रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1630

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 1 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, हा अर्थसंकल्प देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, ‘हम सब एक है’ या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे.

विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास अशा सात प्रमुख मुद्द्यांवर केंद्रित ‘सप्तर्षी योजना’ म्हणून ओळखला जाईल असा हा अर्थसंकल्प आहे. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची फळं देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचावीत आणि अंत्योदयाचे पंतप्रधानांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे ह्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. नालेसफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.

देशातील अत्यंत प्रामाणिक अशा नोकरदार मध्यमवर्गाचादेखील उचित विचार या अर्थसंकल्पात केला आहे.

एकूणच भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवी वर्षाचा अमृतकाल सुरु असताना, आणि जग मंदीशी आणि इतर विविध समस्यांशी झुंजत असताना, ह्या अर्थसंकल्पाने भारत महासत्ता होण्यासाठी एक पाऊल तर टाकलंच आहे पण त्याचवेळेस संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

०००

वर्षा आंधळे/विसंअ/

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी समिती गठित

मुंबई, दि. 1 : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी निवड समिती गठित केली आहे.

एनसीईआरटीचे माजी संचालक प्रा. जगमोहन सिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड समिती गठित करण्यात आली आहे.

सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. अनुपम शुक्ला, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच भोपाळ येथील मध्य प्रदेश भोज मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. रवींद्र कान्हेरे (यूजीसी प्रतिनिधी) हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई वायुनंदन यांचा कार्यकाळ दिनांक ७ मार्च २०२२ रोजी संपल्याने विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

००००

Governor constitutes Search Committee for selection of Open University VC

Mumbai, 1st Feb : Maharashtra Governor and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari has constituted a Search Committees for the selection of a new vice chancellor of the Yashwantrao Chavan Maharashtra Open University, Nashik. Former Director of NCERT Prof Jagmohan SIngh Rajput will be chairman of the Committee.

Prof. Anupam Shukla, Director, Sardar Vallabhbhai National Institute of Technology, Surat, Vikas Chandra Rastogi, Principal Secretary, Higher & Technical Education Department and Prof. Ravindra Kanhere, former Vice Chancellor of Madhya Pradesh Bhoj Open University will be the other members of the Search Committee.

The term of YCMOU vice chancellor Prof. E. Vayunandan had ended on 7th March 2022. The Vice Chancellor of Mahatma Phule Krishi Vidyapith, Rahuri Dr. Prashantkumar G. Patil has been holding the additional charge of the post of the YCMOU Vice Chancellor since then.

0000

 

बचतगटांच्या माध्यमातून राज्यात उत्कृष्ट काम सुरु – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. १ : बचतगटांच्या माध्यमातून महिला उत्कृष्ट काम करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान आणि सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आजपासून राज्यात सुरू होणाऱ्या जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम (जीटीएम) उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदतच होणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राजभवन येथे आज  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) राबवित असलेल्या नव तेजस्विनी  ‘जेंडर ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझमच्या अंमलबजावणी उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या  विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका, जी टी एम च्या भारत प्रमुख मीरा मिश्रा, आयफॅडचे  रोम, इटली व भारतातील प्रतिनिधी तसेच बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रतिनिधी व वॉशिंग्टन विद्यापीठातील, सनियंत्रण आणि मूल्यमापन तज्ज्ञ, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणारा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम महिला आर्थिक विकास महामंडळ उत्कृष्टपणे राबवेल. आगामी सहा वर्षात या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महिला बचत गटांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के होते. त्यामुळे बँका देखील त्यांना कर्ज देण्यासाठी उत्सुक असतात. महिलांच्या विकासासाठी जागतिक स्तरावरून  होत असलेले सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. शासनाकडून देखील महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम व योजना राबवल्या जातात. कोणत्याही योजनेचा लाभार्थी असेल त्याला  अनुदान देताना थेट ग्राहकांच्या खात्यात दिले जाते.

महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. साहजिकच महिलांचे विकासात योगदान वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही देशाची प्रगती आहे. आज बचत गट काम करताना व्यापक स्वरूपात काम करू शकतात. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्ये वर्ष म्हणून जाहीर केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात पौष्टिक तृणधान्यांना आरोग्यविषयक महत्त्व व आहारातील वापर वाढवण्याकरता मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. हे लक्षात घेऊन महिला बचत गटानेदेखील पौष्टिक तृणधान्य या संस्कृतीला पुढे नेणे गरजेचे आहे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले.

आयफेडचे ग्रामविकासात महत्त्वाचे योगदान : नदिया बेल्टचिका

ट्रान्सफॉरमेटिव्ह मॅकेनिझम आयफॅडच्या विशेषतज्ञ नदिया बेल्टचिका म्हणाल्या की,इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंटचे ग्राम विकासामध्ये खूप मोठे योगदान आहे. ‘जीटीएम’ साठी निवड करण्यात आलेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जीटीएम या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात आगामी सहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येईल.

जीटीएम या उपक्रमासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य – प्रधान सचिव आय. ए. कुंदन

महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन म्हणाल्या  की, इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट आणि बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने जीटीएमया उपक्रमासाठी सहा वर्षासाठी ४० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले आहे. जीटीएमच्या उपक्रमाची अंमलबजावणी वर्ष २०२३-२४ पासून सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने लीड राज्य म्हणून राष्ट्रीय स्तरावर ‘माविम’ने केलेल्या कामांच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. माविम ने आपल्या कार्याची  एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला बचत गटांना डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन  सक्षमीकरण करणे, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी महिला बाल विकास विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे, असेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांनी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

कांदाटी खोरे- विकास दृष्टीकोन आणि ध्येय

कांदाटी खोऱ्यातील बरीचशी गावे ही कोयना धरणात गेली आहेत.  हे खोरे कोयनेच्या जलाशयाने वेढलेले आहे. या खोऱ्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तापोळा, बामणोली या भागाला तर मिनी काश्मिर असे म्हटले जाते. येथे येणा-या पर्यटकांचा ओढा बघता येथे पर्यटन वाढीसाठी व स्थानिकांच्या रोजगारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी  पर्यटन व रोजगार निर्मितीबाबत आराखडा प्रशासनास तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. या आराखड्या विषयी माहिती.

या अाराखड्यानुसार उपजीविकेच्या पर्यायांमध्ये विविधिता उपलब्ध करुन देणे (कृषी, वन, पशुधन, पर्यटन, पाणी आणि स्वच्छता). पर्यटनाच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता सुविधांमध्ये सुधारणा. रस्ते जोडणी आणि दळवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा. पाणलोट क्षेत्र आणि झऱ्यांच्या व्यवस्थापनाविषयी वाव. पर्यटन अनुभवामध्ये विविधता (धार्मिक, साहसी, निसर्ग, जल पर्यटन) ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी विकसित करणे सेवा प्रदाता आणि उद्योजक म्हणून स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमता वर्धन व क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता समुहांना योग्य संधी उपलब्ध करुन देणे.

लोकांची उद्योजकता, पर्यटन आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन यावर आधारित सरकारी व्यवस्था आणि खासगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरण पूरक, शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोक समुदाय तयार करण्यात येणार आहे. यामध्ये सक्रीय लोक समुदाय, कौशल्य आणि क्षमता बांधणी, तांत्रिक आणि व्यवस्थापन सहाय्य व हवामान बदलाशी सुसंगत कार्यपद्धती यावर भर देण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होम-स्टे व्यवस्था विकसित करणे, जलाशय काठच्या ठिकाणी टेंट व कॉटेजेसची व्यवस्था, जंगलातील मुक्काम स्थळे विकसीत करणे. कृषी पर्यटन स्थानिक जीवनाशी आणि कृषी पद्धतींचा अभ्यास, निसर्ग प्रेमींसाठी दरदिवशी किंवा शनिवार-रविवार निसर्ग सहलींचे नियोजन करणे. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकींगची सोय उपलब्ध करुन देणे. डोंगर माथ्यांवरील आकाश निरीक्षण सहलींचे नियोजन, दोन-तीन प्रमुख ठिकाणी (उत्तेश्वर, पर्वतेश्वर, चकदेव) उत्सव अशा पर्यटन स्थळांचा विकास व इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवून वर्क-एन-रिलॅक्स सुविधांसह होम-स्टे आणि रिसॉर्ट्स विकसित करणे. प्रवेश  रस्ते व पार्किंग विकसित करणे, टेंटसाठीची जागा, रस्ते यांचे व्यवस्थापन. बेटांवर जाण्यासाठी छोट्या बोटींची सुविधा विकसित करणे पर्यटकांसाठी मंडप आणि स्टॉल्सचे नियोजन, स्वच्छतागृहे व कॅफेटेरिया यांची निर्मिती करण्यात येणार आहे.

पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करण्यात येणार असून बिझनेस प्लान तयार करण्यात येणार आहे. तसेच दुधाची उत्पादकता वाढविणे, दुधावर प्रक्रिया करणे आणि दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. औषधी वनस्पती, बांबू असे वन उत्पादन गोळ करणे व पुढील व्यवस्था विषयक व्यवसाय योजना तयार करण्यात येणार आहे. मध गोळा करणे, मधावरील प्रक्रिया आणि मधाची विक्री या विषयही योजना तयार करण्यात येणार आहे.

तापोळा, महाबळेश्वर, खेड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा, कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी सुधारित ॲप्रोच रोड कनेक्टिव्हिटी वाढविण्यात येणार असून जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

भविष्यातील विकासाचा विचार करता या भागात तयार होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संघटन आणि व्यवस्थान, सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन सुविधांच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता सर्व गावांसाठी सुधारित आरोग्य सुविधांची उपलब्धता, आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी तात्काळ पोहचविण्याची सुविधा 16 गावांसाठी  आराखड्यानुसार करण्यात येणार आहे.

पर्यटन व रोजगार निर्मिती आराखड्याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही वारंवार बैठका घेवून वेळोवेळी बहुमूल्य अशा सूचना केल्या आहेत. आराखडा लवकरच तयार होवून त्यांची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार या भागातील स्थलांतर कमी  होवून नागरिकांना गावातच रोजगाराबरोरच  सर्व सुविधा मिळणार आहेत.

 

 संकलन – जिल्हा माहिती कार्यालय, सातारा

राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. १ : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या १२५ छात्रसेनेच्या चमूचा सन्मान आज मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, जामनेर नगराध्यक्ष साधना महाजन, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी हे उपस्थित होते.

मंत्री श्री महाजन म्हणाले की, छात्रसेना संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगिरी अतिशय दिमाखदार आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करत शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मी सुद्धा एनसीसीच्या माध्यमांतून विद्यार्थी दशेत सहभागी होतो, अशी आठवण या निमित्ताने मंत्री श्री.महाजन यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.

यावेळी आरडीसी कन्टिजंट अधिकारी म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयातील एनसीसी आधिकारी लेफ्टनंट डॉ.नंदकुमार बोराडे तसेच आरडीसी कन्टिजंट कमांडर कर्नल निलेश पाथरकर यांचा सत्कार मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

००००

राजू धोत्रे/विसंअ

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 31 : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ हा चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथास  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीचा तृतीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. याशिवाय  आंतरराज्य सांस्कृतिक स्पर्धेत राज्याने द्वितीय क्रमांक पटकावला होता, अशा एकूण तीन श्रेणीतील पुरस्कारांनी यावर्षी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले.

येथील छावणी परिसरातील रंगशाळेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पुरस्कार प्रदान सोहळ्यात आंतरराज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या राज्यांची नृत्य सादर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राने ‘धनगरी’ लोककला प्रकारातील नृत्य सादर केले. त्याला द्वितीय पुरस्कार मिळाला.

असा होता राज्याचा चित्ररथ

महाराष्ट्राने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन घडविण्यात आले होते. उच्चस्तरीय समितीने निकषांच्या आधारे राज्याच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला होता.

आतापर्यंत राज्याच्या चित्ररथाला मिळालेले पुरस्कार

सन 1970 मध्ये राज्याने प्रथम चित्ररथ सादर केला होता. राजधानीतील मुख्य पथसंचलनाच्या कार्यक्रमात राज्याच्या वैभवशाली ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविले आहे.

राज्याला सन 1981, 1983, 1993, 1994, 1995, 2015, 2018 असे एकूण 7 वेळेस प्रथम पुरस्कार पटकाविलेला आहे.  सन 1993 ते  1995 असे सलग तीन वर्ष  प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम नोंदविलेला आहे. सन 1986, 1988,2009 असे तीन वेळेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. सन 2007 व 2017 मध्ये तिसरा क्रमांक राज्याने पटकावला होता. मागील वर्षी 2022 मध्ये लोकप्रिय चित्ररथाच्या श्रेणीत राज्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. यावर्षी चित्ररथाला दुसरा आणि लोक पसंती या श्रेणीत तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. असे एकूण 14 पुरस्कार आतापर्यंत राज्याला प्राप्त झाले आहेत.

00000

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र. 25 /दि.3१.01.2023

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या भूसंपादनाचे काम कालमर्यादेत पूर्ण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 31 : आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाची दुरूस्ती आणि मार्गातील प्रलंबित असलेले भूसंपादन कालमर्यादेत पूर्ण करून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीसाठी सोपविण्यात यावे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

आळंदी ते पंढरपूर रस्ता दुरूस्ती, बस स्थानक आगारातील स्वच्छता गृह, तालुका स्तरावर नवीन बस उपलब्ध करून देणे, रोना ते कोंडाळी महामार्गाचे बांधकाम, समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे होणारे नुकसान अशा विविध विषयांसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री श्री. देसाई यांनी आज मंत्रालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, आळंदी ते पंढरपूर दरम्यान सासवड ते माळशिरस पर्यंतच्या पालखी महामार्गाच्या रस्त्याचे उर्वरित ३५ टक्के काम तातडीने पूर्ण करावे. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना महामार्गालगतच्या नाल्यातील पाणी वळवावे जेणेकरून ते शेतात जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, त्यासाठी तातडीने नाले खोलीकरण, पर्यायी व्यवस्था करावी.

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील स्थानक व आगारामधील विश्रांतीगृह तसेच स्वच्छतागृहे, बसची स्वच्छता आणि उपलब्धता करून देण्याचे काम प्राधान्याने करावे.

यावेळी आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते-पाटील, दादाराव केचे, दीपक चव्हाण, राम सातपुते, परिवहन विभागाचे आयुक्त विवेक भिमनवार, एसटी महामंडळाच्या उपमहाव्यवस्थापक विद्या भिलारकर, नागपूर महामार्ग अधीक्षक अभियंता आणि वर्धा, सोलापूर, आर्वी, नागपूर विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

सीना-कोळेगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत आढावा

सीना नदीवरील करमाळा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने मंत्री श्री. देसाई यांनी आढावा बैठक घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच करमाळा तालुक्यातील ७ पुनर्वसित गावांतील वस्ती विखुरलेली असल्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर करण्याबाबतही यावेळी निर्देश दिले.

या बैठकीला आमदार  रणजितसिंह मोहिते-पाटील  उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गालगतच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी जाऊन ५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. याबाबत मंत्री श्री. देसाई यांनी बैठक घेतली. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यापुढे पावसाच्या पाण्याच्या योग्य निचरा व्हावा यादृष्टीने महामार्गालगत नाल्यांचे खोलीकरणाचे निर्देश त्यांनी दिले. याबाबत आमदार दादाराव केचे यांच्यासह मुख्य अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश वर्धाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला आमदार दादाराव केचे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे वर्धा जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकारी, अधीक्षक अभियंता (समृद्धी महामार्ग), तसेच अमरावती विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई अनुदानाचे तत्काळ वितरण करावे – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 31 : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाबाबत  आढावा घेऊन नुकसान भरपाईच्या अनुदान वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी देण्यात आलेल्या निधीचे वितरण करण्याबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. ६५ मिमीपेक्षा कमी, परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत निकष ठरवण्यासाठी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने निकष तयार केल्यानंतर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री श्री. देसाई  यांनी यावेळी स्पष्ट केले.

या बैठकीला आमदार  दीपक चव्हाण, अपर मुख्य सचिव नितीन करीर तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ

आरोग्य विभागाकडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

मुंबई, दि. 31 :  आरोग्य विषयक विविध पायाभूत सोयी सुविधा वाढविण्याची मागणी सातत्याने होत असते. लोकप्रतिनिधींकडून विविध मागण्यांचे प्रस्ताव येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा वाढ‍विणे, पदभरती आदींचा समावेश असतो. आरोग्य विभागाकडील प्रलंबित असलेले विविध प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.

मंत्रालयातील मंत्री दालनात आरोग्य विषयक विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. सावंत बोलत होते. विषयानुसार बैठकीला दहिसरचे आमदार मनीषा चौधरी, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडकर, लातूरचे आमदार अमित देशमुख, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावंत म्हणाले की, कोविड काळात मुलांवर झालेल्या मानसिक तणावाचा विभागामार्फत अभ्यास करून शोध प्रबंधाच्या स्वरूपात अहवाल तयार करावा. जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास हा अहवाल दिशादर्शक ठरेल. मानसिक आरोग्याबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. मानसिक आरोग्याबाबत कार्यक्रमाची अंमलबजावणी विहीत कालावधीत पूर्ण करावी.

भंडारा जिल्हा आरोग्य विषयक आढावा

भंडारा जिल्ह्यातील विविध आरोग्य विषयक प्रस्तावांबाबत बैठकीत श्री. सावंत म्हणाले, भंडारा महिला रुग्णालयाचे काम 75 टक्के पूर्ण झाले असल्यास ‘कर्मचारी आराखडा’ द्यावा. त्यासाठी प्रस्ताव तपासून घ्या. जिल्ह्यातील श्रेणीवर्धन करणे, खाटांची संख्या वाढविणे, रिक्त पदांची भरती, अड्याळ, पवनी, लाखांदूर, लाखणी, मोहाडी, पालांदूर व सिंहोरा ही रुग्णालये कार्यान्व‍ित करणे, मानेगाव ता. भंडारा व चिंचाड ता. पवनी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मिती, कार्यरत मनुष्यबळामध्ये वाढ करणे आदी प्रस्ताव मार्गी लावावेत.

प्रयोगशाळांच्या तपासणी यंत्रणेबाबत स्वतंत्र बैठक लवकरच

केंद्र शासनाच्या राजपत्रानुसार मेडिकल लॅबोरेटरीबाबत निर्णय घ्यावा. तसेच नियमांचे पालन न करता पॅथॉलॉजी प्रयोगशाळांमधून तपासणी अहवाल दिले जात असल्यास, चुकीचे अहवाल देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रयोगशाळांची तपासणी करणे गरजेचे आहे. याबाबत भरारी पथकांसारखी यंत्रणा उभी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे श्री. सावंत यांनी सांगितले.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय

ठाणे जिल्हा रुग्णालय, मीरा भायंदर रुग्णालय व उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय या तीनही आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय असावा. तीनही समकक्ष अधिकाऱ्यांची उपसंचालकांनी बैठक घ्यावी. त्यांचा अहवाल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कंत्राटी पद भरतीबाबत निर्णय घ्यावा. तेथूनच पदभरतीबाबत प्रस्ताव मंजूर करावा, अशा सूचना आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या पदभरतीबाबत आयोजित बैठकीत दिल्या.

लातूर जिल्हा आरोग्य विषयक आढावा

लातूर येथे नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी कृषी विभागाच्या जमिनीचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी कृषी विभागाने 10 एकर जागेसाठी मागणी केलेले 2.88 कोटी रुपये अनुदान द्यावे. तसेच पुढील जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी. ग्रामीण रुग्णालय अंतर्गत मुरूड ता. लातूर येथे ट्रेामा केअर केंद्राला प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव निकाली काढावा. बाभूळगांव ग्रामीण रुग्णालयात 20 खाटांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया युनिटचा प्रस्ताव सादर करावा. तसेच औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरणाचा प्रस्तावही मार्गी लावावा, अशा सूचना लातूर जिल्हा आरोग्य विषयक बैठकीत मंत्री श्री. सावंत यांनी दिल्या.

*****

निलेश तायडे/ससं/

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नव्याने विकसित संकेतस्थळाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अनावरण

मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नव्याने विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे अनावरण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात झाले. हे संकेतस्थळ सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता अजय सिंह आणि भारत वानखेडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे – सावेडकर, संचालक (वित्त) राजेंद्र मडके,  सतीश माने, मृणाल शेलार, ग्रँट थोर्टन कंपनीचे माहिती तंत्रज्ञान सल्लागार विजय बेलूलकर, संकेतस्थळ विकासक सेंटम टेक्नॉलॉजीजचे गुरुप्रसाद कामत यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) ही राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण १९६ कार्यालये आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सन २०१५ मध्ये संकेतस्थळ विकसित केले होते. ते सप्टेंबर २०२२ पर्यंत कार्यरत होते. त्यात आता नव्याने बदल करून http://mjp.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.

ई-गव्हर्नन्स उपक्रमांतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मचा विकास आणि अंमलबजावणी करणे, माहिती, दळण-वळण आणि तंत्रज्ञान (ICT) लागू करून प्रशासकीय प्रक्रियेचे बळकटीकरण करणे यासाठी मजीप्राच्या आयटीसेल कडून विविध केंद्रीकृत सॉफ्टवेअरचा विकास करण्यात आला. हे सॉफ्टवेअर मजीप्रामधील कार्यरत अधिकारी/ कर्मचाऱ्यांना वापरणे सुलभ जावे यासाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर वापरण्याची संधी देण्यासाठी तसेच आयटी क्षेत्रामध्ये झालेल्या बदलास अनुसरून नव्याने हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे.

नव्याने विकसित केलेल्या संकेतस्थळामध्ये पाणी व्यवस्थापन प्रणाली, केंद्रीकृत प्रकल्प देखरेख प्रणाली, टॅली, ई-एमबी, ई-बिलींग, सेवार्थ, टपाल व्यवस्थापन इत्यादी सॉफ्टवेअर मजीप्रामधील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना सुलभपणे वापरता येणार आहेत. मजीप्रा मधील विविध विभागाची संक्षिप्त माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....