रविवार, मे 18, 2025
Home Blog Page 1631

मराठीचा आवाज केविलवाणा नाही; स्वाभिमान टिकविण्याचे काम सर्वांचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘इये मराठीचिये नगरी’ कार्यक्रमातून विधानमंडळात मराठीचा गजर

मुंबई दि.27 : मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची. या टापांचा आवाज खणखणीत तर  मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठीचा आवाज अजिबात केविलवाणा नसल्याचे आणि मराठीचा स्वाभिमान टिकविण्याचे काम आपणा सर्वांचे आहे असे स्पष्ट केले. एवढेच नाही तर मराठी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची भाषा आहे ती टिकणारच असा विश्वासही व्यक्त केला.

राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात’इये मराठीचिये नगरी’या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास  परिषदेचे सभापती रामराजे नाईकनिंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले,  उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, साहित्यिका नीलिमा गुंडी  यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, विधानमंडळ सदस्य आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

मराठीचा आग्रह एक दिवसासाठी, एका वर्षासाठी नाही तर संपूर्ण आयुष्य मराठी, मराठी आणि मराठीच झालं पाहिजे असे आवाहन  करून मुख्यमंत्री म्हणाले बये दार उघडअसं सांगणारी भाषा मराठीच, प्रत्येक संकटात धावून येणारी मराठीच, मुगल आणि इंग्रजांना पुरुन उलेली भाषा आपली मराठीच आहे. त्यामुळे मराठी टिकेल की नाही याची चिंता नको.

आज आपल्याआईचा सन्मान

आज आपण सर्व मिळून आपल्या आईचा सन्मान करत असल्याची भावना व्यक्त करून श्री. ठाकरे म्हणाले,  मराठी ही ह्दयावर, डोंगर कपारीत कोरली गेलेली भाषा आहे, आपण बोलत राहिलो तरी ती पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित होत जाईल.  आपल्या भाषेचा एकच दिवस का साजरा करायचा, बरं करायचा तर मराठी भाषा टिकेल की नाही ही चिंता मनात बाळगून तो का साजरा करायचा ? 

मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा

जगभरात साहित्य संमेलन, महोत्सवाच्या माध्यमातून मराठीचा जागर होत असताना मराठीची, मराठी संस्कृतीची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मराठी ही शक्तीची आणि भक्तीची भाषा आहे. तिचा अभिमान, स्वाभिमान टिकवण्याचं काम आपल्या सर्वांचंच आहे. वासुदेव, नंदीबैलवाले, वाघ्या मुरळी  या मराठीच्या सांस्कृतिक परंपरा पुढच्या पिढीला माहितीच नाहीत. मग मराठी भाषा पुढं जाणार कशी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निकष आणि पुरावे मागितले जातात. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मराठी भाषेचा पुरावा मागणारे जिवंत असते का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

मराठी भाषा अनिवार्य कायद्याचा आनंद

आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात  दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा करण्याचं भाग्य मला मिळालं, याचा आनंद वाटत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद

मुख्यमंत्री सभागृहात भाषण करत असताना सभागृहाच्या गॅलरीत संत टेरेसा विद्यालयाचे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व चिमण्या पाहुण्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान त्यांना थेट संबोधित करून त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या शाळेचे नाव विचारले.  आज मला माझ्या आईची आठवण येते, तिने मला दगडी पाटीवर पेन्सिलने अ,,इ लिहायला शिकवले, तुमच्यापैकी कितीजणांना ही पाटी पेन्सिल माहित आहे असं मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारताच हो माहिती आहे, असे जल्लोषपूर्ण उत्तर विद्यार्थ्यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांकडून आजोबांचे स्मरण

आताचा माणूस मोबाईलवेडा झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मोबाईलमुळे लिहिणे, वाचणे बंद झाले. ऱ्हस्व, दीर्घ गेले. मराठी भाषा शुद्ध लिहिली गेली पाहिजे, ऱ्हस्व दीर्घाप्रमाणे भाषेचा उच्चार झाला पाहिजे हा आपल्या आजोबांचा प्रबोधनकार ठाकरे यांचा आग्रह होता असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ग्रंथ दिंडी ग्रंथ प्रदर्शन

मुख्यमंत्र्यांनी विधानमंडळ प्रांगणात सुरुवातीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले तर ग्रंथ दिंडीची पालखीही मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी स्वत:च्या खांद्यावरुन वाहिली. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी विधानमंडळातील शिवप्रतिमेसही पुष्पहार अर्पण केला.

विधानमंडळात इये मराठीचिये नगरी कार्यक्रमातून मराठीचा गजर घुमला. यात गवळण, अभंग, भारुडासह मराठी भाषेचे वैभव सांगणारी गीते सादर करण्यात आली. मराठी भाषेचा, साहित्याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला

मराठी भाषा संस्कृतीची वाहक होणे आवश्यकनीलिमा गुंडी

मराठीची प्रवाहक्षमता गौरवास्पद असल्याचे सांगून साहित्यिका नीलिमा गुंडी म्हणाल्या, मराठी ही लोकव्यवहाराची भाषा होती. तिला ज्ञानभाषा करण्याचे काम तेराव्या शतकातील संतपरंपरेने केले.  सांस्कृतिक ऊर्जा, प्रभावक्षमता ही मराठीची बलस्थाने आहेत. भारतीय भाषेत ही तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे.  असे असले, तरी भाषेचे चलनवलन वाढणे एवढे मराठीसाठी पुरेसे नाही. ती समाजाचा अंत:स्वर, संस्कृतीची वाहक होणे आवश्यक आहे. मराठी भाषा सक्तीची करून शासनाने यादृष्टीने खंबीर पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदनही केले.  प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र मराठी भाषा विभाग असावा, मराठी बोलींचे जतन व्हावे, तसे अभ्यासक्रम तयार व्हावेत, भाषा प्रशिक्षक तयार व्हावेत, मराठी भाषेचे पायाभूत अभ्यासक्रम तयार व्हावेत, शासकीय पातळीवर मराठीचे सुसूत्रीकरण व्हावे  अशा सूचनाही त्यांनी यानिमित्ताने केल्या. 

मराठी भाषेसाठी भविष्यात संघर्ष- अजित पवार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी जुनी असून दुर्दैवाने अजून ती  पूर्ण झाली नाही. मराठी माणसाला आणि मराठीला संघर्षाशिवाय काही मिळालं नाही, यासाठीही भविष्यात संघर्ष करावा लागेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुलांनी, कुटुंबाने आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती जपली पाहिजे, आपल्या घरापासून याची सुरुवात झाली पाहिजे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले,  भाषेत पोट भरण्याची क्षमता असावी यादृष्टीने उद्योग, व्यापार आणि संगणकाची भाषा मराठी व्हावी.  महाराष्ट्र कनार्टक सीमाबांधवांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो.  या निमित्ताने मी त्यांच्या साहित्य सेवेपुढे नतमस्तक होतो असेही श्री.पवार म्हणाले.

अभिजात भाषेसाठी पंधानमंत्र्यांची भेट-रामराजे निंबाळकर

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांचे शिष्टमंडळ घेऊन प्रधानमंत्री महोदयांची आपण सर्वजण भेट घेऊ, महाराष्ट्राच्या साडेतेरा कोटी जनतेची इच्छा पंतप्रधानांना सांगू असे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याकामी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी सुचविले. जागतिक भाषेचे विद्यापीठ महाराष्ट्रात व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. इंग्रजी माध्यमात शिकणारी मुलं आज धड इंग्रजी नीट बोलू शकत नाहीत की मराठी अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. बालकांनी या कार्यक्रमास वेळ दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

भाषेची आपुलकी आपणच दाखवली पाहिजे- नाना पटोले

मराठी आपणच बोलत नसू तर मराठी जगणार कशी? असा सवाल करून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठी भाषेविषयीची आपुलकी आपणच दाखवली पाहिजे. मराठीचा जागर, मराठीची भूमिका देश आणि जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा संकल्प केला पाहिजे. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण हा प्रयत्न जोरकसपणे करूया असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. त्यांनी मराठी भाषेच्या गौरवासाठी अनेकांनी काम केल्याचे सांगून मराठी सक्तीच्या या कायद्यासाठी सर्वांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याचे म्हटले. स्व.हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी  हा कायदा केल्याबद्दल मुख्यमंत्र्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती असेही त्या म्हणाल्या.

विधानसभा प्रश्नोत्तरे

कर्जमुक्ती योजनेची रक्कम तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 27 :  शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरु झाली असून तीन महिन्यात या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पैसे दिले जातील, असा प्रयत्न राज्य शासनामार्फत केला जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य बबनराव शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांकडून पिककर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यात सोलापूर जिल्हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती घेतली जाईल. या जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊ असेही श्री. पवार यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य भारत भालके यांनी भाग घेतला.

000

उच्चदाब वितरण प्रणालीवरील जोडण्या

सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार

– ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई, दि. 27 : राज्यात ज्या शेतकऱ्यांनी कृषिपंपासाठी वीज जोडणीचे अर्ज केले आहेत, ते पूर्ण करण्यासाठी कमी उच्चदाबाच्या वाहिनीवरुन देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विधानसभेत सांगितले.

परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या उच्चदाब प्रणाली अंतर्गत कामे अपूर्ण असल्याबाबतचा प्रश्न सदस्य डॉ.राहूल पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ.राऊत म्हणाले, परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत डिसेंबर अखेर 3 हजार 963 कृषीपंपांपैकी 1442 पंपांना वीज जोडणी देण्यात आली. जानेवारी 2020 अखेरपर्यंत नव्याने 1705 जोडण्या देण्यात आल्या. 2278 कामे प्रगतीपथावर असल्याचे डॉ.राऊत यांनी सांगितले.

दरम्यान एका उपप्रश्नाला उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, परभणी जिल्ह्यातील पेड पेंडींगची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करण्यात येतील.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देत असताना मंत्री डॉ.राऊत म्हणाले, उच्चदाब वितरण प्रणालीतून देण्यात येणाऱ्या जोडणीसाठी सध्या मुदतवाढ दिली आहे. मुदत संपली तरी या प्रणालीच्या जोडण्या कमी दाबाच्या प्रणालीवरुन देऊन शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. दरम्यान या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिल बाबर, सुधीर मुनगंटीवार, विनय कोरे यांनी भाग घेतला.

000

येत्या शैक्षणिक वर्षापासून सामजिक न्याय विभागाच्या

वसतिगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय योजना राबविणार

– सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 27 : सामजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या वसतिगृहांसाठी मध्यवर्ती भोजनालय व्यवस्था येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य मोहन मते यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. मुंडे म्हणाले, नागपूर येथील गड्डी गोदाम वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत आंदोलन केले होते. चौकशीअंती या वसतिगृहाचे गृहपाल यांची बदली करण्यात आली. तसेच भोजन पुरवठा करणारा कंत्राटदार देखील बदलण्यात आला. अशा स्वरुपाच्या तक्रारींची दखल घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून मध्यवर्ती भोजनालय संकल्पना राबविण्यात येईल. त्याचबरोबर वसतिगृहासंदर्भातील सोयी-सुविधा, भोजन व्यवस्था यांचा दर्जा राखण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

राज्यात सामाजिक न्याय विभागाची मुलींसाठीची जी वसतिगृहे आहेत तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या वर्षभरात मुला-मुलींच्या सर्व वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, असे श्री. मुंडे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने जो सकस आहार ठरवून दिलेला आहे, त्यानुसार भोजन दिले जाते. मात्र राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या सर्व ठिकाणच्या वसतिगृहांमध्ये समान दर्जाच्या सुविधा, भोजन मिळण्याकरिता धोरण तयार करत असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले. 

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री संग्राम थोपटे, राधाकृष्ण विखे-पाटील, विकास ठाकरे, रवि राणा यांनी भाग घेतला.

000

मातृभाषेचा आदर करून समृद्ध मराठी भाषेचा वारसा जपूया – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे आवाहन

मुंबई, दि. 27 : मातृभाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मराठी भाषा ही समृद्ध भाषा असून तिचे जतन आणि संवर्धन करून मराठी भाषेचा वारसा जपूया असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

 

मराठी भाषा गौरव दिन विद्यापीठ आणि महाविद्यालयात अनिवार्य करण्यात आला असल्याने मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. सामंत बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कुसुमाग्रज यांचे मोलाचे योगदान आहे.  वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा करतो. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या समृद्ध साहित्याचे वाचन केले पाहिजे.

श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व लोककला जपल्या पाहिजेत आणि लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे. आपल्या मातृभाषेचा आदर राखत सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये तिचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे आणि सर्व शासकीय/अशासकीय, अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये यामध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’  साजरा करणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

मंत्र्यांच्या निवासस्थानांना ऐतिहासिक गड किल्ल्यांची नावे द्यावीतउदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मंत्री, राज्यमंत्री यांना वाटप करण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना राज्यातील विविध गडकिल्ल्यांची नावे देण्यात यावीत, अशी विनंती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यांची नावे मंत्रालयासमोरील मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांना देण्यात यावीत. असे विनंतीपत्र  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना  देण्यात आले आहे. 

मंत्री आणि राज्यमंत्री यांना वाटप केलेले शासकीय निवासस्थान क्रमांक आणि  विनंती केलेल्या निवासस्थानांची नावे  पुढीलप्रमाणे आहेत –

अ–     सिंधुदुर्ग,     राजगड,५ प्रतापगड ,६ रायगड, ९ तोरणा, १ सिंहगड, २ रत्नदुर्ग,३ जंजिरा,   पावनगड, ५ विजयदुर्ग, ६ सिद्धगड,       पन्हाळगड,  आचलगड, २ ब्रम्हगिरी,        पुरंदर,       शिवालय, ५अजिंक्यतारा,    प्रचितगड ,        जयगड, ८ विशालगड अशी नावे देण्यात यावीत अशी विनंती करण्यात आली असल्याचेही श्री.सामंत यांनी सागितले.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारुड, पोवाडा, नमन आदी लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाचे

प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी,  कुलसचिव डॉ. अजय देशमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

००००

काशीबाई थोरात/विसंअ/27.2.2020

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मत्स्य दुष्काळाबाबत समिती स्थापन करणारमत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख

       

मुंबई, दि. 27 : मत्स्य दुष्काळाबाबत समिती स्थापन करणार असून चार महिन्यांत समितीचा अहवाल आल्यानंतर मत्स्य दुष्काळाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी आज विधानपरिषदेत दिली.

राज्यातील मच्छिमारांना डिझेल परताव्याची रक्कम देण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. शेख बोलत होते.

श्री. शेख म्हणाले, डिझेल तेलावरील प्रतिपूर्ती योजनेंतर्गत राज्यातील सात सागरी जिल्ह्यांना सन 2018-19 मध्ये 54 कोटी व 2019-20 मध्ये 78 कोटी वाटप केले. आगामी अर्थसंकल्पात 137.85 कोटी इतक्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे. डिझेल परताव्यासाठी वितरीत निधी डीबीटीद्वारे मच्छिमारांच्या खात्यावर थेट जमा करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरुन केली जाते.

डिझेल परताव्याचा फॉर्म हा आता मराठी भाषेत मच्छिमारांना देण्यात येईल. राज्यातील मच्छिमारांना डिझेल तेलावरील प्रतीपूर्ती योजनेंतर्गत परताव्याची रक्कम देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याचेही श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदस्य सर्वश्री निरंजर डावखरे, ॲड.हुस्नबानू खलिफे यांनी सहभाग घेतला.

000

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची

मदत देण्याची कार्यवाही सुरुकृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 27 : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत देण्याबाबत प्रश्न सदस्य रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. भुसे बोलत होते.

श्री. भुसे म्हणाले, खरीप हंगाम 2019 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांनी 1.26 कोटी अर्जाद्वारे पीकविमा योजनेत भाग घेतला आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये भाग घेतलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्राचे पंचनामे करुन अहवाल भारतीय कृषी विमा कंपनी व बजाज अलियान्झ कंपनीस पाठविण्यात आला असून विमा कंपनीकडून नुकसानीची परिगणना करण्याची कार्यवाही सुरु आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विमा कंपनीमार्फत  केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

केंद्र व राज्यस्तरावर नुकसानभरपाई निश्चित करण्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात आला व त्यानुसार संबंधित विमा कंपन्यांना नुकसान भरपाई अदा करण्याबाबत केंद्र शासनाच्या11 फेब्रुवारी 2020 च्या पत्रान्वये सूचना देण्यात आल्या असून विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

राज्यातील ज्या10 जिल्ह्यात विमा कंपनी पोहोचल्या नाहीत त्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती पुनर्वसन निधीच्या (NDRF) धर्तीवर मदत देण्यात येणार असल्याचेही श्री.भुसे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, सदाभाऊ खोत, रणजीत पाटील, विनायक मेटे आदींनी सहभाग घेतला.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

विधानपरिषद व विधानसभेत ठरावाद्वारे केंद्राकडे शिफारस

मुंबई, दि. 27 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत केंद्र शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी शिफारस केंद्र शासनाकडे करणारा ठराव विधानपरिषद आणि विधानसभेत करण्यात आला. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी नियम 110 अन्वये हा शासकीय ठराव विधानसभेत तर राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी विधानपरिषदेत मांडला होता.

मराठी भाषा ही अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करीत असल्याने केंद्राने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, असे यावेळी सदस्यांनी सांगितले. या मागणीच्या पूर्ततेसाठी केंद्र शासनाकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्यात यावे, तसेच या मागणीच्या पाठपुराव्यासाठी एक समिती नेमण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. या सूचनांचे स्वागत करुन राज्य शासन यावर निश्चित कृती करेल. मराठी ही प्राचीन भाषा असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय अभिजात भाषेच्या दर्जासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत आहे. त्यामुळे मराठीला हा दर्जा तातडीने मिळणे आवश्यक असून यासाठी सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार कृती करण्यात येईल, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मराठी ही संस्कृतपेक्षाही जुनी भाषा असल्याचे सिद्ध झाले आहे. पुरातन मराठी, मध्यकालीन मराठी व आजची मराठी एकच असल्याचेही सिद्ध झाले आहे. १९२७ साली श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी मराठीचे वय २५०० वर्षापेक्षा जास्त असल्याचे दाखवून दिले आहे. मराठी ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे महामहोपाध्याय राजारामशास्त्री भागवत यांनी १८८५ मध्ये दाखवून दिले आहे. प्रा. रंगनाथ पठारे समितीने ही भाषा अभिजात भाषेच्या दर्जासाठी पात्र असल्याचा पुराव्यानिशी निर्वाळा दिला आहे. तरीही या भाषेला हा दर्जा मिळत नसल्याबाबत मराठी भाषिकांच्या मनात शल्य आहे. तेव्हा केंद्र शासनाने विनाविलंब याबाबतीत निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

सर्वपक्षीय सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. सदस्यांच्या एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. आशिष शेलार, राहुल नार्वेकर, रवींद्र वायकर, रमेश कोरगावकर आदींनी यावर विचार मांडले.

००००

इर्शाद बागवान/विसंअ/27.2.2020

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले अनुभव साहित्यातून व्यक्त करावेत – ‘माहिती व जनसंपर्क’चे सचिव डॉ. पांढरपट्‌टे यांचे आवाहन

आपलं मंत्रालयया गृहपत्रिकेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक प्रदान समारंभ 

मुंबई, दि. 27 : ‘लिहिता येणं हा दुर्मिळ गुण असून मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तो जोपासला पाहिजे. साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेले अनुभव रोजच निरनिराळ्या कामांतून आणि अभ्यागतांच्या भेटीतून येत असल्याने आपलं मंत्रालयच्या व्यासपीठावर ते अभिव्यक्त करावे’, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रकाशित करण्यात येत असलेल्या‘आपलं मंत्रालयया गृहपत्रिकेच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालक (माहिती/प्रशासन) अजय अंबेकर, संचालक (माहिती/वृत्त) सुरेश वांदिले, संचालक (विशेष कार्य) शिवाजी मानकर, उपसंचालक अनिल आलूरकर उपस्थित होते.

मंत्रालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यक्त होण्यासाठी आपलं मंत्रालय हे हक्काचे व्यासपीठ आहे. या नियतकालिकाच्या वर्धापन दिनानिमित्त कथा, लेख, छायाचित्र, अनुभव व कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना सचिव डॉ. पांढरपट्‌टे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तकांचा संच देऊन गौरवण्यात आले. यावेळी किरण शार्दूल यांना पर्सन ऑफ द आपलं मंत्रालय 2019’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रास्ताविक श्री. वांदिले यांनी तर आभार प्रदर्शन श्री. आलूरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण कुलकर्णी यांनी केले.

स्पर्धेतील विजेते :

कथा स्पर्धा :प्रथम – सुधीर वेदपाठक, द्वितीय – भरत लब्दे , तृतीय – मानसिंग उ. पाटील, चतुर्थ – सारिका निलेश चौधरी व पाचवा क्रमांक दिवाकर मोहिते.

लेख स्पर्धा :प्रथम – किरण शार्दूल, द्वितीय – सारिका निलेश चौधरी तर तृतीय क्रमांक अतुल नरहरी कुलकर्णी.

छायाचित्र स्पर्धा :प्रथम – दुर्गाप्रसाद मैलावरम, द्वितीय – प्रशांत वाघ, तृतीय – नंदकिशोर नीलम साटम, चतुर्थ – पंकज कुंभार तर पाचवा क्रमांक महादेव शांताराम मगर.

अनुभव स्पर्धा :प्रथम – किरण शार्दूल, द्वितीय – पद्मजा श्रीपाद पाठक, तृतीय – चित्रा धनंजय चांचड, चतुर्थ – महेश पांडुरंग पाटील तर पाचवा क्रमांक प्रियंका बापर्डेकर.

कविता स्पर्धा :प्रथम – सुरेश नाईक, द्वितीय – मानसिंग उ. पाटील, तृतीय – वृषाली सचिन चवाथे, चतुर्थ – संजीव केळुस्कर व पाचवा क्रमांक शैला जंगम.

आपलं मंत्रालयचा अंक प्रकाशित

पारितोषिक वितरण समारंभादरम्यान ‘आपलं मंत्रालय’च्या फेब्रुवारीच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांच्या हस्ते करण्यात आले.  मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अनुभव, कविता, शुभवर्तमान व मंत्रालयातील घडामोडींचा यात समावेश करण्यात आला आहे.

अमरावती जिल्ह्यातील १५६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री पेयजल योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश

मुंबई दि.27 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने अंमलबजावणी सुरू असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. 156 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणाचे काम मुख्यमंत्री पेयजल योजनेत समाविष्ट करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

156 गावे पाणीपुरवठा योजना 20 वर्षाहून अधिक जुनी झालेली मोठी योजना आहे. यामधील 10 गावांना यापूर्वी गुरुत्व पद्धतीने पाणीपुरवठा होत होता. मात्र तो अपुरा पडू लागल्यामुळे नवीन टाक्या बांधण्याचे आणि 12 गावांमध्ये वितरण व्यवस्था टाकण्याचे काम हाती घेण्यात यावे. तसेच ही योजना खारपाण पट्ट्यात असल्यामुळे योजनेचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी योजनेचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

105 गावे योजना नवीन जलजीवन मिशनमध्ये घेण्यात यावी तसेच 40 लिटरऐवजी 55 लिटर प्रतिमाणसी या क्षमतेची करण्यासह पुढील 30 वर्षाचे नियोजन करुन योजनेचा आराखडा तात्काळ तयार करावा, त्यास मान्यता दिली जाईल. 70 गावे पाणीपुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च आणि वसुली तसेच योजना चालविण्यातील खर्चाची तफावत पाहता ग्रामविकास विभागासोबत बैठक घेऊन त्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात, असेही मंत्री श्री. पाटील आणि श्रीमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. यावेळी अमरावती पाणीपुरवठा योजनेचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीस आमदार सर्वश्री प्रविण पोटे-पाटील, बळवंत वानखडे, प्रताप अडसड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (म.जि.प्रा.)सदस्य सचिव अभय महाजन, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव चंद्रकांत गजभिये, म.जि.प्रा.चे अधीक्षक अभियंता पी. डी. भामरे आदी उपस्थित होते.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.27.2.2020

माथाडी कामगारांच्या घरकुलांची प्रक्रिया गतिमान करणार; मंडळाच्या नावावर छळवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

 मुंबई, दि. 27 : – माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला वडाळा व चेंबूर येथे शासनाकडून मिळालेल्या जमिनीवरील गृहप्रकल्पातील सदस्यांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, मंडळाच्या कार्यालयीन सेवेत पदभरती करताना माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, माथाडी कामगार मंडळाची पुनर्रचना तातडीने व्हावी तसेच माथाडी कामगारांच्या नावाने उद्योगांना लुबाडणाऱ्या बोगस टोळ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, आदी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात विधानभवनात आज झालेल्या बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री व माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील आदींसह वरिष्ठ शासकीय अधिकारी, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनीयनचे पदाधिकारी, माथाडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर माथाडी कामगार मंडळाची तसेच सल्लागार समितीची पुनर्रचना करण्याचे प्रस्तावित आहे. महामंडळ व समितीवर कामगार संघटनांना योग्य प्रतिनिधीत्वं देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले.

माथाडी कामगारांसाठी वडाळा व चेंबूर येथे साधारणपणे चार हजार घरांचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यातील सभासदांची पात्रता प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. कामगारांच्या मुलांना मंडळाच्या कार्यालयीन सेवेत प्राधान्य देण्यात यावे, माथाडी हॉस्पिटलचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, माथाडी कायद्यातील त्रूटी दूर करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, आदी निर्णय बैठकीत घेण्यात आले. कळंबोली येथील स्टील मार्केटमधील रस्ते व अन्य आवश्यक सुविधा सिडकोच्या माध्यमातून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले.

माथाडी मंडळाच्या नावाने बोगस व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून व्यापारी व उद्योगांची सुरु असलेली छळवणूक थांबवण्यासाठी कठोर पोलिसी कारवाई करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी  बैठकीत दिले. यासाठी कामगार नोंदणी व कार्यक्षेत्राच्या मर्यादेचे नियम कठोर करण्यात येणार आहेत. माथाडी कामगारांनी पतसंस्थांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते मंडळामार्फत भरण्याची प्रक्रिया पूर्ववत करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाणार आहे. बाजार समितीच्या परवानाधारक मापाडी व तोलणार कामगारांना बाजार समितीच्या कार्यालयीन सेवेत घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भातील सर्व संबंधितांची पुन्हा एकदा बैठक घेऊन करण्यात येणार आहे.

मराठीतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अनुराधा पाटील यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. 27 : मराठी भाषा ही वीरांची भाषा आहे. तिला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे, ती शतकानुशतके टिकून राहील. मराठी भाषेतील विपुल साहित्यसंपदेमुळे महाराष्ट्र समृद्ध आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री.ठाकरे बोलत होते.

यावेळी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार राहूल नार्वेकर, मराठी भाषा सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, दहावीपर्यंत मराठी भाषा सर्व शाळांमधून अनिवार्य करण्यासाठीचा कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाला आहे.  हा कायदा माझ्या कालावधीत होत आहे, हे माझे भाग्य. लहानपणापासून साद घालणारे अंगाईगीत, नंतर भावगीत, युद्धभूमीवरील समरगीत, शाहिरांच्या रुपाने अंगात वीरश्री संचारणारा पोवाडा या सर्वांमुळे मराठी समृद्ध आहे. हे अक्षरधन पुढच्या पिढ्यांना देत राहावे. मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढीसाठी जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.

परप्रांतियांनीदेखील ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याची भाषा आत्मसात करावी आणि त्याचा वापर करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा27 फेब्रुवारी हा जन्मदिन  राज्य शासनाकडून मराठी भाषा गौरव दिनम्हणून साजरा करण्यात येतो.

मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस‘श्री.पु.भागवत पुरस्कारप्रदान करण्यात येतो.

निवड समितीने यावर्षीच्या‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठीज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांची तसेच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली.

मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस‘भाषा संवर्धन पुरस्कारप्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली. साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार विजेते या सर्व साहित्यिकांचा मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.

मराठी भाषेचा प्रवास दर्शविणारा आणि मराठी भाषेची सौंदर्यस्थळे मांडणारा सांस्कृतिक कार्यक्रम‘प्रवास आणि प्रवाह’  हा यावेळी सादर करण्यात आला.

मराठी भाषा अक्षर संपत्ती

स्थानिय लोकाधिकार समिती महासंघातर्फे मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे म्हणाले, संपत्ती म्हणजे पैसा, जमीन, घर, त्याचप्रमाणे मराठी भाषा सुद्धा अक्षरधन आहे. मराठी भाषा ही भक्तीची भाषा असून तिची आपण मनापासून भक्ती केली पाहिजे. मराठी अभिजात भाषा झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले. मरिन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित या कार्यक्रमास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार गजानन किर्तीकर, खासदार अनिल देसाई, ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आदी उपस्थित होते. यावेळी अभिजात मराठीया पुस्तकाचे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

००००

अर्चना शंभरकर/ विसंअ/ मराठी भाषा गौरव दिन/27-2-20

विधानसभा प्रश्नोत्तरे

वित्तीय संस्थांच्या निधीतून कोस्टल रोडच्या कामाला प्राधान्यउपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 26 : पायाभूत सुविधांच्या कामांसाठी वित्तीय संस्था निधी देतात. कोस्टल रोडच्या  कामाला अशा निधीच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाईल. यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येतील,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य भास्कर जाधव यांनी मुंबई व कोकण पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी एका उपप्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या विभागाच्या पर्यटन विकासाकरिता निधी उपलब्धतेसाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडे आराखडा सादर करण्यात आला होता. मात्र बँकेमार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या बाबींमध्ये पर्यटन ही बाब अग्रक्रमी नसल्याचे बँकेने कळविले आहे. कोकणच्या पर्यटन विकासासाठी आराखडा करण्यात आला असून स्थानिकांना रोजगार, समुद्र किनारे, हॉटेल याबाबत धोरण तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणामध्ये आता पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम तसेच चिपी विमानतळदेखील सुरु होत आहे. त्यामुळे कोकणचा पर्यटन विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य वैभव नाईक यांनी भाग घेतला.

000

वन नेशन वन रेशन कार्डयोजना राज्यात राबविणार

छगन भुजबळ

मुंबई, दि. 26 : केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात वन नेशन वन रेशन कार्डही योजना जून महिन्यापासून राबविण्याची शक्यता आहे. राज्यातही ही योजना राबविण्यासाठी राज्य शासनाची तयारी असल्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य आशिष शेलार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, ज्या भागात स्वस्त धान्य दुकानांवर ई-पॉस मशीन नादुरुस्त आहे, तेथे लाभार्थ्यांना अन्य मार्गाने धान्य मिळावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मशीन बंद असले तरी अन्य कागदपत्रे तपासून धान्य देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

दुर्गम भागामध्ये नेटवर्क उपलब्ध नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन धान्य देण्याची परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य दिले जात नाही, तेथे चौकशी करुन कारवाई केली जाईल असेही श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री आशिष शेलार, संग्राम थोपटे, अतुल भातखळकर यांनी भाग घेतला.

000

ऑनलाईन औषध विक्रीसंदर्भात केंद्र शासनाचा कायदा अंतिम टप्प्यात;

आवश्यकता भासल्यास महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करु

                                      डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई, दि. 26 : ऑनलाईन औषध विक्री संदर्भात केंद्र शासनाचा कायदा अंतिम टप्प्यात असून त्यात आवश्यकता वाटल्यास बदल करुन महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य संग्राम थोपटे यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना डॉ.शिंगणे म्हणाले, औषधे व सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन करुन ऑनलाईन औषधे विक्री करण्यास बंदी आहे. राज्यामध्ये गेल्या पाच वर्षात 66 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून 29 परवाने रद्द करण्यात आले आहे.

गर्भपाताची, गुंगीसाठीच्या औषधांची ऑनलाईन विक्री होऊ नये असे मत महाराष्ट्राने केंद्र शासनाला प्रस्तावित कायद्याच्या मसुद्यासाठी सुचविले आहे. हा कायदा अंतिम टप्प्यात असून आवश्यकता भासल्यास महाराष्ट्राचा स्वतंत्र कायदा केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अमीन पटेल, सुधीर मुनगंटीवार, विकास ठाकरे, संग्राम थोपटे, श्रीमती भारती लव्हेकर, देवयानी फरांदे यांनी भाग घेतला.

000

स्वयंचलित वाहन निरिक्षण, तपासणी केंद्रासाठी

महिन्याभरात निविदा काढणारॲड.अनिल परब

मुंबई, दि. 26 : नेहरु नगर कुर्ला येथे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जागेवर स्वयंचलित वाहन निरीक्षण व तपासणी केंद्राच्या कामासाठी मंजुरी दिली असून, एका महिन्यात त्याची निविदा काढली जाईल, असे परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री.परब म्हणाले, पुणे येथील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र स्थापन करण्यात प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया महिन्याभरात पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी भाग घेतला.

000

खाजगी शाळांच्या शुल्क वाढीच्या नियंत्रणासाठी

विभागीय समित्यांची लवकरच स्थापना करणार

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 26 : राज्यातील खाजगी शाळांच्या शुल्क वाढीवर नियंत्रण ठेवण्याकरिता राज्य स्तरावर समिती गठित करण्यात आली असून विभागीय समित्या येत्या दोन ते तीन दिवसात स्थापन केल्या जातील असे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्रीमती गायकवाड बोलत होत्या. या संदर्भात माजी न्यायमूर्ती श्री. ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन झाली असून विभागीय समित्या नेमण्याची कार्यवाही सुरु आहे. त्या स्थापन झाल्यानंतर शुल्क वाढीसंदर्भात तक्रारी करता येतील. शुल्क वाढ नियंत्रणासंदर्भात विधिमंडळाच्या सदस्यांच्या सूचनादेखील विचारात घेण्यात येतील. याबाबत लवकरच सदस्यांची बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष जयस्वाल, आशिष शेलार, सुभाष धोटे, किशोर जोरगेवार, नितेश राणे यांनी भाग घेतला.

000

पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करणारशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 26 : राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा हा विषय शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी मराठी भाषा दिनानिमित्त मांडण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली.

आज राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत सदस्य मंगेश कुडाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला. त्यास उत्तर देताना मंत्री श्रीमती गायकवाड बोलत होत्या. यावेळी सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभु, आशिष शेलार, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री श्रीमती गायकवाड म्हणाल्या, सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याबाबतचे विधेयक उच्च सभागृहात मांडले जाणार असून, मराठी भाषा दिनानिमित्त ते विधानसभेत उद्या मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी, केंद्रीय, आंतरराष्ट्रीय या सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून, ज्या शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाहीत,  त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, प्राथमिक आणि माध्यमिक अशा वर्गवारीत टप्प्याटप्प्याने या मराठी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

त्याचबरोबर, ज्या खाजगी शाळा शैक्षणिक शुल्काबाबत नियम पाळत नाहीत अथवा गरजेपेक्षा जास्त शुल्क आकारतात अशा शाळांबाबत तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित उपप्रश्नास दिली.

००००

ताज्या बातम्या

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप

0
यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : वनहक्‍क कायदा २००६ च्‍या अंमलबजावणी अंतर्गत जिल्‍हास्‍तरीय वनहक्‍क समितीने मंजुरी दिलेल्‍या केळापुर उपविभागामधील केळापुर, घाटंजी व झरी जामणी या तालुक्‍यातील...

बोगस बियाणे, लिंकींग, साठेबाजी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही – पालकमंत्री संजय राठोड

0
पालकमंत्र्यांकडून खरीप हंगामपूर्व तयारी आढावा जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना मृद पत्रिका देणार वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेल्यांना रोखीने परतावा यवतमाळ, दि.17 (जिमाका) : येत्या खरीप...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नंदुरबार, दिनांक 17 मे, 2025 (जिमाका) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे, असे स्पष्ट मत राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले. त्यांनी आज...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशीलेचे उद्घाटन

0
पुणे, दि.१७: जागतिक, राष्ट्रीय, जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमुलाग्र बदल विचारात घेता सहकारी...

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आवश्यक आहे. यासाठी  गोरेवाडा परिसरातील...