शुक्रवार, जून 27, 2025
Home Blog Page 1613

श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते पूजन

सातारा दि. 22 : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री  संदिपान भुमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख  यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी फलोत्पादन, रोजगार हमी मंत्री  संदिपान भुमरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख  यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेटी देऊन स्टॉलची माहिती घेतली. याप्रसंगी श्री. विखे-पाटील व श्री. भुमरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सुयोग येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद

नागपूर, दि. 22 : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज सुयोग पत्रकार निवासस्थानी भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

सुयोग येथील सभागृहात झालेल्या अनौपचारिक चर्चेत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध योजना, विकासकामांच्या नियोजनाची माहिती दिली. सुयोग शिबिरप्रमुख विवेक भावसार व माध्यम प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, घरांची वाढलेली संख्या, गावे-शहरांचा विस्तार पाहता रस्त्यांची लांबी वाढली आहे. गुणवत्तापूर्ण रस्त्यांसाठी निधीची गरज असते. निधीचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी धोरणात बदल करणे आवश्यक आहे. तसे धोरण अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामावर भर देण्यात येत आहे.

राज्यातील रस्त्यांची स्थिती आणि दर्जा सुधारण्यासाठी आवश्यक प्रयत्न, कोकणातील, तसेच इतर विभागांतील रस्ते, धोरणात्मक निर्णय आदी बाबींविषयी चर्चा झाली. त्यानंतर मंत्री श्री. चव्हाण यांनी सुयोग येथील विविध कक्षांना भेट देऊन सुविधांची पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, दि. 21 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदिच्छा भेट देत पत्रकार बांधवांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुयोग येथील सभागृह, भोजनकक्ष आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी सुयोग येथील सभागृहात पत्रकार बांधवांशी अत्यंत अनौपचारिक वातावरणात झालेल्या चर्चेत हिवाळी अधिवेशन, निवडणूक, राजकारण, समाजकारण आदी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला.

आमदार प्रताप सरनाईक, सुयोग शिबिर प्रमुख विवेक भावसार, महेश पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

000000

महिला चालक असलेल्या वाहनांसाठी सार्वजनिक पार्किंगमध्ये आरक्षण – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

नागपूर, दि. २१: राज्यातील सार्वजनिक वाहन पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील, अशी घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर उत्तर देताना मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी महिला आता वाहने चालविताना दिसत आहेत. कॅबचालक म्हणूनही महिला काम करत आहेत. सार्वजनिक पार्किंगच्या ठिकाणी त्यांची होणारी कुचंबना, गैरसोय पाहता आता अशा सार्वजनिक पार्किंगमध्ये महिला चालक असलेल्या वाहनांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
००००

हिवाळी अधिवेशनात सहभागींसाठी ‘मराठी सिनेमा’चे आयोजन

नागपूर, दि. 21 : हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी दिवसभर विविध कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. अशात मोकळ्यावेळी त्यांना आराम मिळावा व त्यांच्यात मराठी सिनेमाची आवडही निर्माण व्हावी यासाठी प्रशासनाकडून प्रायोगिक स्तरावर मोबाईल डिजिटल मुव्ही थिएटरची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या मागे मोफत स्वरूपात विधानपरिषद व विधानसभा सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी मराठी सिनेमा दररोज अधिवेशन कामकाज संपल्यानंतर रात्री 7.00 वा. पासून ते 10.00 वा. पर्यंत दाखविण्यात येणार आहे. याची सुरूवात दि.21 डिसेंबर रोजी मराठी चित्रपट पावनखिंड ने झाली. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी उपस्थित होत्या. मुव्ही थिएटर या फॉरमॅटमध्ये असलेला हा प्रयोग आपण सर्वांनी एकदा अनुभवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मंत्री तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानमंडळ निवास व्यवस्था वाटप समितीच्या मंजुरीनुसार दि. 30 डिसेंबर पर्यंत मराठी सिनेमा दाखविण्यात येणार आहेत. एखाद्या मल्टीप्लेक्स सारख्या हुबेहुब सुविधा असलेल्या मिनी थिएटरमधे एकावेळी 120 लोक बसू शकतात.

मिनी थिएटर मधे दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी – दि.22 डिसेंबर रोजी हवाहवाई, 23 डिसेंबर रोजी सिंहासन, 24 डिसेंबर गोष्ट छोटी डोंगरा एवढी,  25 डिसेंबर हरिश्चंद्राची फॅक्टरी, 26 डिसेंबर दुनियादारी, 27 डिसेंबर जैत रे जैत, 28 डिसेंबर नटसम्राट, 29 डिसेंबर टाइमपास व 30 डिसेंबर रोजी सैराट / मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.

000000

अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि.21 : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू, असे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती  डॉ. निलम गोऱ्हे यांनी कृती समिती शिष्टमंडळाला दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, अंबाझरी, बचाव कृती समितीच्या सदस्यांनी  आमदार अमोल मिटकरी व समितीचे मुख्य संयोजक किशोर गजभिये यांच्या नेतृत्वात विधानभवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात नमूद केल्यानुसार नागपुरातील अंबाझरी तलावाशेजारील शासकीय ४४ एकर जागेत उद्यान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती सभागृह ५७ वर्षांपासून अस्तित्वात होते. मात्र सध्या ही जागा खाजगी कंपनीला ९९ वर्षाच्या करारावर देण्यात आली असून, या कंपनीने जुलै २०२१ मध्ये कोणालाही कल्पना न देता येथील आंबेडकर भवन हटविले. कंत्राटदाराच्या  ताब्यातून ही जागा सोडविण्यासाठी या बचाव कृती समितीने विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून विषय समजून घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला व योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी समितीचे पदाधिकारी डॉ. धनराज डहाट, डॉ. सरोज आगलावे, सुधीर वासे, बाळू घरडे, वर्षा शामकुडे, सिद्धार्थ उके, राहुल परुळकर, रामभाऊ आंबूलकर, प्रताप गोस्वामी उपस्थित होते.

००००

व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. 21 : युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. हीच युवा पिढी आज व्यसनाधीन होत असतांना दिसत आहे. युवापिढीला व्यसनाच्या गर्तेतून बाहेर काढून नशामुक्त भारताचा संदेश देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालय यांच्या मार्गदर्शनात राधिका क्रीएशन नागपूर प्रस्तुत ‘‘मोहजाल’’ या  नाटिकेचा 25 वा प्रयोग आज 21 डिसेंबर रोजी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सादर करण्यात आला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंगल, समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, डॉ. मंगेश वानखेडे, भरत केंद्रे, नागपूर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, देशात आज युवावर्गामध्ये अंमली पदार्थ सेवनाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. अंमली पदार्थ सेवनाच्या अतिआहारी जाऊन काही जणांनी आत्महत्या केल्याचे बघितले आहे. आपल्या देशातील युवा पिढी अंमली पदार्थाच्या सेवनातून मुक्त झाली पाहिजे. युवा पिढी व्यसनापासून दूर राहावी. यासाठी अशाप्रकारच्या प्रबोधनात्मक जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी केले.

भारतीय संस्कृती ही माणसाला माणूस बनविणारी आहे. जे व्यसनाच्या आहारी गेले त्यांनाही प्रेम आणि आपुलकीने व्यसनमुक्त करण्याचे काम युवा पिढींने करावे, असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.

‘‘मोहजाल’’ नाटिका अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या युवक – युवतींवर आधारित आहे. 30 मिनिटाच्या या नाटिकेतून युवावर्ग अंमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात कसा गुरफटला जात आहे. याचे जिवंत चित्रणच मांडण्यात आले आहे. युवावर्ग अंमली पदार्थाच्या आहारी जात असताना पालक आणि समाजाच्या संदिग्ध भूमिकेवरही नाटिकेतून प्रकाश टाकण्यात आला आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या पाल्यांशी कशाप्रकारचा व्यवहार केला पाहिजे, याचे प्रबोधन करण्यात आले आहे.

नाटिकेचे लेखक प्रसन्ना शेंबेकर, दिग्दर्शक संजय पेंडसे आणि निर्मिती प्रमुख सारिका पेंडसे व डॉ.रवी गिऱ्हे यांची आहे. या नाटिकेमध्ये 25 युवक-युवतींचा सहभाग असून हे सर्व जण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातंर्गत येणाऱ्या नागपूर येथील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पेंडसे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपालांनी नाटिकेत सहभागी सर्व कलावंतांचे, दिग्दर्शक, लेखक व निर्मिती प्रमुख यांचे कौतुक केले.

000000

विवक्षित सेवा

आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’-उद्योगमंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २१: विदर्भाला भरभरून नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. उद्योगासाठी येथे पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत राज्यशासन उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी  आज विदर्भ विकास परिषदेत दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘विदर्भ विकास परिषदे’चे उद्घाटन श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. माजी खासदार अजय संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष निकेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

श्री.सावंत  म्हणाले की, राज्य शासनाने उद्योग विभागाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड महामारीच्या काळात राज्यातील उद्योजकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आतापर्यंत दोन टप्प्यात २४ कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान राशी प्रदान केली आहे.  येत्या मार्च महिन्यापर्यंत उर्वरीत प्रोत्साहन राशी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन आग्रही असून त्यासाठी मंत्रिमंडळ उद्योग उपसमितीची  महिन्याला दोन वेळा बैठक घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

चंद्रपूर आणि  गडचिरोली जिल्ह्यांतील उद्योगांसाठी ४१ हजार कोटींचा निधी

राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास भौगोलिक विभागनिहाय समतोल साधून होणे आवश्यक आहे. गेल्या तीन महिन्यात ७१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प मंजुर झाले असून त्यापैकी ४१ हजार २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रकल्प विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये येत आहेत. यामुळे ३२ हजार जणांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. विदर्भातील आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होईल, असा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला.

तरुण उद्योजकांना प्रोत्साहन

तरूण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी  राज्य शासनाने ५०० कोटींहून अधिक निधींची तरतूद केली आहे. ही रक्कम संपूर्ण खर्च करण्यास उद्योग विभागाचे प्राधान्य असेल. याकरिता शासनासह अन्य घटकांचीही महत्त्वाची भूमिका आहे. बँकांनी तरुण उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यास बॅंकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व आता बँकांद्वारे उद्योजकांना कर्ज नाकारण्याचे प्रमाण ४२ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासासाठी ४०० कोटींची तरतूद- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

परिषदेच्या दुसऱ्या सत्रात कौशल्य विकास, पर्यटन, महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले.  श्री लोढा म्हणाले की, राज्यात पर्यटन क्षेत्रामध्ये विविध संधी आहेत. पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात  रोजगार संधी उपलब्ध होतील. राज्यात कौशल्य आणि नाविन्यता  केंद्रांना चालना देऊन औद्योगिक विकास  संस्थांना सक्षम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

परिषदेत दिवसभरात एकूण तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. ललित गांधी यांनी प्रास्ताविक केले. विदर्भातील उद्योग, व्यापार, कृषी, पर्यटन या विषयांवर वरिष्ठ शासकीय अधिकारी, तज्ज्ञ, वित्तीय संस्थांचे प्रमुख यांनी  मार्गदर्शन केले.

000

‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. २१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत गुरूवार, दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी सायं ७.३० वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर- https://twitter.com/MahaDGIPR

अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या धोरणांतर्गत अंगणवाडी केंद्रांना भौतिक सुविधेसाठी इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, शौचालय बांधकाम, दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सौर ऊर्जा संच, अन्न शिजविण्यासाठी साहित्य उपलब्ध होणार आहे. अंगणवाडी दत्तक धोरण नेमके काय आहे, याची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे, गरोदर माता, स्तनदा माता, सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालके व तीन ते सहा वर्षातील सुदृढ बालके, निरोगी माता यांना लाभ कसा होणार आहे, अशा विविध विषयांची विस्तृत माहिती, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी  ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

000

ताज्या बातम्या

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल

0
स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे....

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन...

0
ठाणे, दि.26 (जिमाका) : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा...

खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन...

0
नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे...

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

0
सातारा दि. 26 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव...