रविवार, ऑगस्ट 17, 2025
Home Blog Page 1646

विविध विकास कामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. : 13 (जिमाका वृत्तसेवा) : पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज नांदगाव तालुक्यातील करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजना, शिवसृष्टी यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेला 15 टक्के निधी राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वाने येथील स्थानिकांना दररोज पाणी मिळणार असून त्यांच्या आयुष्यात बदल घडविणारी ही योजना असल्याने यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच मनमाड म्हणजे राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने येथील रस्त्यांच्या विकासाकरिता निधी देण्यात येऊन बंद असलेल्या योजना सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषद इमारतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केले.

ते म्हणाले, नांदगाव तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मनमाड येथे एमआयडीसी सुरू करण्याकरिता येत्या नजीकच्या काळात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे फिरते दवाखाने, फिरते कार्यालय या संकल्पनाचे कौतुक करून यांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताचे काम येथे होत असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार : डॉ भारती पवार

आज करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनातून महिलांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेस तत्काळ मंजूरी दिली आहे यातून त्यांची  कामाबद्दलची तत्परता गावोगावी पोहोचत आहे. नांदगाव शहरात साकारत असलेली भव्य शिवसृष्टी केवळ नांदगावचा नाहीतर सर्व महाराष्ट्रातील जनतेचा ऐतिहासिक वारसा आहे. नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव व सटाणा तालुक्यांचा समावेश करण्याबाबत शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्यात येऊन त्याबाबत मंजूरीसाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, या पाणीपुरवठा योजनेमुळे महिलांच्या 50 टक्के समस्या कमी होणार आहेत. या योजनेसोबतच ग्रामीण पुरवठा विभागाच्यावतीने देखील 500 कोटी रुपयांच्या पाणी योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून मनमाडच्या  विकासात  भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनमाड शहर व मार्गस्थ -२ गावे पाणी पुरवठा (करंजवण धरण उद्भव) योजना, शिवसृष्टी व ललवाणी उपजिल्हा रुग्णालय, मनमाड या कामांच्या कोनशिलांचे अनावरण करण्यात आले. तसेच फिरते दवाखाने व फिरते कार्यालये असलेल्या वाहनांचे लोकार्पण करून दिव्यांग बांधवांसाठी सायकलींचे वाटप यावेळी मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

0000

मराठा समाजातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी संवाद मेळावा महत्त्वपूर्ण – मंत्री अतुल सावे

औरंगाबाद, दिनांक १३ (जिमाका) : मराठा समाजातील होतकरु तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तरुणांना उद्योजक होण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने चिखलठाणा येथे आयोजित केलेला लाभार्थी आणि बँक यांचा संवाद मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

या संवाद मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार हरिभाऊ बागडे,  महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे किशोर शितोळे, लोकविकास नागरी सहकारी बँकेचे  नामदेव पवार, इन्डसलँड बँकेचे व्यवस्थापक मनोज सदाफले, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील, रोजगार व स्वंय रोजगारचे सहायक आयुक्त सुरेश वऱ्हाडे, जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रंल बॅक, कॅनरा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, देना बँक यांच्यासह विविध बँकाचे स्टॉल धारक, विविध मराठा संघटनेचे प्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते.

मेळाव्यातून सर्व बँकेचे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी तयार करुन युवकांना उपलब्ध करुन द्यावी.  लाभार्थींनी वेळेत कागदपत्रे जमा करावी जेणेकरुन लवकर कर्ज उपल्ब्ध होईल. ही प्रक्रिया सुलभ केल्याने गरजूंना विविध विकास महामंडाळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी सूचना सहकार मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित बँक अधिकारी व प्रतिनिधीना केली. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाची १५ लाखावरुन २५लाखापर्यंत कर्जाची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, या संवाद मेळाव्यातून महामंडळ प्रत्यक्ष अर्जदार, लाभार्थी बँकाचे प्रतिनिधी आणि अधिकारी, यांच्या समन्वयातून एकत्र ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व यात येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करत जास्तीत जास्त तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सहकारी बँकप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणत करावा. यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. महामंडळाअंतर्गत महिलांना देखील कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यासाठी महिला समन्वयकाच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करुन उद्योजक तयार करण्यासाठी  अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. निर्यातक्षम उत्पादन वाढविण्याबरोबरच कर्जाची मर्यादेत वाढीसाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, उद्योजक होण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीसह निवड केलेल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती तरुणांनी करुन घ्यावी. बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करुन तरुणांनी व्यवसाय सुरु करावा. बँकाचा विश्वास संपादन करण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करावी.

किशोर शितोळे यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी तरुणांना उद्योजक घडविणे आवश्यक आहे. रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडाळाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जिल्ह्यात ४७५ लाभार्थींना ३५ कोटींचे कर्ज, देवगिरी नागरी सहाकारी बँकने उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचा व्याजाचा परतावा लाभार्थींनी पूर्णपणे केला आहे.     कार्यक्रमात लाभार्थी उद्योजक यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सचिन पेरे, सोमनाथ खांडेभराड, राहुल पोटफाडे, दिपाली पाटेकर, विशाल सोळंखे, रामेश्वर पाटोळे, दादासाहेब निकम यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला.

***

उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले

मुंबई, दि. 13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा.परमेश्वर उडमाले यांनी मांडले

पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023 मध्ये उष्णतेच्या लाटांबाबत पूर्वसूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे या चर्चासत्रात प्रा. परमेश्वर उडमाले बोलत होते. यावेळी ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील प्रतिनिधींनी आपले या विषयाच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

प्रा.परमेश्वर उडमाले म्हणाले की, विविधांगी स्वरूपात उष्ण लाटांचे प्रदेश आहेत, त्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. यामध्ये अशा प्रदेशांची माहिती जमा करणे आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक आणि भौतिक अशा स्वरूपाच्या सगळ्या जगण्यावरती याचा परिणाम होत असतो. संवेदनशील भागात नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

ओडिशा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी आपल्या राज्यात उष्णतेच्या लाटांसाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच कशाप्रकारे आगामी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. जनजागृतीसाठी माहिती–शिक्षण-संवाद यातून लोकांना उष्णतेच्या कालावधीत होणारी हानी कशाप्रकारे कमी करता येईल, याची माहिती यावेळी दिली.

हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत

जागतिक हवामान बदलामुळे वाढणाऱ्या उष्म लहरींचा परिणाम कृषी क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणून हवामान संकेतानुसार पिके घ्यावीत. पीक विमा घ्यावा, कमी पाण्यातील विविध पीक लागवड करावी, अशा उपाययोजना यावेळी सूचविण्यात आल्या.

अन्न सुरक्षा ही महत्त्वाची बाब असून, बदलत्या हवामानानुसार राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे पिकांची लागवड करताना पालन करावे असे सांगून डॉ. विनय सेहगल यांनी शेतीचे वाढत्या उष्म लहरींमुळे नुकसान होऊ नये यासाठी उपाययोजना सांगितल्या.

वाढत्या उष्णलहरींमुळे पाणी व ऊर्जाचे नियोजन कसे करावे याबाबत सीडीआरआय चे महासंचालक अमित प्रोथी यांनी माहिती दिली.

००००

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. 13 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत मेट्रो, ट्रान्सहार्बर लिंक, रस्ते या पायाभूत सुविधेवर विशेष भर देण्यात येत आहे. मार्च २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकीटचे करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी ६५०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. मुंबईतून कनेक्टिव्हीटी उत्तम असल्याने आंतरराष्ट्रीय नागरिक, उद्योजक मोठ्या संख्येने येत आहेत, यामुळे मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दादर येथे टीव्ही ९ च्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या विषयावरील राज्यस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार सदा सरवणकर, टीव्ही 9 चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बरूण दास, संपादक उमेश कुमावत उपस्थित उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, राज्य शासन सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. गेल्या सात महिन्यात जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. कोरोना काळात बंद पडलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू केले. या प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण केले. हा महामार्ग शिर्डीपर्यंत सुरू झाला असून येत्या वर्षाअखेर मुंबईपर्यतचा महामार्ग पूर्ण होईल. यामुळे नागपूर ते मुंबई अंतर 6 ते 7 तासांवर येणार आहे. शेवटचा टप्पा येत्या वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. या समृद्धी महामार्गावर 18 ठिकाणी नवीन नोड तयार करण्यात आले असून विविध ठिकाणी उद्योग, लॉजिस्टीक पार्क, फूड पार्क तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे मूल्यवर्धन होईल. पर्यटनाला चालना मिळणार असल्याने लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. महामार्गांवर 33 लाख वृक्ष लागवड करणार असून यामुळे पर्यावरण समतोल राखला जाईल. सुमारे २५० ते ५०० मेगावॅट सोलर वीज तयार करण्याचे उद्दिष्ट असून हा ग्रीन महामार्ग आहे. सर्व प्रकल्प पर्यावरणाचा समतोल राखून करण्यात येत आहेत.

ट्रान्स हार्बर लिंकमुळे केवळ १५ मिनिटांत रायगड

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मुंबईच्या सुशोभीकरणावर, कोळीवाड्यांचा विकास करण्यावर भर देण्यात येत असून शिवडी न्हावाशिवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून रायगडला केवळ 15 मिनिटांत पोहोचणार आहोत. याठिकाणी ग्रोथ सेंटर, लॉजिस्टिक पार्क, टाऊनशिप, टेक्नो हब, फार्मा हब बनविणार आहे. याठिकाणचे फ्लेमिंगो इथेच राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

पुणे-मुंबई आठ लेनचा जगातील सर्वात रूंद बोगदा करणार

मुंबईहून पुण्याला घाटातून जाताना वाहतूक समस्या दूर करण्यासाठी जगातील सर्वात रूंद आठ लेनचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होईल, प्रदूषण कमी होईल, इंधन आणि वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाला गडचिरोली, भंडारा, गोंदिया जोडणार

समृद्धी महामार्गाची व्याप्ती वाढविणार असून आता नागपूर-मुंबईसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नांदेड, जालना असा महामार्ग जोडणार आहे. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग हा मार्गही हाती घेण्यात येणार आहे. शिवाय नागपूर-गोवा शक्तीपीठ करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यामुळे शेतकऱ्यांचा माल त्वरित मोठ्या बाजारपेठामध्ये पोहोचणार असून माल खराब होण्याची शक्यता कमी होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वर्सोवा-विरार सी-लिंक

मुंबईतल्या व्यक्तीला विरारला पोहोचायला दोन तास लागतात. मात्र वर्सोवा-विरार सी-लिंक पॉईंटमुळे हे अंतर कमी होणार आहे. मुंबईतली व्यक्ती केवळ ४५ मिनिटात विरारला पोहोचणार आहे. हा विकास केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता पालघरसह ग्रामीण भागापर्यंत विकास पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवाय मेट्रो २ अ, ७ अ सुरू झाल्याने वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. मेट्रो ३ सुरू झाल्यास वेळ, इंधनाची बचत होईल. ३३७ किमी मेट्रोचे जाळे तयार झाल्याने ६० ते ७० लाख कारचा वापर कमी होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून १४७ प्रकारच्या तपासण्या

राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असून मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १०० ठिकाणी सुरू केला आहे. शिवाय २५० आणखी दवाखाने सुरु करणार असून ग्रामीण भागातही प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना सुरू केला आहे. यामाध्यमातून १४७ विविध प्रकारच्या तपासण्या मोफत होणार आहेत. ‘माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’ योजनेंतर्गत राज्यातील चार कोटी 39 लाख मातांची तपासणी करून रोगनिदान केले. दुसऱ्या टप्प्यात 0 ते 18 वयोगटातील 3 कोटी मुलांची तपासणी सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अपग्रेडेशन सुरू केले असून प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी उपचार देण्याचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

१८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता

कृषी, पाणी टंचाई यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या रोखणे, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणे यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. १८ ते २० सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यामुळे अडीच ते पाच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करून प्रभावीपणे राबवित आहोत. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळविण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. उद्योगस्नेही धोरण ठेवल्याने अनेक नवीन उद्योग राज्यात येत आहेत. महाराष्ट्रात कौशल्य असलेले मनुष्यबळ, कनेक्टिव्हीटी असल्याने मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. सर्व सवलती देण्यात येत असून एक खिडकी योजनेतून सर्व प्रकारच्या परवानग्या देत आहोत. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकरी, सहकार, चित्रपट उद्योग यासाठी सवलती देऊन राज्य शासन सहकार्य करीत आहे. मुंबईतील रखडलेले प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येत आहे. जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सडेतोड उत्तरे दिली.

000

धोंडिराम अर्जुन/ससं/

उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार करणार – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर

मुंबई, दि. 13 : उष्माघातामुळे होणारी जीवित हानी रोखण्यासाठी पूर्वनियोजन आणि राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कमल किशोर यांनी मांडले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी, मुंबई) पवई येथे ‘उष्णतेच्या लाटा राष्ट्रीय कार्यशाळा 2023’ आयोजित कार्यशाळेत कमल किशोर बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई, भारतीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज, देशातील विविध राज्यातील व  महाराष्ट्रातील विविध मान्यवर तज्ज्ञ कार्यशाळेत सहभागी आहेत.

श्री. कमल किशोर म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून जगभरात उष्णतेच्या लाटा वाढत आहेत, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर खूप मोठे परिणाम होत आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) भारतातील अति उष्णतेच्या लाटेशी संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी, समन्वय आणि मूल्यमापनासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. या क्षेत्रात काम करणारे अभ्यासक यांनी एकत्र येऊन उष्णतेच्या लाटांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी तत्काळ नियोजन, प्रभावी कृती आराखडा तयार करणे या अनुषंगाने कार्यशाळेत चर्चा व मार्गदर्शन यातून एक चांगले विचारमंथन घडून येईल, असेही कमल किशोर म्हणाले.

आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना दिलासा मिळणे गरजेचे – प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता

मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले की, राज्यात विविध आपत्तींमध्ये होणारी मनुष्यहानी टाळण्याकरता राज्य शासन अनेक उपाययोजना करत असते. उष्णतेच्या लाटांमध्ये शून्य मृत्यू हे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्य शासन, विविध क्षेत्रांतील काम करणाऱ्या संस्था आणि या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल. कोणत्याही आपत्तीमध्ये मनुष्यहानी टाळून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनही प्रयत्नशील आहे. नाविन्यपूर्ण, उपयुक्त कल्पनांच्या देवाण-घेवाणीसाठी ही कार्यशाळा महत्त्वाची आहे, असेही प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता म्हणाले.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सहसचिव कुणाल सत्यार्थी, आयआयटीचे संचालक डॉ. सुभाशिस चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य आपत्ती व्यवस्थापनचे संचालक अप्पासाहेब धुळाज यांनी प्रास्ताविक केले.

००००

संध्या गरवारे/श्रद्धा मेश्राम/13.2.2023

शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. १२: महाराष्ट्र विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित ‘बोरिवली खेल महोत्सव २०२३’ या ठिकाणी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), आमदार प्रवीण दरेकर, बोरीवलीचे आमदार आणि खेळ महोत्सवाचे संयोजक सुनील राणे, दहीसरच्या आमदार मनिषा चौधरी, कांदिवलीचे आमदार योगेश सागर, कुस्तीपटू तथा ॲथलिट नरसिंग पंचम यादव यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध उपक्रम सातत्याने राबवित असून खेळाडूंच्या कौशल्याची दखल घेऊन तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालेल्यांना यापूर्वी  शासकीय सेवेत  नियुक्ती  दिलेल्या आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपण महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी यासह कुस्तीमध्ये विविध किताब जिंकलेल्या खेळाडूंच्या मानधनात तीन पट वाढ केली आहे. खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्रात खेळाडूंना चांगले प्रशिक्षक, उत्तम प्रशिक्षण सुविधा, शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषणतत्वे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासह सर्व पूरक  सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुस्ती आपला पारंपरिक खेळ आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक कुस्तीमध्येचं मिळवून दिले होते. आताही आपले कुस्तीपटू वेगवेगळ्या ठिकाणी पदके मिळवत आहेत. खेलो इंडिया मध्येही विविध क्रीडा प्रकारांत  उत्कृष्ट कामगिरी आपल्या खेळाडूंनी बजावली असून सर्वाधिक पदके महाराष्ट्राने पटकावली आहेत, ही अभिमानास्पद  बाब आहे. याच पद्धतीने महाराष्ट्र भविष्यात उज्वल कामगिरी करत आपल्या देशाचे, राज्याचे नाव मोठे करेल,असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र केसरी जागतिक विजेता पृथ्वीराज पाटील आणि एशियन चॅम्पियन इरानचे हुसेन रमजानी यांची विशेष लढत यावेळी झाली.  या लढतीत विजयी झालेल्या पृथ्वीराज पाटीलचा आणि प्रतिस्पर्धी कुस्तीपटू  हुसेन रमजानीचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते फेटा ,गदा देऊन सत्कार करण्यात आला. रोमहर्षक कुस्ती या खेळ महोत्सवात बघायला मिळाली यात आपल्या महाराष्ट्र केसरीने इराणच्या कुस्तीपटूस पराभूत करून कुस्ती जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त करत दोन्ही कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या.

000

राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृहांना देणार स्वमालकीच्या शासकीय इमारती

नंदुरबार, दि. १२ (जिमाका वृत्त):  येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे व त्यात काम करणारे शिक्षक कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी स्वमालकीच्या शासकीय इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच पुढील वर्षापासून पहिली ते दुसरीच्या वर्गांत मराठी, हिंदी, इंग्रजी या अनिवार्य भाषांसोबतच स्थानिक आदिवासी बोली भाषेतून शिक्षण देण्याची योजना असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज अक्कलकुवा तालुक्यातील डाब, भगदरी, मोलगी आणि सरी येथील शासकीय मुलींच्या वसतीगृह/ आश्रमशाळांचे लोकार्पण व जलजीवन मिशनच्या कामांचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्यांच्या भुमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जि. प. सदस्य किरसिंग वसावे, सि. के. पाडवी, निलेश वळवी, पं.स. सदस्य बिरबल वसावे, सरपंच सर्वश्री पिरसिंग पाडवी (भगदरी), आकाश वसावे (डाब), अशोक राऊत (पिंपळखुटा), रोशन पाडवी (बिजरीगव्हाण), दिनेश वसावे (साकलीउमर), दिलीप वसावे (सरी), श्रीमती ज्योती तडवी (मोलगी), सागर पाडवी (काठी) सहायक जिल्हाधिकारी तथा तळोदा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, सार्वजनिक बांधकाम विभाग (आदिवासी विकास) उपअभियंता मनिष वाघ विवध व यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले की, राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या सर्व आश्रमशाळा/वसतीगृहांचे डिजिटलायजेशन केले जाणार असून व्हर्चुअल क्लासरूमची संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. मातृभाषेतून शिक्षणासोबतच आदिवासी बहुल भागातील विद्यर्थ्यांची आकलन क्षमता वाढीस लागावी यासाठी आदिवासी बोली भाषांमधून पहिली, दुसरीच्या वर्गात दृकश्राव्य पद्धतीने विविध संकल्पना शिकवून त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजीत काय संबोधले जाते याचेही समांतर शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व करत असताना कुठेही शिस्त आणि नियमांशी तडजोड केली जाणार नाही. जे शिक्षक व कर्मचारी वेळेत येणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ज्या विषयांत मुलांचा निकाल समाधानकारक लागणार नाही त्या विषय शिक्षकांची वेतनवाढ रोखली जाईल. शिस्त आणि नियमांची अंमलबजावणी करताना शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांच्या अडचणी ऐकून त्या शंभर टक्के जागेवरच सोडवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगून शासनाच्या प्रत्येक विभागामार्फत आदिवासी विकासासाठी योजना कार्यक्रम आहेत. भविष्यात जनतेच्या मागणीनुसार या योजना व कार्यक्रम राबवले जातील, असेही पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

आधुनिक पद्धतीने दिले जाणार शिक्षण – डॉ. हिना गावित

आज ज्या वसतीगृह व आश्रमशाळांच्या इमारतींचे लोकार्पण झाले आहे, तेथे शिक्षणातील सर्व आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. व्यायामशाळा, ग्रंथालय या सारख्या उपक्रमांमधून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळणार असून केवळ पाठ्यपुस्तकेच नाही तर संशोधनपर संदर्भग्रंथही या आश्रमशाळा/ वसतीगृहांमधील ग्रंथालयात उपलब्ध आहेत, असे यावेळी सांगून खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल से नल’ योजनेची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

या इमारतींचा झाले लोकार्पण

 डाब येथील शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृह

 भगदरी येथील शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृह

 मोलगी येथील शासकीय आश्रमशाळा व मुलींचे वसतीगृह

 सरी येथील शासकीय आश्रमशाळा, मुलींचे वसतीगृह व सामाजिक सभागृह

यांचे झाले भुमिपूजन

 भगदरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध रस्ते

 मोलगी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना

 सरी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना

 साकली उमर येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना

000

बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

वाशिम, दि. १२ (जिमाका) ‍: बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) संस्था, तसेच नंगारा बोर्ड स्थापन करुन त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोहरादेवी येथे केली.

बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातुच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व ५९३ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महंत बाबुसिंग महाराज, खा. भावना गवळी, खा. प्रतापराव जाधव, खा. उमेश जाधव, आ. ॲड. किरण सरनाईक, आ. राजेंद्र पाटणी, आ. संतोष बांगर, आ. इंद्रनील नाईक, आ. संजय रायमुलकर, आ. निलय नाईक, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.

मान्यवरांचे स्वागत पारंपरिक बंजारा पद्धतीने औक्षण करुन व लेझिम नृत्याने करण्यात आले. त्यानंतर देवीस भोग लावण्यात आला व हरदास पठण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील ५९३ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या भुमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाले.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात गोर बंजारा बोलीत करून उपस्थितांना जिंकून घेतले, ते म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. शासन हे सामान्य जनतेचे आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी, रस्ते इ मूलभूत सुविधा विकासासह शाळा, दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ,असे आश्वासन श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विकासासाठी शासन बंजारा समाजाच्या नेहमी पाठीशी आहे. समाजातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ ही संशोधन संस्था स्थापन करण्यात येईल. तसेच नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोहरादेवी येथे हेलिपॅडवर आगमन होताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री संजय राठोड,ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन,बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे,आमदार राजेंद्र पाटणी, आमदार ऍड.निलय नाईक,बंजारा समाजाचे धर्मगुरु महंत बाबूसिंग महाराज,महंत कबिरदास महाराज, शेखर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोहरादेवीचा कायापालट करु – उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गोर बंजारा बोलीत भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञा ह्या केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. बंजारा हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा निर्माण केली आहे. एकेकाळी समृद्ध असणाऱ्या या गोपालक समाजाची आजची हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

तांड्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करून प्रत्येक तांड्यापर्यंत विकास पोहोचवू. बंजारा समाजातील मुला-मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी शासन उपाययोजना करेल. ‘नॉन क्रिमिलेयर’ ची अट रद्द करण्याबाबत महाधिवक्त्यांचे मत मागविण्यात येईल. पोहरादेवीचा विकास करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. गोर बोलीचे संवर्धन करण्यासाठी अकादमी स्थापन करू. शासन संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी उपाययोजना करावी अशी मागणी केली. त्यासाठी बंजारा समाजाचा परिशिष्ट ‘ब’ मध्ये समावेश करावा. नॉन क्रिमिलेयर अट रद्द करावी, समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजनेप्रमाणे विविध योजना राबवाव्या, तांडा सुधार योजना राबवावी, भूमिहीन समाजबांधवांना जमीनीचे पट्टे द्यावे इ. मागण्या मांडल्या. आ. निलय नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. आ. इंद्रनील नाईक यांनी माजी मंत्री मनोहर नाईक यांचा संदेश वाचून दाखवला. अलका राठोड यांनी आभार मानले.

बंजारा समाजाच्या संस्कृतीचे घडले दर्शन

या कार्यक्रमात उपस्थित बंजारा बांधवांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. अनेक महिला व पुरुष हे पारंपरिक वेशभुषा परिधान करुन आले होते. पारंपरिक वाद्ये व त्या तालावर लोकगीते सामूहिकरीत्या नृत्यासह गायिली गेली. कार्यक्रमासाठी विविध राज्यांतूनही मोठ्या संख्येने बंजारा समाजबांधव उपस्थित होते. आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध गायिका मंगली यांनी सुरेल आवाजात रचना सादर केल्या. त्यावेळी अवघ्या सभामंडपाने ठेका धरला. तसेच देशभरातून आलेल्या अनेक बंजारा कलापथकांनी आपली कला सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

०००

तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.१२ (जिमाका): जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केले.

श्री. सामंत यांच्या हस्ते आज शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला, माळनाका येथे महाराष्ट्रातील पहिल्या भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उद्योग विभागाचे सहसंचालक सतीश भामरे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जीएस हरळय्या, पालघर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उद्धव माने, बँक प्रतिनिधी, अण्णा सामंत, युवा हब चे संचालक किरण रहाणे, राहुल पंडित, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी महोत्सव घेण्याचे निश्चित करण्यात आले. माझ्याकडे उद्योग खाते असल्याने त्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली. या नोकरी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून यासाठी ऑनलाईन ७ हजार ८०० अर्ज प्राप्त झाले तसेच ऑफलाईन अर्जही मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. राज्यासह राज्याबाहेरील, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल १३० कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री श्री.सामंत पुढे म्हणाले की, रत्नागिरीच्या समुद्रकिनारी स्टील इंडस्ट्रीज उभारुन येथील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याची इच्छा उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी एका भेटीत व्यक्त केली. तर इलेक्ट्रॉनिक मोटर्स हब रत्नागिरी मध्ये उभारण्याची इच्छा सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. परंतु येथील जनतेने मानसिकता बदलणे फार गरजेचे असल्याचे आहे, जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे.

कोकणातील तरुणाईने नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत.

अशा प्रकारचे मेळावे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येणार आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील तरुण-तरुणींसाठी ऐतिहासिक नोकरी मेळावा सीमा भागात घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज मंजूरी पत्र वाटप करताना मंत्री श्री. सामंत नोकरी करण्यापेक्षा आपण नोकरी देणारे बनावे. स्वतःचे उद्योग उभारावेत असे आवाहन उपस्थित तरुण-तरुणींना केले.

पुणे जिल्ह्यातील तळेगांव येथील महिलांनी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नर्सरीचे त्यांनी उदाहरण दिले. या महिलांसारखेच कोकणातील महिलांनी-युवतींनीही नाविन्यपूर्ण उद्योग करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या रोजगार महामेळाव्याच्या माध्यमातून ज्या युवक युवतींची नोकरीसाठी अंतिम निवड झालेली आहे अशांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी ज्या बँकांनी उल्लेखनीय कामगिरी केली अशा बँ व्यवस्थापकांचाही सन्मान करण्यात आला. मिलिंद गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले. सतीश भामरे यांनी प्रस्तावना केली. विद्या कुलकर्णी यांनी आभार मानले.

मूकबधीर युवकांच्या रोजगारासाठी पालकमंत्री श्री. सामंत यांनी घेतला पुढाकार

दरम्यान महामेळाव्यानिमित्त काही मूकबधीर युवक या ठिकाणी आल्याचे पालकमंत्र्यांना समजले. अशा युवकांना कोणते काम, नोकरी द्यायची हा यक्ष प्रश्न सर्वांसमोर उभा असल्याचे पालकमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने या युवकांसाठी तात्काळ तिथेच बैठक आयोजित केली. त्या सर्व युवकांची व त्यांच्यासह आलेल्या पालकांची मंत्री श्री. सामंत यांनी आस्थेने विचारपूस करून संवाद साधला. या युवकांना कशा प्रकारे नोकरी देता येईल, त्यांच्या कायमस्वरूपी उपजीविकेसाठी काय करता येईल, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली.

मूकबधीर युवकांकडे कौशल्य,बुद्धी असूनही त्यांना योग्य संधी मिळत नाही. त्यामुळे आता या युवकांना योग्य ती संधी मिळण्यासाठी नेमके काय करता येईल, यासाठी येत्या काही दिवसातच स्वतंत्र बैठक घेऊन पुढील एक महिन्याच्या कालावधीत या युवकांच्या उपजीविकेसाठी कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला.

रत्नागिरीच्या रोजगार महामेळाव्यात २ हजार १४० जणांना मिळाली नोकरी

आजच्या रोजगार महामेळाव्यात नोंदणी झालेल्या जवळपास १० हजार उमेदवारांपैकी ४ हजार ४२८ जणांच्या मुलाखती आज पार पडल्या. त्यातील २ हजार १४० जणांना नोकरीचे देकार (ऑफर) प्रमाणपत्र तात्काळ अदा करण्यात आले. तसेच २ हजार ८८ उमेदवारांना कौशल्य विकास विभागाकडे कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी संदर्भित करण्यात आले आहे. या २ हजार ८८ उमेदवारांना आवश्यक ते प्रशिक्षण देऊन भविष्यात त्यांनाही नोकरी मिळवून देण्यात येणार आहे.

000

वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

औरंगाबाद, दि.१२, (विमाका) : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी डॉ.कराड बोलत होते.

कार्यक्रमास माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड, वेरुळचे सरपंच प्रकाश पाटील, अभिजित देशमुख, अनिल मानकापे, किशोर चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ.कराड म्हणाले की, औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. या शहराला राज्य शासनाने पर्यटनाची राजधानी असे संबोधले आहे. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेण्यांमुळे पर्यटक आकर्षित होतात. त्यादृष्टीने पर्यटन वाढीसाठी तसेच पर्यटकांना सोईसुविधा तसेच या परिसराच्या सर्वागीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहाजीराजे स्मारक व मालोजीराजे गढीच्या सर्वांगिण विकासासाठी सीएसआरमधून ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विकासासाठीचा आराखडा तयार करण्यात आला असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय  पातळीवर साजेसे काम होणार आहे. यामध्ये नाईट टुरिझम, आकर्षक वीज रोषणाई व पर्यटक आकर्षित होतील असा विकास करण्यात येईल. गढीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही डॉ. कराड म्हणाले.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची जपणूक, संवर्धन, सौंदर्यीकरण करुन पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून अनेक कामांना निधी मिळवून देण्याबाबत आपला पाठपुरावा सुरू असुन लवकरच ही कामे गती घेतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन कराड यांनी शिवजयंती उत्सवाबाबत माहिती दिली. शिवजयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा व महिलांसाठी दीपोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन त्यांनी केले. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी युवक, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

0
कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत 'राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल' या नावाने उभारण्यात...

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा...

0
मुंबई, दि १७: मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश, आणि...