सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1598

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. ५ :- भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

श्री.देशपांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, दि. ०४ ऑगस्ट, २०२२ ते ०७ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत पूर्व- पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात आले होते. या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे इ. सुधारणा करून दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग, महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती व विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (PVTG) प्रवर्गातील पात्र व्यक्तींची १०० टक्के नोंदणी करण्याबाबत निदेश दिले होते. त्याप्रमाणे १०० टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले आहे. एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ ते ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारुन दि. २६ डिसेंबर, २०२२ पर्यंत सर्व दावे व हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आज दि. ०५ जानेवारी, २०२३ रोजी अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९, महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७ तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४ हजार ७३५ असून एकूण मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ असल्याची माहिती श्री.देशपांडे यांनी यावेळी दिली. या यादीत नाव आणि इतर माहितीत दुरूस्ती केलेले पुरूष मतदार १ लाख ५२ हजार २५४, महिला मतदार १ लाख ६ हजार २८७ तर तृतीयपंथीय ९० असे एकूण २ लाख ५८ हजार ६३१ मतदार आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ च्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ इतकी होती. तर, ५ जानेवारी २०२३ नुसार त्यात वाढ होऊन ती ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ एवढी झाली आहे. एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ७७ हजार ४८३ इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात १५ हजार ३३२ ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध

अमरावती, दि. ५ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान दि. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. १२ जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. १३ जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. १६ जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. ४ फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.

मतदार संख्या

अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात १ लाख २० हजार ९४४ पुरूष, ६४ हजार ९०६ महिला व इतर ७५ अशा एकूण १ लाख ८५ हजार ९२५ मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात ३३ हजार २३६ पुरूष, २३ हजार ३२९ महिला, इतर ६४ असे एकूण ५६ हजार ६२९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात २७ हजार ९४३ पुरूष, १६ हजार ५५२ महिला व ११ इतर असे एकूण ४४ हजार ५०६, तसेच बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार १६१ पुरूष, १० हजार ३३६ महिला (इतर शून्य) असे एकूण ३६ हजार ४९७ मतदार नोंदणी आहे.

वाशिम जिल्ह्यात ११ हजार ७८ पुरूष, ३ हजार ९६६ महिला (इतर शून्य) असे एकूण १५ हजार ४४ आणि यवतमाळ जिल्ह्यात २२ हजार ५२६ पुरूष, १० हजार ७२३ महिला (इतर शून्य) एकूण ३३ हजार २४९ मतदारांची नोंदणी आहे.

मतदान केंद्रे

विभागात संभाव्य २६२ मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला जिल्ह्यात ६१, बुलडाणा जिल्ह्यात ५२, वाशिम जिल्ह्यात २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ केंद्रे असतील.

निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून २८८, मतदान अधिकारी म्हणून १ हजार १५३ व सूक्ष्म निरीक्षक म्हणून २८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-१९ बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणुकविषयक विविध बाबींची माहिती दिली, तसेच त्यांचे शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

०००

बृहन्मुंबई क्षेत्रात फटाके वाजविण्यास ३१ जानेवारीपर्यंत मनाई

मुंबई, दि. ५ : बृहन्मुंबई क्षेत्रात पोलीस अधिकाऱ्यांच्या परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फटाके विक्रीसह फटाके जवळ बाळगणे, हस्तांतरण करणे, प्रदर्शन करणे आणि वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई पोलीस दलातील अभियान शाखेचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले आहेत. दि.३१ जानेवारीपर्यंत आदेश लागू राहतील.

नववर्षानिमित्त नागरिक मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत असल्याने अन्य नागरिकांना होणारा अडथळा, गैरसोय, धोका किंवा अन्य प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी फटाक्यांवर काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत.

या ठिकाणी फटाके वाजविण्यास मनाई

दि.३१ जानेवारीपर्यंत ५०० मीटर बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनसोबतच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.च्या परिमितीतील व बाहेरील क्षेत्र, बॉटलिंग प्लांट बफर झोन, माहूल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. बीडीयू प्लांट क्षेत्र, स्पेशल ऑइल रिफायनरीच्या १५ आणि ५० एकर क्षेत्र अशा ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडवू किंवा फेकू नये, असे आदेश, उपायुक्त श्री. ठाकूर जारी केले आहेत.

००००००

शैलजा पाटील/विसंअ/

चला! जाणून घेऊ या संरक्षण दलाची सज्जता आणि सक्षमता

नागपूर दि. ५ : आपले संरक्षण दल व त्याच्या वेगवेगळ्या शाखा अखंडपणे देश संरक्षणासाठी सज्ज असतात. मात्र ही सज्जता, सक्षमता आणि आक्रमकता येते ती विज्ञान आणि तंत्रज्ञानातून. या विज्ञान तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधाचे प्रात्यक्षिक दाखवणारे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना विभागाचे (डीआरडीओ) दालन इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रयोग व त्याची प्रात्यक्षिकांची माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे. दालनाच्या सुरुवातीला आकर्षक ड्रोन ठेवण्यात आला आहे. पाच किलो वजनाचा हा ड्रोन शत्रूच्या सीमेत घुसून ५ कि.मी. परीसरात टेहळणी करू शकतो. युद्धकाळात मानव विरहीत टेहळणी करणारा ड्रोन सध्या युद्धनीतीमध्ये माहिती गोळा करणारे यंत्र म्हणून प्रामुख्याने वापरला जातो. विवाहाच्या चित्रीकरण करणाऱ्या किंवा पोलिसांनी वापरलेले ड्रोन यापेक्षा येथे ठेवण्यात आलेला ड्रोन अधिक सक्षम असतो.

याच दालनात अन्य एका स्टॉलवर ‘कन्फाईंड स्पेस रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल’ नावाचे अद्भुत यंत्र आहे. हे यंत्र जमिनीवर कुठेही दडवलेले स्फोटक शोधून काढते. एवढेच नव्हे तर पायऱ्या चढून स्वतःच स्फोटके लपवलेली बॅग शोधू शकते. स्फोटक शोधणे, उचलणे, स्फोटक जिवंत आहे अथवा नाहीत याचे विश्लेषण करणे. वेळ नसेल तर त्याच ठिकाणी स्फोटक निकामी करते. अशा पद्धतीचे केवळ रिमोट वर चालणारे हे यंत्र असून अडचणीच्या ठिकाणी ठेवलेले स्फोटक शोधून काढण्याचे कौशल्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मानवाच्या प्रतिकृतीत तसेच छोट्या खेळण्याच्या आकारात हे यंत्र लक्ष वेधून घेते.

‘सबमरीन सोनार सिस्टम’ ही यंत्रणा समुद्राच्या पोटातील हालचालींचे तांत्रिक विश्लेषण करते. समुद्रात निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वरून नेमके अंतर कसे काढायचे, त्याचे विश्लेषण कसे करायचे, या विश्लेषणाचे नेमकेपणा कसा असतो, याबाबतची माहिती येथे दिली जाते. दिशा ठरवणे आणि अंतर ठरवणे अशी विभागणी सोनार सिस्टममध्ये केलेली असते. सैनिकी कारवाया, नागरिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करताना हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या स्वरूपात वापरले जाते.

‘डिफेन्स जिओ इन्फॉर्मेटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट’ चंदीगड येथील संस्थेच्या कामकाजाची माहिती देते. ही संस्था हिमालयामध्ये निर्माण होणाऱ्या हिम वादळांसंदर्भात विश्लेषण देते. हिम वादळ निर्माण होणार अथवा कसे?यासंदर्भात सैन्यदलास माहिती देण्याचे काम ही संस्था करते. हिमालयामध्ये कोणत्या ठिकाणी कोणत्या क्षमतेचे बर्फाचे वादळ निर्माण होऊ शकते; याची कल्पना या संस्थेमार्फत दिली जाते. याशिवाय क्षेपणास्त्रांबाबतची अनेक दालने या ठिकाणी आहेत. यामध्ये मध्यम परिणामकारक मारा करणारे क्षेपणास्त्र व त्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. हवेतून हवेत मारा, हवेतून टॅंक निकामी करणारे, दीर्घ अंतरावर मारा करणारी अनेक क्षेपणास्त्रे येथे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.

000

दर्पण : परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र आद्य संपादक बाळशास्त्री जांभेकर

समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मत होते. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी वर्तमानपत्रासारखी मोठी शक्ति आहे. तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो, याचा बाळशास्त्री जांभेकरांना अभ्यास होता. त्यामुळेच त्यांनी तत्कालीन चुकीच्या रुढी परंपरांवर प्रहार केला. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत बाळशास्त्री  हे प्रगमनशील व्यवहारवादी होते. म्हणूनच त्यांनी दर्पणला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले. जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. दर्पण दिनानिमित्त विशेष लेख..

६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण हे पाक्षिक सुरु करुन मराठी वृत्तपत्र युगाची जी मुहूर्तमेढ बाळशास्त्रींनी रोवली. आज त्या घटनेस १९१ वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महान कार्याची आठवण म्हणून प्रतिवर्षी ६ जानेवारी रोजी राज्यात ‘दर्पण दिन’ साजरा करण्यात येतो.

बाळशास्त्रींनी त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग करून घेतला आणि दर्पणरुपी ज्योत समाजप्रबोधनासाठी तेवत ठेवली. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. २५ जून १८४० यावर्षी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान जांभेकरांना मिळाला. दर्पण वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्रींनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते.

सामाजिक सुधारणेवर भर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसारासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉर्नोक यांनी १८४० यावर्षी जस्टीस ऑफ पीस अशी पदवी देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला. आज वर्तमानपत्राची भव्यता पाहता झालेली प्रगती लक्षात येते. परंतु त्याकाळी अत्यंत बिकट स्थितीमध्ये वर्तमानपत्र चालविण्याचे कार्य बाळशास्त्रींनी केले. बाळशास्त्रींबद्दल न्यायमूर्ती ना. ग. चंदावरकर यांनी म्हटले आहे की, “बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते. न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे. तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्रींबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, बाळशास्त्री हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. मुंबई महानगरीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनामध्ये त्यांनी मोलाची भर टाकली, असेही अत्रे यांनी म्हटले आहे.

लोककल्याण आणि लोकशिक्षण

वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते, असे सुप्रसिध्द माध्यम तज्ज्ञ ए. ए. बेर्जर यांनी म्हटले आहे. त्यानुसार जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन ‘दर्पण’ प्रकाशित केले. १८३२ चा काळ, अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. ‘दर्पण’मध्ये एकही जाहिरात त्यांनी छापली नाही. अगदी स्वत:चे पैसे टाकून सुमारे आठ वर्षे लोकांसाठी वृत्तपत्र सुरु ठेवले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकुराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत. त्यामुळे ‘दर्पण’ मधील मजकुराचा दर्जा उच्च होता.

पहिले प्रपाठक – शिक्षणसंचालक

वयाच्या ११व्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली होती. मुंबईत इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन त्यांनी विविध विषयांचे ज्ञान मिळविले. या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल याकडे त्यांचा ओढा होता. जांभेकरांनी सतत परिश्रम करुन त्याकाळच्या जवळपास नऊ देशी – विदेशी भाषा आत्मसात केल्या होत्या. तसेच भारतातील पहिले प्रोफेसर म्हणजे प्रपाठक होण्याचा बहुमान १८३४ यावर्षी बाळशास्त्रींना मिळाला. पुढे ते १८४५ यावर्षी ते शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले. यात प्रामुख्याने भूगोल,इतिहास, भौतिकशास्त्र, गणित,  खगोलविद्या, मानसशास्त्र आदी विषयांचा समावेश आहे. सोप्या आणि साध्या मराठी भाषेत सर्वांना समजतील, असे हे ग्रंथ आहेत. याच बरोबर त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले आहेत. एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानाच्या आधारे त्यांनी इतिहास रचला. हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ १८५१ यावर्षी त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. बाळशास्त्री त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचा शिष्यांच्या यादीत दादाभाई नौरोजी, डॉ. भाऊ दाजी, नारायण दाजी, प्रा. केरो लक्ष्मण छत्रे, डॉ. आत्माराम पांडूरंग, नाना नौरोजी, नौरोजी बेहरामजी, रामचंद्र बाळकृष्ण, वासुदेव पांडूरंग, अर्देसर फ्रान्सिस मूस, दफ्तदार केशवराव नरसिंह आदी मान्यवरांचा समावेश आहे.

आद्य संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ अशा बहुआयामी व्यक्त‍िमत्त्वाचे ते धनी होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याकाळी केलेल्या कष्टाची जाणीव निश्चितच आजची माध्यम क्रांती पाहून होते. त्यांच्या या महान कार्यास शतश: प्रणाम…

000

– डॉ. राजू पाटोदकर,

उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे

 

 

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विज्ञान,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक  – डॉ. बसंत कुमार दास

नागपुर, दि. ५ : देश धान्य उत्पादनात खूप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास यांनी केले.

भारतीय विज्ञान काँग्रेस अंतर्गत शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. दास बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना होत्या. पद्मश्री राहीबाई पोपेरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.आशिष पातुरकर, भारतीय विज्ञान काँग्रेसचे सचिव डॉ. एस. रामकृष्णन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, शेतकरी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ. प्रकाश ईटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ.दास म्हणाले की, अन्नधान्याच्या उत्पादनात आपण फार मोठी प्रगती केली आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. फॅमिली फार्मिंग ही नवीन संकल्पना आपण आणतो आहे. जैविक खाद्य पदार्थांना आपण पुढे नेतो आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराने शेतकऱ्यांना सक्षम केले जात आहे.

कुलगुरु डॉ. पातुरकर म्हणाले की, शेतीची व शेतीशी निगडीत व्यवसायाची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. पशु व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, दुग्धोत्पादन आणि नैसर्गिक शेती झाली पाहिजे. या शेतीचा एकूण शेत उत्पादनातील वाटा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत गेला पाहिजे.

डॉ. सक्सेना म्हणाल्या की, आजही शेतकऱ्यांची स्थिती नाजूक आहे. मेहनती इतके उत्पन्न मिळत नाही. निसर्गातील बदलाचा देखील फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे, यासाठी यंदा पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. देश, विदेशातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन करतील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. अन्नधान्याच्या समृद्धतेसह आज आपण एकापेक्षा अधिक पिके घेऊ शकतो आहे. पुढील काळ शेती व शेतकऱ्यांसाठी निश्चितच समृध्दीचा काळ असेल.

कुलगुरु डॉ.सुभाष चौधरी म्हणाले की, जे विज्ञान अस्तित्वात आहे, तेच आपण शिकतो आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी तंत्रज्ञानाची भुमिका महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी जोड व्यवसायासह आपल्या कौशल्याचा देखील वापर करावा. डॉ. प्रकाश कडू यांनी अकोला येथील कृषी विद्यापिठाच्या कामाची माहिती दिली. विद्यापीठाने आतापर्यंत १७६ विविध पिकांचे वाण विकसित केले आहेत. विदर्भातील ११ हजारावर गावांपर्यत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यात आले आहे. जैविक शेतीसाठी विद्यापीठ नियमित काम करीत असल्याचे डॉ. कडू यांनी सांगितले.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या वतीने राहीबाई पोपेरे यांचा सत्कार

शेतकरी विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित बीज माता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा भारतीय विज्ञान काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष डॉ. सक्सेना यांनी सत्कार केला.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, सुरवातीच्या काळात माझ्या कामावर टिका व्हायची, लोक हसायचे. आज ३ हजार ५०० महिलांना सोबत घेऊन २०० गावांमध्ये काम सुरु आहे. आपण पैसे देऊन विष खरेदी करतो आणि खातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. विविध पिकांच्या देशी बियाण्यांच्या संवर्धनासह त्याचा प्रचार प्रसार आम्ही करत आहोत. प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे, गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल. रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे रानभाज्य नष्ट झाल्या. भविष्यात माती देखील नष्ट होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

000

 

 

भारतीय विज्ञान काँग्रेस : आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली

नागपूर, दि. 5– देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड आफ इंडिया’ या प्रदर्शनात ‘आनंदीबाई जोशी ते कादंबिनी गांगुली’ या महिला शास्त्रज्ञांचा जीवनपट मांडण्यात आलाय. भारतीय विज्ञान काँग्रेसला भेट देणाऱ्या प्रत्येक विज्ञान यात्रीला या माहितीचे अप्रूप वाटत आहे. महिला शास्त्रज्ञांबद्दल माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची वाढती गर्दी ह्याचेच द्योतक आहे.

यंदाची भारतीय विज्ञान काँग्रेस ही ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या संकल्पनेवर केंद्रित आहे. यामध्ये ‘शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका’, या विषयावर विशेषत्वाने चर्चा होत आहे. या अनुषंगाने महिला वैज्ञानिकांचा जीवनपट मांडणारे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालखंडात विज्ञान क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानाबद्दल या प्रदर्शनातून माहिती  देण्यात आली आहे. ‘हॉल ऑफ प्राईड’ या हॅाल मध्ये असलेल्या या प्रदर्शनात आनंदीबाई जोशी, केतायुन अर्देशिर दिनशॅा, बिमला बुटी, इरावती कर्वे, असीमा चॅटर्जी, डॅा. जानकी अम्माल, अन्ना मणी, कमल रणदिवे, डॅा. विभा चौधरी, कादंबिनी गांगुली, मेरी पूनन लुकोस, कमल रणदिवे या विज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला चवैज्ञानिकांच्या माहितीचा समावेश आहे.

महत्वपूर्ण अशी माहिती सोप्या भाषेत या प्रदर्शनात पहावयास मिळते. कर्करोगतज्ज्ञ केतायुन अर्देशिर दिनशॅा यांनी वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः कर्करोग या आजारावरील रेडिएशन थेरपीवर केलेल्या संशोधनाची माहिती इथं देण्यात आली आहे. पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ असीमा चॅटर्जी या विज्ञान विदुषींची माहिती या प्रदर्शनीत देण्यात आली आहे. भारतीय औषधी वनस्पतींवर त्यांनी विपुल संशोधन केले. त्यांना ‘पहिल्या भारतीय महिला रसायनशास्त्रज्ञ’ असे संबोधले जाते. रसायनशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेऊन ‘डॉक्टरेट इन सायन्स’ पदवी संपादन करीत त्यांनी अमेरिकेत जाऊन संशोधन केले. भारताचे नोबेल पारितोषिक समजले जाणारे शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक मिळवले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले. त्यांना ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. जानकी अम्मल यांची विशेष ओळख म्हणजे त्या भारतातील पहिल्या महिला वनस्पतिशास्त्रज्ञ. वनस्पतिशास्त्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने १९७७ मध्ये पद्मश्री सन्मान देऊन गौरवले.

भारताच्या ‘वेदर वुमन’ म्हणून अ‍ॅना मणी ओळखल्या जातात. भारतीय हवामान निरीक्षण यंत्रांच्या रचनेत अ‍ॅना मणी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बनवलेली हवामान निरीक्षण यंत्रे भारतातील हवामानाच्या पैलूंचे मोजमाप करण्यात आणि अंदाज व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

यासोबतच बिमला बुटी, इरावती कर्वे, कमल रणदिवे, आंनदी गोपाळ जोशी,  डॉ. विभा चौधरी, कादंबिनी गांगुली, मेरी पूनन लुकोस, कमल रणदिवे या विदुषींनी विज्ञान क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाची प्रेरणादायी माहिती या प्रदर्शनात बघायला, वाचायला मिळते. तसेच विज्ञान क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत देशातील महिला शास्त्रज्ञांचे प्रमाण, अंतराळ संशोधन क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह इतरही रंजक माहिती या प्रदर्शनात पहावयास मिळते. प्रत्येकाने अवश्य भेट द्यावे असे हे दालन आहे.

000

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि-05: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील  ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी  त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.

आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

000

UP Chief MinisterYogi Adityanath calls on Maha Governor

Mumbai, Jan 5 –Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai. Yogi Adityanath visited the 19th Century underground British Era Bunker at Raj Bhavan and inspected the Gallery of revolutionaries ‘Kranti Gatha’ created inside the bunker.

Yogi Adityanath offered his respects at the statue of Chhatrapati Shivaji Maharaj installed inside the museum and got himself apprised of the work of various revolutionaries during the Indian freedom movement.

The UP Chief Minister later visited the historic Sri Gundi Devi Mandir located at the cliff of Malabar Point facing the Arabic ocean inside Raj Bhavan and visited the huge statue of Lord Shiva sitting in a meditation posture installed outside the temple recently.

000

 

ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 4: महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी ग.दि. माडगळूकर यांच्या नियोजित स्मारकाला भेट देवून अधिकाऱ्यांकडून स्मारकाच्या कामाबाबत माहिती घेतली. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त (विशेष) आयुक्त विकास ढाकणे, अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, गदिमा स्मारकाच्या मूळ इमारतीचे काम आधी पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरु असलेल्या प्रदर्शन केंद्राच्या कामासोबत स्मारकाचे कामही सुरु करावे आणि पुढील वर्षाच्या गुढी पाडव्यापर्यंत ते पूर्ण करावे. कामासाठी चांगली क्षमता असलेल्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात यावी. काम पूर्ण करण्यासाठी त्याला प्रोत्साहनात्मक सुविधा देण्यात याव्यात. स्मारकाच्या आतील सजावटीचा आराखडा तयार करताना गदिमांच्या कुटुंबियांशी चर्चा करावी व पुढील आठवड्यात त्याचे सादरीकरण करण्यात यावे. गदिमांच्या कार्याला साजेसे असे स्मारक उभे राहील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी श्री. ढाकणे यांनी स्मारकाच्या कामाबाबत माहिती दिली. कोथरुड मध्ये तीन मजली भव्य स्मारक उभारण्यात येणार असून बांधकामाचे क्षेत्रफळ 3 हजार 230.78 चौरस मीटर एवढे असणार आहे. पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर पाच विविध दालने आणि दुसऱ्या मजल्यावर प्रायोजित रंगभूमीसाठी नाट्यगृह नियोजित आहे. एक्झिबिशन सेंटरच्या स्वंतत्र इमारतीचे क्षेत्रफळ 8 हजार 580.32 चौरस मीटर असून त्याचे काम सुरु करण्यात आले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. 4: पुण्यातील 18 पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आले असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्वारगेट पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, कायद्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यामध्ये बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्षाची सुरुवात होणार आहे. लहान बालके व महिलांवर अन्याय व अत्याचार झाल्यास ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीसांची भिती वाटू नये, त्या ठिकाणी विश्वास वाटावा, दडपण येऊ नये यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले, बालस्नेही कक्षात येणारे अत्याचारित बालक, विधीसंघर्षग्रस्त बालक बोलके व्हावे, गुन्ह्याची नोंद होईपर्यंत त्यांच्या बसण्याची, रमण्याची, खेळण्याची व्यवस्था करण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. कक्ष उभारण्यासाठी सामाजिक उत्तर दायित्व निधीसोबतच जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल.

आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्याला लवकर जामीन मिळाला नाही, न्यायालयात गतीने खटले दाखल करुन चालवले आणि गुन्हे सिद्धतचे प्रमाण वाढून शिक्षा झाल्यास आरोपींच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असेही यावेळी श्री. पाटील म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांनी मुलांना खेळणी व खाऊचे वाटप केले तसेच गुलटेकडी येथील सेठ दगडूराम विद्यालयातील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप केले. यावेळी ‘होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन’चे व्यवस्थापक शकील शेख यांचा कक्ष उभारणीमध्ये केलेल्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.

असा आहे ‘बालस्नेही कक्ष

आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार निधीतून स्वारगेट पोलीस ठाणे अंतर्गत बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. पोलीस ठाणे परिसरातील रंगरंगोटी व स्वच्छता तसेच नुतनीकरण पुणे पोलीस मास निधीतून करण्यात आले आहे.

कायद्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात बाल कल्याण कल्याण पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे. बालकांचे जबाब नोंदवितांना त्यांच्यावर दडपण येऊ नये यासाठी हे बालकल्याण पोलीस अधिकारी पिडीत बालक, विधीसंघर्षग्रस्त बालकांसोबत संवाद साधतील तसेच त्यांना समुपदेशन करण्यात येईल. अत्याचारग्रस्त पिडीत बालक त्यांच्यावर घडलेल्या अत्याचाराची माहिती विश्वासाने व मनमोकळेपणाने देण्यासाठी कक्षात खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यासाठी येथे प्रयत्न केला जाणार आहे.

बालकांच्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी त्यास प्रोत्साहित करणे. बालक गैरवर्तन करु नये याकरीता त्यांच्यामनात सकारात्मक विचार निर्माण करणे. बालकाला घडलेल्या घटनेची माहिती देण्यासोबत त्यास समुपदेशन व मानसशास्त्रीय आधार किंवा वैद्यकीय उपचार देणे आदी काम या ठिकाणी होणार आहे. स्वारगेट पोलीस ठाणे व होप फॉर दि चिल्ड्रेन फॉऊडेशन यांच्या समन्वयाने बालस्नेही कक्षाचे कामकाज करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा

0
मुंबई दि. 29 - स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे आर्थिक नियोजन व सांख्यिकीय पध्दतीचा विकास यामध्ये विख्यात सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
नागपूर,दि.29 :  येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची...

त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती...

0
तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द पावसाळी अधिवेशनात १२ विधेयके अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी ३६००...

बारामती येथील सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर राज्याकरिता पथदर्शी ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २९: राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या मदतीने ग्रामीण भागातील तरुणांना आधुनिक विज्ञानाची ओळख करुन देणाऱ्या सायन्स अँड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचा विद्यार्थ्यांना...

अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया – जी. कमलावर्धन राव

0
मुंबई 29:- अन्न सुरक्षा हा सार्वजनिक आरोग्याचा पाया असून यामध्ये कोणतीही कसूर होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी कटाक्षाने व समन्वयपूर्वक काम करावे असे...