शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1711

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 21 : युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. हीच युवा पिढी आज व्यसनाधीन होत असतांना दिसत आहे. युवापिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढून नशामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्गदर्शनात राधिका क्रीएशन नागपूर प्रस्तुत ‘‘मोहजाल’’ या  नाटिकेचा 25 वा प्रयोग आज 21 डिसेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, डॉ. मंगेश वानखेडे, भरत केंद्रे, नागपूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशात आज युवावर्गामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. अंमली पदार्थ सेवनाच्या अतिआहारी जाऊन काही जणांनी आत्महत्या केल्याचे बघितले आहे. आपल्या देशातील युवा पिढी अंमली पदार्थाच्या सेवनातून मुक्त झाली पाहिजे. युवा पिढी व्यसनापासून दूर राहावी. यासाठी अशाप्रकारच्या प्रबोधनात्मक जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी केले.

भारतीय संस्कृती ही माणसाला माणूस बनविणारी आहे. जे व्यसनाच्या आहारी गेले त्यांनाही प्रेम आणि आपुलकीने व्यसनमुक्त करण्याचे काम युवा पिढींने करावे, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

‘‘मोहजाल’’ नाटिका अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवक – युवतींवर आधारित आहे. 30 मिनिटाच्या या नाटिकेतून युवावर्ग अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात कसा गुरफटला जात आहे. याचे जिवंत चित्रणच मांडण्यात आले आहे. युवावर्ग अंमली पदार्थाच्या आहारी जात असताना पालक आणि समाजाच्या संदिग्ध भूमिकेवरही नाटिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या पाल्यांशी कशाप्रकारचा व्यवहार केला पाहिजे, याचे प्रबोधन करण्यात आले आहे.

नाटिकेचे लेखक प्रसन्ना शेंबेकर, दिग्दर्शक संजय पेंडसे आणि निर्मिती प्रमुख सारिका पेंडसे व डॉ.रवी गिऱ्हे यांची आहे. या नाटिकेमध्ये 25 युवक-युवतींचा सहभाग असून हे सर्व जण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातंर्गत येणाऱ्या नागपूर येथील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पेंडसे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपालांनी नाटिकेत सहभागी सर्व कलावंतांचे, दिग्दर्शक, लेखक व निर्मिती प्रमुख यांचे कौतुक केले.

000000

विवक्षित सेवा

आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’-उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २१: विदर्भाला भरभरून नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. उद्योगासाठी येथे पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत राज्यशासन उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  आज विदर्भ विकास परिषदेत दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘विदर्भ विकास परिषदे’चे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. माजी खासदार अजय संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष निकेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.सावंत  म्हणाले की, राज्य शासनाने उद्योग विभागाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड महामारीच्या काळात राज्यातील उद्योजकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आतापर्यंत दोन टप्प्यात २४ कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान राशी प्रदान केली आहे.  येत्या मार्च महिन्यापर्यंत उर्वरीत प्रोत्साहन राशी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन आग्रही असून त्यासाठी मंत्रिमंडळ उद्योग उपसमितीची  महिन्याला दोन वेळा बैठक घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर आणि  गडचिरोली जिल्ह्यांतील उद्योगांसाठी ४१ हजार कोटींचा निधी

राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास भौगोलिक विभागनिहाय समतोल साधून होणे आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यात ७१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजुर झाले असून त्यापैकी ४१ हजार २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये येत आहेत. यामुळे ३२ हजार जणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. विदर्भातील आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होईल, असा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला.

तरुण उद्योजकांना प्रोत्साहन

तरूण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी  राज्य शासनाने ५०० कोटींहून अधिक निधींची तरतूद केली आहे. ही रक्कम संपूर्ण खर्च करण्यास उद्योग विभागाचे प्राधान्य असेल. याकरिता शासनासह अन्य घटकांचीही महत्त्वाची भूमिका आहे. बँकांनी तरुण उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यास बॅंकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आता बँकांद्वारे उद्योजकांना कर्ज नाकारण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी ४०० कोटींची तरतूद- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात कौशल्य विकास, पर्यटन, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले.  श्री लोढा म्हणाले की, राज्यात पर्यटन क्षेत्रामध्ये विविध संधी आहेत. पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात  रोजगार संधी उपलब्ध होतील. राज्यात कौशल्य आणि नाविन्यता  केंद्रांना चालना देऊन औद्योगिक विकास  संस्थांना सक्षम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिषदेत दिवसभरात एकूण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. विदर्भातील उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन या विषयांवर वरिष्ठ शासकीय अधिकारी, तज्ज्ञ, वित्तीय संस्थांचे प्रमुख यांनी  मार्गदर्शन केले.

000

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरूवार, दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR

अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी दत्तक धोरण नेमके काय आहे, याची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके व तीन ते सहा वर्षातील सुदृढ बालके, निरोगी माता यांना लाभ कसा होणार आहे, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी  ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि.२१ :  पशुसंवर्धन विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण  वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी दि. ११ जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. याचा लाभ घेण्याकरीता पशुपालक, शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी जास्तीत जास्त अर्ज दाखल करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.

विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थीची निवड करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी ही संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.

यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्ष म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळू शकल्यामूळे लाभार्थी हिस्सा भरणे किवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप अशा विविध योजनांसाठी लाभार्थींची निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सन २०२२-२३ वर्षाकरीता राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ: https.//ah.mahabms.com अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव : AH.MAHABMS (Google play स्टोरवरील मोबाईल अॅपवर उपलब्ध ) अर्ज करण्याचा कालावधी : १३ डिसेंबर २०२२ ते ११ जानेवारी २०२३, टोल फ्री क्रमांक : १९६२  किंवा 1800-233-0418 या क्रमांकावर संपर्क साधावा.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जातील, या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांश माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

००००

हिवाळी अधिवेशनासाठी ‘महा असेंब्ली’ ॲप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ॲपचा प्रारंभ

नागपूर, दि. २१ : अधिवेशन काळात मंत्री व आमदारांना एका क्लिकवर अधिवेशनासंबंधी सर्व माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘महा असेंब्ली’ या मोबाईल ॲपचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे हा कार्यक्रम झाला.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. अॅपच्या निर्मितीसाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे विशेष सहाय्य करण्यात आले आहे. या अॅपचे आज लोकार्पण करण्यात  आले. सध्या प्रायोगिक तत्वावर गुगल प्ले स्टोअरवर अॅप उपलब्ध असून मंत्री, आमदार आणि सचिवांसाठी ते उपलब्ध होऊ शकेल. येणाऱ्या काळात या ॲपमध्ये अधिक सुधारणा आणि माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे.

याप्रसंगी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, ॲपची निर्मिती करणाऱ्या सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘महा असेंब्ली’ अॅपद्वारे अधिवेशन दैनंदिनी, अधिवेशन काळात आयोजित विविध बैठकांचा तपशील, महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक असणारी निर्देशिका, निवास व्यवस्थेबद्दल परिपूर्ण माहिती एका क्लिकवर अधिवेशन काळात उपलब्ध होऊ शकणार आहे. या अधिवेशन काळात प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून पुढील काळात नवनवीन सुविधायुक्त असे ॲप उपलब्ध होणार आहे.

अॅपचे सादरीकरण राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत करण्यात आले असून त्यांनी या संकल्पनेचे व अॅपचे कौतुक केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अॅपचा आढावा घेऊन हे अॅप महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना व्यक्त केली.

अॅपची निर्मिती नांदेड जिल्ह्यातील किनवट या आदिवासीबहुल तालुक्यात कार्यरत सेटट्राईब या आयटी कंपनीच्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी केली आहे. सेटट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर यांना स्टार्टअप यात्रा या उपक्रमात ई-प्रशासन प्रकारामध्ये राज्यस्तरीय विजेता म्हणून नुकताच पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे ग्लोबल क्वालिटी स्किल या अॅपच्या निमित्ताने जगासमोर आले आहे.

अथक परिश्रम घेऊन सेटट्राईबच्या विद्यार्थ्यांनी केवळ चार दिवसात परिपूर्ण असे अॅप तयार करून ते कार्यान्वित केले असून त्यांना महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे विशेष मार्गदर्शन लाभले असल्याचे श्री.वाकोडीकर म्हणाले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा

नागपूर, दि. २१: पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.

यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार श्री. भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय उपस्थित होते तर पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी आमदार श्री. भुजबळ यांनी प्रास्ताविक करताना या राष्ट्रीय स्मारकामध्ये मुलींची शाळा सुरू करणे तसेच त्यामध्ये कोणकोणत्या बाबी असाव्यात याबाबत सूचना केल्या.

सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याला सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी भिडे वाड्यातील रहिवाशांची बैठक घ्यावी. आठवडाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्मारकाच्या कामाला कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा प्रश्नोत्तरे

कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कृती दल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २१ : चीनसह अन्य काही देशांत कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात कृती दल गठित करून केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फर्मेशनचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या परिस्थितीवर राज्य शासन लक्ष ठेवून आहे. कृती दल गठित करून आणि केंद्र सरकारबरोबर समन्वय ठेवत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येईल.

०००००

शालेय पोषण आहारापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २१ : राज्यातील विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची 31 डिसेंबर 2022 पर्यंत आधार नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ही नोंदणी पूर्ण होईपर्यंत शालेय पोषण आहार व इतर कोणत्याही योजनेच्या लाभापासून विद्यार्थांना वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात  दिली.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह  सदस्य सर्वश्री संजय बनसोडे, अशिष शेलार , जयंत पाटील, अभिमन्यू पवार यांनी प्रश्न  उपस्थित केला होता.

शालेय पोषण आहार वाटपासंदर्भात उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, आधार कार्ड नोंदणी पूर्ण होईपर्यंत  राज्य शासनाच्या ‘सरल’ या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धान्य दिले जात आहे. एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल तर त्याच्या घरी धान्य पोचविण्यात येते. ज्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्या घरी जाऊन आधार नोंदणी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली.

0000

जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २१ : “जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्यावर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा  पडणार असल्याने जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

विनाअनुदान तथा अंशत: अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुदानासंदर्भात सदस्य संजय शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर झालेल्या चर्चेत विरोधीपक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील डॉ. राजेंद्र शिंगणे, राम शिंदे, आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्रप्त खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच यापूर्वी 20 टक्के वेतन अनुदान सुरु असलेल्या शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय झाला तेव्हा 350 शाळा होत्या, जेव्हा अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा 3 हजार 900 एवढी शाळांची संख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे शासनावरील आर्थिक बोजा वाढला आहे.

उपरोक्त प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, “नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान मंजूर करुण्यात आले असून, त्याकरिता अपेक्षित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच यापुढे केवळ स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सुरु करता येतील. अनुदानित शाळांना परवानगी मिळणार नाही. उच्च शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे प्राथमिक शिक्षण इंग्रजीतून घेण्याचा पालकांचा कल आहे. असे दिसून आले. मात्र यापुढे उच्च शिक्षणदेखील मराठी माध्यमातून देण्यात येईल, यासाठी मराठीतून पुस्तकेही मराठी भाषांतरित करण्यात येत आहेत. इंग्रजी भाषेचा पगडा दूर करुन मराठी भाषेतून शिक्षण देण्यात येईल असेही श्री. केसरकर म्हणाले.

000

गोपाळ साळुंखे/ससं/

संसदीय अभ्यासवर्गात संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा सदस्य कु. प्रणिती शिंदे यांचे उद्या मार्गदर्शन

नागपूर, दि. 21 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात गुरुवार, दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘लोकप्रतिनिधींची स्वत:च्या मतदारसंघाविषयी कर्तव्ये आणि विकासकामांचे नियोजन’ या विषयावर संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान’ या विषयावर विधानसभा सदस्य कु. प्रणिती शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशा प्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनाद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/21.12.22

गावातील रस्ते शहरास जोडल्यास गावांमध्ये समृद्धी –  मंत्री रविंद्र चव्हाण

चंद्रपूर, दि. २१: गावातील रस्ता हा शहरापर्यंत तर शहर हे गावातील रस्त्याला सहजपणे जोडले गेल्यानंतर खऱ्या अर्थाने गावांमध्ये समृद्धी येते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. नागभीड येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव श्री. साळुंखे, नागपूर प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते, अधीक्षक अभियंता श्री. गाडेगोणे, नागभीडच्या कार्यकारी अभियंता जया ठाकरे, श्री. टांगले, सुनील कुंभे आदी उपस्थित होते.

या क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने विकास कामे होत आहेत. असे सांगून मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, मागील अडीच वर्षात अनेक विकास कामांना ग्रहण लागले. या क्षेत्रातील १४ कि.मी. लांबीचा अपूर्ण रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असून या भागातील १०० कि.मी.चे सर्व रस्ते दर्जा उन्नती करावयाचे आहेत. दर्जा उन्नतीसाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून देण्यात येईल. हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत विकास कामांना गती देण्याचे काम केले जात आहे. हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत सुमारे १० हजार कि.मी.च्या कामांना मंजुरी दिली. त्यापैकी काही कामांचे लोकार्पण आज येथे पार पडत आहे.

मंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कष्टकरी समाज, महिला व विद्यार्थी या सर्वांना विकासाच्या खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहे. किसान सन्मान योजनेचे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला ६ हजार रुपये त्यांच्या खात्यात थेट जमा केले जात आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात धान पिकते, धानाला चांगला भाव मिळवून देण्याचे काम तसेच गेल्या ६ महिन्यात सिंचनाच्या विविध भागातील १८ योजनांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम या सरकारने केले आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचं काम होत आहे. आज या क्षेत्रातील ३०० कोटींहून अधिक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडत आहे.

आमदार श्री. भांगडीया म्हणाले की, राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी घेताच मंत्री श्री. चव्हाण यांनी मागील पावसाळी अधिवेशनात ५०० कोटी रुपये या मतदारसंघाच्या विकासकामांसाठी मिळवून दिले, हे सर्वात मोठे योगदान आहे. तर नागभीड बसस्थानकासाठी  ६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. लवकरच या बसस्थानकाचे भूमिपूजन देखील करण्यात येईल. मंत्री श्री. चव्हाण यांनी चालू हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत ५० कोटी रुपये निधी या क्षेत्राच्या विकासकामांसाठी मंजूर करून दिला आहे. मागील अडीच वर्षातील विकास कामांचा अनुशेष या माध्यमातून भरून काढण्यात येत आहे. चिमूर विधानसभा क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागे राहणार नाही, अशी ग्वाही आमदार श्री. भांगडीया यांनी दिली.

चिमूर,नागभीड या मतदारसंघात ३०० कोटी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन पार पडत आहे. रस्ते, पूल व इमारती सार्वजनिक बांधकाम विभागाची महत्त्वाची कामे आहेत. महाराष्ट्रात हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत रस्त्यांची विविध कामे सुरू आहेत, तर १४९ रेल्वे उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचा सचिव म्हणून सर्व कामे उच्चप्रतीची गुणवत्तापूर्ण व कमी कालावधीत पूर्णत्वास येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) श्री. साळुंखे यांनी यावेळी दिली.

तत्पूर्वी, मंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते नागभीड तालुक्यातील ७५० मी. लांब ५ मी. उंच तर ३५० मी. लांब व ५ मी. उंचीच्या दोन कॅटल अंडरपासचे भूमिपूजन पार पडले. त्यासोबतच क्षेत्रातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आभासी पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे संचालन शाखा अभियंता लोचन वानखेडे तर आभार राजू देवतळे यांनी मानले.

000

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील कारागृह ग्रंथालयांसाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्याकडून बुककेस आणि बुकरॅक देण्याचा...

0
मुंबई, दि.९ : कारागृहातील बांधवांचे सामाजिक, शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांच्यात सुधारणा व पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी योजनेंतर्गत ग्रंथालय संचालनालयाच्या राज्यातील...

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील नवी न्यायालयीन वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब...

0
ठाणे,दि. ०९ (जिमाका) : अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती...

बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
मुंबई दि. ९ - महिला सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा कणा असतो. ज्यावेळी समाजातील महिला मुख्य प्रवाहात येतील तेव्हाच त्या राष्ट्रांच्या विकासाला गती येते....

प्रशासकीय अधिकारी आणि पत्नींच्या संस्थेमार्फत शिलाई मशीन्सचे वितरण

0
मुंबई, दि. ९ - प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या पत्नींची संघटना आयएएसओडब्ल्यूए (IASOWA) ही अखिल भारतीय स्तरावर कार्यरत असलेली ना नफा तत्वावर सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध असलेली संस्था...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी

0
नवी दिल्ली, ९ - शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची...