शुक्रवार, जुलै 18, 2025
Home Blog Page 266

दुर्मिळ साहित्याचे जतन करुन ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक -पालकमंत्री नितेश राणे

  •  मालवणी भाषा भवन उभारणार
  • साहित्यांचे डिजिटायजेशन होणे आवश्यक
  • तरुणांनी वाचन संस्कृती जोपासावी

सिंधुदुर्गनगरी  दि. २२ (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्य संस्कृती फार मोठी आहे. या जिल्ह्याने अनेक साहित्यिक, लेखक घडविले आहेत. दुर्मिळ साहित्यांचे जतन करणे जेवढे आवश्यक असते तेवढेच ते साहित्य सर्वांसाठी उपलब्ध करुन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणेही गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक असून वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी आवश्यक आहेत. पालकमंत्री म्हणून साहित्याचे जतन करून वाचक वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष गंगाराम गव्हाणकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रांतअधिकारी हेमंत निकम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री राणे म्हणाले की, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. कोकणातील सर्व साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून  कोकणची प्रतिमा सर्वदूर पोहचविणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जुन्या साहित्याचे डिजिटलायझेशन होणे आवश्यक आहे. नव्या पिढीला वाचनाची गोडी लावायची असेल तर केवळ पारंपरिक मार्गावरून चालता येणार नाही. त्यासाठी नव्या पिढीचे नवे मार्ग, नवी माध्यमे हाताळावी लागतील.    ही साहित्य चळवळ पुढे अविरत चालू ठेवण्याच्या दृष्टीने कोकण मराठी साहित्य परिषदेने सावंतवाडी येथे घेतलेले हे  जिल्हास्तरीय साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे.

पालकमंत्री म्हणाले की, वाचन चळवळ वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जुन्या ग्रंथाचे जतन करणे आवश्यक आहे. आजची तरुण पिढी  ई-बुक किंवा किंडलच्या माध्यमातून वाचन करत असते. म्हणून त्यांच्यासाठी ही ग्रंथसंपदा कशी उपलब्ध करता येईल यासाठी देखील प्रयत्न होणे आवश्यक आहे. ग्रंथालयांचा डिजिटलायझेशन करण्यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे. जेणेकरुन जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती बदलू शकते.  जिल्हा ग्रंथालयांच्या विकासासाठी आराखडा तयार केला आहे. तसेच पुढील आर्थिक वर्षामध्ये ग्रंथालयाच्या विकासासाठी निधीची देखील तरतूद केली असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री म्हणाले की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात कोकणचा मोठा सहभाग आहे. मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह परिसरात मराठी भाषा भवन बांधले जात आहे. आपण आपल्या कोकणामध्ये ‘मालवणी भाषा भवन’ उभारुया. त्यानिमित्ताने आपली मालवणी बोलीभाषा भावी पिढीपर्यंत पोहोचवता येईल, त्याबद्दल आपण सर्वजण एकत्र येऊन चर्चा करूया, असेही ते म्हणाले.

०००

नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करावे -विभागीय आयुक्त श्वेता सिंघल

  • विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापळकरांच्या बालसुधारगृहास भेट

अमरावती, दि.२२: राज्य शासनाने 100 दिवसांसाठी सात कलमी कृती आराखडा ‍निश्चित केला असून त्यात जनतेच्या तक्रारींचे निवारण, सुकर जीवनमान तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी हे घटक अंतर्भूत आहेत. मेळघाटसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल भागातील नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वयाने कामे करुन त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना दिले.

सेमाडोह पर्यटन संकुल येथे 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण या कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आढावा बैठक झाली, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. ‍

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, ‍ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अपर आयुक्त अजय लहाने, रामदास सिध्दभट्टी, सुरज वाघमारे, उपवनसंरक्षक सुमीत सोळंके,  दिव्यभारती एम., प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हाळदळकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत महसूल विभागाच्या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मेळघाट ‍परिसरातील दहा गावांना भेट देऊन तेथील ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, रेशन दुकान, गावातील सोयी-सुविधा आदींची पाहणी करुन ग्रामस्थांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. तसेच उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

100 दिवस कृती आराखड्यांतर्गत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मेळघाटातील गावांना प्रत्यक्ष भेटी व तेथील ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनस्तरावर करावयाच्या उपाययोजनाबाबत विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. त्या म्हणाल्या की, मेळघाटातील नागरिकांचे जीवनमान हे प्रामुख्याने जंगल व जंगलातील उत्पादनांवर आधारित आहे. येथील क्षेत्राचा विकास होण्यासाठी याठिकाणी पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, वीज, रस्ते, रोजगार आदी मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. टंचाईग्रस्त गावांना नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी विहिर खोलीकरण, गाव तलावातील गाळ काढून तेथे पाणी संचयनासाठी प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने संबंधित विभागांनी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. प्रत्येक गावांत वीज पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी विद्युत विभागाने सब स्टेशनची निर्मितीसाठी नियोजन करावे तसेच सोलर योजना प्रभावीपणे राबवावी.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून भेटी दिलेल्या गावांतील प्रश्नांबाबत आढावा घेवून त्यापुढे म्हणाल्या की, पिढ्यांपिढ्यापासून वन जमीनीवर शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना वनहक्क पट्ट्यांचा ताबा देण्यासाठी वन विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. यासाठी विशेष मोहीम राबवावी. वन विभागाच्या अखत्यारित असलेली कामे स्थानिक गावकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावी. त्यांचे मजूरीचे मस्टर अद्ययावत ठेवून वेळेत मजूरीचे चुकारे करण्यात यावे. वन्य प्रान्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या वारसांना तत्काळ सानुग्रह मदत तसेच जखमींना तत्काळ उपचारासाठी वन विभागाने सहाय्य करावे. जंगल परिक्षेत्रात शेत असणाऱ्यांना शेतीपीकांसाठी विहिर तसेच बोअर करण्यासाठी परवानगी देण्यात यावी.

१०० दिवस कृती विकास आराखड्यांतर्गत मेळघाट क्षेत्रातील वझ्झर, घटांग, सलोना, भवई, सेमाडोह, माखला, ‍चिखली, तारुबांधा, बोरी, केशरपूर, कारा या गावांना भेटी देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्यात.

विभागीय आयुक्तांची शंकरबाबा पापळकरांच्या बालसुधारगृहास भेट

मेळघाट क्षेत्रातील गावांना भेट व पाहणी या कार्यक्रमांतर्गत प्रारंभी विभागीय आयुक्तांनी अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेच्या शाळेला आणि पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या स्व.अंबादासपंत वैद्य मंतिमंद, मुकबधीर बेवारस बालसुधारगृहास भेट दिली व मतिमंद मुला-मुलींशी संवाद साधून आस्थेवाईपणे विचारपूस केली.

यावेळी शंकरबाबा पापळकर यांनी बालसुधारगृहातील 18 वर्षावरील अनाथ मुलांना कायमचे पालकत्व व पूनवर्सन होण्याचा कायदा होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. यासंबंधी राजभवन येथे बैठक लावून सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिली.

०००

आरोग्य सेवेतील उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश

नागपूर,दि. २२: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न ९ रुग्णांलयातील गट ‘ड’ संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट – ड  संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्याच वर्षापासून 680 पदे रिक्त होती. रिक्त पदावर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन होऊन पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते.

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या 13 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट ड सवर्गातील सरळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक व समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून 680 रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जामधून 680 उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 66 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये 344 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोउपचार रुग्णालयासाठी 19 पदे, ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेर 11 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 57 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी 135 पदे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी 22 पदे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय 3 पदे तर शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी 23 पदांचा समावेश आहे.

रुग्णसेवेला बळकटी

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विविध सलग्नित रुग्णालयात एकत्र 680 रिक्त पदांची भरती होत असल्यामुळे रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहे. रुग्णसेवेसाठी गट ड मधील भरती अत्यंत आवश्यक होती. अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.राज गजभिये यांनी यावेळी दिली.

०००

शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार
  • आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार
  • नुकसानीचे पंचनामे, तीन दिवसात मदत
  • नागपूरची शांतता भंग होणार नाही, दक्षता घेणार
  • दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

नागपूर, दि. २२: नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्यासोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतला. त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सहपोलीस आयुक्त निसार कांबळी, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील, प्रमोद शेवाळे, शिवाजी राठोड, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त लोहीत मतानी, राहुल मदने, महेक स्वामी, विशेष शाखेचा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. या शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आला. दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणली. परंतु, या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहे. पोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे 34 पोलीस जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी दिले.

शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. या संदर्भात 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 12 विधी संघर्षित बालक आहेत. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (व्हिडीओ क्लीप) च्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या असून एकही दंगलखोर यामधून सुटणार नाही, अशी सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, दंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या 250 पोस्ट शोधण्यात आल्या आहेत. या पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. अशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

झालेल्या नुकसानीची दंगलखोरांकडून भरपाई

दंगलीमध्ये मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. नुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले की, संपूर्ण नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईल. नुकसान भरपाई करताना दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन संपूर्ण भरपाई वसूल करण्यात येईल. यासाठी महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले.

दंगलीमध्ये 71 वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहे. वाहनांच्या नुकसानी संदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासबंधी तत्काळ कारवाई करावी, अशी सूचना यावेळी केली.

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शहरात आगामी काळात विविध समुदयांकडून सण व उत्सव आयोजित करण्यात येतात. अशा उत्सवाच्या प्रसंगी कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच सण व उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही यादृष्टीने जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहे. शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिस विभागाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांनी शहराच्या काही भागात भरलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या घटनेतील दोषी असणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

०००

मंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘दिलखुलास’ मध्ये २४ ते २६ तर ‘जय महाराष्ट्र’मध्ये २५ मार्चला मुलाखत

मुंबई दि. २२ : ‘शिका व कमवा’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राकरीता उपयुक्त असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यामध्ये तांत्रिक कौशल्य विकसीत होण्यास मदत होणार आहे. शिक्षणाबरोबर रोजगाराचाही पर्याय उपलब्ध या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. 24, मंगळवार दि.25 आणि बुधवार दि. 26 मार्च 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 25 मार्च 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व राज्यातील विविध संस्थाच्या संयुक्त विद्यमाने ‘शिका व कमवा’ या उपक्रमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय कौशल्य विकास उपक्रमांतर्गत केली जाणार असून, उद्योगधंद्यातील कुशल मनुष्यबळाच्या वाढत्या मागणीला पूरक ठरणार आहे. या उपक्रमात राज्यातील इच्छुक संस्था, उद्योगसमूह आणि संबंधित तज्ञ यांना सहभाग घेता यावा याकरिता महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने धोरणात्मक रूपरेषा निश्चित केली आहे. यासाठी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने अल्पमुदतीचे शासनमान्य पदविका अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रत्यक्ष औद्योगिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ‘शिका व कमवा’ ही योजना काय आहे, राज्यात या योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येणार आहे याविषयी मंत्री  पाटील यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

०००

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

मुंबई, दि. २२: महावितरणला शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय सिंचन व ऊर्जा मंडळातर्फे (सीबीआयपी) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वीज वितरण कंपनी म्हणून गौरविण्यात आले. अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक दत्तात्रय पडळकर उपस्थित होते.

महावितरणच्या गौरवाबद्दल अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आभार मानले तसेच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

महावितरण मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करते. महावितरणचे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषी असे 3 कोटी 11 लाख ग्राहक आहेत. महावितरण देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे.

महावितरणने ग्राहक सेवेसाठी तसेच वीज वितरणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा केलेला वापर, ऊर्जा परिवर्तन आराखडा राबवून नवीकरणीय ऊर्जेच्या वापरावर दिलेला भर, वीज खरेदी खर्चात कपात करून ग्राहकांसाठीचा वीजदर कमी करण्यासाठी आयोगासमोर मांडलेला प्रस्ताव, शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर ऊर्जा मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सह राबविलेल्या विविध योजना आदी बाबींचा विचार करून महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. वीज उपकेंद्रांची संख्या वाढविणे, त्यांची क्षमता वाढविणे, नव्या वीज वाहिन्यांचे जाळे उभारणे, वितरण रोहित्रांची उभारणी तसेच वीज वितरण व्यवस्थेत केलेली सुधारणा यांचाही विचार महावितरणचा सन्मान करताना करण्यात आला.

कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही गेम चेंजर योजना आहे. हा देशातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक दशकांची कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे. योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. आगामी वर्षामध्ये राज्यातील सर्व कृषी पंपांना शंभर टक्के सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण होईल. या योजनेत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे महावितरणचा वीज खरेदी खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून सौर कृषी पंप बसविण्यात महावितरणने देशात प्रथम स्थान मिळविले आहे. उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठीच्या राज्य सरकारच्या योजनेसाठी महावितरणला नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.गावाची संपूर्ण विजेची गरज स्थानिक पातळीवर तयार झालेल्या सौर ऊर्जेवर भागवून गावाला ऊर्जा स्वयंपूर्ण करण्यासाठी महावितरणने सौर ग्राम योजना सुरू केली आहे. त्यामुळे गावकरी वीजबिलमुक्तही होतात. राज्यात 100 गावे महावितरणतर्फे सौर ग्राम विकसित करण्यात येणार असून त्यापैकी 10 गावे सौर ग्राम झाली आहेत.

महावितरणने स्वतःची कार्यालये, वीज उपकेंद्रे, ग्राहक सेवा केंद्रे आणि अतिथी गृहे सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या मुख्यालयाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले.महावितरणने राज्यात विद्युत वाहनांसाठी 63 चार्जिंग स्टेशन्स राज्यात उभारली आहेत. पुणे येथे उभारलेल्या विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाला जोडून महावितरणने अक्षय्य ऊर्जेच्या आधारे वाहनांचे चार्जिंग करण्यासाठी पाऊल टाकले आहे.

०००

 

‘नवसखी सरस महोत्सवा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. २२:  जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून दक्षिण मध्य सांकृतिक केंद्र येथे आयोजित जिल्हास्तरीय नवसखी सरस महोत्सवाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आदी यावेळी उपस्थित होते.

नवसखी सरस महोत्सवात एकूण शंभर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या स्टॉल्सची पाहणी करीत मुख्यमंत्र्यांनी स्टॉलधारक महिलांशी संवाद साधला. २६ मार्चपर्यंत सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार  आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हे शासनाचे धोरण यशस्वी करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या संकल्पनेतूनच हे आयोजन करण्यात आले आहे.

०००

संत विचारांमध्ये समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि. २२:  संत साहित्य, विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोककल्याणाची होती. संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाज एकसंघ ठेवण्याचे सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनास शिर्डी येथे सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.माधवमहाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव तथा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ह.भ.प चकोर महाराज बावीस्कर आदी उपस्थित होते.

श्री साईबाबांच्या शिर्डीनगरीत संत साहित्य संमेलनाचे आयोजन ही जिल्हावासियांसाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नमूद करत पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, संत साहित्यातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आहे. संताची भूमिका लोककल्याणाची होती. मराठी भाषा व तिच्या बोली भाषांमध्येही संत साहित्याचे प्रतिबंब दिसून येते. संत साहित्य समाजाच्या उद्धारासाठी आहे.

संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एकता प्रस्थापित होते. समाजाचे ऐक्य टिकविण्याची ताकद संत साहित्यात असल्याने प्रत्येकाने संत साहित्य वाचले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाया मजबूत करण्याचे काम या साहित्यातून झाले आहे. संतानी समाज सुधारणेचा मंत्र आपल्याला दिला. संत साहित्याच्या माध्यमातून निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम झाले. ही परंपरा पुढे नेतांना लोकशिक्षण व लोकजागृतीचे काम अविरतपणे सुरू ठेवण्याचे काम संत आणि वारकरी निश्चित करतील,अशी अपेक्षाही  विखे पाटील यांनी व्यक्त केली.

वारकऱ्यांकडून समाज एकसंघ ठेवण्याचे काम – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संतांच्या विचारांचा वारसा घेऊन वारकरी काम करतात. माणसाचे कल्याण साधण्याचे आणि सुखदुःखासाठी जगण्याचा मंत्र देण्याचे काम वारकरी करतात. संत, वारकरी नसते तर समाज व्यवस्था टिकली नसती. माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करणे व समाज एकसंघ ठेवण्याचे काम संत, वारकऱ्यांनी केले. वारकऱ्यांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. समाजातील कुप्रवृत्ती बाजूला नष्ट करण्यासाठी संत, वारकऱ्यांनी समाजप्रबोधन व संस्काराचे काम प्रभावीपणे करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी केले.

संत, वारकऱ्यांकडून संस्कृती संवर्धनाचे कार्य – संजय शिरसाट

संत आणि वारकरी हे संस्कृती टिकवण्याचे काम करतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून आध्यात्मिक वारसा सामान्य जनांपर्यंत पोहोचतो,  समाजातील सांस्कृतिक मूल्यांची जोपासना होते. राजसत्ता आणि धर्मसत्तेच्या समन्वयाने समाजात अनुकूल बदल घडवून आणण्याचे काम व्हायला हवे.

वारकरी साहित्य संमेलनास सामाजिक न्याय विभागाने २५ लाख रूपयांची आर्थिक मदत दिली आहे. सर्व वारकरी दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांची शासनाकडून मदत दिली जाईल. संत साहित्य व वारकऱ्यांना आवश्यक सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी मंत्री शिरसाट यांनी दिली.

संमेलनाध्यक्ष श्री. देहूकर म्हणाले, संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय हे मराठी संस्कृती आणि भक्ती परंपरेचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. वारकरी संप्रदाय हा भगवान विट्ठलाच्या भक्तीवर आधारित असून, त्यात संतांनी रचलेले साहित्य हे भक्ती, ज्ञान व समाज प्रबोधनाचे माध्यम बनले आहे.

यावेळी ह.भ.प माधव महाराज शिवणीकर व सदानंद मोरे यांची भाषणे झाली.

प्रास्ताविकात विठ्ठल पाटील यांनी वारकरी संत साहित्य संमेलन आयोजनामागील भूमिका विशद केली.

संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी, श्री साईबाबा समाधी मंदीर ते संमेलनस्थळ शेती महामंडळ मैदानापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. दिंडीची सांगता अश्व रिंगणाने करण्यात आली.

दोन दिवसीय संत साहित्य संमेलनाचा समारोप २३ मार्च रोजी होणार आहे. या संमेलनास राज्यातून मोठ्या संख्येने वारकरी व संत अभ्यासक उपस्थित झाले आहेत.

०००

गडचिरोलीतील वाघांचे मानवांवरील हल्ले रोखण्यासाठी ३ महिन्यात आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यातील मनुष्यहानी टाळण्यासाठी परिस्थितीचा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करून तातडीने विशेष उपाय योजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघांच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणे, अतिरिक्त वाघांचे स्थलांतर आदींचा समावेश असून त्याचा अहवाल ३ महिन्यात देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून त्यांनी तेथील नागरिकांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन यावर उपाय योजना सुचविण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार परदेशी यांनी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोली वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक एस. रमेशकुमार आदी उपस्थित होते.

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे 50 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रात वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील परिस्थितीचा अभ्यास करून गडचिरोलीतील अतिरिक्त वाघांचे स्थलांतर तीन महिन्यात करण्यात यावे. तसेच गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची माहिती गोळा करून त्यांच्या वारसांना विशेष नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते.

यासंदर्भात परिस्थितीचे अवलोकन करून आराखडा तयार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा व प्राणहिता अभयारण्यात सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांस भक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटलाच्या धर्तीवर वन पाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाईनद्वारे CBG गॅस पुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले. वन्य प्राण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई लवकर देण्यासाठी ई पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील 6 गावांच्या स्थलांतरासाठी तेथील स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे आदी उपाय योजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच यासंबंधीच्या उपाय योजना करण्याबाबत या विषयावर काम करणाऱ्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे. धोकादायक व संवेदनशील क्षेत्राचे सौम्यीकरण (मिटीगेशन) आराखडा तयार करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. मानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. अशा वाघाच्या स्थलांतरासंदर्भातही धोरणात्मक निर्णय घेण्याचे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

०००

अनधिकृत भूखंड, बांधकामाचे सर्वेक्षण – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर,दि. २१, (विमाका): छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत भूखंड तसेच बांधकामाबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  महानगर क्षेत्रात सर्वेक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील विना परवानगी भूखंड तसेच बांधकाम सर्वेक्षणाबाबत विभागीय आयुक्त गावडे यांनी आज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्वेक्षणासाठी सेवा देणारे विद्यार्थी तसेच अधिकाऱ्यांशी संवाद साधला, यावेळी महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, सह महानगर नियोजनकार रविंद्र जायभाये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महानगर आयुक्त गावडे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात अनाधिकृत ,विना परवाना भूखंड व बांधकामाबाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सर्वेक्षणासाठी आपली सेवा देणार आहेत. “कमवा व शिका” योजनेच्या धर्तीवर शैक्षणिक अभ्यासक्रमावर कोणत्याही प्रकारचा परिणाम न होऊ देता विद्यार्थी सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. या सर्वेक्षणा अंतर्गत महानगर क्षेत्रात नागरिकांकडे विद्यार्थी जातील त्यावेळी नागरिकांनी आपल्याकडील या संदर्भातील कागदपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याबरोबरच  सर्वेक्षणातील प्रश्नावलीबाबत अचूक माहिती द्यावी. जेणेकरून नियमाप्रमाणे भूखंड तसेच बांधकाम नियमित करण्याकामी मदत होणार आहे.

अनधिकृत भूखंड तसेच बांधकाम नियमित झाले तर गरजूंना या मालमत्तेवर बॅंकेकडून कर्ज मिळणेही सुलभ होणार आहे. तसेच ज्यांना सदर मालमत्तेची विक्री करावयाची असल्यास विक्री करणेही सुलभ होईल. त्यामुळे नागरिकांनी या सर्वेक्षण मोहिमेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त गावडे यांनी केले.

सर्वेक्षणाअंतर्गत विद्यमान वापर, भूखंड धारकांचे नाव, भूखंड क्रमांक, गट क्रमांक, मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवानगी, सातबारा उतारा, भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी, ग्रामपंचायत 8 अ उतारा, वीज देयक ,लेआऊट प्रत, भूखंडाचे क्षेत्रफळ, बांधकामाचे क्षेत्रफळ, भूखंड तसेच बांधकामाचा कच्चा नकाशा, मिळकतीचे वर्णन याबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्रासाठी पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची मांडणी – राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची माहिती

0
राजधानीत ' ऊर्जा वार्ता' परिषद नवी दिल्ली 17 : महाराष्ट्र राज्य हे ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर  ठेवण्यासाठी  पर्यायी ऊर्जा प्रकल्पांची आवश्यकता असल्याची धोरणात्मक मांडणी ऊर्जा...

विकसित महाराष्ट्र २०४७ मध्ये ‘आयएसओवा’ सक्रीय सहभागी – आयएसओवाचे अध्यक्ष अर्चना मीना

0
मुंबई, दि. 17 : सक्षमता, ज्ञान आणि अनुभवाची जोड देऊन आपण सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात पूर्ण क्षमतेने योगदान देण्यास सक्षम आहोत. विकसित महाराष्ट्र २०४७ या...

उमराणेतील शेतकऱ्यांना कांद्याची थकीत बिले देण्यासाठी ४५ दिवसांत अहवाल सादर करा – पणन मंत्री जयकुमार...

0
मुंबई, दि. १७ : नाशिक येथील उमराणे रामेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांना कांद्याचे थकीत बिले अदा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार...

नागपूर-अमरावती जिल्ह्यातील नझूल निवासी भूखंडधारक अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ – महसूलमंत्री चंद्रशेखर...

0
मुंबई दि. १७ : नागपूर आणि अमरावती विभागातील निवासी प्रयोजनार्थ भाडेपट्ट्यावर दिलेल्या नझूल भूखंडांसाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेला ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ...

पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सात गावांना देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – जलसंपदा मंत्री...

0
मुंबई, दि. १७ :- सीना-माढा उपसा सिंचन योजनेत बंद नलिका वितरण प्रणाली व ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे होणारी पाण्याची बचत आणि पावसाळ्यात धरण भरल्यामुळे  वाहून...