मंगळवार, मे 6, 2025
Home Blog Page 368

महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार

मुंबई, दि. १० : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवनचरित्रावर आधारित एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित भव्य चित्ररथाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या जीवनकार्यावर आधारित विद्वत्त परिषदेचे आयोजन कोल्हापूर विद्यापीठामध्ये करण्यात येणार आहे. तसेच महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षाचा भाग म्हणून राज्यात सहा महसुली विभागात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रयोगात्मक कलेच्या माध्यमातून महाराणी ताराराणी यांच्या जीवन चरित्राचे सादरीकरण जनसामान्यांपुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची असून मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाचे भव्य सादरीकरण होणार आहे.

या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे  संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

आदिवासी बांधवांसाठी सावऱ्या दिगरचा पूल ठरेल विकासाचा सेतू – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 12 ऑक्टोंबर, 2024 (जिमाका वृत्त) – शासनाच्या आदिवासी विकास विभागाने बिलगांव ते सावऱ्या दिगर येथील पुलासाठी 45 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे येत्या एक ते दीड वर्षात हा पूल पूर्णत्वास येऊन, या अतिदुर्गम भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांसाठी हा पूल विकासाचा सेतू ठरेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या बारा वर्षांपासून  निधीअभावी रखडलेल्या बिलगाव ते सावऱ्या दिगर येथील उदई नदीवरील पूल आणि बोधी नाल्यावरच्या पुलांच्या कामाचे भूमिपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी माजी खासदार डॉ हिना गावित,  बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कुणाल पावरा, विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता जगदिश पावरा, तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा , सुभाष पावरा , शिवाजी पराडके, राड्या पावरा , जोमा पावरा, दिलीप सरंपच, खुशाल पावरा, लितिश मोरे, हिरालाल काळूसिंग  यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यातील अतिदुर्मग भाग असलेल्या सावऱ्या दिगरच्या पुलाचे काम गेल्या अनेक वंर्षापासून निधी अभावी रखडले होते. 2012 साली मान्यता मिळालेल्या या पुलासाठी भरीव निधीची गरज होती. मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागातूना यासाठी 45 कोटींच्या भरीव निधीला मान्यता देत या कामाची निविदा प्रक्रीया देखील पुर्ण केली. त्यांच्या हस्ते या रखडलेल्या पुलाचे काम महिन्या  दिड महिन्यात सुरु होणार आहे. या 45 कोटींमध्ये या भागातील उदई नदीवरील सावऱ्या दिगरच्या पुलासह बोधी नाल्यावरच्या पुलाचे काम देखील होणार आहे. मुळातच या पुलाअभावी या भागातील 08 गाव आणि अनेक पाड्यातील लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. आरोग्य यंत्रणेला देखील याठिकाणी पोहचण्यात मोठी अडसर निर्माण होत होती. तर पावसाळ्यात पाणी आल्याने या भागाती गावांचा संपर्क तुटत असल्याने महसुल यंत्रणेला देखील स्वस्त धान्य दुकानाचे चार महिन्याचे रेशन एकाचवेळी गावात पोहचवून ठेवावे लागत होते. त्यामुळे या गाव परिसरातील नागरीकांनी या पुलाच्या बांधकामासाठी आदिवासी विकांसमंत्री यांनी साकडे घातले होते.

या पुलाच्या उद्घाटनावेळी हा पुल या भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांना शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकास सेतू म्हणून उपयोगात येईल असा विश्वास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केला. या भागातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्यातील शासन कटीबद्ध असून आदिवासी बांधवांना मागेल ती योजना देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचेही यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले. या पुलाप्रमाणेच या भागातील रस्ते आणि विद्युतीकरणासाठी देखील मोठी निधी मंजुर करुन दिला असून येत्या दोन तीन महिन्यात अनेक वाड्या- पाड्यांपर्यत  वीज पोहचून वीज समस्येचे निराकरणे होईल असा विश्वास देखील मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी येथील नागरिकांना दिला.

या पुलामुळे या भागातल्या सावऱ्या दिगर, बमाना, उडद्या, खोपरगाव. मांजरी, मुखानी, बादल अशा मोठ्या गावांना जाण्याचा जवळचा मार्ग प्रस्थापित होणार असल्याने या ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाचा प्रवास सुकर होणार असल्याचे यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या.  आश्रमशाळांच्या बळकीटकरणातून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सोईसुविधांयुक्त शिक्षण, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी घरकुल, लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, शबरी महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या हाताला काम, अशा विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे देखील यावेळी  माजी खासदार डॉ हिना गावित म्हणाल्या.

‘महाप्रीत’ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १२ :- महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौ‌द्योगिकी मर्यादित (महाप्रीत) ने राज्यात परवडणारी घरे, सौरऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील बदलाचे नेतृत्व करावे. ‘महाप्रीत’च्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या विविध प्रकल्पांची कामे जलद आणि दर्जेदार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

‘महाप्रीत’च्या संचालक मंडळाची २५ वी बैठक मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. ११ ऑक्टोबर) संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्यासह संचालक मंडळाचे इतर विभागीय प्रतिनिधी आणि ‘महाप्रीत’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की ‘महाप्रीत’च्या माध्यमातून ठाणे शहरात क्लस्टर प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. यामुळे पुनर्वसनासाठी हजारो परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत. यातून अनेकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रात महाप्रीत राज्यात आणि परराज्यात चांगले काम करत आहे. मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना अंतर्गत साकारणाऱ्या प्रकल्पामुळे राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांना अक्षय ऊर्जा उपलब्ध होणार आहे. सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगतच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे ऊर्जा निर्मिती करून या महामार्गाच्या वैशिष्ट्यात भर पडणार आहे. गोवा ऊर्जा विकास अभिसरणासाठी सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची संधी ‘महाप्रीत’ला मिळाली आहे. ही संधी म्हणजे ‘महाप्रीत’च्या जागतिक दर्जाच्या कामाची पावती आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत महाप्रीत संचालक मंडळाने विविध प्रस्तावांवर मंजूर केला त्यात प्रामुख्याने १) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यक्रमातील घटक ज्यात किसन नगर ठाणे येथील दोन मोकळ्या जमिनींवर सुमारे १ हजार ६५० कोटींच्या ५ हजार २१३ पुनर्वसन निवासी युनिट्सचे बांधकाम, २) ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट अँड एरिया इम्प्रूव्हमेंट कंपनी लिमिटेड या एसपीव्हीची ठाणे येथील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निर्मिती, ३) पीपीपी मॉडेल अंतर्गत ठाण्यातील किसान नगर, कोपरी आणि लोकमान्य नगर येथील क्लस्टर्सच्या विकासास मान्यता, ४) महाराष्ट्र केमिकल लॉजिस्टिक पार्क (MCLP) साठी पीडीएमसीच्या नियुक्तीला मंजुरी १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन अंदाजे १ हजार ३७२ कोटी, ५) महाप्रीत द्वारे AIF ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी १० हजार कोटींच्या निधी उभारणीसाठी मान्यता, ६) “मुख्यमंत्री लघु उ‌द्योग सौर छत योजना (एम.एल.एस. वाय.) अंतर्गत राज्यातील १० हजार लघु आणि मध्यम औ‌द्योगिक घटकांसाठी एमएसएमई क्षेत्रासाठी ४०० मेगावॅट क्षमतेच्या भारतातील सर्वात मोठ्या रूफ टॉप सोलार योजनेपैकी एक अस्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.

सोबतच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी सौर प्रकल्पांसाठी MSRDC सोबत JVA करण्याचे निर्देश तसेच NTPC ग्रीन सोबत JVA ला 10GW च्या अक्षयऊर्जा प्रकल्पांसाठी पुढील कार्यवाहीसाठी आणि गोवा शासनाचे गोवा ऊर्जा विकास अभिसरण साठी ३० MW सौर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत डिसेंबर २०२३ मध्ये दावोस येथे करण्यात आलेल्या सौर, पवन-सौर संकरित प्रकल्प, AI प्रकल्पाच्या विविध  प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाप्रीत’ला देण्यात आलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व भिवंडी आणि चंद्रपूर, यवतमाळ येथे प्रधानमंत्री आवास योजना या प्रकल्पांची माहिती मंडळाला देण्यात आली.

विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक 12 – राज्य शासनामार्फत समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी योजना राबविल्या जात आहेत. महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मोफत उच्च शिक्षण अशा विविध योजना राबविल्या जात असून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास हातभार लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कुर्ला विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले. तत्पूर्वी बंटर भवन कुर्ला येथे शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र उद्योग तसेच परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात महिलांबरोबरच शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी देखील विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद होणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ऑनलाईन भूमिपूजन तसेच लोकार्पण झालेले प्रकल्प

छेडा नगर उड्डाण पुलाचे लोकार्पण. पूर्व द्रुतगती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर पासून ते यु टर्न करिता प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. चुनाभट्टी रेल्वे फाटक वरून प्रस्तावित असलेल्या पुलाचे भूमिपूजन. कुर्ला विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. चुनाभट्टी प्रवेशद्वार व इतर कामाचे लोकार्पण. कामराज क्रीडांगणाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण.

टिळक नगर येथील हनुमान मंदिर उद्यान नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण. नेहरूनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मधील नाना नानी पार्क व बालोद्यान याचे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ. कुर्ला विधानसभेमधील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ. नेहरूनगर टिळक नगर या म्हाडा वसाहती मधील दुसऱ्या टप्प्यातील मला निसारण महिन्यांच्या कामाचे शुभारंभ. कुर्ला पूर्व रेल्वे स्थानकाजवळ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे लोकार्पण.

00000

जळकोट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

लातूर, दि. ११ : बाराव्या शतकात सामाजिक समतेचा संदेश देणारे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच सर्व समाज घटकांना सोबत घेवून विकास कामे राबविण्यावर आपला भर असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. जळकोट येथे महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी आमदार गोविंद केंद्रे, नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, तहसीलदार राजेश लांडगे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. कोरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण यांच्यासह हावगीस्वामी मठाचे डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, बस्वलिंग शिवाचार्य महाराज आदी उपस्थित होते.

महात्मा बसवेश्वरांचे विचार युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. जळकोट येथे उभारण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यामुळे सर्वांना त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल. उदगीर, जळकोट तालुक्यात विविध विकास कामे राबविताना आपण सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे ना. बनसोडे यावेळी म्हणाले. जळकोट येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला एकाच दिवशी निधी मंजूर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी बस स्थानक परिसरात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आजच या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याचे ना. बनसोडे म्हणाले.

उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये दळणवळण, सिंचन, वीज, आरोग्य सुविधांची निर्मिती करून येथील नागरिकांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे. याठिकाणी उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उदगीर येथे भविष्यात वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ उभारणीचे आपले ध्येय असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु केल्याचे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा दीड हजार रुपये लाभ देण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात ही रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल. यासोबतच युवकांना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्यावेतन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांना साडेसात एचपी पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचाही निर्णय शासनाने घेतला असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले.

जळकोट, उदगीर तालुक्यात झालेल्या पायाभूत सुविधा निर्मितीमुळे दोन्ही तालुक्यांचा चेहरा-मोहरा बदलला असल्याचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी सांगितले. तर जळकोट नगरपंचायत इमारत, शहरातील रस्ते व विविध विकास कामांना ना. बनसोडे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे यांनी आभार मानले.

डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज आणि विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

०००००

घोणसी तांडा येथे साठवण तलावाचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन

लातूर, दि. 11 : जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा (खंबाळवाडी) येथे जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाची निर्मिती केली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झाले.

जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. श्याम डावळे यांच्यासह स्थानिक सरपंच, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

घोणसी तांडा (खंबाळवाडी) साठवण तलाव हा खंबाळवाडी गावाजवळून वाहणाऱ्या गोदावरी उपखोऱ्यातील स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. या तलावाच्या निर्मितीसाठी 15 कोटी 36 लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

घोणसी तांडा (खंबाळवाडी) या साठवण तलावामुळे 22.50 हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार असून परिसरातील 311 हेक्टर क्षेत्रास सिंचनाची सुविधा निर्माण होणार आहे. यासोबतच परीसरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सिंचनाची सुविधा निर्माण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास क्रीडामंत्री ना. बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.

००००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दसरा-विजयादशमीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ११ :- यंदाची विजयादशमी आपल्या सर्वांच्या जीवनात यश, किर्ती, सुख, समृद्धी, आरोग्य, आनंद, उत्साह घेऊन येवो. राज्यावरील नैसर्गिक संकटे तसंच समाजातील अज्ञान, अन्याय, अंधश्रद्धा दूर होवोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दसरा, विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची, स्नेहाची लयलूट करण्याचा सण आहे. विजयादशमी म्हणजे समाजातील दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तींचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. असत्यावर सत्याने, अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने, अशाश्वतावर शाश्वताने विजय मिळवण्यासाठी कटिबद्ध होण्याचा दिवस आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, हा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. दसऱ्याच्या दिवशी आपण धन, ज्ञान, भक्ती, शक्तीची पूजा करतो. नवरात्रीच्या पवित्र पर्वानंतर येणारा दसरा हा सण आपल्या गौरवशाली संस्कृतीचे एक प्रतीक आहे. हा चैतन्यदायी सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात निश्चितपणे आनंद घेऊन येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील बळीराजा, महिला, युवक यांच्यासह वंचित-उपेक्षितांच्या आयुष्यात सुखाचे, आनंदाचे दिवस यावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. विविध घटकांसाठी शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. यंदाच्या दसऱ्याच्या निमित्तानं राज्याच्या हितासाठी, सर्व समाजघटकांच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येऊया. राज्य शासनाने सुरु केलेल्या लोकहिताच्या योजना पात्र घटकांपर्यंत पोहोचविण्याठी प्रयत्न करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.

०००००

जामनेरमध्ये भव्य शिवसृष्टी आणि भीमसृष्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार स्मिता वाघ, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची उपस्थिती

जळगाव दि. 11 ( जिमाका ) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कार्य आणि विचाराची प्रेरणा घेवूनच आम्ही काम करतो. घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची ओळख संविधानातून करून दिली. अशा दोन आदर्श युगपुरुषांचे अत्यंत भव्य स्मारकं जामनेर मध्ये झाली, याचा आपल्याला आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जामनेर येथील सोनबर्डी टेकडी परिसर विकास अंतर्गत शिवस्मारक (शिवसृष्टी) आणि भीमस्मारक ( भीमसृष्टी ) लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, खा. स्मिता वाघ, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आ. सुरेश ( राजू मामा) भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जामनेर शहरात जी भव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीमसृष्टी आपण निर्माण केली आहे. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देव, देश आणि धर्मावर सातत्याने आक्रमण होत असताना, महिलांची विटंबना होत असताना.  सर्व सामर्थ्याने लढा देऊन रक्षण केले आणि स्वराज्य स्थापन केले. अशा आपल्या राज्यांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष असताना अशी भव्य शिवसृष्टी निर्माण केली हे अत्यंत आनंददायी आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य काय असतात हे संविधानातून दाखवून दिले. अशा या महामानवाच्या विचाराचे सदैव स्मरण करू देणारी भीमसृष्टी उभी केली.

या शासनाने शेतकऱ्यांच्या , कष्टकऱ्यांच्या,महिलांच्या जीवनात बदल करण्यासाठी योजना आखल्या म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या विचाराने वाटचाल करत आहोत आणि पुढेही असेच काम करत राहू असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे हे आम्हा जामनेरकरांचे स्वप्न होते ते आज पूर्णत्वास आले असून थोड्याच दिवसात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह, अहिल्यादेवी होळकर, महाराणा प्रताप, वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक तसेच संत सेवालाल महाराज यांची सृष्टी तयार करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

यावेळी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी जामनेर शहरात उभे असलेले दोन्ही स्मारकं आणि जामनेर तालुक्याचा झपाट्याने होणाऱ्या विकास यावेळी अधोरेखित केला. खा.छत्रपती उदयनराजे भोसले आणि आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनीही ग्रामविकास मंत्री यांच्या कार्याचे कौतुक करून भव्य स्मारक उभं केल्याबद्दल अभिनंदन करून सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

कशी आहे शिवसृष्टी

▪️छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधिष्ठीत पूर्णाकृती साधारणतः १६ फुट उंचीचा ब्रांझ धातुचा पुतळा व सिहासन ३२ फुट आहे

▪️हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाच्या नगारखानासहित वाड्याची भव्यदिव्य प्रतिकृती साकार केली आहे.

▪️या मराठामोळ्या शैलीच्या वाड्याची लांबी १०० फूट आहे आणि यात तळ मजल्यावर १२ खांब आणि पहिल्या मजल्यावर २४ खांब आहेत. वाड्याच्या बाजूच्या भिंतीची लांबी ५० फूट असून उंची वाड्याची तटबंदी धरून साधारण ३८ फूट आहे.

कशी आहे भीमसृष्टी

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती साधारणतः १५ फुट उंचीची संविधान घेतलेली आणि राष्ट्राला उद्देश करत असलेली ही पूर्णाकृती भव्य मूर्ती साकार केली आहे.

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या २४ मुद्रा या त्यांना असलेल्या २४ उपाध्यांसहित कायमस्वरूपी अशा स्टील प्लेट्सवर महान विभूती गौतम बुद्धांच्या बोधिवृक्षाच्या पिंपळ पानांवर केल्या आहेत.

▪️डॉ. बाबासाहेबांच्या मूर्तीमागे संविधान चक्र केले असून त्यामागे बोधिवृक्ष साकार केला आहे. यातून महान गौतम बुद्धांच्या आशीर्वादाचे प्रतिबिंब आपल्याला दिसते.

00000

महोदय ! आपण आमच्या भावना जाणून घेताहेत याचा आनंद आहे…

नांदेड दि. ११:  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज शेतकरी, कामगार, खेळाडू, उद्योगपती, व्यावसायिक, पत्रकार, अधिकारी-कर्मचारी, तृतीयपंथीय, सामाजिक संघटना, संस्था अशा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद साधला. अडीच तास ते ऐकत होते. काय करता येईल यावर उपाय सांगत होते. बदल घडविण्याचे उपाय करण्याचे सूतोवाच करत होते. त्यामुळे अनेक शिष्टमंडळांनी राज्यपाल सारख्या पदावरील व्यक्तीने आम्हाला शांततेने ऐकून घेतल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया दिली.

राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज संवाद कार्यक्रमासाठी अमरावतीवरून विमानाने नांदेड विमानतळावर सायंकाळी 5 वा. दाखल झाले. याठिकाणी त्यांना मानवंदना देण्यात आली. नांदेड येथील शासकीय विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांनी लगेच संवाद कार्यक्रमाला सुरूवात केली. सर्वप्रथम नांदेड येथील खासदार तसेच यापूर्वीच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. या संवादाला राज्यसभेचे सदस्य तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार भिमराव केराम, माजी खासदार व्यंकटेश काब्दे, माजी आमदार गंगाधरराव पटने यांची उपस्थिती होती. या शिवाय विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

या शिष्टमंडळाने पिकविमा योजनेच्या व्याप्तीमध्ये व प्रभावात वाढ करण्यात यावी. नांदेड येथून मुंबई विमान प्रवासाची सुविधा, नांदेड-लातूर, नांदेड-बिदर रेल्वे, आदिवासी भागातील विकासाला वनविभागाच्या कायदाचा अडसड, लेंडी प्रकल्पाचे दीर्घकाळापासून रेंगाळणे, बाभळी बंधाऱ्याचा मोबदला न मिळणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे, मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅजेटचा आधार घेणे, नदीकाठच्या गावांमध्ये बाबु उत्पादन वाढविणे, मुस्लिमांना शिक्षणाच्या संधीमध्ये आरक्षण देणे, धार्मिक भावना भडकविणारी व्यक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करणे तसेच मोठ्या उद्योग समुहांना नांदेडमध्ये आमंत्रित करावे अशा विविध विषयांची मांडणी यावेळी केली.

दुसरे शिष्टमंडळ शासकीय अधिकाऱ्यांचे भेटले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील विविध योजनांची सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, गृहनिर्माण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, महिलांच्या योजना  यासंदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने विभागीय आयुक्त दिलीप गावडे, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

तिसरे शिष्टमंडळ हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तसेच विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी होते. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी विविध समस्या मांडल्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून तर गोशाळेला मिळणारे अनुदान गोपालकांना का नाही अशा पद्धतीचे अनेक प्रश्न चर्चेला आले. त्यानंतर वैद्यकीय व्यवसायातील वरिष्ठ व नामांकित डॉक्टरांचे पथकाने या व्यवसाय व नांदेड मधील समस्या व त्यावरील उपाययोजनेवर चर्चा केली. त्यानंतर उद्योग व्यवसायातील मान्यवरांनी आपल्या समस्या व मागण्या सादर केल्या. नांदेड जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधीत्व देणाऱ्या विविध मान्यवरांशी देखील राज्यपालांनी चर्चा केली. पॅरॉऑलिम्पिक मधील प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळांडूसोबत राज्यपालांनी यावेळी फोटोही घेतले.

माध्यम प्रतिनिधींसोबत राज्यपालांची चर्चा झाली. विद्यापिठातील वेगवेगळे अध्यासन, वैधानिक विकास मंडळाची स्थापना, आदिवासींच्या समस्या, रेल्वेमधील बंद झालेले आरक्षण, मुस्लिमांसाठी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, ग्रामीण पत्रकारांसाठी गृहनिर्माण योजना, कम्युनिटी किचन आदी विषयांवर राज्यपालांशी पत्रकारांनी चर्चा केली. यामध्ये नांदेड येथील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील प्रातिनिधीक सहभागात मान्यवर माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते. राज्यपालांच्या या बैठकीमध्ये माध्यम प्रतिनिधींनी राज्यपालांच्या संवाद कार्यक्रमाबद्दल कौतूक केले.

सामान्य माणसासाठी संवाद

सामान्य माणसाला मुंबईमध्ये भेटण्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे विविध क्षेत्रातील प्रातिनिधीक मंडळींना त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन भेटण्याचा अशा संवादातून आनंद मिळतो. समस्या कळतात. राज्य शासनाला काही बाबी लक्षात आणून देता येतात. राज्यपालांच्या अधिकारामध्ये असणाऱ्या बाबींची अंमलबजावणी करता येते. त्यामुळे हा संवाद कार्यक्रम सुरू केला आहे, असे राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केले. नांदेडमधील जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी यावेळी कौतुक केले.

जिल्हाधिकारी झाले अनुवादक

राज्यपालांना मराठी व हिंदीमध्ये संवाद साधण्यास अडचण भासू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत अनुवादकाच्या भुमिकेत आले होते. राज्यपालांना प्रत्येकाला आपल्या भाषेतच संवाद साधण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी, राज्यपाल आणि इंग्रजी शिवाय अन्य भाषेमध्ये संवाद साधणाऱ्या जनतेतील सेतू झाले होते.

०००

नांदेड विमानतळावर राज्यपालांचे स्वागत

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे नांदेडच्या गुरुगोविंद सिंघजी विमानतळावर सायंकाळी ५ वा. आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी विमानतळावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगांवकर आदींची उपस्थिती होती. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली.

०००

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची १२ व १४ ऑक्टोबर रोजी मुलाखत

मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात बाष्पके संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम या विषयावर बाष्पके संचालनालयाचे सहसंचालक गजानन वानखेडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्र हे बाष्पक उत्पादन क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. बाष्पक सयंत्र हे वाफेशी संबंधित आहे. हे ऑईल मिल, वस्त्र उद्योग, रासायनिक उद्योग, पेट्रोकेमिकल्स, रिफायनरिज (कच्चे खनिज तेल), दुग्ध/खादय व्यवसाय, हॉटेल उद्योग, विजनिर्मिती इत्यादीसाठी वापरले जाते. या सर्व उद्योगात बाष्पकांची गरज भासते. बाष्पक हे अत्यंत उपयोगी जरी असले तरी त्याच्या स्फोटकतेमुळे ते धोकादायकही ठरु शकते. यासाठी शासनस्तरावर बाष्पके संचालनालयामार्फत घेतलेले धोरणात्मक निर्णय, बाष्पकांच्या सुरक्षित व प्रभावी वापराकरिता जनजागृती, तसेच बाष्पकं हाताळतांना जिवीत व वित्तहानी होवू नये याकरिताचे प्रयत्न याबाबत सहसंचालक श्री. वानखेडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 12 आणि सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक श्वेता शेलगावकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

केशव करंदीकर/वससं/

ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसाय विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
पुणे, दि. 5: राज्यातील मत्स्यव्यवसाय विभाग महत्त्वाचा विभाग असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्रिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्पन्नवाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य...

‘एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष

0
मुंबई, दि. ०५: ‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी...

 जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा...

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका): नागरिकांना चांगल्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  परभणी मनपा आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांनी आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यावर भर...

‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

0
परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी...