शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1608

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

नागपूर, दि. २७ : “ठाणे, पालघर जिल्ह्यांतील जमिनी प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात येत आहेत. या भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल”, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

ठाणे व पालघर जिल्ह्यांत समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन मार्ग, मुंबई-बडोदा महामार्ग अशा अनेक विकास प्रकल्पांचे काम सुरु आहे. या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना उपविभागीय कार्यालय, भिवंडी या कार्यालयाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

भिवंडी तालुक्यातील जमीन मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणूक प्रकरणी भिवंडीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा यावेळी महसूल मंत्री श्री विखे पाटील यांनी केली.

तसेच अंजूरगाव येथील शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या मृत्यूची विभागीय आयुक्तमार्फत चौकशी करण्यात येईल. या चौकशीमध्ये शेतकऱ्यांच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार असतील तर त्यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भूसंपादनामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना लाभ देण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

शेतकरी दोडे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आकस्मिक मदत करण्याचे तसेच त्यांच्या जमिनीचा मोबदला संबंधितांना मिळेल, या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

राष्ट्रीय प्रकल्पास रेडिरेकनरनुसार जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासन सकारात्मक – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नागपूर, दि. २७ : राज्यातील राष्ट्रीय प्रकल्पांना चालना मिळावी, प्रकल्पाची किफायतशीर किंमत असावी यासाठी शासन विद्यमान अधिसूचनेनुसार  राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांलगत असलेल्या जमिनी भूसंपदित करताना त्याचा मोबदला बाजारभावाने देण्यात येतो. तथापि, या रेडीरेकनरच्या मूलभूत प्रक्रियेत बदल करण्यासाठी शासनाची भूमिका सकारात्मक असेल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राष्ट्रीय, राज्य महामार्ग लगत असलेल्या जमिनीचा रेडिरेकनरचा दर तसेच कृषक दर वेगवेगळा असतो. त्यामुळे जमिनी संपादित करताना वेगवेगळा दर निश्चित केला जातो. महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन करताना त्याचा दर वेगवेगळ्या ॲथॉरिटीकडून केला जातो. त्यामुळे या वेगवेगळ्या किमतीसाठी धोरण ठरविले जाईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य जयंत पाटील, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनीही यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.

000

सप्टेंबर २०२३ पर्यत लम्पी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

 

नागपूर, दि. २७ : राज्यातील 33 जिल्ह्यात एक लाख 78 हजार 72 गोवर्गीय जनावरे लम्पी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत 100 टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लम्पी चर्मरोगाबाबत प्रश्न उपस्थित केला होता, प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री विखे-पाटील बोलत होते.

श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यातील काही जिल्ह्यात लम्पी आजार बळावला होता. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तातडीने लसीकरणाचा निर्णय घेतला. राज्य शासनाने 100 टक्के लसीकरण गतीने केल्याने पशुधनाचा मृत्यू दर कमी झाला. यामध्ये राज्याने विशिष्ट पद्धती अवलंबल्याने लसीकरण पूर्ण झाले. प्रत्येक जिल्ह्यात औषध बँक आणि तीन कोटी रुपये दिले. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने स्वीकारल्या आहेत.

आर्थिक मदतीबाबत शासन सकारात्मक

पशुधनाचा मृत्यू झाल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. यामध्ये मृत गाय 30 हजार, बैल 25 हजार आणि वासराला 16 हजार रुपये देण्यात येत आहे. मात्र यामध्ये आणखी वाढ करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही श्री विखे पाटील यांनी सांगितले.

कायमस्वरूपी विमा योजना सुरू करणार

राज्यात पशुधनाला अनेक आजरांचा सामना करावा लागतो. यात लाखो रुपयांचे पशुधन दगावण्याची शक्यता असते. यामुळे पशुपालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी मदत व्हावी म्हणून सर्व जनावरासाठी व्यापक स्वरूपात विमा योजना सुरू करण्याचा विचार असल्याचे श्री विखे पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आतापर्यंत 3383.85 लाख रुपयांचा निधी मृत पशुधनाच्या पशुपालकांना वाटप केला आहे. उर्वरित पशुपालकांना 15 दिवसात मदत देण्यात येईल. पशुवर स्वतः उपचार केले असल्यास शेतकऱ्यांना योग्य परतावा दिला जाईल. शिवाय पशुसंवर्धन दवाखान्यातील रिक्त जागा येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असेही उप प्रश्नाला उत्तर देताना श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, प्रवीण दराडे, महादेव जानकर, एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

०००

संजय ओरके/विसंअ/

विधानसभा प्रश्नोत्तरे

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अधिसंख्य पदनिर्मिती; उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर, दिनांक २७: मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यामुळे उमेदवारांना आर्थिक मागास गटातून नियुक्ती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण केली. उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज विधानसभेत दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी  (स्थापत्य) सेवा परीक्षा सन २०१९ मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने सदस्य धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उप मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षण कायदा  झाल्यानंतर राज्याने आर्थिक मागास निकषानुसार उमेदवारांना नियुक्ती दिली. दरम्यानच्या काळात हा कायदा रद्द झाला. त्यामुळे या निवड झालेल्या उमेदवारांना अधिसंख्य पद निर्मिती करून नियुक्ती देण्यात आली. स्थापत्य सेवेतील काही उमेदवारांना आपण नियुक्ती दिली. मात्र इतर उमेदवारांनी मॅट मध्ये दाद मागितली. याप्रकरणी कोणावर अन्याय होऊ नये अशी राज्य शासनाची भूमिका असल्याने या प्रकरणात चांगला वकील लावून न्यायालयात भूमिका मांडणे आणि या उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सामावून घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

या वेळी सदस्य अशोक चव्हाण यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

खडखड नळ पाणीपुरवठा योजना मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे कंत्राटदारास आदेश – मंत्री उदय सामंत

नागपूर, दिनांक २७: जव्हार (जि. पालघर) शहराला पाणीपुरवठा करणारी खडखड नळपाणी पुरवठा योजना मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. मुदतीत योजना पूर्ण नाही केल्यास प्रतीदिन दहा हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनील भुसारा यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात या संदर्भात प्रश्न मांडला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

श्री.सामंत म्हणाले की, योजना गतीने मार्गी लागावी यासाठी काही अटींवर या योजनेला मान्यता देण्यात आली. आता या योजनेतील पाण्याचा उपसा करणे, शुद्धीकरण आदींसाठी आवश्यक जागा ताब्यात आल्या आहेत आणि काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेसाठी १७ कोटी ३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

या प्रश्नावरील चर्चेत सदस्य श्रीमती  मनीषा चौधरी, सर्वश्री प्राजक्त तनपुरे, बच्च कडू, संदीप क्षीरसागर आदींनी सहभाग घेतला.

000

दीपक चव्हाण/विसंअ

अनियमित वाहन नोंदणी प्रकरणी ५ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू – मंत्री शंभूराज देसाई

 

नागपूर, दि. २७ : “उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता एकूण ११६ वाहनांची अनियमित नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले असून ही वाहने संगणक प्रणालीवर ब्लॅक लिस्ट करण्यात आली आहेत. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत आज सदस्य वैभव नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता ११६ वाहनांची नोंदणी प्रकरणी परिवहन कार्यालयातील एकूण पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच चार खासगी व्यक्तींच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना आयुक्त, परिवहन यांनी सेवेत पुन:र्स्थापित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भास्करराव जाधव यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

विधानसभा लक्षवेधी

पर्यावरणाचा समतोल राखून त्र्यंबकेश्वरचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. 27 : “पर्यावरणाचा समतोल राखून त्र्यंबकेश्वरचा विकास केला जाईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पाण्याची मागणी वाढली आहे. या वाढीव पाण्याच्या मंजुरीसाठी तसेच इतर सोयीसुविधांसाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या सोबत बैठक घेतली जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

सदस्य  हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षावेधीवरील चर्चेत  छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ

 

रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीसंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढणार –  मंत्री उदय सामंत

नागपूर दि. 27; मुंबईतील रेल्वे नजीकच्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात कायमस्वरुपी तोडगा काढण्याची शासनाची भूमिका असून, आवश्यकता भासल्यास मुंबईतील सर्व आमदारांची मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक बोलावू आणि या बैठकीला रेल्वे तसेच इतर संबधित यंत्रणांना निमंत्रण देण्यात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

यासंदर्भात सदस्या श्रीमती मनिषा चौधरी, ॲड. पराग अळवणी यांनी लक्षावेधी उपस्थित केली होती.

श्री. सामंत पुढे म्हणाले, “रेल्वे नजिकच्या झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सध्या न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही केली जाईल. यासाठी रेल्वे बोर्डाने या विषयावर सहानुभूतीपुर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.  झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एम एम आर डी ए आणि रेल्वे बोर्ड यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना देण्यात येतील” असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ

 

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांची चौकशी करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

 

नागपूर, दि. २७ : नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या जिल्हा परिषदेच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध रस्त्याची विकास कामांबाबत एक महिन्यात चौकशी समिती नियुक्त करून  योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य जयकुमार रावल यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. चव्हाण बोलत होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, मे. निलेश इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला कामे दिली गेली आहेत, ती वेगवेगळ्या विभागाची कामे आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, व इतर कामे आहेत. ज्या कामाची सुरुवात झाली नसेल अशा कामांचे  कार्यादेश दिले जाणार नाहीत. हे काम करत असताना कंपनीने चुकीचे कागदपत्रे सादर केल्याबाबत इतर विभागातून अहवाल मागविण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने काम झाली असल्यास, समितीमार्फत अभियंता सार्वजनिक बांधकाम, अभियंता नांदेड व अभियंता धुळे यांची सर्व कागदपत्रे तसेच नियमाप्रमाणे कामकाज झाले आहे का नाही हे तपासण्यात येईल.  या कामात हलगर्जीपणा झाला आहे का, हे तपासून दोषीवर कारवाई केली जाईल.

या लक्षवेधी सूचनेवरील सर्चेत सदस्य राजेश पाडवी, यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता.

गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

नागपूर, दि. २७ : मुख्यमंत्र्यांनी दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनाबाबत घोषणा केली आहे. या मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी रु.२१ कोटी ०२ लाख ७० हजार ७४६/- इतक्या रकमेचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. हा निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुरेसा निधी देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी असलेला आवश्यक २१ कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडून सांस्कृतिक विभाग प्रलंबित असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य रत्नाकर गुट्टे यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, गड किल्ले संरक्षित स्मारकासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती मधून तीन टक्के निधी याप्रमाणे पुढील तीन वर्षा करीत या विकास कामासाठी 1 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने तरतूद केली आहे.

श्री. महाकाली, श्री. मार्कंडेश्वर यांची देखभाल दुरुस्तीचे काम भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे होते. हे काम राज्य सरकार च्या अखत्यारीत करण्याची मागणी केंद्रसरकार कडे केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुप्तेश्वर मंदिर हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात धारासूर या गावात आहे. हे शिवमंदिर असून गोदावरी नदीच्या काठावर आहे. या मंदिराची निर्मिती यादव कालखंडात १२-१३ व्या शतकात झाली आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून पूर्वेस मुखमंडप, दक्षिण व उत्तर बाजूस अर्धमंडप, सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिर २.४५ मी. उंच अधिष्ठानावर स्थित असून मंदिराचे बांधकाम काळ्या दगडातील सुष्कसांधी व शिखर विटांमध्ये असून ते चुन्याच्या बांधकामातील आहे. अधिष्ठानाला सुंदर अशी हत्तीका व गर्भगृहाच्या बाह्य बाजूने ३७ कोरीव मुर्त्या आहेत. यामध्ये विष्णु, गणपती व सुरसुंदरीच्या प्रतिमा आहेत. हे मंदिर शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी अंदाजपत्रक  रू. १५.०० कोटीपेक्षा अधिक रकमेचे असल्याने त्यास उच्चस्तर सचिव समितीची मान्यता घेण्यात येत आहे.

तसेच १५ व्या वित्त आयोगांतर्गत गुप्तेश्वर मंदिराच्या संवर्धनासाठी रु.८.०० कोटीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली होती. तथापि, १५ व्या वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाकडून यासाठी निधी मंजूर झालेला नाही.

सदस्य श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर, देवराव होळी, मनीषा चौधरी या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सहभाग घेतला.

00000

 

चेंबूर येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे सर्वेक्षण करणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर, दि. २७ : चेंबूर  येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण करुन तिथे वास्तव्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे योग्य व कायदेशीर पुनर्वसन करण्यासाठी तसेच या संपूर्ण क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक सर्वेक्षण होणे गरजेचे आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली.

तसेच येथील शिल्लक जमीन, हस्तांतरण केलेली जमीन, एकूण आकडेवारी याची सविस्तर तपासणी करून निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चेंबूर येथील भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या दृष्टीने सदस्य प्रकाश फातरपेकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री देसाई म्हणाले की, पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी राज्यात विविध ठिकाणी ३१ वसाहती निर्माण करण्यात आल्या. त्यापैकी एक वसाहत मौजे वाढवली, चेंबूर येथे आहे. झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, झोपडपट्टी धारकांनी विरोध केल्याने सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर झोपडीधारकांसोबत या कार्यालयात सर्वेक्षणाबाबत तीन वेळेस बैठक घेण्यात आली. ही सर्व कामे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी निगडीत आहेत. मदत व पुनर्वसन विभाग आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या एकत्रित सहाय्याने हा प्रकल्प राबविणे गरजेचे असल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास विनंती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतची बाब महसूलमंत्री  यांच्या निर्दशनास आणून  व याबाबत लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, असेही श्री. देसाई यांनी सांगितले.

या चर्चेत सदस्य आशिष शेलार, योगेश सागर आदींनी सहभाग घेतला.

00000

समृद्धी महामार्गालगतच्या २८ शेतकऱ्यांना १० लाख ५३ हजार रुपयांची नुकसान भरपाई – मंत्री शंभूराज देसाई

 

नागपूर, दि. २७ : “समृद्धी महामार्गाच्या बांधकामादरम्यान कंत्राटदारांच्या वाहनांची वाहतूक असलेल्या परिसरातील शेती पिकांचे धुळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी २८ शेतकऱ्यांना १० लाख ५३ हजार ५३५ रुपयांची भरपाई कंत्राटदारामार्फत अदा करण्यात आली आहे. याबाबत शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर बैठकीचे आयोजन करण्यात येईल”, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सदस्य दादाराव केचे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपविभागीय अधिकारी, आर्वी यांच्यामार्फत कळविण्यात न आलेल्या, ईपीसी कंत्राटदाराने त्यांच्या पातळीवर चार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची भरपाई अदा करण्यात आली आहे. प्रमाणित नुकसान भरपाईच्या मोबदल्याची खबरदारी म्हणून कंत्राटदाराच्या माहे ऑक्टोबर २०२१ च्या देयकातून दहा लाख रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. या महामार्गाच्या संरक्षण भिंतीमुळे भिंतीलगतच्या शेतात पाणी साचू नये म्हणून संरक्षण भिंतीलगत आवश्यक तेथे पाणी प्रवाह सुरळीत करण्यासाठी नाली देण्यात आली आहे. संरक्षण भिंतीमुळे पावसाचे पाणी शेतात जमा होत असल्यास त्या पाण्यास संरक्षण भिंतीखालून मार्ग काढून महामार्गाच्या हद्दीत येवू देण्याच्या सूचना संबंधित शेतकऱ्यांना ईपीसी कंत्राटदारांमार्फत देण्यात आल्या  आहेत. महामार्गालगतच्या शेतकऱ्यांना वहिवाटीचे रस्ते, पाइप टाकून रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागास देण्यात आल्या आहेत. येत्या सहा महिन्यांत याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत राम सातपुते, यशोमती ठाकूर आदींनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

 

जालना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी – मंत्री डॉ. तानाजी सावंत

नागपूर, दि. २७ : “जालना येथील जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निलंबित करून त्यांची सचिव आणि महिला डॉक्टरांचा समावेश असलेल्या समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येईल. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करार तत्त्वावरील डॉ. अर्चना पाटील आणि डॉ. सतिश पवार या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्यात येत आहे”, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभेत आज सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले, की कोरोना विषाणूचा प्रतिबंध आणि उपचारात्मक कार्यवाहीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस तांत्रिक आणि प्रशासकीय खरेदीबाबत अधिकार देण्यात आले होते.

कोरोना काळात अत्यावश्यक परिस्थितीत सर्व रुग्णांना उपचार मिळण्यासाठी खरेदीचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गरजेनुसार समितीच्या मान्यतेने खरेदी करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद, जालना यांच्याकडून कोरोना कालावधीत जिल्हा स्रोतातून (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा नियोजन समितीकडून) नऊ कोटी 66 लाख 16 हजार 959 रुपये एवढा निधी प्राप्त झाला होता. या निधीपैकी नऊ कोटी एक लाख 55 हजार रुपये एवढा निधी खर्च झालेला आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या औरंगाबाद येथील उपसंचालक यांच्या स्तरावर चौकशी समितीची नेमणूक केलेली असून चौकशी सुरू आहे, असेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनील टिंगरे यांनी सहभाग घेतला.

०००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

 

सीमाभागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची कर्नाटक सरकारने हमी द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर, दि. २७ : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव, आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह ८६५ गावांतील मराठी भाषक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. सीमा भागातील इंच न् इंच जमिन तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा सर्वोच्च न्यायालयात करण्याचा आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्यासाठी कर्नाटक सरकारला समज देण्यात यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दोन्ही सभागृहांत मांडलेल्या ठरावात म्हटले आहे.

सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ठराव संमत केला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच सर्व सदस्यांचे त्यांनी आभारही मानले. त्याचबरोबर सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी माहिती सभागृहाला दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव असा :

ज्याअर्थी, नोव्हेंबर, १९५६ मध्ये राज्यांची पुर्नरचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव (चंदगड तालुका वगळून) विजापूर, धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले. महाराष्ट्राने खेडे हे एक घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सूत्रानुसार फेररचनेची मागणी करून कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ सीमावादीत गावांवर दावा सांगितला आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्याविरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालयात असलेला मूळ दावा क्र.४/२००४ (Original Suit) च्या अनुषंगाने दाखल केला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्र. I.A. 11/2014 वर सुनावणी अंती दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजी, दाव्यातील साक्षी, पुरावे नोंदविण्यासाठी मा.कोर्ट कमिशनर म्हणून मा.श्री.मनमोहन सरिन, भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू-काश्मीर यांची नियुक्ती केली. परंतु सदर दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजी पारित केलेल्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दि.०६ डिसेंबर २०१४ रोजी अंतरिम अर्ज क्र. I.A. 12/2014 मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढत आहे. महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालविण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणाऱ्या ज्येष्ठ, अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनेलवर नियुक्ती केली आहे.

आणि ज्याअर्थी, सीमा भागातील प्रश्न, सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षोनुवर्ष होणारे अन्याय, मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक, त्यांचेवर अत्याचार केले जाणे, त्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर होणे, इतकेच नव्हे तर मा. समन्वयक मंत्री, सीमाप्रश्न यांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे, मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे, त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे, तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणांकरिता संपादित करुन त्याचे भुखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व मा. उच्च न्यायालयांनी दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे, आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इ. बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केला जात आहे.

या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय गृहमंत्री यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढविता दोन्ही राज्यांमध्ये शांतता ठेवण्याकरिता एकमत केले असतांना देखील विपरित भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे. दरम्यान, कर्नाटक विधिमंडळाने एकही इंच जमीन न देण्याच्या दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचे काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची ही भूमिका लोकशाही संकेतास धरुन नाही. एकाच देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी या बाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवला आहे. आपण कायदेशीर बाजू मांडण्यासाठी नियमीत विधीज्ञांच्या टीम, व्यतिरिक्त ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील ८६५ मराठी भाषिक खेडे घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे, त्याअनुषंगाने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी विविध सोईसुविधा व सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या लाभांबरोबरच अभियांत्रिकी / वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षणासाठी सवलत, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांचे फायदे व इतर शासकीय संस्थांच्यामार्फत विहीत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करते आहे, धिक्कार करते आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ११० नुसार..

१.      कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यांसह मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा, प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.

२.      मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद सोडविण्यासाठी हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल.

३.      कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह  ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील महाराष्ट्र शासन विनंती करते, असा ठराव ही विधानसभा निर्धारपूर्वक एकमताने पारित करीत आहे.

४.      तसेच याबाबत केंद्र शासनाने गृह मंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा, तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी.

विधानपरिषद लक्षवेधी

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत माहिती

 

नागपूर, दि. 27 :- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो तर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या विकास कामात ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन करुन कामे करण्यात येणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊनच तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. याबाबत कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अमोल मिटकरी यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कॉरीडोरबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले की, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा आराखडा सर्वंकष होण्यासाठी वाराणसी आणि तिरुपती या देवस्थानाला सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. त्याच धर्तीवर मंदिरात येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, श्रींचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मंदिरातील मूळ वास्तूचे व वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर स्वच्छता, चांगले रस्ते, शौचालये, हॉस्पिटल आणि चंद्रभागा घाट याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे.

छोटे व्यापारी, स्थानिक रहिवासी यांच्या शकांचे निरसन करून त्यांना विश्वासात घेऊन सर्वांच्या सहकार्याने योग्य मोबदला देण्यात येणार आहे. शिवाय त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्यासाठी कॉरीडॉरचा नियोजित प्रारूप विकास आराखडा सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया, आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या सर्व हरकती, सूचना यांचा विचार करून कोणावरही अन्याय होणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिली.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये नदी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पार्कींग, पाणी आदी पायाभूत  सुविधेची  कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. ही कामे करताना वारकरी परंपरेला व संस्कृतीला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. होळकरवाडा, शिंदेवाडा याबाबत पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार जतन करून कॉरीडॉर केला जाईल.

पुढील 25 वर्षानंतर होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारुप आराखडा करण्यात आला आहे. 964 सूचना/हरकती प्राप्त झाल्या असून यात 366 सूचना रस्ता रुंदीकरण व मोबदला याबाबत आहेत, असेही श्री सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सचिन अहिर, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

०००००

धोंडिराम अर्जुन/ससं

 

मानवी खाण्यायोग्य तांदळासाठी ‘एसओपी’त बदल करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव – मंत्री रवींद्र चव्हाण

नागपूर, दि.२७ : धान खरेदी करताना खाण्यायोग्य तांदूळ पुरवठा केला नसल्यास संबधित मिलधारकावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या एस.ओ.पी.त आवश्यक ते बदल करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राज्यात राबविली जाते. यानुसार तांदूळ खरेदी करताना ते खाण्यायोग्य नसल्यास केंद्र सरकारच्या एसओपीनुसार त्या मिलधारकास ३ वर्षांकरिता काळ्या यादीत टाकले जाते. या मिलधारकांना काळ्या यादीत टाकल्यानंतर त्यांना पुन्हा एक संधी दिली जाते. तथापि, ३ वर्षे झाल्यानंतर काही मिलधारक हे पुन्हा गैरप्रकार करतात. त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या मिलधारकांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या ‘एसओपी’त सुधारणा करण्याचा प्रस्ताव तात्काळ पाठविला जाईल, असे मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, जयंत पाटील यांनी मांडली होती.

000

 

अनधिकृत उत्खननावर प्रतिबंधासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब  मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील 

नागपूर, दि. २७ : राज्यातील गौण खनिज पट्ट्यातून अनधिकृत उत्खननावर प्रतिबंध यावा, यासाठी १५ जानेवारीपर्यंत नवीन धोरण आणले जाणार आहे. या नवीन धोरणात ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्ही या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

कर्जत तालुक्यात अनधिकृत खडीक्रशर धारकांकडून अवैध उत्खनन प्रकरणी प्रा.राम शिंदे यांनी लक्षवेधी मांडली होती, यास मंत्री श्री.विखे पाटील यांनी उत्तर दिले.

कर्जत तालुक्यात झालेल्या अवैध उत्खनन प्रकरणी संबंधित खडीक्रशर धारकांकडून ४८ कोटी १९ लाख ६८ हजार ५२५ रुपयांची दंडात्मक रकमेची कार्यवाही करण्यात आली असल्याचे श्री.विखे पाटील यांनी सांगितले. या अवैध उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करून संबधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. या लक्षवेधीवरील चर्चेत विधानपरिषद सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

संजय ओरके/विसंअ

 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार मंत्री दीपक केसरकर

नागपूर, दि. २७: राज्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

केंद्र सरकारने इयत्ता पहिली ते दहावीतील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची बंद केलेली शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याबाबत सदस्य वजाहत मिर्झा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीतील बालकास शासनाकडून मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे केंद्र सरकारने प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती ही इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थी वगळून इयत्ता नववी ते १० वीतील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबाबत नाराज विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत राज्यशासनाने शिष्यवृत्ती पूर्ववत करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. या शिष्यवृत्ती योजनेसाठी  ७४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्र सरकारने राज्याची मागणी मान्य न केल्यास राज्य शासनाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही मंत्री केसरकर यांनी उत्तरात स्पष्ट केले.

०००००

पवन राठोड/स.सं

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे, यंत्रसामग्री पुरवठ्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार मंत्री गिरीष महाजन

 

नागपूर दि. २७ : राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे आणि अन्यबाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रवीण दटके यांनी हाफकीनच्या औषध आणि यंत्रसामग्री पुरवठ्याच्या कार्यप्रणालीमुळे रुग्णालयांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, हाफकीन संस्थेकडून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध, सर्जिकल साहित्य आणि यंत्रसामग्री पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हाफकीनला सुमारे पंधराशे कोटी रुपयांचा निधी दिला मात्र त्यापैकी सुमारे ६५० कोटी रुपयांचा निधी विनावापरामुळे परत येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संस्थांना १० टक्क्यांवरून ३० टक्के खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच हाफकीन महामंडळाच्या खरेदी कक्षाचे सक्षमीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. औषध खरेदीबाबत नियमावली तयार करण्याची कार्यवाही देखील सुरू असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

उपसभापतींकडे होणार बैठक

हाफकीन संस्थेच्या कार्यप्रणाली आणि संशोधकांच्या सोयीसुविधांसंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुढच्या महिन्यात बैठक आयोजित करण्यात यावी. अशी सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यानी केली. तत्पूर्वी हापकीन संस्थेची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भातील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण पोटे पाटील, सतीश चव्हाण, सचिन अहिर आदींनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ

 

सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू – मंत्री चंद्रकांत पाटील

 

नागपूर, दि. 27 : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन सहायक प्राध्यापक संवर्गातील भरतीसाठी वित्त विभागाने 40 टक्के पदांना मान्यता दिली आहे. त्यानुसार पद भरतीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सहायक प्राध्यापक भरतीबाबत सदस्य महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

श्री. पाटील यांनी सांगितले की, सहायक प्राध्यापकांच्या 3580 पदांना उच्चस्तरीय समितीने स्थगिती उठवून मंजुरी दिलेली आहे. यातील १४९२ पदे भरण्यात आलेली आहेत. शिवाय 219 पदांच्या भरतीस शासनाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. संस्था, महाविद्यालय स्तरावरून विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून पद भरतीची कारवाई सुरू आहे. 2088 सहायक प्राध्यापक यांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथील केले असून ही भरतीही लवकरच केली जाईल. यामध्ये सेट, नेट, पीएचडी, एम फील झालेल्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

जानेवारीत शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहायक पदाची मान्यता घेऊन 100 टक्के पदभरती प्रक्रिया राबवू, असेही श्री. पाटील यांनी उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

तासिका तत्वावरील प्राध्यापक यांच्या मानधनात वाढ करुन 650 रुपये केले आहे. त्यांचे मानधन वेळेत होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, विक्रम काळे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ

एमपीएससीच्या ४३० जाहिराती प्रसिद्ध, मुलाखत प्रकिया लवकरात लवकर राबविली जाईल – मंत्री दीपक केसरकर

 

नागपूर, दि. २७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत सरळसेवा भरतीच्या एकूण ४३० जाहिराती प्रसिद्ध केल्या आहे. यात इतर विभागांकडून झालेल्या मागणीनुसार तसेच दिव्यांग आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या  उत्तरात सांगितले.

दिव्यांगांसाठी शासकीय सेवेतील सर्व प्रवर्गासाठी शासनाने निश्चित केलेल्या वयोमर्यादेस आव्हान देणारी  एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे शासन सध्या राबवित असलेल्या या भरती प्रक्रियेला खीळ बसू नये, त्यामुळे उमेदवारांच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा  विचार करता येणार नाही, असे मंत्री श्री.केसरकर यांनी उत्तरात सांगितले. त्याचबरोबर, उमेदवारांच्या मुलाखती तात्काळ घेण्यासंदर्भात आयोगाला सूचित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानपरिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातील  लक्षवेधी उपस्थित केली होती. सदस्य अभिजित वंजारी यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

000

संजय ओरके/विसंअ

 

औरंगाबादमध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु करणार – मंत्री अब्दुल सत्तार

 

      नागपूर, दि. २७ : महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत केली.

सदस्य सतीश चव्हाण यांनी महिला कृषी महाविद्यालय सुरु करण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सत्तार बोलत होते.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुढे म्हणाले, “राज्यात ४८ शासकीय आणि अनेक खासगी कृषी महाविद्यालये आहेत. या प्रत्येक महाविद्यालयामध्ये महिला प्रवेशासाठी ३० टक्के जागा राखीव करण्यात आल्या आहेत. महिलांच्या कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये खास बाब म्हणून पहिले महिला कृषी महाविद्यालय सुरु केले जाईल. यासोबतच औरंगाबादमध्ये उप कृषी विद्यापीठ सुरु करण्याबाबत समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर निर्णय घेण्यात येईल”, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सभागृहात स्पष्ट केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २७ : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी, सफाई कामगार, आणि अधिकारी यांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्यांना सोयी सुविधा टप्प्याटप्प्याने लागू करण्याबाबत अधिवेशनानंतर एक बैठक घेऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

बृहन्मुंबई मनपाच्या शाळा तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अनुषंगाने सदस्य कपिल पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी संस्थांद्वारे चालविल्या जाणाऱ्या खाजगी प्राथमिक शाळांना राज्य शासनाने मान्यता दिलेली असून, सदर शाळांना अनुदान सहाय्य संहिता १९६८ मधील तरतुदी लागू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळांना नियमांची पूर्तता केल्यानंतर गुणवत्तेनुसार मालमत्ता करात सूट देण्यात येत असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम पदावर १० वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना वैद्यकीय गटविमा योजना लागू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही तसेच कर्मचाऱ्यांना व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात काही आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागातील नवीन सरळसेवा पद भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून, पद भरतीचे प्रस्ताव कार्यान्वित आहेत. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांतील परिचारिका संवर्गाच्या रिक्त पदांची बिंदुनामावली पडताळणी करून घेण्यात आली आहे. सदर रिक्त पदे भरण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये परिचारिका संवर्गाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन ती भरण्यात येणार आहेत. तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशींअन्वये वारसाहक्क धोरणांतर्गत कर्मचाऱ्याच्या वारसास नोकरी देय आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना मोफत निवासस्थाने देण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेस नुकतेच शासन आदेश देण्यात आले असल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

या लक्षवेधीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

0000

मनिषा पिंगळे/विसंअ

घाटकोपर पोलीस वसाहतीच्या जागेवर अनियमितता झाली असल्यास कारवाई करणार – मंत्री उदय सामंत

नागपूर, दि. २७ : घाटकोपर येथे पोलीस वसहतीसाठी भूखंड आरक्षित असून या भूखंडावर अनियमितता झाली असल्यास याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

घाटकोपर पोलीस वसाहतीच्या राखीव असलेल्या भूखंडावर अनधिकृत पेट्रोल पंप उभारल्याबाबत सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री सामंत यांनी सांगितले की, घाटकोपर येथील भूखंडावर बृहन्मुंबई विकास योजना २०३४ नुसार पोलीस कर्मचारी वसाहत असे नामनिर्देशन दाखविले आहे. काही भाग खेळाचे मैदान, मनोरंजन मैदान यासाठी आरक्षित आहे. हा भूखंड महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांच्या मालकीचा आहे. पोलिसांना कल्याण निधी उभारण्याचा हक्क आहे. त्यानुसार भारत पेट्रोलियम कार्पोरेशन कंपनीचे इंधन भरणा केंद्र उभारणीसाठी पोलीस आयुक्त रेल्वे मुंबई यांनी बृहन्मुंबई महापालिकेत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला आहे.

पेट्रोल पंपासाठी भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी अग्निशमन दल, सीआरझेड, एमएमआरडीए, ट्री ॲथॉरिटी, जल अभियंता, रेन वॉटर हार्वेस्टिंग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बँक हमी, लेआऊट मंजुरी, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक, मुंबई पोलीस ना हरकत, वाहतूक शाखा, इलेक्ट्रिक,औद्योगिक आणि आरोग्य संचालनालय यांची परवानगी घेण्यात आली आहे. भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यासाठी मनपाकडे अर्ज सादर केला आहे. यामध्ये अनियमितता असेल तर कारवाई करण्याची हमी मंत्री श्री सामंत यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ. रणजित पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

धोंडिराम अर्जुन/स.सं

वनविकास महामंडळाने मोठी झेप घ्यावी : वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 26 : वनविकास महामंडळाची क्षमता प्रचंड असून ती पूर्णतः वापरत महामंडळाने लवकर मोठी झेप घ्यावी, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

नागपूर येथे वनविकास महामंडळाची संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली, त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नागपूर भागात फर्निचर क्लस्टर, फर्निचर बनविणाऱ्या कारागिरांसाठी एका छताखाली भाडे तत्वावर यंत्रे व उपकरणे वापरू देणारा कारखाना, लाकूड कारागिरांचा कौशल्य विकास, त्यांच्या फर्निचरला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न, वनोद्याने विकसित करून देणारी व्यावसायिक सेवा, महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष जोपासना आणि वृक्ष संवर्धन, चंद्रपूर येथे नवीन व्याघ्र सफारी तर गोरेवाडा येथे आफ्रिकन सफारी तयार करणे अशा अनेक महत्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. वनविकास महामंडळाने आता व्यावसायीक क्षेत्रात झेप घेण्याची आवश्यकता आहे, असे सांगून सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक सूचना या बैठकीत केल्या. वनविकास महामंडळाने संबंधित विविध क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.

नागपुरात फर्निचर क्लस्टर आणि सार्वजनिक सुविधा केंद्र उभारणार

नागपुरात फर्निचर क्लस्टर उभारून स्थानिक फर्निचर उत्पादक कुशल कारागिरांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न वनविकास महामंडळाने करावा, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली. लाकूड कारागिरांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवावा आणि त्यांना यंत्रे व उपकरणे भाड्याने उपलब्ध करून देण्यासाठी एक सार्वजनिक सुविधा केंद्र वनविकास महामंडळाने निर्माण करावे असे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे ज्यांना सुतारकामाची उपकरणे व जागा विकत घेणे परवडत नाही, अशा कारागिरांना कामाच्या कालावधीपुरती जागा व उपकरणे उपलब्ध होतील आणि त्यांचा व्यवसाय बहरेल असे ते म्हणाले.

वनविकास महामंडळाने अशा स्थानिक उत्पादित फर्निचरला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध मोठ्या कंपन्यांशी बोलणी करावीत, अशीही सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

लॅण्डस्केपिंग आणि वनोद्याने विकसित करणार

वनविकास महामंडळाने विविध कंपन्या, प्रकल्प, रस्ते, विकास प्रकल्प यासाठी लॅण्डस्केपिंग आणि सौंदर्यीकरण सेवा व्यावसायिक पातळीवर द्यावी, अशीही सूचना श्री. मुनगंटीवार यांनी वनविकास महामंडळाच्या संचालकांना केली आहे. प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला सौंदर्यीकरण, लॅण्डस्केपिंग यांची गरज असते. त्या सेवा वनविकास महामंडळाने विकसित कराव्यात आणि व्यावसायिक पातळीवर त्या पुरवाव्यात असे ते म्हणाले.

महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष लागवड

राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. महामार्गांच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन आणि जोपासना हे काम वनविकास महामंडळाने करावे, त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी बोलणी करून करार करावा, असेही निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

चराऊ कुरणांचा विकास

राज्यात चराऊ कुरणांची कमतरता आहे आणि त्याचवेळी हजारो एकर जमिन पडीक आहे. या पडीक जमिनींवर चराऊ कुरणांचा विकास वनविकास महामंडळाने करावा. त्या कुरणात उत्पादन झालेल्या चाऱ्याचे भारे नवीन तंत्रज्ञान वापरून वेष्टित करून महिनोन महिने टिकवता येतील या विषयात वनविकास महामंडळाने स्वतःचे नैपुण्य निर्माण करावे आणि राज्यातील चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यास हातभार लावावा, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आफ्रिकन सफारी आणि टायगर सफारी

नागपुरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सफारी तसेच चंद्रपूर येथे नवीन टायगर सफारी या तज्ञांच्या मदतीने वनविकास महामंडाळाने उभाराव्यात, त्याकरता आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांची मदत घ्यावी, अशी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

देशात 56 हजार कोटींचे लाकुड आयात करावे लागते. तर आपल्याकडे लाकुड व अन्य वनोत्पादनाकडे दुर्लक्ष केले जाते. वनविकास महामंडळाने वनखात्याच्या वनोत्पादने व लाकुड यांना चांगली बाजारपेठ मिळवून देण्याचे काम करावे, जेणेकरून परकीय गंगाजळी वाचेल, अशी सूचनाही सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

हरित इंधनाचा व्यवसाय

चंद्रपूर गडचिरोली च्या वनांमध्ये बांबूची अतिरिक्त वाढ झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. हे अतिरिक्त बांबू तोडण्यासाठी बाहेरच्या कंपन्यांना काम द्यावे लागते. त्याऐवजी वनविकास महामंडळानेच ही बांबू तोड करून त्या बांबूला बाजारपेठ निर्माण करून देण्याचे काम करावे अशीही सूचना ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याचबरोबर त्या बांबूपासून हरित इंधन (पॅलेटस्) तयार करून ते बाजारपेठेत पुरवावे असेही निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

वनविकास महामंडळाने व्यावसायिक क्षेत्रांचा विस्तार करतांना कामाचा वेग व दर्जा उच्च राखावा, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. या बैठकीत प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, प्रधान वनबलप्रमुख श्री. राव, श्री. विकास गुप्ता, यांच्यासह वनविकास महामंडळाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

00000

‘वीर बाल दिवसा’च्या इतिहासामुळे तरूण पिढीला शौर्य, देशप्रेम व त्यागाची प्रेरणा मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, 26 : ‘वीर बाल दिवस च्या इतिहासामुळे देशातील तरूण पिढीला शौर्य, देशप्रेम आणि त्यागाची प्रेरणा मिळेल, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केल्या.

मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर ऐतिहासिक  वीर बाल दिवस कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री शिंदे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु तसेच गृहनिर्माण नागरी विकास मंत्री हरदिप सिंग पुरी,  केंद्रीय संस्कृती राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, मीनाक्षी लेखी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, वीर बाल दिवस सारख्या सर्वोच्च त्याग सोहळ्याच्या आयोजनामुळे इतिहासाची  प्रेरणा नक्कीच निर्माण होईल. यामुळे ही पिढी राष्ट्र विकासात आपले योगदान निश्चितच देईल, असे सांगून श्री.शिंदे म्हणाले,  हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून या वर्षात साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांचा शहीद दिवस  वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जात आहे. ही सर्वांसाठी संस्मरणीय ऐतिहासिक अशी घटना आहे.

गुरू गोबिंद सिंग यांनी वाहेगुरू जी का खालसा वाहेगुरू जी की फतेह अशी उद्घोषणा देऊन अन्यायाविरोधात लढण्याची ताकत लोकांना दिली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीकारकांमध्ये  महाराष्ट्र आणि पंजाबचा संबंध समसमान आहे. चाफेकर बंधू आणि भगतसिंग यांच्या सोबत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचेच होते. दोन्ही राज्यात क्रांतीकारकांची एक गौरवशाली परंपरा आहे. 

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आत्मीयतेचं नातं असल्याचेही मुख्यमंत्री  म्हणाले, दोन्ही राज्यातल्या मातीने अनेक वीरांना, महान संतांना जन्म दिलेला आहे. या दोन्ही राज्यांमध्ये शतकांपासून एकोपा आहे. घुमान मध्ये संत नामदेव यांचे निवासस्थान आहे तर  नांदेडमध्ये गुरुगोबिंद सिंग जी यांचे समाधी स्थळ सचखंड श्री हजु़र साहेब  आहे. 

सन 2008 मध्ये राज्य शासनाच्यावतीने गुरु गोबिंदसिंग जी यांची 300 वी पुण्यतिथी गुरु-ता-गद्दी  समारंभ मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला असल्याची आठवण याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी केली. शेती ते देशाच्या सीमासुरक्षेपर्यंत मराठी आणि पंजाबी यांचे एक अतूट नाते असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले. गुरु गोबिंदसिंग जी पंजाबचे होते ते महाराष्ट्रात नांदेडला पोहोचले. तर, संत नामदेव हे महाराष्ट्राचे होते ते पंजाबला पोहोचले. संत नामदेव यांचे अभंग गुरु ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केला. 

गुरू गोंबिदसिंग साहेबासारेखच छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रप्रेम आणि त्यांच्या अद्भुत शौर्यासाठी ओळखले जातात. सर्वोच्च असे बलिदान या महापुरुषांनी दिले, त्याची प्रेरणा घेऊन तरूण पिढी वागेल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. 

जी 20 चे अध्यक्षपद भारताला मिळालेले आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब असून यातील काही बैठका राज्यातील शहरांमध्ये होत असल्याची माहिती श्री शिंदे यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमादरम्यान, सुमारे तीनशे बाल कीर्तनकारांनी शबद कीर्तन केले.  प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री  यात सहभागी झाले. तसेच यावेळी येथे (दिल्लीत) काढण्यात आलेल्या मार्च पास्ट (फेरीला) प्रधानमंत्री श्री मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

छोटे साहिबजादे यांच्या विषयी

अवघ्या 9 आणि 6 वर्षांचे असणारे छोटे साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी़ यांनी मुघलांची शरणागती न पत्करता स्वाभिमानाने सर्वोच्च त्याग करून धर्माचे रक्षण करत  मरण कबूल केले.  

श्री गुरु गोबिंदसिंग यांचे सुपुत्र, साहिबजादे बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी, यांचा बलिदानाचा दिवस, 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी , श्री गुरु गोबिंदसिंग जी  यांच्या प्रकाश पुरबच्या दिनी 9 जानेवारी 2022 रोजी केली होती.

साहिबजादे यांच्या असामान्य धैर्य आणि शौर्याची कथा, देशातल्या सर्व नागरिकांपर्यंत  विशेषतः तरुण मुलांपर्यंत पोहोचवून या इतिहासाविषयी त्यांना जागरूक करण्यासाठी सरकार अनेक संवादात्मक आणि सहभागात्मक कार्यक्रमांचे  संपूर्ण देशभर आयोजन करीत आहे. याचाच  एक भाग म्हणून, देशभरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये, निबंध लेखन, प्रश्न मंजूषा आणि इतर उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, रेल्वे स्थानके, पेट्रोल पंप, विमानतळे अशा सार्वजनिक ठिकाणी याविषयी माहिती देणारी डिजिटल प्रदर्शने लावली जाणार आहेत. त्यासह संपूर्ण देशभरात, अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमांमधून छोटे साहिबजादे यांचे आयुष्य आणि त्यांच्या बलिदानाची कथा, गाथा  सांगितली जाईल.

000

आकर्षक लोगोच्या माध्यमातून जगात ‘बॉटनिकल गार्डन’चा परिचय होईल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 26 : जिल्ह्यातील विसापूर येथे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे. कोणत्याही वास्तुचा लोगो हाच त्याचा परिचय असतो. त्यामुळे बॉटनिकल गार्डनचा लोगो जगात सर्वत्र पोहोचण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन व्हावे. या लोगोच्या माध्यमातून देशातच नव्हे तर जगामध्ये विसापूरच्या (चंद्रपूर) बॉटनिकल गार्डनचा परिचय होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विसापूर येथे बॉटनिकल गार्डनच्या लोगो (प्रतीक चिन्ह) अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जीतेंद्र रामगांवकर, उपवनसंरक्षक श्वेता बोडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक गाडेगोणे, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ.दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार स्नेहल रहाटे, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, ब्रिजभूषण पाझारे, किशोर पंदीलवार आदी उपस्थित होते.

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या लोगो चे अधिकृत उद्घाटन झाले, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोगो निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून हा लोगो निर्माण केला आहे. हा लोगो भविष्यामध्ये देशातच नव्हे तर जगामध्ये बॉटनिकल गार्डनचा परिचय करून देईल. या लोगोमध्ये बॉटनिकल गार्डनची भिंत म्हणजे गोंडकालीन किल्ल्याची प्रतिकृती, मत्सालय, प्ल्यॅनाटोरियम, जैवविविधता, तीन स्टार बॉटनिकल गार्डनच्या सर्वांगीण माहितीचा समावेश आहे. या लोगोमध्ये तीन स्टार असले तरी बॉटनिकल गार्डन मात्र फाईव्ह स्टार होईल.

ते पुढे म्हणाले, बॉटनिकल गार्डन राज्यातील उत्तम वास्तू व्हावी, एवढेच नव्हे तर हे गार्डन ज्ञानाचे, रोजगाराचे केंद्र व्हावे, जैवविविधता, टॉकिंग ट्री व सायन्स पार्कच्या माध्यमातून विज्ञानाची माहिती देणारे  हे ज्ञानवर्धक केंद्र व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वनविभागातील 16 हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धन करतात, याचा मला अभिमान वाटतो. वनसंरक्षण व वनसंवर्धनासाठी सतत कार्यरत असलेले वनअधिकारी, वन कर्मचारी, वनरक्षक, वनक्षेत्रपाल व वनमजूर यांच्या कार्याचे त्यांनी यावेळी कौतुक केले. बॉटनिकल गार्डनमध्ये विविध प्रजातीचे रंगबिरंगी मासे हवे असल्यास तारापूर मत्स्यालयातून उपलब्ध करून देता येईल, असेही ते म्हणाले.

विसापूर परिसरात एसएनडीटी विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षण, बॉटनिकल गार्डन ज्ञानवर्धक केंद्र, बल्लारपूर स्टेडियमच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करणे तर सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सीमेची रक्षा करणारे सैनिक तयार करण्याचे कार्य होत आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक व्यक्ती येथील कार्याचे कौतुक करून जाईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकेत मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर म्हणाले, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन या ठिकाणी होत आहे. लवकरच या गार्डनचे लोकार्पण करण्यात येईल. नैसर्गिक शिक्षण, निसर्ग पर्यटनात वाढ करणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, रोपवाटिकांची संख्या वाढवणे, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, जैवविविधतेचे संवर्धन व जतन, जैवविविधता, पर्यावरण संवर्धन व मत्सालय आदी उपक्रमाद्वारे ज्ञान-विज्ञानाचे शिक्षण या वनस्पती उद्यानातून देण्यात येणार आहे. या प्रकल्पाव्यतिरिक्त वन अकादमी, सफारी प्रकल्प, रेस्क्यू प्रकल्प, उद्योजक केंद्र, निसर्ग पर्यटन केंद्र तसेच  बीआरटीसी प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बॉटनिकल गार्डन देखील लवकरच लोकार्पित होणार असून आज लोगो अनावरण पार पडत आहे.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा तयार करणारे शंतनु इंगळे, गार्डनचा लोगो निर्माण करणारे विवेक रानडे यांचा सत्कार करण्यात आला.

बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेतील मृतक शिक्षिकेच्या कुटुंबियाला धनादेश वितरीत

बल्लारपूर रेल्वे पूल दुर्घटनेतील मृत शिक्षिका श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लक्ष रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जाहीर केले होते. त्याअनुषंगाने श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार हे अर्थसहाय्य मंजूर झाले. श्रीमती रंगारी यांच्या कुटुंबीयांना पाच लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण बल्लारपूर येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार स्नेहल रहाटे, नायब तहसीलदार सतीश साळवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

0000000

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करून घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये 15 जानेवारी, 2023 पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई यांनी केले आहे.

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाना धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम 1.5  किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 21 रुपये होता. आता वाढीव दर 23 रुपये, असा ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी 14.20 पैसे होता, तो आता 15.33 पैसे केला आहे. टॅक्सीसाठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वी 25 रुपये होते. तो आता 28 रुपये असा ठरविण्यात आला असून त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी  16.93 पैसे होता, तो आता 18.66 पैसे व कूल कॅब (वातानुकूलित) साठी प्रथम 1.5 किमीसाठी पूर्वीचा दर 33 रुपये  भाडेदर होता, तो आता 40 रुपये  असा दर ठरविण्यात आला आहे. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वीचा दर 22.26 पैसे होता, तो सुधारित 26.71 पैसे असा ठरविण्यात आला आहे. ही भाडेवाढ 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आली आहे.

 

प्रवाशांना योग्यप्रकारे भाडे आकारणी करण्याकरिता ऑटो रिक्षा व टॅक्सीमध्ये बसविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये नवीन भाडेदराप्रमाणे दुरुस्ती करुन या संबंधित कार्यालयामार्फत रिकॅलिब्रेशन तपासून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) या कार्यालयामध्ये नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी परवानाधारकांसाठी रिकॅलिब्रेट केलेल्या मीटरच्या चाचणीसाठी यंत्रणा कार्यरत आहे. तारखेनुसार पूर्व नियोजित वेळ घेऊन इलेक्ट्रॉनिक मीटर रिकेलिब्रेट केलेल्या वाहनांची चाचणी पूर्व द्रुतगती महामार्ग ( गोदरेज कंपनी गेट क्र.02 विक्रोळी पूर्व, मुंबई) या ठिकाणी दररोज सकाळी 6 ते 10 या वेळेत करण्यात येत आहे.

दिनांक 23 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत या कार्यालयात नोंदणीकृत सुमारे 80 हजार ऑटोरिक्षांपैकी केवळ 51 टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करून मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. तसेच नोंदणीकृत सुमारे 8 हजार काळीपिवळी टॅक्सींपैकी केवळ 40 टक्के परवानाधारकांनी चाचणीसाठी वाहन हजर करुन मीटर चाचणी उत्तीर्ण केली आहे. हे प्रमाण अत्यल्प असून रिकॅलिब्रेट केलेल्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरसह वाहने या कार्यालयाकडून चाचणी करीता सादर करुन तपासून घेणे आवश्यक आहे.

रिकॅलिब्रेशनसाठीची मुदत प्राधिकरणाने दि. 15 जानेवारी 2023 अखेरची दिली असल्याने त्यानंतर मीटर रिकॅलिब्रेशन चाचणीसाठी येणाऱ्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल.

विहित वेळेत रिकॅलिब्रेशन करून कार्यालयामार्फत घेण्यात आलेली चाचणी उत्तीर्ण केली नसल्यास मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या ठरावाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही कारवाई टाळण्यासाठी सर्व ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी 15 जानेवारी, 2023 पूर्वी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे नोंदणीकृत असलेल्या ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी त्यांचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर वाढीव भाडेदराप्रमाणे रिकॅलिब्रेट करून  घ्यावे.

रिकॅलिब्रेशनची मुदत दि. 15 जानेवारी, 2023 पर्यंत असली तरी वाढीव भाडेदर हे दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत. रिकॅलिब्रेट होईपर्यंत सर्व प्रवाशांना व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारकांना ठरवून देण्यात आलेल्या दराप्रमाणे प्रवासाचे भाडे अदा करता येतील व घेता येतील. दर हे क्यूआर कोडसह विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑटो रिक्षा व टॅक्सी भाडेवाढ नवीन (New) या टॅबवर क्लिक करून ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व कूल कॅब टॅक्सीसाठी दराचा आधार घेवूनच भाडेदर प्रवाशांनी अदा करावेत. तसेच संकेतस्थळावर दर हे क्यूआर कोडसह प्रदर्शित केले असल्याने हा क्यूआरकोड ग्राह्य धरण्यात यावा. तसेच ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी देखील रिकॅलिब्रेट होईपर्यंत या दराचा वापर करावा आणि प्रवाशांकडून योग्य भाडेदर आकारावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

तसेच दि. 1 ऑक्टोबर, 2022 नंतर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांकडून विभागाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास त्याविषयीची तक्रार प्रवाशांनी संबंधित कार्यालयाकडे घटनेच्या इतर तपशीलासह करावी असे आवाहन विभागाने केले आहे. ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर हे 15 जानेवारी, 2023 पूर्वी रिकॅलिब्रेट करुन कार्यालयामार्फत चाचणी करुन घ्यावी व हे केल्यानंतर प्रवाशांना योग्यप्रकारे भाडेदर आकारणी करुन उत्तम सेवा देण्यात यावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

०००

अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये पायाभूत सुविधा  लवकर उपलब्ध कराव्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 26 : नागपूर येथील अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी मध्ये पाणी, वीज रत्यांसह पायाभूत सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

नागपूर विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात आयोजित हिंगणा आणि अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विपीन शर्मा यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसीमध्ये खराब झालेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत. या एमआयडीसी मधील प्रस्तावित सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू करावीत. उद्योग उभारणी करतांना देण्यात येणाऱ्या परवानग्या वेळेत देण्यात याव्यात.

“रेडी रेकनर दर, एमआयडीसी दर आणि मुद्रांक शुल्क यांच्यातील मोठ्या तफावतीमुळे आर्थिक भार पडतो यावरही सकारात्मक विचार करण्यात येईल”, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट घेताना देण्यात येणारे बांधकामाचे प्रमाण हे छोट्या  आणि मोठ्या उद्योगक्षमतेनुसार परवानगी देण्यास यावी.उद्योगांचे ग्रेडींग करण्यात यावे. आकारण्यात येणारा कर हा सुधारित करण्यात यावा. याबरोबर औद्योगिक वसाहतीमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना श्री. फडणवीस यांनी दिल्या.

विविध भागधारकांशी चर्चा केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की अतिरिक्त बोटीबोरी परिसराला विशिष्ट क्षेत्र म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे. नागपूर विभागात इलेक्ट्रॉनिक्स फार्मासिटिकल अशी कोणतेही क्षेत्रे विशेष क्षेत्रे नाहीत. असे क्षेत्र घोषित केल्यास विशिष्ट गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी त्याचा अतिरिक्त एमआयडीसी परिसरात फायदा होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विदर्भाच्या विकासासाठी पेट्रोल केमिकल्स कॉम्प्लेक्स, गडचिरोली स्टील प्लांट असे उद्योग उभारण्यासाठी कच्च्या मालाची उपलब्धता आहे. वाहतुकीस रस्ते उपलब्ध असल्याने हजारो रोजगार उपलब्ध होऊ शकतात शासनाने याविषयी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती उद्योगपतींना केली.

या बैठकीस  बुटीबोरी मनुफॅक्चरिंग असोसिएशन, एमआयडीसी हिंगणा इंडस्ट्रियल असोसिएशन, विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन, विदर्भ इकॉनोमिक डेव्हलपमेंट कम्युनिटी आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

000

राजू धोत्रे/विसंअ/

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...