गुरूवार, जुलै 3, 2025
Home Blog Page 25

पावसाळ्याची पूर्वतयारी : सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज

मुंबई, दि. 21 : पावसाळ्यात रस्ते व पूल सुस्थितीत राहावेत, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यापक उपाययोजना राबविल्या असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांचे व पुलांचे दुरुस्ती व देखभाल काम वेगाने सुरू आहे.

राज्यातील प्रमुख राज्य मार्ग, राज्य मार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग यांची दैनंदिन देखभाल व वेळोवेळी दुरुस्ती करून हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य राहावेत, यासाठी विभाग सतर्क आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर खबरदारीचा उपाय म्हणून सावधानतेचे फलक लावण्यात येत असून, दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी वाहतुकीसाठीचे पर्यायी मार्ग (diversion) योग्य स्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली सध्या एकूण 16,519 लहान-मोठे व ब्रिटीशकालीन पूल आहेत. यापैकी 451 पुलांचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले आहे. मागील 10 वर्षांत 1,693 पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

धोकादायक स्थितीत असलेल्या किंवा वाहतुकीसाठी बंद असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूंना सावधानतेचे फलक व बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. अशा रस्ते व पुलांची स्थिती शासन स्तरावरून सातत्याने तपासली जात आहे.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अडचणींवर वेळीच उपाय करता यावा, यासाठी एक प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असून, त्याअंतर्गत अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुका स्तरापर्यंत नियंत्रण कक्ष (Control Room) कार्यरत असून, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे या कक्षांचे वेळोवेळी निरीक्षण करत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या तयारीमुळे पावसाळ्यातील आपत्कालीन स्थितींना सक्षमपणे तोंड देणे शक्य होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

00000

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

मुंबई, दि. २२ :   राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून दरड हटविण्याचे काम सुरु असल्याचे, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात १९.८ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात १६.३ मिमी, चंद्रपूर १२.३ मिमी, ठाणे जिल्ह्यात ११.१ मिमी  आणि रायगड जिल्ह्यात ९.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २२ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ११.१, रायगड ९.४, रत्नागिरी १६.३,  सिंधुदुर्ग ८.५, पालघर १९.८, नाशिक ५.४, धुळे ०.२, नंदुरबार ४.८, जळगाव २.६, अहिल्यानगर ०.३, पुणे ३.४, सोलापूर ०.४,  सातारा ५.२,  सांगली २.७,  कोल्हापूर ५.१, छत्रपती संभाजीनगर ०.७, जालना ०.६,  लातूर ०.८, धाराशिव १.५, नांदेड २.४,  परभणी ०.३, हिंगोली ३.८, बुलढाणा ३, अकोला १.४, वाशिम १.४ अमरावती १.१, यवतमाळ ९.३, वर्धा ४.२, नागपूर १.४, भंडारा ३.८, गोंदिया २.२, चंद्रपूर १२.३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

००००

ग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्री

पुणे, दि. २१:महाआवास व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता हे दोन्ही अभियान ग्रामविकासासाठी महत्त्वाची आहेत. स्वच्छ, सुंदर व प्लास्टिक मुक्त महाराष्ट्रासाठी ग्रामपंचायतीनी महत्त्वाची भूमिका निभवावी व शासनामार्फत लवकरच राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.


विभागीत आयुक्त कार्यालयात आयोजित निर्मल वारीचा शुभारंभ तसेच राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास योजनेतील पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री श्री. गोरे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अपर आयुक्त नितीन माने, विजय मुळीक उपस्थित होते.
मंत्री श्री. गोरे म्हणाले, ग्रामविकास विभागाने आषाढी वारीच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था उभ्या केल्या आहेत. पंढरपूरला दर्शनासाठी येणारा प्रत्येकजण व्हीआयपी आहे. त्यामुळे आषाढी एकादशी होईपर्यंत सर्व व्हीआयपी दर्शन बंद केले आहेत. सर्व मंदिर परिसर वाहनमुक्त केला आहे. ३ हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून पंढरपूर मध्ये उद्या (२२ जून) महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

ते म्हणाले, आषाढीवारी मध्ये वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला असून पालखी तळ व मार्गावर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. ७ लाख रेनकोटची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरते दवाखाने, औषधोपचार कीट, महिलांच्या स्नानगृहांची व्यवस्था, पर्यायी मार्ग तसेच यावर्षीपासून वृद्ध वारकऱ्यांसाठी मसाज व्यवस्था करण्यात आली आहे असे सांगून ‘सर्वांसाठी घरे’ या केंद्र सरकारच्या योजनेत एका वर्षात ३० लाख घरांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ६५ हजार कोटी रुपयांना मान्यता मिळाली असून याअंतर्गत एका वर्षात ५० टक्के घरे पूर्ण होतील. या योजनेतही ग्रामविकास विभागातील चांगल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक करुन ग्रामविकास विभागामार्फत यंदाचा वारी सोहळाही सर्वोत्तम होईल असा विश्वास व्यक्त केला.


विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, पंचायत राज व्यवस्था ज्या उद्देशाने स्वीकारली आहे, जे स्वप्न आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी पाहिले, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आणि प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावे या उद्देशाने ग्रामपंचायतींनी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम उत्कृष्ट आहे. सर्वांसाठी चांगले आरोग्य महत्त्वाचे आहे, त्यासाठी योगसाधनेला पर्याय नाही. ग्रामसभेमध्ये योग साधनेचा प्रसार करावा असा संदेश योग दिनाच्या निमित्ताने त्यांनी दिला.
ते म्हणाले, सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.  गावांमध्ये कचरा, प्लास्टिक, टाकाऊ अन्न इतरत्र पसरलेले असते, त्याबाबत जनजागृती आवश्यक आहे. संत गाडगेबाबा स्वच्छतेचे अग्रदूत आहेत. ग्रामविकासाची गीता संत तुकडोजींनी लिहिली. ग्रामगीतेमध्ये आरोग्य,सुंदर गावांची संकल्पना, स्त्री-पुरुष समानता, स्त्री संरक्षण आदी विविध पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे, असे सांगून सर्वांनी नद्यांचे पावित्र्य जपावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करावी. वारकऱ्यांनी हरित वारी, निर्मल वारीसाठी प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिली.
सन २०२३-२४ महाआवास योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वोकृष्ट जिल्हे, तालुके व ग्रामपंचायती तसेच शासकीय जागा उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुके, वाळू उपलब्धता सर्वोकृष्ट कामगिरी करणारे तालुक्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.


सन २०२२-२०२३ राष्ट्र संत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या ग्रामपंचायती : शेळकेवाडी (करवीर, कोल्हापूर), बोरगाव (कवठे महाकाल, सांगली), कवठे ( खंडाळा, सातारा )
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२०२३ अंतर्गत विभागस्तरीय विशेष पुरस्कार:
स्व. वसंतराव नाईक पुरस्कार-  दरेवाडी (सातारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत सांडगेवाडी (सांगली), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- गोयेगाव (सोलापूर)
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभिमान २०२३-२४ जिल्हास्तरीय पुरस्कार: ग्रामपंचायत गावडेवाडी (प्रथम- ६ लाख), मांजरी खु. (द्वितीय- ४ लाख), सदोबाची वाडी (तृतीय- ३ लाख रुपये)
विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती- स्व. वसंतराव नाईक पुरस्कार-  चिंचोली (जुन्नर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार- ग्रामपंचायत टाकवे खु. (मावळ), स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- मांजरवाडी (जुन्नर)
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण लोगोचे, पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेली पालखी सोहळा माहिती पुस्तिका तसेच वारी सुविधा व टॉयलेट सुविधा ॲपचे मंत्री गोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात निर्मल दिंडी, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, मोबाईल व्हॅन, लोककला पथक, संवाद वारी आदी चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याला पुरस्कार प्राप्त तालुक्याचे गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

0000

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये महाराष्ट्राला पदक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.२१ : महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले. त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा, अशा अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीपटुंना पायाभूत सुविधा,प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात येईल असे आश्वासन आज येथे दिले.

भारतीय कुस्तीगीर महासंघ, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ, नागपूर शहर कुस्तीगीर संघ आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर येथील विभागीय क्रिडा संकुलात आयोजित ‘मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्य स्पर्धे’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.त्यावेळी ते बोलत होते.गृह (ग्रामीण)राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संदीप जोशी, आमदार कृपाल तुमाने, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मागील काही वर्षात महाराष्ट्राने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याने गेल्या तीन वर्षात अव्वल कामगिरी केली आहे. कुस्तीतही १५ वर्षाखालील वयोगटात महाराष्ट्राचा दबदबा आहे. मात्र, १५ वर्षावरील वयोगटात राज्याची कामगिरी सुधारण्याची गरज आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देत महाराष्ट्राला सन्मान मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर राज्यातील कुस्तीतून हा बहुमान मिळाला नाही. यापुढे  कुस्तीपटुंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरते मर्यादित नराहता ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी सर्व स्तरातून पोषक वातावरण होण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनही कस्तीपटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व पायाभूत सुविधा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.

कुस्ती हा प्राचीन क्रीडा प्रकार असून रामायण आणि महाभारतामध्येही कुस्तीचे संदर्भ आढळतात. महाराष्ट्राच्या खेडया-पाडयात कुस्ती आणि कबड्डी हा खेळ मोठया प्रमाणात खेळल्या जातो. कोल्हापूर,पुणे,सातारा,अमरावती,नागपूर आदी ठिकाणी कुस्तीचे आखाडे असून तिथेही कुस्ती खेळल्या जाते . आता लाल मातीवरील कुस्ती मॅटवर आली आहे. या खेळातील बदलानुसार खेळाडूंनीही कौशल्य आत्मसात करून उत्तमोत्तम प्रदर्शन करावे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कुस्तीच्या सामन्यांचा आनंदही घेतला व विजेत्यांना पदक वितरीत केले.

नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी देशातील २५ राज्यांतून १५ वर्षांखालील स्पर्धक सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण १० वजन गट आहेत. मुलांसाठी ३८ ते ८५ किलो आणि मुलींसाठी ३३ ते ६६ किलो वजन गट आहेत.मुलांच्या फ्री स्टाईल आणि ग्रीको रोमन तर मुलींच्या फ्रीस्टाईल प्रकारात या स्पर्धा होत आहेत.

००००००

पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेणार – मंत्री प्रकाश आबिटकर

पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

कोल्हापूर दि.21 (जिमाका): लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने कोल्हापूर माहिती विभागात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची दोन दिवसीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. गणेश मुळे, संचालक किशोर गांगुर्डे, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके तसेच राज्य समितीचे सदस्य व विभागीय समितीचे अध्यक्ष तसेच उपसंचालक उपस्थित होते.

दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचा शुभारंभ झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे कोल्हापूर पद्धतीने फेटा बांधून पुस्तिका आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आपल्या लेखणीद्वारे भविष्याचा वेध घेण्याचे काम पत्रकार करतात. राज्यात अधिस्वीकृतीपत्रिका मिळणाऱ्या पत्रकारांची संख्या अत्यंत कमी असून ही संख्या वाढायला हवी. त्याचबरोबर समाजातील वस्तुस्थिती परखडपणे पण योग्य पद्धतीने मांडून समाजाला जागृत करुन योग्य दिशा देणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज असून असे प्रगल्भ पत्रकार तयार होणे आवश्यक आहे, असे सांगून मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील पत्रकारांना शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चित सकारात्मक निर्णय घेतील. मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील पत्रकारांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व पत्रकारांना न्याय देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्यमंत्री, अशी ओळख निर्माण करावी – यदु जोशी

समितीचे अध्यक्ष यदु जोशी म्हणाले, कोल्हापूर हा दिलदार व्यक्तींचा जिल्हा आहे. दिलदार जिल्ह्यातील आरोग्यमंत्री असणाऱ्या प्रकाश आबिटकर यांनी पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावून पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्यमंत्री अशी ओळख निर्माण करावी.

राज्याच्या विविध जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठका होतात. पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्याचे काम ही समिती करत असून आतापर्यंत सुमारे 3200 पत्रकारांना समितीने अधिस्वीकृती पत्रिका वितरीत केल्या आहेत. मध्य प्रदेश शासनाच्या वतीने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे अभ्यास दौऱ्यात दिसून आले. अल्प वेतन, तुटपुंजी पेन्शन, उदरनिर्वाहासह सुरक्षेचा प्रश्नही पत्रकारांसमोर आहे. शाहू, फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या निर्मितीत पत्रकारांचा मोठा वाटा असून समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पत्रकारांचा राज्य शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करुन पत्रकारांना सन्मान मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल अध्यक्ष यदू जोशी यांनी समाधान व्यक्त करुन सर्व सदस्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

संचालक डॉ. गणेश मुळे यांनी बैठकीच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि विभागीय माहिती कार्यालयाचे आभार मानले. प्रास्ताविक कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले.

००००

‘ईएसआयसी’ रुग्णालयात रुग्णसेवेच्या गुणवत्तेत वाढ करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ताराबाई पार्क येथील राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयाला भेट देऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. रुग्णसेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि रुग्णसन्मुख करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री आबिटकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने ‘ईएसआयसी’ रुग्णालयात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक सुधारणा आणि पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. याबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, रुग्णसंख्या, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यावर त्यांनी विशेष भर दिला. रुग्णसेवा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळाले पाहिजेत, असे ते म्हणाले.
रुग्णालयातील सध्याच्या सुविधांचा आढावा घेताना आबिटकर यांनी औषधांचा पुरवठा, स्वच्छता, तपासणी उपकरणांची उपलब्धता आणि रुग्णांना मिळणारी वैद्यकीय सल्ला-सुविधा याबाबत तपशीलवार चर्चा केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच, रुग्णालयात येणाऱ्या विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना रुग्णालयातील सध्याच्या सुविधा आणि आव्हानांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही रुग्णसेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामकाजात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या, तपासणी कक्ष, बेडची उपलब्धता आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांना प्रोत्साहन दिले. तुम्ही सर्वजण रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहात. तुमच्या मेहनतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळतो. यापुढेही असेच समर्पित भावनेने काम करा, असे ते म्हणाले. त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरही लक्ष देण्याचे निर्देश दिले.
या भेटीवेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे रुग्णालयातील सेवांमध्ये लवकरच सकारात्मक बदल दिसतील, अशी अपेक्षा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. ‘ईएसआयसी’ रुग्णालय हे विमाधारक कामगारांसाठी महत्त्वपूर्ण वैद्यकीय केंद्र असून, येथील सुधारणांमुळे हजारो कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे.

00000

 

 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २१: राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ठळक लोककल्याणकारी योजना, उपक्रमांची माहिती देणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मार्फत आयोजित ‘संवादवारी’या चित्र प्रदर्शनाचे, एलइडी व्हॅन कलापथक व्हॅन तसेच चित्ररथाचे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर आदी उपस्थित होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हे प्रदर्शन ठेवण्यात येणार असून मुक्काम तळांसोबत संपूर्ण मार्गावर चित्ररथ, कलापथक तसेच एलइडी व्हॅनच्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती करणार आहेत.

प्रदर्शनात ३० फ्लेक्स पॅनेलचा समावेश आहे. पशुसंवर्धन विषयक किसान क्रेडिट कार्डची सुविधा पशुपालकांना देणे, पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकासाला चालना, बळीराजा शेतकऱ्याच्या उन्नतीसाठीच्या योजना व घेतलेले निर्णय, नागरिकांना भेसळविरहित अन्नधान्य मिळावे यासाठी सुरक्षित अन्न तपासणीच्या सुविधा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, कृषी योजनांच्या लाभासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, ‘महाविस्तार- एआय’ ॲप, सायबर सुरक्षितता, जलसिंचनासाठीचे प्रकल्प, सामाजिक न्यायासाठी मंत्रालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापना, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणकारी मंडळाची पुनर्रचना, आदिवासींच्या उत्थानासाठी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, प्रधानमंत्री आवास योजना टप्पा २ अंतर्गत ३० लाख घरे मंजूर, पीएम- जनमन, रमाई, शबरी, अटल बांधकाम कामगार वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मोदी आवास योजना आदी योजनांची  माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय पशुसंवर्धन अंतर्गत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, राज्य स्तरावर कॉल सेंटरची स्थापना, पशु आरोग्य सेवांसाठी टोल फ्री क्रमांक, सहकार विभागांतर्गत आपले सहकार पोर्टलवर सहकार विभागाच्या ऑनलाईन सेवा उपलब्ध, परिवहन विभागांतर्गत महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना, गोवारी बांधवांच्या विकासासाठी स्वतंत्र योजना, दिव्यांगणसाठी स्वतंत्र विभाग, उच्च व तंत्र शिक्षण अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी आदी माहिती या प्रदर्शनात फ्लेक्स पॅनेलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.

0000

‘आशा रेडिओ पुरस्कार’ सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध रेडिओ वाहीन्यांच्या सहा रेडिओ जॉकींनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीद्वारे मुख्यमंत्र्यांनी आपल्या रेडिओवरील संगीत ऐकणे, गाने लिहीणे आदी छंदाविषयी मनमोकळा संवाद साधला. आपल्या आयुष्यातील रेडिओविषयक प्रसंगांचे वर्णन त्यांनी संवादाद्वारे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले. रेडिओचे महत्व पूर्वापासुन असून आजही ते अबाधीत असल्याचे सांगत रेडिओ अंतिम व्यक्तिपर्यंत पोहचण्याचे सशक्त माध्यम आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेडिओचे महत्व अधोरेखीत केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आमच्या लहानपणी दिवसाची सुरूवात सकाळी रेडिओ ऐकण्यापासून व्हायची. विविध भारती रेडिओ वाहिनीवर सकाळी येणारी गाणी अगदी न चूकता ऐकली जायची. त्यामुळे रेडिओशी लहानपणापासूनच जुळता आले. शासन दरबारी रेडिओ क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार सातत्याने होता. या पुरस्कार सोहळा आयोजनातून त्याचे समाधान लाभत आहे. रेडिओवर कार्यक्रम सुरू असताना माणूस दिसत नाही, पण सचित्र दर्शन शब्दांमधून घडत असते, असे विचार मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले.

जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात रेडिओ जॉकी सिद्धू, अक्की, अर्चना, ब्रजेश, भूषण, सपना भट यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमाचे समन्वयन हेनल मेहता यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ज्येष्ठ गायिका महाराष्ट्र भूषण आशा भोसले, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक विभीषण चवरे उपस्थित होते.

संगीत हे मानवामध्ये संवेदनशीलता आणत असून तणावमुक्तीचे कार्य करते. प्रवासात किंवा तातडीच्या समस्या येवून मनस्थिती बिघडत असल्यास हमखास संगीत ऐकावे. त्यामुळे मन शांत होऊन विचार क्षमता विकसित होते. रेडिओवर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी रेडिओवरील कार्यक्रमांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भागही बनविले आहे. त्यामुळे रेडिओचे महत्व कधीही कमी होणार नाही, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. रेडिओचे महत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखून शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू केला. रेडिओ केवळ संगीत ऐकण्याचे साधन नाही, तर संवादाचेही माध्यम होऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले, अशा शब्दात पुन्हा एकदा रेडिओचे महत्व मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विषद केले.

रेडिओवरील संवादाद्वारे जीवनाला उभारी देण्याचे काम – ॲड. आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड शेलार म्हणाले, सांस्कृतिक प्रवासाची मोठी वाटचाल रेडिओच्या माध्यमातून झाली आहे. शासनाने या प्रवासाची दखल घेत पुरस्कार सुरू केले आहे. 1923 मध्ये रेडिओ बॉम्बे नावाने रेडिओ वाहिनी सुरू झाली. रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्काराच्या माध्यमातून सन्मान करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. कोरोना काळात जीवनाला उभारी देण्याचे काम रेडिओवरील संवादाद्वारे करण्यात आले. यावेळी या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे महत्व लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील रेडिओ जॉकींशी संवादही साधला होता. मराठी संस्कृती रेडिओ वाहिन्यांवरील कार्यक्रमांमधून समाजापर्यंत जावू देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रेडिओ नसते, तर मी नसते, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आशा रेडिओ जीवन गौरव पुरस्कार 2025 हा विश्वनाथ ओक यांना देण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट पुरूष निवेदक पुरस्कार हा रेडिओ मिर्ची वाहिनीचे रेडिओ जॉकी जितूराज यांना, आशा सर्वोत्कृष्ट महिला निवेदक पुरस्कार हा रेड एफ एम वाहिनीच्या रेडिओ जॉकी मलिश्का यांना प्रदान करण्यात आला. तसेच आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ केंद्र पुरस्कार रेडिओ सिटी यांना, तर आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्राचा पुरस्कार विकास भारती रेडिओ केंद्र नंदूरबार यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमात 12 रेडिओ प्रकारात पुरस्कार देण्यात आले. राज्यात 16 रेडिओ वाहिन्या, 58 कम्युनिटी रेडिओ वाहिन्या व 60 केंद्र अस्तित्वात आहेत.

विसंअ/निलेश तायडे

000

छत्रपती शिवाजी महाराज परिक्रमा; भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी पूर्ण

 केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मानले आभार

मुंबई, दि. २१ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचा महापराक्रम आणि जाज्ज्वल्य इतिहासाला समर्पित ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ अर्थात परिक्रमेसाठी भारत गौरव पर्यटन रेल्वेची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली. या सहा दिवसांच्या प्रवासात या विशेष रेल्वेच्या पर्यटक प्रवाशांना शिवप्रताप स्थळांच्या दर्शनाची पर्वणी लुटता आली. ही परिक्रमा शिवछत्रपतींना अभिवादनाची संधी देणारी संस्मरणीय अनुभूती असल्याचे सांगत, पर्यटक प्रवाशांनी  रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र शासन आणि आयआरसीटिसीच्या या संयुक्त उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

भारत गौरव पर्यटन रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ९ ते १४ जून या दरम्यानची पहिली फेरी नुकतीच पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. ‘शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास, महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य अभिमान जागवणाऱ्या या उपक्रमाला पर्यटक प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या संकल्पनेला केंद्रीय रेल्वे आणि आयआरसीटीसीने उत्स्फूर्त आणि सकारात्मक रित्या साकार केले आहे. यात सहभागी सर्व यंत्रणा आणि त्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही चोख जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, या सर्वांचे प्रयत्न देखील प्रशंसनीय आहेत. भारत गौरव रेल्वेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न महत्वाचा आहे. या आणि अशा अनेक उपक्रम-प्रयत्नात महाराष्ट्र यापुढेही सदैव सज्ज आणि अग्रभागी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली आहे. अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांना पाठविले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट – भारत गौरव पर्यटन रेल्वेला शिवाराज्याभिषेक दिनी (९ जून) रोजी मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना केले होते. त्यानंतर या विशेष रेल्वेने रायगड, पुणे – कसबा गणपती, लाल महाल आणि शिवसृष्टी, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, शिवनेरी, प्रतापगड, कोल्हापूर- महालक्ष्मी मंदिर, पन्हाळा आणि परत मुंबई असा प्रवास पूर्ण केला.

मुंबईतून रवाना झाल्यानंतर रेल्वेने पहिला थांबा माणगांव (जि. रायगड) येथे घेतला. येथून पर्यटकांना विशेष बसद्वारा स्वराज्याची राजधानी रायगडकडे येथे घेऊन जाण्यात आले. काही प्रवाशांना रोप-वेतून, तर काही प्रवाशी पायी चालत रायगडावर पोहचले. याठिकाणी या पर्यटकांना शिवराज्याभिषेक सोहळ्याचे क्षण आणि उत्साह अनुभवता आला. माणगांव-रायगड येथून रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी पर्यटक रेल्वे पुणे रेल्वे स्टेशन येथे पोहचली. येथून पर्यटकांना शिवसृष्टी, शिव पराक्रमाचा साक्षीदार लाल महाल, आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब महाराजांनी स्थापना केलेल्या मानाचा गणपती कसबा गणपती यांचे दर्शन घेता आले. तिसऱ्या दिवशी पुण्यातून पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी आणि परिसराचे दर्शन घडवून आणण्यात आले. त्यानंतर पर्यटकांची बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. चौथ्या दिवशी सकाळी रेल्वे पुणे येथून सातारा कडे रवाना झाली. पाचव्या दिवशी सातारा येथे आगमन आणि पुढे प्रतागगड येथे शिवप्रतापाचा साक्षीदार आणि शिवछत्रपतींनी बांधलेल्या गडाचे दर्शन घडवण्यात आले. यात गडावरील तुळजाभवानी मंदिर आणि परिसराची माहिती पर्यटकांना दिली गेली. या प्रवासात सह्याद्री पर्वत रांगामधील निसर्ग संपदेचा आणि विविध स्थळांच्या विलोभनीय दर्शनाचा आनंदही पर्यटकांना मनमुरादपणे घेता आला. सातारा येथून रात्री रेल्वे सहाव्या दिवसाच्या प्रवासासाठी कोल्हापूरला रवाना झाली. सहाव्या दिवशी कोल्हापूर येथे आगमनानंतर श्री महालक्ष्मी मंदिर परिसरास भेट आणि श्री दर्शन. त्यानंतर पन्हाळगडास भेट, याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभ्या केलेल्या विविध वास्तूंसह, पन्हाळगड वेढ्यातून सूटका, महापराक्रमी बाजी प्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद स्मारक आदी स्थळांची माहिती देण्यात आली. सहाव्या दिवशी सायंकाळी हे सर्व पर्यटक कोल्हापूर येथून मुंबईकडे परतले.

सहा दिवस आणि पाच रात्रींच्या या प्रवासात या पर्यटक प्रवाशांच्या निवास-चहा-नाष्टा आणि भोजन, स्थानिक प्रवास यांचीही चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासातील या सर्व ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पर्यटन क्षेत्रातील घटकांनी पर्यटक प्रवाशांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श, पराक्रमाने पावन झालेल्या परिसरांची, स्थळांची प्रेरक माहिती मिळावी यासाठी तज्ज्ञ गाईडस् यांची व्यवस्था करण्यात आली. यामुळे या पर्यटक प्रवाशांनी भारत पर्यटन गौरव रेल्वेचे आणि या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. आयसीआरटीसीकडे तशा प्रतिक्रियाही त्यांनी उत्स्फुर्तपणे नोंदवल्या.

000

पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

मुंबईदि. २१ :  पुणे विभागात झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेतअसे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.

राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाण्याची आवक ६३ हजार ६४५ क्युसेक इतकी होत असुन सद्यस्थितीत धरणात ७२.७९ टक्के इतका पाणी साठा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर असून अतिवृष्टीमुळे दापोलीखेडचिपळूण आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये झाड कोसळून आणि भिंत पडून खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेल्याची नोंद झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग १७३ किमी ३०/६०० चिपळूण तालुक्यातील अंजवेल- रानवेल- पलटणे-श्रृंगरतली- कोटलूक- आबोली- भडगाव चारवेली रास्ता खचला असून  या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन केंद्राने कळविले आहे.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (२१ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ३४ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७.९ मिमीकोल्हापूर २३.७ मिमीरायगड जिल्ह्यात १२.४ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ११.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज २१ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  ७.९रायगड १२.४रत्नागिरी ३४,  सिंधुदुर्ग २७.९पालघर ११.४नाशिक ७.९धुळे ०.१नंदुरबार १.३जळगाव ०.२अहिल्यानगर ०.२पुणे ४.२सोलापूर ०.४,  सातारा १०.६,  सांगली ६.१,  कोल्हापूर २३.७छत्रपती संभाजीनगर ०.९जालना ०.४,  लातूर ०.५धाराशिव ३.२नांदेड ०.१,  परभणी ०.३हिंगोली २.५बुलढाणा ०.३अकोला ०.४वाशिम ०.१ अमरावती ०.१यवतमाळ ०.३वर्धा ०.३नागपूर ०.१भंडारा ०.७गोंदिया ०.५चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यूजालना जिल्ह्यात वीज पडून दोन प्राण्यांच्या मृत्यूठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यूनाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

000

विसंअ/एकनाथ पोवार

ताज्या बातम्या

अक्कलकुवा तालुक्यात केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय

0
मुंबई, दि. २: नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील ठाण्याविहिर पाडा ते केलखाडी पाडा दरम्यान केलखाडी नदीवर साकव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना...

वडखळ ते अलिबाग रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार – अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. २ : अलिबागच्या दिशेने होणारी वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी वडखळ ते अलिबाग मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अधिक जलदगतीने पूर्ण...

फळपीक विमा योजनेस अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ – कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. ०२ :  हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ देऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी...

पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री संजय राठोड

0
मुंबई, दि. २ : पोहरादेवी येथे उभारण्यात येत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच श्री क्षेत्र पोहरादेवी येथील म्युझियमचे...

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाद्वारे देशाचा समग्र विकास  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २ : "महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासातूनच देशाचा विकास साधता येतो," असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. राजभवन येथे महिला...