मंगळवार, जून 3, 2025
Home Blog Page 290

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ३१:  बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार असून आज माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत.

पालकमंत्री ॲड. शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनसंरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन, उपसंचालक रेवती कुलकर्णी, सहाय्यक वनरक्षक सुधीर सोनवणे, मुख्य सुरक्षा अधिकारी योगेश महाजन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आले असून त्यांचे पालन करण्यात येत आहे. मात्र, पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे ३० हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 5 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात 20 लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी मंत्री ॲड.शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले.

दरम्यान, याबाबत आढावा घेतल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी या क्षेत्रात नवी बिबट्याची सफारी सुरू करा, त्यासाठी लागणारा निधी वन खाते आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

‘भारत, भारती’ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक!

या उद्यानात ‘भारत आणि भारती’ हे तीन वर्षाचे दोन सिंह नुकतेच 26 जानेवारीला गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री ॲड. शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च मंत्री ॲड.शेलार वैयक्तिकरित्या करणार आहेत.

४११ जणांना सुरक्षा कवच

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 400 वन मजूर असून ते उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता तसेच वन्य प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून सतत गस्तीचे काम करतात. यातील बहुसंख्य हे आदिवासी बांधव आहेत.

तर मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी 11 जणांची टीम असून या सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब मंत्री ॲड. शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले व या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

०००

संजय ओरके/विसंअ

प्रत्येक विभागाने ई ऑफिस प्रणालीचा वापर करावा- पालक सचिव एकनाथ डवले

नाशिकदि. ३१ (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय विभागाने ई ऑफिस या संगणक प्रणालीचा वापर करतानाच १०० दिवसांच्या कार्यक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी येथे  दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज सकाळी पालक सचिव श्री. डवले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे आदी उपस्थित होते.

पालक सचिव श्री. डवले म्हणाले की, ई ऑफिस प्रणाली वापरास अत्यंत सुलभ आहे. त्याबरोबरच प्रत्येक विभागाला १०० दिवसांच्या कार्यक्रमांचे उद्दिष्ट मिळाले आहे. त्याअंतर्गत दिलेल्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेटीवर अधिक भर द्यावा. जिल्ह्यात गुंतवणूक वाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे उद्योजकांसमवेत संवाद साधत उद्योगांना भेटी द्याव्यात. जिल्हा उद्योग मित्र समितीची नियमितपणे बैठक घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

तसेच संकेतस्थळांचे अद्ययावतीकरण, कार्यालयीन सुविधांचे अद्ययावतीकरण, अभिलेखांची वर्गवारी, पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी पालक सचिव श्री. डवले यांनी पशुसंवर्धन, ग्रामविकास, कृषी, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदासह विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी ई ऑफिस प्रणालीच्या वापरासाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याची सूचना दिली. जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी १०० दिवस अंमलबजावणी कार्यक्रमाची सविस्तर माहिती देतानाच आपले सरकार पोर्टल, उद्योग स्नेही धोरण, सातबारा उतारावरील कालबाह्य बोजा उतरविणे, ई ऑफिस, ई फेरफार नोंदींची माहिती दिली.

सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा

पालक सचिव श्री. डवले यांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेऊन संबंधित विभागांनी नियोजन करावे. आवश्यक कामांना आतापासूनच सुरुवात करावी. सीसीटीव्ही यंत्रणा एआय आधारित असावी, असे सांगितले. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००००

विकासकार्यातून दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींचे जतन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगलीदि. ३१ (जि. मा. का.) : उच्च पदावर असूनही दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी सर्वसामान्य माणसाचे दुःख सदैव समजून घेतले. विद्यार्थ्यांनी त्यांचा नम्रपणा हा गुण घ्यावा. विकास कार्यातून अनिल बाबर यांच्या स्मृती चिरंतन जपल्या जातील, अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

विटा येथे बाबर कुटुंबीयांच्या निवासस्थानी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर एका शाळेत आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्यांनी दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

यावेळी आमदार सुहास बाबरअमोल बाबर व बाबर परिवारातील सदस्यमकरंद देशपांडेमोहन व्हनखंडेविटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोदराव गुळवणीशिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्या डॉ. मेघा गुळवणीदेवदत्त राजोपाध्येमाजी नगरसेवक अनिलअप्पा बाबर आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेदिवंगत आमदार अनिल बाबर यांनी मतदारसंघात केलेली विविध विकासकामे पुढील पिढ्यांना उपयोगी ठरतील. त्यांच्या वारशाचे जतन व्हावे. कार्यमग्न राहणेसर्वसामान्य माणसाबद्दल आपुलकी या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या गुणांचा आदर्श घ्यावाअसे ते म्हणाले.

बाबर यांच्या निवासस्थानी कलाशिक्षक शशिकांत आलदर यांनी रेखाटलेल्या दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या चित्राचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

०००००

खेळाडुवृत्तीचे प्रदर्शन करा व विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नागपूर, दि.३१ : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा, आयुष्यात शरीर सदृढ ठेवा, व्यसनापासून दूर रहा आणि जलसंपदा विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा, असा संदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या रवि नगर येथील क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-२०२५ चे उद्घाटन श्री. महाजन यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या एकूण ९ विभागांचे १६०० खेळाडू सहभागी झाले असून २ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्यातील उद्योग, शेती, उर्जा प्रकल्प आदिंना पाणी पुरवठा करण्याची महत्वाची भूमिका जलसंपदा विभाग पार पाडत आहे. विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे करता येते. त्याकरिता त्यांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, आहार, विहार गरजेचा आहे. तसेच व्यसनापासून दूर राहणे तेवढेच महत्वाचे आहे. हे लक्षात घेवूनच या विभागाचा मंत्री म्हणून २०१७ मध्ये छत्रपती संभाजी नगर येथे जलसंपदा विभागाची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. स्वत: एक उत्तम खेळाडू असून गेल्या जवळपास ४० वर्षांच्या राजकीय जीवनातील व्यस्ततेतही नियमीत व्यायाम करतो व व्यसनापासून दूर असल्याचे सांगून त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शासकीय नोकरीमध्ये कामासोबतच खेळाला असलेल्या महत्वाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या आंतरविभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेमध्ये जिंकण्याची इच्छाशक्ती शेवटपर्यंत कायम ठेवून खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा, असा संदेश अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिला.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गिताने झाली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चोपडे यांनी क्रीडा शपथ दिली. सचिव संजय बेलसरे यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी सूत्रसंचलन केले तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, श्री.महाजन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. पोलीस बँड पथकाच्या तालावर दहा संघांनी यावेळी पथ संचलन केले. यात मंत्रालय मुंबई संघ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर, तापी पाट बंधारे विकास महामंडळ जळगाव, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक, यांत्रिकी पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणे, गुणनियंत्रण, जलविद्युत, मुख्यलेखा परीक्षक, जल व सिंचन छत्रपती संभाजीनगर, स्वेच्छेने सहभागी झालेले शेगाव येथील गजानन महाराज संस्थेचे सेवेकरी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अशा १० संघांचा समावेश होता.

शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर श्री.महाजन यांच्या हस्ते १०० मिटर धावण्याच्या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून या आयोजनातील पहिल्या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेत सहभागी १६०० खेळाडुंपैकी ५५० महिला खेळाडू असून क्रिकेट, कबड्डी, व्हॉली बॉल आदी क्रीडा स्पर्धांसह गायन, संगीत, नाटक, एकांकिका, छायाचित्र आदी सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.

0000

१०० दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे, दि. 30: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, नागरिकांना विश्वासात घेत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. यासंबंधात आलेल्या सूचनाही विचारात घ्यावात, 100 दिवसाच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

विधानभवन येथे आयोजित वाहतूक समस्येबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्वांनी वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पुढाकार घ्यावा. रस्त्यावरील अतिक्रमणाची ठिकाणे निश्चित करुन महानगरपालिकेने ते अतिक्रमण तात्काळ काढावेत, रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी आवश्यक भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती द्यावी. याकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलीस विभागाची मदत घ्यावी. याकरिता अत्याधुनिक साधने, कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (एआय) नवनवीन तंत्रज्ञानाची तसेच या विषयाशी निगडीत तज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्यावी. भूसंपादनाची प्रलंबित असलेली न्यायालयीन प्रकरणे मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता पुणे महागरपालिकेकडे असलेली वाहतूक सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तातरीत करावी. नवले पुलाचे प्रलंबित कामे गतीने पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी कार्यालयातील वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पोलीस आयुक्ताकडे वर्ग करावी, अशाही सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

अहिल्यानगर व सोलापूर महामार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रव्हॅल्स थांब्याकरीता जागा निश्चित कराव्यात. सुरक्षितेतच्यादृष्टीने त्याठिकाणी सीसीटिव्ही, वीज आणि शौचालय, पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी.

चाकण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याकरीता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने मिळून कार्यवाही करावी. वाहतूक सुरळीत राहण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधा उभाराव्यात. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही श्री. पवार म्हणाले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, खासदार श्रीमती कुलकर्णी यांनी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबत अनधिकृत अतिक्रमण काढण्याची सूचना केली. आमदार श्री. तापकीर, श्री. शिवतारे, श्री. पठारे यांनी वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत सूचना केल्या.

श्री. हर्डीकर म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्याकरीता मेट्रो पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी पीएमपीएलच्या बसेसच्या फेऱ्यामध्ये वाढ करावी लागेल. नागरिकांना परवडेल असे भाडेदरात आकारणी करावी लागेल, असे श्री. हर्डीकर म्हणाले.

पोलीस आयुक्त श्री. कुमार म्हणाले, आगामी काळात होणारी लोकसंख्येतील वाढ व रस्त्यांची रुंदी विचारात घेता शहरात वाघोली, सोलापूर मार्गासह विविध भागात थांबणाऱ्या ट्रॅव्हल्सकरीता धोरण राबविणे गरजेचे आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यावर भर असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

डॉ. भोसले म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडण्याकरीता बैठकीत दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याकरीता सर्व संबंधित यंत्रणेला विचारात घेवून प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात येतील.

श्री. म्हसे म्हणाले, वाहतूकीच्यादृष्टीने पीएमआरडीएच्यावतीने शहर परिसरात मल्टीमोडल हब विकास आराखड्याअंतर्गत कामे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

श्री. शेखर सिंह आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक कोंडी तसेच ती सोडविण्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करुन माहिती दिली.
0000

लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करुन सूचना कळवाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.३० : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामेट्रोकडून सादर केलेल्या पुढील ३० वर्षाच्या १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यामध्ये काही बदल, सूचना असल्यास सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या ७ ते १० दिवसांमध्ये महामेट्रोला लेखी स्वरुपात कळवाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगर प्रभाव क्षेत्रातील सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करणे व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार अमित गोरखे, चेतन तुपे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोकप्रतिनिधींना मेट्रोने सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करुन त्यांना वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल त्यासाठी नवीन मार्ग, पर्यायी रस्ते आदींबाबत मेट्रोकडे सूचना कळवाव्यात. महामेट्रोकडून त्याबाबत तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यता तपासून आवश्यकतेप्रमाणे आराखड्यात बदल करण्यात येतील.

यावेळी श्री. हर्डीकर यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत हिंजवडी ते जिल्हा न्यायालय, पिंपरी चिंचवड ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मार्गावर नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन, बीआरटी व रेल्वे लाईन, मांगडेवाडी, कदम वस्ती, लोणीकंद व मोशी या ठिकाणी नवीन बस टर्मीनल, कोथरुड, कात्रज, हडपसर, मार्केटयार्ड व पिंपरी बस डेपोचा पुनर्विकास, पूलगेट, चिंचवड, भोसरी, निगडी, मुखई चौक, चिखली, वाघोली, रांजणगाव, तळेगाव व चाकण येथील जुन्या बस टर्मीनलचा पुनर्विकास, रिंग रोड, मिसींग लिंक, रेल्वे जंक्शनचा विकास, सायकल ट्रॅक, फूटपाथमध्ये सुधारणा, ट्रक टर्मीनल व लॉजिस्टिक हब, पार्कींग व्यवस्था, रस्ता रुंदीकरण, बसेसची उपलब्धता, रेल्वे ओव्हर ब्रीज, पीएमपीएमएलच्या नवीन मार्गावर बस सुरु करणे याविषयी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दर पाच वर्षांनी वाहतूक आराखडा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असल्याचे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती सुळे यांनी वाहतूक विकास आराखडा तयार करताना पुरंदर येथील विमानतळाच्या जागेच्या अनुषंगाने सूचना केली.

श्री. शिवतारे यांनी पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच सासवड येथे बसडेपो सुरु करावा, पुणे ते नीरा लोकलची सेवा सुरु करावी, बंद केलेल्या मार्गावरील बसेस सुरु कराव्यात अशी मागणी केली.

श्री. तुपे म्हणाले, नवीन मुठा उजवा कालव्याच्या खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत प्रस्तावित बोगद्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता देऊन पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. संपूर्ण बोगद्याच्या अंतरापर्यंत जमिनीवर रस्ता आणि समांतर लोकल रेल्वे किंवा मेट्रो केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकेल; त्याबाबत विचार व्हावा, असे ते म्हणाले.

आमदार श्री. तुपे यांनी मेट्रोच्या स्वारगेट कात्रज विस्तारित मार्गापासून कात्रज ते मंतरवाडी अशी सासवड मार्गाशी जोडणी प्रस्तावित करावी अशी मागणी केली.
0000

पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या उभारणीस वेग येणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४१ कोटी निधीस मान्यता

मुंबई, दि. ३० : पिंपरी चिंचवडमध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारकासाठी ४१ कोटी निधीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

हे स्मारक उभारण्यासाठी १९९७ पासून मागणी होत होती. उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेमुळे आता क्रांतिवीर चापेकर स्मारक उभारणीस वेग येणार आहे.

चापेकर वाडा येथे स्मारक तयार करण्यासाठी सर्वप्रथम  दत्ताजी साळवी, सभापती स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती.

त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सप्टेंबर, १९९७ मध्ये ठराव मंजूर करुन चापेकर स्मारकाचा २९ लक्ष रकमेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला. त्यानंतर २००२ मध्ये ४४ लक्ष किंमतीचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला.

मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी जुलै, २०२३ मध्ये  स्थानिक खासदार श्री. बारणे यांच्या विनंतीनुसार यथोचित स्मारक उभारण्यासाठी शासनामार्फत ४१ कोटी देण्याचे निर्देश दिले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते.

आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी  चापेकर स्मारकाचे काम  पूर्ण होण्यासाठी ६८ कोटी रकमेच्या आराखड्यास मंजुरी देऊन ४१ कोटी इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

स्मारकाच्या या कामात स्थापत्य विषयक कामे, संग्रहालय, ऐतिहासिक कास्य शिल्प, ऑडियो व्हीज्युअल अशा कामांचा समावेश आहे.

000

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नियोजन भवन येथील पालकमंत्री कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर, दिनांक 30:- नियोजन भवन इमारतीमधील पहिल्या मजल्यावर पालकमंत्री यांच्यासाठी कार्यालय तयार करण्यात आलेले असून या कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज फित कापून केले. यावेळी त्यांनी कार्यालयाची पाहणीही केली.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट व पाहणी

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली व कार्यालयाची सविस्तर पाहणी केली.

पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच श्री गोरे यांनी आज प्रथमच जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना सांगून प्रत्येक शाखेच्या अधिकाऱ्याची व त्याच्या कामकाजाची माहिती पालकमंत्री महोदयांना दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर अभ्यागतासाठी स्वतंत्र अभ्यागत कक्ष तयार करण्यात आलेला असून त्या कक्षाची ही पाहणी पालकमंत्री यांनी केली.

यावेळी महापालिका आयुक्त शितल उगले तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख तहसीलदार श्रीकांत पाटील व अन्य महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामुळे दिव्यांग बांधवांना विनाविलंब सहायक उपकरणे मिळण्यास मदत होईल – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

  • ‘डीडीआरसी’मार्फत चालविले जाणारे पहिलेच प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र
  • हरंगुळ बु. येथील संवेदना प्रकल्पाला पालकमंत्र्यांकडून ५ लाखांची देणगी

लातूर, दि. ३० दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव, सहायक उपकरणे यांचे वितरण करण्यासाठी यापूर्वी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अर्थात अॅलिमको या संस्थेमार्फत दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात होती. मात्र, आता लातूर येथे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक सहायक उपकरणे देण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु राहील. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्प, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई येथील आयईसी लिमिटेड यांच्या सहकार्याने लातूर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अंतर्गत प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते झाले.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, संजय अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, आरईसी लिमिटेडचे महाव्यवस्थापक सुमन एक्का, अॅलिमकोचे कमलेश यादव, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. योगेश निटूरकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईक आदी यांची यावेळी उपस्थिती होती.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामुळे दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर साहित्य मिळाल्यामुळे त्यांचे जीवनमान सुखकर होईल. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवून त्यांचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. दिव्यांग बांधवांसाठीही विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री ना. भोसले यावेळी म्हणाले. तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांना प्रशिक्षण देवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. दिव्यांगांसाठी राज्यातील पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून चालविली जात आहे. त्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार, रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच दिव्यांग कल्याणाचे इतरही उपक्रम या संस्थेमार्फत चालविले जात असून या संस्थेचे कार्य अभिमानास्पद असल्याचे पालकमंत्री ना. भोसले यावेळी म्हणाले. तसेच या संस्थेच्या कामासाठी आपण वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची देणगी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी संवेदना प्रकल्पामार्फत करण्यात येत असलेल्या कार्याचा उल्लेख करून जिल्ह्यात यापूर्वी सहायक उपकरणे वाटपासाठी या संस्थेने केलेल्या प्रयत्नांमुळे एकाच वेळी सुमारे १२ हजार ५०० दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव आणि सहायक उपकरणे वितरीत करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणसाठी अनेक योजना हाती घेतल्या असून त्यामुळे दिव्यांग बांधवांना मदत होत असल्याचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले. तसेच दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात सहायक उपकरणे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असून दिव्यांग बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी गतीने व्हावी, असे सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील यावेळी म्हणाले.

प्रारंभी संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. निटूरकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कामाची माहिती दिली. व्यंकट लामजणे यांनी निवेदन केले.

 पालकमंत्र्यांच्या हस्ते ३५० दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचे वितरण

गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे ३५० दिव्यांग बांधवांना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सहायक उपकरणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये मोटाराईज ट्रायसिकल, ट्रायसिकल, व्हीलचेअर, रोलेटर, सीपीचेअर, श्रवणयंत्र, काठी आदी साधनांचा समावेश होता. वितरण कार्यक्रमासाठी बसवराज पैके, प्रविण सगर, सुनिल वसमत्कर, चापेकर, राहुल देशपांडे यांनी परिश्रम घेतले.

महिलांना भरारी घेण्यासाठी कृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा

नांदेड दि. ३० जानेवारी : कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेला नीटनेटकेपणा, योग्य वेळेची निवड,नवनवीन प्रयोग, बाजाराचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा आता महिलांनी देखील अभ्यास करावा. कृषी क्षेत्र देखील महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकते असे प्रतिपादन,राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हयातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र साह्यभूत भूमिका सोडून आता या क्षेत्रातही महिलांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .कृषी विज्ञान केंद्र सगरोळी सारख्या केंद्रांनी आता या दृष्टीने देखील प्रयत्न करावे. अशा महिलांना आणखी प्रशिक्षित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात गुरुवार (ता.३०) रोजी महिला मेळाव्यास त्या संबोधित करीत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी,उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प्रणीता देवरे चिखलीकर,उद्योजिका चंद्रिका चव्हाण, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका भालेराव, कर्करोग तज्ञ डॉ. सुप्रिया सोनजे, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होत्या.

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून तंत्रज्ञान युगात युवतींना अनेक संधी  उपलब्ध आहेत.कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून ड्रोन पायलट बनण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिली आहे,अशा अनेक योजना केंद्र व राज्य शासनातर्फे राबविल्या जात आहेत. त्यातून महिला आत्मनिर्भर, सक्षम व आरोग्यमय होतील, याची खात्री असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.

आमदार चित्रा वाघ यांनी, हर घर शौचालय व लखपती दीदी अशा योजनांचा  महिलांनी लाभ घ्यावा. नावासमोर आईचे नाव जोडून शासनाने महिलांचा सन्मान केला आहे. कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठ एकशेबारा डायल करावा असे आवाहन केले. शासनाने लखपती दिदिसाठी अकरा कोटी तर बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. महिलांनी उभारलेल्या प्रदर्शनींना भेटी देऊन संवाद साधला. चंद्रिका चव्हाण यांनी महिलांसाठी उद्योगाच्या संधी, डॉ भालेराव यांनी स्त्रियांचे आरोग्य व डॉ. सोनजे यांनी कर्करोग निदान व उपचार तर प्रा. कुलकर्णी यांनी, निरामय, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याचा कानमंत्र दिला. यावेळी यावेळी परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय...

0
मुंबई, दि. २ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथील तीन अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक भूखंडांचे वाटपपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर,दि.02 : ग्रामीण भागात विविध सेवा सुविधा पोहोचाव्यात यासाठी पंचायत राज सिस्टीम आपण भक्कम केली आहे. जिल्हा परिषद हे यासाठी मुख्य माध्यम आहे. पाच वर्षाच्या...

सर्वांसाठी घरे हे ध्येय साकारण्यासाठी प्रत्येक मंडळात क्लस्टर विकसित करु – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
जलसंधारण व तलाव खोलीकरणावर अधिक भर आवश्यक  झालेल्या नुकसानीचे प्राथमिक अहवाल परिपूर्ण गरजेचे  शासन निर्णयात तरतुदीप्रमाणे मदतीसाठी तत्पर रहा   नागपूर,दि.02 : महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे हे ध्येय लोक...

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय...

0
मुंबई, दि. 2 : इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी...

‘ईद’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

0
मुंबई, दि. २ : आगामी ईद सणानिमित्त मुंबईबरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था...