रविवार, जून 29, 2025
Home Blog Page 1600

जयस्तंभ अभिवादन सोहळा : उत्तम नियोजन आणि समन्वय

पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्तम नियोजन,अनुयायांची शिस्त, त्यांनी प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोहळ्यासाठी सहकार्य करणारे अनुयायी, विविध संस्था-संघटना आणि ग्रामस्थांना त्यासाठी विशेष धन्यवाद दिले.

सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. कोरोनाचे निर्बंध दूर झाल्याने यावर्षी अधिक प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोहळ्यासाठी अधिकच्या सुविधा देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि कार्यक्रमस्थळी विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या. पूर्वतयारी करताना विविध संघटनांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले.

पोलीस दलाची चांगली कामगिरी

सोहळ्यासाठी ८ हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, ७४६ होमगार्ड्स आणि राज्य राखील दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे शहरचे साडेपाच हजार तर पुणे ग्रामीणचे २ हजार ७०६ पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात होते.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे १८५ सीसीटीव्ही आणि ३५० वॉकीटॉकी, ६ व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलीसांचे लक्ष होते. एवढा मोठ्या जनसमुदायाचे नियंत्रण करताना पोलीस काही ठिकाणी अनुयायाना सहकार्य करतांनाही दिसत होते.

पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे १०० सीसीटीव्ही, १० ड्रोन कॅमेरे, शंभर दुचाकीस्वार, १० दहशतवाद विरोधी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सलग ३० तास बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनतळाची तत्परतेने व्यवस्था

सार्वजनिक बांधकाम विभागाने जयस्तंभाची सजावट, परिसरातील नियोजन उत्तमरितीने केले. रस्त्याची दुरुस्ती, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण अशी कामे अत्यंत कमी वेळात त्यांनी पूर्ण केली. चार ठिकाणी हायमास्ट, पीए सिस्टीम, २७ ठिकाणी स्वतंत्र जनित्राची व्यवस्था करण्यात आली. पूर्व विभागातर्फे सुमारे २ लाख चौरस मीटरचे ८ वाहनतळ तयार करण्यात आले होते. विविध विभागांसाठी आश्यक सुविधाही निर्माण करण्यात आल्या. दक्षिण विभागातर्फे ६० एकर परिसरात १४ वाहनतळ तयार करण्यात आले.

स्वच्छ आणि आरोग्यदायी सोहळा

जिल्हा परिषदेची आयोजनातली भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. गेल्या वर्षापेक्षा अधिक स्वच्छता हे यावेळचे वैशिष्ठ्य होते. सोहळ्यानंतरही रात्रीतून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. ८० घंटागाड्यांच्या माध्यमातून ३ टन ओला आणि ८ टन कोरडा कचरा संकलीत करण्यात आला. १७५ ठिकाणी तात्पुरत्या कचाकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी २२५ स्वच्छता कर्मचारी २४ तास प्रयत्न करत होते.

विशेषत: जयस्तंभ व वाहनतळ परिसरातील १ हजार ५०० शौचालय सातत्याने स्वच्छ ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते, ते स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चांगल्यारितीने केले. ५ झेटींग यंत्र व मैला बाहेर काढण्यासाठी १५ सक्शन यंत्राचाही उपयोग करण्यात आला. शौचालयाचे ठिकाण नागरिकांना कळावे यासाठी आकाशात बलून सोडण्यात आले होते. हात धुण्यासाठी १५ हॅण्डवॉश स्टेशन बसविण्यात आले.

महिलांसाठी विशेष व्यवस्था

स्तंभ परिसर आणि वहानतळाच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रुम उभारण्यात आल्या होत्या. स्तनदा मातांसाठी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षांचा १६८ महिलांनी लाभ घेतला. कक्षात माता व बालकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. कक्षासाठी ३१ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

बीएसएनएलतर्फे माध्यम कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यावर्षी कॉलड्रॉपच्या तक्रारी आल्या नाहीत. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सकाळी ६ ते १२ या वेळेत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. समाज माध्यमाद्वारेदेखील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाल्याने येथे येऊ न शकलेल्यांना घरबसल्या सोहळा पाहता आला.


सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने हा संपूर्ण सोहळा योग्यरितीने पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. विविध संघटनांशी समन्वय साधल्याने सोहळ्याचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ सारख्या संस्थांचेही आपत्तीव्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले. महावितरणने अखंडीत वीज मिळावी यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.

अनुयायांसाठी बसेसची सोय

पीएमपीएलतर्फे ३१ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ( शिक्रापूर ते कोरेगाव) ३५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्किंग ते वढु या मार्गावर ५ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोलनाका ४० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. १ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ते कोरेगाव ११५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्कींग ते वढु २५ बसेस द्वारे रात्री ११ पर्यंत सेवा देण्यात आली. दुपारी गर्दी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.

लोणीकंद ते पेरणे टोलनाका मार्गावर १४० बसेस विविध वाहनतळावरून उलपब्ध करून देण्यात आल्या. पुणे ते लोणीकंद करीता सुमारे ९० बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, पिंपरी, अप्पर इंदिरानगर आदी ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आल्या. पीएमपीएमएलचे सुमारे ८५० चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी व २५ डेपो मॅनेजर, इंजिनिअर अधिकारी नेमण्यात आले होते. बसेच्या सुमारे १० हजार फेऱ्याद्वारे ५ लाख अनुयायांनी लाभ घेतला.

वाहनतळावरील नियोजनही उत्तम होते. सर्व वाहनांची शिस्तीत ये-जा सुरू असल्याने वाहतूकीसाठी कोणतीही अडचण आली नाही. वाहतूक शाखेनेदेखील या मार्गावरील वाहतूक वळवून योग्य नियोजन केले.

आरोग्य सुविधा आणि तत्पर उपचार

आलेल्या अनुयायांना आरोग्यसुविधेचाही चांगला लाभ झाला. ४८ रुग्णवाहिका, ७ कार्डीयाक रुग्णवाहिका, १० आरोग्यदूत आणि २१ पथकांनी उत्तम आरोग्य सुविधा दिली. सुमारे २७ हजार बाह्यरुग्ण, २३०० स्क्रीनिंग, ४१ संदर्भित (सर्वांची प्रकृती स्थिर) रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.

यावर्षी पिण्याच्या पाण्याचीही चांगली व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने १५० टँकर्सची व्यवस्था केली होती. त्यापैकी साधारण ६० ते ७० टक्के पाणी वापरले गेले. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली होती.

 

समूह भावनेमुळे सोहळा यशस्वी

प्रशासनातील विविध यंत्रणा, विविध संस्था आणि अनुयायांनी संवेदनशीलतेने आपले कर्तव्य पार पाडताना समूहभावनेचा उत्तम परिचय दिल्याने हा सोहळा यशस्वी झाला असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना धन्यवाद देताना हा सोहळा समन्वयाचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनुयायांसाठी स्वयंस्फुर्तीने भोजन, पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा आदी व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिकांनी आपल्या अंतिथ्यशिलतेचा परिचय देत अनुयायांचे स्वागत केले. एस्कॉनसारख्या संस्थेने पोलीसांच्या भोजनाची व्यवस्था केली. या सर्वांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.

000

सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलिसांबद्दल जनमानसात आदराची भावना – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई ,दि.२ : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे राज्य पोलीस अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव मुंबई येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 गेल्या दहा-वीस वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवाद यांसारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना दुप्पट सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलीस दलाचे आधुनिकीकरण करीत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती देखील होत आहे. पोलीसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य तसेच देश अधिक सुरक्षित करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आपल्या कृतीतून राज्य पोलिसांनी गीतेतील ‘परित्राणाय साधुनां, विनाशाय च दुष्कृताम’ हे ब्रीद सार्थक केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 दिनांक २ जानेवारी १९६१ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता. त्यामुळे २ जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केल्या जातो, असे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

दिनांक १ जानेवारी १८२७ रोजी तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असताना बॉम्बे डिस्ट्रिक्ट पोलीस दलाची स्थापना केली होती. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य असलेल्या राज्य पोलीस दलाच्या अंतर्गत १२ पोलीस आयुक्तालय व ३७ जिल्हा पोलीस दल असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांतर्फे सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच महिला, लहान मुले  व वरिष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केले व  शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.  संचलनामध्ये मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलीस व बँड पथक सहभागी झाले होते. यावर्षी बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोज तर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

कार्यक्रमाला बृहनमुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच मुंबई पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते.

000

Maharashtra Governor attends State Police Day Raising function

Mumbai 2-  Governor Bhagat Singh Koshyari attended the Maharashtra Police Raising Day function organised by Maharashtra Police at the State Reserve Police Force Ground at Goregaon Mumbai on Monday (2 Jan).

Director General of Police Rajnish Seth, Commissioner of Police of Brihanmumbai Vivek Phansalkar, senior police officers, retired police officers, police jawans and their family members were present.

Speaking on the occasion, the Governor said he felt proud to be the Governor of a State that boasts of the best police force in the country.  The Governor called upon the State Police to harness Artificial Intelligence and other modern technological tools to tackle emerging challenges like Cyber Security, Drug menace, Naxalism and those coming from the coastal border. The Governor praised the State police for being the front line Covid warriors alongside doctors and nurses during the COVID 19 pandemic.

Earlier the Governor inspected the Ceremonial Parade and accepted salute presented by the marching columns of State Police. This year the police band presented a musical ensemble while a team of 46 commandos presented the Silent Arm Drill. The Dog Squad presented an impressive Dog Show on the occasion.

The Maharashtra Police Foundation Day is celebrated on 2 January to commemorate the presentation of the State Police Flag by then Prime Minister Pt Jawaharlal Nehru to Maharashtra Police on 2 January 1961.

000

सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक गमावला : सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

मुंबई, दि.१: ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांच्या निधनाने चित्रपटांवर नितांत प्रेम करणारा अभ्यासक आपण गमावल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

मामी फिल्म फेस्टिव्हलची मूळ संकल्पनाच सुधीर नांदगावकर यांची. चित्रपट हा विशेष जिव्हाळ्याचा विषय.चित्रपट संस्कृतीच्या प्रचाराचा ध्यास घेतलेल्या श्री.नांदगावकरांनी अनेक चित्रपट महोत्सवांच्या आयोजनात सक्रिय योगदान दिले आहे. फिल्म सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी उभी केलेली चळवळ म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा मानबिंदूच ठरली. फिल्म फोरम, प्रभात चित्र मंडळ, थर्ड आय चित्रपट महोत्सव या माध्यमातून नांदगावकरांनी जे कार्य केले ते तर  या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. चित्रपटांचे केंद्र दक्षिण मुंबईतून उपनगरांकडे वळवण्यात त्यांच्या प्रयत्नांचा वाटा मोठा होता. दिग्दर्शक भारतत्न सत्यजित राय आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ही त्यांची दैवते होती.  नांदगावकरांनी त्यांच्या समीक्षणातून सुसंस्कृतता व अभ्यासू वृत्ती कायम जपली . त्यांच्या निधनाने चित्रपट क्षेत्राची अपरिमित हानी झाली असून एक व्यासंगी विद्वान आपण गमावला आहे. नांदगावकर कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात सहभागी मी आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

000

 

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले : मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १ :केशवराव धोंडगे यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व आपल्यातून गेले आहे अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

श्री. मुनगंटीवार म्हणाले की, केशवरावांच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे. आपल्या विचारसरणीशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. मराठवाड्याच्या प्रश्नांवर ते आक्रमक राहिले. त्यांच्या निधनाने एक सरळमार्गी व्यक्तिमत्व हरपले आहे. ईश्वर त्यांच्या आप्तांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो आणि केशवरावांना सद्गती देवो अशी प्रार्थना त्यांनी करत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

000

केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला

मुंबई, दि. १ : केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबड्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत त्यांची भाषण त्या काळात प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला.

000

मुंबईत बुधवारपासून ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन

मुंबई, दि. १ : मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि कलेच्या दीर्घ परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला उजाळा मिळावा, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे, पारंपरिक कला अभिव्यक्त व्हाव्यात, उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे यासाठी भारतातील आणि भारताबाहेरील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन संपन्न आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

मराठी भाषा विभागामार्फत मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया येथे दि. ४ ते ६ जानेवारी, २०२३ या कालावधीत “मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, ६२ परदेशस्थ उद्योजक, ४७० परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधी, १६४ राज्यातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. तसेच, राजघराण्यातील मान्यवर, परकीय वकीलातीतील राजदूत इत्यादी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. केसरकर यांनी आज दिली.

उद्योग कल्पनांचे आदान-प्रदान व्हावे हा देखील हेतू असल्यामुळे, परेदशातील निमंत्रित उद्योजकांसमवेत संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे दि. ०६ जानेवारी रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग कल्पनांच्या आदान-प्रदानाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा देखील या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरीक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरीक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे.

संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी जनांची अभिरुची लक्षात घेऊन संमेलनाच्या दि. ४, ५ व ६ जानेवारी २०२३ या दिवशी संध्याकाळी ६ नंतर अनुक्रमे चला हसू या, सांस्कृतिक संचालनालयाचा महासंस्कृती लोकोत्सव आणि मराठी बाणा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक संचालनालयाकडून सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विविध सांस्कृतिक पैलू सादर केले जातील. यातील ‘महाताल’ वाद्यमहोत्सवात १५ वेगवेगळ्या दुर्मिळ वाद्यांचे सादरीकरण ५० कलाकारांच्या माध्यमातून होणार आहे. तसेच, पुणेरी ढोल, नाशिक ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण व सर्व वाद्यांच्या तालावर महाराष्ट्र गीताचे सादरीकरण होईल ‘वाद्य जुगलबंदी’मध्ये ढोलकीची जुगलबंदी, संबळ व हलगी या वाद्यांचे एकत्रित सादरीकरण केले जाईल. ‘महासंस्कृती लोकोत्सव’मध्ये महाराष्ट्रातील भक्ती संस्कृती, जागर, आदिवासी संस्कृती, बंजारा नृत्य तसेच शिवकालीन लोककला, कोळीगीते, बोहाडा व सोंगी मुखवटे यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायं. ६ ते १० या वेळेतील कार्यक्रम सर्वसामान्य जनतेसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

000

उदयोन्मुख खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचा प्रयत्न -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.१: राज्यातील प्रतिभासंपन्न खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहून राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा २०२२-२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन ५ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

विधानभवन सभागृह पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी उपस्थित होते.

श्री. राव म्हणाले की, स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे आयोजन राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून या स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६  खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत.

स्पर्धेकरीता १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकाराच्या एकविध क्रीडा संघटनेमार्फत त्या-त्या क्रीडा प्रकारातील राज्यातील सर्वोत्कृष्ट आठ संघांची व खेळाडूंची निवड करण्यात आलेली असून हे निवडक आठ जिल्ह्यांचे संघ महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५ जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार असून या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकरीता क्रीडा ज्योत तयार करण्यात आली आहे. मुख्य क्रीडा ज्योत ही रायगड येथून प्रज्वलित केली जाईल. राज्याच्या क्रीडा विभागांतर्गत एकूण आठ विभाग आहेत. प्रत्येक विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणापासून क्रीडा ज्योत पुणे येथे आणली जाणार आहे. या सर्व ज्योतींचे एकत्रिकरण करून ही क्रीडा ज्योत मिरवणुकीने पुणे शहरातून शिवछत्रपती क्रीडा संकुलात आणली जाईल व स्पर्धेच्या उद्घाटनाचे वेळी मुख्य कार्यक्रमस्थळी असलेली ज्योत प्रज्वलित केली जाईल. याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली असून सर्व स्पर्धास्थळे स्पर्धा आयोजनाकरीता सज्ज झालेली आहेत. शासनाचा क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील ३९ क्रीडा प्रकारांच्या क्रीडा संघटना अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरीता झटत आहेत. खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, क्रीडांगणे, खेळाडूंची स्पर्धेकरीता वाहतूक, स्वयंसेवक, पदके आदी बाबी सर्वोत्कृष्ट स्वरूपाच्या होतील याकरीता प्रत्येक बाबीकडे जातीने लक्ष पुरविले जाते आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सुवर्ण,  रौप्य आणि कांस्य पदके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक पदकांची कमाई करणाऱ्या जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान व ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धा आयोजनास राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असून १९ कोटी रुपये इतकी तरतूद देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे, या स्पर्धेकरीता कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही याची ग्वाही शासनाने दिलेली असून राज्यातील खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखविण्याकरीता आवाहन केले आहे.

या स्पर्धा आयोजनाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना त्यांचे क्रीडा कौशल्य प्रदर्शित करण्याकरीता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा डाटाबेस तयार करण्यात येईल व भविष्यात या खेळाडूंच्या कामगिरीचे ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, असेही श्री. राव यांनी सांगितले.

श्री.दिवसे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंच्या गुणवत्तेला स्पर्धेद्वारे चांगली संधी मिळेल. खेळाडूंची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा विकासाचे उपक्रम राबविताना याचा उपयोग होऊ शकेल.

श्री.शिरगावकर म्हणाले की, ही स्पर्धा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी नवी पहाट ठरणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात क्रीडा विकासाला पोषक वातावरणाची निर्मिती होईल. महाराष्ट्र ऑलिम्पिक देशातील सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पदकांचे अनावरण करण्यात आले.

0000

महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा: क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध

पुणे येथे नव्या वर्षाच्या सुरूवातीस २ ते १२ जानेवारी दरम्यान श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. तब्बल २३ वर्षांनंतर शासनाच्या पुढाकाराने या स्पर्धांचे आयोजन होत असल्याने या स्पर्धांना विशेष महत्त्व आहे. ३९ क्रीडा प्रकारात राज्यातील पुरुष व महिलांचे सर्वोत्तम ८ संघ यात सहभागी होणार असल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात देशातील महत्त्वाचे राज्य आहे. गेल्या ५ वर्षात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चांगल्या कामगिरीत सातत्य ठेवत नेत्रदीपक यश मिळविले आहे. १९९४ मध्ये बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडानगरीत राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनप्रसंगी भारतरत्न लता मंगेशकर यांचे ‘कदम कदम पे नक्श है, विजय हमारा लक्ष है..’ हे स्वर जणू राज्याच्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल दर्शविणारे होते. त्याच क्रीडा नगरीने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले. ती परंपरा पुढे नेण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा महत्त्वाची आहे.

खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या देशी खेळात आपला पूर्वीपासून दबदबा आहे. मात्र शासनाने क्रीडा सुविधांचा विकास आणि प्रशिक्षणावर विशेष लक्ष दिल्याने इतर खेळातही आपले खेळाडू आंतररराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करताना दिसत आहेत. राज्याच्या क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी तसेच खेळ व खेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी २००१ मध्ये राज्याचे क्रीडा धोरण आखण्यात आले. असे धोरण आखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.

राज्याच्या क्रीडा लौकीकात भर घालण्यासाठी आणि या क्षेत्रातील आपली कामगिरी उंचावण्यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘ऑलिम्पिक व्हिजन’ तयार करण्यात आले आहे. राज्याच्या प्रत्येक भागात उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य केले जात आहे. त्यासोबतच शालेय आणि स्थानिक स्पर्धांनाही आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठीदेखील शासनाने १९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

नुकतेच बालेवाडी येथे खेलो इंडिया स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यानंतरची ही दुसरी मोठी स्पर्धा असेल. अशा स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्यासोबत क्रीडा क्षेत्रातील गुणवत्तेचा शोध घेता येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्याची क्षमता असलेले गुणवंत खेळाडू अशा स्पर्धांमधून पुढे येतात. त्यांना आपला खेळ दाखविण्याची संधी मिळावी आणि त्यासोबत नव्या दमाच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी अशा स्पर्धांना महत्त्व आहे.

बालेवाडी-म्हाळुंगे येथील १५३ एकराच्या परिसरात उभारण्यात आलेली श्री शिवछत्रपती क्रीडानगरी हे देशाचे क्रीडावैभव आहे. सर्व प्रकारचे ऑलिम्पिक खेळ असणारे हे देशातील पहिले क्रीडासंकुल आहे. इथल्या अत्याधुनिक सुविधा लक्षात घेता या क्रीडानगरीत येऊन खेळ दाखविण्याचे स्वप्न राज्यातील प्रत्येक खेळाडूच्या मनात असते. राज्यभरातील ३ हजार ८५७ पुरुष व ३ हजार ५८७ महिला खेळाडू असे एकूण ७ हजार ४४४  खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे. स्पर्धेत खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, व्यवस्थापक, पंच, स्वयंसेवक, तांत्रिक अधिकारी  यांच्यासह एकूण १० हजार ४५६ जणांचा सहभाग असणार आहे.

क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेची पूर्वतयारी जोमाने सुरू आहे. खेळाडूंना उत्तम सुविधा मिळाव्यात असा क्रीडा विभागाचा प्रयत्न आहे. ऑलिम्पिक असोसिएशनदेखील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

राज्यातील आठ विभागीय मुख्यालयातून क्रीडा ज्योत स्पर्धास्थळी आणली जाणार असल्याने राज्यभरात क्रीडा संस्कृतीला पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रायगडावर प्रज्वलित करण्यात येऊन ५ जानेवारीला मिरवणूकीने ती क्रीडानगरीत येणार आहे. क्रीडा क्षेत्रातही करिअर करण्याची संधी आहे, प्रतिष्ठा आहे हा संदेश यानिमित्ताने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत जावा आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला चालना मिळावी हाच यामागचा उद्देश आहे.

मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा देशाच्या क्रीडा क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. खेळाडूंना उत्तम संधी आणि योग्य मैदान मिळाले तर त्यांच्यातील प्रतिभा उंचावते, अशी संधी देणारी ही स्पर्धा आहे. यातून पुढे येणारे खेळाडू देशाचे नेतृत्व करतील आणि येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्येदेखील यश मिळवतील अशी अपेक्षा करीत त्यांना शुभेच्छा देऊया!

स्पर्धांची ठिकाणे

१. पुणे-ॲथलेटिक्स, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, लॉन टेनिस, मॉडर्न पँन्टाथलॉन, शुटींग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलींग, स्क्वॅश, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, रोलर स्केटींग, गोल्फ, सॉफ्ट टेनिस

२. नागपूर- बॅडमिंटन, नेटबॉल, हॅण्डबॉल, सेपक टकरा

३. जळगांव – खो-खो, सॉफ्टबॉल, मल्लखांब, शुटींगबॉल

४. नाशिक- रोईंग, योगासन

५. मुंबई- याटींग, बास्केटबॉल

६. बारामती- कबड्डी

७. अमरावती- आर्चरी,

८. औरंगाबाद- तलवारबाजी

९. सांगली- कनाईंग-कयाकिंग अशा ठिकाणी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत.  स्पर्धा आयोजनासाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

000

-जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १ :- “स्वातंत्र्य संग्राम ते स्वातंत्र्योत्तर काळात शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्षशील आणि ठाम भूमिका मांडणारे लढवय्ये नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘मन्याडचा वाघ’ म्हणून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा दरारा होता. स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ  आणि आणिबाणी विरुद्धचा लढा यात ते हिरिरीने सहभागी झाले. विधानसभेत कंधार भागाचे प्रदीर्घकाळ नेतृत्व केलेल्या केशवराव धोंडगे यांनी शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि अगदी गुराखी यांच्यासारख्यांच्या प्रश्नावर  शेवटपर्यंत आपली आग्रही भूमिका मांडली. रस्त्यावरील लढा आणि विधीमंडळातील त्याची समर्पक मांडणी यामुळे त्यांची भाषणं आजही मार्गदर्शक आहेत.  त्यांच्या निधनामुळे राजकारण, समाजकारणातील प्रेरणादायी, मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. अनेक सामाजिक चळवळींचा आधारवड नाहीसा झाला आहे असे सांगून ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

औरंगाबाद, दि. 1: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आज उद्घाटन झाले.

या प्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचे कौतुकही केले.

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये

  • 600 पेक्षा जास्त स्टॉल्स
  • 99 विविध प्रात्यक्षिके
  • आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग
  • शासनाच्या विविध योजनांचे सादरीकरण
  • यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा
  • 32 विविध चर्चासत्रे
  • आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे राज्यस्तरीय उद्घाटन

 विशेष सहभाग

  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
  • महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळ, मुंबई

000

ताज्या बातम्या

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. 29 : सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन...

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८: शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू...

संपेल वीजबिलाचा अंक, मिळेल मागेल त्याला सौर पंप !

0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत 9...

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत...

वसतिगृहातील विद्याथ्यांची प्रवेश क्षमता वाढविणार – मंत्री संजय शिरसाट

0
नागपूर, दि. २८: अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यार्थी क्षमतेत वाढ करण्याची गरज लक्षात घेऊन वसतिगृहाची प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव...