रविवार, जून 1, 2025
Home Blog Page 289

कामगार संहितेनुसार नियमावली तयार; विधिमंडळ अधिवेशनात नियमावली मांडणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

नवी दिल्ली दि. 29: महाराष्ट्र शासनाने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली मांडण्यात येणार असल्याची, माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्र्याच्या बैठकीत दिली.

येथील अशोका हॉटेलमध्ये काल आणि आज  केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या कामगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री फुंडकर बोलत होते.  या बैठकीस केंद्रीय कामगार मंत्री यांच्यासह केंद्रीय राज्य मंत्री शोभा कंरदलाजे, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव तसेच विविध राज्यांचे कामगार मंत्री आणि सचिव उपस्थित होते.  कामगार मंत्री  आकाश फुंडकर उपस्थित होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव  आय ए कुंदन , रोजगार राज्य विमा योजनाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे उपस्थित होते.

राज्याचे कामगार मंत्री श्री फुंडकर यांनी संघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या विषयावरील महत्त्वपूर्ण सत्राची सहअध्यक्षता केली.  अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री श्री मांडविया होते. यावेळी त्यांनी सांगितले, कामगार संहितांनुसार नियमावली तयार केली असून फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही नियमावली मांडली जाईल, असून  मार्चमध्ये होणाऱ्या  विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली सादर केली  जाईल, अशी माहिती श्री. फुंडकर यांनी दिली.

ईएसआयसीसंदर्भात,  श्री. फुंडकर यांनी ईएसआयसी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्न करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले.  ईएसआयसी अंतर्गत अधिक लोकांना लाभ देण्यासाठी त्याचे कार्यक्षेत्र वाढविणे, आरोग्यसेवेचे फायदे सुधारणे आणि धोरणात्मक सुधारणांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर श्री. फुंडकर यांनी भर दिला यासाठी केंद्राकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा ही व्यक्त केली.

कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी ही परिषद आयोजित केल्याबद्दल केंद्राचे आभार मानले. यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय आणि संवादाची संस्कृती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात महाराष्ट्रात  असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छाही श्री फुंडकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी औद्योगिक न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मागितले. उद्योगातील कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी प्रशिक्षण संस्थेची आवश्यकता असल्याचे माहिती दिली.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी राज्यात ईएसआयसीच्यावतीने  सुरू असलेल्या योजनांची आणि आरोग्य सेवांची माहितीचे संगणकीकृत सादरीकरण केले. राज्य शासनाने कामगार विमा सोसायटी तयार असल्याची माहिती दिली. 

0000

 अंजु  निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.27 /दि.30.01.2025

जनतेप्रती पारदर्शिता, दायित्व वाढविण्यासाठी १०० दिवसांचा सात सूत्री कार्यक्रम राबवा; पालक सचिव राधिका रस्तोगी यांच्याकडून जिल्हा यंत्रणेचा आढावा 

नांदेड दि.३० जानेवारी : इज ऑफ लिव्हींग म्हणजे काय तर पारदर्शिता आणि दायित्व समजून नागरिकांना सेवा उपलब्ध करणे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या संदर्भातील निर्देश सुस्पष्ट असून नांदेड जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव राधिका रस्तोगी यांनी आज येथे केले.

पालक सचिवांनी आज शंभर दिवसांचा कृती आराखडा, जिल्हा सुशासन निर्देशांक, डिस्ट्रिक्ट स्टॅटेजिक प्लॅन यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती कावेली मेघना,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

कार्यालयीन स्वच्छता, कार्यालयीन सोयी सुविधा, क्षेत्रीय भेटी,क्षेत्रीय भेटीच्या नोंदी, ई – सुविधांमध्ये वाढ, याकडे त्यांनी लक्ष वेधण्याचे निर्देश दिले. पशुपालन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध उत्पादन, बचत गटांचे सबळीकरण, महिला सक्षमीकरण, सुलभ आरोग्य यंत्रणा, उद्योग विभागामार्फत क्लस्टर निर्मितीला चालना, याबाबत जिल्ह्यामध्ये वाढ करण्यास वाव असून याकडे गांभीर्याने लक्ष वेधण्याचे त्यांनी आवाहन केले.

नांदेड जिल्ह्याची पर्यटन, शिक्षण, वैद्यकीय पर्यटनात आगेकूच सुरू असून जिल्हाला क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या सादरीकरणांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, गाव तेथे दफन व दहन भूमी यासंदर्भात काल मर्यादित केलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात 100 दिवसातील उपक्रमांतर्गत गाव नकाशा प्रमाणे रस्ते मोकळे करणे, अभिलेखांचे अध्यायवतीकरण, स्वच्छ कार्यालय, ऍग्री स्टिक सारख्या योजनांमध्ये सक्रियता राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

00000

गुणवत्तापूर्ण कामातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. ३० : जिल्हा वार्षिक योजनेसोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा प्रयत्न राहणार असून यामाध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात येईल. जिल्ह्यात प्रगतीपथावर असलेली, तसेच नव्याने सुरु होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण होतील, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जिल्हा वार्षिक योजनेतील कामे विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिल्या. तसेच जिल्हावासियांसाठी अतिशय महत्वाचे असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच निधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री  ना. भोसले बोलत होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर,आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, पालक सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी प्रास्ताविकामध्ये सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेतून झालेल्या खर्चाची व सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित कामांची माहिती दिली. तसेच जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी जिल्हा नियोजन समिती विविध योजनानिहाय खर्चाची, तसेच प्रस्तावित निधी, पुनर्विनियोजन प्रस्ताव याबाबत माहितीचे सादरीकरण केले.

कृषिपंपासाठी सुरळीत वीज पुरवठा हा अतिशय महत्वाचा विषय आहे. ग्रामीण भागातील विद्युत रोहित्र विषयक तक्रारीं सोडविण्याला प्राधान्य द्यावे. विद्युत भार वाढल्यामुळे नादुरुस्त होणाऱ्या विद्युत रोहीत्रांची यादी तयार करून त्यांची क्षमता वाढविणे, वीज वितरणचे सुरळीत होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. भोसले यांनी दिल्या. एखादे रोहित्र नादुरस्त झाल्यानंतर त्याठिकाणी पर्यायी रोहित्र तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी औसा तालुक्यात सुरु करण्यात आलेला ‘पॉवर ऑन व्हील’ हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबवावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेतून प्रस्तावित कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत. उपलब्ध करून दिलेल्या निधीतून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आणि लोकोपयोगी कामे करून आपल्या जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. या कामांमध्ये कोणताही गैरप्रकार किंवा हयगय होणार नाही, याची दक्षता संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले.

यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था, रस्ते विकास, आरोग्य व्यवस्था, जलजीवन मिशन, सिंचन प्रकल्प व तलाव, बंधारे यांची दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, प्रधानमंत्री पीक विमा योजना, जिल्हा रुग्णालय आदी विषय मांडले.

‘गाव तिथे स्मशानभूमी’साठी निधी देणार

प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी असावी, याकरिता ‘गाव तिथे स्मशानभूमी’ मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावांची यादी तयार करून स्मशानभूमी बांधकामाचा प्रस्ताव सादर करावा. या कामांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. यासोबत ज्या गावांमध्ये जमीन उपलब्ध नाही, अशा गावांमध्ये भूसंपादनासह स्मशानभूमी बांधकामासाठी दुसऱ्या टप्प्यात निधी दिला जाईल. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बांधकामाचा आराखडा आणि प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. भोसले यांनी दिल्या.

विविध विषयांवर मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करणार

लातूर जिल्ह्यातील लातूर ते टेंभूर्णी महामार्ग रुंदीकरण आणि पानगाव ते लातूर रस्त्याच्या कामाचा प्रश्न, जलजीवन मिशनची अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करणे, तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प, तलाव यांच्या दुरुस्तीच्या कामांबाबत लवकरच मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा रुग्णालयाच्या जमिनीसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याबाबत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी चर्चा झाली. त्यानुसार संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या असून लवकरच यासाठी निधी उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी सांगतिले.

सर्वांना सोबत घेवून जिल्ह्याचा समतोल विकास करणार

लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करताना आठवणीत राहतील, अशी विकास कामे करून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना सोबत घेवून जिल्ह्याचा समतोल विकास करण्याला प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी, त्यांना अपेक्षित विकास अधिक गतीने व्हावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

 भारतीय संविधानाची प्रत देवून उपस्थितांचे स्वागत; मुलींच्या नावाची नेमप्लेट भेट

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनामार्फत घर घर संविधान उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सर्व उपस्थितांचे भारतीय संविधानाची प्रत देवून स्वागत करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘माझी मुलगी, माझा अभिमान’ उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांना घरावर लावण्यासाठी मुलींचे नाव असलेली नेमप्लेट भेट देण्यात आली.

 सन २०२५-२६ करिता ४९० कोटी २९ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा; जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

लातूर जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ करिता जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ३६१ कोटी २६ लाख रुपये, जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) अंतर्गत १२५ कोटी रुपये आणि जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना) अंतर्गत ४ कोटी ३ लाख रुपये अशा एकूण ४९० कोटी २९ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा विकास आराखड्यासाठी २५ टक्के निधी प्रस्तावित केला असून याअंतर्गत जिल्ह्यात कृषी व संलग्न सेवा, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील विविध कामांवर भर देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ करिता अंमलबजावणी यंत्रणांनी ६८२ कोटी ६८ लाख रुपयांची अतिरिक्त मागणी नोंदविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीला जास्तीत जास्त प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री ना. भोसले यांनी यावेळी सांगितले.

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ४०६६ नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार – माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. 30 : राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4 हजार 66 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड नुतनीकरण करणे, पत्ता बदलणे, अशा विविध सेवा देणारी ई सेंटर राज्यभर सुरू असून यासाठी लागणारी 3 हजार 873 आधार कार्ड किट सन 2014 साली जिल्हाधिकारी कार्यालयाना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यापैकी सुमारे 2 हजार 558 किट सध्या वापरात असून 1 हजार 315 किट नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 2 हजार 567 नव्या किटची मागणी करण्यात आली होती. याबाबत ग्रामीण भागातून आलेल्या मागण्या लक्षात घेऊन राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि नव्याने 4 हजार 66 किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीनंतर घोषित केला.

येत्या 10 फेब्रुवारी पासून हे नवीन किट उपलब्ध करून देण्यात येणार असून सध्या यु.आय.डी.आय टेस्टिंगची प्रक्रिया सुरू आहे. नव्याने किट उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगरला 34 अकोला 78, अमरावती 109, छत्रपती संभाजीनगर 134, बीड 58, भंडारदरा 23, बुलढाणा 124, चंद्रपूर 74, धुळे 113, गडचिरोली 44, गोंदिया 48, हिंगोली 88, जळगाव 167 ,जालना 104, कोल्हापूर 188, लातूर 271, मुंबई शहर 103, मुंबई उपनगर 122, नागपूर 91, नांदेड 112, नंदुरबार 90, नाशिक 49, उस्मानाबाद 73 आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांना 153, परभणी 55, पुणे 338, रायगड 63, रत्नागिरी 59, सांगली 130, सातारा 132, सिंधुदुर्ग 160, सोलापूर 146, ठाणे 400, वर्धा 50, वाशिम 100, यवतमाळ 83 किट उपलब्ध होणार आहेत.

००००

संजय ओरके/विसंअ/

जल साक्षरता वाढीसाठी प्रशिक्षण व कार्यशाळांचे आयोजन करावे – जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीतील सूचना 

मुंबई, दि. ३० : जीवनासाठी महत्त्वाची नैसर्गिक संपत्ती असलेल्या पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी जलसाक्षरता महत्त्वाची आहे. जलसाक्षरता वाढवण्यसाठी प्रशिक्षणासोबतच कार्यशाळांचे आयोजन, अशा सूचना राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.

राज्यस्तरीय जलसाक्षरता समन्वय समितीची आढावा बैठक समितीचे अध्यक्ष तथा सचिव (लाक्षेवि) डॉ.संजय बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस मुख्य अभियंता (पा ) व सह सचिव संजीव टाटू, उपसचिव (लाक्षेवी) तथा सदस्य सचिव महेंद्रकुमार वानखेडे उपस्थित होते. तर यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, प्रकल्प उपसंचालक, रा. ग्रा. वि. सं., यशदा पुणेचे श्री. पुसावळे व अन्य संबंधित अधिकारी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

जल साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षीत जल सेवकांची फळी तयार करणे गरजेची आहे. जल सेवक, जलदूत, जलप्रेमी, जल योद्धा, जलनायक, जलकर्मीना जल व्यवस्थापनाची योग्य माहिती मिळावी यासाठी कार्यशाळांचे आयोजन केले जावे. जल साक्षरता वाढीस लागावी म्हणून विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जावेत, अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या.

जल व्यवस्थापनात लोकसहभाग वाढावा. गावागावात जलसाक्षरता वाढून शाश्वत जलसंधारणाच्या दिशेने ठोस पावले उचलली जावीत यासाठी जलसाक्षरता केंद्रे प्रभावीपणे कार्यान्वित होणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

जल साक्षरता कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जलसंपदा  विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता  यांनी सामन्याने कार्यक्रमाचा वर्षभरातील आराखडा व अहवालाचा आढावा घेऊन कार्यक्रम अंतिम करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात

मुंबई, दि. ३० : येत्या २ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे  घेण्यास आयोग सज्ज असून उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर, नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. डॉ. खरात म्हणाल्या की, २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४’ या परीक्षेच्या पूर्वीच प्रश्नपत्रिकांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत. सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत आणि अशा कोणत्याही माहितीमध्ये तथ्य नाही. काही भ्रमणध्वनी क्रमांकांवरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका मिळवण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस आयुक्त, पुणे यांच्या तर्फे या प्रकरणी कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारांना अशा प्रकारचे दूरध्वनी आल्यास, त्यांनी contact-secretary@mpsc.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवावी.

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ८६ हजार उमेदवार परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त आणि व्यवस्था ठेवण्यात आली असल्याचेही डॉ. खरात यांनी सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

 

जिल्हा विकास आराखड्यात कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य द्यावे – पालक सचिव हर्षदीप कांबळे

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका)- जिल्हा विकास आराखड्यामध्ये उद्योगाला आवश्यक कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी प्रशिक्षण उपलब्धतेला प्राधान्य द्यावे तसेच वस्तुनिष्ठ उपाययोजनांचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी आज दिले.

जिल्हा विकास आराखडा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भरत वायाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, रोजगार आणि  स्वयंरोजगार  विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी  मनीषा हराळ, कृषी ,उद्योग, महिला बालविकास विभागाचे अधिकारी या  बैठकीस उपस्थित होते.

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक होत असून ‘ऑटोहब’ म्हणून ओळख निर्माण होत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, तंत्रनिकेतन, उद्योग यांनी समन्वयाने विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण राबवून कुशल मनुष्यबळ उपलब्धता करण्याच्या उपाययोजनांचा नियोजन आराखड्यात समावेश करावा.

उत्पादन, निर्यात, पर्यटन, स्थानिक लघुउद्योग, वितरण व्यवस्था, कृषी यासह निर्यात क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. खाजगी संस्थांचे सहकार्य आवश्यक तेथे घेण्यात यावे. लॉजिस्टिक पार्क तयार करुन साठवण क्षमता वाढवणाऱ्या गोदामांची निर्मिती करण्यात यावी. शेतमालावर  प्रक्रिया करण्यासही वाव आहे. त्यात मका, भाजीपाला, फळ प्रक्रिया यासारख्या उद्योगाची जास्तीत जास्त युनिट स्थापन करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्यात येईल.

पर्यटन वाढीसाठी उपलब्ध दळणवळण व्यवस्थेबाबतही पोलीस,जिल्हा प्रशासन, हवाई वाहतूक व सर्व वाहतूक यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. स्टार्टअप कंपन्यांद्वारे रोजगार उपलब्ध करण्याचा जिल्हा विकास आराखड्यात समावेश करावा,असेही त्यांनी सांगितले.

०००००

लोकसंख्येची वाढ गृहित धरुन नियोजन करावे – पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.३० (जिमाका) – जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करताना लोकसंख्येची वाढ गृहित धरावी. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन तयार करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या १३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक आज नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संदिपान भुमरे, डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आमदार राजेश राठोड, विधानसभा सदस्य आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संजनाताई जाधव तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात सन २०२४-२५ साठी मंजूर नियतव्यय सर्वसाधारण ६६० कोटी रुपयांचा आहे. त्यात गाभा क्षेत्र ४५० कोटी ९१ लक्ष रुपये, बिगर गाभा क्षेत्र १८० कोटी ५८ लक्ष रुपये तर नियोजन आराखड्यातील योजनांव्यतिरिक्त योजना २८ कोटी ५१ लक्ष असे एकूण ६६० कोटी रुपये मंजूर नियतव्यय आहे. तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०४ कोटी तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी ९ कोटी ९० लक्ष रुपये असे एकूण ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे.

सन २०२५-२६ करीता तयार करण्यात आलेल्या आराखड्यात सर्वसाधारणसाठी गाभा क्षेत्रात ७६० कोटी रुपये, बिगर गाभा क्षेत्रासाठी ३८० कोटी तर नियोजन आराखड्यातील योजनांव्यतिरिक्त योजनांसाठी ६० कोटी असे एकूण १२०० कोटी रुपयांचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या नियतव्ययाच्या तुलनेत मागणी रक्कम ५४० कोटी रुपयांनी जास्त आहे. त्याच प्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनांसाठी १४४ कोटी ६० लक्ष रुपयांचा तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी १० कोटी ६ लक्ष रुपयांचा असा एकूण १३५४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

सन २०२४-२५ वर्षाच्या मंजूर नियतव्ययातील डिसेंबर २०२४ अखेर खर्चाचा आढावा घेण्यात आला. सन २०२४-२५ साठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांचा मिळून ७७३ कोटी ९० लक्ष रुपयांचा नियतव्यय मंजूर असून त्यापैकी आतापर्यंत ४३४ कोटी ३४ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ५३१ कोटी ७६ लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून २४० कोटी ७८ लक्ष रुपयांचा निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. त्यापैकी १८८ कोटी २८ लक्ष रुपयांचा निधी खर्च झाला आहे,अशी माहिती देण्यात आली.

बैठकीत पालकमंत्री शिरसाट यांनी निर्देश दिले की, शाळांसाठी चांगल्या इमारती बांधकाम करण्यासाठी  नव्याने कृती आराखडा तयार करावा. जेणेकरुन नव्या इमारती उपलब्ध होतील. नव्याने जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करतांना लोकसंख्या वाढ हा मुद्दा लक्षात घ्यावा. अधिकाधिक ठिकाणी सौर उर्जा निर्मितीची यंत्रणा बसविण्यास चालना द्यावी. ग्रामिण भागात स्मशानभुमी बांधण्यासंदर्भात एक सर्व्हेक्षण करुन महिनाभरात आराखडा तयार करावा. शाळांमध्ये मुलींच्या शिक्षण व सुरक्षेसंदर्भात अधिकाधिक दक्षता घेऊन त्वरीत कारवाई करणे अपेक्षित आहे.

पाच वर्षाचा जिल्हा विकास आराखडा देखील पालक सचिव हर्षदीप कांबळे यांनी राबवण्याच्या सूचना सभागृहाला दिल्या व त्यास देखील जिल्हा नियोजन समिती ने मान्यता प्रदान केली.

बैठकीत जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था, गौणखनिज, वीज वाहिन्या व रोहित्र जोडण्या, पाणी उपलब्धता अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. बैठकीनंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सामाजिक न्याय दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले.

०००००

नांदेड जिल्ह्याच्या ७०३ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

नांदेड दि 30 जानेवारी : नांदेड जिल्ह्याच्या सन 2025- 26 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 7O3 कोटीच्या प्रारूप आराखड‌्यास आज जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. आजच्या बैठकीला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, खासदार डॉ. अजित गोपछेडे, खासदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आमदार आनंद पाटील बोंढारकर, आमदार श्रीजया चव्हाण, प्रधान सचिव तथा नांदेड जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्रीमती कावेली मेघना,अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर,जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे,आदींची उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याच्या 2025 -26 च्या 703 कोटींच्या मर्यादेतील आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. सोबतच सन 2024-25 च्या 749 कोटी मंजूर आराखड्यातील 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश त्यांनी आज येथे दिले.

शासनाने 703 कोटीची आर्थिक मर्यादा घालून दिली आहे. तर विविध विभागाने 1772 कोटीची मागणी केली आहे. मंत्रालय स्तरावर वित्त व नियोजन मंत्र्यांच्या मार्गदर्शनात राज्यस्तरीय बैठक होईल. त्यामध्ये शासनाने घातलेली मर्यादा व प्रत्यक्ष मागणी यावरून जिल्ह्याचा 2O25- 26 चा नियोजनाचा आराखडा ठरणार आहे. या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणेने प्रस्तावित केलेल्या मागणीप्रमाणे निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले.

अर्थ विभागाने सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपायोजना, आदिवासी उपाययोजना, या तीनही घटकांना मिळून सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 703 कोटींची आर्थिक मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने मात्र जवळपास 1772 कोटीची मागणी केली आहे. वित्त व नियोजन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आता जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या अंतिम प्रारूपाला मान्यता मिळणार आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी शासनाने 477 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 164 कोटी आदिवासी उपयोजनेसाठी 61 कोटी रुपये आर्थिक मर्यादा केली आहे.  तर यावर्षी मार्च अखेरपर्यंत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 525 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेमधून 164 कोटी, आदिवासी उपयोजनेतून 59 कोटी, जिल्ह्यातील सर्व शाखांना खर्च करायचे आहे. हा खर्च पुढील दोन महिन्यात करायचा असून जिल्हा यंत्रणेपुढे तीनही योजनेतील 749 कोटी खर्च करणे आवश्यक आहे. आतापर्यंत वितरित 216 कोटींपैकी 177 कोटी खर्च झालेला आहे. वितरित झालेल्या तरतुदीसी खर्चाची 82 टक्केवारी आहे. मात्र, दोन महिन्यात उर्वरित खर्च यंत्रणांना पूर्ण करायचा आहे.

तत्पूर्वी, आज पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक गावात स्मशान भूमी देण्यात यावी,आदिवासींची संख्या लक्षात घेता या योजनेमध्ये अधिक निधीची तरतूद करण्यात यावी, स्मशानभूमी सभोवतालचे अतिक्रमण काढण्यात यावे, पाणंद रस्ते मोकळे करण्यात यावे, वनजमिनीचे पट्टे परंपरागत शेती करणाऱ्यांना देण्यात यावे, आदी विषयांवर लोकप्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत व जिल्ह्यातील अंमलबजावणी बाबत यावेळी अधिकाऱ्यांसोबत उपस्थित खासदार आमदारांनी चर्चा केली.

नांदेड येथील स्व. डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व तेथील सोयी सोयी सुविधा. सिटीस्कॅन बंद असणे, गोदावरी नदीचे शुद्धीकरण, जलजीवन मिशनची प्रलंबित कामे,याबाबतही चर्चा झाली.जात पडताळणी व तत्सम प्रमाणपत्र तातडीने मिळण्यासाठी आणखी सक्रियतेने समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, याबाबतही यावेळी पालकमंत्र्यांनी निर्देशित केले.

बैठकीमध्ये सुधारीत रेती धोरण, महावितरण मार्फत शेतकऱ्यांना विनाविलंब ट्रांसफार्मर मिळण्याबाबत,तसेच अंगणवाडी सेविका सेवा नियुक्ती प्रक्रियेत नियमांचे पालन करणे,या मुद्यांवर विस्तृत चर्चा झाली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.तर सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी केले.

00000

सन २०२५-२६ जिल्हा वार्षिक योजनेच्या ५१९ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

बुलढाणा,दि.30(जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने सन २०२५-२६ या नव्या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४००.७८ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना घटक कार्यक्रमाअंतर्गत १०० कोटी व आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत १८.६५ कोटी अशा एकूण ५१९. ४३ कोटींचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला असून या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

निवडणुकीनंतर जिल्ह्याची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. या बैठकीला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, सर्वश्री आमदार चैनसुख संचेती, सिद्धार्थ खरात, श्वेता महाले, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सन २०२५-२६ साठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासनाने ४००.७८ कोटी रुपये कमाल आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ९३६.२४ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केलेला आहे. राज्यस्तरीय बैठकीत ५३५.४६ कोटी रुपये वाढीव आराखड्याची मागणी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मान्यता प्रदान करण्यात आली. अनुसुचित जाती उपयोजनाअंतर्गत शासनाने १०० कोटी रुपये कमाल आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी रु. १६४.०२ कोटी नियतव्यय प्रस्तावित केलेला आहे. राज्यस्तरीय बैठकीत ६४.०२ कोटी रुपये वाढीव आराखड्याची मागणी करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आली असून हा प्रारुप आराखडा राज्यस्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

तसेच आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत शासनाने १८.६५ कोटी रुपये कमाल आर्थिक मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ३३.९० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित केलेला आहे. राज्यस्तरीय बैठकीत १५.२५ कोटी रुपये वाढीव आराखड्याची मागणी करण्यासाठी मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

मंजूर आराखड्यातील सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे – मकरंद पाटील

चालु आर्थिक वर्षासाठी (2024-25) ४४० आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ३९४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी राज्य शासनाकडून एकूण नियतव्ययपैकी १७६ कोटी रुपये प्राप्त झाले असून त्यापैकी १५१ कोटी रुपये (८५.८३%) निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित निधी उपलब्ध करुन मिळण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करणार असून तो लवकरच प्राप्त होईल. तथापि मंजूर आराखड्यातील सर्व कामे मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसुचित जाती उपयोजना, आदिवासी घटक कार्यक्रमाच्या जानेवारी अखेर खर्चाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मुळ मंजूर नियतव्यय ४४० कोटी रुपये असून त्यापैकी ३९३.३१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जाती उपयोजना योजनेसाठी मुळ मंजूर नियतव्यय १०० कोटी रुपये असून त्यापैकी ८१.०१ कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेल्या आहे. तसेच आदिवासी घटक कार्यक्रम योजनेसाठी मुळ मंजूर नियतव्यय १८.०९ कोटी रुपये असून त्यापैकी ६.०८ कोटींच्या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

तसेच या बैठकीत जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, रस्ते आदी क्षेत्रातील कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शासकीय रुग्णालयांची सुधारणा, जिल्हा परिषद शाळांतील प्रसाधनगृह स्वच्छता, वैद्यकीय अधिकारी भरती, ट्रॅामा केअर सेंटर, मॅाडेल स्कुल, मागेल त्याला सौर कृषी पंप, व्यायमशाळा, पीक विमाबाबत आमदारांनी उपस्थित केलेल्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व्यवहारे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम योजनेअंतर्गत सहभागी करून घ्याकेंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे संबंधित विभागाला निर्देश

पीएम कुसुम योजनाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्या, असे  निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज प्रशासनाला दिले.

बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील विविध विषयांवर अधिकाऱ्यांना निर्देशित केले. यामध्ये प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान अर्थात पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारची आहे. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जातात. या योजनेचा प्रचार प्रसार करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घ्यावेत, असे निर्देशीत केले.  शिवाय बुलढाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत सुद्धा खाजगी शाळाप्रमाणेच शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून सीबीएससी पॅटर्न अंगीकृत करावे. जिल्ह्यातील पांदनरस्ते येणाऱ्या मार्च पर्यंत मोकळे करावेत. पिक विम्याचे पैसे उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा होण्याच्या  दृष्टिकोनातून उपाय योजना कराव्यात, आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना कराव्यात तसेच भालगाव आणि पळशी बुद्रुक येथे नव्याने प्राथमिक केंद्र सुरू करावे, असा ठराव त्यांनी नियोजन समितीच्या बैठकीत मांडला व हा ठराव  बैठकीत  पारित करण्यात आला.

00000

ताज्या बातम्या

गरजूंना आवश्यकतेनुसार सहाय्यक उपकरणे पुरविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. 31 : राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी अपंगांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्यात येणार आहे. अपंग आणि ज्येष्ठ...

पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. 31 : पारधी समाज हा आजही मागासलेलाच आहे. त्यांना आपल्या अधिकाराची अद्यापही जाणीव झालेली नाही. गेल्या कालावधीत राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमामुळे...

अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये अत्याधुनिक अग्निशमन वाहने उपलब्ध करून देणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दिनांक 31:-राज्य शासन व प्रशासन हे कारखानदार, कामगार तसेच उद्योगाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी मध्ये नुकतीच झालेली दुर्घटना पुन्हा...

नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी कार्यभार स्वीकारला

0
छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ :  नूतन विभागीय आयुक्त  जितेंद्र पापळकर यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. सेवानिवृत्त होत असलेले विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून...

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण झाल्यावर शासनाकडून निश्चीतपणे मदत – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद...

0
सातारा, दि.31:  सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत फलटण, माण, खटाव या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी  होऊन नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण...