शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 190

जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेणार नाही – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर, दि. १९ : नैसर्गिक संपत्तीचे वरदान असलेला चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा, सिमेंट व इतर उद्योगांचे विस्तृत जाळे पसरले आहे. त्यातून लोकांना रोजगार निर्मिती होते. तसेच जल, जंगल, जमीन याचे रक्षण करून वनौपजावर आधारित उद्योगातून नागरिक आपला उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सामान्य नागरिकांना त्रास होईल, किंवा शासन – प्रशासनाची बदनामी होईल, अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

नियोजन सभागृह येथे कोळसा खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. उईके बोलत होते. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. या खाणींमधून कोळशाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला दिल्या. मात्र 15-20 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. त्यांचे योग्यरित्या पुनर्वसन झाले नाही.  त्यातच कोळशाची अवैध वाहतूक, शासकीय आदेशाला न जुमानता अवैध उत्खनन, गावकऱ्यांसोबत दमदाटी करणे, कोणालाही विश्वासात न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, स्थानिकांचा नोकरीत समावेश न करणे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी.

चंद्रपूर जिल्हा हा राज्याच्या टोकावर असून तेलंगणा राज्याची सीमा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी, गुटखा तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीला पोलीस प्रशासनाने त्वरित आळा घालावा. सोबतच दारूबंदी असलेले वर्धा आणि गडचिरोली हे जिल्हे चंद्रपूर जिल्ह्याला लागून असल्यामुळे अवैध दारू तस्करी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील दारू तस्कर, वाळू माफिया यांच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे.  अवैध धंदे करणाऱ्या कोणालाही प्रशासनाने पाठीशी घालू नये. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिला.

बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

०००

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुरदृष्टीने पाणी साठवण तलावांची निर्मिती केली- मंत्री संजय राठोड

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याहस्ते राज्यातील शिवकालीन, प्राचीन तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ

किटा कापरा येथे गाळ काढण्याचा राज्यस्तरीय शुभारंभ

शिव जयंती निमित्त हजार तलावातून गाळ काढणार

यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात 33  तलाव बांधले. आजही त्या तलावांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकरी, सामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजे, हा महाराजांचा तलाव बांधण्यामागचा उद्देश होता. अत्यंत दुरदृष्टीने महाराजांनी पाणी साठविण्याचे काम केले, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचिन तलाव, गावतळे व पाणी पुरविण्यासाठी वापरण्यात येणारे सद्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहिम मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने राज्यभर राबविण्यात येत आहे. आज शिवजयंतीच्या दिवशी या मोहिमेचा यवतमाळ जिल्ह्यातील किटा कापरा येथून राज्यस्तरीय शुभारंभ झाला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, किटा कापराच्या सरपंच अनिता ढोले, उपसरपंच मेघा तराळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे, पराग पिंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडे, तहसिलदार योगेश देशमुख आदी उपस्थित होते.

शिव जयंती निमित्त सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेची आज राज्यात एकाचवेळी सुरुवात झाली. राज्यात एक हजार तलावातून गाळ काढण्याचा उद्देश आम्ही ठेवला आहे. शिवाजी महाराजांनी शेतकरी, शेतमजूर आनंदी कसा राहीलं यासाठी धोरण राबविले. त्यांनी त्याकाळात बांधलेले तलाव सुस्थितीत तर आहेच; त्या तलावात आजही भरपूर पाणी असल्याचे आपण पाहतो. महाराजांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन तलावांची निर्मिती केली. महाराजांचे पाणी साठवणुकीचे काम या मोहिमेच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे श्री.राठोड म्हणाले.

मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविली जात आहे. ठराविक कालावधीसाठी राबविण्यात येणारी ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर घेतला. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद देखील केली. ग्रामपंचायतींना या मोहिमेत सहभागी करुन घेतले. पुर्वी तलावांमधील गाळ काढण्याची तरतूद होती. आता नाले, बंधारे यातील गाळ काढण्याची बाब देखील समाविष्ठ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक उपयुक्त गाळ उपलब्ध होतील, असे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

शिव जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंत्री श्री.राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन केला. किटा कापरा येथील तलावातून गाळ काढून त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेतजमिनीत पसरविण्यासाठी देण्यात आला. शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी शासन अर्थसहाय्य देत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी केले.

0000

‘सिडको’चे हक्काचे घर मिळालेले भाग्यशाली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १९: सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था पारदर्शकपणे काम करत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पवित्र दिनी २१ हजार ३९९ नागरिकांना सिडकोचे ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत आहे. ही हक्काची घरे मिळालेले सर्वजण भाग्यशाली असून त्यांच्या अभिनंदनाची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. यावेळी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सिडकोचे अधिकारी तसेच लॉटरीतील सहभागी नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंद नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरजी यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय  दर्जेदार असून ही घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता अटल सेतूमुळे 20 मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहीर केले असल्याने महाराष्ट्रात 20 ते 25 लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले. समूह विकास माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे  त्‍यांनी सांगितले.

एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र, त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे, हे दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणले जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदींचा अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफित तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभसंदेश वाचून दाखविण्यात आले.

०००

 

‘सेवांकुर भारत’ प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १९: देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये युवा डॉक्टर्सना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जाऊन तेथील लोकांना एक आठवडा निःशुल्क आरोग्य व वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘सेवांकुर भारत’ प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद आहे. या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन प्रत्येक नागरिकाने एक आठवडा देशकार्यासाठी दिला तर भारताला गतवैभव प्राप्त करता येईल असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या ‘सेवांकुर भारत : वन वीक फॉर द नेशन’ या विविध राज्यांमधील वैद्यकीय सेवा कार्यावर आधारित लघुपटाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे पार पडले त्यावेळी ते बोलत होते.

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विविध वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण व आदिवासी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्यास त्यांचे अनुभवविश्व व्यापक होईल, असे नमूद करून यासंदर्भात आपण राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाला या प्रकल्पाला सहकार्य करण्याबाबत सूचना करू, असे राज्यपालांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाशी अनेक वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जोडले जातील व ग्रामीण भागात सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होतील. या प्रकल्पात सहभागी सर्व डॉक्टर्स तसेच वैद्यकीय विद्यार्थ्यांचे राज्यपालांनी अभिनंदन केले.

‘त्वदियाय कार्याय बद्धा कटीयम’ हे वाक्य मातृभूमीसाठी सेवा करण्याची प्रेरणा देणारे आहे.

यावेळी ‘स्वयम टॉक्स’ या लघुपट निर्माण करणाऱ्या संस्थेचे संस्थापक नवीन काळे, सहसंस्थापक आशय महाजन व लेखक दिग्दर्शक ओंकार ढोरे यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वयमचे जॅकी पटेल यांनी सेवांकुर भारत लघुपट निर्मितीला अर्थसहाय्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.  उद्योजक गोविंद गोयल यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सतीश कुलकर्णी, अधिष्टाता डॉ. स्वाती शिरडकर,  सचिव डॉ. अश्विनीकुमार तुपकरी तसेच प्रतिष्ठानचे सदस्य व युवा डॉक्टर्स उपस्थित होते.

०००

साल्हेर किल्ला पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि. १९: (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साल्हेर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व इतिहासात अधोरेखित आहे. हा किल्ला पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचे कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

आज साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शेरमाळे, उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे, तालुका कृषी अधिकारी शांताराम भोये आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, शिवरायांचे विचार समाजासाठी आजही प्रेरक आहेत. त्यांची आदर्श विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावी. साल्हेर किल्ला या ऐतिहासिक वास्तूचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी रोपवेचा प्रस्ताव तातडीने सादर करावा तसेच येथे हरणबारी व केळझर या धरणांवर बोटिंग विकसित करता येईल. गुजरातमधून येणारे व मांगीतुंगी येथे येणारे पर्यटक येथे भेट देतील. त्यामुळे साल्हेरच्या पर्यटन विकासाला व रोजगाराच्या संधीला चालना मिळेल. येत्या काळात साल्हेर येथे कृषी पर्यटनासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले

साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीने आदिवासी संग्रहालय व शिवसृष्टीसाठी १५० कोटींचा आराखडा प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या कामासाठी महसूल विभागाची ५० एकर जमीन संपादनासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे आमदार श्री. बोरसे यांनी सांगितले.

०००

नागपुरात आदिवासी संग्रहालय, स्पर्धा परीक्षा ग्रंथालय सुरू करणार- मंत्री डॉ. अशोक उईके

नागपूर, दि. १९: आदिवासी समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने नागपुरात आदिवासी संग्रहालय आणि स्पर्धा परीक्षा ग्रंथालय लवकरच साकारत आहोत. त्यासोबतच केंद्राच्या धर्तीवर राज्यात सर्व आदिवासी योजना एकत्रित राबवून आदिवासींच्या जीवनात बदल घडावा, त्यांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचाव्यात यासाठी विशेष मोहीम व नियोजन असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली.

प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्यासह मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात आदिवासी विद्यार्थी हा विकासाचा केंद्रबिंदू असेल. या अंतर्गत नागपूर शहराचे महत्त्व लक्षात घेता शहरात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत लायब्ररी आणि रीडिंग रूम सुरू करण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणे शक्य होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले आदिवासी संग्रहालय नागपुरात सुरू होणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विभागासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद आहे. आदिवासी विभागासाठी यंदाच्या बजेटमध्ये १० टक्के निधी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यातील नऊ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला आहे. १७ प्रकल्प कार्यालयाचा आढावा घेण्यात आला आहे. आदिवासी विकास योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. आदिवासी शाळेत एक दिवस मुक्काम हा उपक्रम ७ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी समजावून घेतल्या. अतिदुर्गम भागातही मुक्काम करण्यात आला. जास्तीत जास्त आश्रम शाळेत सर्व सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, असा प्रयत्न असल्याचे मंत्री डॉ. उईके म्हणाले.

आदिवासी मुला-मुलींना विदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी प्रचार आणि प्रसार संकल्प करण्यात आला आहे. येत्या काळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू समजून वाटचाल करणार असल्याचे ते म्हणाले.

डीबीटी वाढविण्याचे नियोजन आहे. मुलींच्या वसतिगृहात भेटी दिल्या असून हे वसतिगृह अद्ययावत करण्याचा प्रयत्न आहे. आदिवासी विकास विभागाचा शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात १२१ डिजिटल शाळा करणार आहे. केंद्रात स्वतंत्र आयोग आहे. त्याप्रमाणे राज्यात तयार करण्याचे नियोजन आहे. शंभर दिवसाच्या अनुषंगाने ५५ कार्यक्रम आखले आहेत.  विद्यार्थ्यांना डीबीटी नियमितपणे मिळत असल्याचे ते म्हणाले.

०००

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा नव्या पिढीसाठी दिशादर्शक -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. १९ : हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम उपक्रम असल्याचे प्रतिपादन महसूल तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. पदयात्रेस मंत्री बावनकुळे यांची विशेष उपस्थिती होती.

सक्करदरा येथे राजे रघुजी भोसले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन पदयात्रेस प्रारंभ झाला. तर महाल येथील गांधी गेटस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले व पदयात्रेची सांगता झाली.

मंत्री बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची महती देशभर पोहोचावी आणि विकसीत भारताची संकल्पना अधिक मजबूत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ उपक्रमाचे नियोजन केले असून आज देशभर हा उपक्रम साजरा होत आहे.

छत्रपती शिवाजीराजे हे उत्कृष्ट शासक, प्रशासक होते. जनतेच्या हिताचाच सदैव विचार मनात बाळगून कार्य करणाऱ्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा अंगीकृत करुन महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास आहे.

महाराजांची वाघनखे महाराष्ट्र शासनाने लंडनहून परत आणली. ही ऐतिहासिक वाघनखे नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये सर्वांना पाहण्यासाठी खुली असून नागरिकांनी दर्शन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वत: रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र मंत्री बावनकुळे यांना भेट देण्यात आले.

पदयात्रेस श्रीमंत राजे मुधोजी भोसले, आमदार  प्रवीण दटके, आमदार  आशिष देशमुख, माजी आमदार विकास कुंभारे, प्रभारी विभागीय आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आदिवासी विभाग अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलिस उपायुक्त महेक स्वामी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मनपा जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व हंबीरराव मोहिते यांनी कार्यक्रमाचे संचलन केले. क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी आभार मानले.

शिवकालीन कलांचे नेत्रदिपक सादरीकरण

गांधीगेट येथील कार्यक्रमात अमोल खंते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेशभूषा साकारुन उपस्थिती दर्शविली होती. या पदयात्रेत ठिकठिकाणी चिमुकल्यांनी शिवकालीन कलांचे सादरीकरण केले. राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा येथे संजूबा हायस्कूलचा विद्यार्थी अजित मोहिते शिवाजी महाराजांवरील उत्कृष्ट पोवाडा सादर केला. पदयात्रेला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी डॉ. संभाजी भोसले ग्रुप आणि शिवशक्ती आखाडा च्या विद्यार्थ्यांनी आखाडा प्रात्यक्षिके सादर केली. सी. बी. अँड बेरार चौक येथे जिम्नॅस्टिक असोसिएशन नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सादर केले.

विविध शाळा, महाविद्यालयांचा सहभाग

पदयात्रेमध्ये मनपा अग्निशमन पथक, मनपा संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा, केशवनगर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालयातील, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी, मनोहरराव कामडी महाविद्यालय, गोविंदराव वंजारी महाविद्यालय, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री गजानन विद्यालय नवीन सुभेदार, बाबानानक सिंधी हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालय, शासकीय दाभा वसतीगृह या शाळेतील विद्यार्थ्यांसह मनपाचे हिवताप व हत्तीरोग विभागाच्या कर्मचारी, मनपा ज्येष्ठ नागरिक मंडळ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुमारे १५ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देखील पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केली होती. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच महाल परिसरातील दादीबाई देशमुख मुलींची शाळा येथे रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन करण्यात आले होते.

०००

राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ.आरोग्य संस्थामध्ये दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि.१९ : राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार ७० पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १३ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तसेच श्रेणीवर्धित आरोग्य केंद्राकरिता पदनिर्मिती करण्यासाठी मान्यता दिली आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर इत्यादी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. यामधील ज्या आरोग्य केंद्रांचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे अशा ८६ आरोग्य संस्थांकरिता ८३७ नियमित पदे व १२३३ कुशल/अकुशल पदे बाह्ययंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये राज्यातील ४७ उपकेंद्रे १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे पाच ग्रामीण रुग्णालये दोन ट्रॉमा केअर युनिट चार स्त्री रुग्णालये १० उपजिल्हा रुग्णालये आणि दोन जिल्हा रुग्णालये अशा विविध ८६ आरोग्य संस्थांचा समावेश आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करून राज्याला आरोग्य संपन्न बनवण्याच्या दृष्टीने ही पदनिर्मिती करण्यात आली आहे. तसेच टप्याटप्याने सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनात्मकरित्या प्रयत्न करण्यात येतील. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेल्या गट अ वैद्यकीय अधिकारी म्बब्स पदाच्या प्रतीक्षा यादीतील ४०८ व बम्स गट ब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षा यादीतील २५ डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सूचित केले आहे.

००००

शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी- मुख्यमंत्री

आंबेगाव येथील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

शिवसृष्टीच्या पुढील टप्प्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

पुणे, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वधर्म व स्वभाषा या त्रिसुत्रीवर आधारित शिवसृष्टी येथे मांडण्यात आलेले दालन अत्यंत प्रेरणादायी असून महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी या शिवसृष्टीला प्रेरणा आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून भेट द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण प्रसंगी केले. तसेच शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याचं काम अधिक वेगाने व्हावे यासाठीही राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, उदयनराजे भोसले, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, नानासाहेब जाधव, रविंद्र वंजारवाडकर, शिवसृष्टीचे जगदीश कदम, विनय सहस्त्रबुद्धे, अमृत पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम लढवय्ये, उत्तम योद्धे तर होतेच त्याबरोबरच ते उत्तम प्रशासक होते. महिलांचा सन्मान आणि शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना संरक्षण देण्याचे काम त्यांनी केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. परंतु खऱ्या अर्थाने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचे काम शिवरायांनी केले. ज्यावेळी अरबी आणि फारसी या शब्दावलीतून राज्यकारभार चालायचा तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वभाषेचा आग्रह धरुन मराठीचा वापर चालू केला.  त्याचे पर्यायी मराठी शब्द लिहायला लावले. त्या प्रकारची नवीन आज्ञावली शिवरायांनी तयार केली, असे सांगून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे २१ फेब्रुवारी पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शासनाने शिवसृष्टीला ‘मेगा टूरिझम’ म्हणून दर्जा दिला असता तरी पर्यटन केंद्र म्हणून भेट देण्यापेक्षा प्रेरणेचे आणि अभ्यासाचे केंद्र म्हणून प्रत्येकाने शिवसृष्टीला भेट द्यावी. शिवसृष्टीमध्ये ३६ मिनीटांमध्ये भारताचा इतिहास आणि स्वराज्यासाठीचे छत्रपती शिवरायांचे योगदान अवर्णनीय पद्धतीने मांडण्यात आले आहे असे सांगून ते म्हणाले, देशामध्ये सर्वोत्तम स्थापत्यशास्त्र हे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांमध्ये पहायला मिळते. किल्ल्यांची रचना, पाण्याच व्यवस्थापन, बाजार व्यवस्था, किल्ल्याच्या संरक्षणासाठीची अभेद्य व्यवस्था ते करायचे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ल्यांचे युनेस्कोच्या जागतिक वारसासाठी नामांकन केले आहे. या किल्ल्यांच्या स्थापत्य रचनेच्या संदर्भातील सादरीकरण सांस्कृतिक विभागामार्फत युनेस्को येथे लवकरच करण्यात येणार आहे. छत्रपती शिवरायांचे किल्ले हे जागतिक वारसा म्हणून युनेस्कोही स्विकारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, शिवरायांचे वेगवेगळे पैलू शिवसृष्टीच्या माध्यमातून जनतेपुढे यावेत. त्यांच्या आज्ञावलीतील माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून सर्वांना मिळावी. देशाभिमानी आणि इतिहास जाणणारी पिढी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होत नाही. शिवसृष्टी उभारणं हे एक राष्ट्र कार्य आहे. या कार्यामध्ये शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

प्रारंभी शिवसृष्टी येथील स्वराज्य, स्वभाषा व स्वधर्म या त्रिसुत्रीवर आधारित दालन, गंगासागर व भवानी मातेच्या मंदीराला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रायगड किल्ल्यावरुन आणलेले जल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गंगासागर मध्ये अर्पण करण्यात आले.

कार्यक्रमाला विविध मान्यवर तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचे आयोजन

पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस  म्हणाले, ज्यावेळी भारतात अनाचार, अंध:कार होता आणि भारतातील अनेक राजे रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते. मुघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते. अशावेळी मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी आपला आत्माभिमान जागृत करून असा अंगार फुलविला की त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार थेट अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले. संपूर्ण भारतभर स्वराज्य स्थापन करून भारताला स्वराज्याची देण दिली.

ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते तर उत्तम राज्यकर्ते होते. शेतकऱ्यांचे कल्याण, जलसंवर्धन, जंगलांचे संवर्धन, उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले गड किल्ल्यांचे निर्माण, आरमाराचे निर्माण आदींच्या माध्यमातून अभेद्य तटबंदी, सागरी सुरक्षा आदी बाबी छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकविल्या. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात व्हावा म्हणून नामांकन केले असून लवकरच त्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल.

विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

डॉ. मांडविया म्हणाले, देशाच्या स्वाभिमानासमोर संकट होते अशा स्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा, सन्मानाचा नारा दिला तसेच जनतेच्या कल्याणाची मोहीम चालवली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशाचे नवयुवक विकसित भारताचा संकल्प घेऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या स्वाभिमानासाठी कसे लढता येते, आदर्श शासन कसे चालवता येते, देशाच्या सन्मानासाठी मान न झुकविता कसे लढता येऊ शकते हा वारसा दिला आहे.

शिवाजी महाराजांनी एक आदर्श लोकशाही व्यवस्था, अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक विकास कसा करता येऊ शकतो हे दाखवून दिले. त्याच प्रमाणे आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी ‘जय शिवाजी, जय भारत’  पदयात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही डॉ. मांडविया म्हणाले.

श्रीमती खडसे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठी एक श्रद्धास्थान, आस्था आहे. त्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्य स्थापनेसाठी लाखो युवकांना सोबत घेतले. त्याचप्रमाणे आपल्या देशाला पुढे घेऊन जायचे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताच्या निर्माणासाठीचा संकल्प युवकांनी करावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. भरणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारल्यास अंगात एक ऊर्जा निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन आपण आपल्या जीवनात वाटचाल ठेवली पाहिजे. या आदर्शाची उजळणी ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रा उपक्रमामुळे होणार आहे. राज्यातील युवकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य शासनही खंबीरपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी विभागीय डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड म.न.पा. आयुक्त शेखर सिंह, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे,  क्रीडा व युवक कल्याण विभागाचे सचिव अनिल डिग्गीकर, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.

या पदयात्रेचे सीओईपी कॉलेज मैदान ते एस.एस.पी.एम.एस. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जंगली महाराज रस्ता ते झाशीची राणी पुतळामार्गे खंडूजीबाबा चौक, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग या मार्गाने आयोजन करण्यात आले.

या पदयात्रेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस,केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे, श्री. मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांच्यासह शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

0000

ताज्या बातम्या

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...

केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या...

फणस लागवड क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : फणस उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे, यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची दर्जेदार कलमे तयार...

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १५ : आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश...