रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 24

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन

अमरावती, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कक्षाच्या माध्यमातून आता गंभीर व खर्चिक आजारांवर उपचारासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी, एक खिडकी प्रणालीद्वारे दिला जाणार आहे. यापूर्वी या सेवेसाठी नागरिकांना मंत्रालय गाठावे लागत होते, मात्र दि. १ मे २०२५ पासून ही सुविधा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उपलब्ध झाली असून लवकरच ती ऑनलाईन स्वरूपातही सुरू होणार आहे.

दि. २७ मार्च ते ३० एप्रिल दरम्यान एकूण ४७ रुग्णांनी कक्षाशी संपर्क साधला आहे. त्यापैकी १५ जणांवर मेंदू, कॅन्सर, प्लास्टिक व हृदयविकार अशा जटिल आजारांवरील मोठ्या शस्त्रक्रिया करून लाभ देण्यात आला. उर्वरित रुग्णांना मोफत औषधोपचार व मोफत कंजर्वेटिव्ह मॅनेजमेंट करता भरती करणे व इतर वैद्यकीय लाभ मिळवून देण्यात आले आहे.

या कक्षा अंतर्गत राबवण्यात येणारी ‘आरोग्यदूत’ संकल्पना गावागावात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने अत्यंत स्तुत्य आहे.

यावेळी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधीक्षक डॉ. निलेश खटके, कक्षाचे अध्यक्ष व तज्ज्ञ डॉक्टर डॉ. श्याम गावंडे, समाजसेवा अधीक्षक पवन गुल्हाणे आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. भुसे यांनी फित कापून उद्घाटन केले. त्यांनी कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा – मंत्री दादाजी भुसे

अमरावती , दि. १ (जिमाका ) : शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित केल्या आहेत.  शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या निमित्ताने  पोलीस मुख्यालय, अमरावती शहर परेड मैदान येथे मुख्य शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे बोलत होते. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

नागरिकांना मार्गदर्शन करण्यापूर्वी श्री. भुसे यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. श्री. भुसे म्हणाले, राज्याच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी  शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून आतापर्यंत पावणे तीन लाख शेतकऱ्यांना १ कोटी ६५ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून ८६ शेतकऱ्यांना १ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

राज्य शासनाने पारदर्शी आणि गतिमानतेचे धोरण स्वीकारले आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा मिळाव्यात यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजाचे समाधान शिबिर राबविण्यात येत आहे. राज्य शासनाने १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘संवाद’ हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला आहे. हा प्लॅटफॉर्म नागरिकांना समस्या मांडण्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. जिल्हा प्रशासनाला ‘मिशन 28 मेळघाट ‘ आणि महिला व बाल संरक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे. अमरावतीच्या विकासासाठी विमानतळ सुरू झाले आहे. याशिवाय या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरात वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करून यावर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा विहित वेळेत मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व शासकीय सेवा ऑनलाईन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सध्या सेवा हमी विधेयकाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

सौर ऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यात येत आहे.  प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यात १० हजार २७३ ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे ४३.७३ मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे.

राज्यात नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कार्यवाही करत, राज्य अभ्यासक्रमात सीबीएसईच्या चांगल्या गोष्टींचा समावेश केला जाणार आहे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती हुतात्म्यांच्या बलिदानातून झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.

पुरस्कार वितरण सोहळा

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . श्रुतिका औगड व उन्नती ओगले ( गोल्डन ॲरो चाचणी परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल), अक्षय पंत (प्रामाणिकपणा व सचोटी ), योगेश ठाकरे (फायरमन), सय्यद अन्वर सै अकबर (लीडिंग फायरमन), प्रीती ठाकरे ( अवैध गौण खनिज विरुद्ध कार्यवाही), पोलीस आयुक्तालयातील दिनेश नेमाडे, अली खुर्शीद अली सय्यद, विनोद सिंग चव्हाण, संगीता सिरसाम यांना उत्कृष्ट कार्याबाबत गौरविण्यात आले.

प्रारंभी विविध शासकीय विभागामार्फत परेड संचलन करण्यात आले. मंत्री श्री. भुसे यांनी परेड संचलनाचे निरीक्षण केले.  परेडचे संचलन परेड कमांडर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापूरे, राखीव पोलीस निरीक्षक श्रीधर गुळसुदरे यांनी केले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देशमुख यांनी केले.

मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत आणि मदत कक्षाचे उद्घाटन

मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्ष, धर्मादाय रुग्णालय मदत आणि मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांना मदत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या सहायाची माहिती देण्यात आली.

00000

 

शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका  : पालकमंत्री अतुल सावे

  • उत्पादन वाढीसाठी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करावा
  • शेतकऱ्यांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करावे 

नांदेड, दि. 1 मे :- नांदेड जिल्ह्याला खरीप हंगाम 2025 साठी एकुण 7 लाख 76 हजार 762 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी बि-बियाणे, खते, किटकनाशके यांचा पुरवठा करण्यास कमतरता भासू देऊ नका, अशी सूचना राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. ख्ररीप हंगाम 2025 पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार  डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार भिमराव केराम, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच विविध संबंधित विभागाचे अधिकारी आदीची उपस्थिती होती.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे पुरवठा व्यवस्था योग्यरितीने करावा, त्यांना बियाणे व किटकनाशकांची उपलब्धता वेळेत होईल याचे नियोजन कृषी विभागाने करावे. जिल्ह्यातील बोगस बि-बियाणे पुरवठा करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, असे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांना विविध योजनांची जास्तीत जास्त माहिती होण्यासाठी कृषी विभागाने व्हॉटसअप ग्रुप तयार करुन त्याद्वारे त्यांनी आवश्यक माहिती पोहोचवावी. कृषी क्षेत्रात एआयचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे असेही निर्देश त्यांनी दिले. ज्या बँका शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यांना शासनाकडून देण्यात येणारी सवलत कमी करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पिकविमा अनेक तालुक्यामध्ये खूप कमी अधिक प्रमाणात वितरीत होत आहे. याबाबत तालुका स्तरावर नियोजन असावे. शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तालुका पातळीवर व्यवस्था करावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली. तसेच विमा कंपनीने आतापर्यत किती रक्कम वितरीत केली, अजून किती रक्कम येणे शिल्लक आहे याची वर्षनिहाय माहिती द्यावी. उत्पादन वाढीसाठी एआयचा वापर, जिल्ह्यात जलसंधारण व जलसंपदाच्या मंजूर प्रकल्पांना निधी उपलब्ध व्हावा, जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र वाढावे यासाठी उपाययोजना आखाव्यात अशा सूचना खासदार अशोक चव्हाण यांनी केल्या. यासोबत त्यांनी अर्धापूर व मुदखेडला केळी निर्यात सुविधा केंद्र व धर्माबादला मिर्ची संशोधन केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला.

नांदेडला सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरु करावे तसेच शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी नांदेड जिल्ह्यात आयसीएआरचे केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी  केली.

प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी पीपीटीद्वारे जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी केलेल्या पुर्वतयारीच्या नियोजनाची माहिती दिली. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते कृषि मार्गदर्शिकेचे प्रकाशन  करण्यात आले. यावेळी राज्यस्तर प्रथम क्रमांक विजेते माधव शंकरराव पाटील रा. चैनपूर ता. देगलूर व सुनिल नामदेव चिमनपाडे रा. कुडली ता. देगलूर यांना द्वीतीय क्रमांक मिळाल्याबाबत त्यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्ह्यातील आतापर्यत अवयवदान केलेल्या दात्यांच्या कुटूंबियांचा सन्मान पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये चंद्रकला रावळकर, भाग्यश्री संतोष मोरे, सोनाली भुजंग मस्के, नामदेव दादाराव पवळे, लक्ष्मीबाई पवळे, शोभा सुर्यकांत साधु व डॉ. दिपक साधु, प्रिया अभिजीत ढोके यांचा सन्मान करण्यात आला. अवयवदानाची शपथ पालकमंत्र्याच्या हस्ते उपस्थितांना देण्यात आली.

जिल्ह्यातील 7 विद्यार्थी युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये कृष्णा जाधव पाटील, सुनिल रामलिंग स्वामी, आयुष कोकाटे, वेदांत माधव पाटील उंचेकर, अतुल अनिल राजूकर, शिवराज गंगावळ, आनंद सदावर्ते यांचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान  करण्यात आला.

00000

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला भेट

मुंबई, दि. ०१ : वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते.

भारत पॅव्हेलियनमध्ये राज्य शासनाच्या ‘मॅजिकल महाराष्ट्र’ या पॅव्हेलियनलाही पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली. यावेळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध पॅव्हेलियनला भेट देत करमणूक आणि दृकश्राव्य माध्यमांमधील नवनवीन तंत्रज्ञानासंदर्भात त्यांनी माहिती जाणून घेतली. तर गेमिंग आर्केडला भेट दिल्यानंतर त्यांनी गेमिंग क्षेत्रातील नव तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील विविध संधी याविषयी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

भारत पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्रासह हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा  राज्यांसह या क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, तसेच विविध मानोरंजन आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्था यांनी त्यांचे पॅव्हेलियन उभारले आहेत.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मूल्य, रूढी आणि संस्कृतीमधून ब्रँडची निर्मिती – प्रेम नारायण

मुंबई, दि. ०१ : संस्कृती महत्त्वपूर्ण असून देशाची संस्कृती माहीत असेल, तर ब्रँड्स कसे तयार होतात हे समजते. लोकांची श्रद्धा, मूल्यं, रूढी आणि संस्कृती याचा अभ्यास करून जाहिरातीमधून ब्रँड रुजवता येतात, असे मत ओगिल्वी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम नारायण यांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मधील ‘ब्रँड उभारणीसाठी संस्कृती हेच इंधन’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी क्रिएटर्स, कंटेन्ट रायटर उपस्थित होते.

प्रेम नारायण म्हणाले की, राष्ट्राची संस्कृती ही तेथील लोकांच्या मनात – हृदयात असते. सर्व  ब्रँड्स आणि जाहिरात ही लोकांच्या हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे जर देशाची संस्कृती समजली, तर तेथील लोकांशी नाते जोडता येते.

जर जाहिरातदार किंवा फिल्ममेकर भारतासाठी काही तयार करत असतील, तर त्या भावनिक नात्याचा शोध घ्यावा लागेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सांस्कृतिक संदर्भ वापरून बदल घडवून आणता येते. भारतात चॉकलेटचं प्रतिव्यक्ती सरासरी सेवन फक्त २० ग्रॅम्स होतं. आज आपल्याकडे हे १६०-१७० ग्रॅम्स दरम्यान आहे आणि हे मोठ्या प्रमाणावर या ब्रँडमुळे झाले आहे. आपल्या देशात कोणताही सण, कोणतंही शुभकार्य, काहीही सुरूवात असो – गोड पदार्थ हा अविभाज्य भाग असतो. याचा विचार करूनच ब्रँड विकसित होतो. सांस्कृतिक ठिकाण किंवा क्षण हे ब्रँड रुजवण्यासाठी मोठ्या संधी असतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नारायण यांनी यावेळी विविध ब्रँडच्या जाहिरातीचे दाखले देत ब्रँड उभारणीसाठी ‘संस्कृती हेच इंधन’ या विषयावर सविस्तर माहिती दिली.

०००

गजानन पाटील/ससं/

 

सृजन क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती
  • सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. ०१ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला.

बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस् बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, केंद्रीय सचिव संजय जाजू तसेच उद्योजक ॲडम ग्रॅनिटी, ॲडम मोसरी, आदर पुनावाला, अजय बिजली, अक्षत राठी, अक्षय विधानी, भूषण कुमार, चांघाम किम, चार्ली जेफरी, डायन स्मिथ गंडर, एकता कपूर, प्रिन्स फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौद, सुबासकरण अलीराजाह, शूजी उत्सुमी, शरद देवराजन, शंतनू नारायण, संकेत शाह, संजीव गोयंका, राल्फ सिमोन, राजन नवानी, पिरोजशा गोदरेज, नितीश मिटरसेन, अलेक्झांडर झरोव, क्रिस रिप्लेय, दिनेश विजन, लिझवेटा ब्रॉडस्काया, हर्ष जैन, फरहान अख्तर, हार्वेय मासोन, हिरोकी टोटोकी, जोंग बम पार्क, लुईस बॉसवेल, महेश सामत, मार्क रीड, नमीत मल्होत्रा, निल मोहन उपस्थित होते.

भारताच्या जीडीपीमध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असणार आहे. कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर यावर आधारित ऑरेंज इकॉनॉमी पुढील १० वर्षांत दुप्पट होणार आहे. या इकॉनॉमीला आणखी गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

भारताने सृजन क्षेत्राच्या विकासासाठी उचलेले पाऊल अत्यंत सकारात्मक असून त्यास सर्व उद्योजक उत्स्फूर्तपणे साथ देतील, असा विश्वास सर्व उपस्थित उद्योजकांनी व्यक्त केला.

०००

संतोष तोडकर/विसंअ/

 

महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्राच्या विकासात विविध क्षेत्रे आपला सहभाग देत आहेत. येत्या काळात महाराष्ट्राच्या विकासात मनोरंजन क्षेत्राची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज् परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील चित्रपटनगरीत मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ५०० एकरमध्ये असलेल्या मुंबईतील चित्रपटनगरीत अ‍ॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी खास १२० एकरमध्ये मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट सिटीची उभारणी होणार आहे. हे दोन्ही प्रकल्प आगामी काही महिन्यांत प्रत्यक्षात येणार आहेत.

या वेव्हज् परिषदेद्वारे भारताने क्रिएटिव्ह क्षेत्रात आघाडीवर असल्याचे दाखविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण केली असून, आता भारत क्रिएटिव्ह क्षेत्रातही नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे, असे  प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. माहिती तंत्रज्ञान, कौशल्य आणि क्षमता ही महाराष्ट्राची बलस्थाने आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भारताच्या नव्या ‘क्रिएटिव्ह वेव्हज’चे स्वागत करण्याचे आवाहन केले.

०००

संजय ओरके/विसंअ/

सातारा जिल्ह्याला पर्यटन हब करणार – पालकमंत्री शंभूराज देसाई  

सातारा दि. ०१:  सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, कास पठार अशी विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. पर्यटन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातून सातारा जिल्हा पर्यटन हब करुन जिल्ह्याला आर्थिक चालना देणार, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

महाराष्ट्र स्थापना दिनिानिमित्त पालकमंत्री देसाई यांनी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात ध्वजवंदन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहूल अहिरे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, सर्वच क्षेत्रातील एक उज्वल परंपरा असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे अभिमानाने नाव घेतले जाते. राज्याच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे स्व. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.  परकीय गुंतवणूकीसाठी उद्योजकांचे पसंती असणारे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर नेहण्याचा प्रयत्न त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून आम्ही करीत आहोत.

पुर्वीच्या काळी जिल्ह्यातील नागरिक कामासाठी, पुणे, मुंबई येथे जात होते. परंतु, जिल्ह्यात कृषी, आद्योगिक क्रांतीमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल आहेत. कोयना धरण बांधले या धरणाच्या 67 टक्के पाण्यावर 2 हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरु करुन सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला वीज दिली. कोयना काठच्या शेतकऱ्यांना एकही रुपयान न घेता पाणी देण्याचा निर्णय महसूल विभागच्या माध्यमातून स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी घेतला. औद्योगिक प्रगतीच्याबाबतीत सातारा जिल्हा नेहमीच एक पाऊल पुढे राहिला आहे. तसेच सातारा जिल्हा हा डोंगरी जिल्हा आहे. या डोंगरी भागात शेती सिंचनासाठी साठवण हौद आणि वळण बंधाऱ्यांची काम येत्या काळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचेही  पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मरळी येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या महोत्सवात बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालांचे स्टॉलही उभारण्यात आले होते. महोत्सव कालावधीत 25 लाखांची विक्री झाली आहे. 11 हजाराहून अधिक लोकांनी या महोत्सवाच्या अनुषंगाने जल पर्यटनाचा लाभ घेतला. देशात पर्यटन वाढीस चालना देऊन परदेशी पर्यटकांना आकर्षीत करुन पर्यटन क्षेत्रामध्ये उलाढाल वाढविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. त्या प्रयत्नातूनच कश्मिर खोरे पुर्वपदावर येत होते. पण दशतवाद्यांनी भ्याड हल्ला करुन या प्रयत्नांमध्ये अडखळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वाखाली देश म्हणून आपण सडेतोड उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे दरम्यान महापर्यटन उत्सवाचे महाबळेश्वर याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांची सुरक्षा करणे, हे पर्यटन विभागाचे काम आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र पर्यटन दलाची स्थापना प्रायोगीक तत्वावर करण्यात आली आहे. या पहिल्या तुकडीच्या कामकाजाचा प्रारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात यामध्ये माजी सैनिकांचाही सहभाग घेणार आहे, असेही पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा स्थापनेची औचारिक घोषणा केली. यानंतर त्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, विशेष ग्रामपंचायतींचा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार व पोलीस दलामध्ये विविध प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्माचिन्ह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.

ध्वजारोहणापुर्वी पालकमंत्री देसाई यांनी पोवई नाक्यावरील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व शाहू स्टेडीयम समोरील शहिद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानात जावून पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

०००

 नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. ०१ (जिमाका):  त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा स्वच्छ व हरित होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. तसेच नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ पोलीस संचलन मैदानावर आज सकाळी आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस दल, गृह रक्षक दल, राज्य उत्पादन शुल्क, अग्निशमन दल, नागरी संरक्षण दल, शहर पोलिस वाहतूक शाखेच्या तुकडीने संचलन करून मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार, प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६- २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. मार्च महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिक/त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्थ कुंभमेळा कामकाजाचा आढावा घेतला. स्वच्छ आणि सुंदर, पर्यावरण पूरक कुंभमेळ्याच्या कामाला चालना देण्यात येईल. तसेच कुंभमेळ्यानिमित्त निर्माण होणाऱ्या पायाभूत सोयी सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी कोणत्याच गोष्टींची उणीव जाणवू देणार नाही. तसेच स्वच्छ व हरित कुंभ पार पडण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील काही वाड्या, गावांना सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. अशा ७८ वाड्या, गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच दहा गावांसाठी विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ३३ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी समाधानकारक आहे. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार २२२ योजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये एक हजार २९६ गावांचा समावेश आहे. आतापर्यंत ६ लाख ७० हजार ९३६ कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

आगामी खरीप हंगामासाठी नाशिक जिल्ह्यात ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी आवश्यक बि- बियाणे, रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, अशी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक फार्मर आयडी म्हणून नोंदणी करून घ्यावी. यासह कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिक जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून १५ हजार १४५ सभासदांना १४८ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. पावसाळा जवळ आला आहे. यामुळे कर्ज वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५- २६ करीता सर्वसाधारण योजनेसाठी ९०० कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी ४४३ कोटी रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०१ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे.

पोलिस दलाने नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि तक्रारींची तत्काळ दखल घेता यावी म्हणून बळीराजा सेल कार्यान्वित केला आहे. आतापर्यंत ९५८ शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिस दलाने या शेतकऱ्यांना २ कोटी ३३ लाख ४२ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. आपल्या नाशिक जिल्ह्यात १५ लाख ३५ हजार ४४७ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. महिला, तरुणींना आत्मनिर्भर करणे आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी नाशिक शहरात १ हजार महिलांना पिंक (गुलाबी) ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे.

राज्यातील सर्व शाळा आता जिओ टॅगिंग करण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षण विभागाची सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने यंदाच्या पावसाळ्यात किमान एका रोपाची लागवड करावी. रोपाची लागवड करून उपयोग नाही, तर त्याची देखभाल करणे सुद्धा महत्वाचे आहे. राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे  प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाचा संकल्प सोडावा, असेही आवाहन मंत्री महाजन यांनी केले. यावेळी आमदार सीमा हिरे, महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी ओमकार पवार, अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावले, रवींद्र भारदे, शुभांगी भारदे यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६६ व्या स्थापना दिवसानिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलावले, रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, तहसीलदार गणेश जाधव, अपर तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

०००

शंभर दिवसांच्या विशेष मोहिमेत लोकाभिमुख व नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

  • महाराजस्व अभियानात नऊ हजार विक्रमी दाखल्यांचे वितरण !

नंदुरबार, दि. ०१ (जिमाका) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत जिल्ह्यात तालुका स्तरावरील 28 व जिल्हास्तरीय 54 अशा 82  कार्यालये आणि विभागांनी सहभाग नोंदवून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात महसूल, कृषि आणि ग्रामविकास विभागांच्या एकत्रित प्रयत्नांनी तब्बल 9 हजार 578 विक्रमी दाखल्यांचे वितरण साध्य करण्यात आले, असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाच्या मुख्य कार्यक्रमात शुभेच्छा देताना बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा, प्रभारी पोलीस अधिक्षक आशित कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, महेश चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी जितेंद्र कुवर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकात पवार, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक स्नेहा सराफ, जिल्हा शल्य चिकित्सक के.डी. सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अंकुश पालवे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, विभागीय वन अधिकारी मकरंद गुजर, आदि अधिकारी-कर्मचारी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक हे उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक गावात पोहोचवण्यासाठी ‘आपली अभ्यासिका’ उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील 100 जीर्ण इमारतींना नवे स्वरूप देऊन त्या वाचनालयांमध्ये रूपांतरित केले जात आहेत. विविध योजनांचा निधी व ग्रामपंचायतींचा सहभाग यामुळे ही वाचनालये स्व-अभ्यास, डिजिटल साक्षरता आणि करिअरविषयक माहितीचे केंद्र ठरणार आहेत. ‘आपली अभ्यासिका’ हा केवळ वाचनालयाचा उपक्रम नसून ग्रामीण भागाचा उज्वल भविष्य घडविण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हा नियोजनातून जिल्हा पोलीस दलाला गुन्हे तपास व गस्तीसाठी 13 नवीन वाहने उपलब्ध झाली आहेत. 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत सर्व पोलीस ठाण्यांची स्वच्छता, रंगरंगोटी व वृक्षारोपणासह नूतनीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 713 ठिकाणी जीपीएस (GPS) आधारित स्मार्ट ई-बीट प्रणालीमुळे निरंतर व  अचूक पेट्रोलिंग सुरू आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचा कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांसाठी पोलीस यंत्रणेशी सुसंवाद सुलभ झाला आहे. तसेच, इलेक्ट्रॉनिक मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (eHRMS) मुळे प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम बनले आहे.

पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी 3 लाख 5 हजार 955 हेक्टर क्षेत्रावर पेरणी नियोजित आहे. शेतकऱ्यांसाठी  27 हजार 192 क्विंटल बियाणे व 1 लाख 1 हजार 653 मेट्रिक टन रासायनिक खताचा पुरवठा केला जाणार आहे. बियाण्यांच्या गुणवत्तेसाठी 7 भरारी पथके सज्ज आहेत.  पीएम किसान योजनेत 1 लाख 10 हजार 928 शेतकरी लाभार्थी आहेत व वनपट्टाधारक शेतकऱ्यांची नोंदणीही सुरू आहे. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीत जिल्ह्याने 4 था क्रमांक मिळवला आहे. सूक्ष्म सिंचनात 3 हजार 270 शेतकऱ्यांना 35 कोटींचा लाभ मिळवून दिला आहे. ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीसाठी 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. कापूस व सोयाबीन अर्थसहाय्य योजनेत 51 कोटी 9 लाख रुपयांचे वाटप झाले आहे.

आपल्या जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागामार्फत 21 वी पशु व कुक्कुट पक्षी गणना प्रभावीपणे पूर्ण झाली आहे. विशेष अभिमानाची गोष्ट म्हणजे, नाशिक विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यात 7 ते 25 मे दरम्यान पशुधनासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात असून, 7 लाख 76 हजार 900 लसीमात्रा उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी नंदुरबार व शहादा या दोन समित्यांनी आधुनिकतेचा स्वीकार करून ई-नाम प्रणालीत यशस्वी वाटचाल केली आहे. आज या दोन्ही बाजार समित्यांमध्ये व्यवहार डिजिटल माध्यमातून पार पडत आहेत.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, स्मार्ट प्रकल्पांतर्गत 2023-24 मध्ये नंदुरबार बाजार समितीने राज्यात 14 वा आणि नाशिक विभागात 3 रा क्रमांक मिळवून जिल्ह्याचा मान उंचावला आहे. शहादा बाजार समितीने देखील राज्यात 36 वा आणि विभागात 13 वा क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीचे मोलाचे योगदान आहे. सन 2025-26 साठी एकूण 656 कोटी 54 लाख 15 हजार रुपयांचा अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 213 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 429 कोटी 54 लाख 25 हजार आणि अनुसूचित जाती योजनेसाठी 14 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेत जिल्ह्यात 20 शासकीय आश्रमशाळांना स्मार्ट टीव्ही, 42 आश्रमशाळा व 16 वसतीगृहांना हायप्रेशर पंप, 8 आश्रमशाळांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी खुर्च्या, तसेच 42 आश्रमशाळांसाठी 240 संगणक संच पुरवठा करण्यात आला असून, या उपक्रमांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या आहेत. स्वामित्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील 29 गावांतील लाभार्थ्यांना त्यांचे प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले.

मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजनेंतर्गत आपल्या जिल्ह्यातील 800 लाभार्थ्यांसाठी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर येथे तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले.  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत लाभ घेतलेल्या 3 हजार 914 प्रशिक्षार्थींना 5 महिने वाढीव प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे लोकार्पण करण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारासाठी तातडीने मदतीचा हात देणारा हा उपक्रम म्हणजे एक प्रकारची संजविनी आहे. नंदुरबार सारख्या दुर्गम-अतिदुर्गम जिल्ह्यात या सहायता कक्षाची नितांत गरज होती असे ते म्हणाले.

आजपासून ‘जल बंधु’ उपक्रमाची सुरुवात होत असून, जिल्ह्यात 100 गावांमध्ये भूजल पुनर्भरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात प्राधान्याने 30 जून 2025 पर्यंत 20 गांवे पूर्ण केली जातील. जल जीवन मिशन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, मनरेगा, वन विभाग व समुदाय सहभाग यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत जलस्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न असून, जलसंधारण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आजपासून ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियान सुरू झाले असून ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री ॲड. कोकाटे यांनी यावेळी केले.

यांचा झाला सन्मान…

पोलीस हवालदार बापू वाघ, 15 वर्षाच्या सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल पोलीस महासंचालकांकडून सन 2024 साठी सन्मानचिन्ह.

बाळु धनगर, तलाठी उपविभाग नंदुरबार यांना आदर्श तलाठी पुरस्कार, प्रशस्तीपत्र व रुपये 5 हजार.

जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2022-23

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-जितेंद्र पगारे.

गुणवंत खेळाडू (महिला) रिंकी पावरा.

गुणवंत खेळाडू (दिव्यांग खेळाडू) राजू वळवी.

सन 2023-24

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार-बाबुराव जाधव.

गुणवंत खेळाडू (महिला) कु. अर्पिता काटे.

गुणवंत खेळाडू (पुरुष) भगतसिंग वळवी.

गुणवंत खेळाडू (दिव्यांग खेळाडू) रामसिंग वसावे.

जिल्हा युवा पुरस्कार सन 2022-23

जिल्हा युवा पुरस्कार (युवक) मनिष सनेर

जिल्हा युवा पुरस्कार (युवती) भारती पवार

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) सार्वजनिक शिक्षण समिती, नंदुरबार

सन 2023-24

जिल्हा युवा पुरस्कार (युवक) राजेश्वर चौधरी

जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्ट, नंदुरबार

यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे, कॅन्सर व्हॅनचे उद्घाटन, आदर्श ग्राम अभियान शुभारंभ, जलबंधु अभियान शुभारंभ व जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

०००

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...

महिला व बालविकास विभाग कार्यालयीन सुधारणा मोहीम व प्रशासकीय गुणांकनात प्रथम 

0
मुंबई दि. ११:  शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देऊन शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

पालकमंत्री डॉ. वुईके यांच्याकडून इरई नदी खोलीकरणाची पाहणी

0
चंद्रपूर, दि. ११ :  चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता आदिवासी...

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर...

0
️नियामक परिषद बैठक संपन्न नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात...