शुक्रवार, मे 16, 2025
Home Blog Page 188

शिवव्याख्यानांच्या आयोजनातून राजधानीत शिवजयंती उत्साहात

नवी दिल्ली 20 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे भव्य आणि ऐतिहासिक शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. या सोहळ्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि व्याख्याते विशाल गरड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत तरुणाईला प्रेरणादायी संदेश दिला.

ओल्ड राजेंद्र नगर येथील बढा बाजार रोड येथे काल सायंकाळी उशिरा पार पडलेल्या या सोहळ्याचे आयोजन सरहद, पुणे, जाणता राजे प्रतिष्ठान (दिल्ली) आणि शौर्य स्मारक ट्रस्ट (पानिपत) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याची सुरुवात झाली.

या कार्यक्रमास खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण भारतभूमीचे रक्षण करणारे थोर योद्धा होते. शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आली. नव्या पिढीने त्यांचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत, तर ते एक विचारधारा आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श घेतल्यास देश अधिक सक्षम होईल.”

श्री. गरड यांनी शिवचरित्र या विषयावर प्रभावी व्याख्यान देऊन शिवरायांच्या युद्धनीती, प्रशासन कौशल्य आणि लोककल्याणकारी निर्णयांवर सखोल प्रकाश टाकला. ते म्हणाले, शिवजयंती हा केवळ सण नाही, तर मराठ्यांच्या पराक्रमाची गौरवशाली आठवण आहे. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला शिवचरित्राची महती समजेल. दिल्लीसारख्या ठिकाणीही छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या विचारांचा प्रसार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर तो राष्ट्रीय स्तरावरही प्रभावी ठरला आहे.

माजी राजदूत आणि साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी संभाजी महाराजांचा आदर्श घेत महाराष्ट्र देशाला कसे योगदान देऊ शकतो, यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र दिला, तर शाहू महाराज, महात्मा फुले, आगरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज परिवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.”

या सोहळ्यातील मुख्य आकर्षण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सिंहगर्जना ढोलताशा पथकाच्या दमदार सादरीकरणाचे होते. त्यांच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सहसंयोजक लेशपाल जवळगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या गगनभेदी घोषणांनी आणि ढोल-ताशांच्या निनादात या भव्य सोहळ्याची सांगता झाली.

000

राजधानीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. 20 : बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनातील उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) हेमराज बागुल यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कार्यालयातील उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

0000

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यावेळी अभिवादन केले.

 

0000

प्रवीण भुरके/ ससं/

साहित्य संमेलन स्मरणिका : एक वाङ्मयीन दस्तावेज

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने….

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच होणारे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहेत.  या संमेलनाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून हे संमेलन 70 वर्षानंतर दिल्लीत होत आहेत हेही विशेष आहेत. या संमेलनावेळी स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. याबाबत अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमेश माने यांचा लेख….

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्मरणिकेची निर्मिती केली जाते. आजवर ९७ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने संपन्न झालीत. या संमेलनानिमित्त त्या त्यावेळी स्मरणिका प्रकाशित केल्या गेल्या. साहित्य संमेलने पार पडून जातात, संमेलनात चर्चा, विविध परिसंवाद, कविसंमेलने, मुलाखती, कथाकथन, इत्यादि भरगच्च कार्यक्रम असतात. त्यातील काव्य, कथा, भाषा, साहित्यविचार, मुलाखती ऐकताना सर्वच ग्रहण करता येत नाही. काही विचार हवेत विरून जातात. परंतु स्मरणिकेच्या माध्यमातून, विविध लेखांच्या माध्यमातून प्रकाशित झालेला लेखनविचार मात्र स्मरणिकेच्या निमित्ताने संस्मरणीय राहतो. अशा स्मरणिका वाङ्मयीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक वैभवसंपन्न दस्तावेज ठरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकांवर काही लोकांनी शोधनिबंध आणि शोध प्रबंध देखील निर्माण केलेले आहेत. यावरून या स्मरणिकांचं मूल्य आपल्या लक्षात येईल.

आजवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने महाराष्ट्रासह बृहन्महाराष्ट्रातही झाली आहेत. अशी संमेलने ज्या प्रदेशात असतात त्या प्रदेशातील आयोजक संस्थेचा वाङ्मयीन, सांस्कृतिक व सामाजिक कार्याच्या लेखाजोखा स्मरणिकेच्या माध्यमातून वाचकांना कळतो. त्या संस्थेचा दैदीप्यमान इतिहासही कळतो. त्या संस्थेत आजपर्यंत साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आलेली मान्यवर मंडळी कळते. एकूणच त्या आयोजक संस्थेची वैभवशाली परंपरा माहित होते. नव्याने सुरू झालेल्या संस्थांना त्या कार्यातून प्रेरणा मिळते. म्हणून असे लेख स्मरणिकेतून वाचायला मिळतात.

संमेलन ज्या परिसरात असते त्या परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन व इतर महत्वाची वैशिष्ट्ये प्रस्तुत संमेलनाच्या शीर्षकगीतातून कळतात. अशा गीताचाही समावेश स्मरणिकेत असतो. स्थानिक आयोजकांनी व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची साहित्य संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका कळते. शिवाय साहित्य महामंडळ, संमेलनाचे कार्याध्यक्ष, आयोजक संस्थेचे पदाधिकारी व  संपादक मंडळाची ओळख होते. याशिवाय तेथील श्रध्दास्थाने, प्रमुख पाहुणे, संमेलन पत्रिकेतील मान्यवर साहित्यिकांचा परिचय होतो. यानिमित्ताने कोण कुठल्या वाङ्मयप्रकारात लेखन करतात ते कळते. स्थानिक साहित्यिकांचे वाङ्मयीन योगदान लक्षात येते. मान्यवरांच्या संदेशातून त्यांची संमेलनविषयक भावना कळते. त्या गावात किंवा परिसरात यापूर्वी संमेलन भरविले असेल तर त्या गतसंमेलनविषयीच्या काही आठवणी लेख किंवा जुन्या छायाचित्रांवरून कळतात. शिवाय त्या संमेलनातील वाद-प्रतिवाद, चर्चा, वेगळेपण कळते. (जसे की, १९५२ साली अमळनेर येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र मराठी साहित्य अधिवेशनात अत्रे-फडके वाद खूप गाजला होता.) अशा वैशिष्ट्येपूर्ण नोंदी ज्ञात होतात. तसेच संमेलनाध्यक्षांचा एकूण वाङ्मयीन कार्य व त्यांना मिळालेल्या मानसन्मानाची माहिती मिळते.

स्मरणिकेच्या विविध विभागाची रचना केलेली असते. त्यात मराठी साहित्याची समकालीन सद्यस्थिती किंवा वर्तमान मराठी साहित्य, समकालीन मराठी साहित्याची वाटचाल अशा वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीमवर) आधारित लेख समाविष्ट असतात. यात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र- आत्मचरित्र, ललितगद्य, वैचारिक, समीक्षा, बालसाहित्य, विनोदी साहित्य, भाषांतरीत साहित्य, इत्यादि वाङ्मयप्रकाराचा लेखनप्रवास वाचण्यास मिळतो. तसेच मराठी भाषा, तिची विविधता, मराठी भाषेचे महात्म्य, ताम्रपट, शिलालेख यांच्या संदर्भखुणा आणि विशेष आदींच्या नोंदी कळतात.

ज्या प्रदेशात संमेलन भरविले जाते त्या प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, आध्यात्म, पौराणिक, ऐतिहासिक, लोककला, इतर विविध कला त्यांची परंपरा, नियतकालिके, दिवाळी अंक, ग्रंथालये, खाद्यसंस्कृती, पोशाख, बोलीभाषा, बोलीचे विविध प्रकार, सण-उत्सव, श्रद्धा, लोकमानस, लोकतत्त्व, व्यक्तिविशेष, विविध वाङ्मयप्रकारातील लेखन जसे की, कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र-आत्मचरित्र, वगैरे विषयी लेख अंतर्भूत असतात. याखेरीज एक स्वतंत्र विभागही त्यात निर्माण करता येऊ शकतो, तो म्हणजे काही विशिष्ट कलाकृतींच्या वाङ्मयीन योगदानावर किंवा विशेष लक्षणीय ठरलेल्या आणि  सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठलेल्या कलाकृतींवर लेख समाविष्ट केले जाऊ शकतात. अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या संमेलनाच्या स्मरणिकेत तसा प्रयोग केला गेला. उदाहरण- ‘रानातल्या कविता- ना. धों. महानोर (प्रा. इंद्रजीत भालेराव), पाचोळा- रा. रं. बोराडे (डॉ. गणेश मोहिते), सूड – बाबुराव बागूल (प्रा. ज्ञानेश्वर कांबळे), संध्याछाया-जयवंत दळवी (सुदेष्णा कदम), बहिणाबाईची गाणी- बहिणाबाई चौधरी (प्रा. बी. एन. चौधरी) अशा प्रातिनिधिक परंतु साहित्यप्रांतात मैलाचा दगड ठरलेल्या कलाकृतींच्या योगदानावर अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश केला होता. काव्य विभागात जुन्या कवींच्या स्मृति जाग्या करता येऊ शकतात. मागील संमेलनातील स्मरणिकेत खान्देशातील दिवंगत कवींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘काव्यस्मृतिगंध’ हा एक उपघटक केला होता. त्यात खान्देशातील महत्वाचे वाङ्मयीन योगदान देणाऱ्या कवींच्या एकेक कवितांचा सन्मान केला होता. तर दुसऱ्या उपघटकात सद्यस्थितीत लेखन करणाऱ्या नव्या-जुन्या विविध जाणिवेच्या कवी-कवयित्रींच्या काव्याचा सन्मान करता येतो किंवा केला आहे. तसेच काही स्थानिक कवींच्या प्रातिनिधिक कविताही घेता येऊ शकतात. जो ‘खान्देश वैभव’ मध्ये प्रयोग केला आहे.

काही विशेष मुलाखतीही स्मरणिकेत समाविष्ट करता येतात. मागील वर्षी संमेलन अमळनेरात असल्याने अमळनेर ही भूमी पूज्य सानेगुरुजी यांची कर्मभूमी म्हणून परिचित आहे. म्हणून अशा भूमीत संमेलन होत असल्याने सानेगुरुजींच्या पुतणी सुधाताई साने-बोडा यांची संजय बच्छाव यांनी घेतलेली मुलाखत समाविष्ट केली आहे. या मुलाखतीतून सानेगुरुजींच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. गुरुजींच्या कामाची अनेक पैलू कळाली. म्हणून अशा वैशिष्ट्येपूर्ण मुलाखती घेता येतात.

स्थानिक प्रदेशाची वैशिष्ट्ये नोंदविणाऱ्या स्मरणिकेच्या  मुखपृष्ठाची निर्मिती स्थानिक चित्रकाराकडून करता येते. त्याचबरोबर काही प्रासंगिक किंवा लेखाला अनुसरून उत्तम रेखाटनेही घेता येऊ शकतात. त्यातूनही कलात्मकतेची अनुभूती घेता येते. संमेलनाच्या व स्मरणिकेच्या निमित्ताने जाहिरात देणाऱ्या दातृत्त्ववान लोकांची, संस्थाची ओळख होते. शिवाय विविध लेखकांची लेखनाच्या माध्यमातून ओळख होते.

एकूणच साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून वाचक आणि लेखक हा नक्कीच समृद्ध होत असतो. कारण तो एक वाङ्मयीन दस्तावेज असतो. अर्थात कुठलाही दस्तावेज हा समाज आणि संस्कृतीसाठी वैभवसंपन्न ठरत असतो.

(लेखकाने अमळनेर येथे संपन्न झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘खान्देश वैभव या स्मरणिकेचे संपादन केले आहे.)

प्रा. डॉ. रमेश माने

(मराठी विभाग)

प्रताप महाविद्यालय, अमळनेर, जि. जळगाव.

संपर्क – ९८९०३३१२३७

मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे

नवी दिल्ली येथे २१-२२-२३ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत होणारे हे साहित्य संमेलन महत्त्वाचे आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. या संमेलन निमित्ताने ‘मराठी प्रकाशनाची दोनशे वर्षे’ या लेखाद्वारे सुरुवातीच्या कालखंडातील लेखन-प्रकाशन क्षेत्राचा घेतलेला हा आढावा…!

मराठी प्रकाशनाचे आद्य प्रवर्तक म्हणून कलकत्त्याच्या डॉ. विल्यम कॅरी यांच्याकडे पहिले जाते. त्यांनी बंगालमधील श्रीरामपूर येथे सन १८०५ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘मराठी भाषेचे व्याकरण’ या देवनागरी लिपीतील पुस्तकाने मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली. एकोणिसाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांनी मुद्रणयंत्रे आणून धर्मप्रचाराच्या दृष्टीने काही ग्रंथ प्रकाशित केले. त्याला व्यावसायिक स्वरूप नव्हते. कालांतराने सरकारी व खाजगी शाळांसाठी क्रमिक पुस्तकांची आवश्यकता भासू लागल्यावर मराठी साहित्यिकांच्या मदतीने सरकार स्वतः पुस्तके तयार करून वाटप करू लागले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेर २,१९३ पुस्तके प्रसिद्ध झाल्याची नोंद मिळते. विसाव्या शतकातही शालेय पुस्तकांचीच प्रकाशने अधिक होती. १९१९ मध्ये पहिले महायुद्ध संपले. भारताचे इतर देशांशी वैचारिक दळणवळण सुरू झाले. विल्यम कॅरी हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार, तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक, मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते. दिनांक १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर येथील डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी चर्च व शाळा काढली. एक छापखाना उभारला. ते बंगाली, संस्कृत आणि पौर्वात्य संस्कृती भाषांशिवाय ते इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू भाषांत पारंगत होते. आपल्या छापखान्यातून सन १८३४ पर्यंत त्यांनी बंगाली व मराठीसह नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू, पंजाबी, उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी आदि चाळीस भाषांमधून ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या होत्या. सन १८०५ ते १८२५ दरम्यान मराठी भाषेत, देवनागरी लिपीत त्यांनी सेंट मॅथ्यूचे शुभ वर्तमान, बायबलचा नवा करार, जुना करार वगैरे १४ धार्मिक ग्रंथ प्रकाशित केले. सन १८१० साली केरी यांनी ‘अ डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हा मराठी भाषेचा शब्दकोश तयार केला. ६५२ पृष्ठांच्या या शब्दकोशात नऊ ते दहा हजार मराठी शब्दांचा इंग्रजीत अर्थ दिला आहे. सन १८१४ साली ‘सिंहासन बत्तीशी’ हे संस्कृत पुस्तकाचे मराठीत भाषांतर त्यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकात राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाच्या बत्तीस कथा ३२ पुतळ्यांच्या मुखातून वदवल्या आहेत. १८१६ साली ‘रघुजी भोसल्याची वंशावळी’ हे पुस्तक मराठी भाषेत आणि मोडी लिपीत लिहून मुद्रित केले.

‘लिखिलेल्या ४९ पृष्ठांपेक्षा अधिक मजकूराला मुद्रित करून प्रकाशन योग्य करणे ग्रंथ !’ अशी युनेस्कोने ग्रंथाची व्याख्या केलेली आहे. जगाचा विचार करता या व्यवसायास नवव्या शतकाच्या मध्यास चीनमध्ये सुरुवात झाली. तोपर्यंत ग्रंथाच्या नकला तयार होत असतं. मुद्रणामुळे ग्रंथाच्या प्रती निर्दोष व त्वरेने तयार करता येऊ लागल्या. यूरोपात पंधराव्या शतकात खिळामुद्रण सुरू झाले. सोळाव्या शतकात हा धंदा फ्रान्समध्ये स्थिर झाला आणि तेथून इंग्लंडमध्ये गेला. जगात, बांधलेल्या पृष्ठांच्या ग्रंथाचे अस्तित्त्व चौथ्या शतकापासून, रोमन युगापासूनच आढळते. सन १५०१ मध्ये आल्दो मानूत्स्यो या नागरिकाने ग्रंथाचा अवाढव्य आकार बदलून त्याला आजचा आकार आणला. प्राचीन ग्रंथ हस्तलिखित स्वरूपाचे, मोठ्या आकाराचे असत. थोलकाधीअर नावाच्या लेखकाचे थोलकाप्पियम हे पुस्तक २ हजार ५०० वर्षांपूर्वीचे जुने आहे. पूर्वी ग्रंथप्रकाशक असा स्वतंत्र व्यवसाय नव्हता. हस्तलिखितांच्या प्रती तयार करणारा ‘प्रकाशक’ असायचा. त्याच्या दुकानात कागदाच्या अथवा कातड्याच्या मोठमोठ्या गुंडाळ्यांवर ग्रंथ लिहिले जात असे. कालांतराने चर्च, विद्यापीठे, गिल्ड्‌स, मुद्रक व प्रकाशक अशी प्रकाशन व्यवसायाची स्थित्यंतरे क्रमाक्रमाने होत गेली. अनेक शतकांच्या मार्गक्रमणेतून पुस्तकांची मागणी वाढू लागली. लेखकांना लोकप्रियता मिळू लागली. अठराव्या शतकाच्या अखेरीस पुस्तकविक्रेते आणि ग्रंथालये यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये दरवर्षी सु. ९३ ग्रंथ प्रसिद्ध होत. पूर्वीच्या काळी ग्रंथनिर्मितीच्या खर्चासाठी राजेराजवाडे, सरदार, धनिक यांची मदत घ्यावी लागे.

खरतरं ग्रंथप्रकाशन हे अतिशय कठीण, कौशल्याचे व जिकीरीचे काम ! ग्रंथाचा विषय, व्याप्ती, पृष्ठसंख्या, त्याला मिळणारे ग्राहक, त्याचे रास्त मूल्य यांचा विचार प्रकाशकाला करावा लागतो. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ग्रंथप्रकाशन हा भारतात व्यवसाय होऊ शकला नाही. सन १८६७ मध्ये कार्यवाहीत आलेल्या ‘द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अॅक्ट’ मुळे ग्रंथनिर्मिती व्यवहारास आकार प्राप्त होत गेला. स्वतंत्र महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ग्रंथालय विकास योजनेमुळे ग्रंथालयांची संख्या वाढली. ब्रिटिश सत्ता भारतात पक्की झाल्यानंतर राज्यकारभार चालविण्यासाठी दुय्यम दर्जाच्या नोकरवर्गाची गरज निर्माण झाली. त्यासाठी त्यांनी शाळा उघडल्या. या शाळांतून देशी भाषा हेच माध्यम होते. सन १८३३ मध्ये ‘मेकॉले मिनिट’ प्रसिद्ध झाले. शाळेतील देशी भाषांचे स्थान इंग्रजीला मिळाले. या शाळांमुळे ग्रंथप्रकाशनास चालना मिळाली. महाराष्ट्रात छापून तयार झालेले पहिले पुस्तक ‘पंचोपाख्यान’ होय. ते सन १८२२ मध्ये बाँबे करिअर छापखान्यात छापून प्रसिद्ध करण्यात आले होते. सन १८४७ साली लेखाधिकार कायदा (इंडियन कॉपीराइट ॲक्ट) संमतझाला, ग्रंथकारास संरक्षण मिळाले. सन १८६७ च्या ग्रंथनोंदणी कायद्यामुळे सरकारकडे पुस्तके येऊ लागली. १८६७ च्या पूर्वीच्या प्रकाशित ग्रंथास ‘दोलामुद्रिते’ / ‘आद्यमुद्रिते’ म्हणत. दोलामुद्रितांच्या काळात मराठी भाषेत १२८ प्रकाशकांनी ४३५ ग्रंथ प्रकाशित केले होते. त्याहीपूर्वी प्रकाशने शिलामुद्रित असत. सन १८६७ नंतर खिळामुद्रण सुरू झाले. टॉमस ग्रॅहॅम यांनी या मुद्रणकलेची सुरुवात केली. मराठीतील पहिले पंचांग सन १८५८ मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर छापले. कॅरी, एल्‌फिन्स्टन, कँडी, जार्व्हिस, मोल्सवर्थ या ब्रिटिशांनी मराठी भाषेवर प्रेम केल्याचे दिसते. याकाळात परशुरामपंत गोडबोले यांचे नवनीत (१८५४), बाबा पदमनजी यांची यमुनापर्यटन (१८५७) कादंबरी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे साक्रेतिसाचे चरित्र (१८५२), अमरापूरकर यांचे प्रबोधचंद्रोदय (१८५१) नाटक ही मराठीतील काही नामांकित प्रकाशने होती. सन १७९५ मध्ये नाना फडणीस यांनी तयार केलेल्या श्रीमद्‌भगवद्‌गीतेच्या लाकडी ठशांपासून तो खिळामुद्रणापर्यंत ५० वर्षांत मराठी प्रकाशकांनी बरीच मजल मारली. सन १८५९ च्या सुमारास गोविंद रघुनाथ केतकर यांच्या ज्ञानसागर शिळा छापखान्यात एका ग्रंथाच्या १५० प्रती निघत होत्या. भाषा समृद्ध करण्यासाठी कोशवाङ्‌मयही समृद्ध करण्याचा प्रयत्न मराठी पंडितांच्या मदतीने ब्रिटिशांकडून सुरु झाला. यातून डॉ. विल्यम कॅरी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८०५), बाळशास्त्रींचा मराठी-इंग्रजी कोश (१८२०), मोल्सवर्थ-कँडी यांचा मराठी-इंग्रजी कोश (१८३१), रत्नकोश (१८६१), हंसकोश (१८६३) निर्माण झाले. मुद्रक, प्रकाशक व विक्रेते या घटकांनी एकत्र यावे. कोणाकडून या मंडळींवर अन्याय झाल्यास त्याचा प्रतिकार करता यावा, या हेतूने त्या काळात प्रिंटर्स, पब्लिशर्स, बुकसेलर्स असोसिएशन या नावाची संस्था आद्य मराठी मुद्रक-प्रकाशक जावजी दादाजी यांनी सन १८९३ ला स्थापन केली. न्या. रानडे यांनी १८७४ मध्ये मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी या नावाची संस्था स्थापन केली. केशव भिकाजी ढवळे, जगत्‌हितेच्छू प्रकाशनाचे गोंधळेकर, कर्नाटक प्रकाशनाचे मंगेश नारायण कुलकर्णी, दामोदर सावळाराम यंदे, मनोरंजक ग्रंथ प्रकाशन मंडळी, तुकाराम पुंडलिक शेटे आदिंनी प्रकाशन व्यवसायासाठी प्रयत्न केले. मनोरंजन मासिकाचे संपादक काशिनाथ रघुनाथ मित्र, गणेश महादेव वीरकर मंडळी मराठी प्रकाशन क्षेत्रात कार्यरत होती. मात्र मराठी जनतेने ग्रंथखरेदीच्या बाबतीत उदासीनवृत्ती दाखविल्यामुळे त्यांना फारसे यश मिळाले नाही.

सन १८९४-९५ च्या डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रॅन्स्लेशन सोसायटीच्या अहवालात, ‘मराठी भाषेत ग्रंथ कमी होतात. याचे कारण मराठे लोकांत ग्रंथकर्तृत्व-शक्ती कमी आहे हे नाही, तर ग्रंथवाचनाची अभिरुची कमी आहे हे होय. म्हणून उपयुक्त व मनोरंजक ग्रंथ तयार करून ते अल्प किंमतीने लोकांस विकत देता येतील, अशी तजवीज केली पाहिजे’ अशी नोंद आढळते. रियासतकार सरदेसाई, नाथमाधव, पारगावकर, सावरकर, खांडेकर वगैरेंचे वाङ्‌मय सन १९२० ते १९४० दरम्यान गणेश महादेव आणि कंपनी यांनी प्रसिद्ध केले. सन १९१४ मध्ये के. भि. ढवळे प्रकाशन संस्था स्थापन झाली. ग्रंथनिर्मिती, लेखकांची निवड, सचोटीचे व्यवहार आणि मराठी वाङ्‌मयाबद्दलचे प्रेम ही या संस्थेची वैशिष्ट्ये होती. मराठी ग्रंथांना रूपसंपन्न करण्याचे याच संस्थेला जाते. स्वातंत्र्योत्तर काळात माध्यमिक व उच्च अभ्यासक्रमांत मराठीला स्थान मिळू लागले. मराठी ग्रंथप्रकाशनांची संख्या वाढली. भाषेच्या दृष्टीने विचार करता प्रकाशनाबाबत सन १९६४ साली इंग्रजी व हिंदी या भाषांच्या खालोखाल मराठीचा क्रम राहिला आहे. सन १९७० मध्ये मराठीत १,५१४ पुस्तके प्रसिद्ध झाली. देशमुख आणि कं., पुणे काँटिनेंटल प्रकाशन, पुणे व्हीनस प्रकाशन, पुणे मौज प्रकाशन, मुंबई मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई पॉप्युलर प्रकाशन, मुंबई ठाकुर आणि कं., अमरावती सुविचार प्रकाशन, नागपूर व उद्यम प्रकाशन, नागपूर ही त्यावेळची काही प्रमुख नावे होतं. दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने, काही खाजगी संस्थांनी श्रेष्ठ ग्रंथांस पारितोषिके देऊन या व्यवसायाला उत्तेजन देण्याचा अभिनंदनीय कार्यक्रमही चालू केला. ग्रंथालयासाठी स्वतंत्र खाते स्थापन झाले. साक्षरता प्रसारासाठी खेडेगावापर्यंतही ग्रंथांचे लोण पोहोचविण्यात आले. विश्वविद्यालये, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, भारत सरकार वगैरे संस्थाही उपयुक्त ग्रंथांस अनुदान देऊ लागल्या. दुर्दैवाने इतक्या प्रयत्नातून सावरूनही आजचा मराठी वाचक तितका जागरूक झालेला नाही. ग्रंथालयासारख्या उपक्रमाबाबत मराठी माणूस मागे आहे. वाचकांना ग्रंथ विकत घेणे परवडावे म्हणून लोकप्रिय ग्रंथांच्या स्वस्त आवृत्त्या, प्रकाशनपूर्व सवलत-योजना, खंडशः पैसे देऊन ग्रंथ-खरेदी करण्याची योजना यांबाबत अलिकडे मराठी प्रकाशकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. जगात युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, ग्रंथप्रदर्शने, परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेच्या साहाय्याने या धंद्याची बैठक भक्कम पायावर उभी करीत आहेत. पश्चिम जर्मनीत फ्रँकफुर्ट येथे दरवर्षी भरत असलेले आंतरराष्ट्रीय ग्रंथ-प्रदर्शन, दिल्लीच्या प्रगती मैदानावर भरणारे वर्ल्ड बुक फेअर आज प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही ग्रंथ प्रदर्शने होतात. त्यांचे प्रमाण घटलेले आहे. ग्रंथ हे शिक्षणाचे प्रमुख माध्यम हे तत्त्व गृहीत धरून सरकारने साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ माध्यमातून प्रयत्न सुरु केले. सन १९७३ दरम्यान ग्रंथमुद्रणास योग्य अशा कागदाचे दुर्भिक्ष्य, छपाईच्या दरातील वाढ यांमुळे पुस्तकांच्या किंमती वाढल्या आणि वाढत्या महागाईमुळे विक्री कमी झाली. भारतातील आजच्या बहुतेक प्रकाशन संस्था व्यक्तिगत मालकीच्या आहेत. भारतातील इंग्रजी, संस्कृत भाषांतील ग्रंथांना परदेशांतील वाचनालयांतून मागणी आहे.

पुण्याचा विचार करता शनिवार पेठ, नारायण पेठ हा भाग मुख्यत: मुद्रण, छपाई क्षेत्राने व्यापलेला आहे. याच भागातील सदाशिव पेठेमध्ये शनिपारजवळ फिरताना ‘दि पूना प्रेस ओनर्स असोसिएशन’ची इमारत दिसते. पुण्यात सन १९१० च्या दशकात प्रिंटिंग क्षेत्र वेगाने विकसित होत असताना कागदटंचाई, प्रशिक्षित मनुष्यबळाची वानवा निर्माण झाल्याने या क्षेत्रातील काही ध्येयवादी व्यक्तींनी एकत्र येऊन १९ मे १९१९ या दिवशी पुणे मुद्रक संघाचे हे रोपटे लावले होते. आता या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. महाराष्ट्रात सन १९७०-८० च्या दशकापर्यंत पुण्या-मुंबईसह औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नाशिक शहरात मोजके प्रकाशक कार्यरत होते. महाराष्ट्रभर विद्वान लेखकांची मांदियाळी होती. वाचकप्रेम अनुकरणीय होतं. प्रकाशनविश्व जोरात कार्यरत होतं. नंतरच्या कालखंडात हळूहळू नवनवीन प्रकाशन संस्था उदयाला येत गेल्या. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी शासनाने सकारात्मक योजना राबवल्या. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत अनेकांनी प्रकाशन संस्था उभारल्या. एकविसाव्या शतकात पुस्तके प्रकाशित करण्याबाबतचा प्रकाशकांचा दृष्टीकोन बदलला. माहितीपर, अनुवादित, वाचकाला वाचायला आवडणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण वाढले. दुर्दैवाने सर्वच प्रकाशकांना भरपूर पैसा मिळतो हा चुकीचा समज या काळात अधिक दृढ झाला. प्रकाशन व्यवसायातील नैतिकतेसंदर्भातील अनेक बाबी ठळकपणे चर्चिल्या जाऊ लागल्या. शाळांमधील ग्रंथालयांच्या खरेदीवर शासकीय अनुदानाचा परिणाम होत गेला. कमी-जास्त किंमती, खरेदीतील अधिक सवलती यामुळे काही प्रकाशन संस्था डबघाईला आल्या. विविध कारणांमुळे ग्रंथालयामध्ये दर्जेदार पुस्तके मिळणे दुर्मीळ झाले. ग्रंथालयांच्या खरेदीत गुणात्मकता असायला हवी. ते सामाजिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे आहे. असे मुलभूत सिद्धांत अडगळीत गेले. परिणामस्वरूप ग्रंथालयापासून वाचक दुरावला. या साऱ्यावर सारासार विचारमंथन होण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन असावे. आजही महाराष्ट्रात ‘एक लेखक एक प्रकाशक’ या संकल्पनेवर कार्यरत असलेले लेखक आहेत. अगदीच नाही म्हणायला गेली काही दशके ‘एक लेखक एक प्रकाशक’ या विचारानुसार कार्यरत लेखक-प्रकाशक आपल्याला भेटतात. त्यांना सर्वांसमोर आणल्यास लेखक-प्रकाशक संवाद समन्वयाचे गुपित उलगडता येऊ शकेल.

अडचणींचा डोंगर उभा असला तरीही, सातत्याने उत्तमोत्तम पुस्तके काढणारे प्रकाशक आपल्या व्यक्तिगत वाचकांच्या आणि ग्रंथ प्रदर्शनांच्या बळावर भाषिक सामर्थ्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करताहेत. पूर्वी प्रकाशक पायाला भिंगरी लावून सर्वदूर प्रवास करत. चांगल्या मराठी प्रकाशकांची चांगली पुस्तके आजही ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचत असतात. चालणारी पुस्तके वर्षभर चालतात. परंतु धावणाऱ्या दोन पुस्तकांसाठी प्रकाशकांना इतर दहा पुस्तकांची निर्मिती करावी लागते. अशा पुस्तकांनाही ग्रंथ प्रदर्शनातून उठाव मिळतो. त्यामुळे पुस्तक प्रदर्शनाचा चांगला फायदा होतो. दुर्दैवाने आज राज्यात ग्रंथ प्रदर्शनासाठी लागणाऱ्या हॉलची वाढलेली भाडी, वाहतूक व प्रवास खर्च, कामगारांचे पगार, मुक्कामाचा खर्च, मंडप किंवा अन्य सुविधांचा खर्च आणि तुलनेने विक्रीच्या व्यस्त प्रमाणामुळे ग्रंथ विक्रेत्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित बिघडलेले दिसते. अनेक प्रकाशकांनी बाहेरगावची ग्रंथ प्रदर्शने बंद केली आहेत. खरतरं ही प्रदर्शने गावोगावची सांस्कृतिक भूक भागविण्याचे काम करतात. त्यामुळे शासनाने अशा उपक्रमांना सढळ हाताने मदत करायला हवी आहे. म्हणूनच या संमेलनाच्या निमित्ताने भरलेला ‘ग्रंथमहोत्सव’ अधिक महत्त्वाचा आहे. आज जगभर असलेल्या महाराष्ट्र मंडळांच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत वस्तूंप्रमाणे मराठी पुस्तकांची निर्यात होण्याच्या मुद्द्यावर विचार होणे गरजेचे आहे. शासकीय ग्रंथप्रदर्शनात प्रकाशकांचा सहभाग आणि वाचकांची सोय पाहिली जायला हवी. ‘आयएसबीएन’ क्रमांकाची उपलब्धी सहज व्हायला हवी. लेखक-प्रकाशकांना सरकारी विश्रामगृहांत मुक्कामासाठी सवलत मिळायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संगणकीय मराठी टंकलेखन युनिकोड वापरासाठी शासनाने पुढाकार घ्यायलाच हवा आहे. अलिकडे जवळपास प्रकाशक लेखकांकडून टाईप केलेला मजकूर मिळावा असा आग्रह करीत असतात. आजच्या युगात ‘युनिकोड वापर कार्यशाळा’ ही एक मोठी आवश्यकता म्हणून पुढे येते आहे.

ग्रंथाचे संपादन आणि मुद्रितशोधन हा या क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. परदेशातील प्रकाशकांकडे असणाऱ्या संपादकांप्रमाणे मराठीत आता ही पद्धत रूढ होते आहे. पत्रकार, त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून आपल्या वृत्तपत्रे, नियतकालिकातील सदरांची पुस्तके काढण्याचे प्रमाण वाढते आहे. वाढत्या सामाजिक, राजकीय जाणीवांमुळे वैचारिक साहित्याचे दालन फुलू लागले आहे. मराठी पुस्तकांना मागणी आहे. वाचकांना वैविध्यपूर्ण पुस्तके हवी आहेत. नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून पुस्तके नव्या, तरुण वाचकांपर्यंत पोहोचवण्याची गरजही वाढली आहे. कॉपीराइट हा अनेक ठिकाणाचा कळीचा मुद्दा आहे. हक्क अबाधित असा उल्लेख नसला तरीही कॉपीराइट असतोच. लेखकाच्या मृत्यूनंतर ६० वर्षांपर्यंतच हा कायदा लागू होतो. नव्याने लेखनादि क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या पिढीसाठी या गोष्टी नीट समजून घेण्याचे हे संमेलन योग्य व्यासपीठ आहे. मराठी साहित्याचे चांगले मार्केटिंग व्हायला हवे आहे. फेसबुक, व्हॉट्सअप आदि तंत्रज्ञानामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ‘वाचक नाहीत’ ही तक्रार चुकीची आहे. ई-बुक, ऑडिओ बुक हा मूळ छापील पुस्तकांना पर्याय नसून त्या नवतंत्रज्ञानाने युक्त संधी असल्याचे समजून घ्यायला हवे आहे. बनावट पुस्तकांचा (पायरेटेड) मुद्दा सर्वत्र अत्यंत गंभीर आहे. पायरेटेड पुस्तके कशी रोखावीत ? यावर आजही ठोस उत्तर मिळालेले नाही. लेखक आणि प्रकाशक नात्याचे अनेक पैलू राहिलेले आहेत. या दोनही ठिकाणी विश्वास, आपुलकी आणि सौहार्द समानतेच्या मांडवाखाली आणण्याचा प्रयत्न करणारे हे संमेलन आहे.

पुस्तक विकलं जाण्यासाठी आम्ही नवोदितांनी, ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तकाचा निम्मा शिल्लक प्रवास समजून घेण्याची गरज आहे. तो समजला तर चांगल्या पुस्तकांची निर्मिती शक्य आहे. पूर्वी लेखक, संपादक आणि प्रकाशक यांच्यात लेखनाविषयी चर्चा होतं. योग्य आणि अचूक लेखन वाचकापर्यंत पोहोचवायची कळकळ त्यामागे असायची. आताची पिढी या साऱ्याकडे व्यवसाय म्हणून अधिक बघते. कधीकधी लेखनाची गुणवत्ता चांगली असते, पण विक्रीमूल्य कमी असतं. तेव्हा प्रकाशकीय अंदाजाचा कस लागतो. आजही मराठी वाचक पुस्तकाच्या किंमतीचा खूप विचार करतो. तुलनेने अधिक किंमतीची इंग्रजी विकत घेतली जातात. सध्या तंत्रज्ञानामुळे आमूलाग्र बदल घडलेत. संगणकायुगाने अलिकडे प्रिंट ऑन डिमांड पद्धत जन्माला घातली. साहित्यिक आणि वाचक जवळ आले आहेत. वितरण यंत्रणा बदलत आहेत. सोशल मीडिया, तंत्रज्ञानामुळे लेखकाला वाचकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले आहे. इंटरनेट, ईमेल, फेसबुक, व्हॉटस्अप, गुगलप्लस, ई-बुक, डिजिटल प्रिंटिंग आदि तंत्रज्ञानामुळे हे क्षेत्र पूर्णतः ढवळले गेले आहे. आज वाचकांची प्रगल्भता कमालीची वाढते आहे. पुढचा काळ कागदी प्रकाशकांचा नाही. असे काही ठिकाणी म्हंटले जाते, त्यात सर्वथा सत्यता नसावी. आज महाराष्ट्रात राजहंस, मॅजेस्टिक, मेहता पब्लिशिंग हाऊस, पॉप्युलर, मौज, ग्रंथायन, वरदा बुक्स, प्रगती अभियान, उत्कर्ष, रोहन, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, काँटिनेंटल प्रकाशन, मनोविकास, अनुबंध, देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि., परचुरे प्रकाशन, लोकवाङमय गृह – मुंबई, साकेत, स्नेहवर्धन, मधुश्री, विश्वकर्मा, मायबोली, रसिक आदिंसह सुमारे पाचशे हून अधिक प्रकाशन संस्था कार्यरत असाव्यात. तरुण वर्ग वाचत नाही, ही टीका अन्यायकारक आहे. तरुण वर्ग वाचत असतो. त्यांच्या वाचनाचे विषय, माध्यमं बदलत आहेत. त्यांच्या पसंतीस उतरतील असे विषय, पुस्तकंच येत नसतील तर ते काय वाचणार ? असा एक प्रश्न पुढे येत असतो. दुर्दैवाने जुनी जड वैचारिक पुस्तकं आजची पिढी वाचत नाही. आजचा वाचक चार पुस्तकं चाळून, बघून, त्यावर नजर टाकून मग पुस्तक विकत घ्यायचं की नाही ते ठरवतो. प्रकाशकांनी वाचकांपर्यंत पोहोचायला हवं हे सत्य आहे. प्रकाशकांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागतो आहे. भविष्यात प्रकाशन संस्थांना पुस्तकांच्या मुद्रित कॉपींबरोबर ई-बुक्सही तयार करावी लागणार आहेत. मराठीत अनुवादित पुस्तकांचं प्रमाण आणि मागणीही वाढते आहे

आज लेखक स्वयं-प्रकाशनाबद्दल पाऊले उचलताना दिसतात. काही भक्कम यशही मिळवतात. अशांसाठी किमान लेखनाचे संपादन, पुस्तकाचा आकार, पुस्तकाचे मुखपृष्ठ, छपाई, पुस्तक बांधणी, वितरण, कमिशन, आय.एस.बी.एन. आदि बाबींचा किमान विचार करायला हवा, याची जाणीव करून देणारे हे संमेलन आहे. आजही पुस्तक हातात पडलं की काही वाचक एका बैठकीत ते वाचतात. पुस्तकातल्या विषयाचा विचार करतात. काही वेळा त्यातल्या व्यक्तिरेखेत गुंततात. एखाद्या वाक्यात हरवतात. हे सगळं लेखकाला अनुभवायला मिळतं. वर्तमान युगात, याही पुढे जाऊन ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ यामधला पुस्तक निर्मितीचा प्रवास समजून घेतला तर नवलेखकांकडून अधिकाधिक दर्जेदार ग्रंथ निर्मिती शक्य होईल. मराठी ग्रंथनिर्मिती क्षेत्रात चैतन्य प्रस्थापित होईल.

000

-धीरज वाटेकर मो. ९८६०३६०९४८

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार

लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात

आग्रा, दि . १९ : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंतीनिमित्ताने आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ला येथे अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘शिवजन्मोत्सव भारतवर्ष का ‘ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या अनोख्या महोत्सवाच्याआयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे. यावेळी केंद्रीय मंत्री एस पी बघेल, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे , सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, , फतेहपूर सिक्रीचे खासदार राजकुमार चहर, आग्र्याच्या महापौर हेमलता कुशवाह, आग्रा जिल्हा पंचायत अध्यक्षा डॉ. मंजू भदौरिया, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार परिणय फुके यांच्यासह  छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल, या चित्रपटाचे निर्माते नितीन विजन, कार्यक्रमाचे आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आदी उपस्थित होते.

आग्रा येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे महत्त्व आणि औचित्य अत्यंत अभिमानास्पद असून हा उपक्रम सर्व शिवप्रेमींना ऊर्जा देणारा असल्याचे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री म्हणाले, आग्रा येथे महाराजांनी दाखवलेला स्वाभिमान प्रेरणादायी असून या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा नव्याने स्वराज्य उभे केले. परकीयांचे दुराचारी शासन संपुष्टात आणून हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची प्रेरणा राजमाता जिजाऊंनी महाराजांना दिली, स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. ते उत्तम प्रशासक, महिलांच्या सन्मानाचे रक्षणकर्ते होते.  महाराष्ट्राचे समाजभान महाराजांनी जागे केले. समाजातील विविध छोट्या घटकांना, बारा बलुतेदार जातीसमूहांना एका सूत्रात गुंफून त्यातून इमान जपणारे लढवय्ये मावळे उभे केले. जे देव, देश आणि धर्मासाठी निष्ठेने लढल्याने जगात आदर्शवत असे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. देशाची सूत्रे हाती घेतल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रायगडावर येऊन प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही वाटचाल करत असून बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांचा योग्य आणि जाज्वल्य इतिहास समोर आणल्याबद्दल छावा चित्रपटाचे निर्माते अभिनंदनास पात्र असल्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबऱ्या वाचून आपण प्रभावित झाल्याचे सांगून केंद्रीय मंत्री बघेल म्हणाले, या उपक्रमामुळे राष्ट्रभावना निर्माण होण्यास मोठी मदत होईल .महाराजांच्या शौर्य आणि धाडसामुळे या पुढील काळात आग्रा हे शिवाजी महाराजांच्या नावानेही ओळखले जाईल . तसेच मुंबई -आग्रा हा महामार्ग या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून पाठबळातून हा अनोखा कार्यक्रम साकारण्याचे सांगून मंत्री शेलार म्हणाले, महाराजांच्या जीवनातील एकेका प्रसंगावर महानाट्य तयार होऊ शकते इतके ते प्रेरणादायी आहे.आग्रा येथून महाराजांनी सुटका करून घेतलेला दिवस हा युक्ती दिवस म्हणून साजरा करण्यात येईल असे अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

श्री योगेंद्र उपाध्याय यावेळी म्हणाले, आग्रा येथे महाराजांना कैदेत ठेवलेली जागा निश्चित करण्यासाठी अनेक इतिहासकारांशी विचार विमर्श केला.त्यातून रामसिंगची कोठी असलेली जागा निष्पन्न झाली. या जागेवर महाराजांचे भव्य स्मारक व्हावे. आग्रा येथे आयोजित जन्मोत्सवाचा हा उपक्रम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे सांगून अभिनेते विकी कौशल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर एक विचारधारा व वैश्विक प्रेरणा आहे. आघाडीवर राहून नेतृत्व करणारे ते अत्यंत द्रष्टे नेते होते. समकालिन राजांपेक्षा महाराज वेगळे होते. ते माझे सुपर हिरो आहेत. छावा चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांचा विचार जगात पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे श्री. विजन म्हणाले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. आमदार परिणय फुके यांनी आभार मानले.

प्रारंभी महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले . शिवजन्मोत्सवानिमित्त पाळणा पूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथील सुटकेच्या प्रसंगावर आधारित नाट्याचेही सादरीकरण झाले. कोल्हापूर येथील पथकाकडून महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा दर्शवणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करण्यात दाखवण्यात आली

कार्यक्रमापूर्वी  येथील महिला भगिनींनी औक्षण करत मुख्यमंत्र्यांचे आत्मीयतेने स्वागत केले. या अनोख्या स्नेहपूर्ण स्वागताने मुख्यमंत्री भारावले. तसेच या कार्यक्रमादरम्यान  छत्रपती संभाजीनगर येथील खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या चैतन्य तुपे  या मुलाने व त्याच्या आई-वडीलांनी या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या सुटकेसाठी तत्परतेने प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले.

0000

लातूर जिल्ह्यातील साहित्य : भाषाशैली आणि बोलीभाषा

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. अशा या विशेष संमेलनानिमित्त लातूर जिल्ह्यातील बोलीभाषेचे वेगळेपण मांडणारा हा लेख…_
भाषा ही एक सामाजिक संस्था असून तो मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भाषेच्या अस्तित्वाशिवाय दैनंदिन, भावनिक, वैचारिक आणि व्यावहारिक देवाण घेवाण अशक्य आहे. म्हणूनच लेखक ज्या परिसरात जन्मतो, तेथील भाषा शिकतो, त्या परिसरातील बोलीभाषेमधील शब्दांचा, भाषेचा उपयोग करून आपल्या सुख-दुःखात्मक अनुभवांची मांडणी आपल्या साहित्यातून करत असतो. मराठवाड्यातील लातूरच्या परिसरातील, मराठी ग्रामीण साहित्यातून अभिव्यक्त झालेल्या भाषाशैली मधून हे दिसून येते. ग्रामीण साहित्याशी नाळ बांधून लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी ग्रामीण परिसर जिवंत करण्यासाठी तेथील वास्तवाबरोबरच ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला आहे. ग्रामीण कथा, कादंबरी, कविता आदि साहित्यप्रकारातून लातूरच्या बोलीभाषेचा पदोपदी प्रत्यय येतो, हे लातूरच्या मराठी ग्रामीण साहित्यातील भाषाशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
लातूरची भूमी कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात नेत्रदीपक अशी आहे. या मातीचा सुंगध घेऊन आलेली शब्दकळा ग्रामीण साहित्यातून बोलीरूपाने आजही दरवळत आहे. रा.रं. बोराडे, शेषराव मोहिते, जनार्दन वाघमारे, योगीराज माने, भास्कर बडे, फ. म. शहाजिंदे, सुरेंद्र पाटील, बी. एम. देशमुख, श्रीराम गुंदेकर, प्र.ई. सोनकांबळे, ललिता गादगे, विलास सिंदगीकर, अंबादास केदार आदी लातूरच्या ग्रामीण दलित साहित्यिकांच्या साहित्यातून ग्रामीण भाषेतील शब्दकळा, म्हणी, वाकप्रचार, प्रतिमा, प्रतीके, उपमा, अलंकार, आदिंचा वापर केलेला असल्यामुळे भाषेला एक प्रकारचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. त्यात बोलीभाषेचा जिवंतपणा आला आहे. म्हणूनच लातूरच्या अस्सल ग्रामीण बोलीभाषेतील मराठी ग्रामीण साहित्य हे लातूरचे खरे भूषण आहे.
मराठवाडी बोली वेगळी आहे असे म्हणण्या इतपत या बोलीत वेगळेपणा आहे. निजामी सत्तेतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त झाला, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक दृष्टीने संपन्न आहे. मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र्य जाणिवेची भाषा बोलली जाते. लातूर जिल्ह्यातील भाषेवर उर्दू, कन्नड, तेलगू, इंग्रजी व शेजारच्या जिल्ह्यातील भाषांचा प्रभाव दिसतो. लातूरच्या बोलीभाषेचा विचार लातूर जिल्ह्यातील ग्रामीण-दलित लेखकांच्या साहित्याधारे अभ्यास करावा लागतो. आधुनिक युगातही हा वेगळा प्रभाव या भाषेवर दिसतो.
लातूर कर्नाटकी सीमेवर असल्यामुळे कर्नाटकी ‘हेल’ काढून ही बोली बोलली जाते. शब्द, वाक्यरचना, म्हणी, वाक्यप्रचार या सगळ्यावरच कन्नड प्रभाव आहे. लातूर जिल्ह्यातील माणूस बोलताना उंच पट्टीत ‘का करुलालाव की आन् का नाय की’ असे भेटल्याभेटल्या बोलायला सुरुवात करतो. याशिवाय ‘गिरा लावणे’ म्हणजे ‘ग्रहण लावणे’ एखाद्याचे कुणामुळे तरी नुकसान झाले असेल किंवा काही संकटे येत असतील तर ‘गिरा लावला’ असा शब्दप्रयोग आजही केला जातो. ‘नकर’ म्हणजे ‘थोडसे’, ‘उगं नकर लागल्यालं हाय’ तसेच ‘कुठे आहेत’ असे म्हणायचे असेल तर ‘कुठ हाव’ असा शब्दप्रयोग केला जातो. तसेच मटमन (मटकन), आपरुग (आपरुक), मुरगाळून (पाय दुमडून), दलिद्री (दरिद्री), टुचभर (थोडसं), जवारी (ज्वारी), आगरी (शेकोटी) असे वेगवेगळे शब्दप्रयोग ग्रामीण भागात बोलले जातात.
लातूर जिल्ह्यातील स्त्रियांच्या तोंडी माय, कडू, हाट्या असे अनेक शब्द वापरले जातात. निजामी राजवटीचा प्रभाव मराठवाडा-लातूरवर असल्यामुळे निजामी राजवटीतील वक्त, कैफियत, जुमला, हमिशा, इमाम, मोगलाई, फितवून, फारारे, मुनिम, दम, कोशिश असे कितीतरी शब्द लातूरच्या मराठी बोलीभाषेत वापरले जात आहेत. थोडक्यात, लातूरच्या भाषेवर निजामी राजवटीचा प्रभाव असल्यामुळे ती वेगवेगळ्या ढंगाने बोलली जाते हे लातूरच्या मराठी भाषाशैलीचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच अशा भाषाशैलीचा प्रभाव लातूरच्या मराठी ग्रामीण साहित्यातून आजही ठळकपणे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील साहित्यिकांनी लातूरच्या अस्सल मराठमोळी मराठवाडी भाषाशैलीमधून ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन आपापल्या कथा, कविता, कादंबरी, नाटक आदि साहित्यप्रकारातून घडविले आहे. आजही ग्रामीण जीवनातील रुढी, प्रथा, परंपरा, कृषिसंस्कृती, निसर्ग, नातेसंबंध, शेतकरी, शेतमजूरांच्या जीवनाचा दस्ताऐवज ग्रामीण भाषाशैलीमधून मांडला जात आहे.
मराठी ग्रामीण साहित्यातील आघाडीचे कथा कादंबरीकार प्राचार्य रा.रं. बोराडे लातूर जवळील काटगावचे होते. त्यांनी लातूरची पहिल्यांदा अस्सल ग्रामीण शब्दकळा आपल्या साहित्यातून मांडून या बोलीचा परिचय मराठी साहित्याला करून दिला. ‘पेरणी’, ‘ताळमेळ’, ‘वरात’, ‘नातीगोती’, ‘बोळवण’, ‘वाळवण’, ‘फजितवाडा’, ‘माळरान’, ‘राखण’, ‘गोंधळ’, ‘खोळंबा’ आदी कथासंग्रह तर ‘पाचोळा’, ‘सावट’, ‘चारापाणी’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘इथं होत एक गावं’, ‘रहाटपाळणा’, ‘राजसा’ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी आपल्या कथा, कादंबऱ्यातून लातूर, धाराशिव (तत्कालीन उस्मानाबाद) परिसरातील ग्रामीण बोलीभाषेचा सुयोग्य वापर केलेला आहे. रा.रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीतील बोलीभाषेसंदर्भात डॉ. विठ्ठल जंबाले असे म्हणतात की, ” ‘पाचोळा’ ही बोराडे यांची बहुचर्चित कादंबरी. निवेदन आणि संभाषणाकरिता बोलीभाषेचा वापर असल्यामुळे ही कृतीचे वेगळेपण दर्शविते. पहिल्या वाक्यापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत या कादंबरीत बोलीभाषेचा (ग्रामीण भाषेचा) सर्जनशील वापर केल्यामुळे ही कादंबरी नजरेत भरते. कादंबरी कथनाचे सामर्थ्य बोलीभाषेत आहे. विशेषतः मराठवाड्यातील लातूर परिसरातील बोली या कादंबरीत योजिली आहे.” म्हणजे, ‘पाचोळा’ या कादंबरीतून लातूर परिसरातील बोलीभाषेचा यथोचित वापर केला आहे.
शेषराव मोहिते यांनी ‘असं जगणं तोलाचं’ व ‘धूळपेरणी’ या कादंबऱ्यामधून ग्रामीण भाषा शैलीतून शेतकरी जीवनाचे चित्रण केले आहे. शेषराव मोहिते यांच्या कांदबऱ्या संदर्भात डॉ. गणेश देशमुख असे म्हणतात की, “लग्न, त्यासाठी कर्ज, शेतीवर ते फेडण्याची इच्छा व उत्पन्न येऊनही ‘भाव’ न मिळाल्याने शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करणारा या कादंबरीतील ‘हाणमू’ आजच्या शेतकऱ्याचे प्रतिनिधिक रूप आहे. केवळ समस्या मांडून चालणार नाही तर त्यावर प्रभावी उपाययोजना सूचविण्याची चिंतनशील वृत्ती जोपासणारे मोहिते शेतकरी जीवनाशी कमालीची निष्ठा बाळगून आहेत. तर ‘धूळपेरणी’ शेती व गावापासून तुटू पाहणाऱ्या ‘श्रीराम’ ची शेतकऱ्यांच्या नव्या पिढीची कहाणी येते.” अर्थात् शेषराव मोहिते यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शोकात्म जीवन, त्यांच्या समस्या याचे वास्तव चित्रण लातूर परिसरातील ग्रामीण बोलीभाषेतील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार आणि ग्रामीण जीवनातील निसर्गविषयक प्रतिमा, प्रतीके यांचा वापर करून केला आहे. त्यामुळे त्यांच्या कादंबरीलेखनात जिवंतपणा आलेला आहे.
जनार्दन वाघमारे यांनी ‘बखर एका खेड्याची’ या कादंबरीतून १९९३ साली झालेल्या भूकपामुळे किल्लारी परिसरातील विशेषतः ‘कौठा’ गावात झालेल्या जिवित व वित्तहानीचे चित्रण ग्रामीण भाषाशैलीत केले आहे. याशिवाय ‘मूठभर माती’ या आत्मकथनातून या परिसरातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत.भास्कर बडे यांनी ‘चिकाळा’ या कथासंग्रहातून ग्रामीण समाजजीवनाचे दर्शन ग्रामीण भाषाशैलीतून घडविले आहे. ग्रामीण व प्रमाण भाषेतून स्वतःचा जीवनपट उलगडला आहे. त्यांच्या भाषेवर लातूर व बीड जिल्ह्यातील बोलीभाषेचा प्रभाव आहे. फ. म. शहाजिंदे यांनी ‘निधर्मी’, ‘शेतकरी’, ‘ग्वाही’ आदि काव्यसंग्रहातून ग्रामीण भाषाशैलीत सामाजिक व्यथा, वेदनांनी भरलेले समाजवास्तव चित्रित केले आहे. याशिवाय ‘मीतू’ ही प्रेमपत्रात्मक कादंबरीही लक्षणीय आहे. सुरेंद्र पाटील यांनी ‘चिखलवाटा’ आणि ‘झुलीच्या खाली’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या. मधून ग्रामीण शेतकऱ्याच्या समस्या, कृषिसंस्कृती यांचे ग्रामीण भाषाशैलीतून दर्शन घडविले सुरेंद्र पाटील यांच्या साहित्य लेखनातून लातूर जि जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील कर्नाटकातील कानडी भाषेचा पडलेला प्रभाव याचे यथार्थ दर्शन घडविले आहे.
डॉ. श्रीराम गुंदेकर यांचे ‘उचल’ व ‘लगाम’ हे दोन कथासंग्रह प्रकाशित आहेत. सत्यशोधली संशोधन व म. फुले यांच्या विचाराला आयुष्यभर त्यांनी वाहुन घेतले आहे. त्यांनी कथावाङमयातून अत्यंत प्रभावीपणाने लातूरच्या बोली भाषेचा वापर केला. श्रीराम गुंदेकर यांच्या भाषाशैलो संदर्भात डॉ. वासुदेव मुलाटे असे म्हणतात की, “श्रीराम गुंदेकरांना प्रत्यक्ष ग्रामीण जीवनाचा अनुभव आहे. किंबहुना त्या व्यथापूर्ण ग्रामीण वास्तवाशी त्यांची नाळ अजूनही तुटलेली नाही. याचा प्रत्यय देणारी अनेक स्थळे त्यांच्या कथांमधून सापडतात. बहुतेक कथा कधी संपूर्ण बोलीभाषेतून तर कधी बोलीशी जुळेल अशा प्रमाणात शेती शब्दांची, वाक्यांची सरमिसळ करून लिहिल्यामुळे प्रत्ययकारितेत भरच पडली आहे.” म्हणजेच श्रीराम गुंदेकर यांच्या कथालेखनात कधी ग्रामीण बोलीभाषा तर कधी बोलीशी जुळेल अशी प्रमाणभाषा त्यांनी वापरलेली आहे.
मराठवाड्यातील – लातूर परिसरातील साहित्यिकांच्या भाषेवर उर्दू, कानडी, इंग्रजी, हिंदी अशा देशी – विदेशी भाषेचा प्रभाव आहे. कारण या विविध भाषेतील शब्दांचा वापर कळत-नकळतपणे लेखक कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आदि साहित्यप्रकारातून करत आहेत. म्हणूनच डॉ. प्रल्हाद लुलेकर असे म्हणतात की, “मराठवाड्यातील भाषेवर १९४८ पूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या उर्दू भाषेचा, शेजारच्या कन्नड आणि तेलगू भाषेचा, खानदेशातील अहिराणीचा, काही प्रमाणात वऱ्हाडीचा परिणाम झाल्याने त्याचे परिणामही भाषेला लाभले आहे. सहचर्याचा हा परिणाम अपरिहार्य असतोच याचाच अर्थ असा की, लातूर परिसरातील साहित्य हे विविध भाषेतील शब्दांचा कमी अधिक प्रमाणात वापर करून निर्माण झालेले आहे, होत आहे. हे लातूरच्या भाषाशैलीचे ठळक वैशिष्ट्ये आहे.
लातूर परिसरातील लोकांच्या आणि साहित्यिकांच्या भाषा शैलीवर सीमाभागातील कानडी, भाषेचा प्रभाव प्रभावीपणे आजही जानवतो आहे. लातूर जिल्ह्याची बोली कन्नड ढबीने बोलली जाते. यामध्ये कोणतेही वाक्य बोलताला उच्चार सुलभ करून बोलण्याची प्रवृती दिसते, तसेच कर्नाटकी शैलीपेमाणे हेल काढून बोलण्याची सवय दिसते. बोलत असताना बऱ्याच वेळा क्रियापद अगोदर बोलले जाते व नंतर बाकीचे वाक्य बोलले जाते. उदा जाताव का ये गावाला ? (गावाला जाता का?) तसेच बोलताना बऱ्याच वेळा वाक्याच्या मध्ये शेवटी हेल काढून ‘ये’ चा उच्चार केला जातो. लातूर जिल्ह्याच्या बोलीत बरेच नवीन शब्द दिसतात ते महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या इतर भागात हे शब्द वापरले जात नाहीत. उदा. ‘नकर’ हा शब्द ‘थोड’ साठी वापरला जातो. उदगीर परिसरात हा शब्द सर्रास वापरला जातो. औसा तालुक्यात ‘बोगाणं’ हा शब्द ‘भगुणं’, पातेलं यासाठी वापरला जातो. तसेच याच पारिसरात ‘आयनास’ हा शब्द ‘अनायसे’ साठी वापरला जातो. आणखी खूप वेगळे शब्द लातूर जिल्हा परिसरात बोलले जातात. स्त्रिया, पुरुष, लहान मुले यांच्या बोलीत फरक असलेला दिसतो.
 – प्राचार्य डॉ. आशा मुंडे
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महिला महाविद्यालय, लातूर
(लातूर : वसा आणि वारसा ग्रंथातून साभार)

माय मराठीचा समृद्ध वारसा !

मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यासोबत सत्तर वर्षानंतर दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यानिमित्ताने आपल्या माय मराठीचा समृद्ध वारसा अधोरेखित करणारा हा विशेष लेख…

“मराठिया बोले अवघे संत।

येरि अवांतर भाष्य न लागे।”

– संत नामदेव

संत नामदेवांनी आपल्या लेखनातून मराठी भाषेची महत्ती सांगितली आहे. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख भाषांपैकी एक असून तिचा इतिहास समृद्ध, साहित्यिक वारसा आणि तिला सांस्कृतिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी केली जात होती. अभिजात भाषेसाठी आवश्यक असलेल्या निकषांमध्ये त्या भाषेचा प्राचीन इतिहास, स्वतंत्र परंपरा, समृद्ध साहित्य आणि समाजावर झालेला परिणाम हे महत्त्वाचे घटक असतात. संस्कृत, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना आधीच अभिजात दर्जा मिळाला होता. मराठी भाषाही सुमारे दोन हजारवर्षांहून जुनी असून संत साहित्य, लोककथा, काव्य, नाटक आणि आधुनिक साहित्य यामुळे तिचा वारसा अधिक उजळलेला आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव यांसारख्या संतकवींनी मराठी भाषेत अमूल्य योगदान दिले आहे. मराठेशाहीच्या काळात ही भाषा प्रशासन आणि लष्करी व्यवहारात वापरण्यात आली. अशा या समृद्ध भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

मराठी भाषा ही भारतातील एक समृद्ध आणि ऐतिहासिक भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा असलेली मराठी कोट्यवधी लोकांची मातृभाषा असून ती आपल्या अद्वितीय वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, परंपरेचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. इ.स. ९ व्या शतकाच्या सुमारास अपभ्रंश रूपातून मराठीचा विकास झाला. मराठी भाषा संत साहित्यातून अधिक लोकप्रिय झाली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून, संत तुकारामांनी अभंगातून, तर संत रामदासांनी आपल्या काव्यरचनांमधून मराठी भाषेला एक वेगळी उंची दिली.

“मराठीचिया नगरी, ब्रम्ह वेचातो विकीरी।”

– संत ज्ञानेश्वर

छत्रपती शिवाजी महाराजांनीही मराठीचा गौरव वाढवला. त्यांनी राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा उपयोग केला आणि राजपत्रांसाठी मराठी भाषा प्रचलनात आणली. त्यामुळे मराठी ही केवळ बोलीभाषा न राहता राजभाषा बनली. मराठी भाषेत प्राचीन काळापासून अनेक थोर साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांसारख्या संतांनी भक्तिरसपूर्ण साहित्य निर्माण केले. नंतर कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, शिवाजी सावंत यांसारख्या साहित्यिकांनी आधुनिक मराठी साहित्य समृद्ध केले.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मराठीच्या वेगवेगळ्या बोली आढळतात. जसे- कोकणात मालवणी, विदर्भात वऱ्हाडी, उत्तर महाराष्ट्रात अहिराणी, पश्चिम महाराष्ट्रात देशस्थ मराठी, खानदेशात खंडेशी अशी काही प्रमुख उदाहरणे असली, तरी बारा मैलावर भाषा बदलते, असे म्हटले जाते. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यातील बोलीमध्ये काही प्रमाणात वैविध्यता दिसून येते.  मराठी नाटक, चित्रपट, लोककला यांमध्ये भाषा महत्त्वाची भूमिका बजावते. तमाशा, भारुड, गोंधळ, लावणी यांसारख्या लोककला मराठीतूनच विकसित झाल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात मराठीतून अनेक विज्ञानविषयक पुस्तके लिहिली जात आहेत. तसेच इंटरनेट, सोशल मीडिया, ब्लॉग्स यामुळे मराठीचा प्रसार वेगाने होत आहे.

अभिजात दर्जा

केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने आता तिच्या संवर्धनासाठी विशेष निधी मिळेल, संशोधनाला चालना मिळेल आणि जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक दृढ होईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमान बाळगून तिचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार करायला हवा. अभिजात दर्जा ही केवळ मान्यता नसून मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल.

आजच्या डिजिटल युगातही मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही भाषा सतत विकसित होत आहे. मोबाईल अॅप्स, वेबसाईट्स, शिक्षणपद्धतीत मराठीचा समावेश वाढला आहे. शैक्षणिक आणि प्रशासकीय स्तरावर मराठी भाषेला महत्त्व देणे आवश्यक आहे. मराठी माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करता येते. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने पुढाकार घ्यायला हवा. मराठी साहित्य वाचावे, मराठीतून लेखन करावे, मराठीत संवाद साधावा आणि मुलांना मराठी शिकवावी. आपण  मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. तिच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगून आपण मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहायला हवे.

जय मराठी! जय महाराष्ट्र! जय भारत !

– संगीता पवार

महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका,

जि.प.प्रा.शा.साई, ता. जि. लातूर

लाभले  आम्हांस  भाग्य बोलतो मराठी. ….

साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, श्रेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि. वा.शिरवाडकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीने  विशेष स्थान प्राप्त केले. त्यांचा जन्मदिन हा संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. २७ फेब्रुवारी हा दिन जवळ येऊ लागतातच महाराष्ट्रात मराठीचा गर्जा जयजयकार सुरू होतो. दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा यांनी
लेखन प्रपंच.
१९८७ साली मराठी भाषेतील दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन वि.वा. शिरवाडकर यांना गौरवण्यात आले. काव्य, नाटक, कादंबरी या साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतात मुशाफिरी करणारे कवी कुसुमाग्रज यांनी वाड्मयीन क्षेत्रात मोलाची भर घातली. त्यांचे साहित्य चिरंतन, शाश्वत स्वरूपाचे असून ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणिवा जपणारे महत्त्वाचे साहित्यिक आहेत.
 जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांची संख्या प्रचंड आहे. भारत हा बहुभाषिक देश असून  भारतीय भाषांमध्ये लोकसंख्येच्या आधारावर बोलली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची भाषा म्हणून मराठी भाषा ओळखली जाते.
 भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेली मराठी ही भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा असून ती महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा या राज्याची सहअधिकृत भाषा आहे. भारतात नऊ कोटीपेक्षा जास्त लोक मराठी भाषा बोलतात. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असल्याने मातृभाषा असलेल्या मराठी भाषेला वेगळे महत्त्व आहे.
 महाराष्ट्र, गोवा या राज्यामध्ये मराठी भाषेचा वापर प्रामुख्याने होतो. या दोन राज्याव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक पातळीवरील विचार करीत असताना भारताप्रमाणे इस्त्रालय, मॉरिशियस या देशांमध्ये मराठी भाषा बोलली जाते. शिवाय जगातील अनेक देशात मराठी भाषिकांची वस्ती असलेली पहावयास मिळते. त्यातून मराठी भाषेचे आदान प्रदान होताना दिसते. मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अभ्यास करण्यासाठी विविध देशातील संशोधक महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले पहावयास मिळतात. महाराष्ट्राचे उपास्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी वारीच्या निमित्ताने अनेक परदेशी नागरिक आषाढी वारीत सहभागी होऊन महाराष्ट्रीय संस्कृतीबरोबर मराठी भाषेचाही अभ्यास करतात. मराठी भाषेच्या जवळजवळ ५२ बोलीभाषा महाराष्ट्रातील विविध भागात बोलल्या जातात. बोलीभाषांमुळे मराठी भाषा ही अधिकाधिक परिपूर्ण झालेली असली तरी प्रशासन, शिक्षणाचे माध्यम, समाजातील लेखी व्यवहार यासाठी सहसा बोली भाषेचा वापर केला जात नाही. कोणतीही भाषा एकाएकी जन्मास येत नाही. तिच्या जन्माची प्रक्रिया प्रदीर्घकाळ सुरूच असते. आज असलेली आपली मराठी भाषाही  त्याला अपवाद नाही.
  जगातील कोणत्याही भाषेची सुरुवात नेमकी कधी, केव्हा, कुठे झाली हे सांगणे कठीण. मात्र मराठी भाषेला प्राचीन परंपरा असून ती आठव्या शतकापासून प्रचलित असल्याचे दिसते. राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठीचा वापर यादव काळापासून होत होता. यादवकाळातील मराठीतील शिलालेख आणि ताम्रपट हे याची साक्ष देतात. दुर्मिळ स्वरूपात सापडलेले शिलालेख, ग्रंथ यावरील संशोधनावरून मराठी भाषा ही प्राचीन असल्याची साक्ष पटते.
 मराठी भाषा महाराष्ट्रातील विविध संतांच्या अभंग, कीर्तन, भारुड, भजनातून सहज सुलभपणे आविष्कृत होताना ती समृद्ध होत गेली. मराठी भाषेतील आद्य चरित्र ग्रंथ म्हणून   लीळाचरित्राचा उल्लेख केला जातो. संत ज्ञानदेवांनी मराठी भाषेची अस्मिता, तिची ध्वजा फडकवली. त्यांचा  साहित्याचा लेणे असणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ गेली अनेक शतके सर्वोच्च असून जागतिक दर्जाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.
   परि अमृताचे पैजा जिंके !
   ऐसे अक्षरेचि रसिके   मेळविण !!
अशा  सार्थ शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले . नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी! असे म्हणणाऱ्या संत नामदेवांनी मराठी भाषेची पताका अभंगाच्या माध्यमातून उत्तर भारतापर्यंत पोहचवली. शीख धर्मीयांचा गुरू ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात त्यांच्या रचनांचा समावेश आढळतो. संत तुकाराम यांनी मराठी भाषेला वैभवाच्या शिखरावर नेहून ठेवले. त्यांचे अभंग सातासमुद्रापलीकडे गेले. संत तुकारामांचा अभंग माहित नाही असा मराठी माणूस शोधूनही सापडत नाही. त्यांचे अभंग आजही लोकांच्या जिभेवर नाचताना दिसतात. गाडगेबाबांनी  संत तुकारामांच्या अभंगांचा आपल्या कीर्तनात यथोचित वापर करून समाजमन जागृत करून मानवता धर्माची शिकवण दिली. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक, दासबोध या ग्रंथातून मराठी भाषा भक्तीरसात रमली. संत एकनाथांनी भारुडाच्या माध्यमातून मराठी भाषेचे सौंदर्य रूप न्याहाळले. त्यांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठी भाषेत भर घातली. याशिवाय अनेक संतांच्या अभंग, रचनांनी मराठी भाषा समृद्ध झालेली दिसते.
संत, पंत, तंत मंडळींनी माय मराठी भाषेच्या समृद्धीचा आलेख व्यापक आणि विस्तृत स्वरूपात आकारास आणला. १९ व्या शतकात धर्म, राजकारण, समाजकारण, संस्कृती, साहित्य अशा क्षेत्रात समाजसुधारक तसेच साहित्यिक यांनी आपले योगदान दिले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, लोकहितवादी, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा अनेकांनी ग्रंथलेखन व त्यातून मराठीची सेवा केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर तर स्वतःला ‘ मराठी भाषेचा शिवाजी आहे’ असे अभिमानाने म्हणत.
      १९६० नंतर ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य अशा अनेक साहित्य प्रवाहांचा उदय झाला. या साहित्य प्रवाहांमुळे मराठी भाषा तळागाळातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचली. मराठी साहित्याच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने दलित साहित्याचा सशक्त प्रवाह जन्माला आला. फुले, शाहू, आंबेडकर या विचारधारेशी एकरूप असणारे अनेक लोक लिहू लागले, वाचू लागले. कथा, काव्य ,कादंबरी, नाटक , चरित्र, आत्मचरित्र अशा विविध अंगी साहित्य प्रकाराने मराठी भाषा सर्वश्रेष्ठ ठरली आहे. समाजातील  दलित, उपेक्षित, शोषित , वंचित , कष्टकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्यांचे जीवन लेखणीत शब्दबद्ध करून अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात क्रांती केली.
 ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर झाला. भाषा प्राचीन असावी त्या भाषेतील साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे हे निकष पूर्ण करणारी मराठी भाषा अभिजात भाषा ठरली ही गोष्ट मराठी भाषिकांसाठी अभिमानाची आहे. यावरूनच मराठी भाषेची महती लक्षात येते.
 मराठी भाषेच्या उगमापासून ते आजच्या आणि सध्याच्या मराठी भाषेच्या स्वरूपात अनेक बदल हे कालपरत्वे झाले. कोणतीही भाषा एकजिनसी असत नाही. परकीय आक्रमणे, राज्यक्रांती, दुष्काळ, भूकंप, महापूर , युद्धे , रोगराई, वैचारिक व धर्मक्रांती अशा अनेक कारणांनी समाजमन ढवळून निघत असते. त्याचा परिणाम मराठी भाषेवर होताना मराठी भाषाही हळूहळू बदलत गेली. असे असले तरी विविध ज्ञानपीठ, साहित्य अकादमी पुरस्कार, शासन स्तरावरील पुरस्कार, विविध संस्था यांचे पुरस्कार, भाषा संचालनालय,महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य संमेलने अशा विविध  ज्ञात अज्ञात संस्था या मराठी भाषेचा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा तसेच मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी यासाठी  मराठी भाषा संवर्धनासाठी राबविलेले विविध उपक्रम मराठी भाषेच्या समृद्धीच्या दिशेने टाकलेली मोठी पाऊले आहेत.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या आणि माध्यमांच्या जगात मराठी भाषा आपले अस्तित्व  राखून आहे. आज मराठी भाषेवर इतर भाषांची किती आक्रमणे झाली तरीही मराठी भाषेवर त्याचा फारसा परिणाम न होता उलट तिची वाटचाल समृद्ध दिशेने सुरू आहे….
  लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
हा कविवर्य सुरेश भट यांनी मराठी मनात जागवलेला अभिमान चिरंतन राहील.
डॉ. संजयकुमार सरगडे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

समाजनिर्मितीची रूपरेषा…

आपल्या उक्ती आणि कृतीतून समाजाला प्रबोधनाच्या मार्गावर नेणाऱ्या संत गाडगेबाबा यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. समाजाला दशसूत्री देऊन त्यातून एक सशक्त समाजनिर्मितसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. राज्‍य शासनाने गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा अंगीकार केला असून त्यामाध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास नेला जात आहे.

विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत एक परिणामकारक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे संत गाडगेबाबा होत. संत गाडगेबाबांची खरी ओळख ही चिंध्या पांघरणारा, हाती खराटा घेऊन स्वच्छतेचे व्रत सांभाळणारा नि आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना अंधश्रध्दा, कर्मकांड यांपासून मुक्त करू पाहणारा एक लोकोत्तर पुरूष ! सामाजिक परिवर्तनासाठी ‘स्वच्छता’ आणि ‘कीर्तन’ या दोन प्रबोधन उपक्रमांचा उपयोग त्यांनी केला. गाडगेबाबांचे तसे औपचारीक शिक्षण झाले नव्हते. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यास कारणीभूत होती, असे असले तरी गाडगेबाबांनी विविध पध्दतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांसाठी आपल्या जीवनकार्यातून एक तत्वज्ञान देऊ केले.

युगनिर्माता संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. झिंगराजी जानोरकर हे त्यांच्या वडिलांचे नांव! तर सखुबाई ही त्यांची आई. गाडगेबाबांचे लहानपणचे नांव डेबू! त्यांच्या व्यसनाधीन-अंधश्रध्दाळू वडिलांचा १८८४ मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी गाडगेबाबांचे वय अवघे सात वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर गाडगेबाबांचे मामा चंद्रभान यांचे घरी त्यांच्या पुढील जीवन प्रवास सुरू झाला. गाडगेबाबांचा कामसूपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या गुरे राखणीपासून तर शेती करण्यापर्यंत ठायी ठायी दिसून येई. १८९२ मध्ये त्यांचे कुंदाबाईसोबत लग्न  झाले. काही दिवसांनी मामाची शेती सावकाराने गिळंकृत करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी व झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी डेबुजीने अपार कष्ट घेतले. बाबांना आलोका व कलावती या दोन मुली तर मुद्गल आणि गोविंद अशी दोन मुले होती. १९०५ मध्ये त्यांनी कोणत्याही पाशात न अडकता गृहत्याग केला. त्यानंतर आयुष्याची ५० वर्षे व्रतस्थपणे त्यांनी जनसेवेत घालवली.

बुडती हे जन न देखवे डोळा !

 म्हणोनी कळवला येत असे !

या भावनेतून त्यांनी समाजाला दिशा दिली. गाडगेबाबांची दशसूत्री प्रसिध्द आहे. त्यामध्ये समाजकल्याणाची एक रूपरेषा आपल्याला प्रतीत होते.

१) भूकेल्यांना : अन्न, २) तहानलेल्यांना : पाणी, ३) उघडयानागडयांना : वस्त्र, ४) गरीब मुलामुलींना: शिक्षण, ५) बेघरांना : आसरा, ६)अंध, पंगू रोग्यांना : औषधोपचार, ७) बेकारांना : रोजगार, ८) पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय, ९) गरीब तरूण-तरुणींचे : लग्न १०) दु:खी व निराश्यांना : हिंमत

अशी ही गाडगेबाबांची दशसुत्री म्हणजे कल्याणकारी राज्याच्या गुणवैशिष्ट्यांचाच भाग जाणवते.

समाजातील सुस्थितीत लोकांकडून इतर दुर्बल लोकांसाठी कार्य करण्याची ते जशी अपेक्षा व्यक्त करतात तशीच अपेक्षा ते शासनाकडूनही करतात. या दशसूत्रीतील गर्भित अर्थ खऱ्या अर्थाने मानवी विकासाचा निर्देशांक कसा वाढवता येईल याचे दिग्दर्शन करतो.

भुकेल्यांना : अन्न

या मूलभूत सुत्राकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. देशातील कुणीही माणूस हा भुकेने मरू नये, याकरिता बाबांनी मांडलेला विचार अनेकांनी स्वीकारला. शासनाने देखील ‘शिवभोजन योजना’च्या माध्यमातून हे सुत्र अंगिकारले आहे. आज राष्ट्रीय स्तरावरती सुमारे ८० कोटी नागरीक हे मोफत शिधा प्राप्त करत असून त्यातून त्यांना मोठा आधार मिळत आहे. सरकारने या कायद्याच्या माध्यमातून उचललेले पाऊल व केलेले प्रयत्न म्हणजे आज कोणीही गरीब उपाशी राहणार नाही, असेच म्हणावे लागेल.

तहानलेल्यांना : पाणी

गाडगेबाबा ज्यावेळी समाजप्रबोधनाचे काम करत होते. त्याकाळी पाण्याचे दुर्भिक्ष होते. विशेषत: स्त्रियांची होणारी भटकंती व गुंड-घागरी घेऊन त्यांची होणारी पायपीट, हे सार्वत्रिक चित्र होते. ‘जल हेच जीवन’ याचे महत्व सांगत असतांना प्रत्येक माणसाला पाणी मिळायला हवे व तेही शुध्द असावे. या गाडगेबाबांच्या संकल्पनेलाच केंद्र व राज्य शासनाने आपल्या धोरणांमध्ये अंगीकृत करून ‘गाव तेथे पाणी पुरवठा योजना’ राबविली जात आहे.

उघड्यानागड्यांना : वस्त्र

आज ‘माणुसकीची भिंत’ यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक उपयोगी कपड्यांचे दान दिले जाते आहे. गरजूंनी तेथून कपडे घेऊन आपली निकड भागवावी, अशी अपेक्षा त्यामागे आहे. शिवाय अनेक सेवाभावी संस्थामार्फत मोफत कपडे, ब्लॅंकेट्सचे वाटप केले जाते. यासारख्या उपक्रमांना बळ देण्यासाठी लोकमानसात सेवाभावी वृत्ती व दानत्व वाढवणे गरजेचे आहे. ज्यातून गरीब व उपेक्षित जनतेची वस्त्रांची गरज भागवली जाऊ शकते.

गरीब मुला-मुलींना : शिक्षण

गाडगेबाबा शिक्षणाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी सतत कीर्तनातून संदेश देत.अज्ञानामुळे होणाऱ्या नुकसान व शोषणाचे अनेकअंगी पदर ते उलगडून दाखवीत.

आज शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणात राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे व वसतिगृहाच्या प्रशस्त व्यवस्थांमुळे समाजातील तळागाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोईचे झाले आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी शासनाद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व प्रोत्साहन दिले जाते आहे.

आजच्या संदर्भात बाबांनी अपेक्षिलेला शिक्षित समाज हा केवळ शालेय शिक्षणापुरता मर्यादित नसून, समाजातल्या उन्नत व विकसित घटकांच्या बरोबरीने उपेक्षित व मागास समाजाला शिक्षित करणे, असाच आपल्याला घ्यावा लागेल. त्यादृष्टीने शासनासोबतच समाजानेही कार्य करणे आज गरजेचे आहे.

बेघरांना : आसरा

बाबांना अभिप्रेत असलेली जी संकल्पना होती. त्यामध्ये कुडाच्या, तुटक्या-फुटक्या घरांमध्ये राहणारी श्रमिक माणसे, उघड्यावर संसार करणारी कुटुंबे यांना किमान हक्काचे छप्पर मिळावे ही होती.

रानावनात भटकंती करणारी स्थलांतरीत माणसे यांना स्थायित्व मिळावे आणि देशाचे नागरिक म्हणून किमान जगण्याची पूर्तता व्हावी, याकरीता गाडगेबाबा आपल्या किर्तनातून सातत्याने मांडणी करत.

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर या उघड्या पडलेल्या माणसांना हक्काचे निवारे देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या. ज्यामध्ये ‘लोक आवास योजना’, ‘वाल्मिकी आंबेडकर आवास योजना’, ‘प्रधानमंत्री घरकुल योजना’, ‘महाराष्ट्र हाऊसिंग ॲण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरटी’ (म्हाडा) यांचा समावेश आहे. आजही केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये होणारी कोट्यवधी रूपयांची तरतूद ही बाबांच्या दूरदृष्टी व समाजभानाला अधोरेखित करणारी आहे.

गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व लहानपणीच हेरले होते नि अंगी बाणले होते. सार्वजनिक अस्वच्छतेतून साथीचे रोग, प्रदूषण आणि गलिच्छपणा या समस्यांना सामोरे जावे लागते, हे त्यांनी आपल्या भ्रमंतीतून टिपले होते. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व लोकांच्या मनावर बाब बिंबवत असत. त्यासह लोकाच्या मनातील आरोग्यविषयक अंधश्रध्दाही बाबा निपटून काढत.

रोग्यांना : औषध

या सूत्राच्या परिपूर्तीसाठी बाबांनी मुंबई-पुण्यासारख्या शहरात दवाखान्याजवळ धर्मशाळा बांधल्या. गरीब स्त्रियांसाठी प्रसूतिगृहे, दवाखाने बांधले. ते आरोग्यविषयक जाणिवेतूनच !

कॉलरा कुणाच्या अवकृपेने होतो. यावर बाबांचा मुळीच विश्वास नव्हता. तो केवळ अस्वच्छतेने होतो. हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळेच यात्रेच्या ठिकाणी ते सावध असत व लोकांनाही सावध करत.

बाबांच्या विचाराaचा मोठा प्रभाव हा धोरणकर्त्यावरही पडलेला आपल्याला आज दिसून येतो आहे. गाडगेबाबांच्या संवाभावीवृत्तीतून पेरलेल्या संस्कारामुळे व शासनाच्या प्रोत्साहानामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याला खेड्यातीलच नव्हे तर शहरी लोकांकडूनही उत्स्‍फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. ६०-७० वर्षापूर्वी पेरलेल्या या संस्कारांना आज अभियानाच्या रूपाने देखणेपण मिळाले आहे. ‘स्व्च्छता’ या शाश्वत संस्काराचा वसा जपणाऱ्या कर्मयोगी गाडगेबाबांचे नाव या अभियानास शासनाने देऊन एका परिने त्यांचा गौरवच केला आहे.

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तिंच्या अपंगत्वाकडे न बघता त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून, त्यांचा सुप्त गुणांना विकसित करून, त्यांना जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी द्यावी व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शिवाय सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती सूट व प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्वांचा उद्देश अपंग व्यक्तिंना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हाच आहे. त्यापुढे जाऊन शासनाने तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातील ५ टक्के रक्कम ही दिव्यांगांच्या साहाय्यसाठी राखीव ठेवण्याची सक्ती केली आहे. यातून फार मोठा आर्थिक आधार त्यांना मिळतो आहे. गाडगेबाबांच्या विचाराचे हे एक मोठे यश आहे, असे म्हणता येईल.

पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय

पशु-पक्षी, मुके प्राणी हे सुध्दा सृष्टीचे अविभाज्य घटक असून माणसांप्रमाणेच त्यांना सुध्दा जगण्याचा समान अधिकार आहे. ही गोष्ट ७०-७५ वर्षांपूर्वी बाबा मांडत होते. त्याकरीता अंधश्रध्देवर आधारलेल्या पशुबळी, नवस-सायास यांचा बाबांनी कडाडून विरोध केला. लक्षावधी लोकांना त्यापासून परावृत्त केले. आतातर केंद्र शासनाने व राज्य शासनाने पशुहत्या बंदीसारखे अनेक कायदे केले असून मुक्या जनावरांना वेदना देणाऱ्या कृती बंद केल्या आहेत.

अशिक्षित असणाऱ्या गाडगेबाबांना आज प्रगत राष्ट्र मांडत असलेल्या जैवविविधतेच्या साखळीची महती उपजतच ठाऊक होती. ही बाब त्यांच्या असामान्यत्वाची प्रचिती देणारी आहे.

गरीब तरूण-तरूणींचे : लग्न

समाजातील हजारो गरीब तरूण-तरूणींचे लग्न होऊन, त्यांनी सुखाचा संसार करावा असे गाडगेबाबांना वाटत असे. एकीकडे समाजात श्रीमंत व आर्थिकदृष्ट्या सबल लोकांच्या कुटुंबातील लग्ने उत्साहाने व थाटामाटात पार पडत. त्यांचे अनुकरणातून गरीब लोक अनेकदा कर्ज काढून लग्न-समारंभ साजरे करत. कित्येक गरीब तरूण-तरूणींच्या पाल्यांजवळ पैसाच नसे. त्यामुळे ते विवाहार्दीपासून वंचित राहत. कर्जबाजारी होऊन लग्न करू नका, ही बाब आपल्या कीर्तनातून बाबा सतत मांडत असत.

आज शासनाने गरीब व गरजू कुटुंबातील तरूण मुला-मुलींची लग्न करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. ज्यामधून लक्षावधी विवाहसोहळे सामूहिकपणे संपन्न होत आहेत. या कार्यक्रमांमधून संपन्न होणाऱ्या सोहळयांमध्ये जाति-पातीची कुठलीही बंधने नसून, एकाच मांडवाखाली विविध जातीच्या जोडप्यांचे विवाहसोहळे हे समाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘जाति-पाती विरहीत समाज’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप मिळाले असून, ते बाबांना अपेक्षित असलेल्या समाज निर्मीतीच्या दिशेने पुढे नेणारे आहे.

बेकारांना : रोजगार

प्रत्येकाने शिक्षण घ्यावे, शारीरिक श्रम करावे, रोजगार मिळवावा, असे बाबांना वाटे. कुठलेही श्रम कमी प्रतीचे नसतात, प्रामाणिकपणे शिस्तबध्द पध्दतीने नियोजित कामे करून त्या कामांना प्रतिष्ठा मिळवून देता येते, असे त्यांचे परखड मत होते. बाबांच्या विचारांना पुढे नेणारे आणखी एक महत्वाचे पाऊल शासनाने उचललेले आपल्याला दिसते.

गरीब व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू केल्या. १) ग्रामिण भागात अकुशल व्यक्तींकरीता रोजगार हमी योजना, २) वैयक्तिक लाभाच्या योजना.

शासनाच्या या योजनांमधून बेकारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयास केले जात असतानाच, मानवी संसाधनाच्या निर्मीतीसाठी व आजच्या स्पर्धेमध्ये आवश्यक असणारे कौशल्य विकसित करणारे विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत.

रोजगार आणि स्वयंरोजगार यांच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा देणारी व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर तरूणांची पिढी निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यातून बेरोजगारी व आर्थिक कुचंबना निश्चितपणे संपुष्टात येईल. गाडगेबाबांच्या ‘बेकारांना : रोजगार’ आणि ‘दु:खी व निराशांना : हिंमत’ या दोन्ही सुत्रांच्या पूर्ततेसाठी या योजना व धोरणे निश्चितच उपयुक्त ठरणारे असून मानसिक व शारीरिकदृष्ट्या अत्यंत सुदृढ असा समाज आपण याद्वारे निर्माण करू शकणार आहोत.

बाबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाच्या प्रत्येक समस्येवर विविध योजना शासनाकडून राबविल्या जात असल्या व समाज उन्न्तीची सर्व जबाबदारी शासनाची असली तरी, प्रत्येक नागरिकाने ती नैतिक कर्तव्य म्हणूनही निभावने जरूरी आहे. आपण या दृष्टीने येणाऱ्या काळात कार्य करत राहू हीच खऱ्या अर्थाने बाबांना आदरांजली ठरेल !

प्रा. डॉ. मोना चिमोटे

 विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

 (संकलन-विभागीय माहिती कार्या. अमरावती)

ताज्या बातम्या

क्रीडापटूंसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्या – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: मौजे धाटव येथे तालुका क्रीडा संकुलाच्या डागडुजीचे तसेच क्रीडापटूंना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जे क्रीडा प्रकार मोठ्या प्रमाणात खेळले जातात, त्या...

माणगांव शहरातील नागरी समस्यांचे मान्सूनपूर्व निराकरण करा – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई, दि. १५: माणगांव शहरातील बारमाही वाहणारी काळनदी ही माणगांव शहराची जीवनवाहिनी आहे. या काळनदीचे पुनर्जीवन, जीर्णोद्धार आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी पर्यावरण...

केळीच्या कल्स्टर डेव्हलपमेंटसाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी डिजिटल शेती शाळा असे नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवा. केळी संशोधनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. जळगाव जिल्ह्यात केळी पिकाच्या...

फणस लागवड क्षेत्र वाढीसाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करा – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १५ : फणस उत्पादन लागवडीखालील क्षेत्र वाढावे, यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार करावा. फणसाच्या विविध जातीची दर्जेदार कलमे तयार...

आदिवासी विभागाच्या योजनांमध्ये महिलांना प्राधान्य द्या – मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. १५ : आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महिलांना आणि शालेय विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे निर्देश...