बुधवार, जून 4, 2025
Home Blog Page 291

प्रवेशासाठी डिजिटल पडताळणी पद्धतीचा अवलंब; ज्येष्ठ नागरिकांना नाममात्र शुल्क आकारण्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, दि.३१(जिमाका)-विभागीय क्रीडा संकुलात अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजिटल पद्धतीने चेहरा ओळखीची पद्धत अवलंबावी. तसेच ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तिंना विभागीय क्रीडा संकुलात चालण्याच्या व्यायामासाठी वार्षिक १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारावे. जे केवळ त्यांच्या नोंदणीसाठीच्या प्रक्रियेकरिता वापरले जावे,असे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज दिले.

विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक आज विभागीय क्रीडा संकुलात पार पडली. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच विभागीय क्रीडासंकूल समितीचे सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री शिरसाट यांनी आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर व  विविध क्रीडा प्रकारांच्या विशेष मैदानावर सराव करण्यासाठी व नियमित व्यायामासाठी येणाऱ्या खेळाडू व नागरिकांनाच प्रवेश देण्यात यावा. अन्य अनधिकृत व्यक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी डिजीटल पद्धतीने चेहरा ओळख ही पद्धती अवलंबावी. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात खेलो मोअरही पद्धत वापरली जाते त्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धती वापरावी. प्रत्येक क्रीडा प्रकार, इनडोअर आऊटडोअर या सेवांसाठी वेगळे दर निर्धारित केले जावे. तसेच ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा अधिक आहे असे केवळ प्रकृतीस्वास्थ्यासाठी सकाळी वा सायंकाळी चालण्यासाठी मैदानात येतात अशा नागरिकांना नाममात्र रजिस्ट्रेशन करीता शुल्क आकारावे. वय वर्षे १८ ते ६० या व्यक्तिंकरीताच शुल्क आकारावे. शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना शुल्क आकारु नये,असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले. प्रत्येक व्यक्ती खेळाडुची डिजीटल नोंदणी करावी. त्यांच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करुन ओळख पटविण्याची यंत्रणा बसवावी. अंधारलेल्या भागात उजेडाची व्यवस्था करावी. सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांची नेमणूक करावी. अवैध व्यक्तिंचा प्रवेश रोखण्यासाठी कडक उपाययोजना करावी. प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक म्हणून सेवा देणाऱ्या व्यक्ति म्हणून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडुंनाच मान्यता द्यावी. तसेच सिंथेटीक धावनपथ तयार करण्याचे कामाबाबत कायदेशीरबाबी तपासून त्वरीत निर्णय घ्यावा. दोन लक्ष लिटरची भुमिगत पाण्याची टाकी बांधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश पालकमंत्री शिरसाट यांनी दिले.

लातूर पोलिसांकडून महिला, मुलींसाठी राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. 31 : जिल्हा पोलीस दलाच्या भरोसा सेलमार्फत करण्यात आलेल्या समुपदेशनामुळे अनेक कुटुंबे विभक्त होण्यापासून वाचली आहेत. तसेच आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षामार्फत जिल्ह्यातील बेपत्ता मुलींचा शोध घेवून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच मुलांना दामिनी पथकविषयी माहिती देण्यासाठी ‘इन्स्पेक्टर दामिनी’ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाचे महिला, मुलींसाठी राबविण्यात येणारे हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे सांगितले.

पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते कोनशिला अनावरण व फित कापून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भरोसा सेल इमारतीचे लोकार्पण झाले. या इमारतीमध्ये भरोसा सेल, अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि दामिनी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षांची पालकमंत्री ना. भोसले यांनी पाहणी केली. तसेच येथील कामकाजाची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, उपअभियंता संजय सावंत, पोलीस उपअधीक्षक गजानन भातलवंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यावेळी उपस्थित होते.

पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक वादावर वेळीच तोडगा निघाला नाही तर अनेकदा घटोस्फोट, एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यापर्यंत वाद वाढतो. हे टाळण्यासाठी भरोसा सेलमार्फत जोडप्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.  गेल्या वर्षी जवळपास ४९१ जोडप्यांमध्ये समेट घडवून आणण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटुंबे विभक्त होण्यापासून वाचली आहेत. या जोडप्यांचे आईवडील, मुले यांच्या आयुष्यात येणारी संकटे यामुळे दूर झाली आहेत. या कक्षाने यापुढेही असेच संवेदनशीलपणे काम करावे, असे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले.

भरोसा सेलच्या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांनाही मदत करण्यात येत आहे. तसेच अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षाने गेल्या वर्षभरात जवळपास १३२ बेपत्ता मुलींना शोधून त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

भरोसा सेलच्या समुपदेशनाने समेट घडलेल्या जोडप्यांचा यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री ना. भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच भरोसा सेल इमारतीचे बांधकाम गतीने पूर्ण केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय सावंत, कनिष्ठ अभियंता वर्षा सोनटक्के, सार्वजनिक बांधकाम विद्युत उपअभियंता दत्तात्रय इंगळे यांच्यासह कंत्राटदार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भरोसा सेल, अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी, कर्मचारी यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

साहित्य अकादमी पुरस्कार प्रक्रियेत बदल

नवी दिल्ली, दि. ३१: साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या २४ भारतीय भाषांमधील दरवर्षी दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

साहित्य अकादमीने पहिल्यांदाच लेखक, प्रकाशक आणि त्यांच्या हितचिंतकांकडून वर्ष  २०२५ च्या मुख्य पुरस्कारासाठी २४ भाषांमधील पुस्तके निवडण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.

२०२५ च्या पुरस्कारांसाठी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एक प्रत अर्ज भरून विचारार्थ पाठवता येईल.

याबद्दलची सविस्तर माहिती अकादमीच्या https://sahitya-akademi.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती देशभरातील 24 भाषांमधील पोहचविण्याचे आवाहन सचिव के. श्रीनिवासन यांनी या प्रसिद्धी प्रत्रकाद्धारे केले आहे.

०००

 

फॉरेन्सीक प्रकरणांच्या विश्लेषणामध्ये ४० टक्क्यांची वाढ

मुंबई, दि. ३१ : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात २०२४ मध्ये फॉरेन्सिक प्रकरणांच्या प्राप्तीमध्ये २२ टक्के वाढ झाली आहे. प्राप्त झालेल्या प्रकरणांची संख्या जानेवारी २०२४ मध्ये २० हजार ६५८ वरून डिसेंबर २०२४ मध्ये २५ हजार २५८ पर्यंत वाढली आहे. त्याचवेळी, प्रकरणांच्या विश्लेषण क्षमतेत महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे. जानेवारी २०२४ मध्ये १६ हजार १० वरून डिसेंबर २०२४ मध्ये २२ हजार ७७० प्रकरणांचे विश्लेषण करण्यात आले आहे. विश्लेषण करण्यात आलेल्या अहवालांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

या वाढीला हाताळण्यासाठी आणि प्रकरणांचे निराकरण वेगाने करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा संचालनालयाने भरती आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे. २०२४ मध्ये संचालनालयाने ५३ पदांची भरती केली आहे. ज्यामध्ये दोन उपसंचालक, तीन सहाय्यक संचालक, ३३ पदे सहाय्यक रासायनिक विश्लेषक, १५ पदे  वैज्ञानिक अधिकारी (सायबर) यांची आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग  १७ सहाय्यक संचालकांची भरती प्रक्रिया पार पडत आहे. यासोबतच वर्ग तीन कर्मचाऱ्यांची पदभरतीदेखील करण्यात येत आहे.

संचालनालय प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी विशेष उपाययोजना करीत आहे. आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचारी घेण्यात येत आहे. यामध्ये १७० फॉरेन्सिक पदे, वर्ग चार ची १६६ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे. उर्वरित पदे राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (NFSU) द्वारा भरली जाणार आहेत. तसेच फॉरेन्सिक क्षमतांचा विस्तार आणि सायबर फॉरेन्सिक विश्लेषणाची गती वाढवून प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी सेमी-ऑटोमॅटिक प्रोसेसिंग सोल्युशन व डिजिटल फॉरेन्सिक्समधील उत्कृष्टता केंद्र यावर काम करण्यात येत आहे. हे प्रकल्प अत्याधुनिक फॉरेन्सिक वर्क स्टेशन्स, डेटा मिळविण्याची उपकरणे, प्रगत डेटा प्रक्रिया आणि विश्लेषणाचे उपाय एकत्र करतात.  ज्यामुळे सायबर प्रकरणांच्या तपासण्याची गती आणि अचूकता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.

उच्च संवेदनशील प्रकरणांना संचालनालय प्राधान्य देत आहे. यामध्ये पॉस्को प्रकरणे (बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा), अंडर ट्रायल प्रीझनर प्रकरणे, न्यायालयांकडून आदेश दिलेली प्रकरणे यांचा समावेश आहे. या ठोस उपक्रमांसह संचालनालय महाराष्ट्र न्यायवैद्यक विज्ञान सेवा मजबूत करण्यासाठी, प्रकरणांचे निराकरण वेगाने करण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नागपूर येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला भेट

नागपूर, दि.31 :  प्रादेशिक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेमार्फत होत असलेले काम न्यायदानाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. गुन्हेगारांवर जरब बसविण्याकरिता गुन्ह्यांचा तपास व त्याची शास्त्रीय मीमांसा वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यादृष्टीने नागपूर येथील प्रयोगशाळेत वर्षाला सुमारे 40 हजार केसेस हाताळल्या जात असल्याने येथील यंत्रणा व प्रयोगशाळा महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. या प्रयोगशाळेच्या सक्षमीकरणासाठी मंत्रालय पातळीवर संबंधित असलेल्या कामांचा आढावा सुजाता सौनिक यांनी प्रयोगशाळेला भेट देऊन घेतला.

प्रयोगशाळेचे उपसंचालक डॉ.व्ही.जे. ठाकरे यांनी प्रयोगशाळेची माहिती देऊन येथे होत असलेल्या विविध तपासण्यांची माहिती दिली. दरवर्षाला 40 हजार प्रकरणांमध्ये सुमारे 300 प्रकरणे ही प्राणी व वन्यजीवांची असतात. सायबरच्या केसेस इथे येतात. सर्व प्रकारच्या तपासणीसाठी ही प्रयोगशाळा सक्षम असल्याची माहिती डॉ. ठाकरे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिली. नागपूर येथून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही संकल्पना विकसित झाली असून आता त्याचा राज्यपातळीवर विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन नागपूरसाठी नव्या 5 मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

एसटी प्रवाशांनी तिकिटाचे पैसे द्यावे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ३१:  प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये,  यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत, असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे.

याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी अग्रधन रकमेमध्ये १०० रुपयापर्यंत सुट्टे पैसे देण्याची निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्ट्या पैशावरुन होणारे वाद टाळले जाऊ शकतात.

एस. टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (ETIM) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्ट्या पैशामुळे होणारे वाद टाळता येतील, अशी सूचना मंत्री श्री. सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने युपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणाऱ्यां प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुट्टे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासना दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्ट्या पैशावरून वाद उद्भभवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी, अशी सूचना देखील परिवहन मंत्री  प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी उत्पन्नवाढीचे स्त्रोतही बळकट करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

नागपूर,दि.31 :  येथील पायाभूत सुविधा व विकास कामांना असलेली गती समाधानकारक आहे. अनेक विकासकामे अजून सुरु आहेत. महानगराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन भविष्यातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन नियोजनावर भर दिला पाहिजे. विकासकामांना जी काही गती मिळते ती विविध विभागाच्या परस्पर सहकार्यावर अवलंबून असते हे सूत्र सर्व विभागप्रमुखांनी लक्षात घेतले पाहिजे. प्रकल्प उभारतांना लागणारे भांडवल व त्याच्यातील आर्थिक संतुलन साध्य होण्याकरिता महसुली उत्पन्न कसे वाढेल यावर अधिक जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी  केले.

मेट्रो भवनला त्यांनी भेट देऊन  महामेट्रो, नागपूर विकास प्राधिकरण, महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नासुप्र सभापती श्री. संजय मीणा, महा मेट्रो संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) श्री अनिल कोकाटे,  संचालक (वित्त) श्री. हरेंद्र पांडे, संचालक (प्रकल्प) श्री. राजीव त्यागी उपस्थित होते.

एक ट्रिलियन डॉलरची आर्थिक व्यवस्था आपल्याला साकारायची आहे. यासाठी नागपूर विकास प्राधिकरण, मनपा, महामेट्रो व इतर प्राधिकरणांनी सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढे आले पाहिजे. आपण ज्या-ज्या ठिकाणी प्रकल्प साकारले आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी तेथील प्रसिद्ध झालेल्या उद्योग व्यवसायांना प्राधान्याने सामावून घेतले पाहिजे. यातून प्रत्येक ठिकाणी व्यवसायाची एक सक्षम साखळी निर्माण होईल. महामेट्रोला प्रत्येक स्टेशनवर यादृष्टीने मोठी संधी असून एक विकासाचा मार्ग यातून निर्माण होईल, असा विश्वास मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व्यकत्‍ केला. मेट्रो स्टेशन येथे उपलब्ध व्यवसायिक जागेवर स्थानिक कला तसेच खाद्य पदार्थ यांना कश्या प्रकारे पुढे आणता येईल व प्रेरित करता येईल या करता उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विकास कामांच्या विस्तारासमवेत आपल्या आर्थिक क्षमताही विस्तारल्या पाहिजेत. जोपर्यंत आपण प्रत्येक प्रकल्पातील व्यावसायिक क्षमता वाढविणार नाही तोपर्यंत विकासाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले स्त्रोत हे आपण बळकट केली पाहिजे. यासाठी प्रत्येक विभागाने, कार्यालयाने आपली टीम बळकट केली पाहिजे. आपल्या विभागातील प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे ही भावना मानव संसाधनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीमती सौनिक यांनी मेट्रोभवन येथील एक्सपरियन्स सेंटर, सिटी सेंटर मॉडेल, ऑपरेशनल कंट्रोल सेंटर (ओसीसी) याची माहिती घेतली. मेट्रो ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत देखील त्यांना माहिती प्रदान करण्यात आली. मेट्रो ऑपरेशन्सच्या डॉट नेट, 6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणी दरम्यानची आव्हाने इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.

आढावा बैठकीदरम्यान श्रीमती सौनिक मंत्रालय स्तरावरुन आवश्यक सर्व सहकार्य असलेले सहकार्य करु, असे सांगितले. फर्स्ट अँड लास्ट माईल कनेटिव्हिटी अंतर्गत नागपूर महानगरपालिका सोबत योग्यरित्या नियोजन करून मल्टीमॉडेल इंटिग्रेशन करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर, पुणे शहरामध्ये उपलब्ध आहे हे अभिमानाची बाब आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्वसामान्य व्यक्तींना परवडणारे आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आदिवासींचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी प्रगत उपचारांची जोड आवश्यक – मुख्य सचिव सुजाता सौनिक

नागपूर, दि.31 :  जैव विविधता, पर्यावरण आणि निसर्गपूरक राहणीमान याचे उपजत मूल्य व ज्ञान आदिवासी समाजाने टिकून ठेवले आहे. निसर्गाला बाधा न पोहचवता अनेक अशा वनोषौधीच्या साहाय्याने निसर्गोपचाराचा एक शाश्वत मार्ग त्यांच्या ज्ञानातून आपल्याला मिळाला आहे. दुर्गम भागातील आदिवासींच्या आरोग्याला अधिक सक्षम करण्यासाठी या उपचार पद्धतीला नवीन वैद्यकीय सेवासुविधा, तंत्रज्ञान व उपचाराची जोड देणे आवश्यक आहे. यादृष्टीने एम्स येथील आदिवासींच्या आरोग्य विषयावर आयोजित करण्यात आलेली ही जागतिक आरोग्य परिषद महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम्स’ नागपूर येथे आयोजित परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त),  ‘एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी, डॉ. मिलिंद निकुंभ, परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपण कितीही प्रगती साध्य केली तरी या उपजत निसर्गमूल्यांना आपल्याला डावलता येणार नाही. प्रगत वैद्यकीय सेवासुविधा आवश्यक त्या प्रमाणात काही दूर्गम भागात न पोहोचताही तेथील आदिवासींनी आपल्या उपजत ज्ञानावर आरोग्याला समजून घेतले आहे. त्यांच्या या ज्ञानाला जोड देवून नविन आरोग्य सुविधेच्या माध्यमातून सक्षमीकरणाची गरज आहे.  शासन यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. आदिवासींच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये आशा वर्कर, आरोग्य सेवक यांच्याकडून आरोग्यविषयक माहिती प्राप्त होते. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मानकांनुसार याला विद्यापीठाच्या ‘ब्लॉसम’ प्रकल्पाअंतर्गत  प्रत्यक्ष आरोग्य सेवेविषयी काम करुन मिळालेली माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, आदिवासी भागात सिकलसेल अॅनिमिअया, कुपोषण रोगांचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी केंद्र शासन व राज्यशासनाकडून विविध उपक्रम सुरु असून त्याला मोठया प्रमाणात यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषण, बाल मृत्यूचे प्रमाण, आरोग्याच्या सुविधा यात असलेली कमतरता दूर करण्यासाठी सर्व संशोधकांनी एकत्र येऊन केलेले विचार मंथन महत्वाचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपाययोजना संपूर्ण भारतभर राबविले जात आहेत. प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत सुमारे 24 हजार कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत, पोषण अभियान, स्वास्थ्य ई-पोर्टल, अलेख आदी मार्फत विविध प्रकल्प शासन राबविते. महाराष्ट्रातही पूर्ण क्षमतेने आदिवासींच्या आरोग्यसाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे स्वागत केले. या परिषदेच्या निमित्ताने एम्स परिसरात साकारलेल्या ट्रायबल व्हिलेजला त्यांनी भेट देवून विविध आदिवासी कलावस्तूंची पाहणी केली. येथे नावीन्यपूर्ण व कलात्मक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

रायगड जिमाका दि. 31- सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच.एल.एल.लाईफ केअर लि.यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा कु. तटकरे यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर,उप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण शिंदे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,स.पो.निरिक्षक संदीप कहाळे,सा.बांधकाम अभियंता श्री महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना कु तटकरे म्हणाल्या, म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ५ डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दरदिवसाला १५ डायलिसिस रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र  आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली आसून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.  श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन  येथे २,माणगाव २, आणि रोहा येथे ३ मशीन ऊपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कु. तटकरे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल पावसेकर यांनी केले.यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मराठीतील अभिजात साहित्य पुढच्या पिढीकडे नेण्याकरिता कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ३१: तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत आणि देशविदेशातूनआलेल्या साहित्यिक, मराठीप्रेमींच्या प्रचंड उत्साहात उद्घाटन झाले.

आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या युगात मराठीतील आपले अभिजात साहित्य पुढच्या पिढीकरिता कसे नेता येईल यादृष्टीने चॅट-जीपीटी सारखे एखादे ‘स्मॉल लँग्वेज मॉडेल’ तयार करण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

फर्ग्यूसन महाविद्यालय येथे संमेलनाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंचात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यांचे मनापासून आभार मानतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा दर्जा देण्याचे भाग्य लाभले असा उल्लेख श्री. मोदी यांनी केला आहे. प्रमाण मराठीच्या माहेरघरी आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले संमेलन होत आहे तसेच राज्याच्या निर्मितीनंतर पुढील महिन्यात पहिल्यांदा दिल्लीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.

वयाच्या चौथ्या वर्षापासून साहित्य निर्मितीस सुरूवात करुन वयाच्या 93 व्या वर्षी सर्व प्रकारचे साहित्य निर्माण केलेल्या सृजनशील साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार देताना आनंद होत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या संमेलनाला राज्यासह देश विदेशातून मराठीप्रेमी, साहित्यिक आल्याने मराठी भाषा विभागाने खऱ्या अर्थाने हे संमेलन वैश्विक अशा दर्जाचे केले आहे. जगाच्या पाठीवर एकही देश असा नाही जिथे मराठी माणूस पोहोचलेला नाही. दाओस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे गेलो असता तेथील एका चिमुरड्याने ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे सुंदर म्हणून दाखवले हे पाहून अभिमान वाटला की मराठी माणूस इतक्या वर्षापासून परदेशात गेला तरी माय मराठी त्याच्यापासून दुरावली नाही, आणि ती पुढच्या पिढीकडे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

भाषा ही भावना व्यक्त करण्याचे साधन, संपर्काचे साधन असते आणि केवळ अभिव्यक्ती नाही तर अभिव्यक्तीतून सृजन करण्याचे देखील साधन असते. म्हणूनच आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे राज मान्यता मिळाली आहे. मराठी भाषा ही अभिजात होतीच, प्राचीन भाषा होतीच परंतु कुठल्याही भाषेला राज मान्यता मिळणे देखील महत्त्वाचे असते. मोगलांनी या देशाची राजभाषा फारसी केली होती; त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्र काढून स्वराज्याची भाषा मराठी भाषा करुन मराठीला राजमान्यता देण्याची खऱ्या अर्थाने सुरूवात केली.

मराठीची मुळे खोलवर गेलेली आहे. आपली मराठी भाषा काही किलोमीटरवर बदलते पण प्रत्येक ठिकाणी तिची गोडी वाढतच जाते. किंबहुना मराठीच्या बोलीभाषांत निर्माण झालेले साहित्य, त्याचे प्रकार व बोलीभाषातील काव्य आदींची गोडी वेगळीच असून मनाला अतिशय भावनारे असल्याचे पहायला मिळते.

मराठी माणूस हा कधीही स्वार्थी राहिला नाही. पानिपतच्या लढाईत मराठे हे आपले साम्राज्य वाढवण्याकरता नव्हे तर भारताचे रक्षण करण्याकरता गेले होते. त्यावेळी मराठ्यांनी दिल्ली जिंकल्यानंतर अहमदशहा अब्दालीने तहाचा लखोटा दिला होता की पंजाब, सिंध आणि मुलतान दिल्यास उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा राहील. पण मराठ्यांनी संपूर्ण अटकेपर्यंतचा भारत हे हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचा राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे अशी भूमिका घेतली आणि ते पानिपतमध्ये लढले. ही ताकद, क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यात तयार केली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच वैश्विक विचार संत ज्ञानेश्वर, संत तुकोबारायांनी आपल्याला दिला होता तो वैश्विक विचार मराठी माणूस नेहमी जगला आहे. यामुळे मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तेथे एक प्रकारे गुणवत्ता आणतो, त्या ठिकाणच्या व्यवस्था अधिक चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच आज मराठी माणसाची कीर्ति ही जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहे.

संत ज्ञानेश्वरांची विश्वात्मक मराठी असेल, तुकोबारायांचे अभंग असो, संत चोखामेळा यांचा सामाजिक समतेचा संदेश, संत नामदेव, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई यांच्या रचनातून सामान्य माणसाला जगण्याचा जो मिळालेला अधिकार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकल्या त्याचे कारण माय मराठी ही आपल्या सगळ्यांमध्ये एक दुवा म्हणून काम करत होती.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असल्याचा जो नारा दिला किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारे क्रांतिकारकांमध्ये स्फूरण दिले. दादासाहेब फाळके यांनी सिने सृष्टीची निर्मिती केली, गान कोकिळा लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकर आदी अनेक नावांची मांदियाळी आहे की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मराठी असल्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना येतो. या संमेलनाच्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसाला हीच मराठीची परंपरा पुढे नेण्याचीच नव्हे तर जगभरात मराठी जगवायची, टिकवायची, समृद्ध करायची आहे अशा प्रकारची साद देखील घालत आहोत.

आज देशाच्या पाठीवर ज्या रंगभूमींनी खऱ्या अर्थाने नाट्य संस्कृती टिकवली आहे. त्याच्यामध्ये पहिले नाव आपल्या मराठी रंगभूमीचा आम्हाला घ्यावं लागेल. हे जे काही सगळे आपल्या मराठी माणसाने जतन करून, संवर्धन करून ठेवले आहेत ते पुढे नेण्याकरता आपण सर्वजन या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. त्यासाठी आजच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात या तंत्रज्ञानाचा उपयोग हा आपल्या प्रचार आणि प्रचारासाठी करायचा असतो. असा प्रयत्न मराठीला ज्ञान भाषेमध्ये परिवर्तित करण्याचा करत असताना स्मॉल लँग्वेज मॉडेल तयार करुन आपले अभिजात साहित्य पुढील पिढीला तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपलब्ध होईल असा प्रयत्न मराठी भाषा विभागाने करावा.

इंग्लंडमधील मराठी मंडळाला तेथील जागेच्या संदर्भात आवश्यक मदत येत्या पंधरा दिवसांत निश्चित देण्यात येईल. तसेच दिल्लीतली मराठी शाळा देखीलअव्याहत चालल्या पाहिजेत याकरितादेखील महाराष्ट्र शासन आवश्यक ती मदत करेल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

माझी भाषा अभिजात आहे, ही भावनाच अभिमान निर्माण करणारी आहे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मराठी तितुका मेळवावा…’ असे सांगणाऱ्या या विश्व मराठी संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. माझी भाषा अभिजात आहे, ही भावनाच अभिमान निर्माण करणारी आहे. आपली भाषा प्राचीन आहे, आजही प्रचलित आहे. माझ्या मराठी भाषेत उत्तम साहित्य निर्माण होतं, हे पुराव्यानिशी आपण सिद्ध केले. त्यानंतरच हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. हे विश्व मराठी संमेलन म्हणजे पुस्तक आणि पुस्तकांचे निर्माते यांचा हा महाकुंभमेळा आहे.

ही मराठी जगभरातील सर्व देशात पोहोचायला हवी हे आमचे स्वप्न आहे. या स्वप्नाला प्रयत्नांची जोड दिली तरच ते साकार होईल.

वैश्विक भाषा किंवा विश्वाची भाषा म्हणजे जी भाषा सर्वांना जोडते, जात पात धर्माच्या पलिकडची माणुसकी शिकवते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेत ठासून भरले आहेत. जगात सात हजार भाषा आहेत. एकट्या भारतात १२१ भाषा आहेत. जवळपास वीस हजार बोलीभाषा आपल्या देशातच बोलल्या जातात. या सगळ्या भाषांशी मराठीनं आपलं नातं जोडलं पाहिजे. तेव्हाच माझी अभिजात मराठी वैश्विक मराठी होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे. आता ती ज्ञानभाषा व्हायला हवी. आज तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होतंय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेचं म्हणजे एआयचं आहे. आता संवादाची भाषाही तंत्रज्ञान ठरवतंय. त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान मोठे आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून उच्च शिक्षणावर भर दिला आहे. पण, त्यात अनेक अडचणी आहेत. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, संगणक अशा अनेक विषयांत मराठीत उत्तम पुस्तके नाहीतच. विज्ञानाच्या विषय, अभियांत्रिकीसह सर्व विषयांत मराठीतून सोपी पुस्तके येणे गरजेचे आहे. मराठी ही नुसती ज्ञानभाषा नाही तर व्यवहार्य भाषा व्हायला हवी. रोजगारासाठी म्हणजे अर्थार्जनासाठी आवश्यक भाषा व्हायला हवी. त्यासाठी आपल्या सर्वांना मिळून ठोस प्रयत्न करावे लागतील. हे प्रयत्न महाराष्ट्र धर्म वाढवण्याइतकेच महत्त्वाचे आहेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

परदेशात उच्च पदांवर मराठी मुले जास्तीत जास्त दिसावीत. हीच मुले मराठी आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचे राजदूत बनतील. त्यांनी तिथे मराठी संस्कृतीचा झेंडा उंच रोवावा ही अपेक्षा आहे. इथे जमलेल्या कर्तृत्ववान मराठी जणांनी मराठी विश्व कसे बळकट होईल याचा विचार करायचा आहे.

मराठी माणसाच्या पाऊलखुणांचा सार्थ अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपला महाराष्ट्राभिमान हा फक्त, चांद्यापासून बांद्यापर्यंत, महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांपुरता मर्यादीत नाही. देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसांनी झेंडा रोवला, ज्या-ज्या ठिकाणी मराठी माणसाने पाऊलखुणा उमटवल्या. इतिहासातल्या आणि वर्तमानातल्या, त्या पाऊलखुणांचा आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.

ते पुढे म्हणाले, मराठा ही संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही. मराठी भाषा, मराठी बोली बोलणाऱ्या, सह्याद्रीच्या वाऱ्यांशी, महाराष्ट्राच्या मातीशी नातं असलेल्या, अठरापगड जाती, धर्म, भाषा, पंथाच्या लोकांना एकत्रित आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली, हे लक्षात घेतलं पाहिजे.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव केला. पुढील पाच वर्षातील एक तरी मराठी विश्व संमेलन परदेशात घेण्यासाठी मराठी भाषा विभागाने पुढाकार घ्यावा.

संमेलनातील तीन दिवसात कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रातल्या ज्येष्ठ दिग्गज मंडळी आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळे, जून्या-नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम होत आहे. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या, कर्तृत्ववान मंडळींना याठिकाणी भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला मिळणार आहे.

मराठी माणसाच्या मनात, कुठेतरी कोपऱ्यात, एक न्यूनगंड असतो. तो काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल, अशी खात्री आहे. मराठी साहित्य संमेलन, मराठी विश्व संमेलन किंवा मराठी माणसाच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल, तर त्यामागे उभं राहण्याची भूमिका महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे घेईल.

जगाच्या इतिहासात रयतेचे राज्य स्थापन करणारे पहिले राजे, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आले. देशातली पहिली मुलींची शाळा महाराष्ट्रात सुरु झाली. बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा नेण्याचं काम, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांनी महाराष्ट्रात केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच नेतृत्व महाराष्ट्राने केले. याच महामानवांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी भावी पिढीच्या मनात विचारांची पायाभरणी करण्याचं काम, या विश्व मराठी संमेलनातून व्हावे, अशी अपेक्षाही श्री. पवार यांनी व्यक्त केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठीवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक लोकांनी मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खूप मोठी चळवळ केली. त्याला यश आले. मराठी भाषेचे संवर्धन, जतन झाले पाहिजे आणि प्रचार व प्रसार झाला पाहिजे.

मराठी भाषा आहे तशी टिकविणे, मराठीची अस्मिता टिकविणे आणि मराठी भाषेवरील आक्रमणाचा आक्रमक पद्धतीने प्रतिकार करण्याची युवा पिढीची जबाबदारी आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड हे कवि केशवसुतांचे जन्मगाव त्यांचे स्मारक उभारुन श्री. कर्णिक यांनी जगभरात प्रसिद्ध केले. ते पुढील वर्षी पुस्तकांचे गाव करण्यात येईल व त्याला आवश्यक तो निधी देण्यात येईल. याशिवाय मराठी वाढविणारी, मराठीला ताकत देणारा, सातासमुद्रापार नेणारी महनीय व्यक्ती ज्या गावात जन्माला आली असेल अशी राज्यातील गावे शोधून त्यांचा समावेश पुस्तकांचे गाव, कवितांचे गाव योजनेत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मराठीला भाषेला आणि मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याविरुद्ध कडक कायदा व्हावा, अशी भूमिकादेखील मंत्री श्री. सामंत यांनी मांडली.

श्रीमती पाटणकर- म्हैसकर यांनी प्रास्ताविक केले.

अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, सदस्य डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, संजय नहार यांचा सत्कार करण्यात आला.

बालगंधर्व रंगमंदिर ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

०००

ताज्या बातम्या

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावना

0
मुंबई, दि. 4 : तीन दिवसांच्या भारतभेटीवर आलेले पॅराग्वे प्रजासत्ताकाचे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलासिओस यांचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्य शासनाच्या वतीने राजभवन,...

महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्ये स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
मुंबई, दि. 4 : राज्यातील सर्व महामार्गावरील धाबे, हॉटेल, मॉल या ठिकाणांसह सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत असणे ही सर्वच विभागांची जबाबदारी असून...

भारत आणि जपान यांच्यादरम्यान उद्योग, आर्थिक क्षेत्रांसह सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सहकार्यही वृद्धिंगत करुया –...

0
मुंबई दि. 4 :- भारत आणि जपान नैसर्गिक मित्र असून आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्याही दोन्ही देशांचे वेगळे नाते आहे. भारताच्या औद्योगिक प्रगतीत, पायाभूत सुविधांच्या निर्मितीत जपानची...

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्त्वाचे केंद्र – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच मुंबई, दि. ४...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचविण्यासाठी वनालगतच्या गावांमध्ये ‘एआय’आधारित कॅमेरे बसवावेत – वन मंत्री गणेश नाईक

0
मुंबई, दि. 4 : वन्यजीव व मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून ग्रामस्थांना वाचविण्यासाठी राज्यातील ज्या ज्या भागात वन्य प्राण्यांचा वावर आहे,...