रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 1599

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ

पुणे, दि. ४: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शुभारंभ करण्यात आला. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी ज्योत प्रज्वलित केल्यानंतर ऑलम्पियन खेळाडू श्री अजित लाकरा यांना सोपवून रॅलीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद महाड, शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय कडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सिद्धेश शिर्के मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात गुरुवार ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती पुण्यातील एसएसपीएमएस येथे रायगड येथील मुख्य ज्योतीत विलीन करण्यात येणार आहेत. ही क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे दुपारी १ वाजता पोहोचणार आहे.

या रॅलीत खेलरत्न पुरस्कारार्थी अंजली भागवत, पदमश्री पुरस्कारार्थी शितल महाजन, ध्यानचंद पुरस्कारार्थी स्मिता यादव (शिरोळे), ऑलिम्पियन खेळाडू मारुती आडकर, धनराज पिल्ले, अजित लाकरा, विक्रम पिल्ले बाळकृष्ण आकोटकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वपनिल कुसाळे, रुतुजा भोसले, श्रद्धा तळेकर, अर्जून पुरस्कारार्थी निखील कानिटकर, शंकुतला खटावकर, शांताराम जाधव, रेखा भिडे, गोपाळ देवांग, मनोज पिंगळे, काका पवार, राहूल आवारे, नंदन बाळ, संदीप किर्तने, नंदू नाटेकर, सुयश जाधव व मुरलीकांत पेटकर सहभागी होणार आहेत.

जगातील आणि महाराष्ट्रातल्या विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून मजबूत व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 4 : “विश्वातील विविध विद्यापीठांचे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांचे नाते मराठीच्या अभ्यासक्रमातून अधिक मजबूत होण्याची शक्यता विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झाली आहे”, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

वरळी येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया येथे ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्व मराठी संमेलन २०२३ या कार्यक्रमानिमित्त आयोजित ‘मराठी भाषा : काल, आज आणि उद्या’ या विषयी चर्चा सत्राच्या अध्यक्ष म्हणून डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जगातील ज्या विद्यापीठांमध्ये याआधीच समन्वय झालेला आहे, तिथे तो समन्वय अधिक मजबूत व्हावा तसेच त्या विद्यापीठांमध्ये आणि आपल्याकडील विद्यापीठात मराठी भाषेच्या बरोबरच इतिहास, विज्ञान, गणित, शेती या विषयी शिक्षणाच्या पद्धती अशा अनेक विषयांच्या अनुभवाची देवाणघेवाण आणि विचार मंथन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे”.

ज्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार कपडे खरेदी करतो, विविध उपहारगृहांत वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखतो, त्याप्रमाणे आपण मराठी भाषेचा अधिकाधिक वापर होण्यासाठी नवनवीन लेखकांची पुस्तके खरेदी करुन वाचावीत. पालकांनी मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जगातील अनेक देशांमध्ये मराठी जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविणारी मंडळे आहेत. मराठी वृद्धिंगत होण्यासाठी अमेरिका, रशिया, जर्मनी अशा विविध देशात काम सुरू आहे. आपल्या राज्यातही शासनाच्यावतीने उपक्रम राबविले जातात, असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

युरोपीय देशांतील महाराष्ट्रामध्ये यावे यासाठी प्रयत्न व्हावा, असे श्रीमती गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी, या कार्यक्रमास जगभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता मराठीचा प्रचार – प्रसार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “पंचायत राज विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भारताचा संबंध येत असल्याने गाव समृद्ध झाले तर आपोआपच राज्य आणि देश समृद्ध होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. गावातील माणूस आपल्या गरजा पूर्ण करू शकला तर शहरांवरचा ताणही वाढणार नाही”, असे ते म्हणाले. मराठीचा प्रचार आणि प्रसार करणे ही केवळ शासनाचीच नाही तर प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे सांगून यासाठी प्रत्येकाने मातृभाषेबाबत अभिमान बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक श्रीकांत बोजेवार म्हणाले, “ज्याबद्दल आपल्याला प्रेम असते त्याबद्दलच चिंता व्यक्त होते. गेली अनेक दशके मराठी भाषेबद्दल अशीच चिंता व्यक्त केली जात असते, तथापि भाषा ही प्रवाही असल्याने शब्द येत – जात असतात. पण भाषा कधीच संपत नाही, ती टिकून राहते, मराठी ही ज्ञानाबरोबरच अर्थार्जनाची भाषा झाली पाहिजे, ही सामूहिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. मराठीमध्ये दरवर्षी सुमारे चार हजार पुस्तके प्रकाशित होतात, वाचकांनी यातील बदल आत्मसात करून जुन्या पिढीतील लेखकांबरोबरच नवीन पिढी काय लिहिते तेसुद्धा वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.

पॉप्युलर प्रकाशनचे हर्ष भटकळ यांनी प्रकाशक म्हणून विचार व्यक्त करताना, “वाचन जितके जास्त तितका शब्द साठा वाढतो”, असा अनुभव असल्याचे सांगितले. जगात महाराष्ट्राबाहेर सुमारे नऊ कोटी मराठी वाचक आहेत, मराठी भाषा आपली वाटली नाही तर नवीन पिढी इंग्रजीकडे वळते, असे सांगून भाषेकडे व्यापक नजरेने पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पॉप्युलरच्या मराठी प्रकाशनाच्या ७० वर्षांच्या कालावधीतील विविध अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.

पत्रकार आणि साहित्यिक असलेल्या संजीवनी खेर यांनी विश्व मराठी संमेलन हा मराठीचा जागर असल्याची भावना व्यक्त केली. मराठीचे वाचक मोठ्या संख्येने आहेत, पण ही भाषा पुढच्या पिढीत बोलती राहिली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी ही कमावण्याची भाषा आहे हा समज दूर होणे गरजेचे असल्याचे सांगून मराठी भाषेप्रमाणेच इतर भारतीय भाषांचीही ही समस्या असल्याचे त्या म्हणाल्या. हा समज सर्वांनी मिळून बदलावा लागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठीची प्राचीनता अनेक ग्रंथांमधून दिसून येते. मराठीत ४०० हून अधिक बोली असून त्यांची गोडी अलौकिक असल्याचे त्या म्हणाल्या. भाषेची शब्दसंपत्ती वाढत राहिली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

मधुमेह- हृदयविकारातील नवीन घातक घटकांना वेळीच ओळखा-डॉ. शंतनू सेनगुप्ता

नागपूर, दि.4: हृदयविकार आणि मधुमेह या नव्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विकारांमध्ये अलिकडच्या संशोधनातून नवीन घातक घटक असल्याचे निदर्शनास आले आहेत, हे घटक वेळीच ओळखून सजग राहून आपला बचाव करावा, असे प्रतिपादन डॉ. शंतनू सेनगुप्ता यांनी आज येथे केले.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात ‘हृदयविकार आणि मधुमेह या विषयातील नवीन संशोधन’ याविषयावर चर्चा झाली. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. एस. जी. वसिष्ट हे होते. तर या चर्चासत्रात डॉ. शंतनू सेनगुप्ता आणि डॉ. सुनील गुप्ता या तज्ज्ञांनी सहभाग घेतला. हे दोन्ही मान्यवर नागपूरकर आहेत.

डॉ.सेनगुप्ता म्हणाले की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी लिपोप्रोटीन सारख्या नवीन जोखीम घटकांची लवकर ओळख आणि प्रतिबंध हे महत्त्वाचे आहेत. हार्टअटॅक ला जबाबदार पर्यावरणीय, वर्तणूकीय, रोगनियंत्रण (रक्तदाब-मधुमेह)  इ. घटक आहेत. यावर उपाय म्हणून दररोज 8 ते 10 हजार पाऊले चालावे. अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधीसाठी स्थिर बसल्यास थोड्या थोड्या वेळात चालावे. डिजिटल साधनाचा अतिवापर हा घातक आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ.गुप्ता म्हणाले की,  मधुमेह 2021 मध्ये 537 दशलक्ष प्रौढ मधुमेहासह जगत होते. ही संख्या 2030 पर्यंत 643 दशलक्ष आणि 2045 पर्यंत 783 दशलक्षपर्यंत वाढण्याचे अनुमान आहे. रक्तातील ग्लुकोजचे लवकर निदान आणि नियंत्रण यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारतीय लोक इतरांपेक्षा वेगळे आहेत. त्यांची शरीराची रचना बारीक असली तरी शरीरात फॅट्स चे प्रमाण भरपूर असते. मधुमेही व्यक्तीला आपण रोगी न म्हणता ‘पेशंट विथ डायबिटीज’ अस म्हणावं. रोगाचे निदान न होता तसेच इन्सुलिनचे प्रमाण माहिती नसल्यामुळे  मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याबाबत अधिक माहिती असल्यास अनेक रुग्णांचे जीव वाचवता येतील,असे ते म्हणाले.सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा जोशी यांनी केले.

पुरातत्व विभागाच्या ‘समृध्द भारतीय वारसा’ प्रदर्शनाचे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि.3 : भारतीय विज्ञान काँग्रेसच्या आयोजनानिमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील प्राचिन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभाग, केंद्र शासनाचा पुरातत्व सर्वेक्षण व उत्खनन विभागाच्यावतीने विद्यापिठाच्या आवारात ‘समृध्द भारतीय वारसा’ या विषयावर प्रदर्शन उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॅा.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.

कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र.कुलगुरु डॉ. संजय दुधे, अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. प्रिती त्रिवेदी आदी यावेळी उपस्थित होते. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या निमित्ताने हे प्रदर्शन लावण्यात आले आहे. डॉ.सिंह यांनी त्याचे फित कापून उद्घाटन केले.

विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच देशाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभव, देशातील तसेच विशेषत: विदर्भातील पुरातत्व उत्खनन आणि वास्तुकला वारसा दर्शविणाऱ्या या प्रदर्शनाची राज्यमंत्री डॉ. सिंह यांनी पाहणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेल्या चित्रांचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व पुरातत्व विभागाच्या प्रमुख डॉ. त्रिवेदी यांनी विषद केले. विभागाच्या प्राचीन वस्तू संग्रहालयाची देखील त्यांनी पाहणी केली.

तक्षशिला, हडपसर, ब्रम्हगिरी, कालीगंगा येथील उत्खननासह नागपूर जिल्ह्यातील अडम व मनसर तर भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील उत्खनन व तेथे आढळून आलेल्या वस्तूंची चित्रे या प्रदर्शनात आहेत. मानवाची उत्पत्ती, प्राचीन काळातील अवजारे, सातपुडा पर्वतातील गाविलगडच्या डोंगरांमधील कोरीव काम, नागपूर शहरातील वास्तूशास्त्रीय वारसा स्थळे, गोंडकालिन किल्ल्यांची चित्रे व माहिती या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई, दि.३ – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यांत कक्षाकडून 2600 रुग्णांना एकूण 19 कोटी 43 लाख रुपयांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून रुग्णसेवेत झोकून दिले आहे. त्यामुळेच पहिल्याच जुलै महिन्यात 194 रुग्णांना 83 लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात 276 रुग्णांना 1 कोटी 40 लाख, सप्टेंबर महिन्यात 336 रुग्णांना 1 कोटी 93 लाख, ऑक्टोबर महिन्यात 256 रुग्णांना 2 कोटी 21 लाख, नोव्हेंबर महिन्यात 527 रुग्णांना 4 कोटी 50 लाखांची तर डिसेंबर महिन्यात विक्रमी 8 कोटी 52 लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात रुग्णांना देण्यात आलेल्या विक्रमी मदतीबाबत बोलतांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे लढवय्या सहकारी गमावला – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, दि. 3 : “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे”, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले, “मितभाषी, पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. ‘चिंचवडचा ढाण्या वाघ’ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो”, असे श्री.मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

0000

 

 

लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 3 :- “आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नांची जाण आणि माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ माझ्या पक्षाचेच नाही तर माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला”, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी – चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहोचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत”.

००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. ३ :- “नगरसेवक, महापौर ते विधिमंडळातील तडफदार प्रतिनिधी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे नेतृत्व काळाने हिरावून नेले आहे”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसेच दिवंगत जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आमदार जगताप यांनी स्वकर्तृत्वाने कारकीर्द घडवली. पिंपरी-चिंचवडचा विकास हा त्यांचा ध्यास होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. विधिमंडळातही ते आपला मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, अडचणी यासाठी हिरीरीने काम करत असत. लोकहिताच्या दृष्टीने अनेकदा त्यांनी संघर्षशील भूमिका घेतली. आजारपणाशीही त्यांचा प्रदीर्घ लढा सुरू होता. यातही त्यांनी आपले कर्तव्य बजावताना कुचराई केली नाही. पण नियतीला हे मान्य नसावे आणि आमदार जगताप यांना काळाने हिरावून नेले. हा त्यांच्या परिवारासह, कार्यकर्ते, चाहत्यांसाठी मोठा आघात आहे. जगताप कुटुंबियांना या आघातातून सावरण्यासाठी बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लोकप्रिय आमदार लक्ष्मण जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

00000

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३ : आद्य शिक्षिका, भारतीय समाजसुधारक, कवयित्री  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज मंत्रालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन (प्रशासकीय सुधारणा) विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

0000

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे, दि. 3 (जिमाका) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

“देशातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा वारसा जपून आजच्या महिलांनी विविध क्षेत्रात आणखी भरारी घ्यावी, हेच सावित्रीबाई फुले यांना खरे अभिवादन असेल”, अशा शब्दात मुख्यमंत्री महोदयांनी अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार राजाराम तवटे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. 29 :   राज्यात पुढील 24 तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

0
मुंबई,दि. २९ - महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ८.२८ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अदत्त शिल्लक रकमेची दि. २८ जूलै, २०२५ पर्यंत...

बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी एनडी स्टुडिओमार्फत साकारणार कला प्रकल्प

0
मुंबई, दि. 29 : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी बेळगाव येथील ‘बेळगाव स्मार्ट सिटी’ मध्ये नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सांस्कृतिक कार्य...