सोमवार, जून 30, 2025
Home Blog Page 1596

महाराष्ट्र परिचय केंद्रात पत्रकार दिन साजरा

नवी दिल्ली, दि. ६ : महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी पत्रकार दिन आज  साजरा करण्यात आला.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजात नवी जीवनमूल्ये रूजविली. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून ६ जानेवारी रोजी राज्यात ‘मराठी पत्रकार दिन’ साजरा केला जातो.

000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची सोमवारी मुलाखत

मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दिनांक 9, मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत  प्रसारित होणार आहे.

पुणे येथे जी 20 परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांची सुरु असलेली तयारी, जी20 परिषदेमुळे विकासाला मिळणारी गती, पुण्यातील प्रकल्प, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग विभागातील उपक्रम याविषयी मंत्री श्री. पाटील यांनी  ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

सागर कुमार कांबळे/स.सं

बाल वैज्ञानिकांच्या मॉडेल्सनी गाजवली भारतीय विज्ञान काँग्रेस

नागपूर, दि.  6 – भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाल विज्ञान काँग्रेसमध्ये दैनंदिन वापरात येणाऱ्या पण अनोख्या प्रयोगांचे सादरीकरण बाल वैज्ञानिकांकडून करण्यात आले आहे.  प्रचंड आत्मविश्वास आणि अद्भूत असे आविष्कार या बाल विज्ञान काँग्रेसच्या प्रदर्शनात आपल्याला पहायला मिळत आहेत.

बेबी केअरिंग बेड, मद्यपान करून गाडी चालविल्यास वाजणारा अलार्म,  घरात  प्रवेश करताच सुरू होणारे घरातील दिवे, फ्लशचा पायाने  होणारा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर, गॅस गळतीची धोकासुचना देणारा प्रयोग, दृष्टीदोष सुधारण्यासाठी ॲप, पशुधन स्वच्छता, इमारत बांधकामावर ठिबक सिंचनप्रमाणे पाण्याचा नियंत्रित वापर, लाईफ सेफ्टी हेल्मेटचा वापर व गाडीचोरीपासून बचाव, गहू आणि तांदळाच्या वेष्टनापासून विविध वस्तुंची निर्मिती, माती परीक्षण अशा अनेक विज्ञान अविष्कारांनी  बाल वैज्ञानिक काँग्रेस लक्षवेधी ठरली आहे.

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतिश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत.  अंदमान निकोबार पासून, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश अशा सर्वच  भागातून बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती  लावली  आहे.  अनोख्या पद्धतीने हे प्रयोग विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत.  विशेष म्हणजे या प्रदर्शनाची माहिती ही प्रत्येक स्टॅालमध्ये स्वतः विद्यार्थीच देत आहेत. अत्यंत  आत्मविश्वासाने त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वच वयोगटातील विज्ञानप्रेमींना आपापल्या प्रयोगांची माहिती देत आहेत. पालक आणि पाल्यांसाठी हे संपूर्ण विज्ञान प्रदर्शन लक्षवेधी ठरत आहे.

उद्या (दि. 7 जानेवारी) दुपारी भारतीय विज्ञान काँग्रेसचा समारोप होणार असून तत्पूर्वी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

00000000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.६ : शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे या क्षेत्राचे यश आहे. बदलत्या काळानुसार जीवन सुखकर आणि जागतिक पातळीवर ओळख निर्माण होईल, अशा संशोधनावर भर देण्याचे निर्देश देतानाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने आवश्यक शैक्षणिक सुधारणा कराव्यात, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज सिडनहॅम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे बळकटीकरण आणि विविध समस्यांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव भगवान जोशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठाच्या बळकटीकरणासाठी प्रादेशिक केंद्र आणि उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठातील पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भविष्यातील शैक्षणिक गरजा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

000

काशीबाई थोरात/वि.सं.अ

कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई दि. ६ – हरित क्रांती होण्यापूर्वी देशाला अमेरिकेतून आयात होणाऱ्या निकृष्ट धान्यावर विसंबून राहावे लागे. परंतु आज जगभरातील लोक अन्नधान्य उत्पादनाकरिता भारताकडे पाहत आहेत. हरित क्रांती पाठोपाठ देशात श्वेत क्रांती  आली व आता नील क्रांतीच्या दृष्टीने वाटचाल सुरु आहे. जगाची वाटचाल आता पुनश्च शाश्वत शेतीकडे सुरु आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आदी कडधान्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करावा, तसेच पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत शुक्रवारी (दि. ६) राहुरी, जि. अहमदनगर  येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

दीक्षांत समारंभाला राज्याचे कृषी मंत्री तसेच विद्यापीठाचे प्र-कुलपती अब्दुल सत्तार, अणुउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर, कुलगुरु डॉ पी जी पाटील, कुलसचिव प्रमोद लहाळे  यांसह विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे  सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व स्नातक उपस्थित होते.

हरित क्रांतीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर व हायब्रीड बियाणे उपयुक्त समजले गेले. परंतु रासायनिक खतांमुळे मातीचे आरोग्य बिघडले, असे सांगताना आज हरयाणा, गुजरात या राज्यांमध्ये सेंद्रिय शेतीचे यशस्वी प्रयोग होत आहेत. या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी देखील अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.  महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. द्राक्ष, कांदा, संत्री या बाबतीत राज्याची उत्पादने देशात प्रसिद्ध आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठांनी आजवर चांगले काम केले आहे. हे कार्य अधिक पुढे नेऊन कृषी विद्यापीठांनी आदर्श व अनुकरणीय विद्यापीठ व्हावे, असे राज्यपालांनी सांगितले.

कृषी स्नातकांनी आपल्या ज्ञानाचा  गोरगरीब जनतेच्या तसेच सामान्य शेतकऱ्यांच्या  हितासाठी  उपयोग करावा असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले, पोपटराव पवार यांनी आपल्या ग्रामविकास कार्यातून गावातील सामान्य माणसाला सक्षम केले असे त्यांनी सांगितले.

कृषी वैज्ञानिकांनी आपले नवनवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे कारण त्यामुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होईल असे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अनिल काकोडकर यांनी सांगितले. ऊस उत्पादन क्षेत्रात साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर व्हावा असे त्यांनी सांगितले. कृषी स्नातकांनी निसर्ग व पर्यावरणाचे विश्वस्त असल्याची भावना ठेवून जग अधिक सुंदर करावे असे आवाहन त्यांनी केले.

 पदवीदान समारंभात विविध विद्याशाखांमधील एकुण ६८३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.

000

Governor Koshyari presides over 36th Convocation of

Mahatma Phule Krishi Vidyapeeth

Confers Honorary D.Sc. on Agri Scientist Charudatta Mayee and Popatrao Pawar

 

Mumbai Dated.6- Maharashtra Governor and Chancellor of state universities Bhagat Singh Koshyari presided over the 36th  Annual Convocation of the Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, Dist Ahmednagar through online mode on Fri (6th Jan).

Padma Vibhushan Dr. Anil Kakodkar,  Chairman, Rajiv Gandhi Science and Technology Commission  and Former Chairman, Atomic Energy Commission delivered the convocation address.

The Governor conferred the degrees of ‘Doctor of Science’ (Honoris Causa) on  renowned agricultural scientist and former President of Agricultural Scientist Recruitment Board Dr Charudatta Mayee and Executive President of Hiware Bazar Adarsha Gaon Sankalpa and Prakalpa Samiti Padmashri Popatrao Pawar.

Speaking on the occasion, the Governor called upon agricultural graduates to promote Organic Farming and study the traditional methods of farming. He said successful experiments in organic farming have been made in Haryana and Gujarat in the recent past, and added that the same can be emulated elsewhere.

He said a marked shift has come in agriculture since the days of green revolution. He said people are reverting to millet and therefore efforts should be made to promote cultivation of Jowar, Bajra, Nachni and help the farmers increase their incomes.

Pro Chancellor of the University and Minister of Agriculture Abdul  Sattar, Vice Chancellor of the University Dr P. G. Patil, Registrar Pramod Lahale, Members of the Executive and Academic Council, Members of Faculty, invitees and Graduating Students were present. Degrees, Post Graduate Degrees and Ph Ds were conferred upon 6834 students.

000

जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि संशोधकांची भूमी आहे. याप्रमाणेच संपत्ती निर्माण करणाऱ्या मराठी माणसाची देखील भूमी आहे. महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याची जबाबदारी जगभरातील मराठी माणसाची आहे. जगभरातील मराठी माणसाने महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे आयोजित ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनातील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, मराठी भाषा व शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह श्रीमंत सरदार सरदेसाई, श्रीमती धनश्री सरदेसाई, जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक,  बीएमएफ चे अध्यक्ष संदीप दीक्षित, जर्मन कौन्सुलेटचे प्रतिनिधि डॉ. चव्हाण, श्री. आनंद गानू , श्री विजय पाटील यांसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विश्व मराठी संमेलनाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाचे कौतुक करून केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले मराठी संस्कृतीचे महत्त्व आपण बाहेर देशात असताना प्रभावीपणे जाणवते. आज विविध क्षेत्रांत मराठी माणूस पुढे गेलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान तसेच विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याबरोबरच शक्तिशाली अर्थव्यवस्था निर्माण करण्यामध्ये विदेशात असलेल्या भारतीयांचे योगदान खूप मोठे आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसाने महाराष्ट्रामध्ये  गुंतवणूक केली, येथील उद्योजकता वाढवली तर महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मंत्री श्री गडकरी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आपल्या सगळ्यांना मिळून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया मागासलेल्या  ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा प्रामुख्याने विचार करावा लागणार आहे. यासाठी पाणी, वीज, दळण वळण आणि संपर्क साधने यावर विशेष भर द्यावा लागणार आहे. या सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी उद्योग विकासाला मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र शासनाने उद्योगक्षेत्राच्या विकासासाठी धोरण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यायोगे ग्रामीण महाराष्ट्रात उद्योगविकासाला चालना मिळेल, असा विश्वासही श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला”. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. परंतु मराठी माणसाने केवळ नोकरी करणारा न होता नोकरी देणारा होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करायला हवेत. आपण सकारात्मक विचार ठेवून हिमतीने व्यवसायात उतरले पाहिजे”, असेही श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

राज्यात उद्योगांचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय ग्रामीण महाराष्ट्र विकसित होणार नाही. गावही समृद्ध झाले पाहिजे, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी विषद केली. “मुंबई हा देशाच्या आर्थिक विकासाचा केंद्र बिंदू आहे. महाराष्ट्र शासनाने विविध क्षेत्राचा अभ्यास करून त्यांच्या विकासासाठी कालबद्ध नियोजन करावे”, असेही श्री.गडकरी यांनी यावेळी सांगितले. तसेच नवउद्योजक यांना सोयी-सुविधा या वीहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारत देश हा सर्वात मोठा निर्यातदार देश होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी भाषा, मराठी माणसांचे उद्योगातील योगदान आणि त्यांच्या केंद्रातील विविध खात्यांमार्फत सुरु असलेल्या विकास कामांबाबत त्यांनी माहिती दिली.

जगभरातील महाराष्ट्रीयन उद्योजकांचे राज्यात स्वागत – उद्योगमंत्री उदय सामंत

“जगभरातील मराठी उद्योजकांचे महाराष्ट्रात विशेष स्वागत आहे, त्यांच्यासाठी नेहमीच रेड कार्पेट वागणूक दिली जाईल”, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विश्व मराठी संमेलनात आज तिसऱ्या दिवशी मराठी उद्योजकांसमवेत विशेष चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बोलतांना श्री सामंत पुढे म्हणाले, महाराष्ट्रातल्या उद्योजकांनी देश पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि त्या उद्योजकांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येऊन उद्योग सुरू करायचा असेल, व्यवसाय वाढवायचा असेल तर तुमच्यासाठी एक नवीन धोरण उद्योग विभागामार्फत बनवले जाईल आणि राजाश्रय महाराष्ट्र सरकारकडून दिला जाईल”, अशी ग्वाही श्री सामंत यांनी दिली.

“आज महाराष्ट्रामध्ये नऊ लॉजिस्टिक पार्क होत आहेत. केंद्र सरकारची ताकददेखील राज्याच्या पाठीशी आहे. तुमच्या ज्या काही अपेक्षा महाराष्ट्राच्या सरकारकडून आहेत, उद्योग विभागांडून त्या पूर्ण केल्या जातील. आपल्या व्यवसायासाठी जर महाराष्ट्रामध्ये एमआयडीसीची जागा पाहिजे असेल तर ती तात्काळ उपलब्ध करून दिली जाईल.

मैत्री नावाचा एक चांगला कायदा आम्ही आणतोय. उद्योगांना लागणाऱ्या सार्वजनिक परावानग्या या 30 दिवसाच्या आत दिल्या जातील आणि बाकीच्या खात्यांवर देखील त्यासाठी बंधन राहील”, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

पुढचे संमेलन यापेक्षा भव्य असेल – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, मराठी भाषेचा आणि मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार होत असताना आपले प्रत्येकाचे त्यामध्ये योगदान आवश्यक आहे. ही संस्कृती जपणे हे महाराष्ट्र शासनाचे काम आहे. त्यामुळे दरवर्षी विश्व संमेलन आयोजित करण्यात येईल. तसेच पुढचे विश्व संमेलन याच्यापेक्षा अधिक भव्य असेल, असा विश्वास त्यांनी जगभरातून आलेल्या मराठी माणसांना दिला. तसेच जगभरातील मराठी भाषिकांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी “मराठी तितुका मेळवावा” विश्व मराठी संमेलन आयोजनामागची भूमिका विषद केली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध देशांतील गौरवपूर्ण कार्य करणाऱ्या मराठीजनांचा सत्कार करण्यात आला.

00000

मनीषा पिंगळे/विसंअ/6.1.2022

विशेष सक्षम कलावंतांच्या ‘स्वरानंद’ने सायंकाळ संस्मरणीय

नागपूर, दि.6 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये बुधवारची (दि.4) सायंकाळ आनंदवनच्या विशेष कलावंतांनी सादर केलेल्या “स्वरानंद” या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संस्मरणीय ठरली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कुलगुरु डॉ. सुभाष आर. चौधरी आणि डॉ. विकास आमटे (सामाजिक कार्यकर्ते) यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

हा कार्यक्रम मराठी आणि हिंदीतील लोकप्रिय गाण्यांचे बहारदार सादरीकरण, हास्य कारंजी फुलविणारी मिमिक्री, ठेका धरायला लावणारे लोकनृत्य आणि मन आणि माना डोलावणारे संगिताविष्कारांनी उपस्थित विज्ञानप्रेमींसाठी संस्मरणीय ठरला.

“मंदिर सर्वांसाठी खुले आहे (झोनी महाराज), तुकडोजी महाराजांची भजने, बाबूजी धीरे चालना यासारखी जुनी बहारदार सिनेगिते असे संगिताविष्कार विशेष कलाकार, बाल कलाकार आणि त्यांच्या शिक्षकांनी सादर केले. तीन तासांच्या कार्यक्रमात एकही कंटाळवाणा क्षण नव्हता. मूकबधिर आणि ऐकू न येणारी मुले संगीताच्या तालावर नाचताना पाहणे अविश्वसनीय आहे. हा वाद्यवृंदाने विशेष व्यक्तिंच्या निरोगी हृदयाला समाजाशी जोडतो.

थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी 1949 मध्ये महारोगी सेवा समिती, वरोरा ची स्थापना केली, कुष्ठरोगाने पीडित लोकांच्या उपचार आणि मानसिक-सामाजिक-आर्थिक पुनर्वसनासाठी स्वयंपूर्ण सामाजिक सेवा संस्था म्हणून ही संस्था महाराष्ट्र भर सुपरिचित आहे.

के. शमा पठाण, विवेक गलांडे, कुणाल, गोपी, स्वाती, साक्षी, कुणाल आणि मंगल गिवंडीकर आणि दिग्दर्शक सदाशिव ताजने, सहाय्यक दिग्दर्शक राजेश ताजने, संस्थापक आणि संकल्पना, निर्माता – डॉ विकास आमटे अशी ही मांदियाळी रसिकांना तीन तास खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते.

00000000

परिसंवाद : ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन, हवामान बदल’

नागपूर, दि.6- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस मध्ये गुरुवारी (दि.5) ए. के. डोरले सभागृह येथे ‘शाश्वत मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन, हवामान बदल’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. बसंत कुमार दास, संचालक, सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाता हे होते.

परिसंवादात डॉ. उत्तम कुमार सरकार, संचालक, भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन इनलँड ओपन वॉटर फिशरीज अ‍ॅण्ड एक्वाटिक जेनेटिक रिसोर्सेस (AqGRs) आणि अनुकूलन रणनीती’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. ते म्हणाले की, पूर, चक्रीवादळ, रोगांचा वाढता प्रादुर्भाव, परजीवी, हानिकारक अल्गल ब्लूम इ. यासारख्या अत्यंत घटनांमुळे माशांच्या साठ्याचे आणि उत्पादन पायाभूत सुविधांचे अल्पकालीन हवामान बदलाच्या परिणामांचे नुकसान यांचा समावेश होतो. इतर परिणाम म्हणजे जैवविविधतेचे नुकसान, अनुवंशिक संसाधनांना धोका, पुनरुत्पादन अपयश, वन्य बियाणांची कमी उपलब्धता, बदललेल्या प्रजातींचे वितरण दीर्घकालीन खुल्या पाण्यात परिणाम करणाऱ्या गोड्या पाण्याची स्पर्धा वाढवते.

डॉ जे.के. जेना, उपसंचालक, केंद्रीय अंतर्देशीय मत्स्य संशोधन संस्था यांनी ‘सस्टेनेबल फिशरीज अँड एक्वाकल्चर: इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज अँड मिटिगेशन मेजर्स.’ या विषयावर शोधनिबंध सादर केला.  ते म्हणाले की, वाढत्या तापमानामुळे सागरी आणि स्थलीय पर्यावरणीय परिस्थिती बदलत आहे. दुष्काळ, चक्रीवादळ, पूर, क्षारता, पर्जन्यवृष्टी आणि समुद्राच्या पातळीत वाढ यासह परिणामी बदलांचा मत्स्यपालन आणि मत्स्यपालनावर तीव्र विरोधी परिणाम होतो. हवामान बदलामुळे जलसंपत्तीमध्ये झालेल्या समुदायाच्या संरचनेत बदल झाल्यामुळे माशांची उपलब्धता, विपुलता आणि वितरणात चढ-उतार झाले आहेत.

डॉ. बसंत कुमार दास, संचालक, सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाता यांनी, ‘शाश्वत विकास उद्दिष्टे आणि महिला सक्षमीकरणासाठी अंतर्देशीय मत्स्यपालन आणि मत्स्यपालन’ शीर्षकाचे त्यांचे संशोधन सादर केले.

सूत्रसंचालन व समारोप फार्मसी विभागाच्या अधिव्याख्याता डॉ. श्रद्धा शिरभाते यांनी केले.

00000

परिसंवाद : ‘उद्योन्मुख आणि व्यूहरचनात्मक तंत्रे’

नागपूर, दि.6-     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठात भारतीय विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.5) ‘उदयोन्मुख आणि व्यूहरचनात्मक तंत्रे’ अर्थात ‘इमर्जिंग अँड स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजीज’ या विषयावर परिसंवाद डॉ. ए.के. डोरले सभागृह येथे आयोजित करण्यात आला.

परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी श्रीहरी बाबू श्रीवास्तव हे होते.

पी शिवा प्रसाद, संचालक यांनी ‘असिमेट्रिक तंत्रज्ञान’याविषयावर मांडणी केली. त्यात त्यांनी विषम तंत्रज्ञान कसे किफायतशीर, सूक्ष्म आणि व्यत्यय आणणारे आहेत हे स्पष्ट केले. त्याने सामाजिक-आर्थिक, भू-राजकीय, लष्करी इत्यादीसारख्या विघटनाच्या विविध रणनीती आणि रणनीतिक, तांत्रिक आणि धोरणात्मक अशा बाबींवर माहिती दिली.

प्रा.आर पी सिंग, पीआरएल अहमदाबाद, यांनी ‘क्वांटम टेक्नॉलॉजीज आणि फोटोनिक्स: ॲप्लिकेशन ओरिएंटेड रिसर्च’ याबाबत माहिती दिली. क्वांटम टेक्नॉलॉजी आणि त्याची वैविध्यपूर्ण तत्त्वे याविषयी स्पष्टीकरण देऊन. त्यांनी क्लोनिंगची उदाहरणे आणि क्वांटम संशोधनाचे प्रमुख क्षेत्र याबाबत माहिती दिली. क्वांटम कॉम्प्युटिंग्ज आणि सेन्सिंग्सवरील अलिकडील अद्यतने आणि अंमलबजावणीसह क्यूबिट्स आणि त्यांचे महत्त्व याबद्दल बोलले गेले. भविष्यातील जागतिक कार्यक्रमांवरही चर्चा झाली.

‘सायबर-फिजिकल सिस्टीम्समधील कृत्रिम बुद्धिमत्ता’ याविषयावर आयआयटी जोधपूरचे संचालक प्रा.संतनू चौधरी यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले की, ‘उच्च हमीसह CPS ची खात्री करण्यासाठी AI ची विश्वासार्हता, लवचिकता आणि व्याख्या करण्याच्या समस्या आव्हानात्मक आहेत आणि AI-आधारित CPS च्या वास्तविक जीवनात तैनातीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत’.

प्रा.रोहन पॉल यांनी ‘कॉग्निटिव्ह टेक्नॉलॉजीज अँड ऑटोनॉमस सिस्टीम्स: इमर्जिंग अॅव्हेन्यूज’ या विषयावर त्यांचे संशोधन सादर केले. संज्ञानात्मक स्वायत्त प्रणाली प्रत्यक्षात काय आहेत आणि रोबोट आणि मानवी टीमिंगचे उदयोन्मुख युग याबाबत माहिती दिली. संज्ञानात्मक क्षमता आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता मॉडेल आणि उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट केली.

परिचय श्रीमती अस्मिता आचार्य यांनी तर नारायण राव यांनी मान्यवर वक्त्यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले आणि सत्राची सांगता झाली.

000000

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्युज नेटवर्कने आयोजित केलेल्या चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार, मुख्यमंत्री कार्यालयाच्या पायाभूत सुविधा कक्षाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, सिने अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई, विवेक देशपांडे, रंजीत कक्कड आणि अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ. अनिल फळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानाची नोंद घेऊन पत्रकारांनी वाटचाल केली पाहिजे. राज्य शासनही पत्रकारांसाठी वैद्यकीय सहायता योजना, अधिस्वीकृती योजना, पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मान अशा काही महत्त्वपूर्ण योजना राबविते. या योजनांमध्ये काही सुधारणा करण्याबाबत काही सूचना येत आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक त्या सुधारणा या योजनांत जरूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पत्रकारांचे काम केवळ बातमी लिहिणे नाही तर राज्याच्या शाश्वत विकासासाठी सुद्धा त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गेल्या सहा महिन्यातील राज्य शासनाचे काम माध्यमांनी पाहिले आहे. लोकाभिमुख काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातल्या ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास, समाजामध्ये दुर्लक्षित दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग, समृद्धी महामार्ग, विदर्भासाठी नागपूर अधिवेशनात विविध निर्णय राज्य शासनाने घेतले. माध्यमांनी ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले.

माध्यम क्षेत्रात गेल्या तीन – साडे तीन दशकात खूप बदल झाले आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पत्रकारांनी या बदलाची नोंद घेतली पाहिजे. अर्थात या बदलांमुळे पत्रकारांचे महत्व कमी होणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वृत्तपत्रांनी मोठी भूमिका बजावली. आजही नागरिकांना, वाचकांना खऱ्या अर्थाने सज्ञान करणे आणि लोकशिक्षणाची भूमिका माध्यमांनी पार पाडण्याची गरज आहे. आपल्या समाजापुढील अंमली पदार्थांचा वाढता वापर, नक्षलवाद, दहशतवाद, रोजगार, बदललेल्या कुटुंब व्यवस्था, बाजारू चंगळवाद या समस्यांचा वेध घेऊन माध्यमांनी वस्तुनिष्ठ आणि मार्गदर्शक अशी भूमिका मांडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गडचिरोली येथील नक्षलवादाचा बिमोड करण्याची राज्य शासनाची भूमिका असून तेथील नागरिकांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेतले जात असल्याचे सांगितले.

यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारणीत मोलाचा वाटा असणारे श्री. मोपलवार, मनरेगा मध्ये विविध सुधारणा करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे अतिरिक्त मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांचा विशेष सन्मान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

अप्रतिम मीडियाच्या वतीने प्रकाश कथले (वर्धा), हेमंत जोशी  आणि योगेश त्रिवेदी (मुंबई) यांना चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय, माध्यम उद्योजकता व संपादकीय नेतृत्व, पर्यावरण वृत्त, वने व इको टुरिझम वृत्त, टीव्ही न्यूज चॅनेल टीम लीडर, विकास वृत्त, स्थानिक पर्यटन वृत्त,  उद्योग/व्यापार वृत्त, कला-संस्कृती, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, साहित्य, ग्रामीण विकास, सहकार अशा विविध विभागात पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘अप्रतिम महावक्ता’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. फळे यांनी तर सूत्रसंचालन  सोनाली शेटे यांनी केले. आभार विवेक देशपांडे यांनी मानले.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

0
मुंबई, दि. ३० :- विधिमंडळाचे पावसाळी आज पासून सुरू झाले. ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत विष्णू नारळीकर आणि विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत लहानू शिडवा कोम, डॉ. श्रद्धा...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची मुलाखत

0
मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा' या विषयासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या विशेष...

विधान परिषदेमध्ये दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली : सभापती प्रा.राम शिंदे यांनी मांडला शोकप्रस्ताव

0
मुंबई, दि. ३० : च्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विधान परिषद सदस्य अरुण काका भिमराव जगताप आणि डॉ.रामदास भगवानजी आंबटकर यांच्या निधनाबाबत सभापती...

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

0
मुंबई, दि. ३० : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर केली. सभापती प्रा.शिंदे यांनी तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित...

वंदे मातरम् व राज्यगीताने विधान परिषदेच्या कामकाजास सुरुवात

0
मुंबई, दि. ३० : राज्य विधिमंडळाच्या सन २०२५ पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्‌’ आणि राज्यगीताने सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी...