मंगळवार, ऑगस्ट 5, 2025
Home Blog Page 1633

लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्पांसाठी सौदी अरेबियाच्या गुंतवणुकीचे स्वागत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १:- सौदी अरेबियाच्या उद्योग आणि गुंतवणुकीचे महाराष्ट्रात स्वागतच असेल. लोकाभिमुख, विकासात्मक प्रकल्प आणि उद्योजकतेसाठी महाराष्ट्र नेहमीच सौदी अरेबियाचा मित्र राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सौदी अरेबियाचे भारतातील राजदूत सलेह इद अल हुसेनी यांची मुख्यमंत्री शिंदे यांची आज येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राजदूत अल हुसेनी यांनीही महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत गतिमान राज्य असून येथील गुंतवणूक दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करणारे ठरतील असा विश्वास व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्यासह सौदी अरेबियाचे दूतावास प्रमुख सुलेमान इद अल कुताबी आदी उच्चाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य आहे. उद्योगासह विविध क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक पोषक वातावरण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाचे स्वप्न पाहिले आहे. त्या दिशेने काम करणारे राज्य म्हणून आमची ओळख आहे. नुकताच दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत जगभरातील अनेक उद्योगांनी सुमारे १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे करार केले आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. येत्या काही काळात मुंबईचा पायाभूत सुविधांची दृष्टीने कायापालट झालेला असेल. आम्ही उद्योगस्नेही धोरण स्वीकारले आहे. अन्न प्रक्रिया उद्योग, हरित ऊर्जा अशा माध्यमातून पर्यावरण स्नेही गोष्टींना प्राधान्य दिले आहे. या दृष्टीने सौदी अरेबियाच्या विविध प्रकल्प, गुंतवणूक यांचे आम्ही स्वागतच करू.

यावेळी श्री अल हुसेनी यांनी महाराष्ट्र आणि विशेषत: मुंबईचे कौतुक केले. ते म्हणाले, भारत हा विविधतेने नटलेला सुंदर देश आहे. येथील कला क्षेत्रदेखील समृद्ध आहे. आम्हाला या कलाक्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याची इच्छा आहे. आम्ही भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. महाराष्ट्र हे एक सक्षम राज्य आहे, त्यामुळे यातील मोठा भाग महाराष्ट्रात येईल, यात शंका नाही. अन्न व ऊर्जा या क्षेत्रांना आम्ही  प्राधान्य देण्याचे आमचे धोरण आहे. भारताशी आणि पर्यायाने महाराष्ट्राशी आमचे उभयपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असे आमचे प्रयत्न आहेत.

श्री अल हुसेनी यांनी सहा महिन्यांपूर्वी भारतातील राजदूत म्हणून पदभार स्वीकारला आहे. नवी दिल्लीबाहेर एखाद्या शहराला दिलेली पहिली भेट ही मुंबईची असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१: गरिबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार असल्याचे सांगतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प श्रीमती सीतारामन यांनी आज मांडला. शहरी आणि ग्रामीण असा संतुलन साधणारा हा अर्थसंकल्प असून मध्यमवर्गीय, बळीराजा, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व घटकांना सुखावून टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. जगभरात होणाऱ्या नव्या बदलांच्या आणि त्याच्या आव्हानांचा विचार करणारा असा भविष्यवेधी अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्रीमती सीतारामन यांचे अभिनंदन केले आहे.

पायाभूत सुविधा, कृषी, रोजगार, पर्यावरण अशा सर्वंच क्षेत्रांसाठी अतिशय भरीव तरतूद या अर्थसंकल्पात दिसते. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना फायदा होईल त्यामुळे निश्चितच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रामध्येही दिसून येईल. कर रचनेमध्ये ७ लाखांपर्यंतची केलेली उत्पन्नाची मर्यादा विशेषता मध्यमवर्गास दिलासा देणारी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

गेले तीन वर्षे कोविड संकटात होती. त्यातून बाहेर येण्यासाठी या नव्या कर रचनेचा फायदा होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मांडलेली सप्तर्षी कल्पना खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत यामध्ये सर्वंकष विकास, अंत्योदय योजना, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक दडलेल्या क्षमतांचा विकास, युवाशक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश केलेला आहे. यातून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचे चित्र स्पष्ट होते.

काही निर्णय महाराष्ट्रात आपण राबवत असलेल्या योजना, प्रकल्प, संकल्पनांशी एकरूप असे आहेत. इंडिया अॅट १०० (India@100) या धोरणात चार क्षेत्रांना केंद्रीभूत मानण्यात आले आहे. त्यामध्ये महिला सक्षमीकरण, पीएम विकास म्हणजेच आपल्या पारंपारिक कारागिरांचा सन्मान, पर्यटन आणि हरित विकास यांचा समावेश आहे. या चारही क्षेत्रात आपण महाराष्ट्रात यापूर्वीच काम सुरु केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

देशामध्ये महाराष्ट्रातील लघुउद्योग हे सर्वाधिक कार्यक्षम समजले जातात. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता क्रेडिट हमी योजनेमध्ये प्रस्तावित सुधारणांमुळे हे लघुउद्योग अधिक उत्पादनक्षम होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रामध्ये कालच पौष्टिक तृणधान्य वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. हैदराबाद येथील मिलेट सेंटर ऑफ एक्सलन्सला केंद्र सरकारने दिलेला सपोर्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. या तृणधान्ये वर्ष साजरे करीत असताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद होणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्हाला खात्री आहे की हे तृणधान्य वर्ष महाराष्ट्राच्या एकूण बाजारपेठेसाठी नक्कीच पोषक असेल.

अर्थसंकल्पात कृषी आणि सहकार क्षेत्राला मोठे प्राधान्य दिले आहे. सहकार तर महाराष्ट्राचे सामर्थ्य आहे. मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीत सहकारी साखर कारखान्याच्या विविध मागण्यांवर एक बैठक घेतली होती.त्या बैठकीमध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या आयकर संबंधी विषयावर चर्चा झाली. याबाबतीत  तोडगा काढू असे आश्वासन केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह  यांनी दिले होते. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या विषया संदर्भात मोठी घोषणा झाली असून  ज्या सहकारी साखर कारखान्यांवर लायबिलिटी होती त्यामध्ये  सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा दिलासा या सहकारी साखर कारखान्यांना मिळणार आहे.  शेतमालाच्या साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात विकेंद्रीत स्वरुपात व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यासाठी विविध कार्यकारी सोसायाट्या, मत्स्य आणि दुग्धविकास संस्थांना मदत केली जाणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आपला माल योग्य वेळी बाजारात आणणे सोयीचे होणार आहे.

देशभरात १५७ नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जाणार आहेत. याचा फायदा महाराष्ट्रालाही निश्चितच होईल. कारण यापूर्वीच आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना जोडूनच ही महाविद्यालये सुरू होतील.

पीपीई मॉडेलद्वारे पर्यटन तसेच मच्छीमारांसाठी ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक या योजना महाराष्ट्राला नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. महाराष्ट्राला ७२० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून पर्यटनादेखील मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

गरिबांना २०२४ पर्यंत मोफत रेशन मिळणार असून आत्तापर्यंत मोफत रेशनचा ८० कोटी लोकांना फायदा झाला आहे. पीएम अन्नपूर्णा कौशल्य योजनेची सुरुवात होणार असल्याने देशातील गरिबांची काळजी घेणारे हे मोदी सरकार आहे हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे देशात पुढील वर्षांत ५० विमानतळे उभारण्याचा संकल्प करून मोदी सरकारने नव्या भारताची वाटचाल स्पष्ट केली आहे.

जुनी वाहने बदलण्याचा निर्णय प्रदूषण कमी करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी ३० स्किल इंडिया सेंटर उभारण्यात येणार आहेत. रोजगारासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हरित विकासावर भर देताना हरित ऊर्जा साठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद स्वागतार्ह आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १९ हजार ७०० कोटीची तरतूद केली गेली आहे.

एकूणच समाजातल्या सर्व घटकांना प्राधान्य देणारा तसेच त्यांना विकासाच्या वाटचालीत सामावून घेणारा असा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला सुखावणारा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’ कार्यक्रमाचा वृत्तान्त

मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’ कार्यक्रमाचा वृत्तान्त प्रसारित होणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरुवार  दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत हा कार्यक्रम प्रसारित होईल.

संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्ट‍िक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने देशभर कार्यक्रम होत आहेत. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात महाराष्ट्र मिलेट मिशनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमावर आधारित हा वृत्तान्त असेल.

राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळणे, यासाठी राज्य शासन आग्रही आहे. त्यामुळे महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात या तृणधान्य प्रक्रिया उद्योगांना अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, स्मार्ट प्रकल्प यांची सांगड घालून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. जेणेकरून या पिकांचे उत्पादन आणि त्यांची विक्री यांची मूल्यसाखळी विकसित होईल. शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हे मिशन महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले आहे. या दोन्ही भाषणांचा संपादित अंश या कार्यक्रमातून ऐकायला मिळणार आहे.

राज्यपालांचे वाहनचालक मोहन मोरे सेवानिवृत्त; राज्यपाल कोश्यारींकडून भावपूर्ण सत्कार

मुंबई, दि. १ : राज्यपालांचे वाहनचालक असलेले मोहन मोरे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे हृद्य सत्कार केला.

३१ जानेवारी रोजी निवृत्त झालेल्या मोहन मोरे यांना राज्यपालांनी सहकुटुंब आपल्या कार्यालयात बोलावून त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. एका छोटेखानी निरोप समारंभात राज्यपालांनी मोरे यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव केला व त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली तीन वर्षे मोरे यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते.

यावेळी उपस्थित राजभवनातील अधिकारी व सहकाऱ्यांनी आपल्या समयोचित भाषणांमधून मोहन मोरे यांच्या कार्याचा तसेच मनमिळावू स्वभाव तसेच आठवणींना उजाळा दिला.

राष्ट्रपती व पंतप्रधानांचेदेखील केले सारथ्य

मूळचे दुधगाव, महाबळेश्वर येथील असलेले मोहन मोरे तब्बल ४० वर्षांच्या राजभवनातील शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. मोहन मोरे जानेवारी १९८३ मध्ये शासकीय सेवेत क्लिनर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी १९८७ पासून वाहनचालक म्हणून काम केले.

आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर, मोहम्मद फजल, एस एम कृष्णा, एस सी जमीर यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वाहनाचे सारथ्य केले.

देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंह तसेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद राजभवन येथे आले असताना त्यांच्या वाहनाचेदेखील श्री. मोरे यांनी सारथ्य केले होते.

उद्यापासून रंगणार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

मुंबई, दि. 1 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण 2 फेब्रुवारीला संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे संध्याकाळी 6.00 वा. होणार आहे. या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित राहणार आहेत.

सन 2020 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार डॉ.एन. राजम यांना तर सन 2021 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सन 2019-20 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला होता. सन 2020-21 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दत्ता भगत यांना तर, सन 2021-22 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सन 2019-20 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना,सन 2020-21 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना तर सन 2021-22 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वाद्य निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वि. आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसूत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाठी पं.रवींद्र अतिबुद्धी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी .भूषण लकींद्रा यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी बेगम परवीन सुलताना आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे. शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी वि. आरती अंकलीकर, वि. सानिया पाटणकर, विराज जोशी यांचे गायन होणार आहे. तर पं. उद्धव आपेगांवकर आणि पं. पुष्कराज कोष्टी यांचे वादन होणार आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी पं. राजा काळे, डॉ. आशिष रानडे आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन तर वि. कला रामनाथ यांचे वादन होणार आहे.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

कांदाटी खोरे- विकास दृष्टीकोन आणि ध्येय

कांदाटी खोऱ्यातील बरीचशी गावे ही कोयना धरणात गेली आहेत.  हे खोरे कोयनेच्या जलाशयाने वेढलेले आहे. या खोऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तापोळा, बामणोली या भागाला तर मिनी काश्मिर असे म्हटले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओढा बघता येथे पर्यटन वाढीसाठी व स्थानिकांच्या रोजगारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी  पर्यटन व रोजगार निर्मितीबाबत आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. या आराखड्या विषयी माहिती.

या आराखड्यानुसार उपजिविकेच्या पर्यायांमध्ये विविधिता उपलब्ध करुन देणे (कृषी, वन, पशुधन, पर्यटन, पाणी आणि स्वच्छता). पर्यटनाच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा. रस्ते जोडणी आणि दळवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. पाणलोट क्षेत्र आणि झऱ्यांच्या व्यवस्थापनाविषयी वाव. पर्यटन अनुभवामध्ये विविधता (धार्मिक, साहसी, निसर्ग, जल पर्यटन) ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी विकसित करणे सेवा प्रदाता आणि उद्योजक म्हणून स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमता वर्धन व क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता समुहांना योग्य संधी उपलब्ध करुन देणे.

लोकांची उद्योजकता, पर्यटन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यावर आधारित लोकं-सरकारी व्यवस्था आणि खासगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरण पूरक, शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोक समुदाय तयार करण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय लोक समुदाय, कौशल्य आणि क्षमता बांधणी, तांत्रिक आणि व्यवस्थापन सहाय्य व हवामान बदलाशी सुसंगत कार्यपद्धती यावर भर देण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होम-स्टे व्यवस्था विकसित करणे, जलाशय काठच्या ठिकाणी टेंट व कॉटेजेसची व्यवस्था, जंगलातील मुक्काम स्थळे विकसीत करणे. कृषी पर्यटन स्थानिक जीवनाशी आणि कृषी पद्धतींचा अभ्यास, निसर्ग प्रेमींसाठी दरदिवशी किंवा शनिवार-रविवार निसर्ग सहलींचे नियोजन करणे. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकींगची सोय उपलब्ध करुन देणे. डोंगर माथ्यांवरील आकाश निरीक्षण सहलींचे नियोजन, दोन-तीन प्रमुख ठिकाणी (उत्तेश्वर, पर्वतेश्वर, चकदेव) उत्सव आशा पर्यटन स्थळांचा विकास व इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवून वर्क-एन-रिलॅक्स सुविधांसह होम-स्टे आणि रिसॉर्ट्स विकसित करणे. प्रवेश रस्ते व पार्किंग विकसित करणे, टेंटसाठीची जागा, रस्ते यांचे व्यवस्थापन. बेटांवर जाण्यासाठी छोट्या बोटींची सुविधा विकसित करणे पर्यटकांसाठी मंडप आणि स्टॉल्सचे नियोजन, स्वच्छतागृहे व कॅफेटेरिया यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करण्यात येणार असून बिझनेस प्लान तयार करण्यात येणार आहे. तसेच दुधाची उत्पादकता वाढविणे, दुधावर प्रक्रिया करणे आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. औषधी वनस्पती, बांबू असे वन उत्पादन गोळ करणे व पुढील व्यवस्था विषयक व्यवसाय योजना तयार करण्यात येणार आहे. मध गोळा करणे, मधावरील प्रक्रिया आणि मधाची विक्री या विषयही योजना तयार करण्यात येणार आहे.

तापोळा, महाबळेश्वर, खेड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा, कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी सुधारित ॲप्रोच रोड कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार असून जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

भविष्यातील विकासाचा विचार करता या भागात तयार होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संघटन आणि व्यवस्थान, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन सुविधांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता सर्व गावांसाठी सुधारित आरोग्य सुविधांची उपलब्धता, आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी तात्काळ पोहचविण्याची सुविधा १६ गावांसाठी  आराखड्यानुसार करण्यात येणार आहे.

पर्यटन व रोजगार निर्मिती आराखड्याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही वारंवार बैठका घेवून वेळोवेळी बहुमूल्य अशा सूचना केल्या आहेत. आराखडा लवकरच तयार होवून त्यांची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार या भागातील स्थलांतर कमी  होवून नागरिकांना गावातच रोजगाराबरोरच  सर्व सुविधा मिळणार आहेत.

0000

 

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

 

 

नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना

मुंबई, दि. 1 : नवीन नाट्यनिर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत नाट्य परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून 23 अशासकीय सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

या समितीमध्ये अरुण नलावडे, मुकुंद चितळे, विश्वास सोहोनी, शिल्पा नवलकर, विक्रम भागवत, प्रल्हाद जाधव, किरण यज्ञोपावित, रवींद्र खरे, राजन ताम्हाणे, शिवराय कुलकर्णी, राजेश चिटणीस, शैला सामंत, प्रो. वर्षा भोसले, वीरभद्र स्वामी, अभिराम भडकमकर, कुमार सोहोनी, शीतल तळपदे, स्वरुप खोपकर, अरुण होर्णेकर, सविता मालपेकर, अनिल गवस, सुनील बर्वे, सुधाकर गिते हे अशासकीय सदस्य असतील. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/02/202301311837263223.pdf”]

नाटकांचे परीक्षण हे तज्ज्ञांमार्फतच करण्यात येणार असून प्रशासकीय अधिकारी असणाऱ्या संचालकांना नाटकांचे परीक्षण करण्याचे अधिकार नसतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षे किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर होईल तोपर्यंत असेल. नाट्य परीक्षण समितीमधील सदस्य अनुदानासाठी अर्ज केलेल्या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तंत्रज्ञ, संगीत किंवा अन्य बाबींशी संबंधित असल्यास त्या सदस्यास संबंधित नाटकाचे परीक्षण करता येणार नाही. नाटकाचे परीक्षण करण्यासाठी 23 सदस्यांपैकी किमान 11 सदस्यांची गणसंख्या असणे आवश्यक राहील.

ही समिती व्यावसायिक, संगीत आणि प्रायोगिक नाटकांचे परीक्षण करणार आहे.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली, प्रयोगासाठी अनुदान मंजूर करणाऱ्या समितीचे पुनर्गठन

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्रातील लोककला टिकून राहाव्यात, त्यांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि पारंपरिक लोककलांचे संवर्धन करण्यासाठी लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येते. कलापथकांना भांडवली/ प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्याऱ्या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. ही समिती कलापथकांच्या अर्जाची छाननी करणे, त्यांची पात्रता तपासून अनुदान मंजूर करण्याचे काम करणार आहे.

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2023/02/202301311829428823.pdf”]

पुनर्गठन केलेल्या समितीत तमाशासाठी मंगला बनसोडे आणि अतांबर शिरढोणकर, दशावतारासाठी देवेंद्र नाईक आणि तुषार नाईक मोचेमाडकर, खडीगंमतसाठी शाहीर अलंकार टेंभुर्णे आणि शाहीर वसंता कुंभारे, शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरे आणि धनंजय खुडे, लावणीसाठी रेश्मा मुसळे आणि छाया खुटेगांवकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे समितीचे अध्यक्ष असतील. या समितीचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांसाठी किंवा समितीची पुनर्रचना होणे यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत असेल.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/

 

महसूल दिन राज्यस्तरावर साजरा होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. 1 : कोविडमुळे राज्यभरात महसूल दिन साजरा करता आला नाही. महसूल विभागाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे अभियान राज्यभर राबविण्यासाठी यंदापासून महसूल दिन राज्यस्तरावर साजरा करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपसचिव संजय बनकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले की, महसूल दिवस राज्यस्तरीय साजरा करीत असताना विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांबरोबरच राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी पुरेसे अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल.

महसूल खाते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी  निगडीत असलेला विभाग असल्याने या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदभरती, पदोन्नती, भत्ते, ग्रेड पे याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत गतीने निर्णय घेण्यात येत आहेत. महसूल सहायक पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील पदोन्नतीची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात येईल. तर अव्वल कारकुन संवर्गाच्या त्रुटींबाबतही मार्ग काढण्यात येईल असेही  मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या, पदभरती, याबाबत मागण्या यावेळी मांडल्या. यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचेही मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

पर्यटन विकास महामंडळाच्या निवासात मिळणार तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ

मुंबई, दि. १ : संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळतर्फे राज्यभरातील पर्यटक निवासस्थानी तृणधान्य महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला.

तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ मिळणार

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, बाजरी, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसह, लसणाची चटणी आणि तृणधान्यापासून तयार केलेले विविध खाद्य पदार्थ आता महाराष्ट्र पर्यटन  विकास महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये मिळू शकणार आहेत. पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेले पदार्थ या निवासामध्ये उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले की, पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने राज्यात पौष्टिक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे व या पिकांचे आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढविण्याकरिता जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील,देशातील आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पौष्टिक तृणधान्यांची माहिती होईल आणि याचा आहारात वापर व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत राज्यात व राज्याबाहेरील ठिकाणीही या उपक्रमांचे वर्षभर आयोजन केले जाणार आहे. एमटीडीसीमार्फत महाराष्ट्र ‘मिलेट मिशन’ अंतर्गत तृणधान्यांपासून तयार केलेल्या  पदार्थांचे प्रात्यक्षिक व विक्री करणाऱ्या दालनाचे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात उभारण्यात आले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. तृणधान्य पदार्थ महोत्सव, दिल्ली हाट येथे पौष्टिक तृणधान्यांची पदार्थ विक्री, पर्यटक निवास औरंगाबाद येथे हुरडा महोत्सव, भंडारदरा, ग्रे पार्क नाशिक  येथे नाचणी महोत्सव, एमटीडीसी उपाहरगृह महाबळेश्वर, अजिंठा फूट हील, लोणार, बोधलकसा, ग्रेप पार्क, तारकर्ली आणि गणपतीपुळे येथील पर्यटक निवासस्थानी या महोत्सवांचे आयोजन केले जाणार आहे. पर्यटकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

या ऑनलाईन शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यावेळी उपस्थित होते.

महामंडळाच्या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात  हॉटेल मॅनेजमेंट दादर, मुंबई यांनी पौष्टिक तृणधान्यापासून तयार केलेल्या पदार्थांचा स्टॉल लावला होता.या स्टॉलमध्ये या विद्यार्थ्यांनी तृणधान्यापासून बनविलेल्या चिपोतले राजमा मिश्र मिलेट टाकोज,काळा वाटाणा सांबर आणि मिलेट्स वडे, बाजरी नाचणी कुरमुरे भेळ पुरी, वरी तांदूळ आणि साबुदाणे वडे,ज्वारी बदाम पिस्ता कुकीज,नाचणी चोको चिप्स, कुकीज, आले – ओवा – बाजरी – खाऱ्या कुकीज या पदार्थांचा समावेश होता. गेले दोन दिवस लागलेल्या या स्टॉलमध्ये मंत्रालयातील अधिकारी,कर्मचारी व अभ्यागत यांनी या पदार्थांची चव चाखली.

******

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालयाचा वार्षिक अहवाल राज्यपालांना सादर

0
मुंबई, दि.५ : न्यायमूर्ती वि. मू. कानडे, लोक आयुक्त व संजय भाटिया, उप लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी, महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक...

गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

0
मुंबई, दि. 5 : महाराष्ट्रातील गिग (Gig) कामगारांना शासनाच्या विविध योजना, कल्याणकारी योजना, सेवा सुविधा आणि सामाजिक सुरक्षासंहितेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच अन्य संघटित...

एसटी महामंडळ ‘यात्री ॲप’ आणणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

0
मुंबई, दि. ०५ : चालकांना सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत ‘यात्री ॲप’ लवकरच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ...

स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाच्या तयारीचा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी घेतला आढावा

0
मुंबई, दि. ५ : स्वातंत्र्य दिन हा अतिशय महत्त्वाच्या सोहळ्यांपैकी एक आहे. हा सोहळा साजरा करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर प्रत्येक बाबीचे काटेकोर नियोजन...

मंत्रिमंडळ निर्णय

0
महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण-२०२५ जाहीर; पाच वर्षात १.२५ लाख उद्योजक घडवणार, ५० हजार स्टार्टअप्सचे उद्दिष्ट महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण, २०२५ ला आज...