रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 223

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाची नांदेडकरांमध्ये उत्सुकता

नांदेड, दि. १५ : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल नांदेडकरांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नवकथाकरांपासून ते मराठीच्या प्राध्यापकांपर्यंत सर्वांनाच मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा अभिमान आहे. नांदेड मुलखातून मोठ्या संख्येने मराठी साहित्यिक दिल्लीच्या संमेलनात सहभागी होणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने उत्सव अभिजात मराठीचा हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत माध्यमांच्या सर्व आयुधातून दिल्ली येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. काही बोलक्या प्रतिक्रिया खास मराठीप्रेमी वाचकांसाठी..
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मराठी साहित्यिक, लेखक, वाचकांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. नवोदीत कवी, कथाकार, कांदबरीकार, लेखक यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे.

मराठी भाषेला जागतीक कीर्ती मिळावी, जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष व्हावा, यासाठी हे साहित्य संमेलन महत्त्वाचे ठरणार आहे.या साहित्य संमेलनात साहित्य, भाषा आणि संस्कृती याबाबत चिंतन होणार असून, विविध चर्चासत्रे, परिसंवाद आणि ग्रंथप्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक, प्रकाशक, लेखक यांनी आपल्या प्रतिक्रीया व शुभेच्छा दिल्या आहेत. त्या प्रतिक्रीया पुढीलप्रमाणे आहेत.

मराठी माणसाने मराठी माणसासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या संमेलनाने हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना मराठीतूनच शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाने आपल्या पाल्यांना मराठी कवी संमेलने, कार्यक्रमांना आवर्जून नेले पाहिजे. यामुळे मुलांमध्ये मराठी भाषा अधिक वृद्धींगत होईल आणि त्यांना आवड निर्माण होईल. मराठी भाषा अधिक संवर्धित करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  • आम्रपाली रामराव भद्रे, सहाय्यक प्राध्यापक, सावित्रीबाई फुले महिला अध्यापक महाविद्यालय,सिडको

मी नांदेड येथून मागील ५० वर्षांपासून मराठी वाङ्मयीन  800 पुस्तके प्रकाशित केली आहेत. यावर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तो मिळणे ही बाब आमच्यासारख्या मराठी भाषिकांना आनंदाची व अभिमानास्पद आहे. पुणे व इतर शहरातून अनेक प्रकाशक 98 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी जाणार असून जिल्हा पातळीवरुनही अनेक प्रकाशक, लेखक, साहित्यिक दिल्लीला जाणार आहेत. नांदेड येथील निर्मल प्रकाशनही याठिकाणी जावून स्टॉल लावणार आहे.

  • श्री. निर्मलकुमार सुर्यवंशी,प्रकाशक, निर्मल प्रकाशन

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच होणारे हे अ.भा. मराठी साहित्य संमेलन निश्चितपणे मराठी भाषिक, लेखक, वाचकांना ऐतिहासिक ठरणार आहे. हे संमेलन नवोदित साहित्यिकासाठी एक नवी वाटचाल किंवा त्याला प्रस्थापित होण्यासाठीचा एक नवा मार्ग असणार आहे. या साहित्य संमेलनामुळे नवोदित कवी, कथा -कांदबरीकार, लेखकांना एका व्यापक व्यासपीठ मिळून, एका नवीन युगाला सुरवात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळावा. जगाच्या कानाकोपऱ्यात माय मराठीचा जल्लोष, गजर व्हावा, जागतिक पातळीवर कीर्ती मिळावी, अशी अपेक्षा आहे.

  • राम तरटे, ग्रामीण कथाकार

केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे हे साहित्य संमेलन होत असल्याबाबत विशेष आनंद आहे. 98 व्या आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नांदेड येथून अनेक साहित्यिक जाणार आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषा संवर्धनासाठी अनेक महामंडळे स्थापन केली. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्यांची आठवण केली जाईल. संमेलनाला येणाऱ्यांना मराठी भाषिक ग्रंथ पाहाण्यास व वाचण्यास उपलब्ध होणार आहेत

  • नारायण शिंदे, लेखक

०००

पदवीच्या ज्ञानाचा वापर समाजहितासाठी करा – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आवाहन

नागपूर, दि. 15 – जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज येथे केले.

वर्धा रोडवरील वारंगा येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा दीक्षान्त समारंभ आज आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विधी विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायमूर्ती अनिल किलोर, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, कुलगुरु प्रा. डॉ. विजेंदर कुमार, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ, विधी विद्यापीठाचे कुलसचिव विवेक गव्हाणे यांच्यासह विधि क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

विधि कारकीर्दीत सखोल अभ्यास तसेच कायद्याची समज आवश्यक असते. विधि विद्यापीठातून कायद्याची अक्षर ओळख करून घेण्यासोबतच कायद्यामागची  भूमिका,  इतिहास, कायद्याचा व्यावहारिक उपयोग आणि अंमलबजावणी समजून घेणे आवश्यक असते. तुमच्या कामामुळे लोकांचे जीवनमान तसेच स्वातंत्र्यावर परिणाम होतो. त्यामुळे विधी कारकीर्द हे महत्त्वपूर्ण असे क्षेत्र ठरते. आयुष्यात स्वयंशिस्त आणि कठोर परिश्रम जोपासत आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करण्याचे आवाहन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी केले.

विधि विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कारकीर्दीचे विस्तीर्ण असे  क्षेत्र खुले आहे. कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी आता विविध शाखा उपलब्ध झाल्या आहेत. ज्ञानार्जनासाठी अनेक संधी आज उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन विधि विद्यापीठाचे कुलपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

तत्पूर्वी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजेंदर कुमार यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक कामगिरीचा आणि उपक्रमांचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. या दीक्षांत समारंभाला विधि क्षेत्रातील मान्यवरांची  तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

आदिती बैसला सर्वाधिक सात सुवर्णपदके

पदवीप्रदान समारंभात एकूण १५५ पदवी प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये ११२ पदवी, २८ पदव्युत्तर आणि १५ पीएच.डी. पदव्या समाविष्ट होत्या. सर्वाधिक सात सुवर्णपदके विद्यार्थिनी अदिती बैस यांना मिळाली. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यापीठाचे सुवर्णपदक विद्यार्थी विश्वजीत राव आणि विद्यार्थिनी आकांक्षा बोहरा यांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त : अभिमानास्पद बाब

केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा जागर केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण राहणार आहे.

जगातील प्रत्येक भाषेचा जन्म हा संवादाच्या गरजेतून झाला. मराठी भाषासुद्धा त्याला अपवाद नाही. जिचे वर्णन करताना संत ज्ञानेश्वर महाराज, “माझा मराठीचा बोलु कौतुके | परि अमृतातेही पैजा जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळविन ||” असे म्हणतात.  नुकताच, ह्या मायमराठीचा जागर करणारा व मराठी भाषेचा आदर करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात कायमचा कोरला जाईल असा सुवर्णक्षण आपण अनुभवला. तो म्हणजे, आपल्या महाराष्ट्राच्या मातृभाषेला, मराठीला अभिजात भाषेचे स्थान लाभले आहे. हा बहुप्रतीक्षित व ऐतिहासिक निर्णय माय मराठीच्या गौरवात अविस्मरणीय भर घालणारा आहे.

मराठी भाषा ही ‘अभिजात भाषा’ म्हणून मान्य झाली म्हणजे नेमके काय झाले? हा प्रश्न अद्यापही अनेकांच्या मनात घर करून बसलेला आहे. अभिजात या शब्दाचा शब्दश: अर्थ उत्तम, उत्कृष्ट किंवा श्रेष्ठ असा अर्थ होतो. ‘अभिजात’ हा शब्द भाषेशी जोडला जाताना आपण असे म्हणू शकतो की, भाषेला लागू असणारे उत्तमतेचे निकष पूर्ण करण्यासाठी जी भाषा दुसऱ्या भाषेवर अवलंबून नसते म्हणजेच स्वयंपूर्ण असते, ज्या भाषेला साधारणपणे दीड ते दोन हजार वर्षांचा इतिहास असतो, प्रत्येक काळात साहित्यनिर्मितीला प्रेरणा व चालना देऊ शकेल एवढी भाषासमृद्धी ज्या भाषेकडे असते, ज्या भाषेत मूलतः विविध प्रकारची उत्तम साहित्यनिर्मिती झालेली असते, ती भाषा म्हणजे अभिजात भाषा होय. या सर्व कसोट्यांवर मराठी भाषा उतरली आहे. एकूणच मराठी भाषेची विपुल साहित्यसमृद्धी लक्षात घेता, अभिजात भाषा म्हणून स्थान मिळणे हा मराठी भाषेचा यथोचित सन्मान आहे. तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा, उत्तमतेचा यामुळे गौरव झाला आहे. श्रेष्ठ मराठी कवी कुसुमाग्रज तर मराठी साहित्याविषयी सहजपणे लिहितात,

“रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी

चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी”

मुळात भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. ज्याप्रमाणे वाहती नदी जशी किनाऱ्यांना केवळ स्पर्श करत नाही तर किनाऱ्यावरील काहीतरी घेऊन पुढे जाते. त्याचप्रमाणे भाषासुद्धा स्थळकाळाला अनुसरून बदलत जाते. हीच भाषेच्या समृद्धीची प्रक्रिया आहे. परकीय आक्रमणांमुळे, व्यापारांमुळे, दळवळणामुळे मराठी भाषादेखील अशीच समृद्ध व संपन्न झाली आहे.

वर्तमानकाळातसुद्धा मराठी भाषेत विपुल साहित्यनिर्मिती होते आहे. अनेक लेखक, लेखिका, कवयित्री, कवी भरभरून व्यक्त होत आहेत. या साऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलन म्हणजे एक पर्वणीच असते. दरवर्षी नियमित भरणारे, वैभवशाली साहित्यपरंपरेचा वारसा जतन करणारे मराठी सारस्वतांचे संमेलन साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठच असते. यानिमित्त विविध साहित्यप्रवाह, साहित्यप्रकार अशा अनेक साहित्याशी निगडीत विषयांवर ऊहापोह होतो. विविध साहित्यिक चर्चासत्रे, कवीसंमेलने, गझल मुशायरा याप्रकारच्या विविध सत्रांमधून सहभागी होतात.

या सत्रांमुळे भाषेच्या समृद्धीला गती मिळते. यावर्षी भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली नगरीकडे या संमेलनाचे यजमानपद आहे. दिनांक 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी मा. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन भरणार आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेचा जागर मनामनातून होत राहो. हजारो वर्षांपासून जतन केलेल्या अभिजात मराठीच्या अमृतकुंभातील साहित्यअमृताच्या वर्षावात समस्त मराठी रसिक न्हाऊन निघतील याविषयी खात्री आहे.

भैरवी देशपांडे

साहित्यिक व लेखिका

शेती सिंचनाला प्राधान्य देऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नाशिकदि. 15 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):   धरण समूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्यापर्यतंत पुरविण्याच्या दृष्टीने व नाशिक शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री ( गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील  यांनी दिल्या.

आज नाशिक महानगरपालिका सभागृहात जिल्हा प्रशासन, नाशिक महानगरपालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज आहिरे, विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता पाणी पुरवठा अविनाश धनाइत, कार्यकारी अभियंता रविंद्र धारणाकर,बाजीराव माळी,गणेश मैड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पाण्याचे नियोजन लक्षात घेता 7.2 टी.सी.एम पाणी महापालिका क्षेत्रात वापर होतो. नदीपात्रात जवळपास 65 टक्के प्रक्रिया करून प्रवाहित करणे अपेक्षित आहे. परंतु तसे निदर्शनास येत नाही  त्यामुळे येत्या तीन महिन्यांत नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सर्व व्हॉल्व्हचे तातडीने मिटरींग करण्यात यावे, त्यामुळे मंजूर पाण्यापैकी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याची तफावत दूर होण्यास मदत होईल. जवळपास 20 टक्के प्रक्रिया न केलेले पाणी नदी प्रवाहात सोडले जाते या दुषित पाण्यामुळे पाणवेलींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या नदीपात्रावरील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नगरपालिका व ग्रामपंचायत यांचे जलसाठेही प्रदुषित होत आहेत. यासाठी महानगरपालिकेने तातडीने शाश्वत उपायोजना कराव्यात, असेही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने पाण्याचा काटकसरीने वापर झाला पाहिजे तसेच शहरातही काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. यासाठी महापालिकाक्षेत्रात पाण्याचे योग्य परिक्षण होणे गरजेचे असून शहरासाठी 100 टक्के मीटरींग प्रक्रिया जलदपणे लागू केल्यास पाण्याच्या अतिरिक्त होणाऱ्या अपव्ययावर आपोआपच निर्बंध येतील. शेतीचे सरंक्षण करणे हे आपले प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देवून पाणी आवर्तनात होणारी पाणीगळती टाळण्याच्या दृष्टीनेही जलसंपदा विभागाने उपायोजना कराव्यात. अहिल्यानगर व नाशिक साठी गोदावरी आराखड्यात प्रवाहातून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी पाईपलाईन पाणी पुरवठा करण्यातचे नियोजन आहे. यासाठी नियामक मंडळाला सल्लागार नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील नियोजन करता येईल. यामुळे शेतीसिंचनासाठी पाण्यास अधिक वाव मिळेल. दारणा धरणातून थेट पाईपलाईन महानगरपालिका व जलसंपदा विभागाने समनवयाने आराखडा तयार करावा. अशा सूचनाही जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी बैठकीत दिल्या.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज आहिरे यांनी मांडलेल्या सूचनांचे स्वागत करण्यात आले.

00000

रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी तात्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

नागपूर, दि. 15 : रामटेक येथील नियोजित चित्रनगरीसाठी महसूल विभागाने सांस्कृतिक विभागास तत्काळ जागा हस्तांतरीत करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने या चित्रनगरीचे निर्माण होत असून या प्रकल्पासाठी सांस्कृतिक विभागाने तत्वत: मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात चित्रनगरीबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यावेळी उपस्थित होते. रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापूरकर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभाग घेतला.

रामटेक येथील खिंडसी तलावाजवळ चित्रनगरी तयार करण्यात येणार आहे. चित्रीकरण व इतर बाबींसाठी ही जागा योग्य असून हे ठिकाण वनक्षेत्राशी जोडले असल्याने पर्यटनास भरपूर वाव आहे. यातून रोजगार निर्मिती होईल. चित्रनगरीसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यासाठी येथे प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

चित्रीकरणासाठी लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. चित्रनगरीसाठी या क्षेत्रातील लोकांनी कार्यशाळा घ्याव्यात, असे ते म्हणाले.

या प्रकल्पामुळे मध्यप्रदेश छत्तिसगड येथील निर्मात्यांना डाक्युमेंटरी, लघुपट तयार करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

ही चित्रनगरी नागपूर विमानतळ येथून अवघ्या 40 किलोमिटरवर आहे. याभागात रिसार्ट भरपूर आहेत. यासर्व बाबींचा लाभ निर्मात्यांना होईल, असेही त्यांनी सांगितले.

00000

दिल्‍लीचे संमेलन : मराठीची मुद्रा देशभरात उमटवणार

येत्‍या 21 ते 23 फेब्रुवारी रोजी नवी दिल्‍लीतील तालकटोरा मैदानावर 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होवू घातले आहे. संमेलनाचे उद्धाटन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याने या संमेलनाला अनन्‍य साधारण महत्त्व प्राप्‍त झाले आहे. या निमित्त दिल्‍लीकर मराठी भाषकांमध्‍ये कमालीचा उत्‍साह दिसून येत आहे. दिल्‍लीतील साहित्‍य वर्तुळात आनंद तर वाढलेला आहेच शिवाय हे संमेलन अनेक वर्षानंतर देशाच्‍या राजधानीत होत असल्‍याने समस्‍त मराठी भाषक जनतेसाठी ही एक आनंदाची पर्वनी ठरणार आहे. गेल्‍या वर्षी 96 वे अखिल भारतीय मराठी संमेलन महात्‍मा गांधी आणि विनोबा यांच्‍या कर्मभूमित घेण्‍यात आले होते. या वर्षी हे संमेलन दिल्‍लीत होत असल्‍याने वर्धा ते दिल्‍ली असा संमेलनाचा प्रवास वर्धेकर जनतेसाठी आनंद द्विगुणीत करणारा आहे. वर्धा आणि दिल्‍लीचा तसा संबंध स्‍वातंत्र चळवळी पासून राहिलेला आहे.

या चळवळीच्‍या दरम्‍यान महात्‍मा गांधी वर्धेत वास्‍तव्‍यास आल्‍याने अधिक जवळचा ठरला आहे. या काळात वर्धा शहर स्‍वातंत्र चळवळीचे एक महत्‍वाचे केंद्र ठरले. गांधीजींनी शेगावचे नामकरण सेवाग्राम केले आणि सेवाग्राम हे भारताची अशासकीय (नॉन पॉलिटिकल) राजधानी म्‍हणून ओळखले जाऊ लागले.

थानावरतयायानिमित्ताने दिल्‍लीतील राजकीय पुढारी यांची उपस्थिती वर्धेकर जनतेसाठी ऐतिहासिक महत्‍व अंकित करणारी ठरली, सोबतच साहित्‍य विश्‍वातही वर्धेचा नावलौकिक वाढला. स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर 48वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर तब्‍बल 76 वर्षानंतर हे संमेलन आयोजित करण्‍यात आले. दरम्‍यानच्‍या काळात साहित्‍य क्षेत्रात अनेक महत्‍वाच्‍या घटना घडल्‍या. वर्धेतील सत्‍यनारायण बजाज वाचनालय, राष्‍ट्रभाषा प्रचार समिती, आर्वी येथील लोकमान्‍य टिळक वाचनालय आणि वर्धेचे गांधी ज्ञान मंदिर साहित्‍य विश्‍वात प्रेरणा केंद्र राहिली. या केंद्रातून झालेले मंथन कवी व लेखक घडवण्‍यात कारणीभूत ठरले. नवकवी व नवलेखकांनी मराठी साहित्‍यात नाव कमावले व त्‍याची चर्चा दिल्‍लीत मानाने करण्‍यात आली. आतापर्यंत वर्धेत झालेले हे दुसरे संमेलन होते, तसेच राजधानीत होणाने यावर्षीचे संमेलन देखील दुसरे आहे. हा एक योगायोगच म्‍हणावा.

राज्‍याची उपराजधानी नागपूर येथे पहिले विश्‍व हिंदी संमेलन 10 ते 14 जानेवारी 1975 रोजी आयोजित करण्‍यात आले होते. यासाठी मराठी भाषिक साहित्यिकांनीच पुढाकार घेतला होता. त्‍या‍तील एका ठरावातून वर्धा येथे महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्‍थापना झाली. एका अर्थाने संमेलनाचा किती प्रभाव असतो हेच यातून दिसते. वर्धा शहराची स्‍थापना तशी 1866 मध्‍ये झाली. ज्‍याचे नाव पालकवाडी असे होते व जिल्‍ह्याचे मुख्‍यालय पुलगाव जवळील कवठा या छोट्याशा गावात होते. त्‍यानंतर वरदायीनी वर्धा नदीच्‍या नावावर वर्धा असे नामकरण झाले.

वर्धा हे नाव ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऊर्जेचे शहर म्हणून ओळखले जाते. तसा उल्लेख अनेक ग्रंथांमध्ये व वर्धा जिल्हा गॅझेटियरमध्ये सापडतो. भाषिक दृष्टिकोनातूनही वर्धा जिल्हा एक समृद्ध जिल्हा राहिला आहे. हे शहर संस्कृत, प्राकृत, गोंडी, मराठी आणि हिंदी भाषेचे शहर म्‍हणून लौकिक प्राप्‍त झालेले आहे. इतिहासाच्या ओघात येथे भाषांचा विकास होत राहिला आणि काही भाषा कमी-अधिक संख्येने बोलल्या जाऊ लागल्या. वर्धा जिल्ह्यात भिली वा भिलोडी, इंग्रजी, गोंडी, गोरखाली वा नेपाळी, हलबी, खानदेशी, कोलामी, कोकणी, कोरकू व कोया अशा दहा भाषा बोलल्या जात होत्या, ज्यामध्ये मराठी प्रथम स्थानी तर हिंदी दुसऱ्या स्थानी राहिली आहे.

मराठी भाषेला आताच भारत सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेच्‍या प्राचीनत्‍वावर यामुळे मोहर उमटली आहे. मराठी भाषेचे चिरंतन साहित्‍य संत ज्ञानेश्‍वरापासून ते आजतागायत प्रवाहित होत आहे. चिरंतन साहित्‍याचे लक्षण संत ज्ञानेश्‍वरांनी सांगितले आहे. ‘वाचे बरवे कवित्‍व । कवित्वी बरवे रसिकत्‍व । रसिकत्‍वी परतत्‍व । स्‍पर्शु जैसा।। अर्थात भाषेमध्‍ये काव्‍य उत्तम. काव्‍याला रसामुळे बहर येतो आणि रसाला परतत्वाचा स्‍पर्श झाला म्‍हणजे मग त्‍याची गोडी काय वर्णावी. जीवनात क्रांती घडवून आणण्‍याची शक्ति फक्‍त आणि फक्‍त वाड्:मयात अशी महती आचार्य प्र. के. अत्रे यांनी वर्णीली आहे. समाज मनावर साहित्याचा परिणाम त्वरीत होत नाही. सतत सूक्ष्‍म संस्‍कार होत राहिल्‍याने समाजात बदल घडत असतो. साहित्‍य संमेलनातून असे बदल घडत असतात आणि हेच बदल देश आणि समाजात सकारात्‍मक परिणाम घडवत असतात. लेखन आणि वाचनातून माणसात जी प्रगल्‍भता येते ती निरंतर पुढच्‍या पिढीकडे प्रवाहित होत असते आणि त्‍याचा लाभ समाजाला होत असतो.

देशाच्‍या राजधानीत होणारे संमेलन अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. येथे अनेक लहान-मोठ्या संस्‍था मराठीची पताका फडकवित असतात. महाराष्‍ट्र सदन असो की बृहन्महाराष्‍ट्र मंडळ असो येथे साहित्यिक व सांस्‍कृतिक मेळावे, कार्यक्रम व शिबिरे सतत चालू असतात.  यातून दिल्‍लीकरांना मराठी भाषा, साहित्‍य व संस्‍कृ‍तीची मेजवाणीच मिळत असते. येथे मोठ्या संख्‍येने मराठी भाषा बोलणारे असल्‍याने त्‍यांना अशा कार्यक्रमांची सतत ओढ लागलेली असते. दिल्‍लीत मराठी, हिंदी व इतर भारतीय भाषा एक समूह म्‍हणून किंवा सवंगडी म्‍हणून वावरत असतात. येथे असणारे मराठी भाषी नागरिक नोकरी व व्‍यवसायासाठी आलेले असतात परंतु त्‍यांनाही साहित्‍याची भूक असते ती ते साहित्यिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांच्‍या आयोजनातून भागवत असतात.

दिल्‍लीतल्‍या प्रत्‍येक मराठी भाषकांसाठी हे संमेलन आपले वाटणारे यामुळेच ठरणार आहे व त्‍याचे पडसाद देशभरात उमटणार आहे. संमेलनाचा वर्धा ते दिल्‍ली हा एका वर्षाचा प्रवास साहित्‍याच्‍या क्षेत्रातील अनेक प्रकारांना मार्ग तर मोकळा करणारच आहे, तो अधिक प्रशस्‍तही करणारा ठरणार आहे.  हे संमेलन राराची ाचा प्रवास सन 1878 पासुन मराठी भाषा व साहित्‍याला एक नवी झळाळी तसेच नव्‍या वाटा देणारे ठरो हिच रास्‍त अपेक्षा. या संमेलनातून दिल्‍लीत मराठीची मुद्रा नक्‍कीच देशपातळीवर उमटणार हेही तितकेच खरे.

 

 

बी.एस. मिरगे

जनसंपर्क अधिकारी

महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धा

9960562305

रंगशारदा नाट्य मंदिरात ‘महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा’; रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

मुंबई, दि. १५ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेत सादर होणारी ४५ नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येतील. विनामुल्य प्रवेशिका श्री शिवाजी मंदीर, दादर येथे उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्यातील २३ केंद्रांवर आणि गोवा अशा एकूण २४ केंद्रांवर राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त दर्जेदार नाटकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आलेली आहे. अंतिम फेरीतील सर्व नाटके प्रेक्षकांना विनामुल्य पाहता येणार आहेत.

६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिले नाटक ‘पंचमवेद’ हे १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७.०० वाजता रंगशारदा नाट्यगृह येथे सादर होणार आहे. यानंतर दररोज सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ७.०० वाजता नाटकांचे प्रयोग सादर होतील. या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सुमारे १२०० पेक्षा अधिक हौशी कलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघाचे मनोधैर्य वाढवण्याकरीता, त्यांना शुभेच्छा देण्याकरीता आणि विविध विषयांवरची विविध अंगी नाटके पाहण्याकरिता जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

000

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई दि. १५ : संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

000

केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. १५: पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केसरी टूर्सचे संस्थापक, अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली  आहे.

‘उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. ‘केसरी टूर्स’ च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेची ओळख जगभर पोहोचवली. या क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसाय, व्यवस्थापन संधीची माहिती आणि अनेकांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा देण्यात ते मार्गदर्शकाची भूमिका बजावत असत. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या केसरी समूहाशी निगडित सहृदयींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

 

000

अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना…

२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष लेख..

भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही  महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील  कथा घराघरातील आजी आजोबा न चुकता रंगवून आपल्या नातवंडाना सांगत असत. हे सगळं ज्ञान त्यांना कुठून मिळत असे ?

स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत तरी भारतातील बहुतांश खेडी इतर दुनियेपासून दूर होती. बैलगाडी शिवाय इतर वाहन नसल्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचे काम संपल्यानंतर पुढील पाच सहा महिने त्याच शेतातून बैलगाडीचा रस्ता जायचा. त्याशिवाय पायवाटा हा एकमेव मार्ग दुसऱ्या गावांना जोडण्यासाठी उपलब्ध होता. तरीही प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होते, आनंदी होते. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार हे त्यांना नेमून दिलेले कामे करत असल्यामुळे, प्रत्येकाचं महत्त्व प्रत्येकाला माहित असल्यामुळे गावाचं लोक जीवन हे सुरळीत चालत होतं. प्रत्येक जाती जमाती त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक कलांचा आस्वाद घेत होते. मात्र ते सगळे एकाच धाग्यात गुंफल्यासारखे होते. तो धागा होता भारतीय संस्कृतीचा. कोकणभाग सुद्धा यापेक्षा वेगळा नव्हता. कोकणात भजन कीर्तन गाणारे होते, गोंधळ घालणारे होते, कुंभार क्रिया करताना  डाक लावणारे होते, नमन जाखडी सारख्या मनोरंजनाच्या कला येथे होत्या. नाटकाचे खेळ इथे चालत होते. नवरात्रीत घरोघरी फिरून अंबाबाई ची आरती बोलणारे सरावदी होते. गोसावी होते. इतर व्यवसाय करणाऱ्या लोहार, सुतार, कुंभार यांच्यापेक्षा वरील मनोरंजन करणाऱ्या आणि ज्ञानात भर घालणाऱ्या कलांना ग्रामीण जीवनात आनंद देणाऱ्या कला म्हणून पाहिले जात होते. खरे तर हेच भारतीय संस्कृतीचे प्रसारक होते.

शेती हाच कोकणातील खेड्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या त्या कष्टकरी जनतेला विरंगुळा देण्याचं काम याच कलांनी केले. करमणुकीचे अन्य साधन नसल्यामुळे एखाद्या घरच्या गोंधळाला सुद्धा अंगणात मावणार नाहीत एवढी माणसांची गर्दी होत असे. धार्मिक भावनेमुळे उपस्थिती अनिवार्य असली तरी पेंगुळलेल्या डोळ्यांवर पाणी मारून रात्रभर जागून एखाद्या कलेचा आस्वाद घेण्याचा आनंद म्हणजे मनोरंजनाची भूक भागवण्याचा प्रकार असे. याचा परिणाम काय होई.?

रात्री ऐकलेल्या कीर्तनात निरूपणासाठी घेतलेला बुवांचा अभंग दुसऱ्या दिवशी शेताच्या बांधावर काम करत असताना आपसूक मुखातून बाहेर पडत असे. आपल्याला काही आठवत नसेल तर सोबत काम करणाऱ्या माणसाकडून ते जाणून घेतलं जायचं. मग तो कधी एकांतात किंवा सार्वजनिक ठिकाणी सहज बोलला जायचा आणि तो पक्का मनात बसून जायचा. गोंधळ आणि सांगितलेली चिलिया बाळाची कथा किंवा सत्यवान सावित्रीची कथा आई झोपणाऱ्या बाळाला थोपटत थोपटवत ऐकवायची. राम कसा आज्ञाधारक होता हे सांगताना उभ रामायण आपल्या मुलांच्या समोर जिवंत करण्याचं कसब त्यावेळच्या मातांना चांगले जमत असे.

आज कोकणात शिमग्याला किंवा गणपती उत्सवाला चाकरमान्यांची गर्दी होत असते ती केवळ परंपरा राखण्यासाठी असते. मात्र एकेकाळी हे सगळे सण इथल्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होते. अजीर्ण झालं तरी देवाचा प्रसाद हा नाकारायचा नसतो तोच प्रकार शहरात राहून मनोरंजनाचा अजीर्ण होईपर्यंत आस्वाद घेतल्यानंतर वाड वडिलांची परंपरा पुढे चालवण्याच्या भावनेतून ही चाकरमानी मंडळी गावाकडे येत असतात. त्यात कलेचा आस्वाद घेण्याचा मुख्य गाभा आम्ही कधीचा विसरून गेलो आहोत.

स्वातंत्र्यपूर्व काळात खऱ्या अर्थाने कोकणातील प्रत्येक गाव मुखोद्गत साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीला देत असताना दिसत असे. घरातल्या प्रत्येक दैनंदिन कामाबरोबर इथल्या माणसाच्या मुखात ओव्या असत, गाणी असत, उखाणे असत, म्हणी असत, भजन असे किंवा श्लोक असे. घरातली बाई पहाटेच्या वेळी दळण करण्यासाठी जात्यावरती बसायची तेव्हा ओव्या गाऊन ती स्वतःची करमणूक करायची. विहिरीवरच्या राहाटावर बसून मोग्यातून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर याचेही गाणे असायचे त्यामुळे रहाट दाबताना पायात येणारे गोळे तो विसरून जायचा. शेतावरती चार माणसं जमून काम करत असताना, एकमेकांची थट्टा करताना गाण्यांच्याही मैफिली चालायच्या तर कधी एकमेकाला उखाणे देऊन उत्तरे जाणून घ्यायचा प्रयत्न होत असे. ‘उडत कोंबडा बुडत जाय सोळा शिंगे बत्तीस पाय ‘ किंवा ‘ घाटावरून आल्या बाया त्यांच्या लाल लाल डोया.’ असले उखाणे सोबत असलेल्या मुलांना डोकं खाजवायला भाग पाडायचे. याच स्त्रिया श्रावण महिन्यात रात्रीच्या वेळेला फुगड्या घालण्यासाठी एकत्र यायच्या वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी म्हणता म्हणता  फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार नाचता नाचता अंगातून घाम जायचा पण मिळालेल्या क्षणांचा आनंद लुटताना देहभान विसरून जात.

त्या काळातील लग्न म्हणजे एक बिन वाद्यांचा  तीन-चार दिवस चालणारा आर्केस्ट्राच होता. भात भरडताना ची गाणी वेगळी, हळदीची गाणी वेगळी रुखवताची गाणी वेगळी, घाणा भरतानाची गाणी वेगळी. नवरा नवरीची गाठ सोडताना बांधताना नाव घेण्याची तऱ्हा तर आणखी वेगळीच होती. लग्न मंडपातील जेवणावळीत पंगतीच्या श्लोकांची तर जुगलबंदी व्हायची. यात गंमत अशी होती की बोलणाऱ्यात वयोवृद्ध माणसांपासून तरुणांपासून सात आठ वर्षाची मुले सुद्धा त्यात भाग घेत असत याचा अर्थ केवळ पाठांतरावरती हे श्लोक पुढे पुढे चालत असत. शिमग्यात पालखीच्या सोबत गोमूचा नाद चालायचा त्यामध्ये एखाद्या युवकाला स्त्रीचा वेश देव ढोलकी आणि मंजिरीच्या तालावर नाच गाणे व्हायचे. त्यामध्ये गायली जाणारी गाणी स्थानिक लोक तिथल्या प्रसंगावर आधारित बनवायचे. ‘तुकाराम बोट बुडाली हरचेरी बंदरात’ ‘गोमू चालली बाजारा नाखवा घाली येरझारा’ आशा धापनेची ती गाणी असत. होळीच्या दिवशी दिलेल्या फाका या काहीशा शिवराळ असल्यातरी त्यातील यमक योग्य तऱ्हेने जुळवल्याने त्या अधिक आकर्षक ठरायच्या.

पुढे शाळा झाल्या. मुले शाळेत जाऊन शिकू लागली. शाळेतल्या शिक्षकांवरती सर्वांनी विश्वास टाकला. शिक्षणाचे तेच एकमेव साधन आहे याच्यावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे लोक जीवनातून मिळणाऱ्या ज्ञानापासून शिकलेली पिढी दूर जाऊ लागली. गावातल्या बोलीला दुय्यम स्थान मिळाले आणि पुस्तकातल्याच भाषेवरती सर्वांनी अवलंबून राहण्याचे ठरवले. गावातली भाषा बोलणाऱ्याला गावंढळ म्हणून हेटाळणी होऊ लागली. प्रत्येक जण प्रमाणीत भाषेवरती जोर देऊ लागला आणि स्थानिक बोलीभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानसंपदेपासून आपण दूर गेलो. काळ पुढे सरकत गेला. सगळ्याच बाबतीत आपण पुढारलेले आहोत हे दाखवण्याची अहंमिका सुरू झाली. घरात नळाचे पाणी आले आणि विहिरीवरती स्त्रीयांचे एकत्र येणे कमी झाले त्यामुळे तिथला संवाद तुटला तिथली गाणी बंद झाली.  भाताला पर्याय असलेले हरिक धान्य आज काळाच्या पडद्याआड गेले आहे त्या शेताची भांगलण करण्यासाठी  उभ्या गावाला बोलावलं जायचं. तिथे खेळ व्हायचे, वाद्य वाजायची, गाणी व्हायची त्या खेळाला सापड म्हटले जायचे. गोठ्यातली गुरे नाहीशी झाली आणि रानातला गुराखी दिसेनासा झाला. त्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी गुराख्यांचे बासरीचे मंजूळ सुर ऐकू येईनासे झाले.

आज भले आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्य संपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्याप वाढेल, प्रसार वाढेल. पण ज्या काळात गाव गावातल्या मातीवर प्रेम करत होता, शेतीत राबत होता, वेगवेगळे व्यवसाय करीत होता त्यावेळी ची बोलीभाषा, त्या बोली भाषेतील शब्दसंपदा, त्या त्या बोली भाषेतील मौखिक साहित्य आज पडद्याआड गेले आहे. जर अभिजात मराठी भाषेला अधिक श्रीमंत करायचे असेल तर आता तग धरून असलेल्या गावांकडे साहित्यप्रेमीनी, लेखकांनी, कवींनी आपले पाय वळवायला हवेत. तिथल्या शेतांना, तिथल्या पाय वाटांना, तिथल्या निर्झराना, तिथल्या झाडांना, तिथल्या विहिरींना, तिथल्या नद्यांना बोलतं करायला हवंय. त्यांच्या तिथल्या बोलीभाषेचा गौरव करायला हवा आहे. खरं तर लोकभाषा अर्थात बोली भाषा याच कोणत्याही भाषेच्या मानदंड असतात. त्या जोपासल्या तरच भाषा फुलते, बहरते. गत दहा वर्षे मुंबईसारख्या महानगरातून’ राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई’ या संस्थेच्या माध्यमातून  कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर या दोन तालुक्यात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. या संमेलनातून कोकणातील ग्रामीण बोलीभाषेला जोपासण्याचे कार्य चालले आहे. कोकणच्या ग्रामीण भागातील बोलीभाषेत सकस लिहिणाऱ्या कवि – लेखकांनाही यातून व्यासपीठ मिळते आहे. ही सर्व साहित्य चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे.

सुभाष लाड

अध्यक्ष, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
९८६९१०५७३४

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...