शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1594

उषा मंगेशकर यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई, दि. 20 : ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उषा मंगेशकर यांनी राज्यपालांना आपण काढलेल्या चित्रांचे तसेच मंगेशकर परिवारातील इतर सदस्यांनी काढलेल्या कलाकृतींचा समावेश असलेले ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ हे कॉफी टेबल पुस्तक भेट दिले.

यावेळी आदिनाथ मंगेशकर व कृष्णा मंगेशकर देखील उपस्थित होते.

००००

Usha Mangeshkar meets Governor Ramesh Bais

Mumbai, 20th March : Veteran playback singer Usha Mangeshkar met Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Usha Mangeshkar presented to the Governor a coffee table book ‘Strokes of Harmony’ containing her paintings and the artwork done by other members of the Mangeshkar family.  Adinath Mangeshkar and Krishna Mangeshkar were also present.

००००

पानशेत पूरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 20 : पुणे जिल्ह्यातील सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. याबाबत मालक आणि भाडेकरू यांचे हक्क अबाधित ठेवून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी सांगितले.

विधानभवनात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी बोलत होते. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अॅड. वर्षा डहाळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे शहरातील पानशेत पूरग्रस्त सहकारी सोसायट्यांना भाडेपट्टी देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबत शासनाने ८ मार्च २०१९ रोजी निर्णय घेतला आहे. शासनस्तरावर जिल्हाधिकारी, पुणे कार्यालयाकडून वेळोवेळी कार्यवाही करण्यात येत आहे. यासंदर्भात तेथील नागरिकांच्या मागण्या व अडचणींचा विचार करून तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या सूचना विचारात घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असेही मंत्री श्री. पाटील यावेळी सांगितले.

पानशेत पूरानंतर विस्थापित झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांचे अनधिकृत, बेकायदेशीर सभासद, सभासदाने परस्पर सोसायटीचे सभासदत्व बदलणे, अ नोंदणीकृत दस्ताने झालेले हस्तांतरण, बिगर पूरग्रस्त सभासद, तसेच वाणिज्य वापराचे प्रयोजन व दराबाबत, ८ मार्च २०१९ नंतर झालेले अनधिकृत हस्तांतरण, मागासवर्गीय सोसायटीबाबत, पूरग्रस्त सभासदाने दुबार लाभ अथवा दोन घरे घेतल्याबाबत अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

000

जयश्री कोल्हे/ससं/

विधानपरिषद कामकाज

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 20 : गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधानपरिषदेत नियम 260 अन्वये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावर विविध सदस्यांनी विचार व्यक्त केले. या चर्चेनंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उत्तर देताना हे निवेदन केले. दरम्यान या चर्चेला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सविस्तर उत्तर दिले.

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. याशिवाय, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई, काजू पिकाप्रमाणेच आंबा पीक उत्पादकांसाठी दिलासा, कांदा पिकाच्या अनुदानात वाढ, केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचे वेळेत पंचनामे आदी माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चितपणे या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन काम करीत असल्याचे प्रतिपादन मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करुन शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आणि विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणात कोणाचाही सहभाग असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानपरिषदेत दिली.

केंद्रपुरस्कृत ग्रामबीज उत्पादन कार्यक्रमांतर्गत बि-बियाणे उत्पादनासाठी सन 2022-23 मध्ये प्राप्त निधी विहित वेळेत उपयोगात आणला जाईल. याशिवाय, बोगस बियाण्यांना आळा घालण्यासाठी उद्योजकता सामाजिक दायित्वातून शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

फळपिकांवर येणाऱ्या कीडरोगांपासून संरक्षणासाठी तज्ज्ञांमार्फत उपाययोजना आणि सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. विविध माध्यमातून ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

कांदापिकासाठी प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. यातील उर्वरित शेतकऱ्यांना एक महिन्यात निधी त्यांच्या बॅंकखात्यावर वर्ग केला जाईल, असेही मंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

भरडधान्याला प्रोत्साहन, हवामान बदलाच्या परिणामांचा विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल. याशिवाय विविध कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना अडचणीतून निश्चितपणे बाहेर काढण्यात येईल, असा विश्वास मंत्री श्री. सत्तार यांनी व्यक्त केला.

00000

दीपक चव्हाण/विसंअ/

सी-२० सदस्यांसाठी आयोजित हस्तकला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्र्यांची भेट

नागपूर दि. 20 : सी-20 परिषद आयोजनाच्या निमित्ताने मुख्य कार्यक्रम स्थळाशेजारी हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शनात विविध स्टॉलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन येथील वस्तूंची पाहणी केली.   

याठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान,  महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, आदिवासी विभाग,  महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, माता अमृतानंदमयी  मठ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, सत्संग फाउंडेशन आदी विविध संस्थांचे स्टॉल लावण्यात आले असून येथे जम्मू-काश्मीर ओडिशा, मणिपूर, राजस्थान आदी राज्यांसह महाराष्ट्र आणि विदर्भातील हस्तकला मांडण्यात आल्या आहेत. श्री फडणवीस यांनी सी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींसह या स्टॉलला भेट देऊन पाहणी केली.

महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, गोंडी पेंटींग व बांबूची उत्पादने लक्षवेधक

नागपूर दि.२०:   जी-२० अंतर्गत सिव्हिल सोसायटीची (सी-20) परिषद सुरू असलेल्या  रेडिसन ब्लू येथे लावलेल्या हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनातून विदेशी पाहुण्यांना भारतीय संस्कृती व कलेचे दर्शन घडत आहे. या प्रदर्शनातील 11 पैकी 8 स्टॉल महाराष्ट्राच्या विविध विभागाचे आहेत. या स्टॉलवर सिव्हील सोसायटीच्या सदस्यांनी  विविध वस्तूंची खरेदी करत या सांस्कृतिक कलेची औत्सुक्याने माहिती जाणून घेतली.  विदेशी पाहुण्यांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद प्रदर्शनात दिसून येत होता.

            महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाच्या स्टॉलवर बांबूपासून तयार केलेल्या आकर्षक शोभिवंत वस्तू सर्वांच्या लक्ष वेधून घेत होत्या. यात प्रामुख्याने बांबूपासून तयार केलेले पेन, डायरी, टूथब्रश, कंगवा, टेबल लॅम्प इत्यादी विविध वस्तूंचा समावेश होता.

            भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या आदिवासी विभागाच्या स्टॉलवर आदिवासी कला, संगीत, नृत्य, गायन व लोककला इ. आदिवासींचे सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या लक्षवेधक गोंडी पेंटिंग, लोह व झिंक चे जास्त प्रमाण असलेला भंडाऱ्याचा सुगंधी  तांदुळ, वारली पेंटिंग असलेल्या जीआय टॅगिंग टसर सिल्क साड्या तसेच वनधन विकास केंद्राद्वारे हिरडा, बेहडा, भुईनिम, मशरूम पावडर आदी वनउपजापासून तयार करण्यात आलेले अन्नपदार्थ व वनौषधी होत्या.

            सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या स्टॉलवर महात्मा गांधी यांचेवर लिहलेली विविध पुस्तकें व चरख्याच्या प्रतिकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. येथे पेटी-चरख्यावर सुतकताई करून दाखविण्यात येत होती. तसेच ऑरगॅनिक कॉटनचे व ऑरगॅनिक हळद उत्पादने ठेवण्यात आले होते.

            यासोबतच महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या स्टॉलवरील हातमागचे कपडे, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान च्या स्टॉलवरील महिला बचत गटाची उत्पादने तसेच  महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उत्पादने पाहूण्यांना आकर्षित करत होती.

            भारत सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलवर कर्नाटकचे बिदरी आर्ट, मणिपूरचे लॉन्गफी पॉटरी, जम्मू काश्मीरच्या पश्मीना शॉल व स्ट्रोल, ओडीसाच्या डोंगरीया साडी व स्ट्रॉल तसेच सौरा पेंटिंग व डोकरा ज्वेलरी, महाराष्ट्राची टसर सिल्क साडी, हिमाचल येथील मेंढी व याकच्या लोकरीचे शाल व स्ट्रोल, गुजरातचे वाल हैंगिंग यासोबतच राजस्थानच्या मिताकारी वर्क आणि अॅपलीक वर्कच्या साड्या व दुपट्टे प्रदर्शनात होते.

            माता अमृतानंदमयी  मठाच्या स्टॉलवर आश्रमाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी करण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती तसेच त्यांची पुस्तके, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीच्या स्टॉलवर प्रबोधनीची प्रकाशने, विवेकानंद केंद्र नागपूर शाखेच्या वतीने स्वामी विवेकानंद केंद्राद्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती व त्यांचे साहित्यपुस्तके ठेवण्यात आली होती. तर सत्संग फाउंडेशन च्या स्टॉलवर पाणी व्यवस्थापनेबाबत माहिती देण्यात येत होती.

पंचनामे तात्काळ पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय  

अमरावती, दि. 20 : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.

अमरावती जिल्ह्यातील काही भागात शनिवार व रविवारदरम्यान (दि. 18 व 19 मार्च) अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी 14.5 मि. मी. पाऊस पडला.  तसेच अमरावती तालुक्यात 663.50 हे.आर शेतीचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, संत्रा पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. वडगांव माहोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली. यावेळी डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

डॉ. पाण्डेय यांनी वडगांव माहोरे येथील पांडुरंग श्रीखंडे या शेतकऱ्याच्या शेतातील संत्री फळपीकाची पाहणी केली. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल.  एकही  शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील वांगी, कांदा, गहू या पीकांचीही पाहणी केली.  यावेळी सरपंच माला माहोरे, तहसीलदार अविनाश काकडे, तालुका कृषी अधिकारी नीता कवाने, कृषी सेवक पल्लवी बंड तसेच शेतकरी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी कंपन्या, उत्पादन संस्था, स्वयंसहाय्यता गटांना प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. या माध्यमातून शेतमालाला चांगला भाव मिळेल आणि शासकीय अनुदानही मिळेल. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दीपक कुटे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देशभरामध्ये राबविण्याचे नियोजन केलेले असून सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षासाठी ही योजना राबविली जात आहे. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे, उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे, अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे, सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे हे योजनेचे मुख्य उद्देश आहेत.

कोणास मिळेल लाभ  

या योजने अंतर्गत 18 वर्षावरील वैयक्तिक मालकी / भागीदारी, शेतकरी उत्पादक गट संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखपर्यंत क्रेडीट लिंक सबसिडी आधारावर अनुदानाचा लाभ देय आहे.

सामाईक पायाभूत सुविधा अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी, स्वयंसहाय्यता गट आणि त्यांचे फेडरेशन / शासकीय संस्था भाग धेवु शकतात. सदर घटकासाठी ३.०० कोटी कमाल मर्यादेसह पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के क्रेडीट लिंक कॅपिटल सबसिडी देय आहे.

इन्क्युबेशन सेंटर साठी शासकीय संस्था- १००%, खाजगी संस्था- ५० % तर आदिवासी क्षेत्रातील खाजगी संस्था, उत्तर पूर्व राज्ये व मागास जाती जमाती प्रवर्गासाठी ६०% अनुदान देय आहे. तर ब्रँडिंग व पॅकेजिंगसाठी एकूण खर्चाच्या ५०% रक्कम अनुदान देय असून यासाठीची कमाल निधी मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.

बचत गटातील सदस्यांना बीज भांडवल अंतर्गत खेळते भांडवल किंवा गुंतवणीकरीता रक्कम रु.४००००/- प्रति सदस्य (प्रति बचत गटास रु.४.०० लाख) देय आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रकल्प

या योजने अंतर्गत पोर्टलवर प्राप्त झालेले ३६५ प्रकरणे बँकेला सादर करण्यात आली असून बँकेव्दारे १२२ प्रकरणे मंजुर झाली आहेत. १३४ प्रस्ताव बँकेने रद्द केली असून बँक स्तरावर १०९ प्रकरणे कर्ज मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. मंजूर झालेल्या १२२ प्रकरणांपैकी ८१ प्रकरणांना कर्ज वितरण होवून दाल मिल, बेकरी उद्योग, मसाला प्रक्रिया, दुग्ध उत्पादने, पापड तयार करणे, तेल प्रक्रिया वर आधारित उत्पादने घेण्यास लाभार्थ्यांनी सुरुवात केली आहे.

 

– नंदकुमार ब. वाघमारे,

जिल्हा माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची २१, २२ व २३ मार्च रोजी मुलाखत

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर मंगळवार दि. 21, बुधवार दि. 22 व गुरुवार दि. 23 मार्च २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

21 मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो. वन संवर्धन आणि वन संरक्षणासाठी शासनस्तरावर विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. या योजना व उपक्रमांची माहिती प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांनी विस्तृत आणि उपयुक्त माहिती ‘दिलखुलास’  कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. मंगळवार दि. 21 मार्च 2023 रोजी सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

21 मार्च रोजी जागतिक वन दिन जगभरात साजरा केला जातो. वन संवर्धन आणि वन संरक्षणासाठी शासनस्तरावर विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. या योजना व उपक्रमांची माहिती प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांनी ‘जय महाराष्ट्र’  कार्यक्रमातून दिली आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

तृणधान्याला द्या बळ…आरोग्य होईल सबळ!

भारतीय कृषि संस्कृतीत तृणधान्याला कमालीचे महत्त्व होते. पण हातात नगदी पैसे देणाऱ्या पिकांमुळे  तृणधान्य मागे पडले. यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्षे जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले. त्यातून तृणधान्याचे मानवी आहारातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. महाराष्ट्र शासनानेही यावर्षी शेतकऱ्यांमध्ये तृणधान्यविषयक मोठी जागृती केली आहे. मुळातच तृणधान्य उत्पादनात देशात महाराष्ट्राचे स्थान वरचे आहे. तृणधान्य तुमच्या ताटात असेल तर आरोग्यपूर्ण जीवन जगाल हे आता जनमानसात रुजत आहे आणि घराघरात बाजरी, ज्वारी, नाचणीच्या भाकरी होत आहेत. त्यामुळे या धान्याचे बाजार मूल्यही वाढते आहे. त्यावर घेतलेला हा आढावा…!!

तृणधान्याच्या पिकांकडे अधिक लक्ष वाढावे म्हणून भारतानेही 2018 हे वर्ष राष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरे केले होते. यापूर्वी देखील कृषिशास्त्रज्ञ प्रा. एम. एस. स्वामीनाथन यांनीही ‘पौष्टिक धान्य’ हा शब्द प्रचारात आणला होता. आता आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केल्यामुळे पुन्हा एकदा गावठी तृणधान्याच्या चळवळीला वेग येणार आहे.

लातूरसारख्या जिल्ह्यात ज्वारी आणि बाजरी या तृणधान्याचे उत्पन्न होते, पण म्हणावे तेवढे होत नाही. यावर्षी कृषि विभागाने जिल्ह्यात किमान 200 हेक्टर एवढ्या क्षेत्रात उन्हाळी बाजरी पीक प्रात्यक्षिके घेण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कृषिची 23 मंडळे आहेत. प्रत्येक मंडळात कमीत कमी 10 हेक्टर एवढ्या क्षेत्रात उन्हाळी बाजरी घेतली जाईल, याचे नियोजन केले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात तृणधान्य पिकाबाबत मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे.

25 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शन घेण्यात आले. त्यात तृणधान्य (मिलेट) यावर विशेष भर देण्यात आला होता. तृणधान्य लावून शेतकरी, तृणधान्य लावून कृषि घर, तृणधान्याची रांगोळी एवढेच नव्हे तर कृषि विभागाकडून एक भव्य तृणधान्य स्टॉल लावण्यात आला. त्यात तृणधान्यापासून वेगवेगळे पदार्थ कसे करायचे याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. जानेवारीमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर बाजरीच्या पाककलेची स्पर्धा तर फेब्रुवारीमध्ये ज्वारीच्या पाक कलेची स्पर्धा ठेवण्यात आली. लातूर मध्ये 15 फेब्रुवारी रोजी दीड हजार विद्यार्थ्यांची मिलेट (तृणधान्य) दौड आयोजित करण्यात आली होती. तर 26 जानेवारीला तृणधान्याचे महत्त्व विशद करणारा चित्ररथ काढण्यात आला होता. तृणधान्याविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी. त्यामुळे मागणी वाढेल आणि तृणधान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्याला त्याची चांगली किंमत मिळेल, असा यामागील उद्देश होता. परिणामी, लोकांमध्ये हळूहळू तृणधान्य आणि आरोग्य याचे दृश्य परिणाम दिसायला लागले आहेत. जी ज्वारी तीन हजार रुपये क्विंटल होती ती आता साडेचार हजार रुपये क्विंटल मिळत आहे.

लातूर जिल्ह्यातील तृणधान्य क्षेत्र

तृणधान्य मुख्यत: कोरडवाहू जमिनीत येते. लातूर जिल्हा तसा पर्जन्यमान कमी असलेला जिल्हा असल्यामुळे एकेकाळी इथे तृणधान्य मोठ्या प्रमाणात येत होते. यावर्षीचा जिल्ह्यातील रब्बी पिकाचा पेरा बघितला तर लक्षात येईल हे प्रमाण खूप कमी झाले आहे. यावर्षी रब्बी ज्वारीचे एकूण क्षेत्र 31550 हेक्टर एवढे आहे. हे प्रमाण बाजाराची मागणी लक्षात घेता पुढच्या वर्षी वाढेल तसे कृषि विभागाचे सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात पीक कापणी प्रयोगाला मुद्दाम कृषि विभागाचे अधिकारी उपस्थित राहून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, अशी माहिती जिल्हा कृषि अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गवसाने यांनी दिली.

तृणधान्य हे उच्च कॅल्शिअम, लोह आणि प्रथिने ते कमी ग्लायसेमिक इंडेक्स, मुख्य आहाराच्या तुलनेत जास्त फायबर देणारे धान्य आहे. या पिकांची वाढ कोरडवाहू जमिनीसह पर्जन्यवृष्टी असलेल्या परिस्थितीतही होते. अगदी निकृष्ट दर्जाच्या मातीतही तृणधान्याचे पीक घेता येते.

ज्वारी- ज्वारीत न्यूट्रास्युटिकल गुणधर्मामुळे मानवाचे बरेचसे आजार दूर करण्यात मदत होते. भरपूर प्रमाणात तंतूमय पदार्थ आणि हळुवारपणे विघटन होणाऱ्या स्टार्चमुळे रक्तातील कोलोस्ट्रॉल, हृदयविकार, आतड्याचे आजार, बद्धकोष्ठता नष्ट होते.

बाजरी- बाजरीत सल्फरयुक्त अमीनो ऍसिड असल्याने लहानमुले आणि गर्भवतींसाठी बाजरी अतिशय उपयुक्त आहे. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण गहू  मका, भात, ज्वारी इ. पिकांपेक्षा जास्त असल्यामुळे आहारात बाजरीचा समावेश केल्यास शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

नाचणी- नाचणी मध्ये तंतुमय पदार्थ असल्यामुळे नाचणीचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तींसाठी खूप उपयोगी ठरते, ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखर एकदम वाढू देत नाही. यामध्ये पोटॅशियम आणि ‘ब ‘ जीवन सत्व भरपूर प्रमाणात आहे.

भगर- भगरमध्ये प्रमुख घटक कार्बोदके असून कॅल्सीयम, फॉस्फरस यासारख्या खनिज द्रव्यांचे भांडार आहे. तसेच प्रथिने व स्निग्ध हे उच्च प्रतीचे असल्यामुळे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे.

राजगिरा- राजगिराचे पाने, धान्य या दोन्हीचाही आहारात उपयोग केला जातो यात कॅल्शियम व लोहचे प्रमाण भरपूर असते. ग्लुटेन फ्रि असल्यामुळे गव्हाची ऍलर्जी असणाऱ्या व्यक्तींसाठी राजगिरा हा  उत्तम पर्याय आहे.

ही सर्व माहिती असलेली भितीपत्रकं जिल्हा कृषि कार्यालयाने जिल्ह्यात लावले आहेत. एकूणच तृण धान्याचे आरोग्याला असलेले फायदे लक्षात घेता दिवसेंदिवस या तृणधान्याची मागणी वाढेल. लातूर जिल्ह्यातील शेतजमिनी यासाठी पोषक असल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय उभा राहू शकेल. यासाठी कृषि विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यात विषमुक्त नैसर्गिक शेतीचेही प्रयोग मोठ्या प्रमाणात होत आहेत. लोकांमध्ये आरोग्याबद्दल कमालीची सजगता येत असल्यामुळे शेतकरीही गरजेप्रमाणे अशा शेतीकडे वळेल. त्यातून योग्य मूल्य पण मिळेल यासाठी शासनाचेही सातत्याने प्रयत्न आहेत.

 

युवराज पाटील,

जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...