रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 197

त्रिपुराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही बांबू लागवड मिशन प्रभावीपणे राबवू – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे त्रिपुराच्या दौऱ्यावर;बांबू हस्तकला प्रदर्शनाला भेट

मुंबई, दि. १८ – महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, शास्त्रीय दृष्टीची सांगड घालून महाराष्ट्र राज्यात बांबू मिशन अमलबजावणी प्रभावीपणे राबवू, असे पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या.

आगरताळा येथील बांबू लागवड प्रदर्शनाला भेट देऊन मंत्री पर्यावरण श्रीमती पंकजा मुंडे यांनी महिलांच्या हस्तकला कौशल्याचे भरभरून कौतुक केले. तसेच विविध जातीच्या बांबू लागवडीची यावेळी पाहणी केली.

त्रिपुरातील बांबू हस्तकला देशातील सर्वोत्तम हस्तकलेपैकी एक आहे. तसेच अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूच्या काड्यांसाठी संपूर्ण देशाच्या गरजांपैकी बहुतांशी गरज या राज्यातून पूर्ण केली जाते. बांबू क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी, पीपीपी फ्रेमवर्क अंतर्गत, २००७ मध्ये त्रिपुरा बांबू मिशन (टीबीएम) सुरू करण्यात आले होते.

त्रिपुरा बांबू हस्तकला उत्कृष्ट डिझाइन, विस्तृत श्रेणीतील उत्पादनांसाठी आणि कलात्मक आकर्षणासाठी देशातील सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रदर्शनात विविध जातीच्या बांबूच्या लागवडीचे आणि हस्तकला कौशल्याची पाहणी केल्यानंतर मंत्री पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या हवामान व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून राज्यात बांबू मिशनची अमलबजावणीचा करण्यात येईल, असे सांगितले.

श्रीमती मुंडे यांचे आगरतळा विमानतळावर शासकीय वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांनी स्वागत केले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

बेलारुससोबत परस्पर सहकार्य वाढीसाठी पुढाकार- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १८ : रिपब्लिक ऑफ बेलारुस सोबत सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीसाठी राजशिष्टाचार विभागामार्फत पुढाकार घेण्यात येऊन सामंजस्य करार करण्यात येईल. त्याचबरोबर राज्यातील कृषी उत्पादन, प्रक्रिया उद्योग यामध्ये बेलारुसच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

बेलारुसचे महावाणिज्यदूत अलेक्झांडर मात्सुकोऊ यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि बेलारुसमधील परस्पर संबंध वृद्धीबाबत चर्चा करण्यात आली. वाणिज्यदूत कान्स्टान्सिन पिंचुक यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे. महाराष्ट्रात उत्तम समुद्र किनाऱ्यांसह विविध प्रकारची पर्यटनस्थळे आहेत. राज्यात मुबलक कृषी उत्पादन होत असून उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत यामुळे आंबा, डाळींब, केळी आदी फळे, भाजीपाला विविध देशात निर्यात केला जातो. बेलारुसच्या उद्योजकांनी राज्यातील शेतीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, त्यांना निर्यातक्षम कृषीमाल उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असे सांगून द्विपक्षीय सामंजस्य कराराच्या माध्यमातून परस्पर सहकार्याच्या क्षेत्रांची निश्चिती करुन देवाण-घेवाण वाढीवर भर देता येईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री.मात्सुकोऊ यांनी श्री.रावल यांच्यासमवेत आश्वासक चर्चा झाल्याचे यावेळी सांगितले. बेलारुस मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ तर महाराष्ट्रात नोव्हेंबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी उत्कृष्ट असल्याने परस्पर पर्यटनवृद्धीसाठी वर्षभर संधी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातील सिनेसृष्टी जगप्रसिद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

ग्रामीण साहित्याच्या पाऊलखुणा

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहेअशा या विशेष संमेलनानिमित्त मराठी भाषेतील ग्रामीण साहित्य निर्मितीचा धांडोळा घेणारा हा लेख…

ग्रामीण साहित्याची निर्मिती ही ग्रामीण संवेदनशीलतेतून झाली. सातवाहन राजा हाल यांच्या ‘गाथासप्तशती’ या सारख्या ग्रंथात ग्रामीण जीवनाच्या काही छटा प्रकट होताना दिसतात. याशिवाय मध्ययुगीन महानुभाव, वारकरी वाङ्मय, म्हाइंभट्टाचा ‘लिळाचरित्र,’ ‘गोविंदप्रभुचरित्र’ केशिराजबासांचा ‘दृष्टांतपाठ’ या सारख्या महानुभाव वाङ्मयात ग्रामजीवनाचे दर्शन घडते तसेच संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरोबा कुंभार, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ आदी व इतर संताच्या अभंग, गौळणी व भारूडादी काव्य प्रकारातून ग्रामीण संस्कृतीचे सुक्ष्म व प्रभावी प्रकटीकरण दिसून येते.

मराठी काव्याची ‘प्रभात’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिरी कवनातही ग्रामीण रांगड्या श्रृंगाराचे, ग्राम संस्कृतीचे भावप्रकटीकरण दिसून येते. परंतु उपरोक्त साहित्यलेखनकर्त्याचा लेखन हेतू, प्रेरणा भिन्न स्वरूपाच्या दिसून येतात. लोकसाहित्य हे श्रमिक कष्टकऱ्यांच्या रंजनासाठी, महानुभाव साहित्य पंथनिष्ठेतून उदय पावले, वारकरी साहित्य समाजप्रबोधन व अध्यात्मनिरूपणाच्या प्रेरणेतून तर शाहिरी वाङ्मय हे लोकरंजनाच्या हेतूतून उगम पावले. या साहित्य कलावंताच्या कलाकृतीतून ग्रामजीवनाच्या विविध छटा प्रकट होत असल्या तरी ग्रामजीवनाचे विविध प्रश्न, समस्या केंद्रीभूत मानून साहित्य लेखन करावे असे त्यांना वाटलेले दिसत नाही. कदाचित त्या काळाचा विचार करता ग्रामीण समाज जीवनाच्या व्यथा, वेदना आणि समस्या यांच्या अनुषंगाने आवश्यक असणारी शिक्षणप्रणाली व समाजप्रबोधनाची चळवळ झालेली नव्हती. ग्रामीण साहित्याला महात्मा फुले, राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शरद जोशी यांच्या विचाराचे अधिष्ठान आहे.

ग्रामीण संवेदनशीलतेचा आणि जाणीवेचा प्रारंभ आपणास महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यात सापडतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न’ नाटक (१८५५) ‘ब्राम्हणाचे कसब’ (१८६९), ‘गुलामगिरी’ (१८७३), ‘शेतक-याचा आसूड’ (१८८३), ‘मराठी ग्रंबकार सभेस पत्र’ (१८८५), ‘इशारा’ (१८८५), ‘अखंडादी काव्यरचना’ (१८८७) इ. ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन केलेले दिसते. शेतकरी, कष्टकरी व शुद्रादीशुद्रांच्या संबंधी काही मुलगामी विचार मांडून त्यांच्या दारिद्रयाचा, गरिबीचा अन्वयार्थ त्यांनी शोधला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थिती व दाहकतेचे वर्णन करताना महात्मा फुले यांची ग्रामीणतेसंबधी प्रगल्भ जाणीव प्रकट होते.

कृष्णराव भालेराव यांनी १८७७ मध्ये ‘दीनमित्र’ च्या अंकात ‘बळीबा पाटील’ ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीतून खेडुतांचे होणारे शोषण आणि दाहकता यांचे वास्तवदर्शी चित्र रेखाटले आहे. पाटील, कुलकर्णी, अस्पृश, मुसलमान यांच्या संबंधासह वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था व स्त्रियांचे स्थान यावर प्रकाश टाकते. हरिभाऊ आपटे यांनी १८९८ च्या दरम्यान लिहिलेली ‘काळ तर मोठा कठीण आला’ ही दीर्घकथा १८९७ च्या सुमारास महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ स्थितीवर आधारलेली आहे. ‘धनुर्धारी (श्री. रा. वि. टिकेकर) यांनी १९०३ मध्ये ‘पिराजी पाटील’ ही पहिली ग्रामीण कादंबरी लिहिली.

१९२० च्या सुमारास भारतीय राजकारणाची सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे गेली. राजकारणी, समाजसुधारक, विचारवंत व साहित्यिक यांनी खेड्यात जाऊन तेथील समाजाचा जीवनानुभव समजावून घेतला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या अनुयायांना ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली. गांधीजींच्या हाकेने संमोहित होऊन माधव त्र्यंबक पटवर्धन, यशवंत दिनकर पेंढारकर, ग. त्र्य. मांडखोलकर, श्री. बा. रानडे इत्यादी मंडळीनी १९२३ मध्ये ‘रविकिरण मंडळा’ ची स्थापना केली याच काळात हळुहळू ग्रामीण जीवनातील साहित्यामध्ये आस्था आणि जिव्हाळा निर्माण झाला. त्याचे पर्यावसान ग्रामीण कविता लिहिण्यात झाले.

गिरीश, यशवंत, ग. ल. ठोकळ, ना. घ. देशपांडे, मा. भि. पाटील, के. नारखेडे यांच्या जानपद गीतांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. १९३३ साली ‘सुगी’ हा प्रतिनिधीक जानपदगीत संग्रह प्रकाशित झाला. १९३४ साली ग. ह. पाटलाचा ‘रानजाई’, ग. ल. ठोकळ यांचा ‘मीठभाकर’ (१९३८), के. नारखेडे ‘शिवार’ (१९३९), भा. रा. तांबे ‘गुराख्याचे गाणे,’ गिरीशांचे ‘आंबराई,’ चंद्रशेखराचे ‘काय हो चमत्कार’ हे खंडकाव्य दरम्यानच्या काळात प्रसिध्द झाले. तथाकथित ग्रामीण साहित्याचा निर्माता आणि भोक्ताही शहरी मध्यमवर्गीय समाज होता. म्हणून एक रूचीपालट म्हणून ग्रामीण जीवनाला साहित्यात स्थान दिले गेले. या संदर्भात आनंद यादव म्हणतात की, “हौसेखातर नागर मुलीने खेड्यातल्या मुलीचा पोशाख घटकाभर धारण करावा आणि मिरवावा” तसा हा केवळ बदलाचा एक नवा प्रकार म्हणूनच ही कविता आरंभी जन्माला आली.

या काळात सर्वच वाङ्मय प्रकारात विपूल साहित्य निर्मिती होतांना दिसते. ही आनंददायी बाब असली तरी या काळात ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्र प्रकट झाले का? या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. या कालखंडातील अपवाद म्हणून श्री. म. माटे यांचा विचार करावा लागेल. त्यांनी लिहिलेल्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ व ‘माणूसकीचा गहिवर’ या संग्रहातून आलेल्या कथा ही ग्रामीण, दलित, उपोक्षितांच्या व्यथा, वेदनांचा छेद अंतरिच्या उमल्यातून येतांना दिसतात. या अर्थाने माटे यांना ‘ग्रामीण कथेचे जनक’ म्हणतात.

१९४५ च्या नंतर एकूणच मराठी साहित्यात संक्रमण सुरू झाले. हा काळ मराठी ग्रामीण साहित्याच्या दृष्टीनेही परिवर्तनाचा काळ आहे. या काळात उदयास आलेली नवकाव्य, नवकथा हे मराठी साहित्याला वास्तवतेच्या पातळीवर आणू पाहत होते. परिणामतः ग्रामीण साहित्य रंजनपरतेची कात टाकून ग्रामीण वास्तवतेच्या अविष्करणाला महत्व देऊ लागते. “मर्ढेकरांनी नवकाव्याबरोबर साहित्याच्या मूल्यांची भूमिका कलावादी जाणीवेतून मांडली. आपल्या निष्ठा आणि शुध्द कलावादी भान गंगाधर गाडगीळ, गोखले, पु. भा. भावे नव्या जोमाने कथा लेखनाद्वारे मांडीत होते. या लेखनाचा आणि दृष्टीचा ताजा जोम आणि पीळ व्यंकटेश मांडगुळकरांच्या ‘माणदेशी माणसे’ नी शिल्पीत झाला. मांडगुळकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, श्री. ना. पेंडसे आदीचे लक्षणीय लेखन राहिले. विभावरी शिरूरकर यांच्या ‘बळी’ (१९५०) या कादंबरीने समाजापासून वंचित असणाऱ्या मांग-गारूडी या जमातीच्या जीवनातील अंधश्रध्दा, निरक्षरता जोपासणारी, माणसाचा दिशाहिन पट अतिशय प्रगल्भपणे या कांदबरीत मांडली. बहिणाबाई चौधरी यांचा ‘बहिणाबाईची गाणी’ (१९५२) हा अस्सल ग्रामीण संवेदनशीलतेचा ठेवा सापडला. लोकगीताच्या अंगाने कृषीसंस्कृतीचे अनेकविध धागे सहजपणे त्यांनी साकारले.

दरम्यानच्या काळात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे खेड्यातील नवशिक्षितांची पिढी उदयाला आली आणि आपले अनुभव शब्दात मांडू लागली. यालाच ‘साठोत्तरी साहित्य’ हो संज्ञा रूढ केली गेली, या पिढीने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष अनुभवले होते. त्यामुळे त्याच्या लेखनातून अनुभूतीच्या खुणा प्रकट होतांना दिसतात त्यांना आत्मभान आले होते. या काळातील ग्रामीण साहित्य अस्सल ग्राम बास्तवाच्या निकट जाताना दिसते. यातूनच अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’, उध्दव शेळके ‘धग’, हमीद दलवाई ‘इंधन’, शंकर पाटील ‘टारफूला’, ना. धो. महानोर ‘गांधारी’, आनंद यादव ‘गोतावळा’, रा.रं. बोराडे ‘पाचोळा’ या कांदबऱ्या लक्षणीय स्वरूपाने आलेल्या दिसतात. ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात द. ता. भोसले, म. भा. भोसले, ग. दि. मांडगुळकर, शंकरराव खरात, नामदेव व्हटकर, मधु मंगेश कर्णिक, चंद्रकांत भालेराव, वा. भ. पाटील, चंद्रकुमार नलगे, महादेव मोरे, सखा कलाल, चारुता सागर यांच्या शिवाय अनेक साहित्यिक अधूनमधून ग्रामीण लेखन करतांना दिसतात, या काळात ग्रामीण साहित्याने संख्यात्मक व गुणात्मक उंची गाठलेली दिसते. पण ही पिढो ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडताना स्वतःच्या अनुभवाशी रेंगाळताना दिसतात.”समूहाचे जगणे, सामाजिक प्रश्न-समस्या त्यांच्या साहित्यातून येईनाश्या झाल्या. व्यक्तीजीवन, कुटुंबजीवन, नाते संबंध यांच्या मोहात अडकले.

१९७७ पासून सुरू झालेल्या ग्रामीण साहित्य चळवळीने ग्रामीण साहित्याला नवी दृष्टी आणि अस्मिता दिली, तसेच या काळात ग्रामीण साहित्याच्या स्थित्यंतराबाबत एक अतिशय आश्वासक घटना घडली ती म्हणजे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा उदय ही होय. ‘भीक नको घेऊ घामाचे दाम’ हा शेतकरी संघटनेने कष्टकरी शेतकरी समूहाला दिलेला स्वाभिमानी मंत्र त्यांच्या ठायी ‘आत्मभान’ निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरला. शेतकऱ्याचे प्रश्न आणि त्यासाठी उभी राहणारी आंदोलने ग्राम आत्मभानासाठी पूरक असल्याची भूमिका चंदनशिव व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या शोषण परंपराची नोंद घेऊन शेषराव मोहिते, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोतापल्ले, वासुदेव मुलाटे, फ. म. शहाजिंदे, बाबाराव मुसळे, महादेव मोरे, भिमराव वाघचौरे, मोहन पाटील, इंद्रजित भालेराव, संदानंद देशमुख, रा. रं. बोराडे, आनंद यादव, विश्वास पाटील, प्रभाकर हारकळ, राजन गवस, पुरुषोत्तम बोरकर, बा. ग. केसकर, आनंद पाटील, श्रीकांत देशमुख, नागनाथ पाटील, जगदीश कदम, भारत काळे, आसाराम लोमटे, सुरेंद्र पाटील, प्रकाश मोगले, अप्पासाहेब खोत, नारायण सुमंत, प्रकाश होळकर, गणेश आवटे, अशोक कोळी, कृष्णात खोत, भगवान ठग, उत्तम बावस्कर, केशव देशमुख, उत्तम कोळगावकर, भास्कर बडे, लक्ष्मण महाडिक, प्रमोद माने, बालाजी इंगळे, सुधाकर गायधनी, संतोष पवार, कैलास दौंड, नामदेव वाबळे, हंसराज जाधव इत्यादी (अजूनही काही नावे सांगता येतील) साहित्यिक ग्रामजीवन प्रगल्भ जाणीवेसह मांडताना दिसतात. या कालखंडात लिहिणा-या साहित्यिकांना ‘समाजभान’ आल्याचे जाणवते. त्यांनी ग्रामजीवनाचे मानसिक आंदोलनाचे, जगण्याचे प्रश्न नीट नेटकेपणाने आकलन करून घेतले.

ग्रामीण साहित्य प्रवाहाच्या कार्याची गती आणि व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. जो साहित्यिक कलावंत जनतेच्या व्यथावेदना, मानसिक आंदोलन, आकांक्षा, सुख दुःखांना लेखणीत मुखरीत करतो. ते साहित्य खऱ्याअर्थाने विश्वव्यापी रूप धारण करते. मुळात ग्रामीण साहित्याजवळ प्रतिभावंतांची वाणवा नाही. उलटपक्षी वैश्विकतेकडे जाण्याचे सर्वाधिक सामर्थ्य ग्रामीण साहित्यातच आहे, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. तिची बांधिलकी कष्टकरी, श्रमिक व सर्जक मानवतेशी आहे. जोपर्यत ग्रामीण कष्टकऱ्यांची संस्कृती अस्तित्वात आहे तोपर्यत ग्रामीण साहित्याला भवितव्य आहे, यामध्ये कसलाही संदेह नाही.

संदर्भ ग्रंथ

०१. अत्रे त्रि.ना, ‘गावगाडा’, वरद बुक्स, पुणे, तिसरी आवृती, १९८९.

०२. गुंदेकर श्रीराम, ‘ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन’ दिलीपराज प्रकाशन, पुणे, ऑगस्ट, १९९९.

०३. चंदनशिव भास्कर, ‘भूमी आणि भूमिका’, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९२.

०४. फडके य. दि., ‘महात्मा फुले समग्र वाड़मय’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९९१.

 डॉ. ज्ञानदेव राऊत

शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी

dnraut800@gmail.com

आपण सर्व संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

ठाणे,दि.१८ (जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपण सर्वजण जाणता की, आज आपण जो स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत, जगतो आहोत, आज आपला स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. ज्या काळामध्ये अनेक राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारत होते, स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती, गुलामीत राहणे पसंत करत होते, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव, देश आणि धर्मासाठी लढायचे आहे. कितीही मनसबदारी मिळाली, सरदारी मिळाली तरी परकीय आक्रमकांचा नोकर म्हणून आपल्याला काम करायचे नाही तर आपल्या सामान्य माणसावर ओढवलेले हे जे संकट आहे ते दूर सारून या मराठी मुलुखाला स्वराज्यामध्ये परिवर्तित करावेच लागेल.

ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुघलांच्या फौजेमध्ये इराणी, अफगाणी, उज्बेकिस्तान, बलुचिस्तान या सगळ्या भागातले मोठमोठे सरदार होते, त्यांना मोठमोठा पगार होता. ते पगारी नोकरदार होते, लढणे हा त्यांचा व्यवसाय होता. मोठा प्रशिक्षण आणि पैसा त्यांच्या पाठीशी होता. पण आपले मावळे मात्र अर्धपोटी राहून लढायचे. पण फरक काय होता, तर मुघलांचे सैन्य हे पगारार्थ लढायचे आणि आपले मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढायचे. त्यांना माहिती होतं, ज्या राजाकरता आपण लढतोय तो स्वतःसाठी लढत नसून आपल्या जनतेला मुघलांच्या जाचातून बाहेर काढण्यासाठी लढतो आहे. त्यामुळे लाखाची फौज घेऊन मोघल आक्रमक यायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 हजार मावळे त्या फौजेला नामशेष करायचे. याचे कारण त्यांच्यामध्ये जी क्रांती, जे तेज छत्रपती शिवरायांनी पेरलं होतं त्यामुळेच खऱ्या अर्थाने ही लढाई ते जिंकू शकायचे.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक चांगले योद्धे म्हणूनच मर्यादित नसून ते एक उत्तम प्रशासक देखील होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पाण्याचे नियोजन, जंगलांचे नियोजन, बांधलेले किल्ले आणि तयार केलेले आरमार यातील प्रत्येक गोष्ट जर आपण बघितली तर कोणाकडून कर घ्यायचा व कोणाकडून घेऊ नये, कशा पद्धतीत कर घ्यायचा आणि कशा पद्धतीत घेऊ नये, ही प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञावलीच्या माध्यमातून लिहून ठेवली आणि कार्यान्वित केली, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. राज्य करताना संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्य केले जाते. हा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा नसून प्रेरणेचे स्थान आहे. एक असे स्थान आहे ज्यातून प्रेरणा घेवून आपल्या सर्वांना पुढील वाटचाल करायची आहे.

ते पुढे म्हणाले की, बदलापूरसाठी एमएमआरडीएकडून विकासकामांचा निधी येईल आणि विकास होण्यास होईल. पाण्याच्या योजनेचा प्रस्तावास नगरविकास विभागाकडून मंजुरी घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. उल्हास नदीवर काही धरणं देखील बांधत आहोत. त्यामुळे पूररेषा निश्चितपणे कमी होणार आहे. उल्हास नदीच्या खोलीकरण व गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येईल. या कामासाठी ज्या ज्या गोष्टी करणे शक्य आहे त्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील. अस्वच्छ पाणी स्वच्छ करून त्याचे योग्य नियोजन केले जाईल. तसेच मेट्रोच्या कामाला देखील गती देण्यात येईल.

आमदार किसन कथोरे हे आपल्या मनोगतात म्हणाले की, बदलापूर शहराला शिवकालीन इतिहास आहे. उल्हास नदीला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्यास पर्यटनाला चालना मिळेल.

यावेळी लाडक्या बहिणींच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला.

00000

कोकणातील साहित्यिक वाटचाल

२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणातील साहित्यिक वाटचाल यावर विशेष लेख..

महाराष्ट्राच्या इतर विभागाप्रमाणेच एक विभाग म्हणजे कोकण. या कोकणात वेधक निसर्गसौंदर्य, भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण लाभलेला समुद्रकिनारा, विविध झाडे – झुडुपे, डोंगर – दऱ्या अशा अनेक नयनरम्य नैसर्गिक साधनसंपत्ती आढळतात. त्यामुळे इतर विभागाप्रमाणेच कोकणचे वेगळे महत्व आहे. त्यासोबतच कोकण हा महाराष्ट्रातील समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गसंपन्नता लाभलेला प्रदेश आहे. त्याचे कारण म्हणजे याच कोकणात अनेक चळवळींचा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे त्या त्या चळवळींचा मोठा प्रभाव हा कोकणासह महाराष्ट्रात झाला. त्यामुळे कोकणातल्या सर्वच क्षेत्राची वाटचाल अत्यंत लक्षणीय आहे. एवढंच नाही नव्हे तर, इतर चळवळीप्रमाणेच इथल्या साहित्यिक चळवळीचा इतिहास मोठा आहे आणि त्याला विविध साहित्यप्रकारांची आणि प्रसिद्ध साहित्यिकांची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही कालही प्रभावी होती, आजही लक्षणीय आहे आणि भविष्यातदेखील तिचे योगदान मोठे असणार आहे.

कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण

कोकणात नमन, जाखडी, लोककथा, ओव्या आणि भारुडे मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती आणि कालानुरूप आजही त्यांचे अस्तित्व भक्कम आहे. दशावतारी नाट्यप्रकारही इथल्या लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या साहित्याच्या माध्यमातून कोकणातील अनेक प्रथा – परंपरा – सण – उत्सव यांचे महत्व अधोरेखित झाले. आजही ग्रामीण भागात वरील प्रकारातुन साहित्य निर्मिती आणि सामाजिक परिवर्तन होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येते. मुख्यतः लोककथा, ओवी, भारुडे, कविता, कथा, कादंबरी आणि नाटकांमधून व्यक्त झाली आहे. म्हणूनच कोकण हा केवळ निसर्गरम्य प्रदेश नसून, तो मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वाचे योगदान देणारा भाग आहे. कोकणातील साहित्यिक वाटचाल लोकपरंपरेपासून आधुनिक साहित्यापर्यंत विविध टप्प्यांतून गेली आहे. म्हणूनच कोकणातील साहित्यिक चळवळ ही पारंपरिक आणि आधुनिक विचारांचे मिश्रण आहे. लोकसाहित्य, कविता, कथा आणि नाट्य या सर्व माध्यमांतून कोकणाने मराठी साहित्य समृद्ध केले आहे.

कोकणातून अनेक नामवंत साहित्यिक उदयास आले, ज्यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले. कृ. आ. केळुस्कर यांनी गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले चरित्र आपल्या स्वखर्चातून लिहिले आणि त्यातून साहित्य चळवळ प्रवाहित केली. कवी केशवसुत यांना मराठी आधुनिक मराठी कवितेचे मानले जाते. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील अंधश्रद्धा, अज्ञान आणि अनिष्ट प्रथा यावर कवी केशवसुत यांनी प्रहार करताना मानवतेचा आणि सामाजिक जाणिवा वृंद्धीगत करणारा आशय मांडला. त्यापुढील धनंजय कीर यांच्यासारख्या चरित्र लेखकांनी भारतातील अनेक नामवंत आणि महनीय व्यक्तिमत्वाची चरित्रे निर्माण केली. साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, भारतरत्न डॉ. पा. वा. काणे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कथाकार जी. ए. कुलकर्णी, महेश एलकुंचवार यांसारखे कादंबरीकार, लेखक आणि नाटककारही कोकणातील आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने साहित्य चळवळ समृद्ध झाली. जयवंत दळवी आणि इतरांनी नाट्यलेखन आणि विविध क्षेत्रात लेखन करताना त्या – त्या लेखनाचा आशय समाजमनाला भावणारा ठेवला. त्यामुळे संवेदनशील असणारे कोकणी समाजमन या लेखनाकडे आकर्षित झाले. परिणामी कोकणात साहित्यिक चळवळ ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.

कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी

अशा असंख्य लेखकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित, वंचित आणि सर्वसमावेशक कोकणी मनाला भुरळ घातली. प्रत्येकाच्या लेखणीच्या आशयसंपन्न लेखनामुळे लहान ते ज्येष्ठ यांच्यापर्यंत साहित्याची आवड निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणजे कोकणात अनेक साहित्य संमेलन यशस्वी झाले. रत्नागिरी येथे १९९० मध्ये झालेले साहित्य संमेलनानंतर तत्कालीन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत कोकणातील वाडी – वस्त्यांमधील संवेदना जपणाऱ्या मनांनी लिहायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे अनेक कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार, ललित लेखन करणारे साहित्यिक तयार झाले. त्यातून त्यांच्याच पुढाकाराने कोकणात विविध साहित्य संमेलने भरवली जात आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कोकणात झाली. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषदेचे १७ पेक्षा जास्त केंद्रीय संमेलने, साहित्य विश्वात पहिल्यांदाच सहा राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन, बाल साहित्य संमेलन यासह स्थानिक स्तरावर अनेक संमेलने झाली. त्यात राजापूर येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे, नाट्य संमेलनाचे दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. त्यात कोकणी भाषा आणि साहित्य चळवळ यावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडवून आणली जाते. महिला साहित्य संमेलन असो वा युवा साहित्य संमेलनातून महिला आणि युवा वर्गाच्या समोर असणाऱ्या प्रश्नांना आवाज असतो. त्यामुळे या साहित्य संमेलनात उपस्थितीदेखील मोठी असते.

काळाच्या ओघात कोकणातील असंख्य नवलेखक आपल्या सृजनशील लेखणीच्या द्वारे आता कादंबरी, कविता, लघुकथा, चित्रवाहिन्यावरील मालिकांचे लेखन, संहिता लेखन आणि चित्रपट कथा या माध्यमांतून योगदान देत आहेत. कोकणावर आधारित पर्यटन, विज्ञान, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कथा लोकप्रिय होत आहेत. जुन्या आणि नवीन लेखकांनी कोकणच्या संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मागील किती तरी वर्षांपासून सुरू असलेली साहित्यिक आणि मराठी भाषिकांची मागणी विद्यमान सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे पूर्ण झाली. त्यामुळे आता सर्वच मराठी भाषिकांनी मराठी भाषेचे अभिजातपण जपण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या प्रयत्नांना हातभार लावण्यात कोकणचे मोठे योगदान असेल. यावर्षी दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

थोडक्यात अनेक थोर लेखकांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्या भूमीत ज्या अपेक्षेने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ उभारली त्याच जोमाने ती पुढे – पुढे जात आहे. अनेक संस्था यासाठी पुढाकार घेऊन भडकत्या प्रसारमाध्यमांच्या काळात तरुण मनाला लिहिते करत आहेत. त्यामुळे कोकणातील साहित्यिक वाटचाल ही आव्हानात्मक जरी असली तरी समाधानकारक आहे.

000

श्री. माधव विश्वनाथ अंकलगे

वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी

 संपर्क – ९०२१७८५८७४ / ९७६४८८६३३०.

कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारीसाठी इंग्लंडमधील उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठांमधील संशोधन, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. इंग्लंडपेक्षा महाराष्ट्रात उत्पादन खर्च कमी आहे. तेथील शेतकरी आणि उद्योजकांनी भागीदारीसाठी महाराष्ट्रात यावे, येथे त्यांचे स्वागत होईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

ब्रिटीश उप उच्चायुक्तालयातील द्विपक्षीय व्यवहार प्रमुख जॉन निकेल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबरोबरच गुंतवणूक वाढविण्याबाबत चर्चा झाली.

राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, राज्यातील समृद्धी महामार्गामुळे राज्यातील सर्व विभाग जोडले गेले आहेत. सर्व विभागांमध्ये स्थानिक गरजांनुसार उद्योगवाढीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील आंबा, डाळींब, केळी अशा फळांना मोठे निर्यातमूल्य आहे. फलोत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी देखील येथे वाव आहे. इंग्लंडमधील शेतकऱ्यांनी राज्यातील शेतीला भेट द्यावी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन करुन तंत्रज्ञानासह महाराष्ट्रात भागीदारी तसेच गुंतवणुकीसाठी आपले स्वागत होईल, असेही त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे.

भाषा कुठून येते ? आपण ‘ मातृभाषा ‘ असा शब्दप्रयोग करतो तेव्हा आईची जी भाषा ती मुलाची भाषा असा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो काय ? लहान मुल त्याच्या परिसरातील भाषा आत्मसात करते.ते वाढत जाते , तसा त्याच्या परिसराचा विस्तार होतो आणि त्याचा त्याच्या भाषेवर परिणाम होतो. आमच्या छत्रपती संभाजीनगरला राहणारे लोकं घराबाहेर पडले की अगदी सहज हिंदी बोलतात.आपण ज्या विक्रेत्याकडून भाजी घेत आहोत , तो ग्रामीण भागातून आलेला आपल्यासारखाच मराठी माणूस आहे , याचा जणू विसरच पडतो आणि ‘ मेथी क्या भाव है ? ‘ असा प्रश्न हाती भाजीची जुडी घेत सहजपणे विचारतो !

भाषा आत्मसात करण्याची मानवी क्षमता नैसर्गिक

प्रश्न भाषेचा असल्याने आणि भाषा ही मूलतः वैयक्तिक असल्याने काही व्यक्तिगत अनुभव नमूद करायला हवेत.साधारण पस्तीस  वर्षांपूर्वी पुण्यात राहणाऱ्या मित्राने मला बजावले होते की , पुण्यात रिक्षावाल्याशी हिंदीत बोलायचे नाही ! हिंदीत बोलणारा माणूस पुण्यातील नाही म्हणजे नवखा आहे , असे रिक्षावाल्यांच्या लगेच  लक्षात येते आणि मग त्यातील एखादा जवळच्या अंतरासाठी दूरचा रस्ता जवळ करू शकतो असे त्या मित्राचे सांगणे होते.दुसरा अनुभव दिल्लीतील.तेथे राहणारे माझे एक आप्त मला म्हणाले की त्यांच्या परिचयाच्या अन्य मराठी माणसांच्या तुलनेत माझी हिंदी चांगली आहे. या आप्तांना चांगल्या वाटलेल्या माझ्या हिंदीचे कारण माझे छत्रपती संभाजीनगर येथील वास्तव्य म्हणजे माझा परिसर हे आहे.वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांसाठी मार्गदर्शन करणारे प्रा. वसंतराव कुंभोजकर विद्यार्थ्यांना सांगत की , मराठी शब्दोच्चारांवर लक्ष द्यायला हवे. हिंदीत ‘ ण ‘ नाही पण मराठीत तो आहे आणि त्याचा उच्चार  ‘ न ‘ पेक्षा वेगळा आहे ! ही सगळी उदाहरणे भाषेचे परिसराशी असलेले नाते सांगणारी आहेत. कोणतेही व्याकरण शिकण्यापूर्वी भाषा आत्मसात करण्याची मानवी क्षमता नैसर्गिक असल्याचे भाषाशास्त्रज्ञ सांगतात.

माध्यमांचे प्रकार आणि त्यांची संख्या वाढती

परिसरात माणसं असतात तशी माध्यमं असतात. आज तर माध्यमांचे प्रकार आणि त्यांची संख्या वाढती आहे. ही सारी माध्यमं आपल्या समोर आणून ठेवणारा मोबाईल तर नेहमीच आपल्या हाती असतो. त्याने आपला जणू सारा परिसरच व्यापला आहे. यातील बराच भाग आभासी असतो आणि तो खऱ्याखुऱ्या परिसरापासून आपल्याला नेहमी दूर नेतो, हेही लक्षात घ्यावे लागते. आपला परिसर माध्यमांनी व्यापलेला असल्याने माध्यमांच्या भाषेचा विचार करावा लागतो.

कोणे एकेकाळी (हा कोणे एकेकाळ फार लांबचा नाही !) माध्यमांचे विश्व म्हणजे दैनिके , नियतकालिके, आकाशवाणी आणि दूरदर्शन असे होते. (आकाशवाणी आणि दूरदर्शन हे शब्द रेडिओ आणि टेलिव्हिजन या शब्दांचे मराठी प्रतिशब्द नव्हेत.पण माध्यमांनी त्या अर्थाने ते रूढ केले आहेत. ‘ झेरॉक्स ‘ हा शब्दही असाच रूढ झाला आहे. मागच्या पिढीत वनस्पती तुपासाठी ‘ डालडा ‘ हा शब्दही असाच रुढ झाला होता.) जेव्हा माध्यमाचे विश्व मर्यादित होते , तेव्हा त्यांच्यातील स्पर्धाही मर्यादित होती. ( माणसाची झोप ही आमची प्रतिस्पर्धी आहे , असे म्हणणाऱ्या ‘ नेटफ्लिक्स ‘ चा काळ तेव्हा कल्पनेतही नव्हता !) एकूण जीवनाला आजच्या सारखी गती नव्हती. ‘ सर्वात आधी आणि सर्वांच्या पुढे ‘ हा आजचा जीवनमंत्र तेव्हा माध्यमांनी स्वीकारलेला नव्हता. तेव्हा तंत्रज्ञान आजच्या इतके गतीमान नव्हते आणि त्याच्या गतीची मर्यादा स्वीकारली गेली होती.माध्यमे तंत्रज्ञानप्रधान नव्हती.

तेथे काम करणारे आणि वाचक ( ग्राहक नव्हे !) महत्वाचे होते.

वाचकांची जडणघडण आपण करू शकतो , ही भूमिका तेव्हा रूढ होती म्हणूनच काही दैनिके राशिभविष्य छापत नव्हती. काही दैनिके आसाम ऐवेजी असम , पंतप्रधान ऐवेजी प्रधानमंत्री , मध्यपूर्व ऐवेजी पश्चिम आशिया , उत्तरपूर्व ऐवेजी इशान्य असे शब्द जाणीवपूर्वक उपयोगात आणत.त्या काळातील भाषा ही बहुतेकवेळा प्रमाणभाषेशी नाते सांगणारी होती. मराठी शब्द कटाक्षाने वापरण्याकडे कल होता.आज एका बाजूला कम्प्युटर हा शब्द वापरला जातो आणि त्याच वेळी डेटा या शब्दासाठी विदा हा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न सुरू असतो आणि यात विसंगती आहे , असे कोणालाही वाटत नाही. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांना अनुक्रमे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे रूढ झालेले शब्दही वापरले जात नाहीत. काही वेळा मुख्य न्यायाधीश आणि सरन्यायाधीश असा फरक केला जात नाही. दिनांक ऐवजी तारिख , सप्ताह ऐवेजी आठवडा असे सोपे शब्द रुजवण्यासाठी प्रयत्न झाले , याचा आता विसर पडला आहे. हे घडत आहे याची अनेक कारणे आहेत. वर्तमानपत्रांच्या जगात पूर्वी बातमी असो की लेख, ते संपादकीय संस्कार केल्यानंतरच पुढे पाठवले जात. वार्ताहर, मुख्य वार्ताहर, उपसंपादक, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक…अशा पायऱ्या तेव्हा केवळ नामाभिधानासाठी अस्तित्वात नव्हत्या तर त्यांची स्वतंत्र कार्ये निर्धारित होती.आज ही पदं अस्तित्वात आहेत पण त्यांची दैनंदिन कार्ये बदलेली दिसतात. हा बदल तंत्रज्ञानातील बदलासोबत आला.तंत्रज्ञान गती आणि स्पर्धा घेऊन आले. त्याने माध्यमांचे स्वरूप बदलले. मुद्रितशोधक हद्दपार झाला.बातमीदार असो की लेखक , तोच त्याच्या मजकूराचा अनेकदा उपसंपादक ठरू लागला. जी दैनिके वेगळी जिल्हा पाने देतात , त्या पानांत या स्थितीचे प्रतिबिंब सहज दिसते.याचा परिणाम भाषेवर झाला. काहींनी नव्या पिढीशी नाते जोडायचे म्हणून त्या पिढीच्या भाषेशी नाते जोडण्याचा व्यावहारिक आग्रह धरला.त्याला कधी तात्विक रूप दिले. त्यातून भाषेचे रूप आणखी पालटले. महानगरातील भाषेत जशी इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ झालेली असते तशीच भाषा दैनिकातून डोकावू लागली. महानगरात राहणारी नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते.त्याच पिढीतील प्रतिनिधी आज वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात.मग वटहुकूम आणि शासन निर्णय , विधेयक आणि कायदा यात फरक केला जात नाही. मराठीत क्रियापदांचे अनेकवचनी रूप असते , आदरार्थी अनेकवचन उपयोगात आणण्याची पद्धत आहे अशा बाबींचा विसर पडतो.

कोणतीही भाषा स्थिर असू शकत नाही आणि भाषेने अन्य भाषांमधील शब्द स्वीकारण्यास काही प्रतिबंध असू शकत नाही.पण असे शब्द स्वीकारताना आपल्या मूळ भाषेला रजा देण्याची गरज नाही.बँकेला बँक म्हणावे पण चेक साठी धनादेश हा शब्द सर्वांना समजतो ना ?

आपल्या भाषेविषयी मराठी माणूस जागरूक नाही , ही विदारक वस्तुस्थिती आहे. मागे नगरला ( आजचे अहिल्यानगर ) साहित्य संमेलन झाले तेव्हा सुप्रसिद्ध दिग्दर्शक बासू भट्टाचार्य म्हणाले होते की, कलकत्ता शहरात सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहायचे असेल तर बंगाली भाषा शिकावीच लागते.पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही.येथे पिढ्यानपिढ्या राहणारी माणसं मराठी नव्हे तर त्यांची मातृभाषा आणि हिंदी / इंग्रजी बोलत राहू शकतात.राहतात.

असे म्हणतात की ही विदारक वस्तुस्थिती ते सांगत होते तेव्हा सभामंडपातील प्रेक्षक टाळ्या वाजवत होते

आपल्याकडील माध्यमात याच अवस्थेचे प्रतिबिंब पडले आहे. त्यामुळे अनेकदा माध्यमातून कानी पडणारी किंवा वाचनात येणारी मराठी ही अनेकदा मराठी वळणाची राहिलेली दिसत नाही. त्यातून मग ‘ धन्यवाद ‘ मानतो ‘ / ‘ मानते ‘ यासारखे शब्दप्रयोग रूढ होतात. आभार मानले जातात आणि धन्यवाद दिले जातात हे लक्षात घेतले जात नाही.

आपल्याकडे दूरचित्रवाणीचा झपाट्याने विस्तार होत असताना एका मान्यवरांनी असे लिहिले होते की , पाश्चात्य देशात ‘ मुद्रण संस्कृती ‘ रुजल्यानंतर तेथे टेलिव्हिजन आला.आपल्याकडे मुद्रण संस्कृती रुजण्यापूर्वीच टेलिव्हिजन आला आणि विस्तारत असून त्याचे काही दुष्परिणाम संभवतात.भाषेच्या बाबतीत हे दुष्परिणाम आपण आता अनुभवत आहोत.

मुद्रीत माध्यम हे शब्दप्रधान आहे. नभोवाणीचे माध्यम शब्दच आहे. टेलिव्हिजनचे माध्यम कॅमेरा आहे. लिहिले जाणारे शब्द आणि टिपले जाणारे दृश्य यात अंतर असणार हे उघड असले तरी ते माध्यमांचा परस्परांवर परिणाम होऊ नये म्हणून आवर्जून लक्षात घेणे फार आवश्यक आहे. क्रिकेटच्या सामन्याचे दूरचित्रवाणीवरून होणारे थेट प्रक्षेपण , नभोवाणीवरून त्याच सामन्याचे प्रसारित होणारे धावते वर्णन आणि त्याच सामन्याचा दुसऱ्या दिवशी प्रसारित होणारा वृत्तांत यात फरक असणे स्वाभाविक आहे.असाच फरक या तीन माध्यमातून येणाऱ्या अन्य बाबींबद्दल असायला हवा. बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा यात असणाऱ्या फरकाची जाणीव ठेवणे ही प्राथमिक गरज आहे.आपल्याकडे जेव्हा एखाद्या महत्वाच्या घडामोडीचे तपशील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवले जातात तेव्हा कॅमेरा त्याचे दृश्य टिपण्याचे काम त्याच्या यांत्रिक क्षमतेने आणि वेगाने करीत आहे  , मानवी तोंडातून निघणारे शब्द त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत याचा निवेदकांना / बातमीदारांना विसर पडलेला दिसतो.  वर्तमानपत्रातही हे घडत असल्याचे हल्ली अनुभवास येते.तपशिलाच्या पसाऱ्यात नेमकेपणा हरवून जातो.हा माध्यमांचा परस्परांवर होत असलेला परिणाम आहे.असाच परिणाम मांडणीतही होत असल्याचे अनुभवास येते. छोट्या पडद्यावर एकाच वेळी निवेदक / वार्ताहर दिसतो , त्यांचा ज्यांच्याशी संवाद सुरू असतो तेही दिसतात , जे काही दाखवले जात आहे , त्याच्याशी निगडीत शब्दांकन दिसत असते , ‘ स्क्रोल ‘ सुरू असतो , कोपऱ्यात तपमान वगैरे दिसत असते.हे सारे रंगीत असते. वर्तमानपत्रातही मांडणीत अनेकदा अशी गर्दी दिसते.तेथे पुरेसे अंतर राखणारी कोरी जागा अर्थपूर्ण ठरते याचा विसर पडत चाललेला आहे.

आपल्याकडे वाहिन्या बहुभाषक असणे अपरिहार्य आहे.त्याचेही भाषेवर दुष्परिणाम होत आहेत. हिंदीत ‘ खुलासा ‘ हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो , त्या अर्थाने तो मराठीत उपयोगात आणला जात नाही. पण हल्ली हा ‘ खुलासा ‘ मराठीत ऐकू येत असला तरी तो हिंदीतील आहे , हे लक्षात घ्यावे लागते ! अशी किती तरी उदाहरणे देता येतील. हल्ली लहान मुलं त्यांच्या संभाषणात खूप हिंदी शब्द वापरत असतात.त्याचा उगम ते पाहतात त्या ‘ कार्टुन शो ‘ मध्ये आहे. आपल्याकडील लग्नसमारंभातील मराठीपण जसे हळूहळू हरवत आहे , तसेच भाषेचेही होत आहे ! कौटुंबिक नात्यातील मराठी संबोधने बाजूला पडत असून भाऊजी या शब्दाची जागा जिजाजी , मेहुणा या शब्दाची जागा साला या शब्दांनी घेतली आहे.

एकेकाळी वर्तमानपत्रांनी परिभाषेत भर घातली.आता व्यवहारात रूढ झालेले मराठी शब्द बाजूला सारून तेथे इंग्रजी / हिंदी शब्दांचा उपयोग सुरू आहे , याचा पदोपदी अनुभव येतो.

एकीकडे माध्यमातील नवी पिढी कार्यक्षम आणि तंत्रस्नेही असल्याचा अनुभव येत असतानाच त्यांचा मराठी शब्दसंग्रह मर्यादित होत असल्याचे जाणवते.याचे कारण या पिढीत मराठी साहित्याचे वाचन कमी झाले आहे , हे असावे.

इंग्रजी माध्यमातून होणारे शिक्षण , बहुभाषक परिसरात संपर्कासाठी सहजपणे उपयोगात आणली जाणारी हिंदी , माध्यमांना आलेले तंत्रज्ञानप्रधान व्यवसायाचे रूप , उसंत न देणारी वाढती स्पर्धा या आणि अशा काही कारणांमुळे आजच्या माध्यमात दिसणारी भाषा विचित्र रूप धारण करीत आहे. माध्यमांचा समाजमनावर होणारा परिणाम लक्षात घेता माध्यमांकडून उपयोगात आणली जाणारी भाषा महत्वाची ठरते. ती निष्कारण कठीण , बोजड नको तशीच स्वतःचे अस्तित्व सहजपणे विसरणारीही नको.ती पुढे जाणारी , स्वागतशील हवी आणि तिचे नाते तिच्या मुळांशी हवे.

राधाकृष्ण मुळी

निवृत्त संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सुधारित अनुदान योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई दि. १८ :-अल्पसंख्याक विकास विभागाकडून अल्पसंख्याक बहुल शासनमान्यता प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद/ नगरपालिका शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२४-२५ साठी राबविण्यात येत आहे. अनुदान मिळवू इच्छिणा-या संस्थांनी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव, जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४००००१ यांचेकडे सादर करावा. विहित अर्जाचा नमुना व योजनेबाबतची अधिक माहिती https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. २२ फेब्रुवारी, २०२५ आहे. यानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हा यांनी कळविले आहे.

 

0000

‘महामेट्रो’च्या व्यवस्थापनाने कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. १८ : ‘महामेट्रो’च्या व्यवस्थापनाने नागपूर येथील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन न्याय द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

महामेट्रोअंतर्गत नागपूर मेट्रो रेल, नागपूर येथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार प्रविण दटके,  कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, महामेट्रोचे महाप्रबंधक सुधाकर उराडे, कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कामगार संघटना तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते.

महामेट्रोमधील कंत्राटी कामगारांची केंद्रीय कामगार प्राधिकरणाकडे तसेच राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे नोंदणी झाली आहे. तथापि, महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा वेतनप्रश्न न्यायप्रविष्ट महामेट्रोमधील सर्व कंत्राटी कामगारांना शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतनानुसार वेतन देण्यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री फुंडकर यांनी दिले.

राज्यातील मेट्रो रेल सेवेतील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भात श्री.फुंडकर म्हणाले की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्याचबरोबर एमएमआरडीए, एमआरसीएल, पीएमआरडीए या मेट्रोमध्ये काम करणाऱ्या सर्व कंत्राटी कामगारांच्या वेतनामध्ये एकसूत्रता असावी, यासाठी त्यांना एका प्रवाहात आणले जावे. महामेट्रो कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लवकरच एक बैठक घेण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.१८: अल्पसंख्याक विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेमध्ये पात्र मदरशांना पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करून जास्तीत जास्त रु. १०.०० लाख इतक्या मर्यादपर्यंत अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

“डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मदरसांना दि. २२ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत प्रस्ताव मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे. अल्पसंख्याक विकास विभागातील तरतुदीनुसार अटी व शर्तीची पुर्तता करणा-या मदरसांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for Providing Quality Education in Madrasa (SPQEM) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरसांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही, असे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

ताज्या बातम्या

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील...