रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 247

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 8 :- “मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, महाराष्ट्राच्या हितरक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. लालबाग, परळ भागातल्या वास्तव्यामुळे मुंबईतील कामगार चळवळीबद्दल त्यांना विशेष आस्था होती. शिवसेनेचा आणि कामगार चळवळीचा उत्कर्षाचा काळ त्यांनी जवळून अनुभवला होता. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी सर्वस्पर्शी विपुल लेखन केलं. त्यांनी केलेले वार्तांकन, लिहिलेले लेख, पुस्तके ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा, समृद्ध जडणघडणीचा मोलाचा दस्तावेज आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचा विश्वासू शिलेदार आपण आज गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

शासकीय आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक ऊईके

◆ विद्यार्थ्यांशी साधला संवाद

◆ आश्रमशाळेतील सोई-सुविधांची केली पाहणी

यवतमाळ, दि.७ (जिमाका) : ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक ऊईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोई-सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु, असे ते यावेळी बोलतांना म्हणाले.

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रकल्प अधिकारी अमीत रंजन, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, बोटोणीच्या सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेत आगमण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना त्यांनी आश्रमशाळा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बनविण्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांला आश्रमशाळेत टाकतांना येथे उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध होते, अशी भावना पालकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळांचे अधिक्षक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न व अध्यापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्याचा आदिवासी विभाग नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देणारा विभाग बनवू, असे डॉ.ऊईके यावेळी म्हणाले.

राज्यातील ४९७ आश्रमशाळांमध्ये, लोकप्रतिनिधी, अधिकारी मुक्कामी

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या सर्व ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुक्कामाला आहे. अनेक ठिकाणी आदिवासी खासदार, आमदार यांनी देखील मुक्काम केला. बोटोणी येथील आश्रमशाळेतूनच डॉ.ऊईके यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये मुक्कामी असलेल्या खासदार, आमदार व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भोजन, निवास व सोई-सुविधांची पाहणी

विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री डॉ.ऊईके यांनी रात्री वसतिगृहातील स्वयंपाकघर, धान्यसाठा गृह, विद्यार्थी व विद्यार्थीनींची निवास व्यवस्थेची पाहणी केली. आश्रमशाळेत तयार झालेले भोजन विद्यार्थ्यांसह पंगतीत बसून घेतले. विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ, कोलामी नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे मंत्री डॉ. उईके यांनी कौतूक केले.

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

मुंबई, दि. ७: केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकूण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.

वाहनांचे प्रदूषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

000

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवावी

मुंबई, दि. ७ : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.

वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

000

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई, दि. ७ : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.

मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये १० लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार- मानपत्र, सन्माचिन्ह व रूपये ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार- मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये २ लाख असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठी भाषा मंत्री सामंत यांनी बीकेसी येथे पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात या पार्श्वभूमीवर यंदापासून हे पुरस्कार गेट वे ऑफ इंडिया समोर दिमाखदार सोहळ्यात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी नामवंत साहित्यिकांची समिती नेमण्यात असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाङमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर  यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नसल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नसल्याची माहीती यावेळी देण्यात आली.  तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना घोषित करण्यात आला आहे. या प्रौढ वाङमय प्रकारातील प्रत्येक पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नसल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला असल्याचे मराठी मंत्र्यांनी घोषित केले. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.

या दिमाखदार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार  आहे. याचबरोबर २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाचे ‘कवितांचे गाव’ म्हणून उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले.

त्याचबरोबर रत्नागिरी येथील कवि केशवसूत यांच्या मालगुंड यास ‘पुस्तकाचे गाव’ करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे मराठी भाषा मंत्र्यांनी जाहीर केले. कवितांचे गाव या संकल्पेनुसार शिरवाड गावातील ३५ घरांमध्ये वाचनालय निर्माण करून तेथे कवितांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे आणि ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पेत गावातील ३५ घरांमध्ये प्रत्येक एक हजार नवी कोरी पुस्तके ही लहान मुले, युवक आणि प्रौढांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेतील निधी गुणवत्ता पूर्ण कामांवरच खर्च करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

  •  पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचे आराखडे अंतिम

पुणे, दि. ०७ : गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता यावर्षी हा निधी वाढवून २० हजार कोटी रुपये करण्यात येणार आहे, त्यामुळे वाढीव निधीच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वाढवून देण्यात येईल. पण दिलेला सर्व निधी विहित मुदतीत,  गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल याची काटेकोर दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५-२६ चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे झाली. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार विशाल पाटील, म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, आमदार सदाभाऊ खोत,  इद्रिस नायकवडी, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, सुहास बाबर, रोहित पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार नारायण पाटील, आमदार राहुल आवडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त शितल उगले तेली, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सांगली महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जितेंद्र डुडी, अमोल येडगे, कुमार आशीर्वाद, डॉ. राजा दयानिधी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे,  संजय कोलगणे उप आयुक्त नियोजन तर सांगली जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५- २६ करिता नियोजन विभागामार्फत किमान नियतव्यय जिल्हा निहाय कळविण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वित यंत्रणांकडून निधी मागणी नियमित योजनांसाठी करण्यात आली आहे. पुणे विभागातील जिल्ह्यांच्या कार्यान्वित यंत्रणांनी केलेल्या अतिरिक्त मागणीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार निधी मंजुरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली.

यावेळी सातारा जिल्ह्याचा कमाल नियतव्यय ४८६ कोटी २५ लाखाचा असून अतिरिक्त मागणी २३८ कोटी ७५ लाखाची आहे. सांगली जिल्ह्याचा किमान कमाल नियतव्यय ४३० कोटी ९७ लाखाचा असून अतिरिक्त मागणी २१८ कोटीची आहे. सोलापूर जिल्ह्याचा कमाल नियतव्यय ६६१ कोटी ८९ लाखाचा असून २०० कोटीची अतिरिक्त मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा कमाल नियतव्यय ५१८ कोटी ५६ लाखाचा असून अतिरिक्त मागणी ४२१ कोटी ४७ लाखाची आहे. पुणे जिल्ह्याचा कमाल नियतव्यय १०९१ कोटी ४५ लाखाचा असून अतिरिक्त मागणी ७०० कोटींची आहे. असा एकूण पुणे विभागातील जिल्ह्यांचा कमाल नियतव्यय ३१८९ कोटी १२ लाखाचा असून १७७८ कोटी २२ लाखाची अतिरिक्त मागणी आहे. या सर्व मागणीचा सविस्तर आढावा घेऊन भरीव निधीची तरतूद करण्यात येईल असे सांगितले.

जिल्ह्यांचा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ चा अंतिम अर्थसंकल्पीत नियतव्यय हा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कळवण्यात येतो,  याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून चालू वर्षाच्या तुलनेत कमी नियतव्यय असला तरी अतिरिक्त मागणीप्रमाणे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मागील तीन वर्षातील जिल्ह्यांच्या नियमीत योजनेअंतर्गत, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत, पूर्ण झालेल्या उत्कृष्ट कामांचे सादरीकरण सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा नियोजन समितींना नियोजन विभागामार्फत कळविण्यात आलेला कमाल नियतव्यय व जिल्ह्याची अतिरिक्त मागणी यामध्ये बदल होऊ शकतो असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हास्तरीय मागणीप्रमाणे विद्युत विकास, ग्रामीण विकास, ग्रामीण रस्ते, सार्वजनिक आरोग्य याशीर्षां अंतर्गत योजनांना जास्तीत जास्त तरतूद देण्यात आली आहे. शिक्षण, गड, किल्ले, महिला व बालकल्याण महसूल व पोलीस प्रशासन यांना शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेप्रमाणे निधी प्रस्तावित केला आहे. यासोबतच शाश्वत विकास ध्येयांसाठी सूक्ष्म प्रकल्प राबविण्यासाठी विहित केलेला एक टक्के निधी प्रस्तावित केला आहे.  त्यामुळे या महत्त्वाच्या विकास क्षेत्रांना निश्चित निधी उपलब्ध होत आहे.

जिल्हा नियोजनांचा निधी स्थानिक महत्त्वाच्या योजनांना देण्यात आला असला तरी मोठ्या योजनांना राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल,  तसा प्रस्ताव तयार करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बैठकीत निर्देश देण्यात आले.

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांनी सादर केलेल्या जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण)च्या प्रारूप आराखड्यांचा सविस्तर आढावा घेत असताना श्री. अजित पवार म्हणाले,  जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे.  त्यामुळे उपलब्ध करून दिलेला सर्व निधी गुणवत्तापूर्ण  कामांवरच खर्च होईल, याची यंत्रणांनी काटेकोर दक्षता घ्यावी. फेब्रुवारी अखेर जिल्ह्यांना ८० टक्के निधी प्राप्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मार्च अखेर शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल. यंत्रणांनी निधीचे वितरण व्यवस्थित करावे तसेच हा निधी वायफळ कामांवर खर्च होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, टप्प्याटप्प्याने शासनाची सर्व प्रमुख कार्यालये सौर उर्जेवर आणण्यासाठीच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यालय व दुसऱ्या टप्प्यांमध्ये तालुकास्तरीय कार्यालय सौर उर्जेवर आणावीत. पानंद रस्ते खुले करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या.

पुणे जिल्ह्यातील विकास कामे आणि कल्याणकारी योजनांठी भरीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

जिल्ह्याचा सन २०२५-२६ चा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आराखडा हा १ हजार ७९१ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. राज्य शासन जिल्ह्यातील विकास कामे तसेच कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भरीव निधीची तरतूद करेल. तसेच केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

२०२४-२५ च्या मंजूर नियतव्ययाचा खर्चाचा आढावा

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन २०२४-२५ च्या मंजूर नियतव्ययाचा खर्चाचा आढावा घेतला. सर्वसाधारण योजनेतून जिल्ह्याला सन २०२४-२५ साठी १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे.

१ हजार ७९१ कोटी रुपयांचा आराखडा

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सादरीकरण करुन जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी १ हजार ७९१ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. यात १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा कमाल नियतव्यय व ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीचा समावेश आहे.

आराखड्यांतर्गत प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक शाळांकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणे, अंगणवाड्यांचा विकास, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, उपकेंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण, पुणे जिल्हा एकात्मिक पयर्टन विकास आराखडा, लघु पाटबंधारे योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ग्रामपंचायतींसाठी जनसुविधा, नागरी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा, अपारंपरिक ऊर्जा, परिवहन, पानंद रस्ते खुले करणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

आदर्श शाळा, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवावा

पुणे जिल्ह्यात ३०३ प्राथमिक शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माझी शाळा आदर्श शाळा’, १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून हे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी शासकीय निधीसोबतच कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) मधूनही निधी उपलब्ध करुन घ्यावा. जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी डूडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सादरीकरण केले.

एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा

पुणे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर शहर व जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ऐतिहासिक  ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गड किल्ले, स्मारके पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. जेणेकरुन जिल्हा नियोजन समितीच्या निधीची बचत होऊन तो अन्य विकासकामांसाठी उपयोगात आणता येईल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले. शासकीय इमारती, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी सौर छत योजना प्राधान्याने राबविण्यात यावी, असेही ते म्हणाले.

सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या संकल्पना त्यांनी जाणून घेतल्या. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मानिनी हा स्वतंत्र व प्रशस्त मॉल उभारण्यात येत आहे, या संकल्पनेचे कौतुक केले. अन्यत्रही ही संकल्पना राबवावी असे सांगितले.

यावेळी त्यांनी माण, खटाव, फलटणचा काही भाग उजाड आहे, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत. त्यामुळे वीज बिलात मोठी कपात होईल, असे सांगितले. तसेच सातारा जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये प्रस्तावित करण्यात येत असलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली यामध्ये कृषी पर्यटनामध्ये थीम आधारित गावे विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासह निर्यातक्षम फळबाग उत्पादन प्रकल्प, नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या गाई व म्हशींना लिंग विनिश्चित वीर्यमात्रा उपलब्ध करून देणे, डे केअर केमोथेरपी युनिट, महिला केंद्रित कर्करोग अभियान आदी उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माहिती दिली.

माझी शाळा, आदर्श शाळा उपक्रमांतर्गत सीएआर मधून शाळांची संख्या वाढवावी. आदर्श शाळा करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा. पथदिवे, पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा विद्युत पुरवठा सौरऊर्जा प्रकल्पांवर व्हावा, जी गावे अद्यापही मुख्य रस्त्यांशी जोडली गेली नाहीत, अशी गावे काँक्रीट रस्त्याने जोडा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ सर्वसाधारण अंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याने अतिरिक्त २०० कोटीच्या निधीची मागणी केलेली असून त्यांना यातील जास्तीत जास्त वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी दिव्यांगासाठी ठेवण्यात येणार आहे,असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या २०० कोटीच्या निधीतून जास्तीत जास्त निधी सोलापूर जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी मिळावा अशी मागणी केली. तसेच सन २०२४-२५ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ६० टक्के निधी प्राप्त झालेला असून उर्वरित ४० टक्के निधी लवकरात लवकर देण्याची मागणी ही यावेळी त्यांनी केली.

शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, नगरविकास, जनसुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींकरीता २०० कोटींची अतिरिक्त मागणीचा पुरक आराखडा सादर केल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक प्रारूप आराखडा अंतर्गत मंजूर २८२ कोटीच्या निधीतून उजनी धरण जलपर्यटन, विनयार्ड पर्यटन, कृषी व धार्मिक पर्यटन अंतर्गत सद्यस्थिती बाबत तसेच पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्कायवॉक उभारण्यात येणाऱ्या १२९.४९ कोटी रुपयांच्या कामाची सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचे सन २०२५-२६ चे कमाल नियतव्यय  ५१८.५६ कोटी रुपयांचे असून ४२१. ४७  कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे श्री. पवार म्हणाले.

जिल्ह्यातील गडकिल्ले, शासकीय इमारत, शाळा, महाविद्यालयात, तलाव परिसरात स्वच्छता ठेवावी.  भुदरगड किल्ल्यावर हवामानानुरूप जगणाऱ्या स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करावे. युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकित पन्हाळा किल्ला परिसर विकासाकरिता ५० कोटी रुपयांचा निधी तसेच शाळेच्या भौतिक सुविधा करण्याकरिता नियोजित समृद्ध विद्यामंदीर उपक्रमाकरिता विशेषबाब म्हणून तिरिक्त ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या इमारतीची देखभाल दुरुस्तीकरिता उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे. महानगरपालिकेने हद्दवाढ करण्याची कार्यवाही करावी. राज्य शासनाच्यावतीने अत्याधुनिक साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रंकाळा तलावात अशुद्ध पाणी जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो, प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधीना विश्वासात घेवून जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीने  निधीच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी कामे करावीत. विकास आराखड्याकरीता संकल्पना स्पर्धा आयोजित करुन उत्तम आराखड्याची निवड करावी.  जिल्ह्याच्या विकास कामाकरिता निधी कमी पडू देणार नाही, निधीचा पुरेपूर उपयोग करावा, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

सहपालकमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात महिलांसाठी शौचालयाचे बांधकाम करावे, अशी मागणी केली.  आमदार श्री. आवाडे यांनी विकास कामाच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या.

जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी चालू वर्षाचा नियोजन आराखडा आणि आतापर्यंत झालेल्या खर्चाची स्थिती याबाबत आढावा सादर केला. यावेळी  जिल्ह्यात समृद्ध विद्यामंदीर उपक्रमाअंतर्गत शाळेत भौतिक सुविधा, मिशन विद्या किरणअंर्तगत १ हजार ९५८ शाळा सौर शाळा, मिशन कन्या सुविधा योजनेंअतर्गत मुलांकरीता नवीन शौचालय व जुन्या शौचालयाची दुरुस्ती, समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत आरोग्य केंद्रात भौतिक सुविधा, समृद्ध अंगणवाडी केंद्र,  मंडळ तेथे ग्रंथालय, राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन व विश्रामगृह नुतनीकरण, किल्ले पन्हाळा परिसर विकास, मेन राजाराम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नुतनीकरणाची कामे करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती श्री. येडगे यांनी दिली.

सांगली महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिले. जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात दिलेला निधी विहित वेळेत खर्च करावा, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, माझी शाळा, आदर्श शाळा उपक्रमासाठी शासनाकडून निधी देऊ. केंद्र शासनाच्या योजनांचा अधिकाधिक निधी जिल्ह्यात येईल, यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. शासकीय इमारती व महापालिका क्षेत्रातील पथदिवे व पाणीयोजनांची विजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, सौरउर्जेसाठी गायरान जमीन देताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. मोठे क्षेत्र सौरउर्जेसाठी देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

०००

भिमाशंकर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०७: भिमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामे मंदिराचे ऐतिहासिक रुप जपत दर्जेदार होतील अशा पद्धतीने करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले.

विधानभवन येथे भिमाशंकर विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

श्री क्षेत्र पंढरपूर, शिर्डी तसेच श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानाच्या धर्तीवर भिमाशंकर येथील कामे मंदिराचे आणि परिसराचे ऐतिहासिक रुप जपत करावीत. त्यासाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी तसेच वास्तुविशारदांनी सादर केलेल्या प्रस्तावित आराखड्याच्या चित्रफीतीचे तसेच सादरीकरणाचे अवलोकन करुन त्यांनी विविध सूचना केल्या. तसेच त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना घ्याव्यात, असेही उपमुख्यमंत्री श्री..पवार म्हणाले.

भिमाशंकर विकास आराखडा यापूर्वी १४८ कोटी रुपयांचा करण्यात आला होता. त्यापैकी ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि, ही कामे अधिक एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डूडी यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले.

कुकडी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतांसाठी प्रयत्न करावेत

उपमुख्यमंत्री श्री. पवार यंच्या अध्यक्षतेखाली, कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणातून कळमजाई उपसा सिंचन योजना राबविण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

या उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पाटबंधारे विभागाने राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडे प्रयत्न करावेत. मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठी आवश्क ती निधीची तरतूद करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.

०००

महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक

नागपूर,दि.०७ : महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीत नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करु, असे सांगितले.

या बैठकीस कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर. तिरमनवार, तापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे.डी.बोरकर, कोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकास तज्ज्ञ रागेश्री बोस व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तापी रिचार्ज योजनाबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती सिंचन विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.

000

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.

मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.

२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

मुंबई, दि. ०७: केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.वाहनांचे प्रदुषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...