रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 198

मुंबई उपनगर जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शाळांनी अनुदान मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.१८ : सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्हयातील बहुल शाळांनी दि. २२ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्हयातील “धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनु‌दानित,विनाअनुदानित, कायमविना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना” राबविण्यात येत आहे.

धार्मिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शैक्षणिक संस्थांना देण्यात येणाऱ्या रु.२.०० लाख अनुदानात वाढ करून अनुदान रु.१०.०० लाखापर्यंत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०२४-२५ या वर्षासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मुंबई उपनगर जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल शाळांनी दिनांक २२ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत.

अटी व शर्तीची पूर्तता करणा-या शाळांचे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ७०% व अपंग शाळामध्ये ५०% विद्यार्थी हे अल्पसंख्यांक समुदायातील असणे अनिवार्य आहे. या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना शासनाकडून मान्यत मिळालेली असणे आवश्यक आहे. स्वंय-अर्थसहाय्यित शाळा योजनेसाठी पात्र असणार नाहीत असे मुंबई उपनगर जिल्हा जिल्हाधिकारी  कार्यालय यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

नागरिकांचा सर्वांगीण विकासासाठी योजनांचे सुसूत्रीकरण करावे- राज्यमंत्री आशिष जयस्वाल

मुंबई, दि. १८  : नागरिकांच्या एकात्मिक विकासासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात, ज्यांचा उद्देश समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधणे आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांचे नियमित मूल्यमापन आणि सुसूत्रीकरण आवश्यक आहे, असे वित्त व नियोजन मंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

मंत्रालयात विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मूल्यमापन करून त्यांचे सुसूत्रीकरण करणे तसेच साधनसंपत्तीच्या स्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत उच्च स्तरीय समितीची बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री श्री. जयस्वाल बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव आनंद भोंडवे, शिक्षण व नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले की, ग्रामविकास, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य तसेच महिला व बाल विकास विभाग व इतर योजना राबविताना त्यांचे मूल्यमापन करून प्राधान्यक्रम ठरवून त्याचे सुसूत्रीकरण करावे. प्राथमिकतेच्या क्रमाने योजनांचे सुसूत्रीकरण केल्याने संसाधनांचा योग्य वापर होतो आणि अपेक्षित परिणाम मिळतात, असेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले की, अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणामांचा विचार करून योजना राबवण्याचा क्रम ठरवावा . सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधून योजनांची अंमलबजावणी करावी. योजनेच्या लाभाचे स्वरूप तपासून छाननी  करावी, जेणेकरून काही योजना एकत्र करुन राबविल्यास सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते, असेही राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी सांगितले.

000000

मोहिनी राणे/विसंअ

धर्मादाय संस्थेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १८ :- धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के याप्रमाणे एकूण २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असून त्याअनुषंगाने धर्मादाय संस्थाच्या कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत राज्यातील धर्मादाय ट्रस्ट ॲक्ट खालील नोंदणीकृत रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधी व न्याय विभागाचे उपसचिव विलास खांडबहाले, अवर सचिव (विधी) रा.द. कस्तुरे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामेश्वर नाईक उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, धर्मादाय संस्थेच्या अंतर्गत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल रुग्णांना आरक्षित खाटा पारदर्शी पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच जास्तीत जास्त निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी, असेही श्री.आबिटकर यांनी यावेळी नमूद केले.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना या आरक्षणाचा लाभ होण्यासाठी इतरही रुग्णालयांना या योजनेच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी प्रयत्न करावे.

00000

मोहिनी राणे/स.सं

जळगाव- चोपडा तालुक्यांना जोडणाऱ्या खेडीभोकरी-भोकर पुलाच्या कामाच्या खर्चास मान्यता

मुंबई दि. १८ :  जळगाव जिल्ह्याच्या जळगाव व चोपडा तालुक्यांना जोडणारा खेडीभोकरी ते भोकर हा तापी नदीवरील महत्त्वाचा फूल आहे. या पुलाच्या कामाच्या खर्चास जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जलसंपदा मंत्री  महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर, जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक आदी उपस्थित होते.

तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर  या पुलाची लांबी ८८४ मीटर, रुंदी १० मीटर आणि उंची २७ मीटर इतकी आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. प्रवास जलद गतीने होईल असे यावेळी सांगण्यात आले.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

भूसंपादनाच्या प्रकरणातील तडजोडी प्रकरणातील रक्कमा तातडीने द्याव्यात – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

तापी व कोकण विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत २३ विषयांना मान्यता

मुंबई, दि. १८ :–  पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या भूसंदर्भ प्रकरणांमध्ये पॅरिटीच्या आधारावर केलेल्या तडजोड प्रकरणातील रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तातडीने दिली जावी, असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व कोकण खोरे पाटबंधारे विभाग नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर,  जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, पाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन महत्त्वाची बाब आहे. भूसंपादन प्रक्रियेवर बराचसा  निधी खर्च होत असल्याने भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. भूसंपादनसाठी आवश्यक निधीची मागणी विभागाने तातडीने करावी. आवश्यक निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिला जाईल.

तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ७० व्या बैठकीत १६ विषयांना तर कोकण पाटबंधारे  विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८७ बैठकीत ७ विषयांना मान्यता देण्यात आली.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य,
त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १८:- “छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटित करून रयतेचं स्वराज्य स्थापन केलं आणि लोककल्याणकारी राज्याचा आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवत त्यांनी अटकेपार झेंडा फडकवण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत आणि ताकद महाराष्ट्राला दिली,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

उपमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीने प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त त्यांना वंदन केलं आहे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनाही वंदन केले असून, शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, अशा शब्दात राज्यातील जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
***

 ‘आम्ही असू अभिजात’ संमेलन गीताला नांदेडचा संगीत साज

आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे गीत

नांदेड दि.१८ फेब्रुवारी : नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे गीत नांदेडच्या सुप्रसिद्ध गायिका, संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे. दिग्गज गायकांचा सहभाग असणारे अभिजात मराठीला शब्दबद्ध करणाऱ्या दीर्घ काव्याला त्यांनी संगीताचा साज चढवला असून तमाम नांदेडकरांसाठी ही आनंदाची बाब आहे.

९८ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नांदेड मधून एकीकडे शेकडो साहित्यिक रवाना होत आहे. आता नांदेडसाठी आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेले ‘आम्ही असू अभिजात’ हे संमेलन गीत आणखी एक आनंद वार्ता ठरले आहे.

काल राज्यपाल श्री.सी.पी. राधाकृष्णन, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या गीताचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नांदेडच्या संगीतकार आनंदी विकास यांचाही सत्कार करण्यात आला. पुण्याचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेल्या ‘आम्ही असू अभिजात ‘, या मराठी भाषेच्या गौरवगीताला संगीताचा साज चढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे या गीताचे पार्श्वगायन सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शंकर महादेवन, मंगेश बोरगावकर, प्रियंका बर्वे,सागर जाधव, शमिमा अख्तार यांनी केले आहे.या गीताचे संगीत संयोजन प्रथमेश कानडे, ध्वनिमुद्रण मन्मथ मठपती, ध्वनि मिश्रण आदित्य देशमुख यांनी केले आहे.

हे गीत संगीत, पार्श्वगायन, लेखन सादरीकरण या सर्वच कसोटीवर आगळे वेगळे सिद्ध होत आहे. या संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले आहे.

त्यामुळे या गाण्याचा व्हिडिओ देखील लक्षवेधी ठरला आहे. मराठी भाषेच्या अभिजात दर्जा प्राप्त होण्याच्या घटना क्रमावर आधारित हे गीत असून कवी अमोल देवळेकर यांनी १० अंतऱ्याचे हे दीर्घकाव्य मराठीच्या अभिजात दर्जाचा गौरव करताना लिहिले आहे. संदर्भाचे सुनियोजित सादरीकरण या गीतातून होत आहे.

दरम्यान, आयोजकांनी काल या गीताचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण करताना संगीतकार आनंदी विकास यांना सन्मानाने या साहित्य संमेलनाला आमंत्रित केले आहे. साहित्यप्रेमी नांदेडकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.

अंमलबजावणी कक्षामुळे किनारपट्टीची सुरक्षा व मत्स्योत्पादनात वाढ- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

अनधिकृत मासेमारी नियंत्रण व सागरी सुरक्षेसाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना

मुंबई, दि. १८ : राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे परराज्यातील मासेमारी नौकांकडून होणारी मासेमारी थांबवणे आणि सागरी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेला अंमलबजावणी कक्ष महत्वाची भूमिका बजावेल. तसेच यामुळे सागरी मत्स्योत्पादनामध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवासमंत्री नितेश राणे यांनी केले.

मंत्रालयात आज राज्याच्या सागरी क्षेत्रात शास्वत मासेमारी टिकून राहण्याकरिता अनधिकृत मासेमारी नौकांवर कठोर कारवाई करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना झाली, तसेच या कक्षाची बैठक ही झाली. यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते.

सागरी सुरक्षेसाठी किनारपट्टीच्या भागात ड्रोनद्वारे गस्त सुरु केल्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, परप्रांतिय मासेमारी नौका राज्याच्या सागरी क्षेत्रात येऊन मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमार यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. तसेच एलईडी मासेमारी विषयी कठोर कारवाई करणे आणि स्थानिक पारंपरिक मच्छिमारांचे हित जपणे ही शासनाची भूमिका आहे. त्यानुसार या अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सागरी किनाऱ्यांमध्ये आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची माहिती घेऊन त्याची उपलब्धता सूनिश्चित करण्याचे कामही या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे या कक्षातील सर्वच सदस्यांनी जबाबदारीने आणि सहकार्याने काम करावे अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री. राणे म्हणले की, या अंमलबजावणी कक्षाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरक्षा आणि मासेमारीस एक शिस्त येईल. तसेच अवैध हलचालींवरही नियंत्रण आणणे आणि कडक कारवाई करणे शक्य होणार आहे. प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत हीच विभागाची भूमिका आहे. त्यासाठी या अंमलबजावमी कक्षाची भूमिका महत्वाची असणार आहे. तसेच किनाऱ्यांवर झालेले अतिक्रमण हटवण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात यावी. याबाबतचा कृती आराखडा तयार करून येत्या तीन महिन्यांमध्ये किनारपट्टीच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीच्या सर्व जागा अतिक्रमणमुक्त होतील, असे पहावे अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मत्स्य व्यवसाय विभागाच्या या अंमलबजावणी कक्षामध्ये मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त  अध्यक्ष असणार आहेत. तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड,  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात सागरी किनारपट्टीच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव हे सदस्य असणार आहेत. तसेच मत्स्यव्यवसाय (सागरी) सहआयुक्त हे सदस्य सचिव असणार आहेत.

राज्यातील सागरी क्षेत्रामध्ये परप्रांतिय अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणे, कक्षाची संरचना, संविधानिक चौकट व निधीची तरतूद यांचा अभ्यास करणे, परप्रांतीय अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री व मनुष्यबळ यांचा अभ्यास करुन याबाबत शासनास उपाययोजना सुचवणे यासाठी हा कक्ष काम करणार आहे.

तसेच राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये २४ तास गस्त घालणे, सागरी कायद्याची अंमलबजावणी करणे, गस्ती दरम्यान निदर्शनास येणाऱ्या अनधिकृत नौकांवर सागरी कायद्यानुसार कार्यवाही करणे, नौका जप्त करणे, त्यावरील मासळीचा लिलाव करणे, ड्रोनद्वारे गस्ती दरम्यान टिपण्यात आलेली छायाचित्रे व व्हीडिओ यांची तपासणी करुन अनधिकृत नौकांची माहिती घेणे व त्यांच्यावर सागरी कायद्यातील तरतुदीन्वये कार्यवाही करणे, अनधिकृत नौकांना लावण्यात आलेल्या दंडाच्या वसुलीबाबत नियोजन करणे, अवरुद्ध व जप्त करण्यात आलेल्या नौकांवर देखरेख ठेवणे, आकस्मिक व गोपनीय पद्धतीने मासळी  उतरविणाऱ्या बंदरावर, समुद्रात धाडी टाकण्याबाबत  नियोजन करणे, तसेच सागरी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व कामे करणे याप्रमाणे हा अंमलबजावणी कक्ष काम करणार आहे.

अंमलबजावणी कक्षाच्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सह आयुक्त (सागरी) महेश देवरे, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, उपसचिव किशोर जकाते, यासह कोकण विभागातील मत्स्य व्यवसाय सह आयुक्त आणि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

वाट पाहतंय आपली… भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्राॅबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेले असं भिलार गाव…   पुस्तकांचं गाव झालं…. मराठी साहित्याला सोनेरी झळाळी देणारा आणि प्रत्येक रसिक वाचकला दोन्ही बाहु पसरुन खुलेपणानं आमंत्रण देणारा असा  हा प्रकल्प देशभर गाजला… रोजचे पर्यटक तर येतातच पण आजपर्यंत मोठ्या प्रमाणात शालेय सहली इथे आल्या… लाखोंहून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या गावाने मोहून टाकले. स्ट्रॉबेरीची गोडी आणि प्रत्येक पुस्तकाच्या घरात जावून फोटो काढण्याचा मोह… यातून भिलार गावाचे आकर्षण वाढले… पुस्तकांचं भारतातलं पहिलं गाव महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनाही भुरळ घालत आहे.

   

दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या पार्श्वभूमीवर या गावाला दिलेल्या भेटीच्या आठवणी पुन्हा रुंजी घालू लागल्या आहेत. ४ मे २०१७ या दिवशी महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोखं पुस्तकांचं गाव भिलार साकारण्यात आलं … आज या पुस्तकाच्या गावामध्ये ३५ घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी वाचन-चळवळ वाढविण्यासाठीचा हा प्रकल्प. प्रकल्पास भेट देणाऱ्या वाचक / पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित व वैचारिक, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास  या वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची दालने उभी केली आहेत. निवडलेल्या ३५ घरांवर विविध प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत.  चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या ठिकाणी संतसाहित्य-अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरुन पर्यटकाला त्या त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे याची माहिती मिळते.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. ३५ घरांत वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्यांच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास  मोठ्या प्रमाणात मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहेत आणि त्यात दिवसेंदिवस भर पडते आहे.

प्रकल्पासाठी निवडलेल्या घरांची व ठिकाणांची नावे : हिलरेंज हायस्कूल – बालसाहित्य,  नितीन प्रल्हाद (बाळासाहेब) भिलारे – कादंबरी, ‘अनमोल्स इन’ राहूल भिलारे- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती, ‘शिवसागर’ सुभाष भिलारे- विज्ञान, श्री हनुमान मंदिर – नियतकालिके व साहित्यिक प्रदर्शनी , ‘साई व्हॅली पॅलेस’ विजय भिलारे- इतिहास, , गणपत भिलारे- ‘दिवाळी अंक’, ‘कृषी कांचन’ शशिकांत भिलारे – चरित्रे व आत्मचरित्रे व बोलकी पुस्तके, ‘मंगलतारा’ प्रशांत भिलारे- शिवकालीन इतिहास व गडकिल्ले,  अभिजित दत्तात्रय भिलारे- परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, प्रवीण भिलारे –  कथा, अनिल भिलारे – स्त्री साहित्य, नारायण वाडकर – लोकसाहित्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – बालसाहित्य, सुहास काळे – ललित गद्य व वैचारिक, श्रीराम मंदिर साहित्यिक (प्रदर्शन) आणि भाषीक व साहित्यिक खेळ, संतोष सावंत – विनोदी, जिव्हाळा, आकाश भिलारे – विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते, गणपत पारठे – विविध कलांविषयक, मयूर रिसॉर्ट, अजय मोरे – निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण, श्री जननीमाता मंदिर, संत साहित्य, श्री जननीमाता मंदिर (श्री गणपती मंदिरा जवळ) – साहित्यिक प्रदर्शनी आणि गिरीजा रिसॉर्ट – कविता.

पुस्तकाचं गावं नेमकं आहे तरी कसं…!

  • ३५ घरात ४० हजार पुस्तकांचा खजिना.
  • पर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्ध.
  •  साहित्य प्रकारानुसार दालनातील पुस्तकांची मांडणी – साहित्यानुसार भिंतीवर भित्तीचित्रे
  •  गावात कथाकथन अनं कविता वाचनाचे आयोजन.
  • पर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशक.
  • अंधांसाठी ऑडीओ बुक (बोलकी पुस्तके)
  • पर्यटकांच्या साक्षीने नव्या कादंबऱ्यांचे प्रकाशन सोहळे

शासनाने राबविलेला अत्यंत चांगला उपक्रम आहे. येथे आल्यानंतर दूर्मिळ पुस्तके पाहायला, वाचायला मिळाली. मोबाईल, टीव्हीच्या विश्वात वाचनसंस्कृती टिकविणारा एक चांगला उपक्रम आहे.

असे पुस्तकावे गाव कुठेही पाहिले नाही. येथील पुस्तके पाहुन वेगळाच आनंद झाला. शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आणि आगळा वेगळा आहे. अशा भावना पुस्तकाच गाव भिलार येथे येणारे पर्यटक व्यक्त करीत आहेत.

विविध घरांमध्ये शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले या विषांवरील पुस्तके ठेवण्यात आली आहेत. परिवर्तन चळवळ, समाजसुधारकांचा व सुधारणांचा इतिहास, कथा, कांदबऱ्या, कविता संग्रह यासह अनेक पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या गावामध्ये साक्षात ज्ञानाची गंगा आली आहे. गावामध्ये पुस्तक प्रेमी, पीएचडी करणारे विद्यार्थी येत आहेत. या गावाची स्ट्रोबेरी बरोबर पुस्तकाच गाव अशी ओळख निर्माण झाली आहे.

पुस्तकं आयुष्याला वळण देतात…. अनुभव, विचार, ज्ञान बळकट करतात…. पुस्तकाची गोडी लागण्यासाठी पुस्तकांचा सहवासही महत्वाचा असतो त्यासाठी पुस्तकाचं गाव भिलार हा एक अभिनव उपक्रम आहे  आणि गावकऱ्यांचा सहभाग याचं उत्तम उदाहरण असणार पुस्तकाचं गाव भिलार हा अभिवन उपक्रम आहे.

वर्षा पाटोळे

जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

‘उन्नत पॉडकार’ वाहतूक नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरेल- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १८ : गुजरातमधील वडोदरा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात “उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल. ही निश्चितच नावीन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरणार आहे, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते वडोदरा येथे जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये ” स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली ” प्रायोगिक तत्त्वावर विकसित करण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.

नुट्रान ईव्ही मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार ” वाहतूक व्यवस्था पुढील पिढीची नागरी वाहतूक प्रणाली आहे. जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने या पॉड कार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात.

मंत्री सरनाईक यांनी ” उन्नत पॉडकार ” वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा- भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथे ” उन्नत पॉडकार ” वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचे उत्तम उदाहरण आहे. अशा शब्दांमध्ये या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सरनाईक यांचे आभार मानले.

००००

निलेश तायडे/विसंअ

ताज्या बातम्या

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील...