रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 158

नागपुरात साकारणारे स्पोर्टस हब, आयुक्त कार्यालयासह इतर इमारती ग्रीन बिल्डींगच्या आदर्श वस्तुपाठ ठराव्यात –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ३१ : नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्टस हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्वीन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेच्या वापरासह ग्रीन बिल्डींग म्हणून नावारुपास आले पाहिजेत. यादृष्टीने इमारतीच्या बांधकामातील प्रत्येक टप्यांवर याचा विचार करुन काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात साकारणारे स्पोर्टस् हब व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारल्या जाणाऱ्या बारा मजली ट्वीन टॉवर्स आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बांधकामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपूरे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

नागपूर येथील लॉ विद्यापीठातील इमारतीच्या रचनेत आपण ऊर्जेबाबत स्वयंपूर्णता अंगिकारली. शाश्वत विकास व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विचार करता क्रीडा संकुल व आयुक्तालयाचे हे बांधकाम हे नेटझिरो अर्थात ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असले पाहिजे. या संकुलाला कार्यालयाला जी वीज लागेल ती वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण भागविण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सर्व इमारती ग्रीन बिल्डींगच्या सर्व मानकांची पुर्तता करुन पाण्याच्या पुर्नवापराच्या दृष्टीने आदर्श मापदंड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व इमारतींच्या उभारणीसाठी जो कालावधी निश्चित केला आहे त्या कालावधीच्या आत कोणत्याही परिस्थितीत बांधकाम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

*****

भोसला सैनिके शाळेमुळे सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी,देशासाठी शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे कार्य- देवेंद्र फडणवीस

संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण

जनरल बिपीन रावत सभागृहाचे लोकार्पण

नागपूर, दि. ३१ : भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलासाठी उत्कृष्ट अधिकारी तसेच आधुनिकतेला स्विकारणारे व शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे काम होत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व जनरल बिपीन रावत यांच्या स्मृति प्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास सेवानिवृत्त जनरल मनोज पांडे, हवाई दलाचे सेवानिवृत्त एयर चिफ मार्शल शिरीष देव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुर्यरतन डागा, भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, संस्थेचे कुमार काळे, दिलीप चव्हाण, राहूल दिक्षीत, हेमंत देशपांडे, विवेक रानडे, संजय जोशी, अमरेंद्र हरदास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
समाजामध्ये सैनिकी मुल्यांचे रोपण व सैन्याचे भारतीयीकरण तसेच त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसला सैनिकी शाळेची स्थापना झाली. आधुनिकतेला स्वीकारणारी पिढी निर्माण करण्याचे काम संस्‍थेच्या माध्यमातून होत आहे. अनुशासित भारत घडविण्याच्या कार्यासोबतच सैन्यदलाला आधुनिकतेकडे घेवून जाणारे सैन्यदल प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची युवकांना प्रेरणा मिळावी. संपूर्ण भारतीयांना मेजर बिपीन रावत यांच्या कार्याची व आदर्शांची कायम आठवण रहावी, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी यासाठी अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू असून जगातील सर्वात आधुनिक शस्त्र देशात तयार होत आहेत व आपण या शस्त्रांची निर्यातही करत आहोत. भारताने नेहमी शांतीसाठी कार्य केले असल्यामुळे बलशाली भारतच जगाला शांतीचा संदेश देवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

एयर मार्शल शिरीष देव यांनी भोसला सैनिकी शाळा ही एनडीए च्या धर्तीवर विकसित होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सैनिकी शाळांच्या शिक्षणाचा दर्जा तसेच सैनिकी शिक्षणाबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी सैन्य दल प्रमुख मनोज पांडे म्हणाले, जनरल बिपीन रावत हे देशासाठी अलौकीक कार्य करणारे व विकसित
भारतामध्ये सशस्त्र दलाला आधुनिकतेकडे नेणारे दूरदर्शी नेतृत्व होते. तिन्ही दलाला एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासोबतच युद्धासाठी कायम सज्जता असावी अशा विचारांचे असल्यामुळे भारतीय सैन्य दलात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले असल्याचे गौरोद्गार यावेळी त्यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी स्वागत करून संस्थेमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा सभागृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगितले. सैनिकी शिक्षणाची सुरूवात करणारे संस्थेचे संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण ही संस्थेसाठी महत्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रख्यात शिल्पकार प्रदिप शिंदे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हर्षला राजगिरे यांनी केले. तर राहूल दीक्षीत यांनी आभार मानले.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
——– 000 ——–

विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक -राज्यपाल सी पी राधाकृष्णन

मुंबई, दि. ३१  :जगातील  ९०% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी सागरी क्षेत्राचा समग्र विकास होणे अतिशय आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

सागरी व्यापार क्षेत्रातर्फे साजरा केल्या जाणाऱ्या ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवसाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी राज्यपालांच्या जॅकेटला राष्ट्रीय सागरी दिनाच्या ध्वजाची प्रतिकृती लावली तसेच राज्यपालांना स्मृतिचिन्ह व कॉफी टेबल पुस्तक भेट दिले.

अनेक शतकांपूर्वी भारताचा समुद्री व्यापार क्षेत्रात मोठा दबदबा होता. सम्राट राजेंद्र चोला यांचे नौदल शक्तिशाली होते व आपल्या काळात त्यांनी इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, लाओस, बर्मा आदी देशांपर्यंत व्यापार वाढवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्त्व ओळखून सशक्त नौदल उभारले होते, असे राज्यपालांनी सांगितले.

आज व्यापाऱ्यांना कमी वेळात आपला माल गंतव्य ठिकाणी पोहोचवायचा असतो. ग्राहक हा आज राजा आहे. त्यामुळे कंटेनरमध्ये माल  ठेवणे व उतरवणे हे वेळेत झाले पाहिजे. या दृष्टीने नौवहन संचालनालय व शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी कंटेनर कॉर्पोरेशन, रेल्वे तसेच व्यापारी संघटनांशी चर्चा करून सागरी व्यापार क्षेत्राचे आधुनिकीकरण केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

नौवहन संचालनालयाने व्यापारात अडथळे निर्माण होण्यापूर्वीच समस्यांचे आकलन केले पाहिजे व त्यावर परिणामकारक उपाययोजना केल्या पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

वाढवण बंदर तयार झाल्यानंतर भारताचा जगातील विविध देशांशी व्यापार लक्षणीय वाढणार आहे. त्यामुळे वाढवण बंदर येथे कोणत्या सुविधा असाव्या या दृष्टीने नौवहन क्षेत्राने सिंगापूर, शांघाय, ऍमस्टरडॅम येथील बंदरांचे अध्ययन करावे व त्यानुसार येथे आधुनिक सुविधा निर्माण कराव्या, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सागरी प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने हरित सागरी जलवाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे असेही आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला नौवहन महासंचालनालयाचे मुख्य सर्वेक्षक व अतिरिक्त महासंचालक अजित सुकुमारन, उपमहासंचालक पांडुरंग राऊत, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन बी के त्यागी, मुख्य जहाज सर्वेक्षक प्रदीप सुधाकर, उपमहासंचालक डॉ सुधीर कोहाकडे, उप नौकानयन सल्लागार कॅप्टन नितीन मुकेश, शिपिंग मास्टर मुकुल दत्ता, कॅप्टन संकल्प शुक्ल, नॅशनल युनिअन ऑफ सीफेअरर्सचे महासचिव मिलिंद कांदळगावकर आदी उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor launches 62 nd National Maritime Day,

Merchant Navy Week in Mumbai

Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 62nd National Maritime Day and the Merchant Navy Week at Raj Bhavan, Mumbai on Mon (31 Mar).

 Director General of Shipping Shyam Jagannathan pinned a miniature flag of National Maritime Day on the Governor’s jacket and presented a memento and a Coffee Table Book to the Governor.

 Addressing hte officers of Director General of Shipping, Shippping Corporation of India and various other stakeholders, the Governor stressed the importance of the maritime sector to achieve the goal of Viksit Bharat. He called for better coordination between Directorate General of Shipping, Shipping Corporation of India, Container Corporation, Railways and traders and further expressed the need for modernisation of ports in the country.

 Chief Surveyor and Additional Director General of Shipping Ajit Sukumaran, Deputy Director General Pandurang Raut, Chairman of the Shipping Corporation of India, Captain B. K. Tyagi, Chief Ship Surveyor Pradeep Sudhakar, Deputy Director General Dr. Sudhir Kohakade, Deputy Nautical Advisor Captain Nitin Mukesh, Shipping Master Mukul Dutta, Captain Sankalp Shukla, and General Secretary of the National Union of Seafarers, Milind Kandalgavkar were among those present.

0000

शिर्डी विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना सुरुवात

मुंबई, दि. ३१ :शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रात्रीच्या विमानसेवांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. धावपट्टीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने ही ऐतिहासिक सुविधा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डीतील हवाई वाहतूक सेवा नव्या उंचीवर पोहोचली आहे.

या नव्या टप्प्याचा लाभ यात्रेकरूंना तसेच पर्यटकांना होणार असून, इंडिगो एअरलाइन्सने सेवेत दोन नवीन विमानांची भर घातली आहे. विशेषतः, हैदराबाद-शिर्डी-हैदराबाद मार्गावर 78 प्रवाशांच्या क्षमतेचे नियमित विमान सुरू करण्यात आले आहे. ही सेवा गुढीपाडवा आणि उगादीच्या शुभप्रसंगी यात्रेकरूंना भेट म्हणून सुरू करण्यात आली आहे.

या विस्तारामुळे शिर्डी विमानतळ दररोज एकूण 11 विमानांची (22 हालचाली) हाताळणी करेल, ज्याद्वारे दररोज सुमारे 2200 प्रवाशांना सेवा देण्यात येईल. हे पायाभूत सुविधा आणि हवाई वाहतूक क्षेत्रासाठी मोठे यश मानले जात आहे.

श्री साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि पहाटे 4 वाजता होणाऱ्या काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. अनेक विमान कंपन्यांनीही शिर्डीसाठी अधिक सेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शिर्डी विमानतळावर रात्रीच्या कालावधीत विमानसेवा सुरू होणे हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अध्यक्ष  देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे.

या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सांगितले की, ही सुविधा केवळ हवाई वाहतूक क्षेत्रासाठीच नाही, तर धार्मिक पर्यटनालाही चालना देण्यासही मदत करणारी ठरेल. शिर्डीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भविष्यात येथे आणखी सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

०००

राजू धोत्रे/विसंअ

ईद-उल-फित्र निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.३१ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपवास, प्रार्थना व दानधर्माच्या माध्यमातून साजरा होत असलेला  रमजान ईद हा अतिशय पवित्र सण आहे.  हा मंगल दिवस  आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद उल फित्रच्या हार्दिक शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Maharashtra Governor greets people on Eid-Ul-Fitr

Mumbai 31 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan has greeted the people on the occasion of Eid-Ul-Fitr (Ramzan Eid).

In his message, the Governor has said: “The auspicious month of Ramzan attaches importance to fasting, prayers and acts of charity.

May Eid-Ul-Fitr bring happiness, contentment and prosperity to all. Wishing Eid Mubarak to all, especially to Muslim brothers and sisters.”

0000

रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. ३१ मार्च : आगामी काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वधर्मीय सण उत्सवाचे आयोजन होणार आहे. त्या अनुषंगाने आज (दि.31) राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी रामनवमी शोभायात्रेनिमित्त जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, आयोजन समितीचे अध्यक्ष योगेश भंडारी, उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, शैलेश बागला आदी उपस्थित होते.

रामनवमी शोभायात्रेनिमित्त आयोजन समिती आणि जिल्हा प्रशासनामध्ये समन्वय रहावा, या उद्देशाने आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, रामनवमी हा उत्सव सर्व भाविकांच्या श्रध्देचा आणि भावनेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे यासाठी संपूर्ण सहकार्य राहील. अतिशय उत्साहात आणि आनंदात रामनवमी साजरी करावी. रॅलीची वेळ वाढवून मिळण्याबाबत विचार-विमर्श करून आणि नियमानुसार निर्णय घेण्यात येईल. शासन – प्रशासनाच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात साज-या होणा-या सर्वधर्मीय सणांबाबत नुकतीच जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचा हाच लौकिक कायम राहण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेला आणि शांतता समितीच्या सदस्यांना सुचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

मनपा आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, शहरातील रस्त्यांची कामे युध्दस्तरावर सुरू असून शोभायात्रेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी मजबुत करून दिला जाईल. तसेच फॉगिंग मशीनने रस्त्यावरील धूळ खाली बसण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येईल. सोबतच रस्त्याची स्वच्छता आदी कामे मपनाने हाती घेतली आहेत.

यावेळी आयोजन समितीच्या सदस्यांनी देखील सुचना केल्या. बैठकीला विश्वास माधशेट्टीवार, रोडमल गहलोत, डॉ.गोपाल मुंधडा, अजय वैरागडे, जीतेन्द्र जोगड़, रविन्द्र गुरुनुले, अमित विश्वास, आशिष मुंधडा, प्रवीण खोब्रागडे, सुहास दानी, विजय डोमलवार, लखनसिंग चंदेल, विवेक होकम आदी उपस्थित होते.

००००००

सुंदर शाळा उपक्रमातून भौतिक सुविधांसह शाळांमध्ये गुणात्मक बदल – पालकमंत्री संजय राठोड

Ø  ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम

यवतमाळ, दि.३१ (जिमाका) :  तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम सुरु करण्यात आला. शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास आणि त्यांच्यात गुणात्मक बदल घडविण्यासाठी हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत शाळांना बक्षिस वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॅा.प्रशांत गावंडे यांच्यासह पुरस्कार प्राप्त तालुक्यातील शाळांचे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी शाळा व्यवस्थापन संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांनी चांगले काम केले आहे. या उपक्रमामुळे आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे. शाळांना भौतिक सुविधा तर उपलब्ध होत आहेतच शिवाय गुणात्मक बदल यातून दिसतो आहे. शाळा केवळ शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत तर विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविणारे ज्ञानाचे केंद्र आहे. त्यामुळेच खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील शाळा मॅाडेल केल्या जात असल्याचे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी भविष्याची भावी पिढी आहे. या पिढीच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांच्यात नैतिक मुल्यांची जोपासणा होणे देखील आवश्यक आहे. जिल्ह्यातील शाळांना आवश्यक्ता असल्यास डेस्क बेंच उपलब्ध करून देऊ. शैक्षणिक सुविधांसाठी जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या प्रस्तावांना आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्राचार्य प्रशांत गावंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शाळांना पुरस्कार देण्यात आले. त्यात सन 2023-24 या वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटात प्रथम उच्च प्राथमिक शाळा नागापूर, ता.उमरखेड, द्वितीय उच्च प्राथमिक शाळा मनपूर, ता.यवतमाळ, तृतीय प्राथमिक शाळा चालबर्डी, ता.पांढरकवडा व उच्च प्राथमिक शाळा मजरा, ता. मारेगाव यांना देण्यात आला. खाजगी व्यवस्थापन शाळा गटात प्रथम माणिकराव पांडे पाटील विद्यालय फाळेगाव, ता.बाभुळगाव, द्वितीय मोहनाबाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, दिग्रस, तृतीय लखाजी महाराज हायस्कुल झाडगाव, ता.राळेगाव यांना देण्यात आला.

सन 2024-25 या वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था शाळा गटात प्रथम प्राथमिक शाळा सुकळी, ता.कळंब, द्वितीय उच्च प्राथमिक उर्दु शाळा मालखेड बु. ता.नेर, तृतीय उच्च प्राथमिक शाळा पिंपळापूर, ता.राळेगावचा समावेश आहे. खाजगी व्यवस्थापन शाळा गटात प्रथम महात्मा फुले विद्यालय उमरखेड, द्वितीय मातोश्री हायस्कुल महागाव तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस उटुंबू इंग्रजी शाळा जांब, यवतमाळ यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन कैलास राऊत यांनी केले. यावेळी पुरस्कार प्राप्त शाळांसह जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती – डॉ. अशोक उईके

Ø  आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात अत्याधुनिक सुविधा

Ø  शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थाचे मार्गदर्शन

Ø  नविन शिक्षण धोरणानूसार उपक्रमांची आखणी

Ø  रविंद्र ठाकरे यांनी सुरू केलेले उपक्रम कायम राहणार

नागपूर, दि. ३१ :   अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिक्षणाच्या सर्व सुविधा आश्रमशाळांच्या माध्यमातून त्यांच्या पर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. आश्रमशाळा तसेच वस्तीगृहामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये वाढ करतांनाच आश्रमशाळांचा दर्जा वाढविण्यासाठी नियंत्रण समिती तयार करण्यात येणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईक यांनी केली.

वनामती येथील सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सादरीकरण तसेच यासाठी सहाय्य करणाऱ्या संस्थांचा गौरव समारंभ आदिवासी विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री शंकरबाबा पापळकर होते. यावेळी अतिरिक्त आदिवासी उपायुक्त रविंद्र ठाकरे, उपायुक्त दिगंबर चव्हाण, प्रकल्प अधिकारी रंजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), दिपक हेडाऊ (वर्धा), विकास राचेलवार (चंद्रपूर), प्रविण लाटकर (चिमूर), निरज मोरे (भंडारा), उमेश काशीद (देवरी), उपसंचालक डॉ. पुरूषोत्तम मडावी, शिवराम भलावी, दिनेश शेराम, डॉ. गोडवते, अधिक्षक अभियंता उज्वल डाबे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पद्मश्री मिळाल्यानंतर शंकरबाबा पापळकर व रविंद्र ठाकरे यांचा सेवानिवृत्तीनिमीत्त गौरव करण्यात आला.

आदिवासींच्या जिवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तना सोबतच संपूर्ण समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होईल यादृष्टीने काम करण्याची आवश्यकता असून आदिवासी विभागाची अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी मागिल चार वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून या समाजाच्या सर्वांगिन विकासाला प्रोत्साहन दिले आहे. आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी यासाठी बोलका वर्ग, ब्रायटर माईंड आदी शैक्षणिक उपक्रम राबविले. याउपक्रमामुळेच अनेक विद्यार्थी गुणवत्त यादीत येवू शकले. त्यांनी सुरू केलेले सर्व उपक्रम यापुढेही कायम सुरू राहतील असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी व्यक्त केला.

आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. नविन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना अत्याधुनिक पद्धतीचे शैक्षणिक साहित्य पुरविणे आवश्यक आहे. वस्तीगृहामध्ये असलेल्या सोयी व सुविधा कशा वाढविता येईल यासाठी प्रत्येक आश्रमशाळेसाठी नियंत्रण समिती तयार करण्यात यावी व ही समिती नियमीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधेल तरच प्रत्येक आदिवासी मुलाला शैक्षणिक सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आदिवासी आश्रमशाळांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या विविध संस्था व व्यक्तींचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी आदिवासी समाज हा प्रमाणिक व मेहनती असल्यामूळे जंगलांच्या संवर्धनासाठी महत्वाची भुमिका बजावत आहे. आदिवासी भागात शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी विभागाने पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. आदिवासी भागातील प्रत्येक मुलगा शाळेत येईल. यासाठी  उपाययोजना कराव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.

00000

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

परभणी, दि. ३१ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते थाटात पार पडले.

कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता येणार आहे, असे सांगितले.

परभणी विभागाअंतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगारांसाठी एकूण 70 बीएस-6 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारांसाठी प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. नवीन बीएस-6 मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे.

000

नागपूर येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ३१ : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशा अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखीत वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली आहे. मात्र, प्राप्त परिस्थिती व परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही.  आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची मोठी ज्ञान संपदा आहे. त्याचे संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करू असेही त्यांनी सांगितले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्य साधारण महत्व आहे. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित  घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.

विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.

 

00000

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...