बुधवार, मे 21, 2025
Home Blog Page 238

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), येथे अभिरुप मुलाखत कार्यक्रम – २०२४

मुंबई, दि.8:- राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्रातील संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता अभिरूप मुलाखतींचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले. यूपीएससी परीक्षेतील महाराष्ट्रातील उमेदवारांचा उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढावा हा यामागील उद्देश असल्याचे,  राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. भावना पाटोळे यांनी सांगितले.

या अभिरूप मुलाखतीसाठी पॅनल सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, अतिरिक्त पोलिस महानिदेशक विश्वास नांगरे पाटील, लोहमार्ग पोलीस आयुक्त, मुंबई डॉ. रवीद्र शिसवे, मुख्य आयकर आयुक्त, जयंत जव्हेरी, झोनल विकास आयुक्त, सेझ महाराष्ट्र गोवा दीव दमण, दादरा नगर हवेली ज्ञानेश्वर पाटील, संचालक, अणुविभाग नितीन जावळे, अक्षय पाटील (आयकर विभाग), माजी आय.आर.एस. व आय.पी.एस. अधिकारी विकास अहलावत, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा तसेच ए.आर.ओ.सी मध्ये कार्यरत रुजुता बनकर तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तज्ञ प्रा. भूषण देशमुख आदी उपस्थित होते.

या मुलाखतीचा लाभ 22 विद्यार्थ्यांनी घेतला असून या यूपीएससी अभिरूप मुलाखतीचा पुढील टप्पा ऑनलाईन स्वरूपात होणार असल्याचे संचालक डॉ. पाटोळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे विविध सोडतीची बक्षीसे जाहीर

मुंबई दि.8:- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात 5 मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. माहे जानेवारी- 2025 मध्ये 3 जानेवारी 2025  रोजी महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष (भव्यतम), 7 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र सह्याद्री, 11 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी नाताळ विशेष, 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गौरव, 18 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व 25 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती दुपारी 4.00 वाजता काढण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र नाताळ नवीन वर्ष भव्यतम सोडत तिकीट क्रमांक NY-07/3054 या चिराग एन्टरप्राइजेस, नाशिक यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रुपये 25 लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षीस जाहीर झाले आहे.  तसेच महा.सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी  या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रुपये 7 लाखाचे प्रथम क्रमांकाची एकूण 8 बक्षिसे जाहीर झाली आहेत. जानेवारी 2025 मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून 16227 तिकिटांना रुपये  81,51,050/- व साप्ताहिक सोडतीतून 57501 तिकिटांना रुपये 2,20,10,900/- बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व खरेदीदारांना महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रु.10,000/- वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी या कार्यालयाकडे तसेच रक्कम रुपये 10,000/- या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्याबाबत आवाहन उपसंचालक, महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी केले आहे.

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याबाबत आवाहन

मुंबई दि.8:-. मुंबई शहर जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.inwww.ksb.gov.in या दोन्ही संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे. तसेच रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ओळखपत्र, पाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारले जाणार नाही, मुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

महापोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:

  1. ओळखपत्र,2. डिस्चार्ज बुक, 3. आधार कार्ड, 4. पी.पी.ओ. (PPO), 5. पॅन कार्ड, 6. पासपोर्ट साईज फोटो, 7. पेन्शन बँक पासबुक, 8. ई.सी. एच. एस. कार्ड, 9. ई-मेल आयडी
  2. दूरध्वनी क्रमांक

अधिक माहितीसाठी क्रमांक 022- 22700404 / 8591983861 या कार्यालयीन दूरध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या ठाणे येथे मोबाईल व्हॅन, रुग्णवाहिकांचे लोकार्पण

मुंबई, दि. 8 : राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी रविवार दि. 9 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे.

नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे दुपारी १ वाजता या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८ कर्करोग मोबाईल व्हॅन, ७ ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, १०२ क्रमांकांच्या ३८४ रुग्णवाहिका, २ सीटी स्कॅन मशीन, ८० डिजिटल हँड हेड एक्स-रे मशीनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच राज्यात ६ डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने राज्यातील आठ मंडळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही यामध्ये सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. या सुविधांमुळे राज्यातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्याला प्रतापराव गणपतराव जाधव, केंद्रीय आयुष मंत्रालय राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यांच्यासह या कार्यक्रमाला वन मंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार बाळ्यामामा म्हात्रे विशेष निमंत्रित असून स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार दौलत दरोडा, आमदार संजय केळकर, आमदार कुमार आयलानी, आमदार महेश चौगुले, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार किसन कथोरे, आमदार मंदा म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार रईस शेख, आमदार सुलभा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव विरेन्द्र सिंह, आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना श्रद्धांजली

मुंबई, दि.८ :-  निर्भिडता आणि व्यासंग यांचा मिलाफ असलेले, मराठी पत्रकारितेतील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार, संपादक पंढरीनाथ सावंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, सावंत यांनी मराठी पत्रकारितेत आपल्या लेखन शैलीने ओळख निर्माण केली. प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना सहवास लाभल्याने, त्यांना रोखठोक भूमिका मांडण्याचा वसा मिळाला होता. सावंत यांनी आंतरराष्ट्रीय विषयांवरही नेमकेपणाने चित्रण केले. त्यांचा हा व्यासंग आणि निर्भिडता पत्रकारितेतील नव्या पिढीसह, अनेकांना मार्गदर्शकच राहील. त्यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. सावंत यांच्या आत्म्यास शांती लाभो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी गमावला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 8 :- “मुंबईतील गिरणगावात वाढलेले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श लाभलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत महाराष्ट्राच्या गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘मार्मिक’चं कार्यकारी संपादकपद प्रदीर्घकाळ भूषवताना मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचे रक्षण, महाराष्ट्राच्या हितरक्षणाला त्यांनी प्राधान्य दिलं. लालबाग, परळ भागातल्या वास्तव्यामुळे मुंबईतील कामगार चळवळीबद्दल त्यांना विशेष आस्था होती. शिवसेनेचा आणि कामगार चळवळीचा उत्कर्षाचा काळ त्यांनी जवळून अनुभवला होता. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी सर्वस्पर्शी विपुल लेखन केलं. त्यांनी केलेले वार्तांकन, लिहिलेले लेख, पुस्तके ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा, समृद्ध जडणघडणीचा मोलाचा दस्तावेज आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडे त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. आज त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांचं निधन ही महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचा विश्वासू शिलेदार आपण आज गमावला आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

शासकीय आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक ऊईके

◆ विद्यार्थ्यांशी साधला संवाद

◆ आश्रमशाळेतील सोई-सुविधांची केली पाहणी

यवतमाळ, दि.७ (जिमाका) : ‘संवाद चिमुकल्यांशी’ अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक ऊईके यांनी यवतमाळ जिल्ह्यातील बोटोणी या शासकीय आश्रमशाळेत मुक्काम केला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोई-सुविधांची पाहणी केली. आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु, असे ते यावेळी बोलतांना म्हणाले.

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रकल्प अधिकारी अमीत रंजन, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, बोटोणीच्या सरपंच सुनिता जुमनाके, उपसरपंच प्रविण वनकर व आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आश्रमशाळेत आगमण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलतांना त्यांनी आश्रमशाळा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण बनविण्यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांचा आश्रमशाळेबद्दल असलेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांला आश्रमशाळेत टाकतांना येथे उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध होते, अशी भावना पालकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळांचे अधिक्षक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न व अध्यापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्याचा आदिवासी विभाग नागरिकांना सर्वोत्तम सुविधा देणारा विभाग बनवू, असे डॉ.ऊईके यावेळी म्हणाले.

राज्यातील ४९७ आश्रमशाळांमध्ये, लोकप्रतिनिधी, अधिकारी मुक्कामी

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. या सर्व ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुक्कामाला आहे. अनेक ठिकाणी आदिवासी खासदार, आमदार यांनी देखील मुक्काम केला. बोटोणी येथील आश्रमशाळेतूनच डॉ.ऊईके यांनी राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये मुक्कामी असलेल्या खासदार, आमदार व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भोजन, निवास व सोई-सुविधांची पाहणी

विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंत्री डॉ.ऊईके यांनी रात्री वसतिगृहातील स्वयंपाकघर, धान्यसाठा गृह, विद्यार्थी व विद्यार्थीनींची निवास व्यवस्थेची पाहणी केली. आश्रमशाळेत तयार झालेले भोजन विद्यार्थ्यांसह पंगतीत बसून घेतले. विद्यार्थ्यांनी यावेळी गोंधळ, कोलामी नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे मंत्री डॉ. उईके यांनी कौतूक केले.

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

मुंबई, दि. ७: केंद्र शासनाच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकूण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.

वाहनांचे प्रदूषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

000

१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवावी

मुंबई, दि. ७ : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.

वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

000

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारांचे यंदाचे मानकरी ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब बोराडे – मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई, दि. ७ : मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर करण्यात आला आहे. नामवंत प्रकाशन संस्‍थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.

मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये १० लाख असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. नामवंत प्रकाशन संस्था पुरस्कार- मानपत्र, सन्माचिन्ह व रूपये ५ लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धन पुरस्कार- मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रूपये २ लाख असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

मराठी भाषा मंत्री सामंत यांनी बीकेसी येथे पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. हे पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत मराठी भाषेतील दिग्गज साहित्यिकांना देण्यात येतात या पार्श्वभूमीवर यंदापासून हे पुरस्कार गेट वे ऑफ इंडिया समोर दिमाखदार सोहळ्यात २७ फेब्रुवारी २०२५ रोजी देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी नामवंत साहित्यिकांची समिती नेमण्यात असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी २०२३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात वाङमय पुरस्कार प्रकार – प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अनिष्ठकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय नाटक / एकांकिका याकरिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, प्रौढ वाङमय कादंबरी याकरिता हरि नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, प्रौढ वाङमय लघुकथा याकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निबांळकर  यांना, प्रौढ वाङमय ललितगद्य याकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, प्रौढ वाङमय-विनोद याकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय चरित्र याकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, प्रौढ वाङमय आत्मचरित्र याकरिता लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा.राठोड यांना, प्रौढ वाङमय समीक्षा/संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला/आस्वादपर लेखन याकरिता श्री.के.क्षीरसागर पुरस्कार हा समिर चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रौढ वाङमय राज्यशास्त्र / समाजशास्त्र याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नसल्याचे मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, प्रौढ वाङमय इतिहास याकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र/व्याकरण याकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञान याकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, उपेक्षितांचे साहित्य याकरिता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन याकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आली नसल्याची माहीती यावेळी देण्यात आली.  तसेच तत्वज्ञान व मानसशास्त्र याकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्र करिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरण करिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित/आधारित याकरिता रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादित करिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्ण याकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना घोषित करण्यात आला आहे. या प्रौढ वाङमय प्रकारातील प्रत्येक पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – बाल वाङमय यात कविता याकरिता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना तर, नाटक व एकांकिका याकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना, सर्वसामान्य ज्ञान याकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्कारांची रक्कम रूपये ५० हजार आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्य याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिका याकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्य याकरिता ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्कारांकरिता शिफारस नसल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले. या पुरस्काराची रक्कम रूपये ५० हजार अशी आहे.

वाङमय पुरस्कार प्रकार – सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ या पुस्तकासाठी जाहीर करण्यात आला असल्याचे मराठी मंत्र्यांनी घोषित केले. या पुरस्काराची रक्कम रूपये १ लाख अशी आहे.

या दिमाखदार सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार  आहे. याचबरोबर २७ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या शिरवाड या गावाचे ‘कवितांचे गाव’ म्हणून उद्घाटन होणार असल्याचे मराठी भाषा मंत्री सामंत यांनी जाहीर केले.

त्याचबरोबर रत्नागिरी येथील कवि केशवसूत यांच्या मालगुंड यास ‘पुस्तकाचे गाव’ करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे मराठी भाषा मंत्र्यांनी जाहीर केले. कवितांचे गाव या संकल्पेनुसार शिरवाड गावातील ३५ घरांमध्ये वाचनालय निर्माण करून तेथे कवितांची पुस्तके ठेवण्यात येणार आहे आणि ‘पुस्तकांचे गाव’ या संकल्पेत गावातील ३५ घरांमध्ये प्रत्येक एक हजार नवी कोरी पुस्तके ही लहान मुले, युवक आणि प्रौढांसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

0
सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर...

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे...

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

0
एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते, पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – सार्वजनिक...

0
मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. 20 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले...