बुधवार, मे 21, 2025
Home Blog Page 239

जिल्हा वार्षिक योजनेतील निधी गुणवत्ता पूर्ण कामांवरच खर्च करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

  •  पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचे आराखडे अंतिम

पुणे, दि. ०७ : गतवर्षी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८ हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता यावर्षी हा निधी वाढवून २० हजार कोटी रुपये करण्यात येणार आहे, त्यामुळे वाढीव निधीच्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वाढवून देण्यात येईल. पण दिलेला सर्व निधी विहित मुदतीत,  गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च होईल याची काटेकोर दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५-२६ चा पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे झाली. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोंसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार विशाल पाटील, म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर जगताप, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, आमदार सदाभाऊ खोत,  इद्रिस नायकवडी, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, सुहास बाबर, रोहित पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार नारायण पाटील, आमदार राहुल आवडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., मनपा आयुक्त शितल उगले तेली, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सांगली महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जितेंद्र डुडी, अमोल येडगे, कुमार आशीर्वाद, डॉ. राजा दयानिधी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.,सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे,  संजय कोलगणे उप आयुक्त नियोजन तर सांगली जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२५- २६ करिता नियोजन विभागामार्फत किमान नियतव्यय जिल्हा निहाय कळविण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वित यंत्रणांकडून निधी मागणी नियमित योजनांसाठी करण्यात आली आहे. पुणे विभागातील जिल्ह्यांच्या कार्यान्वित यंत्रणांनी केलेल्या अतिरिक्त मागणीवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार निधी मंजुरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली.

यावेळी सातारा जिल्ह्याचा कमाल नियतव्यय ४८६ कोटी २५ लाखाचा असून अतिरिक्त मागणी २३८ कोटी ७५ लाखाची आहे. सांगली जिल्ह्याचा किमान कमाल नियतव्यय ४३० कोटी ९७ लाखाचा असून अतिरिक्त मागणी २१८ कोटीची आहे. सोलापूर जिल्ह्याचा कमाल नियतव्यय ६६१ कोटी ८९ लाखाचा असून २०० कोटीची अतिरिक्त मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा कमाल नियतव्यय ५१८ कोटी ५६ लाखाचा असून अतिरिक्त मागणी ४२१ कोटी ४७ लाखाची आहे. पुणे जिल्ह्याचा कमाल नियतव्यय १०९१ कोटी ४५ लाखाचा असून अतिरिक्त मागणी ७०० कोटींची आहे. असा एकूण पुणे विभागातील जिल्ह्यांचा कमाल नियतव्यय ३१८९ कोटी १२ लाखाचा असून १७७८ कोटी २२ लाखाची अतिरिक्त मागणी आहे. या सर्व मागणीचा सविस्तर आढावा घेऊन भरीव निधीची तरतूद करण्यात येईल असे सांगितले.

जिल्ह्यांचा जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२५-२६ चा अंतिम अर्थसंकल्पीत नियतव्यय हा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर कळवण्यात येतो,  याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून चालू वर्षाच्या तुलनेत कमी नियतव्यय असला तरी अतिरिक्त मागणीप्रमाणे जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मागील तीन वर्षातील जिल्ह्यांच्या नियमीत योजनेअंतर्गत, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत, पूर्ण झालेल्या उत्कृष्ट कामांचे सादरीकरण सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले. जिल्हा नियोजन समितींना नियोजन विभागामार्फत कळविण्यात आलेला कमाल नियतव्यय व जिल्ह्याची अतिरिक्त मागणी यामध्ये बदल होऊ शकतो असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जिल्हास्तरीय मागणीप्रमाणे विद्युत विकास, ग्रामीण विकास, ग्रामीण रस्ते, सार्वजनिक आरोग्य याशीर्षां अंतर्गत योजनांना जास्तीत जास्त तरतूद देण्यात आली आहे. शिक्षण, गड, किल्ले, महिला व बालकल्याण महसूल व पोलीस प्रशासन यांना शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेप्रमाणे निधी प्रस्तावित केला आहे. यासोबतच शाश्वत विकास ध्येयांसाठी सूक्ष्म प्रकल्प राबविण्यासाठी विहित केलेला एक टक्के निधी प्रस्तावित केला आहे.  त्यामुळे या महत्त्वाच्या विकास क्षेत्रांना निश्चित निधी उपलब्ध होत आहे.

जिल्हा नियोजनांचा निधी स्थानिक महत्त्वाच्या योजनांना देण्यात आला असला तरी मोठ्या योजनांना राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल,  तसा प्रस्ताव तयार करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी,  मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या बैठकीत निर्देश देण्यात आले.

पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांनी सादर केलेल्या जिल्हा वार्षिक योजना(सर्वसाधारण)च्या प्रारूप आराखड्यांचा सविस्तर आढावा घेत असताना श्री. अजित पवार म्हणाले,  जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे.  त्यामुळे उपलब्ध करून दिलेला सर्व निधी गुणवत्तापूर्ण  कामांवरच खर्च होईल, याची यंत्रणांनी काटेकोर दक्षता घ्यावी. फेब्रुवारी अखेर जिल्ह्यांना ८० टक्के निधी प्राप्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मार्च अखेर शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल. यंत्रणांनी निधीचे वितरण व्यवस्थित करावे तसेच हा निधी वायफळ कामांवर खर्च होणार नाही याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावी.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, टप्प्याटप्प्याने शासनाची सर्व प्रमुख कार्यालये सौर उर्जेवर आणण्यासाठीच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यालय व दुसऱ्या टप्प्यांमध्ये तालुकास्तरीय कार्यालय सौर उर्जेवर आणावीत. पानंद रस्ते खुले करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना दिल्या.

पुणे जिल्ह्यातील विकास कामे आणि कल्याणकारी योजनांठी भरीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

जिल्ह्याचा सन २०२५-२६ चा जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आराखडा हा १ हजार ७९१ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. राज्य शासन जिल्ह्यातील विकास कामे तसेच कल्याणकारी योजना राबविण्यासाठी भरीव निधीची तरतूद करेल. तसेच केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

२०२४-२५ च्या मंजूर नियतव्ययाचा खर्चाचा आढावा

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन २०२४-२५ च्या मंजूर नियतव्ययाचा खर्चाचा आढावा घेतला. सर्वसाधारण योजनेतून जिल्ह्याला सन २०२४-२५ साठी १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे.

१ हजार ७९१ कोटी रुपयांचा आराखडा

जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सादरीकरण करुन जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी १ हजार ७९१ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. यात १ हजार ९१ कोटी ४५ लाख रुपयांचा कमाल नियतव्यय व ७०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीचा समावेश आहे.

आराखड्यांतर्गत प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक शाळांकरिता पायाभूत सुविधा निर्माण करणे, अंगणवाड्यांचा विकास, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे, उपकेंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण, पुणे जिल्हा एकात्मिक पयर्टन विकास आराखडा, लघु पाटबंधारे योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, ग्रामपंचायतींसाठी जनसुविधा, नागरी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा, अपारंपरिक ऊर्जा, परिवहन, पानंद रस्ते खुले करणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला आहे.

आदर्श शाळा, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवावा

पुणे जिल्ह्यात ३०३ प्राथमिक शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘माझी शाळा आदर्श शाळा’, १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून हे उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी शासकीय निधीसोबतच कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) मधूनही निधी उपलब्ध करुन घ्यावा. जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी डूडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सादरीकरण केले.

एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करा

पुणे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर शहर व जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ऐतिहासिक  ठिकाणे, धार्मिक महत्त्वाची ठिकाणे, गड किल्ले, स्मारके पर्यटन नकाशावर येण्याच्या दृष्टीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याच्या माध्यमातून प्रयत्न करावेत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

जिल्ह्यात राबवायच्या कोणत्याही विकासाच्या योजनांसाठी केंद्र शासनाचा अधिकाधिक निधी आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. जेणेकरुन जिल्हा नियोजन समितीच्या निधीची बचत होऊन तो अन्य विकासकामांसाठी उपयोगात आणता येईल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले. शासकीय इमारती, प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींसाठी सौर छत योजना प्राधान्याने राबविण्यात यावी, असेही ते म्हणाले.

सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या संकल्पना त्यांनी जाणून घेतल्या. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी मानिनी हा स्वतंत्र व प्रशस्त मॉल उभारण्यात येत आहे, या संकल्पनेचे कौतुक केले. अन्यत्रही ही संकल्पना राबवावी असे सांगितले.

यावेळी त्यांनी माण, खटाव, फलटणचा काही भाग उजाड आहे, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सौर ऊर्जा प्रकल्प उभारावेत. त्यामुळे वीज बिलात मोठी कपात होईल, असे सांगितले. तसेच सातारा जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये प्रस्तावित करण्यात येत असलेल्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली यामध्ये कृषी पर्यटनामध्ये थीम आधारित गावे विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानासह निर्यातक्षम फळबाग उत्पादन प्रकल्प, नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या गाई व म्हशींना लिंग विनिश्चित वीर्यमात्रा उपलब्ध करून देणे, डे केअर केमोथेरपी युनिट, महिला केंद्रित कर्करोग अभियान आदी उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माहिती दिली.

माझी शाळा, आदर्श शाळा उपक्रमांतर्गत सीएआर मधून शाळांची संख्या वाढवावी. आदर्श शाळा करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा. पथदिवे, पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा विद्युत पुरवठा सौरऊर्जा प्रकल्पांवर व्हावा, जी गावे अद्यापही मुख्य रस्त्यांशी जोडली गेली नाहीत, अशी गावे काँक्रीट रस्त्याने जोडा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक योजनांचा आढावा झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ सर्वसाधारण अंतर्गत निधी वाढवून देण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्याने अतिरिक्त २०० कोटीच्या निधीची मागणी केलेली असून त्यांना यातील जास्तीत जास्त वाढीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, जिल्हा वार्षिक योजनेतील १ टक्का निधी दिव्यांगासाठी ठेवण्यात येणार आहे,असे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या २०० कोटीच्या निधीतून जास्तीत जास्त निधी सोलापूर जिल्ह्याला विविध विकास कामांसाठी मिळावा अशी मागणी केली. तसेच सन २०२४-२५ अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला ६० टक्के निधी प्राप्त झालेला असून उर्वरित ४० टक्के निधी लवकरात लवकर देण्याची मागणी ही यावेळी त्यांनी केली.

शिक्षण, आरोग्य, रस्ते विकास, नगरविकास, जनसुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींकरीता २०० कोटींची अतिरिक्त मागणीचा पुरक आराखडा सादर केल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक प्रारूप आराखडा अंतर्गत मंजूर २८२ कोटीच्या निधीतून उजनी धरण जलपर्यटन, विनयार्ड पर्यटन, कृषी व धार्मिक पर्यटन अंतर्गत सद्यस्थिती बाबत तसेच पंढरपूर येथे दर्शन मंडप व स्कायवॉक उभारण्यात येणाऱ्या १२९.४९ कोटी रुपयांच्या कामाची सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचे सन २०२५-२६ चे कमाल नियतव्यय  ५१८.५६ कोटी रुपयांचे असून ४२१. ४७  कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असे श्री. पवार म्हणाले.

जिल्ह्यातील गडकिल्ले, शासकीय इमारत, शाळा, महाविद्यालयात, तलाव परिसरात स्वच्छता ठेवावी.  भुदरगड किल्ल्यावर हवामानानुरूप जगणाऱ्या स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करावे. युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकित पन्हाळा किल्ला परिसर विकासाकरिता ५० कोटी रुपयांचा निधी तसेच शाळेच्या भौतिक सुविधा करण्याकरिता नियोजित समृद्ध विद्यामंदीर उपक्रमाकरिता विशेषबाब म्हणून तिरिक्त ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या इमारतीची देखभाल दुरुस्तीकरिता उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे. महानगरपालिकेने हद्दवाढ करण्याची कार्यवाही करावी. राज्य शासनाच्यावतीने अत्याधुनिक साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रंकाळा तलावात अशुद्ध पाणी जाणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. राज्य शासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येतो, प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधीना विश्वासात घेवून जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीने  निधीच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी कामे करावीत. विकास आराखड्याकरीता संकल्पना स्पर्धा आयोजित करुन उत्तम आराखड्याची निवड करावी.  जिल्ह्याच्या विकास कामाकरिता निधी कमी पडू देणार नाही, निधीचा पुरेपूर उपयोग करावा, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

सहपालकमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, जिल्ह्यातील शासकीय विश्रामगृहात महिलांसाठी शौचालयाचे बांधकाम करावे, अशी मागणी केली.  आमदार श्री. आवाडे यांनी विकास कामाच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या.

जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी चालू वर्षाचा नियोजन आराखडा आणि आतापर्यंत झालेल्या खर्चाची स्थिती याबाबत आढावा सादर केला. यावेळी  जिल्ह्यात समृद्ध विद्यामंदीर उपक्रमाअंतर्गत शाळेत भौतिक सुविधा, मिशन विद्या किरणअंर्तगत १ हजार ९५८ शाळा सौर शाळा, मिशन कन्या सुविधा योजनेंअतर्गत मुलांकरीता नवीन शौचालय व जुन्या शौचालयाची दुरुस्ती, समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत आरोग्य केंद्रात भौतिक सुविधा, समृद्ध अंगणवाडी केंद्र,  मंडळ तेथे ग्रंथालय, राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन व विश्रामगृह नुतनीकरण, किल्ले पन्हाळा परिसर विकास, मेन राजाराम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे नुतनीकरणाची कामे करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती श्री. येडगे यांनी दिली.

सांगली महत्त्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिले. जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देण्यात येईल, असे श्री. पवार यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षात दिलेला निधी विहित वेळेत खर्च करावा, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले, माझी शाळा, आदर्श शाळा उपक्रमासाठी शासनाकडून निधी देऊ. केंद्र शासनाच्या योजनांचा अधिकाधिक निधी जिल्ह्यात येईल, यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. शासकीय इमारती व महापालिका क्षेत्रातील पथदिवे व पाणीयोजनांची विजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, सौरउर्जेसाठी गायरान जमीन देताना मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. मोठे क्षेत्र सौरउर्जेसाठी देण्यासाठी प्रथम प्राधान्य द्यावे, अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

०००

भिमाशंकर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ०७: भिमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामे मंदिराचे ऐतिहासिक रुप जपत दर्जेदार होतील अशा पद्धतीने करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले.

विधानभवन येथे भिमाशंकर विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

श्री क्षेत्र पंढरपूर, शिर्डी तसेच श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानाच्या धर्तीवर भिमाशंकर येथील कामे मंदिराचे आणि परिसराचे ऐतिहासिक रुप जपत करावीत. त्यासाठी निधीचा प्रस्ताव सादर करावा, असे श्री. पवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी तसेच वास्तुविशारदांनी सादर केलेल्या प्रस्तावित आराखड्याच्या चित्रफीतीचे तसेच सादरीकरणाचे अवलोकन करुन त्यांनी विविध सूचना केल्या. तसेच त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना घ्याव्यात, असेही उपमुख्यमंत्री श्री..पवार म्हणाले.

भिमाशंकर विकास आराखडा यापूर्वी १४८ कोटी रुपयांचा करण्यात आला होता. त्यापैकी ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तथापि, ही कामे अधिक एकात्मिक पद्धतीने करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डूडी यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले.

कुकडी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतांसाठी प्रयत्न करावेत

उपमुख्यमंत्री श्री. पवार यंच्या अध्यक्षतेखाली, कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणातून कळमजाई उपसा सिंचन योजना राबविण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी म्हाडाच्या पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्यासह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, हणुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे आदी उपस्थित होते.

या उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पाटबंधारे विभागाने राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडे प्रयत्न करावेत. मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठी आवश्क ती निधीची तरतूद करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले.

०००

महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्यासाठी जागतिक बँका सकारात्मक

नागपूर,दि.०७ : महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजनेला वित्तीयसहाय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक, कोरियन एक्झिम बँक व एएफडी यांच्यासमवेत चर्चा केली. या प्रकल्पांच्या वित्तीय सहाय्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तिन्ही वित्तीयसंस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या बैठकीत नारपार सिंचन प्रकल्प, मराठवाडा वॉटरग्रीड योजना, समृद्धी महामार्गावरील गुणवत्तापूर्ण परिवहन व्यवस्था प्रकल्प, दमणगंगा-एकदारे-गोदावरी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँकेचे उपाध्यक्ष हुन किम यांनी या प्रकल्पाबाबत आम्ही सर्वतोपरी सहाय्य करु, असे सांगितले.

या बैठकीस कोरियन एक्झिम बँकेचे वरिष्ठ अधिकारी जंग वॅन रीव्यू, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस.आर. तिरमनवार, तापी सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक जे.डी.बोरकर, कोरियन एक्झिम बँकेचे प्रकल्प विकास तज्ज्ञ रागेश्री बोस व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तापी रिचार्ज योजनाबाबत मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली असून त्यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मकता दर्शविल्याची माहिती सिंचन विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिली. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी बैठकीत सहभाग घेतला.

000

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ०७: कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपये महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आला.

मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबविली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्माननिधी परत घेण्यात येणार नसून, अपात्र ठरलेल्या महिलांना या योजेतून वगळण्यात येत आहे.

२८ जून २०२४ व दि. ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात येत आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

मुंबई, दि. ०७: केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६ नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे.

वाहन निष्कासन (स्क्रॅप) करु इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी जुन्या तसेच निरुपयोगी वाहनांचे निष्कासन हे पर्यावरणपूरक होण्याकरिता मान्यताप्राप्त नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फतच निष्कासन (स्क्रॅप) करावे. आपले वाहन नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा केंद्रांमार्फत निष्कासन (स्क्रॅप) केल्यामुळे नवीन वाहन खरेदी करतांना संबंधित वाहनधारकास एकुण कराच्या १० टक्के सूट दिली जाणार आहे.वाहनांचे प्रदुषण कमी करणे, रस्त्यावरील प्रवासी व वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे, वाहनांची इंधन कार्यक्षमता सुधारणे, वाहनांवरील देखभाल खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होणे यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, २०२१ अंमलात आणला आहे, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ बसवण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०७ : केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.

राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पुर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसविणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पुर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकींग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.

वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामा निमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहन धारकांनी त्यांच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे , चढविणे , दुय्यम आरसी , विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी. हाय सिक्युरीटी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर या कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असेही परिवहन कार्यालयाने कळविले आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०७ : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलित करण्यात येत आहे. या पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरिता घरी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबियांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन अर्थ व सांख्यिकी आयुक्त व अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खासगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि ‘मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे, यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्वाची आहे.

त्या अनुषंगाने माहिती संकलित करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे प्रशिक्षित कर्मचारी फेब्रुवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान निवडलेल्या कुटुंबांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विहित नमुन्यातील माहिती संकलित करतील, असे आयुक्त, अर्थ व सांख्यिकी व संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले  आहे.

०००

मॅग्नेटीक महाराष्ट्र व मेक इन इंडिया अंतर्गत झालेल्या सामंजस्य करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी

  • मॅग्नेटीक महाराष्ट्र अंतर्गत ५५ उद्योगांमध्ये उत्पादनाला सुरुवात
  • मेक इन इंडिया अंतर्गत ११९ उद्योगांमध्ये उत्पादन

नागपूर, दि. ०७: महाराष्ट्रात मोठयाप्रमाणात गुंतवणूक व्हावी, रोजगाराच्या संधी वाढाव्यात तसेच राज्याच्या विविध भागात उद्योग सुरु व्हावेत यासाठी राज्य मॅग्नेटीक महाराष्ट्र-2018 चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला  चांगला प्रतिसाद मिळाला होता. या परिषदेमध्ये नागपूर विभागात 138 सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी 55 उद्योगांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली आहे. इतर उद्योग उभारणीच्या विविध टप्यात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात उद्योग विकासाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळेच सामंजस्य करारनंतर प्रत्यक्ष उद्योग सुरु करण्याला प्रतिसाद मिळत आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र शिखर परिषद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिताभ कांत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते. या परिषदेत अक्षय उर्जा क्षेत्रात मोठयाप्रमाणात गुंतवणूकीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले होते.

नागपूर विभागामध्ये झालेल्या 138 सामंजस्य करारापैकी 55 उद्योगामध्ये उत्पादनाला सुरुवात झाली असून 19 उद्योगांचे बांधकाम सुरु आहे. 49 उद्योजकांनी प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत. सामंजस्य करारापैकी केवळ एका उद्योगाकडून प्रतिसाद बाकी आहे. सामंजस्य करारापैकी बहुतांश  उद्योगांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एकूण सामंजस्य करार झालेल्या 138 उद्योगांमध्ये सुमारे 2 हजार 909 रोजगार निर्मिती होणार आहे.

सामंजस्य करारानुसार 55 उद्योगांमध्ये प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली या उद्योगांमध्ये 1 हजार 082 रोजगार उपलब्ध झाला आहे. सामंजस्य करारानुसार नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात  74 सामंजस्य करार झाले असून 1 हजार 023 रोजगार निर्मिती होणार आहे. यापैकी 10 उद्योगांमध्ये उत्पादन सुरु झाले. 13 उद्योगाचे बांधकाम सुरु असून 38 उद्योगांनी प्राथमिक टप्पे पूर्ण केले. तसेच 13 उद्योग प्रगतिच्या टप्प्यात आहेत. वर्धा जिल्ह्यात 26 पैकी 19 उद्योगात उत्पादनाला सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यात 14 पैकी 8 उद्योग उत्पादनात आहे. गडचिरोली जिल्ह्यात 10 पैकी 6, भंडारा जिल्ह्यात 5 पैकी 4 तर गोंदिया जिल्ह्यात 9 पैकी 8 उद्योग उत्पादनात आहे.

मेक इन इंडियाअंतर्गत 274 करारापैकी 119 उद्योगांमध्ये उत्पादन

मेक इन इंडिया अंतर्गत फेब्रुवारी 2016 मध्ये गुंतवणूकदराची परिषद आयोजित करण्यात आली होती.  या परिषदेअंतर्गत नागपूर विभागासाठी 274 सामंजस्य करार झाले होते. त्यापैकी 119 करारानुसार प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात झाली. 14 उद्योगांचे बांधकाम सुरु असून 57 उद्योगांनी प्राथमिक टप्पे पूर्ण केले आहेत. केवळ 5 उद्योगाकडून प्रतिसाद प्राप्त नाही.

०००

गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादनास प्रोत्साहन देणार – मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे

नागपूर,दि. 7 : विदर्भात मोठ‌्या प्रमाणात तलाव असून या तलावाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनाला मोठ‌्या प्रामाणात वाव आहे. येथील मत्स्य उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यासोबतच गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात नागपूर विभागातील मत्स्यउत्पादनाला प्रोत्साहन तसेच मत्स्यव्यावसायिकांच्या प्रश्नाबाबत नितेश राणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सहायक आयुक्त शुभम कोमरेवार तसेच जलसंधारण, पाटबंधारे विभागाचे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागात माजी मालगुजारी तलाव व इतर तलाव मोठ्या प्रमाणात आहेत. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन घेणे शक्य असून या तलावाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्यात.

मत्स्यव्यवसायकिांना येणाऱ्या अडचणी संदर्भात बोलतांना श्री.राणे म्हणाले की, मासेमारी तलाव गाळमुक्त तलाव-जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुरुस्त करण्याला प्राध्यान्य देऊन चांगल्या प्रतीचे मत्स्यबीज उपलब्ध करुन देण्यात यावेत. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या जलसंठयांमध्ये मत्स्यव्यवयासाला प्रोत्साहन दिल्यास येथील मत्स्यव्यवसायिकांना मोठया प्रमाणात लाभ होईल. यासाठी उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करा, असे त्यांनी सांगितले.

जलसंपत्तीचा वापर करुन मच्छिमारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्या.  मच्छिमार सामाजिक व आर्थिक द्ष्टया मागासलेला आहे. त्यांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्या. विभागाचा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करुन निधी उपलब्ध करण्यात येईल. मत्स्यपालकांची गैरसोय होणार नाही याकडे प्राधान्याने लक्ष द्या. ग्रोथ व यशकथा तयार करा, असे त्यांनी सांगितले.

शहरात मच्छिमाराच्या उत्पादन विक्रीसाठी मासळी बाजारपेठ उभारा. त्यामुळे त्यांच्या उत्पनात भर होईल. विभागाचा तिमाही ॲक्शन प्लॉन तयार करा. मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. सोबतच आंध्र प्रदेश दौऱ्यावर अभ्यासगट जाणार आहे. त्यात आपणास सहभागी करण्यात येईल. यामुळे नाविण्यपूर्ण प्रयोग करता येईल.

प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे यांनी राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यात निलक्रांती योजना, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, राष्टीय कृषी विकास योजना, मासळी बाजारपेठ उभारणी, किसान क्रेडिटकार्ड योजना, ई-श्रम कार्ड योजना, एनएफडीपी पोर्टल रजिस्ट्रेशन, प्रधानमंत्री सूरक्षा विमा योजना, शासकीय मत्स्यबिज केंद्र विक्री यांचा समावेश आहे.

मत्स्य विज्ञान महाविद्यालयास भेट

मत्स्य विज्ञान महाविद्यालय येथे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत तेलवेकर यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यापीठाच्या कुलसचिव  मोना ठाकूर, उपकुलसचिव अजय गावंडे, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील जांभुळे, सह आयुक्त शुभम कोमारेवर या प्रसंगी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांनी महाविद्यालयातील मत्स्य अभियांत्रिकी, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान आणि मत्स्य विस्तार विभागांना भेट देऊन महाविद्यालाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. महाविद्यालयाने विकसित केलेल्या फिरता मत्स्य विक्री संच तसेच माशांचे धुरीकरण संयंत्र या तंत्रज्ञानाविषयी माहिती जाणून घेतली. महाविद्यालय करीत असलेल्या शैक्षणिक आणि विस्तार कार्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. सोबतच महाविद्यालयाचे इमारतीचे बांधकाम, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह या बाबतचे प्रस्ताव शासनास सादर करावेत, असे ते म्हणाले.

महाविद्यालयाने मत्स्य व्यवसाय विभागात सोबत कृती आराखडा आणि मत्स्य कास्तकारांसाठी विकास प्रकल्प शासनास सादर करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. या नंतर विद्यापीठाच्या माफसू संग्रहालयाला भेट दिली आणि तेथील सादरीकरणाची पाहणी केली. संग्रहालयातील पशु संवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय प्रतिकृतीं तसेच दर्शवलेली माहिती याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी  उपस्थित होते.

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली, दि. ०७ (जिमाका): सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून वाढीव निधी देण्याचा प्रयत्न करू. निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिले.

पुणे येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 चे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित या बैठकीस राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, इद्रिस नायकवडी, सुधीर गाडगीळ, डॉ. विश्वजीत कदम, सुहास बाबर, रोहित आर. आर. पाटील, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी प्रत्यक्ष तर जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता वेद सिंगल ई- उपस्थित होत्या.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 करिता नियोजन विभागामार्फत सांगली जिल्ह्यासाठी कमाल नियतव्यय 430 कोटी 97 लाख रूपये कळविण्यात आला होता. जिल्ह्याच्या स्थानिक गरजेनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून 218 कोटी रूपये अतिरीक्त निधी मागणी करण्यात आली. यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजनेसाठी निधीची जरी मर्यादा घालून दिली असली तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी अतिरीक्त निधीची मागणी केली आहे. वाढीव निधी देणार आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

जिल्हा वार्षिक योजनेतून चालू आर्थिक वर्षात दिलेला निधी विहित वेळेत खर्च करावा, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल उपक्रमासाठी शासनाकडून निधी देऊ. त्याचबरोबर या उपक्रमासाठी लोकसहभाग व लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा. मॉडेल स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची सांगड घालण्यासाठी प्रशासन प्रमुखांनी नियोजन करावे. शासकीय इमारती व महापालिका क्षेत्रातील पथदिवे व पाणीयोजनांची विजेची गरज सौरउर्जेतून भागवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील संरक्षित स्मारकांची यादी तयार करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करावा, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीतून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरण केले. यामध्ये सांगली जिल्ह्याच्या नियमित व नाविन्यपूर्ण योजनांतर्गत मागील तीन वर्षातील मंजूर व पूर्ण झालेल्या उत्कृष्ट कामांचे सादरीकरण करण्यात आले. साकव बांधकाम तसेच, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून केलेल्या प्रयत्नांबद्दल यावेळी कौतुक करण्यात आले.

०००

ताज्या बातम्या

पाटण येथे तिरंगा रॅली संपन्न; पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मानले भारतीय सैन्य दलाचे आभार

0
सातारा दि. 20 :  पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदल उत्तर...

विभागीय आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा 

0
छत्रपती संभाजीनगर, दि. 20: हवामान विभागाने पावसाबाबत वर्तविलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी, तसेच ‘पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतीची पडझड, पाणी साचणे...

 कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

0
एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे, दि.20(जिमाका):- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित सर्व रस्ते, पुल इमारतीची कामे तात्काळ पूर्ण करा – सार्वजनिक...

0
मुंबई, दि. २० : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले...

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. 20 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले...