बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 169

‘दिलखुलास’ कार्यक्रमात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण बिरदेव डोणे यांची मुलाखत

मुंबई, दि. ७: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ५५१ वी रँक पटकावत उत्तीर्ण झालेले बिरदेव डोणे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार ८, मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा- 2024 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत राज्यातून 90 हून अधिक उमदेवार उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव सिद्धप्पा डोणे हे उत्तीर्ण झाले आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, विषयांची निवड व मुलाखतीची तयारी कशी करावी, तसेच या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी कशा प्रकारे अभ्यास व तयारी केली याविषयी ‘दिलखुलास’ कायर्क्रमातून श्री. डोणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

000

जयश्री कोल्हे/स.सं

सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली संतुलित आहार – आहारतज्ञ ऋजुता दिवेकर

मुंबई, दि. ७ : आपण रोज जेवतो तोच खरा आहार (डाएट) असतो. त्यामुळे त्यात पोषणमूल्यांची योग्य सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी बनवलेले पारंपरिक पदार्थ हेच शरीरासाठी सर्वोत्तम असतात कारण ते नैसर्गिक, पचायला हलके आणि संतुलित असतात. सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली ही अशाच संतुलित आहारात दडलेली आहे, असे आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सांगितले.

टेक-वारी कार्यक्रमात मंत्रालयात ‘आरोग्यदायी जीवनशैली’ या विषयावर ऋजुता दिवेकर यांचे व्याख्यान झाले.

आहारतज्ञ ऋजुता दिवेकर म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतात. मात्र, संतुलित आणि नैसर्गिक आहाराच्या मदतीने आरोग्य सुदृढ ठेवता येते. पौष्टिकतेचा विचार करता आहारात फळे, भाज्या, घरी बनवलेले अन्न, योग्य प्रमाणातील कार्बोहायड्रेट्स, प्रथिने यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला. वेळेवर आणि योग्य प्रमाणात खाणे हेच दीर्घकालीन आरोग्याचे गमक आहे.

आठवड्यातून किमान तीन दिवस तरी नियमित व्यायाम करा, चालण्याची सवय लावा आणि शक्य असल्यास लिफ्टऐवजी जिने चढा. यामुळे शरीर सक्रिय राहते आणि आरोग्य सुधारते.

प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असेल, तर मोबाईल आणि टीव्ही यासारख्या स्क्रीनवर खर्च होणारा वेळ कमी करणे आवश्यक आहे. लोकल, सिझनल आणि पारंपरिक (ट्रेडिशनल) पदार्थ खाण्यावर भर द्यावा. पॅकेटबंद आणि प्रक्रिया केलेल्या (प्रोसेस्ड) अन्नापासून शक्यतो दूर राहणे आरोग्यास हितावह आहे, असे सांगत दिवेकर यांनी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींच्या आहार आणि आरोग्याच्या गरजांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी नागरिकांनी सजग राहावे – प्रसाद देवरे

Oplus_131072

मुंबई, दि. ७ : डिजिटल युग अधिक प्रगत होत आहे, तसतसे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप बदलत आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांनी अधिक सजग राहावे, असे आवाहन नॅस्कॉमचे अधिकारी प्रसाद देवरे यांनी सांगितले.

‘टेक-वारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘सायबर सुरक्षा’ विषयावर प्रसाद देवरे यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते.

श्री.देवरे म्हणाले, डीप फेक व्हिडीओ, डेटा चोरी रोखण्यासाठी सतर्कता बाळगा. सर्व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत पासवर्ड ठेवा तसेच दुहेरी प्रमाणीकरण प्रणाली वापरा. अनोळखी व्यक्तींचे ई-मेल, मेसेजमधील लिंक्स उघडू नका. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि ‘आयओटी’ डिव्हायसेसचे सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करा. सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्या. बँकिंग किंवा खरेदीसाठी फक्त बँक किंवा अधिकृत प्रदात्यांचे ॲप्स वापरा.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामान्य जनतेला आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे कोणताही संशयास्पद मजकूर किंवा संदेश फॉरवर्ड करताना प्रत्येकाने अत्यंत सतर्क राहावे. सायबर सुरक्षेसाठी काळजी घेणे ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

00000

शैलजा पाटील/वि.संअ

 

राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठ, लॉईड स्टील व कर्टीन विद्यापीठ करार यांचेमध्ये सामंजस्य करार

गडचिरोली लवकरच सर्वाधिक समृद्ध जिल्हा होईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.7 : युवकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान केल्याशिवाय विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही असे सांगून गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने तेथील लॉइड स्टील कंपनी व पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या कर्टीन विद्यापीठासोबत केलेल्या करारामुळे विद्यापीठामधील शिक्षणाचा दर्जा उंचावून आगामी काळात गडचिरोली जिल्हा सर्वाधिक समृद्ध जिल्हा म्हणून उदयास येईल व जिल्ह्याचा चेहरामोहरा पालटेल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंडवाना विद्यापीठाचे लॉइड्स मेटल्स व एनर्जी तसेच  पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांच्यात राजभवन, मुंबई येथे सांमजस्य करार झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामुळे गडचिरोली तसेच इतर नक्षल प्रभावित भागातील नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आला. त्याच्या फलस्वरूप गडचिरोली येथे विकासाची पहाट होत आहे असे सांगून कोणताही विकास सर्वसमावेशक असल्याशिवाय अपूर्ण असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी यापुढे देखील कठोर पावले उचलतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

काही महिन्यांपूर्वी आपण माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेसह गडचिरोलीचा दौरा केला होता असे सांगून गोंडवाना विद्यापीठाने स्थानिक गरज विचारात घेऊन अभ्यासक्रम आखावे तसेच विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळतील हे पाहावे असे राज्यपालांनी सांगितले.

गडचिरोली येथे विपुल खनिज संपदा असून तेथे उत्तम प्रतीचे लोहखनिज आहे.  त्याठिकाणी आज धातू व खनिजाच्या शोधन व विनियोगासाठी तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे असे सांगून कर्टीन विद्यापीठाशी सहकार्यामुळे खनिज क्षेत्रातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

गोंडवाना विद्यापीठाने लॉईड्स स्टील व एनर्जीच्या सहकार्याने विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था स्थापन केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

गडचिरोली देशातील ‘स्टील हब’ होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खनिज व धातू क्षेत्रातील उद्योग स्थापन झाल्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये गडचिरोली जिल्हा देशातील स्टील निर्मितीचे मोठे केंद्र होईल व जिल्ह्याचे मागासलेपण इतिहासजमा होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.  खनिज व धातुशास्त्र या विषयांकरिता जगात दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य करार केल्यामुळे आजचा दिवस गोंडवाना विद्यापीठाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ऑस्ट्रेलियासोबत सामंजस्य करार करण्याची एकाच आठवड्यात ही दुसरी वेळ आहे असे सांगून मुंबईत झालेल्या ‘वेव्ह्ज’ शिखर परिषदेच्या वेळी पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठासोबत नवी मुंबई येथे कॅम्पस  स्थापन करण्याबाबत करार झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोली येथील विद्यापीठाचा लॉइड्स स्टील तसेच कर्टीन विद्यापीठासोबत तंत्रज्ञान शिक्षण संस्था स्थापन करण्याबाबत करार झाल्यामुळे राज्यातील उद्योगाला उत्तम दर्जाचे मनुष्यबळ मिळण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे ज्ञानाची कवाडे उघडली असून देशाबाहेरील विद्यापीठांना राज्यात कॅम्पस स्थापित करण्याचे दृष्टीने नवी मुंबई येथे ‘एज्युसीटी’ निर्माण करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  जगातील १२ नामवंत विद्यापीठांनी आपापले कॅम्पस एज्युसीटी नवी मुंबई ठिकाणी उघडण्यास मान्यता दिली असून यॉर्क, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व इलिनॉईस विद्यापीठांनी अगोदरच तेथे कॅम्पस सुरु केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नवी मुंबई एज्युसीटी येथे सर्व प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे कॅम्पस  स्थापन झाल्यावर त्याठिकाणी ८०,००० ते एक लाख विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेता येईल असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

लॉइड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांचे कौतुक करून त्यांनी धैर्य दाखविल्यामुळे गडचिरोली येथे एकात्मिक स्टील उद्योग सुरु करणे शक्य झाले असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

स्थापनेपासून अवघ्या १२ – १३ वर्षात गोंडवाना विद्यापीठाने चांगली प्रगती केली असे सांगून विद्यापीठाने तंत्रज्ञान संस्था सुरु केल्यामुळे  तसेच कर्टीन विद्यापीठाशी सहकार्य केल्यामुळे संस्थेतून देशात खनिज उद्योग तसेच धातुशास्त्र या विषयातील उत्तम तज्ज्ञ तयार होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील वाणिज्यदूत पॉल मर्फी, लॉईड्स स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक बी प्रभाकरन व गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले.

गडचिरोली येथे युवकांना धातुशास्त्र, खाणकाम व कॉम्प्युटर सायन्स व अन्य विषयातील अभियांत्रिकी प्रशिक्षण देण्यासाठी स्वायत्त ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ व लॉइड्स मेटल्स यांचेमध्ये करार करण्यात आला. तर गोंडवाना विद्यापीठ व पश्चिम ऑस्ट्रेलियातील कर्टीन विद्यापीठ यांचेमध्ये उभयपक्षी पदवी (ट्विनिंग डिग्री) प्रदान करण्याबाबत करार करण्यात आला.

कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार डॉ.परिणय फुके, कर्टीन विद्यापीठाचे प्रकुलगुरु मार्क ऑग्डन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी,  तसेच विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.

000000

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

सोलापूर, दि. ०७: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कांदलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी 14 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिराच्या भक्तनिवासाचे भुमिपूजन करून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटीचा निधी मंजूर करण्याचा संकल्प पालकमंत्री गोरे यांनी केला.

कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख आणि संबंधित विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

उपसा सिंचन योजनेचे आश्वासन

पालकमंत्री गोरे यांनी लवकरच उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे आश्वासन दिले. कांदलगावमधील नरसिंह मंदिरालाही तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांसाठी सुविधा

पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, विठुरायाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. वारकऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

यामुळे बार्शी तालुक्यातील विकासकामांमध्ये गती येईल आणि स्थानिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.

०००

‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि. ०७: भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे अभिनंदन केले आहे. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीने त्यांच्यामागे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारवाईचे समर्थन, कौतुक केले आहे.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने पुन्हा सिद्ध केले आहे. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्याने संपूर्ण देश संतप्त होता. या हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने आज भल्या पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून नियोजनबद्ध, अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीने कारवाई होत राहील, हा संदेश देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेनेच्या नेतृत्वाचे आणि सैनिकांचे अभिनंदन केले आहे.

देशाच्या सीमेपलिकडे जावून लष्करी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहसी, कणखर नेतृत्वाने ती नेहमीच इच्छाशक्ती दाखवली आहे. भारतीय सैन्यदलांना संपूर्ण स्वातंत्र्य, मोकळीक, ताकद देत त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती, देशवासियांच्या एकजुटीतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्याचे सांगत दहशतवाद संपेपर्यंत अशीच कारवाई होत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

०००

राज्यात १६ ठिकाणी ‘मॉक सिक्युरिटी ड्रिल’चे आयोजन

मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील २४४ जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत की दुरुस्तीची गरज आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले. या ड्रिलचा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे असणार आहे.

गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.

मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार

प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्‍चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर

केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून, सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या राज्यातील १६ ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट होणार आहे.

महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉकड्रिल

मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

0000

नीलेश तायडे/विसंअ/

शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी ‘ब्लॉकचेन प्रणाली’ प्रभावी – बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ लौकिक रगजी

मुंबई, दि. ६ : आपले दैनंदिन जीवन अधिक सुरक्षित व पारदर्शक करण्यासाठी ब्लॉकचेनचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो, ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे  बेकर ह्यूज कंपनीचे तज्ज्ञ  लौकिक रगजी यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”  मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ‘ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ या विषयावर श्री. रगजी यांनी मार्गदर्शन केले.

‘ब्लॉकचेन’ ही संज्ञा मुख्यतः क्रिप्टोकरन्सी (जसे बिटकॉइन) संदर्भात वापरली जाते. ही तंत्रज्ञान प्रणाली माहिती सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने साठवण्यासाठी वापरली जात असल्याचे सांगून श्री. रगजी यांनी ब्लॉकचेनच्या मूलभूत तीन-चार संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व सुरक्षा वाढवण्यासाठी ब्लॉकचेन उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

‘प्रूफ ऑफ वर्क’ ही संकल्पना तशी कमी परिचित असली, तरी ती ब्लॉकचेनमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जसे महसूल विभागामध्ये मालमत्ता नोंदवही असते, तसेच ब्लॉकचेनमध्ये व्यवहारांची माहिती साठवली जाते. ही माहिती जर चुकीने भरली गेली, तर ती ओळखणे शक्य होते, कारण प्रत्येक नोंदीची पडताळणी करण्याची यंत्रणा त्यामध्ये असते.

पारदर्शकतेसाठी व भ्रष्टाचारविरोधी उपाय म्हणून ब्लॉकचेन ही विकेंद्रित प्रणाली आहे, त्यामुळे केवळ एका व्यक्तीकडे नियंत्रण न राहता अनेक नोंदी सार्वजनिक स्वरूपात ठेवता येतात. यामुळे प्रणाली अधिक पारदर्शक बनते. प्रत्येक बदलासाठी ‘प्रूफ ऑफ वर्क’ हे क्लिष्ट गणिती प्रमाणीकरण आवश्यक असल्यामुळे, अनधिकृत बदल करणे जवळजवळ अशक्य होते,  असे त्यांनी सांगितले.

श्री. रगजी यांनी सांगितले की, ब्लॉकचेनमध्ये कोण छेडछाड करतो हे शोधणे कठीण असले, तरी याबाबतचे संकेत लगेच समजतात. त्यामुळे ही तंत्रज्ञान प्रणाली शासकीय कामकाजात विश्वासार्हता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा व्यवसायिक माहितीच्या सुरक्षिततेसाठी कसा वापर करता येतो, यावर त्यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.

यावेळी श्री. रगजी यांनी अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. स्वागत सामान्य प्रशासन विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी केले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार

संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी दिल्ली, दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर उभा करण्यात येत आहे. या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती समितीचे महासचिव कर्नल मोहन काक्तीकर (सेवानिवृत्त), मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गार्डियन मीडिया आणि इंटरटेनमेंटचे संचालक संजय दाबके उपस्थित होते. श्री. दाबके यांच्या माध्यमातून अत्याधुनिक अद्ययावत असे संग्रहालय मूर्त रूपात उभे राहत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे असा मानस समितीचा होता. त्याप्रमाणे 2020 पासून यावर काम सुरू आहे. देशभरातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून घ्यावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संग्रहालय उभारण्यात येत असल्याची माहिती श्री काक्तीकर यांनी यावेळी दिली.

हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात आलेले आहे. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यात हे संग्रहालय आहे.

या संग्रहालयातील वस्तू ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. संग्राहालय पाहताना त्या काळातील अनुभव घेता येईल. संग्रहालयातील काही भागांमध्ये थ्रीडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

यासह डार्क राईडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना पाहता येईल.  हे देशातील एक अभूतपूर्व असे संग्रहालय असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

अंजु निमसरकार, मा.अ /वि.वृ.क्र.102 /दि.06.05.2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन

अहिल्यानगर, दि. ६ : – चौंडी येथील मंत्रिपरिषद बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा जलसंधारण अधिकारी निर्मित आणि जिल्हा माहिती कार्यालयाने संपादित केलेल्या ‘पाणीदार अहिल्यानगर’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते.

मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’, जलयुक्त शिवार २.०, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना यांसारख्या इतर योजनांच्या अंमलबजावणीत जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. पुस्तिकेत जिल्ह्याच्या या यशाची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची उत्तम कामे करणाऱ्या गावातील यशोगाथांचा समावेशही या पुस्तिकेत करण्यात आला आहे. पुस्तिका जलसंधारण कामांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...