शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 26

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटन

पुणे, दि. ०१: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे शिवाजीनगर पोलीस कवायत मैदान येथून उद्धाटन करण्यात आले.

यावेळी यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, त्यांना चांगले उपचार मिळावेत, आरोग्य विषयक मदत मिळावी म्हणून आजपासून राज्यभर जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कक्षामुळे आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठा फायदा होईल.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष

दुर्धर आजारावरील उपचाराकरीता आर्थिक सहाय्य तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साह्य याबाबत नागरिकांना जिल्हा स्तरावर सुविधा उपलब्ध होण्यासोबतच मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने खोली क्रमांक 10 तळमजला, जुनी जिल्हा परिषद येथे हा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षासाठी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एक समाजसेवा अधीक्षक, लिपिक, समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. वैद्यकीय कक्षामध्ये शासनाच्या सर्व वैद्यकीय सुविधा व आरोग्य विषयक योजनांचे माहितीफलक लावण्यात आले आहेत. या कक्षाला भेट देणाऱ्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय आदी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची कक्षाला भेट

उद्घाटन कार्यक्रमानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कक्षाला भेट देऊन कामकाजाबाबत माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांनी त्यांचे स्वागत केले.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यलयाचे उद्धाटन

पुणे, दि. ०१:  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे विधानभवन येथे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, महामंडळाचे कार्यकारी संचालक तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा आहे. या महामंडळाच्या माध्यमातून, शेतीपूरक व्यवसाय लघु उद्योग, वाहतूक, पुरवठा, विपणन, साठवणूक, प्रक्रिया उद्योग अशा विविध क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे महामंडळ समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रभावी साधन बनेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला.

राज्यातील ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या तरुण व बेरोजगार तरुणांना योग्य संधी मिळाल्यास ते समाजासाठी आणि देशासाठी मोठे योगदान येऊ शकतात, या उद्देशाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाला निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जणार नाही. ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार तरुण, तरुणींना मदतीचा हात देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी  दिली.

०००

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०१: आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापरासाठी 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर शेतीला थेट फायदा होईल. ऊसाच्या शेतीतसह इतरही पीकांकरीता ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी झालेल्या, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या, महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांना अभिवादन करुन संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान दिलेल्या महाराष्ट्रवीरांच्या त्यागाला वंदन करतानाच त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

भारत चोख प्रत्युत्तर देईल…

पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले, त्यात  पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यात जीव गमालेल्या सर्व भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या प्रति सहसंवेदना व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत या भ्याड हल्ल्याला लवकरच चोख प्रत्युत्तर देऊन दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना कायमची अद्दल घडवेल. या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सामाजिक सलोखा, शांतता, बंधुता, ऐक्य कायम राखावे, ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांची गेल्या अनेक दशकांपासून करण्यात येत होती. त्याअनुषंगाने कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे सर्व समाज घटकांना न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करुन संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो.

विकसित भारत, विकसित महाराष्ट्र…

देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या महाराष्ट्राचा देशाच्या एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात (जीडीपी) साडे तेरा टक्के इतका वाटा आहे. या पार्श्वभूमीवर, विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025-26 या आर्थिक वर्षाचा सात लाख वीस कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.  पूर्वानुभवाच्या बळावर राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करण्याचा कसोशीचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

कृषी हॅकेथॉनचे नवे पाऊल…

कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे नवकल्पक संशोधकांना संधी मिळणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल.

इनविटस्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य…

राज्यात रस्ते आणि पूल आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि भांडवल उभारणीसाठी ‘महा इनविट’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘इनविट’ स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. यामुळे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025जाहीर…

‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण, 2025’ला मान्यता देण्यात आली असून हे धोरण 2030 पर्यंत लागू राहणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी  येत्या पाच वर्षांसाठी सुमारे 2 हजार  कोटी रुपयांच्या निधीच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन आणि वापराला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे, यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे.

पुणे शहर परिसराच्या विकासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यामध्ये  इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांच्या स्वच्छतेसाठी व नदीत होणारे प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. पायाभूत सुविधा हा राज्याच्या प्रगतीचा कणा आहे. राज्यातील मेट्रो, रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून पुणे मेट्रोचे कामेसुद्धा वेगाने सुरु आहे, यामुळे येत्या सार्वजनिक वाहतुकीला गती मिळेल. ‘टेमघर’धरणाच्या गळती प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 488 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

पुणे जिल्ह्याला एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या अंतर्गत जिल्ह्यातल्या 37 ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलच्या माध्यमातून तसेच शासन सहभागातून या ठिकाणचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान 50 हजार जणांना थेट तर 5 लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

स्मारकांची कामे प्रगतीपथावर

क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. राजगुरुनगरच्या शहीद राजगुरु यांच्या स्मारकाचे काम अत्यंत वेगाने सुरु आहे. पुणे शहरातल्या भिडे वाड्यात क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच वस्ताद लहुजी साळवे तसेच वढू बुद्रुक आणि तुळापूर येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्यदिव्य स्मारक चौंडी अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भरघोस निधी

पुणे जिल्हा राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), सन 2025-26 अतंर्गत पुणे जिल्ह्याकरिता 1 हजार 379 कोटी रुपये इतका नियतव्यय मंजूर केला आहे. नियोजन विभागाने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जवळपास 288 कोटींची वाढ त्यात करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजना आणि आराखडा 145 कोटी रुपयांचा आहे, तर आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययामध्ये वाढ करुन 65.46 कोटींचा आराखडा मंजुर केला आहे.

सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची घोडदौड कायम राखताना ‘सुसंस्कृत राज्य’ ही महाराष्ट्राची ओळख आणखी ठळक करण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते पोलीस महासंचालक सन्मान चिन्हप्राप्त पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्माचिन्ह, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष पदक तसेच कामगार विभागातील कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवेसाठी प्रोत्साहनात्मक प्रशस्तीपत्र आणि महसूल विभागातील जिल्हा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाच्या संयुक्त परेड संचलनाचे निरीक्षण केले. यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेवून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

०००

पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०१:  आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या 2 हजार 120 मीटर लांबीच्या पुलाचे उद्घाटन (टप्पा क्र. 2) च्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त एमजे प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी महापौर दत्ता धनकवडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, या पुलामुळे वडगाव, धायरी, नरे, नांदेड आणि खडकवासला येथील वेगाने वाढत असलेल्या परिसराचा वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. इनामदार चौक, हिंजवडी चौक, संतोष हॉल चौक, दत्त हॉटेल चौक आणि गोयेगाव असे पाच चौक ओलांडता येणार असल्यामुळे हवेचे प्रदूषण होणार नाही तसेच वाहतुकीसाठी अर्धा तास कमी होणार आहे. येथून सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत असतात. हा उड्डाणपूल केवळ एक वाहतूक प्रकल्प नसून शहराच्या नवनिर्मितीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहर वाढत असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने पुण्याला मुळशी धरणाचे आणि पिंपरी चिंचवडला ठोकरवाडी धरणाचे पाणी मिळावे, असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मध्यंतरी विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे काम केले. ते देखील कमी पडत असल्यामुळे नवीन विमानतळाचे काम हाती घेतले आहे. काही नाराजी असली तरी जमीन घेतल्याशिवाय, पुनर्वसन केल्याशिवाय विकास होत नाही, असेही त्यांनी नमूद केले.

पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी येरवड्यापासून नवीन बोगदा, ई – वाहने वाढण्याच्यादृष्टीने प्रोत्साहन पर रक्कम देण्यासाठी पुढच्या पाच वर्षांसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातूनही शहरातील पर्यावरणाचा विचार केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने सुविधा देणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुला-मुलींकरता रोजगार निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. टाटा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 350 कोटी रुपयांचा प्रकल्प बाणेर येथे हाती घेतला आहे. यातून येथील मुला मुलींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे प्रशिक्षण रत्नागिरी तसेच गडचिरोली येथे सुरू केले असून छत्रपती संभाजीनगर, बीड येथे सुरू करण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीर येथे घडलेल्या घटनेची बाब अत्यंत गंभीरतेने घेतली असून या घटनेच्या पार्श्वभीवर सुरक्षितता बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हडपसर येथून यवतपर्यंत खालून 6 पदरी आणि वरून चार पदरी उन्नत मार्ग करण्याचा निर्णय कालच मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच वडगाव शेरी पासून वाघोलीच्यापुढे शिक्रापूरपर्यंत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनेही निर्णय घेतला आहे. एक बाह्यवर्तुळ मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळमार्फत आणि दुसरा पुणे महानगर प्रदेश विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अशा पद्धतीने राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून कामे पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न चालू आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, या पुलासाठी सिंहगड रस्त्यावरील रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षाची मागणी होती. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण या पुलाच्या निर्मितीमुळे कमी होईल. पुण्यातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल ठरला. पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येचा, नागरीकरणाचा विचार करता या पुलाची आवश्यकता होती, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले की, पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर करण्यासाठी राज्य शासन, केंद्र सरकार व महानगरपालिकेच्या वतीने अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू झाले आहेत. आज पुण्यामध्ये 32 किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची मेट्रो सुरू आहे. आता खडकवासला ते खराडी या नवीन मेट्रो मार्गालाही राज्य शासनाने मान्यता दिली असून विस्तृत प्रकल्प अहवाल झाले आहेत. पुढील काळामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रोची अंतिम मंजूरी केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मिळवण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये ई – बसेस आणि सीएनजी बसेस मिळून जवळपास पंधराशे नवीन बसेस येत आहेत. 2018-19 मध्ये सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आज उद्घाटन झालेल्या या पुलासह, नदीवरील सनसिटी ते कर्वेनगर पूल तसेच नळ स्टॉप चा दुहेरी उड्डाणपूल असे प्रकल्प हाती घेतले, अशी माहिती त्यांनी दिली.

आज पुण्याचा कायापालट होत आहे. लोकसंख्या, नागरीकरण वाढल्यानंतर नागरी प्रश्न वाढतात मात्र ते सोडवण्यासाठी आधीच काळजी घेण्यात येत आहे. आजही देशात राहण्याचे सर्वात सुरक्षित शहर तसेच पहिली पसंती म्हणून पुण्याचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

पुलाच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह अन्य मान्यवरांनी चार चाकी वाहनातून या पुलावरून प्रवास करून पाहणी केली.

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये

सिंहगड रस्त्यावरुन स्वारगेटकडे येताना वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने तीन टप्प्यात उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले होते. कामाची निविदा 118 कोटी 37 लाख रुपयांची आहे. त्याअंतर्गत टप्पा 1 मध्ये राजाराम पुलाजवळील स्वारगेट कडे जाणारा 520 मी लांब एकेरी उड्डाणपूल ऑगस्ट 2024 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. टप्पा 2 मध्ये विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा 2.2 कि. मी. लांब उड्डाणपूल आज खुला करण्यात आला तर टप्पा 3 च्या इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेटकडे जाणाऱ्या 1.5 कि. मी. लांबीच्या उड्डाणपूलाचे काम 15 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

टप्पा 2 च्या पुलाचे काम प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर पद्धतीने करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी 7.3 मी असून एकूण पिलर 60 आहेत.

०००

ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती, सर्वांगीण सामाजिक विकासासाठी शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ०१ (जिमाका): ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन त्यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पंजाबराव उगले, संजय जाधव, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ. श्रीकांत परोपकारी, शशिकांत बोराटे, सुभाष बुरसे, डॉ.मोहन दहीकर, अमरसिंह जाधव, प्रशांत कदम, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, प्र.उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) सचिन चौधर, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) कार्यकारी अभियंता संजय पुजारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, ममता डिसूझा, तहसिलदार संजय भोसले, उमेश पाटील, रेवण लेंभे, डॉ.आसावरी संसारे, प्रदीप कुडाळ, उज्वला भगत, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, विठ्ठल दळवी, स्मितल यादव, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 66 वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यातील जनतेला मी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना श्रद्धासुमने वाहण्याचा दिवस आहे. या महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडले. बलिदान केले. त्यामागे अनेक दिग्गजांची तपश्चर्या आहे, कर्तृत्त्व आहे. त्या साऱ्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिले त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन आहे. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचे बहुमोल योगदान आहे. त्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत, आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागले आहेत. ही वेळ छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची आहे. एकमेकांमधले हेवेदावे, पक्षभेद, अंतर्गत वाद-भांडणं गाडून देशासाठी एकजुटीने उभे राहण्याची आहे. राष्ट्रकार्याची वेळ आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने बुधवारी घेतला. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाच हे वृत्त येऊन धडकले. मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच देशाला मिळाली, असं म्हणावं लागेल. या निर्णयामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल. या निर्णयामुळे वंचित, शोषित समाज घटकांना न्याय मिळेल. सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल, याची खात्री आहे.

काश्मिरमधले 370 कलम हटवणे असो, माझ्या बहिणींना सत्तेत वाटा देणारे नारी शक्ती वंदन असो, वक्फ बोर्ड सुधारणा कायदा असो. मोदींनी धाडसी निर्णय घेतले.

देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर वन आहे. महाराष्ट्राने आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रात मुसंडी मारली. देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचे मोठे योगदान आहे. पण, मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळे महानगर क्षेत्र सुद्धा यामध्ये येते. ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाली.

ते म्हणाले की, ठाणे हे माझे घर आहे. या जिल्ह्याशी माझा एक ऋणानुबंध आहे. त्यामुळे या जिल्ह्यासाठी विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे दाखवून दिलं. ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या अडीच वर्षात 80 हजार कोटींपेक्षा अधिकचे प्रकल्प मंजूर केले. त्यामुळं पुढच्या दहा वर्षात ठाणे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातला आदर्श जिल्हा बनणार, यात शंकाच नाही. ठाणे जिल्ह्याचे आपल्या अर्थव्यवस्थेतले योगदान 48 बिलियन डॉलरचे आहे. 2030 पर्यंत ते 150 बिलियन डॉलरइतके करायचं आहे. एमएमआरच्या विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओयू झाला आहे. मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार आहे. मुंबईएवढेच पालघर, ठाणे आणि रायगडचंही योगदान असणार आहे.

पुनर्वसन, परवडणारी घरे, जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा, आणि दर्जेदार लाईफ स्टाईल, असा ठाणे जिल्ह्याचा चौफेर विकास करायचाय. देशातले सगळ्यात मोठे ट्रांसफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं स्वप्न मी पाहिलं आहे. आपलं सरकार ते कोणत्याही परिस्थितीत साकार करणार आहे. ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे तब्बल 34 इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल, फ्लायओव्हर्सचा समावेश आहे, त्यासाठी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे. ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाली आहे.

माझ्याकडे गृहनिर्माण, नगर विकास यासारखी महत्त्वाची खाती आहेत. आम्ही लवकरच नवीन क्रांतिकारी गृहनिर्माण धोरण आणतोय. येत्या पाच वर्षात आठ लाखापेक्षा जास्त घरं बांधणार आहोत. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पाही जवळजवळ पूर्ण झाला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचे कामही 96 टक्के पूर्ण झाले आहे. शासन म्हणजे एकटे मंत्री आणि आमदार नसतात तर प्रशासन हे या शासनाच्या रथाचं महत्त्वाचं चाक आहे. मी जिल्हा प्रशासनाचेही कौतुक करतो. ठाणे जिल्हा तर उद्योगांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राने गेल्या दोन वर्षात 10 हजार 61 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 150 सामंजस्य करार केले. त्यातून एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. ठाणे शहराला 32 कि.मी. चा सागरी किनारा असून, 11.90 कि. मी. सागरी किनारा विकासाचे नियोजन केले आहे. त्यातही, 5.30 कि. मी. चा प्रकल्प पूर्ण झाला आहे. 14 हजार क्षमतेचं भव्य असे कन्वेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बंधू भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणेसाठी सीएसआरच्या माध्यमातून दिव्यांग कल्याण केंद्र उभारले आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे पालिकेचा चौथा क्रमांक आलाय. यंदा यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळणारे सातही विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या कै. सी. डी. देशमुख प्रशासकीय संस्थेचे आहेत. त्यांचे यश आम्हा सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे.

शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा मध्ये ठाणे पालिकेचा पहिला क्रमांक आला आहे. त्यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उमेद अंतर्गत लखपती दीदी योजनेत ठाणे ठाणे जिल्ह्याने शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. सुमारे 47 हजार स्वयंसहाय्यता गटांतील महिलांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांहून अधिक झाले आहे. मोबाईल मेडिकल युनिट कार्यक्रमात ठाण्याला पारितोषिक मिळालंय. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान मध्ये कुटुंबांना घरकुल देण्यासाठी मिशन मोडवर कामकाज करण्यात आले. स्मार्ट पीएचसी आणि स्मार्ट स्कूल उभारली जात आहेत. मीरा-भाईंदर येथे दिवाणी तर ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचेही लोकार्पण नुकतेच संपन्न झाले.

ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काही आव्हानं सुद्धा मला दिसतात. जिल्ह्यातल्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी काळू धरण कालमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश दिले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपले महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा, भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत. त्यासाठी कविवर्य सुरेश भट यांच्या ओळी मला कायम प्रेरणा देतात.. गे मायभू तुझे मी फेडिन पांग सारे आणीन आरतीला ते सूर्य चंद्र तारे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे शेवटी म्हणाले.

ध्वजवंदनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उघड्या जीपमधून परेड निरीक्षण केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध शासकीय विभागांच्या उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विविध पथकांनी संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. तसेच शीघ्र प्रतिसाद रुग्णवाहिकांचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचलन वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुलता धनके यांनी केले.

०००

१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग

  • गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव

मुंबई, दि ०१:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.

भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत या मोहिमेचे मूल्यांकन करण्यात आले. वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले की , “ही मोहिम म्हणजे केवळ व्यवस्थापन नाही, तर उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकहितासाठी कार्यक्षम प्रशासनाचे प्रतिबिंब आहे. या उत्कृष्ट अधिकाऱ्यांनी इतरांसमोर आदर्श निर्माण केला आहे.”

शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील.

एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.

या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालय, अधिकारी यादी पुढीलप्रमाणे, कंसात टक्केवारी दिली आहे.

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी

ठाणे (९२.००), नागपूर (७५.८३), नाशिक (७४.७३), पुणे (७४.६७), वाशिम (७२.००)

सर्वोत्तम महापालिका आयुक्त

उल्हासनगर (६५.२१), पिंपरी-चिंचवड (६५.१३), पनवेल (६४.७३), नवी मुंबई (६४.५७)

सर्वोत्तम पोलिस आयुक्त

मीरा भाईंदर (६८.४९), ठाणे (६५.४९), मुंबई रेल्वे (६३.४५)

सर्वोत्तम विभागीय आयुक्त

कोकण (७५.४३), नाशिक (६२.२१), नागपूर (६२.१९)

सर्वोत्तम पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक

कोकण (७८.६८), नांदेड (६९.८७)

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग

महिला व बाल विकास (८०.००),  सार्वजनिक बांधकाम विभाग (७७.९४), कृषी (६६.५४), ग्रामविकास (६३.५८), परिवहन व बंदरे (६२.२६)

सर्वोत्तम आयुक्त / संचालक

संचालक, तंत्र शिक्षण (७७.१३), आयुक्त, जमाबंदी (७२.६६), आदिवासी विकास (७२.४९), राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (७०.२८), वैद्यकीय शिक्षण (६८.५३)

सर्वोत्तम जिल्हाधिकारी

चंद्रपूर (६८.२९), कोल्हापूर (६२.४५), जळगाव (६०.६५), अकोला (६०.५८), नांदेड (५६.६६)

सर्वोत्तम पोलिस अधीक्षक

पालघर (७०.२१), जळगाव (६०.००), नागपूर ग्रामीण (६०.००), गोंदिया (५६.४९), सोलापूर ग्रामीण (५६.००)

या यादीत चंद्रपूर, ठाणे, पुणे, उल्हासनगर, मीरा भाईंदर, पालघर, गोंदिया, नांदेड, कोल्हापूर, अकोला यांसारख्या जिल्ह्यांतील कार्यालयांनी लक्षणीय गुण मिळवत इतरांसमोर उत्तम आदर्श ठेवला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.  त्यांनी म्हटले आहे की “या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. गुणवत्ता मोहिम एक सुरूवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

०००

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजवंदन

मुंबई, दि. ०१: महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी पालकमंत्री शेलार यांच्या  हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री ॲड. शेलार म्हणाले, दुर्धर व्याधींवर खर्चिक उपचार घेण्याची क्षमता नसणाऱ्या रुग्णांना सहाय्य मिळविण्यासाठी मंत्रालयात जाऊन प्रत्यक्ष अर्ज करावा लागे. पंरतु, आता 01 मे, 2025 पासून या कक्षाची सुविधा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होत आहे. लवकरच ही सेवा ऑनलाईन स्वरुपात सुरु होणार असून यामध्ये वैद्यकीय लाभाच्या विविध शासकीय योजनांची सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था या कक्षामध्ये उपलब्ध होत आहे.

या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, समाज विकास अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमित उपलब्ध असणार आहेत. या कक्षाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शेलार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीपाद टाकळीकर, तहसीलदार राजेंद्र चव्हाण  व इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

०००

‘विकसित भारता’च्या निर्माणासाठी प्रगत महाराष्ट्र घडवूया – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. ०१: राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. भारताच्या अमृत काळामध्ये भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय साध्य करताना  महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे असेल. महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी आपण सर्वांनी काम करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मल्लिकार्जुन प्रसन्न, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, आदी यावेळी उपस्थित होते. यावेळ राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायनाने मानवंदना देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करीत राज्यपाल म्हणाले, राज्य शासनाने काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या. राज्य शासनाने सर्व विभागांना लोककल्याणकारी लक्ष केंद्रित करणारे उपक्रम जलद गतीने राबविण्यासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले असून  यामध्ये समाविष्ट बाबींमध्ये विभागांनी समाधानकारक काम केले आहे.

सुरक्षित व उद्योगस्नेही महाराष्ट्र

राज्यपाल यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे सुरक्षा मंडळ तसेच महाराष्ट्र सायबर सुरक्षा धोरण व कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण विकसित करण्यासाठी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, तर महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. स्वित्झर्लंडच्या दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य शासनाने 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांच्या 63 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांमुळे राज्यात 15 लाख 95 हजार 960 रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

स्टील, माहिती तंत्रज्ञान, हरित ऊर्जा, ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रिक वाहने, वस्त्रोद्योग, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि संरक्षण, जैवतंत्रज्ञान, औषध निर्मिती, पायाभूत सुविधा, ड्रोन उत्पादन, शिक्षण आदी विविध क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने तेथे नऊ स्टील उत्पादन प्रकल्पांना देकारपत्रे दिली आहेत. या उपक्रमामुळे एक लाख 60 हजार 238 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल आणि जवळपास 50 हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्यात 78 उद्योग घटकांना देकारपत्रे देण्यात आली असून त्यामुळे सुमारे सहा लाख 55 हजार 84 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सुमारे दोन लाख 47 हजार 400 लोकांना रोजगार मिळणार आहे, असेही राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.

कल्याणकारी योजनांचा लाभ आणि शेतकऱ्यांना दिलासा

राज्यपाल म्हणाले, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी कुटुंबास राज्य शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अडचणीमध्ये आलेल्या धान उत्पादक नोंदणीकृत शेतकऱ्यांना मदतीच्या दृष्टीने 2024-25 या हंगामासाठी प्रती हेक्टर 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर राशी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 31 लाख 36 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना 3,389 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मागील हंगामात 11.21 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली असून, ही देशातील सर्वाधिक खरेदी असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी ‘नमो दिव्यांग अभियान’ राबविण्यात आले असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक अंतर्गत राज्यात 12 लाख 69 हजार 785 म्हणजेच 93.6 टक्के घरे पूर्ण झाली आहेत. तर, दुसऱ्या टप्प्यात 18 लाख 47 हजार 291 घरे प्रगतीपथावर आहेत. राज्याने नुकतेच सुधारित वाळू निर्गती धोरण जाहीर केले आहे.

सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी

राज्य शासनाने मुंबईत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णयही घेतला आहे. महाराष्ट्रातील सागरी किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळावा, यासाठी  शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. हरियाणातील पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ बांधण्याचा निर्णयही  शासनाने घेतला आहे. तसेच आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत असलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही राज्यपाल म्हणाले.

शिक्षण व क्रीडा विकास

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे .उत्तराखंड येथे झालेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 201 पदके जिंकली आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 31 खेळाडूंची शासकीय सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा केली जात आहे.

मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला. यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक यांनी सहभाग घेतला.

०००

 

 

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजवंदन

मुंबई, दि. ०१: महाराष्ट्र राज्य 66 व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे सनई-चौघडा व तुतारीच्या निनादात पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या जनआंदोलनातील सर्व नेत्यांच्या त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून या जनआंदोलनात हौतात्म्य प्राप्त झालेल्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी अभिवादन केले.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम रहावा, यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे. राज्यातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या  गोळीबारात मृत्यमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

ध्वजवंदन सोहळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये, सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी राजेश तारवी, सह सचिव नागनाथ थिटे, उप सचिव सुभाष नलावडे यांच्यासह विधानमंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ आणि राखीव पोलीस उपनिरीक्षक अरुणा जॉन्सन बुरकेन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

०००

 

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त राजभवन येथे ध्वजवंदन

मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे ध्वजवंदन करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...