candidates-Data_as-on-22.10.2024-1.pdf” title=”Nominations and Candidates Data_as on 22.10.2024 (1)”]

 

मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी

मुंबई, दि. २२ : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाल्या की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे,  दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी संजय यादव

सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. मतदान केंद्रांवर मतदाराना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेवून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिट्टीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी, यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

  • निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबचा दिनांक – 22 ऑक्टोबर 2024
  • नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटचा दिनांक – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
  • नामनिर्देशन पत्र छाननी दिनांक – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
  • नामनिर्देशन पत्र परत घेण्याचा शेवटचा दिनांक – 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
  • मतदान – 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार)
  • मतमोजणी – 23 नोव्हेंबर 2024 (शनिवार)

मुंबई शहर जिल्ह्याबाबत माहिती

एकूण मतदान केंद्र – 2 हजार 537

  • उत्तुंग इमारतीमधील (High rise Building) मतदान केंद्र – 156
  • सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र 100,
  • झोपडपट्टी परिसरात मतदान केंद्र 313
  • मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र 75

विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या

धारावी-  2 लाख 61 हजार 012

सायन-कोळीवाडा- 2 लाख 81 हजार 462

वडाळा –  2 लाख 05 हजार 12

माहिम- 2 लाख 25 हजार 415

वरळी –  2 लाख 63 हजार 697

शिवडी-  2 लाख 74 हजार 472

भायखळा- 2 लाख 58 हजार 12

मलबार हिल – 2 लाख 60 हजार 672

मुंबादेवी –   2 लाख 41 हजार 454

कुलाबा – 2 लाख 64 हजार 931

अशी एकूण 25 लाख 36 हजार 139 मतदार संख्या आहे

  • महिला – 11 लाख 72 हजार 944
  • पुरुष- 13 लाख 62 हजार 951
  • तृतीयपंथी 244
  • ज्येष्ठ नागरिक (85+) 54 हजार 033
  • नवमतदार संख्या (18-19 वर्ष) 38 हजार 325
  • दिव्यांग मतदार – 6 हजार 344
  • सर्व्हीस वोटर – 392
  • अनिवासी भारतीय मतदार – 406

मतदारांच्या माहितीसाठी

https://voters.eci.gov.in/  या संकेतस्थळावरुन मतदार यादीतील नावासंदर्भात माहिती उपलब्ध आहे या संकेत स्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी  हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

Voter helpline App – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल. KYC App-  उमेदवारांबाबत माहिती या app वर उपलब्ध होऊ शकेल. C vigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करता येते त्यानंतर त्यावर केलेल्या कारवाईची माहिती  100 मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते. जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्र.-  022-2082 2781, निवडणूक नियंत्रण कक्ष – 7977363304

सुविधा पोर्टल

उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरण्याकरता व निवडणूकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या मिळणेसाठी अर्ज करण्याकरिता सुविधा या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

C-Vigil app

दि.15 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत  सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 14 तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर NGSP पोर्टलवर 101 तक्रारी प्राप्त झाल्या असून 67 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा

प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक  फलक लावण्यात येणार आहेत.

मनुष्यबळ

मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघ असून एकूण 2537 मतदान केंद्र आहेत. ह्या मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे 2537 बीएलओ आहेत. एकूण 364 क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास 12 हजार 500 पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.

मतदारांना आवाहन

प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात येत आहे. नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी, एसएमएस, व्हाट्सअप अशा माध्यमातून संपर्क करण्यात येवून मतदार केंद्राची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...