शनिवार, जून 28, 2025
Home Blog Page 1607

विधानपरिषद लक्षवेधी

महापुरूषांचे पुतळे लावण्यासाठी रीतसर परवानगी

बंधनकारक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २७ : “राज्यातील कोणत्याही गावात किंवा शहरात राष्ट्रपुरूष किंवा थोर व्यक्ती यांचे पुतळे उभारण्यास रीतसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

राजापूर, ता. येवला येथील गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन केल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याबाबत सदस्य नरेंद्र दराडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले, “कोणत्याही शहरात किंवा गावात थोर महापुरूषांचे पुतळे स्थापन करण्यास मनाई नाही. मात्र पुतळा बसविण्यासाठी रीतसर पूर्व परवानगी घ्यावी लागते. याबाबत शासनाने पुतळा बसविण्याविषयी कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. राजापूर-ममदापूर चौफुली येथे ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी परवानगी न घेता आणि विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा स्थापन केला होता. यामुळे या तरूणांवर आदेशाचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

०००

लोकप्रतिनिधी अवमान प्रकरणी पोलिसांना पाठिशी

घालणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

येवला मर्चंट बँक निवडणुकीसाठी नियमानुसार पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही लोकप्रतिनिधींना पोलीस अधिकाऱ्यांकडून धक्काबुक्की केली असेल किंवा हीन वागणूक दिली असेल तर खपवून घेतली जाणार नाही, अशा पोलीस अधिकाऱ्याला पाठिशी घालणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

येवला मर्चंट बँक निवडणुकीत पोलीस निरीक्षकांनी पॅनल प्रमुखांना धक्काबुक्की, शिवीगाळ, मारहाण केल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य किशोर दराडे यांनी मांडली होती.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी विधानपरिषद सदस्य यांना आणि कार्यकर्त्यांना मतदान झाले असेल बाहेर थांबण्यास सांगितले होते. यावेळी वाद निर्माण होऊन धक्काबुक्की झाली होती याबाबत विधानपरिषद सदस्यांनी पोलीस निरीक्षक श्री. मथुरे यांच्याविरूद्ध पोलीस महासंचालक आणि नाशिकचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांच्यामार्फत वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात येत आहे. चौकशीला अडथळा येऊ नये, यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली करण्यात येईल.

०००

ठाण्यातील प्रस्तावित रिंग मेट्रो प्रकल्प स्थानिक लोकांना

विश्वासात घेऊन करणार – मंत्री उदय सामंत

ठाणे शहराच्या मंजूर आराखड्यातील वर्तुळाकार (रिंग) मेट्रो प्रकल्प स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य निरंजन डावखरे यांनी या रिंग मेट्रो प्रकल्पाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होते. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ठाण्यातील प्रस्तावित हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रुट तसेच डी.पी रस्त्यांवर शहरांतर्गत मेट्रो ट्रेन होणार आहे. त्यासाठी मार्च २०१९ मध्ये १३ हजार ९५ कोटी खर्चाला मंजुरी मिळाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष आराखडा तयार केल्यानंतर त्यांची किंमत १० हजार ४१२ कोटी झाली. या प्रकल्पातील ३ किलोमीटरचा प्रस्तावित भूमिगत मार्ग आहे. त्याठिकाणी उन्नत मार्ग करावा की नाही, याबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चाही केली. या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानुसार या प्रकल्पासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येईल. हा प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेऊन केला जाईल, अशी माहिती देखील मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सभागृहात दिली.

००००

अनाथांना ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र मिळणार

– महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राज्यातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र तीन महिन्यांत ऑनलाईन पद्धतीने देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत दिली.

अठरा वर्षांवरील अनाथांच्या विविध प्रश्नांबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री श्री. लोढा बोलत होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, “अनाथांना आरक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. अनांथांना सोयीसुविधा देण्याबाबत सकारात्मक विचार केला जात आहे. अनाथांसाठीच्या योजना राबविण्यासाठी अनाथ विकास महामंडळाची स्थापना करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे बैठक घेण्यात येईल. अनांथांमध्ये कौशल्य विकास होण्यासाठी राज्यातील अनाथालयांमध्ये कौशल्य केंद्र सुरु करण्यात येईल”.

“पदभरतीमध्ये अ प्रवर्गासह ब आणि क प्रवर्गाच्या पदांसाठी अनाथ आरक्षण लागू करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.बालकाश्रमातील प्रशासनाच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला आहे. या बालकाश्रमांच्या इमारती व कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत बैठक घेण्यात येईल. बालकाश्रमातील सोयीसुविधांबाबत आणि कोविड काळात अनाथ झालेल्या बालकांबाबत सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. येत्या तीन ते सहा महिन्यांत हा सर्व्हे पूर्ण करुन राज्य शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. अनधिकृत अनाथालयांबाबत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल”, असे मंत्री श्री. लोढा यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नांना उत्तर देतांना सांगितले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,  सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, राजेश राठोड, प्रसाद लाड, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सचिन अहिर यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केले होते.

००००

नगरपरिषद, महापालिका क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांबाबत समन्वय

बैठकीत निर्णय – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

“केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. मात्र नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही योजना लागू नाही, याबाबत शालेय शिक्षण आणि नगर विकास विभागांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेतला जाईल”, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी नपा आणि मनपा शाळेतील कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू नसल्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले की, अंशदान निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन एकत्रित सकारात्मक निर्णय घेईल. नगरपालिका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी नवीन पद्धती विकसित केली जाईल. राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू केल्यास त्यांच्याकडील हप्ते एकदम वसूल न करता हप्ते बांधून दिले जातील.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य डॉ.रणजित पाटील, जयंत आसगावकर, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

०००

विधानसभा प्रश्नोत्तरे

उद्योगांसाठी प्रक्रियायुक्त पाणी वापराचा विचार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरदिनांक २७ : पाण्याचा पुनर्वापर केल्यास धरणांवरील अवलंबित्व कमी होईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांना ५० किमी अंतरातील महापालिकांकडून प्रक्रियायुक्त पाणी मिळाल्यास त्याचा उपयोग उद्योगांसाठी करण्यात येईल. यामुळे आरक्षित पाणी पिण्यासाठी अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. त्यामुळे प्रक्रियायुक्त पाण्याच्या पुनर्वापराबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईलअशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य कुमार आयलानी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उल्हासनगर शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीमुंबई महानगर क्षेत्रात लोकसंख्या वाढत आहे. त्या लोकसंख्येला पिण्याचे  पाणी पुरविण्यासंदर्भात आपण निर्णय घेतो. मात्रपाणी पुनर्वापर करण्यासंदर्भात आपण विचार केला पाहिजे. प्रकिया केलेले पाणी पुन्हा समुद्रात टाकले जाते. ते पाणी  त्या क्षेत्रातील उद्योगांना दिले तर उद्योगांची पाण्याची गरज भागणार आहेअशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. उद्योग विभाग आणि जलसंपदा विभाग यांची यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईलअशी माहिती त्यांनी दिली. काळू प्रकल्प पुढील पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला चालना दिली जाईलअशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवारसदस्य बालाजी किणीकरगणपत गायकवाडडॉ. जितेंद्र आव्हाड आदींनी सहभाग घेतला.

000

 दीपक चव्हाण/विसंअ

 

विधानसभा प्रश्नोत्तरे :

यवतमाळ पाणीपुरवठा योजनेच्या कार्यान्वयनासाठी

लवकरच बैठक –  मंत्री उदय सामंत

           

नागपूरदि. २७ : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारी ३०० कोटी रुपये खर्चाची योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिनाभरात बैठकीचे आयोजन करून निर्णय घेण्यात येईलअसे मंत्री उदय सामंत यांनी आज विधान सभेत सांगितले.

सदस्य सुभाष धोटे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले कीयवतमाळ पाणीपुरवठा योजनेकरीता मुख्य जलकेंद्र बेंबळा व जलशुद्धीकरण केंद्र टाकळी येथील पंपिंग मशीनकरीता ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरच्या उभारणीसाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेतील पूर्व अर्हतेच्या अटींच्या अधीन राहून तीन निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी मे. कोमल इलेक्ट्रीक सर्व्हिसेसयवतमाळ व मोरया इलेक्ट्रीकपुसद यांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बनावट व चुकीचे असल्याची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्राप्त झाली होती. या निविदाधारकांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे महावितरण कंपनीचे असल्याने त्यांच्याकडून याबाबत शहानिशा करण्यात आली असून महावितरणने सदरचे अनुभव प्रमाणपत्र योग्य असल्याचे स्पष्ट केलेअसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणयवतमाळ यांनी कळविले होते.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखायवतमाळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सादर केलेल्या पत्रानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालययवतमाळ यांच्या आदेशान्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे. तसेच प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. मात्रअधीक्षक अभियंत्यांनी हा अहवाल स्वीकारला नाही. त्यामुळे  मुख्य अभियंत्यांनी हस्तक्षेप केला. या प्रमाणपत्र प्रकरणी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांची चौकशी सुरू असून त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच अधीक्षक अभियंत्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतअसेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री नाना पटोलेमदन येरावर आदींनी सहभाग घेतला.

०००

गोपाळ साळुंखे/ससं

विधानसभा लक्षवेधी

पर्यावरणाचा समतोल राखून त्र्यंबकेश्वरचा विकास

करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूरदि. २७ : पर्यावरणाचा समतोल राखून त्र्यंबकेश्वरचा विकास केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पाण्याची मागणी वाढली आहे. या वाढीव पाण्याच्या मंजुरीसाठी तसेच इतर सोयी सुविधांसाठी लवकरच जिल्हाधिकारी आणि संबधित यंत्रणांच्या सोबत बैठक घेतली जाईल असे” उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लक्षवेधीच्या एका उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

सदस्य हिरामण खोसकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षावेधीवरील चर्चेत छगन भुजबळ यांनी सहभाग घेतला.

०००

 ‘वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्प’ कालबद्ध वेळेत

पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. २७ : विदर्भातील ‘वैनगंगा ते नळगंगा महत्त्वाचा नदी जोड प्रकल्प’ असून याबाबतचे जवळपास सर्व आराखडे तयार करण्यात आले आहेत. यासाठी 426 किमी चा बोगदा तयार करण्यात येत असून राज्यातील हा सर्वात मोठा हा बोगदा असेल. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याबाबत  योजना तयार करण्यात येत आहे. विदर्भाचे भाग्य बदलणारा हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत निश्चित वेळेत पूर्ण करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा या एकमेव नदी जोड प्रकल्पाचा नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असल्याबाबत लक्षवेधी सूचना श्रीमती श्वेता महाले यांनी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाबाबत राज्यस्तरीय समितीची मान्यता घेऊन मान्यता घेऊन निविदा काढण्यात येईल. हा प्रकल्प संपूर्ण विदर्भासाठी नवसंजीवनी देणारा ठरेल, असे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी  यावेळी सांगितले.

यासाठी पाच लाख 72 हजार हेक्टर जमीन संपादित केली आहे. यासाठी सुधारित आराखडा तयार केला असून यासाठी महाराष्ट्र शासन 82 हजार कोटी खर्च करेल. या प्रकल्पामुळे विदर्भातील दुष्काळी भागातील प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकल्पात वाशीम जिल्ह्याचा समावेश केला आहे. हा प्रकल्प पुढे परभणी, हिंगोली पर्यंत नेण्यासाठी रचना करण्यात आली आहे. हे पाणी ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून नेऊन दुष्काळी भागासाठी वरदान ठरणार आहे.

या आराखड्यात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या  जिल्ह्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. बुलढाण्यातून वाशिमला पाणी जाऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील. यासाठी सर्व जागा अधिग्रहित करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सदस्य सर्वश्री हरीश पिंपळे, दादाराव केचे, राजेंद्र शिंगणे यांनी या लक्षवेधी सुचनेवरील चर्चेत सहभाग घेतला होता.

000

महिलांसाठी राखीव जागेवर केवळ महिलांचीच नियुक्ती

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता राखिव ठेवण्यात आलेल्या जागांवर केवळ महिलांनाच नियुक्ती देण्यात येईल, तसा सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सदस्या डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

दि. 25 मे 2001 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात आरक्षणाची व्याप्ती, अटी व शर्तीनुसार भरतीच्या वर्षात त्या त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर सदर आरक्षण इतरत्र अदलाबदली न करता त्या त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांमार्फत भरण्यात यावे अशी अट आहे. त्यामुळे महिला उमेदवारांवर अन्याय होत असून त्यांना हक्काच्या आरक्षणापासून वंचीत रहावे लागत होते, अशा आशयाची लक्षवेधी डॉ. लव्हेकर आणि श्रीमती मनीषा चौधरी यांनी उपस्थित केली होती.

या शासन निर्णयात बदल करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या प्रश्नी शासन सकारात्मक असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल अशी माहिती  महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.

अर्चना शंभरकर/विसंअ/

000

सफाई कामगारांना मालकी हक्कानेच घरे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“ज्यांची 25 वर्षें सेवा झाली आहे त्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्कानेच घरे देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

“सफाई कामगारांच्या बाबतीत मालकी हक्काने घरे देण्यासंदर्भात सन 2015 ला निर्णय घेण्यात आला होता. मध्यंतरी तो निर्णय बदलून सेवा निवासस्थाने देण्याचा निर्णय झाला, आता 12 जून 2015 चाच निर्णय कायम करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ज्यांची 25 वर्षें सेवा झाली आहे त्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्कानेच घरे देण्यात येतील”, असेही उपमुख्यमंत्र्यंनी सांगितले.

कामाठीपुरा परिसराचा समूहविकास पद्धतीने विकास

“कामाठीपुरा परिसराचा समूहविकास पद्धतीने विकास करु, म्हाडाला नोडल एजंसी नेमून यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेऊन त्यांच्या मान्यतेने हा विकास करण्यात येईल”, असे श्री फडणवीस यांनी सांगितले.

“लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन स्थानिक प्रतिनिधींसोबत चर्चा करु. समूह विकासासाठी येथील लोक समोर येत आहेत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना अपेक्षित असलेला हा विकास लवकरच घडवून आणू”, असेही श्री. फडणवीस म्हणाले. “उमरखाडी प्रकल्पाबाबतही व्यवहार्यता तपासून बघण्यात येईल, इथे देखील समूहविकास अंतर्गत विकास करू”, असेही श्री फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले.

या संदर्भात सदस्य सर्वश्री अमिन पटेल, सुनिल राणे आदिंनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

अर्चना शंभरकर/विसंअ/

000

वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास २६ दिवसांत नुकसानभरपाई

– वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

“कोणत्याही शेतकऱ्याचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान होऊ नये ही शासनाची भूमिका आहे. असे झाल्यास २६ दिवसांच्या आत नुकसानभरपाई देण्यात येईल”, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना दिली.

कोकणात वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांच्या होत असलेल्या नासाडीसंदर्भात सदस्य योगेश कदम यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री नितेश राणे, भास्कर जाधव, बच्चू कडू आदिंनी सहभाग घेतला.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, “कोकणात माकडांची तसेच रानडुकरांची संख्या जास्त आहे. माकडांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हिमाचल प्रदेश येथे वन्यजीव सुरक्षा अधिनियमानुसार माकडांची नसबंदी करण्यात येऊ शकते. या आधारावर केंद्र शासनाची विशेष अनुमती घेऊन माकडांची नसबंदी करता येईल.

वन विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापिठाचे अधिकारी यांच्या सहकार्याने नुकसानीची मोजणी केली जाईल. तसेच वन विभागात तीन हजार पद भरती केली जाईल”, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

000

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत

– मंत्री शंभूराज देसाई

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्याबरोबरच आपत्तीच्या काळात त्यांना भरीव मदत करण्यात येत आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य बळवंत वानखेडे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन आणि प्रबोधन करण्यात येत आहे. विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतक-यांच्या विकासासाठी “कृषी समृद्धी” योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतीपूरक उद्योग, महिला व शेतकरी समूह गट तयार करणे, लघु व सूक्ष्म उद्योग निर्मिती, मार्केट लिंकेज, कुक्कटपालन, मत्स्यबीज व कोळंबी संचयन कार्यक्रम, दुग्धव्यवसाय तसेच रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आदींचा त्यात समावेश करण्यात आला असल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतमालाला हमीभाव, पीएम किसान सारख्या योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली, तसेच अल्पमुदत कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक  कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

चालू हंगामातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने व २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत ६ हजार ४१७ कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाले.

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ९९ हजार  ९०१ बाधित शेतकऱ्यांना रू.५५१.२१ कोटी रुपये एवढे निविष्ठा अनुदान मंजूर झाले असून ५५१.२१ कोटी एवढा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी रू.४७७ कोटी ६७ लाख निधी प्रत्यक्ष खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहितीही मंत्री श्री.देसाई यांनी दिली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

शेतीच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती कळण्यासाठी लवकरच

ई पंचनामे – शंभूराज देसाई

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, सततचा पाऊस आदी कारणांमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती कळावी यासाठी यापुढे डिजिटल माध्यमाचा उपयोग करून ई पंचनामे करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांना निकषापेक्षा अधिक मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य दीपक चव्हाण यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे.  विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकत्रित लाभ देण्यासंदर्भात नियोजन करण्यात येईल. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून सहा हजार ४१७ कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चार हजार ५५० कोटी रुपये वितरित झाले असून उर्वरित रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी पाच कोटी ५८ लाख रुपये निधी प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. उर्वरित १७ कोटी निधीही मिळणार असून तो तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

या लक्षवेधी सूचने वरील चर्चेत सदस्य नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

दीपक चव्हाण/विसंअ/

000

पुणे शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्ते तयार

करण्यास प्राधान्य – मंत्री शंभूराज देसाई

“पुणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ च्या शहरालगतच्या मार्गावर पुणे महापालिकेच्या ताब्यात असणाऱ्या जागेवर सेवा रस्ते तयार करण्यासंदर्भात महापालिकेला सूचना दिल्या जातील”, अशी माहिती परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य भीमराव तापकीर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते.

ते म्हणाले की, दरीपूल ते सिंहगड रोड पर्यंत डाव्या बाजूचा सेवा रस्ता बांधण्यात आलेला आहे. उजव्या बाजूस सिंहगड रोड ते इंद्रयणी शाळेपर्यंत सेवा रस्ता असून नऱ्हे स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या बाजूने समांतर नाला असल्यामुळे महामार्गाच्या हद्दीत सेवा रस्ता होऊ शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी नाल्याच्या बाजूने सुमारे तीन मीटर रुंदीची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जागा आणि उर्वरित पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम १९४९ चे कलम २०५ नुसार आखावयाचा नियोजित ६ मीटर रूंदीचा रस्ता असे दोन्ही मिळून एक मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम महानगरपालिकेमार्फत करण्याचे नियोजित केलेले आहे. या कामासाठी पथ विभागामार्फत रु. ४.१८ कोटी रकमेची निविदा मागविण्यात आली असून ती मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. या मान्यतेनंतर राष्ट्रीय मार्ग रस्त्यालगत इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यापुढील नऱ्हे स्मशानभूमी ते भूमकर चौक व नवले पुल ते कात्रज दरम्यानच्या भागातील सेवा रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

पुणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये ६० मीटर रुंदीचा राष्ट्रीय महामार्ग सोडून त्याच्या लगत मंजूर विकास आराखड्यामध्ये दोन्ही बाजूस प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते वारजे ते वडगाव बु. ते आंबेगाव या भागापर्यंत दर्शविण्यात आलेले आहे. पुणे महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग लगतचे १२ मीटर रूंदीचे डी. पी. रस्ते संपूर्णतः विकसित झालेले नाही. तथापि, वारजे भागामध्ये ज्या ठिकाणी चटई क्षेत्र मोबदल्यामध्ये रस्त्याची जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आलेली आहे,  त्या ठिकाणी १२ मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गा लगतचे सुमारे ३.५ कि.मी. लांबीच्या डी. पी. रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वडगाव बु. मध्ये सुमारे १ कि.मी. लांबीचे १२ मीटर रूंदीच्या डी. पी. रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. आंबेगाव बु. या भागामध्ये १२ मीटर डी.पी. रस्त्याची जागा पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात आली नसल्याने तेथे रस्ता विकसनाचे काम अद्याप झालेले नाही. मात्र या भागामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या ६० मीटर रूंदी अंतर्गत स्वंतत्र सेवा रस्त्याचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असल्याची माहिती मंत्री श्री. देसाई यांनी दिली.

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य राहुल कुल यांनी सहभाग घेतला.

000

बँक अपहार प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल – कामगार मंत्री सुरेश खाडे

माथाडी/ सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयीन कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने ‘दी रेल्वे गुडस क्लिअरिंग अँड फॉरवर्डींग एस्टॅब्लिशमेंट बोर्ड, मुंबई’  या मंडळात २५.७० कोटी रुपयांचा बँक अपहार झाल्याचे नमूद केले होते. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य यामिनी जाधव यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे यांनी ही माहिती दिली.मंत्री श्री. खाडे म्हणाले की, विविध माथाडी मंडळांमार्फत त्यांच्याकडे जमा होणाऱ्या लेव्हीच्या रक्कमा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये मुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवण्यात येतात. त्याचप्रमाणे दी. रेल्वे गुड्स क्लिअरिंग अँड फॉरवर्डींग एस्टॅब्लिशमेंटस् बोर्ड, मुंबई या मंडळाने त्यांच्या लेव्हीची रक्कम रु. २५.७० कोटी स्टेट बँक ऑफ इंडिया,अंधेरी व कोपरखैरणे या बँकेमध्ये मुदतठेवीच्या स्वरुपात गुंतवणूक केली होती. त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडिया, कोपरखैरणे या बँकेमध्ये सदर गुंतवणुकीसाठी दिलेल्या धनादेशापैकी रु.१.७० कोटी रुपयाचे धनादेश बँकेचे व्यवस्थापक यांनी परस्पर त्रयस्थ व्यक्तींना देऊन अपहार केल्याचे निदर्शनास आले. याबाबत  गुन्हा नोंदविण्यात आला असून तत्कालिन बँक व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली होती. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, अंधेरी येथील मंडळाच्या २४ कोटी रुपयांच्या मुदतठेवीच्या गुंतवणुकीवर बँकेचे व्यवस्थापक व इतर त्रयस्थ व्यक्तींनी रु. २१.६० कोटीची अधिकर्ष सवलत घेऊन अपहार केला आहे. ही बाब मंडळाच्या निदर्शनास आल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांनी पोलिसात गुन्हा नोंदविला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई येथे वर्ग करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये तत्कालिन बँक व्यवस्थापकासह चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री. खाडे यांनी दिली. याप्रकरणी  बँकेने मंडळास २ कोटी २९ लाख रुपये परत केले असून उर्वरित रक्कम मिळण्यासाठी उच्च न्यायालयात पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

000

दीपक चव्हाण/विसंअ

माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा – संचालक हेमराज बागूल

नागपूर, दि. २७ : “माध्यमांचा परिघ वेगाने विस्तारतो आहे. त्यांचे प्रवाह बदलत आहेत. या परिस्थितीत विश्वासार्ह, अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. अशा माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्याचे कौशल्य आत्मसात करा”, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(प्रशासन) हेमराज बागूल यांनी विद्यार्थ्यांना केले.

संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयमार्फत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ आणि प्रिमिअर ॲकॅडमी, नागपूर येथील विद्यार्थ्यांची विधान भवन, नागपूर येथे अभ्यास  भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी माहिती व जनसंपर्क शिबिर कार्यालयात आयोजित ‘शासन आणि जनसंपर्क’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, प्रा. सुरेश जाधव, प्रा. विभा जाधव, प्रा.श्रृती इंगोले उपस्थित होते.

संचालक श्री. बागूल म्हणाले, “माध्यम क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. मुद्रित, दृकश्राव्य, समाजमाध्यमांचा प्रभाव वाढतो आहे. या बदलत्या काळात  अधिकृत, प्रमाणित माहितीला महत्व प्राप्त झाले आहे. या माहितीवर प्रक्रिया केल्याशिवाय माहितीचे ज्ञानात रूपांतर होत नाही. बाजारप्रधान जगात, प्रतिमानिर्मितीच्या युगात तुम्हाला स्वत:चे भवितव्य घडवायचे आहे. साहित्य, अुनभूती, चिंतनाच्या माध्यमातून मानसिक जडणघडण होत असते. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास महत्वाचा असून त्यांचे सृजन आणि सर्जन विकसित झाले पाहिजे. त्यासाठी वाचनाबरोबर स्वत:शी बोला”.

“विस्तारलेल्या साधनांचा उपयोग योग्य पद्धतीने करा. मुद्रित, दृकश्राव्य माध्यमे, समाज माध्यम, जनसंपर्क क्षेत्र, संशोधन, संवाद या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संयम ठेवून स्वत:ची कौशल्ये विकसित करा. त्यामुळे तुम्हाला या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच समाज माध्यमांचा अतिरेकी वापर टाळावा”, असेही श्री. बागूल यांनी सांगितले.

‘विधिमंडळ समिती पद्धती’ या विषयावरील व्याख्यानात विधानमंडळ सचिवालयातील उपसचिव विलास आठवले म्हणाले की, विधिमंडळ समिती म्हणजे विधानमंडळाची प्रतिकृती असते. समित्यांचे विविध प्रकार आहेत. सार्वजनिक हितासाठी समित्यांचे कामकाज सुरू असते.  लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती अशा विविध समित्यांच्या माध्यमातून प्रशासनावर अंकुश ठेवला जातो. विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहाचे कामकाज सुरू असते. प्रशासनावरील नियंत्रणासाठी समिती कार्यपद्धती महत्त्वाची समजली जाते.

‘विधिमंडळ कामकाज आणि प्रसार माध्यमांची भूमिका’ या विषयावरील व्याख्यानात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने म्हणाले की, लोकशाही मजबूत करण्यात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान आहे. माध्यमे अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, समाजसुधारक आगरकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेत मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखणीला नैतिक अधिष्ठान होते. राज्यघटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याप्रमाणे पत्रकारिता अभिव्यक्तीचे कार्य करते आहे. माध्यमे आणि शासन परस्परांशी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यामुळे लोकशाही टिकून राहण्यास मदत होते.

लोकानुरंजन न करता लोकप्रबोधनात्मक बातम्या देण्यासाठी पुढाकार घ्यावा. सनसनाटीशरण न होता लोकप्रबोधनात्मक पत्रकारिता करा, असे आवाहनही श्री. मदाने यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी अरफान पठाण, कीर्ती जाधव, कल्याणी वरकुडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

००००

नागपूर विधानभवन मध्यवर्ती सभागृहासाठी जमीन अधिग्रहणाबाबत त्वरित कार्यवाही करावी

नागपूर, दि. 27 : नागपूर येथील विधानभवन येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी जमीन अधिग्रहण करणे तसेच मुंबईतील मलबार हिल येथील अजंठा शासकीय निवासस्थान व त्या अखत्यारितील मोकळी जागा ही महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यासंदर्भात पुढील एक महिन्यात कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूर जिल्हाधिकारी विपिन इटनकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अध्यक्ष श्री. नार्वेकर म्हणाले की, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशन घेण्यासाठी जागा अपुरी पडते. या ठिकाणी विधिमंडळाची संयुक्त बैठक घ्यायची असल्यास अडचण होते. त्यामुळे येथे मध्यवर्ती सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी बाजूच्याच शासकीय मुद्रणालयाची अतिरिक्त जमीन घेणे प्रस्तावित आहे. ही जमीन अधिग्रहण करण्याबाबत त्वरित आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच मुंबई येथील अजिंठा शासकीय निवासस्थान हे मोडकळीस आले असून या ठिकाणी विधिमंडळ पिठासीन अधिकारी म्हणजेच विधान परिषद सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते यांच्यासाठी निवासस्थान बांधणे शक्य होईल. ही जागा महाराष्ट्र विधिमंडळास वर्ग करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात पुढील एक महिन्यात योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे निर्देश श्री. नार्वेकर यांनी यावेळी दिले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गाचा समारोप

नागपूर, दि. 27 :- राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने 49 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे विधानभवन नागपूर येथे 20 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. या संसदीय अभ्यासवर्गाचा आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनील झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते यांच्या उपस्थितीत समारोप झाला.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अभ्यासवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या प्रा.डॉ.विद्या चौरपगार यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेने या अभ्यासवर्गाचे आयोजन केल्‍याबद्दल आभार व्यक्त केले. अवर सचिव सुनील झोरे यांनी अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जि.मा.अ.

स्वातंत्र्य, मजबूत संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांमुळे संसदीय लोकशाहीवरील विश्वास वाढेल – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नागपूर, दि. 27 :- नागरिकांचे स्वातंत्र्य, मजबूत संविधान आणि त्यावर विश्वास ठेवणारे नागरिक यामुळे संसदीय लोकशाहीवरील विश्वास वाढत असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर  यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘विधिमंडळ : जनतेच्या इच्छा आकांक्षांच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ’ या विषयावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

 

ॲड. नार्वेकर म्हणाले, “संसदीय लोकशाही प्रणालीत लोकप्रतिनिधी सभागृहात जनतेच्या भावना मांडत असतात. त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याला लोकप्रतिनिधींचे प्राधान्य असते. राज्य व देशहिताच्या प्रश्नांवर चर्चा होत असते. सामूहिकपणे राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात. विधिमंडळे संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार काम करीत असतात. कायदा संविधानाच्या विरुद्ध असेल तर न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारातच विधिमंडळे कामकाज करीत असतात. विधिमंडळ हे जनतेच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा व्यक्त करण्याचे व कायदे करण्याचे व्यासपीठ आहे”.

“नागरिकांनी स्वातंत्र्य उपभोगताना घटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडावीत, तरच आपली लोकशाही सुरक्षित राहील. लोकशाहीचे महत्त्व अनुभवण्यासाठी अधिकार व कर्तव्ये माहिती असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिक्षण हे महत्वाचे आहे. देशातील सर्व नागरिकांना शिक्षित करण्यासाठी कायदा केलेला आहे. भारत हा प्रबळ देश बनविण्यासाठी शिक्षित नागरिक असणे आवश्यक आहे. पारदर्शकता ही लोकशाहीत महत्त्वाची असते. आपल्या संसदीय लोकशाहीला असलेली गौरवशाली परंपरा सुरु राहील आणि विधिमंडळावर विश्वास वाढेल, असे कार्य आपल्या युवा पिढीकडून व्हावे”, अशी अपेक्षाही ॲड.नार्वेकर यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ॲड.नार्वेकर यांनी समर्पक अशी उत्तरे दिली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.प्रेरणा चौधरी यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ.

सीमा भागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

नागपूर, दि. २७ : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांचा आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माहिती दिली.

      सीमा भागातील मराठी बांधवांना संरक्षण मिळावे व त्यांची प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत असलेल्या विशेष प्रयत्नांबाबतची माहिती :

  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमा आंदोलनामध्ये ज्या व्यक्तींनी बलिदान दिले आहे, त्या व्यक्तींना “हुतात्मा” म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकास स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे दरमहा २० हजार निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
  • सद्यस्थितीत कोल्हापूर येथे ८, मुंबई व मुंबई उपनगर येथे ३, पुणे व रत्नागिरी येथे प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण १३ लाभार्थी निवृत्तीवेतन घेत आहेत.
  • सीमावादीत ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सेवाभरती नियमातील सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी अर्ज करण्यास व गुणानुक्रमे निवड होत असल्यास नेमणुकीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्याची छाननी करताना ८६५ गावांतील १५ वर्षांचे वास्तव्य विचारात घेऊन वास्तव्याचा विहित नमुन्यातील दाखला सक्षम अधिकाऱ्‍यास सादर करणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील गृहनिर्माण मंडळामार्फत गाळेवाटपाचे अर्ज करताना कर्नाटक राज्यात असलेल्या व महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या सीमावादीत ८६५ गावांतील १५ वर्षे वास्तव्य हे त्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य असल्याचे समजण्याबाबत गृहनिर्माण विभागाला सूचना दिल्या आहेत.
  • पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य उपविभागामार्फत दरवर्षी प्रयोगात्मक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सीमाभागातील नोंदणीकृत संस्था शासन निकषानुसार सहाय्यक अनुदान मिळण्यास पात्र होतील.
  • डी.एड., पदविका अभ्यासक, डी.एड. शिक्षक, कर्नाटकातील मराठी माध्यमाच्या टी.सी.एच. अर्हता धारकास शिक्षणसेवक पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरविण्याबाबत, शालेय शिक्षण विभागाकडून सीमावादीत भागातील उमेदवारांना सवलती देण्यात आलेल्या आहेत.
  • सीमावादीत भागातील मराठी भाषिक उमेदवारांना इतर मंत्रालयीन विभागांकडूनही सवलती देण्यात येतात. उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत या भागातील उमेदवारांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) पूर्व प्रशिक्षण केंद्रात ५ टक्के राखीव जागा व अभियांत्रिकी पदवी परिक्षेसाठी २० जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  • वैद्यकीय शिक्षण विभागाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत ८ जागा, दंत महाविद्यालयांत २ जागा व शासकीय अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयांत ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
  • सीमाभागातील अल्पभाषिक नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करणे व घटनेनुसार द्यावयाच्या सुविधा/ सवलती यांचा आढावा घेऊन सवलती प्रस्तावित करण्यासाठी अपर मुख्य सचिव (अल्पसंख्याक विकास विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे.
  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांमध्ये मराठी भाषिकांसाठी कार्य करणाऱ्‍या मराठी संस्थांना/ मंडळांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • मराठी भाषेचा विकास, संवर्धन, संगोपन आणि अभिवृध्दी होण्याच्या दृष्टीने प्रत्येक उपक्रमास कमाल १ लाख रुपयांच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात येणार आहे. एका मराठी भाषिक संस्थेने/ मंडळाने एकापेक्षा जास्‍त उपक्रम राबविल्यास अशा उपक्रमांसाठी मिळून १ कोटीच्या कमाल मर्यादेत अनुदान मंजूर करण्याचा निर्णय
  • महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत, ७/१२ उतारे तसेच कार्यालयातील सूचना फलक मराठी भाषेत लावणे, मराठी भाषेचा सर्व स्तरावर उपयोग करणे तसेच कन्नड भाषेची मराठी भाषिक जनतेवर सक्ती न करणे यासाठी कर्नाटक शासनाशी समन्वय साधण्याचा निर्णय.
  • मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावांत महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागास निर्देश.
  • मुख्यमंत्री सहायता देणगी या योजनेत सीमाभागातील ८६५ गावांचा पुन्हा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २७ : राज्याची सर्वांगीण प्रगती व्हावी तसेच कल्याणकारी राज्याची निर्मिती करत असताना त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, गरीबी, निरक्षरता दूर व्हावी याअनुषंगाने अर्थसंकल्पाची आखणी होणे गरजेचे असते. शासनाचा प्रत्येक पैसा हा सर्वसामान्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या पुर्ततेसाठी खर्च व्हावा यासाठीचे सर्वात महत्त्वाचे आयुध म्हणजे अर्थसंकल्प होय, असे प्रतिपादन वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयातील विद्यार्थ्यांसाठी विधानभवन येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत आयोजित संसदीय अभ्यासवर्गात ‘अर्थसंकल्पाची प्रक्रिया – कल्याणकारी राज्यनिर्मितीचे महत्वपूर्ण साधन’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे यांच्यासह विविध विद्यापीठांचे विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाच्या जीडीपीमध्ये १५ टक्के योगदान महाराष्ट्राचे आहे. देशातील १०३ पैकी २७ युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. देशात आणि राज्यात अर्थसंकल्पातून याला चालना देण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना हा जनतेचा पैसा आहे, हा दृष्टीकोन असायला पाहिजे. प्रत्येक पैशाचा वापर हा कल्याणकारी राज्याच्या दिशेने व्हायला पाहिजे. भविष्याचा द्रष्टीकोन, तत्कालीन प्रश्न आणि आर्थिक द्रष्टीकोनातून अर्थसंकल्पाची मांडणी व्हायला हवी. त्याचबरोबर मर्यादीत साधनसामुग्री आणि अमर्यादित गरजा यांचा तोल राखून अर्थसंकल्प मांडणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रश्नांचा वेध घेत त्याचबरोबर बदलत्या जगाचा वेध घेत अर्थसंकल्प सादर करावा लागतो. भुकमुक्त समाज, विषमतामुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दीष्ट असावे. त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत विचारपूर्वक अर्थसंकल्प मांडावा. निवडणुकीचा वेध घेत अर्थसंकल्प मांडल्यास त्याचे वाईट परिणाम होतात. ग्रेट ब्रिटन, श्रीलंका यांच्यासह युरोपातील अनेक देश याचे दुष्परिणाम भोगत आहेत. त्यामुळे कल्याणकारी राज्यनिर्मितीसाठी शेवटच्या घटकाला समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची विद्यार्थिनी दर्शना खंडीझोड हिने आभार मानले.

००००

इरशाद बागवान/विसंअ/

डॉ. पंजाबराव देशमुख यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

नागपूर, दि.२७ : डॉ. पंजाबराव देशमुख ऊर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

येथील शासकीय निवासस्थान रामगिरी येथे झालेल्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भावना गवळी, आमदार कृष्णा खोपडे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीसुद्धा पुष्प अर्पण करुन भाऊसाहेबांना अभिवादन केले.

ताज्या बातम्या

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण – सरन्यायाधीश भूषण गवई  

0
नागपूर, दि २७ : नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व...

‘संवादवारी’च्या प्रदर्शनाला सणसर येथे वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
पुणे, दि.२७: डोक्यावर विठ्ठल-रुखमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, हातात टाळ, वीणा, भागवत धर्माचा पताका हाती घेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ वारकऱ्यांची पाऊले माहिती व...

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर तालुक्यात आगमन

0
पुणे, दि. २७: 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' या भावनेसह, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'ज्ञानोबा- माऊली...

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेच्या पाठीशी राहू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : जिल्हा परिषदेच्या योग दिनाच्या कार्यक्रमात साडेपाच लाखांच्या आसपास नागरिक सहभागी झाले. यातून सांगली जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास...

गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलीस दलाने प्रभावी प्रतिबंधात्मक यंत्रणा कार्यान्वित करावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
पोलीस दादा, पोलीस दीदींनी घरोघरी प्रबोधन करण्याच्या सूचना तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांची कार्यशाळा घेण्याचे निर्देश  सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : कायदा व...