रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 217

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन

यवतमाळ, दि. 3 (जिमाका) : मृद व जलसंधारण विभागाच्या उद्योग भवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन आज मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले.

यावेळी पालकमंत्र्यांह मृद व जलसंधारण विभागाचे नागपुर येथील मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे, अमरावती येथील अधिक्षक अभियंता श्री.निपाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडे यांच्यासह विभागाचे सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री श्री.राठोड यांनी संपुर्ण कार्यालयाची पाहणी केली. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यालयाची मांडणी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान केले. मृद व जलसंधारण विभागाचा मंत्री व राज्यमंत्री दोघेही यवतमाळ जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे विभागाची शहरात स्वतंत्र चांगली ईमारत उभी राहू शकेल का? याबाबत तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यासाठी लागणार निधी उपलब्ध करून देऊ असे ते म्हणाले.

जिल्ह्यात मृद व जलसंधारणाची अनेक कामे सुरु आहे. या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कामांसाठी लागणार निधी देण्यात येतील, असे ते म्हणाले. विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध कामांबाबत यावेळी त्यांनी चर्चादेखील केली.

प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालय तर शाळेच्या प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे असलेच पाहिजेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दि. 3 ( जिमाका):- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तत्काळ करावी. तसेच जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेच्या वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. या दोन्ही कामांसाठी नियोजन समितीच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नियोजन समिती सभागृहात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार राजू खरे, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,  निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर,जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, महावितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांच्या सह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की शंभर दिवस कृती आराखड्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था झालेली दिसून येते परंतु जिल्हा परिषद व अन्य राज्यस्तरीय शासकीय कार्यालय तसेच जिल्हा तालुका स्तरावरील तसेच गाव पातळीवरील प्रत्येक शासकीय कार्यालयात महिलांसाठी शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था तात्काळ करून घ्यावी यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नियोजन समितीला प्रस्ताव पाठवावे. उत्तर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रत्येक वर्ग खोलीमध्ये बसवण्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे सीसीटीव्ही फुटेज पाहता येईल अशी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी. यासाठी आवश्यक तेवढा निधी नियोजन समितीकडून उपलब्ध करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे शंभर दिवस कृती आराखडा अंतर्गत प्रशासन काम करत आहे परंतु शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतरही याच पद्धतीने लोकांना उत्कृष्टपणे सेवा दिल्या गेल्या पाहिजेत. तसेच कृती आराखड्यात अधिकाऱ्यांना भेटण्याच्या वेळा जाहीर केलेले आहे त्याप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी विशेषता गावपातळीवरील ग्रामसेवक व तलाठी नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होतात का यावर योग्य नियंत्रण ठेवावे असे सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिल्या. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयापर्यंत ही ऑफिस प्रणाली सुरू करावी. सन 2024-25 मध्ये नियोजन समिती वरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना सहा कोटी तर जिल्हा शल्य चिकित्सक यांना सात कोटीचा निधी औषधी खरेदीसाठी उपलब्ध करून दिलेला होता. संबंधित आरोग्य यंत्रणेंनी औषधी खरेदी केल्यानंतर त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला आहे की नाही याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधित उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्वरित तपासणी करावी असेही त्यांनी निर्देश दिले. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी चांगल्या सुविधा आहेत का?  व शौचालय आहेत का याची तपासणी करावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2025 – 26 अंतर्गत सोलापूर जिल्ह्याला 934 कोटी 28 लाखाचा निधी मंजूर आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी पुढील एका महिन्याच्या काळात मंजूर निधी अंतर्गत सर्व कामांच्या याद्या जिल्हा नियोजन समितीला सादर कराव्यात त्यानंतर आलेल्या कामांच्या याद्यावर विचार केला जाणार नाही याची संबंधित यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. पंढरपूर देवस्थान विकास आराखड अंतर्गत 73 कोटी 45 लाखाचा निधी मंजूर होता त्यानुसार विठ्ठल मंदिराच्या जतन व संवर्धन कामे आषाढी वारी पूर्वी पुरात्व विभागाने पूर्ण करून घ्यावेत अशी सूचना त्यांनी केली. तर दर्शन मंडप व  स्काय वॉक, श्री संत नामदेव महाराज स्मारक श्री महात्मा बसेश्वर यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने स्वतंत्र बैठक नियोजन विभागाने आयोजित करावी असेही त्यांनी निर्देशित केले.

टंचाईच्या परिस्थितीनुसार जिल्ह्याची सद्यस्थिती माहिती घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना टंचाईच्या काळात कोणालाही पाण्याची कमतरता पडणार नाही या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी सूचना करून एखाद्या गावातून पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मागणीप्रमाणे तात्काळ तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे टँकरला मंजुरी द्यावी असेही त्यांनी सांगितले. मोहोळ तालुक्यातील 11 गावांना पाणीटंचाई जाणवत असून त्या ठिकाणी टँकरची मागणी केलेली आहे त्याप्रमाणे संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित तपासणी करून पुढील कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

नियोजन समितीतून घेण्यात आलेल्या वाहनांचा लोकार्पण सोहळा –

जिल्हा वार्षिक योजना सन 2024- 2025 सर्वसाधारण अंतर्गत सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयाला अकरा वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्या वाहनांना पोलीस आयुक्त कार्यालय येथे हिरवा झेंडा दाखवून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लोकार्पण केले. तर महसूल विभागाला देण्यात आलेल्या शासकीय वाहनांचे लोकार्पणही नियोजन समिती परिसरात पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र; कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंगल प्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत  ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असे यावेळी कौशल्य  विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले.

प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांची सहमती

सिंगापूरचे वाणिज्य दूत  ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातल्या विविध भागात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली. कौशल्य विभागाच्या वतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत श्री.फुंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे या बैठकीला उपस्थित होते.

युवकांना बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पात प्रशिक्षणाची संधी

जगभरातल्या उद्योगात आवश्यक असलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाचा सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन  सर्व्हिसेस ( ITEES ) या संस्थेत समावेश असतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची संधी, तिथले आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान, AI तंत्रज्ञान तसेच औद्योगिक व्यवस्था आणि सेवा याबाबतच्या प्रशिक्षणाची संधी या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या युवकांना मिळणार आहे.

जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षणाबाबत लवकरच सामंजस्य करार

सिंगापूरच्या जागतिक कौशल्य केंद्राच्या माध्यमाने जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना जगभरातील रोजगाराच्या संधीचे दरवाजे खुले होतात. याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या युवकांना जागतिक स्तरावर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न कौशल्य विकास विभाग प्रयत्नशील आहे.  सिंगापूरचे वाणिज्य दुतचे ओंग मिंग फुंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री.लोढा यांनी यावेळी सांगितले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे ‘जियो टॅगिंग’ करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जिल्हा नियोजन’मधून निधी मिळणाऱ्या कार्यालयांना इमारतींच्या सौर ऊर्जीकरणाचे निर्देश

रस्ते सुरक्षेसाठी आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित करावी

मुंबई, दि. ३ : राज्यातील सर्व शाळांचे पिण्याचे पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसह ‘जियो टॅगिंग’ करण्यात यावे. नामांकित शाळांच्या सद्य:स्थितीबाबत विभागाने पडताळणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळणाऱ्या प्रत्येक शासकीय कार्यालयाने आपल्या इमारतीचे सौर ऊर्जीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ विभागांच्या १०० दिवस आराखड्याचा आढावा घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जीकरण करतांना त्याचे पुढील पाच वर्षाचे व्यवस्थापन संबंधित पुरवठादार कंपनीला देण्यात यावे. इमारतीवरील सौर पॅनलची स्वच्छता ठेवण्यात यावी. शासन साडेसात अश्‍वशक्तीपर्यंतच्या सौर उर्जेवर आधारित पंपांना अनुदान देत आहे. ज्या ठिकाणी बूस्टर पंपाची आवश्यकता आहे, तिथे बूस्टर पंपही देण्यात येतील.

शिक्षण हमी कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याबाबत सूचित करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आरटीई’ अंतर्गत विहित अंतरातील मर्यादेत प्रवेश देताना प्रथम शासकीय शाळांना प्राधान्य देण्यात यावे. रस्ते सुरक्षितता महत्त्वाची आहे. रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) कार्यान्वित करण्यात यावी. या प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रभावीपणे थांबविणे आणि अपघातप्रवण स्थळे दुरुस्त करणे सोयीचे होईल.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये इमारत बांधकामाबाबत सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी इमारत नियोजन व्यवस्थापन यंत्रणा (बीपीएमएस) प्रभावीपणे कार्यान्वित करावी. यामुळे मुंबईचे जागतिक दर्जा स्थान सुधारण्यामध्ये आणखी मदत होईल. विकास हक्क हस्तांतरण प्रक्रियेमध्ये ऑनलाइन सुविधा देण्यात यावी. यासाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म ई- टीडीआर सुरू करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत हिरव्या आणि पिवळ्या रंगातील मुद्द्यांवर विभागांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येत्या एक मे पर्यंत अपूर्ण असलेल्या लाल रंगातील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून कामे पूर्ण करावीत. प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर शंभर दिवस आराखड्यातील घेतलेली कामे, पूर्ण झालेली कामे व अपूर्ण कामे कारणांसह ‘पब्लिक डोमेन’ मध्ये संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एसटी महामंडळाने स्वतःचे जाहिरात धोरण तयार करावे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी. यामुळे महामंडळाचे उत्पन्न वाढेल. शंभर दिवसांच्या आराखड्यामुळे नागरिकांना गतिमान सेवा मिळत आहेत. अशाच पद्धतीने भविष्यातही विभागांनी विहित कालमर्यादा आखून कामे पूर्ण करावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या.

या बैठकीत एकूण २२ विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांच्या एकूण मुद्द्यांपैकी ४४ टक्के मुद्द्यांवर पूर्णतः काम झाले आहे. तसेच ३७ टक्के मुद्दे अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. १९ अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 3 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.14 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी  देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतील. त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. या जयंती सोहळ्याचे सर्व संबंधित विभाग व यंत्रणांनी, पोलिस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनासह योग्य समन्वयाने भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजीच्या 134 व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महानगरपालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी यशस्विरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबत दक्षता घ्यावी.

चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सोयीसुविधांची व्यवस्था करावी. त्यामध्ये उन्हापासून संरक्षणासाठी मंडप उभारावेत. उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असावी. दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण करावे व त्यासंदर्भात जागोजागी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना ये-जा करण्यास सुविधा होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, ‘लोकराज्य’ चा विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिद्धी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.

बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. इकबाल सिंह चहल, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि. ३ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य संजय खोडके यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सह सचिव नागनाथ थिटे, उप सचिव विजय कोमटवार, मोहन काकड, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र घाडगे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

000

‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार – मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ३ : विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.

वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाश्यांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते १० लाभार्थ्यांना घरांचे करारपत्रे यावेळी वितरित करण्यात आली. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होत आहे. गणपती उत्सवाच्या आधीच रहिवाशांनी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करावा, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

वांद्रे पूर्व येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची ३०.१६ एकर जमीन उच्च न्यायालयाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री ॲड.शेलार म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वांद्रे पूर्व येथील ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या ७७ सदनिका व बालाजी शॉप किपर्स येथील ६७ सदनिका अशा एकूण १४४ सदनिका शासनाकडे पाठपुरावा करुन उपलब्ध करुन घेतल्या आहेत. या सदनिका तयार होण्यास सहा ते नऊ महिन्याचा अवधी लागणार असल्याने १०० पात्र झोपडीधारकांने स्वखर्चाने पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याची अट नमूद करुन पात्र झोपडीधारकांशी करारनामे करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

बंदिजनांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट

मुंबई, दि. ३ : क्रोध, द्वेष आणि घृणेपोटी किंवा परिस्थितीमुळे गुन्हे घडत असतात. अशा गुन्हेगारांच्या आयुष्यात भगवद्गीतेच्या माध्यमातून सकारात्मकतेची जोड दिल्यास त्यांच्या आयुष्यात  नवी पहाट निर्माण होऊ शकते. याचा प्रत्यय सध्या महाराष्ट्रातील कारागृहातून १९० बंदिजनांच्या साधनेतून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कारागृहात भगवद्गीतेच्या श्लोकांचे सूर घुमत आहेत.

मागील वर्षभर गीता परिवाराच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात भगवद्गीता संथा वर्ग सुरू आहेत. स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. गीता परिवारद्वारा आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून व २१ ‘टाईम स्लॉट्स ‘ मध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज घेतले जात आहेत. हा वर्ग ४० मिनिटांचा आहे. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. राज्यात या उपक्रमाचा व्यापक स्तरावर विस्तार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या उपक्रमाच्या ऑनलाईन वर्गासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता कारागृह प्रशासक आणि कर्मचारी करत आहेत. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर २०२३ मध्ये पहिला वर्ग सुरू झाला. टप्प्याटप्प्याने यात कोल्हापूर, नाशिक, ठाणे, तळोजा येथील केंद्रीय कारागृहांना समाविष्ट केले गेले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात २५, ठाणे ३५, कोल्हापूर ४५, नाशिक ४०, तळोजा ३५, येरवडा १० कैद्यांचा समावेश आहे. या कारागृहातील सुमारे १९० बंदी साधक गीता श्लोक पठण करीत आहेत.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन सुद्धा ऑनलाईन माध्यमातून केले जात आहे. सध्या ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसऱ्या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. येथे एकूण १२ अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. गीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाबाबत समाधानी आहेत. याबरोबरच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले. पुरुष बंदी बांधवांकरिता रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.

शनिवारी व रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जाते. यावेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनदेखील केले जाते. गीता परिवाराचे हे वर्ग चार टप्प्यांमध्ये चालत आहेत. या चार टप्प्यातील वर्गांना चार स्तर म्हटले जाते. पहिल्या स्तरावर दोन अध्याय शिकवले जातात. दुसऱ्या स्तरामध्ये चार अध्याय शिकवले जातात. तिसऱ्या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी सहा अध्याय शिकवले जातात.

या उपक्रमामुळे बंदीजनांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम निश्चितच बंदीजनांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहे. अशा उपक्रमांमुळे बंदीजन आपल्या कुटुंबात परत येऊन एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेत, असा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘अवधान’ लघुपटाचे अनावरण

मुंबई, दि. ०२: चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनद्वारे अध्ययन अक्षमता या  विषयावर निर्मित ‘अवधान’ या लघुपटाचे अनावरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सिंहगड शासकीय निवासस्थान येथे करण्यात आले.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार, सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री शिरूर, डॉ. अमित मिसाळ, सहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टी, पूनम मिश्रा, उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल, निखिल पाटील उपस्थित होते.

‘अवधान’ या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना मिळणारे शिक्षण, तसेच समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये अध्ययन अक्षमतेची लक्षणे समजून घेवून मुलांच्या विकासावर लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे. याबाबतीत जनजागृती करून शिक्षक, समाज व पालक यांना अध्ययन अक्षमतेबाबत शंका कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करणारी हा लघूपट असून  यासाठी जेष्ठ कलावंत नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे. याप्रसंगी विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र निर्माण करण्यासंदर्भात सर्वसमावेशक चर्चा  करण्यात झाली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. ०२: चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  येथे आगमन  झाले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी उच्चायुक्त अभिलाषा जोशी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर – म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...