मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 1594

पर्यटनवाढीसाठी आराखडा तयार करुन प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, दि. ८ : कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरे ता. महाबळेश्वर येथील निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,उपजीविकेच्या पर्यायांमध्ये विविधता उपलब्ध करुन देण्यात यावी. यामध्ये कृषी, वन, पशुधन, पर्यटन, पाणी आणि  स्वच्छता याचा समावेश करावा. रस्ते जोडणी आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करावी. या भागातील ऑनलाईन सेवांसाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी विकसीत करावी. तसेच स्थानिकांचा कौशल्य विकास आणि क्षमतावर्धन करावे. कांदाटी खोऱ्यात कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांना योग्य संधी उपलब्ध करुन द्यावी.  शासकीय व्यवस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्या भागीदारीतून पर्यावरणपूरक शाश्वत आणि एकात्मिक विकासासाठी सक्षम लोकसमुदाय तयार करावा.

पर्यटनवाढीसाठी ठिकठिकाणी होम स्टेची व्यवस्था विकसित करावी.कोयना जलाशयाच्याकाठी तंबू व कॉटेज सारखी व्यवस्था निर्माण करावी. नौका पर्यटन आणि जंगल मुक्कामासह ट्रेकिंगची सोय उपलब्ध करुन द्यावी. पशुधनावर आधारित शेतकरी उत्पादक संघटना विकसित करुन त्यांचा बिझनेस प्लॅन तयार करावा. मध गोळा करणे, त्यावरील प्रक्रिया आणि  विक्री यासाठी  व्यवसाय योजना तयार करावी, असेही त्यांनी सांगितले.

तापोळा, महाबळेश्वर, खेड आणि रत्नागिरीला जोडणारे रस्ते  तसेच जलवाहतुकीमध्ये सुधारणा करण्यात यावी.  तसेच कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी सक्षम  आरोग्य सुविधा निर्माण करावी, पुस्तकाचं गाव भिलार ब वर्ग पर्यटन दर्जा मिळणेबाबत, कास पुष्पपठार येथील रस्ते विकास व परिसर निसर्ग पर्यटन आराखडा तयार करावा. किल्ले प्रतापगड  संवर्धन व  विकास कामे, किल्ले प्रतापगड पायथा येथे शिवप्रतापसृष्टी उभारणे, सातारा जिल्ह्यातील २६ पर्यटन स्थळांचा व शहिद तुकाराम ओंबाळे यांच्या जन्मगावी स्मारक उभारणे या विषयांचाही आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

पोलीस विभाग आढावा

राज्य शासनाने पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाणे, अत्याधुनिक यंत्रणा, निवासस्थाने यासह इतर सुविधा देण्यात येणार असून, पोलीस विभागाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

0000

राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातील पदक विभूषित अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न

मुंबई, दि. ८ : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज एनसीपीए मुंबई येथून सुरु झालेल्या सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलन “परेड ऑफ व्हेटरन्स” मध्ये सहभाग घेतला. सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शेकडो युवक व नागरिकांच्या ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषात माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या संचलनासोबत चालून माजी सैनिकांप्रती त्यांनी सद्भावना प्रकट केली.

परेड ऑफ व्हेटरन्सचे आयोजन नेव्ही फाऊंडेशनच्या पश्चिम विभाग मुंबई शाखेच्या सहकार्याने केले होते.

परेडमध्ये ५०० माजी वीर अधिकारी, व जवान  त्यांचे कुटुंबीय व नागरिक सहभागी झाले होते. यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंह, लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा प्रभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एच. एस. कहलों, नेव्ही फाऊंडेशन, मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते.

0000

पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोकार्पण

            मुंबई, दि. 7 : राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे आज राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

            राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, हिरे व्यावसायिक सेवंतीभाई शाह यांच्यासह जैन समाजबांधव उपस्थित होते.

            राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले की, पर्यटन विभागामार्फत पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी हाती घेण्यात आलेला कार्यक्रम निश्चितच स्तुत्य आहे. अध्यात्माचे महत्व लक्षात घेता सध्याच्या काळात पर्यटनाबरोबरच तीर्थाटनही तितकेच महत्वाचे झाले आहे. त्यामुळे पर्यटन विभागाला आता पर्यटन आणि तीर्थाटन विभाग असे म्हणावे, असे त्यांनी सांगितले.

            राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मोठमोठी संकटे आणि आक्रमणानंतरही आपली भारतीय संस्कृती आणि धर्म अबाधीत राहीले. जैन धर्म आणि या समाजाचे देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासात फार मोठे योगदान राहीले आहे. यापुढील काळातही प्राचीन भारताच्या मार्गावर तसेच भगवान जिनेंद्र यांच्या मार्गावर आपण पुढे गेले पाहीजे, असे त्यांनी सांगितले.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, पर्यटन विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी निगडीत पर्यटन सर्किटच्या विकासाचा कार्यक्रम नुकताच हाती घेतला आहे. त्याचबरोबर नांदेड येथे नुकताच वीर बाल दिनानिमित्त शीख समाजासमवेत विशेष उपक्रम राबविण्यात आला. आता ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख 9 जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश असून या क्षेत्रांची सुरक्षा, तिर्थयात्रा तसेच सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

            महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. आपले मूलतत्व या समाजाने आजही जपून ठेवले आहे. आध्यात्मिक विकासासह देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये जैन समाज यापुढील काळातही योगदान देत राहील, असे त्यांनी सांगितले.

            याप्रसंगी मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह यांनी त्यागाचे महत्व सांगणारे विचार मांडले. ते म्हणाले की, आपली सर्वसमावेशक संस्कृती ही त्यागावर आधारीत आहे. हा भारताचा बहुमोल असा वारसा आहे. या वारशामुळेच आपल्या देशाचे फार पाश्चिमात्यीकरण झाले नाही. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक त्यागाची भावना घेऊन जातात. या आधारावरच ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’ कार्यक्रम राबवावा, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांचा समावेश

            सटाना (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा या पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटमध्ये समावेश आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही- पालकमंत्री शंभूराज देसाई

               सातारा दि. 7 : जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

                नवजा हेळवाक गोवारे मोरगिरी गारवडे साजूर विंग वाठार रस्ता भूमिपूजन कार्यक्रमावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मोरगिरी पर्यंत राज्यमार्ग होत आहे. एका विनंतीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गासाठी 25 कोटीचा  निधी दिला आहे. हा निधी खर्च झाला की, आणखी निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. रस्ते चांगले झाले की विकास होतो. अनेक योजनांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी दिला जातो. जलजीवन मिशन माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठीही निधी आणला आहे. ज्या योजनेतून शक्य आहे त्या योजनेतून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणला जात आहे. मुख्यमंत्री महोदय हे जिल्ह्याचे पुत्र आहेत. त्यांना जिल्ह्यातील अडचणींची चांगली माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल.

                कराड तालुक्यातील गमेवाडी येथे बोलतांना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, रस्ते, साकव, पूल, पिण्याचे पाणी अशा सार्वजनिक विकासासाठी गरज असलेली कामे केलीत. ज्या गावांना विकासाची भूख असते त्याच गावांचा विकास होतो. सध्या राज्यात गतीमान सरकार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी वाढविण्यात आला आहे. डोंगरी विकासासाठीही वेगळे पॅकेज देण्यात आले आहे.

                मल्हारपेठ येथे बोलतांना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सर्वसामान्यांच्या विकासासाठी मिळालेल्या सत्तेचा व पदाचा वापर केला पााहीजे. राज्यात महसूल मिळवून देणारा तिसऱ्या क्रमांकाचा विभाग म्हणजे उत्पादन शुल्क विभाग आहे. या विभागाचे उत्पन्न वाढविणे हा माझा नेहमीच प्राधान्यक्रम राहिल. राज्याचे उत्पन्न वाढवून त्या माध्यमातून विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देणे हे सरकाराचे उद्दिष्ट आहे. गावांनीही विकासाची कास धरावी.

                पाटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते संपनन झाले. त्यामध्ये 20 लक्ष रुपयांच्या गमेवाडी, पाठरवाडी ता.कराड पोहोच रस्ता खडीकरण-डांबरीकरण, मारुलफाटा येथील नवजा, हेळवाक, गोवारे, मोरगिरी, गारवाडी, साजूर, विंग वाठार हा तीन कोटी रुपयांचा रस्ता, मल्हारपेठ ता. पाटण गणेश कॉलनी, मागासवर्गीय वस्ती रस्ता खडीकरण-डांबरीकरण या 15 लक्ष रुपयांचे काम,  दिंडूकलेवाडी (मल्हारपेठ ता. पाटण) पोहोच रस्ता सुधारणा या 10 लक्ष रुपयांच्या कामाचे व मल्हारपेठ ते सोंडेवाडी पोहोच रस्त्यावर जि. प. शाळेजवळी संरक्षित भिंत बांधणे या 15 लक्ष रुपयांच्या कामाचे आणि मल्हापेठ येथे सभामंडप बांधणे या 10 लक्ष रुपयांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे.

विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरमधील भारतीय विज्ञान काँग्रेस ठरली संस्मरणीय

नागपूर,  दि.  7 – येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या भारतीय  विज्ञान काँग्रेसचा समारोप आज झाला. एक लाखांहून अधिक विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरने यजमानपद भूषविलेली 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षातील भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन ही अनोखी भेट ठरली.

येथील राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात  दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित विज्ञान काँग्रेस मध्ये विविध विज्ञान आधारित कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यात 27 परिसंवाद, बाल, महिला, शेतकरी व आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश आहे. यंदा प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते.  पाच दिवस चाललेल्या या विज्ञान परिषदेतला विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज समारोपाला कानपुरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॅा. अरविंद सक्सेना यांना विज्ञानज्योत सोपवून अधिकृत समारोप जाहीर केला.

 

27 परिसंवादांचे आयोजन

विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत एकूण 27 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. भारताची 2030 मधील वाटचाल,अंतराळ विज्ञान  आणि  तंत्रज्ञान,  कोविड आजारानंतर दिसून  येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन  करण्यात आले होते.  देश -विदेशातील  अनेक संशोधक,  वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते.

 बाल विज्ञान प्रदर्शन

बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत.  देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती लावली .

महिला विज्ञान काँग्रेस

           महिला विज्ञान  काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.   पद्मश्री  राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार यारदम्यान व्यक्त केले. असंख्य वाटचालींवर मात  करीत  केलेली वाटचाल त्यांनी यावेळी कथन केली.

प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन

भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात  आले होते. शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते  झाले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे महासचिव डॉ.ए. रामकृष्ण, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे,अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे आणि आदिवासी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.श्याम कोरेट्टी मंचावर उपस्थित होते. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा या आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता.

शेतकरी विज्ञान काँग्रेस

देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा शेतकरी विज्ञान काँग्रेस परिषदेतील सूर होता.

‘प्राईड इंडिया एक्सपो’ विशेष आकर्षण

प्राईड इंडिया एक्सपो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.  यात गझल संध्या, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य, स्वरानंदन या कार्यक्रमांचा  प्रामुख्याने समावेश आहे. पुरातत्व विभाग संग्रहालय, पॅलेस आन व्हिल्स ही गाडी, ॲालिम्पिकच्या धर्तीवर विज्ञान ज्योत,  बाल वैज्ञनिकांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन  या संमेलनात  पहावयास मिळाले.

भारताची गौरवशाली विज्ञान पंरपरा पुढे नेऊ या!- ॲडा योनाथ यांची वैज्ञानिकांना साद

नागपूर, दि. 7 : भारताला वैज्ञानिकांची गौरवशाली पंरपरा लाभली आहे. देशात विज्ञानाची ही परंपरा पुढे नेण्यात भारतीय विज्ञान काँग्रेसची भूमिका मोलाची ठरली आहे. आपण साऱ्यांनी ही गौरवशाली परंपरा पुढे नेऊ या, अशा शब्दात नोबेल पुरस्कार विजेत्या श्रीमती ॲडा योनाथ यांनी वैज्ञानिकांना साद घातली.

येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठात आयोजीत 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा आज समारोप झाला. याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून ॲडा योनाथ बोलत होत्या.

मुख्य कार्यक्रम स्थळी हा सोहळा पार पडला. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी,  नागपूर विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, भारतीय विज्ञान काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. अरविंद सक्सेना आदी उपस्थित होते.

श्रीमती योनाथ म्हणाल्या की, मी माझे संशोधन नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरही 20 वर्षांपासून सातत्याने करीत आहे. संशोधकाने आपले संशोधन कधीही थांबवायचे नसते. या संशोधन कार्यात भारतीय वैज्ञानिक डॉ. तनया बोस, डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांची मदत झाली. भारतीय वैज्ञानिकांबद्दल मला नेहमीच आदर राहिला आहे. माझे मार्गदर्शक डॉ. रामचंद्रन हे एक भारतीय वैज्ञानिक होते. त्यांच्याकडूनच मला महान भारतीय वैज्ञानिक परंपरेची ओळख झाली. हीच महान , गौरवशाली परंपरा पुढे नेण्यात 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसने मोलाची भूमिका बजावली आहे. हीच परंपरा आपण पुढे नेऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. विजयलक्ष्मी बिदरी म्हणाल्या की, नागपुरात झालेले हे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यास व विज्ञानाविषयी प्रेम निर्माण करण्यात मोलाचे ठरले आहे.

 डॉ.श्रीमती विजयलक्ष्मी सक्सेना म्हणाल्या की, नागपुरातील आयोजनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विज्ञानाचा सेतू निर्माण केला. प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेस आयोजन झाले. त्यास सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मध्यवर्ती संकल्पनेस अनुसरुन हे आयोजन यशस्वी झाले. 3 हजारांहून अधिक शोधनिबंध सादर झाले तर 50 हजारहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. सर्वच दृष्टीने हे आयोजन यशस्वी झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

            कुलगुरु डॉ सुभाष चौधरी यांनी आपल्या भाषणात भारतीय विज्ञान काँग्रसच्या आयोजनात सहकार्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शैक्षणिक संस्थाचे आभार मानले. 50 वर्षांनंतर थेट विद्यापीठाच्या शतकपूर्ती वर्षात विज्ञान महाकुंभाचे यशस्वी आयोजन पार पडल्याचे समाधानही त्यांनी  व्यक्त केले.

                 डॉ. अरविंद सक्सेना यांच्याकडे विज्ञान काँग्रेस मशाल सुपूर्द

             या कार्यक्रमाच्या शेवटी मावळत्या अध्यक्ष डॉ विजयलक्ष्मी सक्सेना यांनी भारतीय काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ अरविंद सक्सेना यांच्याकडे भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुढील आयोजनाची मशाल सूपूर्द केली.

                                          वैज्ञानिकांना पुरस्कार प्रदान

108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी विविध श्रेणींमध्ये यावेळी वैज्ञानिकांना सन्मानित करण्यात आले. सुवर्णपदके विजेत्यांची नावे खालील प्रमाणे

 आशुत मुखर्जी मेमोरियल अवॉर्ड – प्रा. अजय कुमार सूद

 डॉ. सी. व्ही. रमण जन्मशताब्दी पुरस्कार – प्रा. एस. आर. निरंजना

 एस. एन. बोस जन्मशताब्दी पुरस्कार – प्रा. सुभाषचंद्र पारिजा

 एस. के. मित्रा जन्मशताब्दी पुरस्कार – डॉ. रंजन कुमार नंदी

 एच. जे. भाभा स्मृती पुरस्कार – डॉ. कौशल प्रसाद मिश्रा

 डी. एस. कोठारी मेमोरियल पुरस्कार – डॉ. श्यामल रॉय –

अन्य पुरस्कार विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे

 प्रो. आर. सी. मेहरोत्रा मेमोरियल लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड – डॉ. यू. सी. बॅनर्जी – एमिटी युनिव्हर्सिटी, मोहाली.

 प्रो. एस. एस. कटियार एंडोमेंट लेक्चर अवॉर्ड – डॉ. केस्तुरू एस. गिरीश – तुमकूर विद्यापीठ, कर्नाटक.

 प्रा. अर्चना शर्मा मेमोरियल अवॉर्ड इन प्लांट सायन्स – डॉ. राजीव प्रताप सिंग – बीएचयू, वाराणसी

 जी. के. मन्ना मेमोरियल पुरस्कार – डॉ. बसंत कुमार दास – आय.सी.ए.आर. कोलकोता

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर

            मुंबई, दि. ७ : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

            या दौऱ्याच्या कार्यक्रमात त्या अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीची पाहणी करतील. तसेच अल्पसंख्याक समाजाला भेडसावणाऱ्या तक्रारी, प्रश्नांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री यांचा १५ कलमी कार्यक्रम, केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक घेऊन चर्चा करतील.

लार्सन अँड टुब्रो कौशल्य संस्थेने राज्याच्या कौशल्य विद्यापीठासोबत सहकार्य करावे- राज्यपाल

        मुंबई, दि. ७ : राज्य शासनाने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले असून राज्यात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. परंतु उद्योग जगत व कॉर्पोरेट्सच्या सहकार्याशिवाय अर्थपूर्ण कौशल्य प्रशिक्षण देता येणार  नाही. या दृष्टीने लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने कौशल्य विद्यापीठाशी सहकार्य करावे असे आवाहन करताना औद्योगिक क्षेत्रातील या समूहाचा प्रत्यक्ष अनुभव युवकांना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक संस्थेने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाच्या सहकार्याने आयटीआय प्रशिक्षकांसाठी आयोजित कौशल्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप संस्थेच्या मढ आयलंड, मुंबई येथील अकादमीत संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लार्सन अँड टुब्रोचे समूहाचे अध्यक्ष ए.एम.नायक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. रामकृष्णन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शहाणे, प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख बी.ए.दमाहे, मास्टर ट्रेनर लार्सन अँड टुब्रो प्रिया सावंत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी तसेच संस्थेत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करीत असलेले राज्यातील आयटीआय प्रशिक्षक उपस्थित होते.

            लार्सन अँड टुब्रो हे देशाच्या उद्योग जगतातील एक प्रेरणादायी नाव आहे. समूहातर्फे केलेल्या प्रत्येक कार्यात गुणवत्ता असते असे सांगून एल अँड टी समूहाने देशातील अनेक राज्यांमध्ये कौशल्य प्रशिक्षण संस्था उभाराव्या व इतर उद्योग समूहांनी देखील युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानण्याची मानसिकता बदलली पाहिजे : ए एम नायक

            समाजात पांढरपेशा नोकऱ्यांना मान आहे परंतु श्रमप्रधान कार्याला दुय्यम मानले जाते ही मानसिकता बदलली पाहिजे, असे प्रतिपादन एल अँड टी चे समूह अध्यक्ष ए.एम.नायक यांनी यावेळी केले.

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जगाची कौशल्य राजधानी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे व कौशल्याच्या माध्यमातूनच देशाला आत्मनिर्भर बनविता येऊ शकते. देशाला कौशल्य राजधानी बनविण्याच्या दृष्टीने मात्र अजूनही फार मोठे कार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

            एल अँड टी समूहाने मुंबई येथे सन २०२१ साली अत्याधुनिक सुविधा असलेली कौशल्य प्रशिक्षक अकादमी सुरु केली असून त्याठिकाणी एल अँड टी मधील अनुभवी लोकांना अध्यापक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे असे त्यांनी नमूद केले.

            आतापर्यंत अकादमीने महाराष्ट्र शासनाच्या १ हजार ७ आयटीआय प्रशिक्षकांना या संस्थेत प्रशिक्षण दिले असून या कौशल्याचा समाजात सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी सांगितले.

            लार्सन अँड टुब्रोने आपल्या सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या लार्सन अँड टुब्रो कौशल्य प्रशिक्षक अकादमी अंतर्गत १ हजार आयटीआय प्रशिक्षकांचे कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते गौरव

               सातारा दि. 7 :  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निनाम येथील जागृती जाधव तसेच सातारा येथील अणासाहेब कल्याणी विद्यालयातील अथर्व पवार यांचा शालेय शिक्षण मंत्री दीपक  केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

                जिल्ह्यातील या दोन विद्यार्थ्यांनी ‍ शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे यश म्हणजे सातारा जिल्ह्याचा बहुमान असल्याचे सांगून, शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर म्हणाले, या विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांनी यांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचे चिज झाले आहे. या यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतो.

                जिल्हा परिषद शाळा निनाम येथील विद्यार्थीनी जागृती जाधव हीने पूर्व उच्च प्राथमिक पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविल आहे.  तर अणासाहेब कल्याणी विद्यालयातील विद्यार्थी अथर्व पवार हा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती  परीक्षा आठवीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आला आहे.

                यावेळी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी जलमंदीर पॅलेस येथे शिवसृष्टीबाबत आढावा घेतला. लिंब येथे उभारण्यात येणाऱ्या या शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट कशापध्दतीने उभारण्यात येणार आहे याविषयी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले, सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसिलदार राजेश जाधव  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण, राज्य शालेय शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देणार – मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. ६ : परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण मंडळांचे प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त देशांतर्गत मराठी भाषिकांचे संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी राज्य शासनामार्फत यापुढे १० लाख रूपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा मराठी भाषा तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.

नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे आयोजित पहिल्या मराठी विश्व संमेलनाचा आज समारोप झाला, त्या वेळी उपस्थित प्रेक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तर देतांना ते बोलत होते. दि. ४ जानेवारी पासून सुरू झालेल्या विश्व मराठी संमेलनात जगभरातील मराठी प्रेमींनी उपस्थिती दर्शविली होती.

यावेळी मंचावर शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर पुढे म्हणाले, मराठी भाषा शिकू इच्छिणाऱ्या परदेशस्थ विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसने ‘प्रथम’ हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. केंद्रीय मंडळांच्या शाळांसह जगभरातील केंब्रीज, ऑक्सफर्ड, हॉवर्ड यासारख्या शिक्षण मंडळांसोबत चर्चा सुरू असून या मंडळांच्या विद्यार्थ्यांना देखील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देण्यात येतील.

हे संमेलनाचे पहिले वर्ष असतांनाही मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करून श्री. केसरकर पुढे म्हणाले, पुढील वर्षी नियोजन करतांना मराठी संवर्धनासाठी योगदान देणारे साहित्यिक आणि  महाराष्ट्रामध्ये मराठीचे संवर्धन करू इच्छिणाऱ्या लोकांच्या संस्था रजिस्टर करून एकत्रित केले जाईल. त्यांच्यासाठी वर्षभर संपर्कात राहण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन केला जाईल.

जगभरातील महाराष्ट्रीय उद्योजकांची औद्योगिक परिषद झाली. श्री. केसरकर या परिषदेत उपस्थित झालेल्या ७० उद्योजकांचे विशेष आभार मानले. यांच्या माध्यमातून राज्याला तांत्रिक बाबींच्या माहितीची भर पडली, कृत्रिम बुद्धीमत्ता याचा वापर करून शेतीपासून निर्यात उद्योगांपर्यंत यांचे योगदान कसे घेता येईल यांवर चर्चा झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल श्री. केसरकर यांनी मराठी भाषा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तर सांस्कृतिक कार्य, उद्योग, नगरविकास विभागाचे विशेष आभार मानले.

याप्रसंगी मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मराठी भाषिक एकत्र येऊन भाषा संस्कृतीचे जतन व संवर्धन होण्याच्या उद्देशाने अशा संमेलनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. असे संमेलन आयोजित करणाऱ्या संस्थांना राज्यशासनामार्फत विविध साहित्य, ग्रंथसंपदा प्रदान करण्यात येईल. तसेच यापुढे दरवर्षी होणाऱ्या विश्व मराठी संमेलनांची निमंत्रणे संबंधितांना संमेलनापूर्वी किमान ६ महिने अगोदर पाठविण्याच्या सूचना करुन विश्व मराठी संमेलनासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात येईल.

देशातील नोंदणीकृत मराठी मंडळातील सदस्यांच्या पाल्यांना महाराष्ट्रातील साहित्य व संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडावे या उद्देशाने त्यांच्यासाठी महाराष्ट्रात शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.

००००

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...