रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 157

शासन बालकल्याण संकुल संस्थेच्या पाठिशी – पालकमंत्री, प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : बालकल्याण संकुल ही संस्था शासनाचेच काम करत असल्याने तिच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिली. समाजात अनेक समस्याग्रस्त पीडितांना ऐनवेळी मदतीची गरज पडते, अशावेळी आवश्यक मदत घेण्यासाठीचा विश्वास बालकल्याण संकुलाबद्दल समाजात आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या बालकल्याण संकुलाला भेट देवून कामकाजाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, येथील मुलांची संख्या पाहता संस्थेबद्दल लोकांच्यात चांगला आत्मविश्वास आहे. असा विश्वास प्रत्येक संस्थेबद्दल निर्माण व्हावा. यावेळी त्यांनी दाखल मुला-मुलींशी संवाद साधून तेथील समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्याशीही कामकाजाबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिशुगृह, बालगृह तसेच कन्या बालगृहाला भेट दिली. जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेचे उपाध्यक्ष व्ही बी पाटील, मानद खजिनदार निरंजन वायचळ, मानद कार्यवाह पद्मजा तिवले, संचालक व्यकंप्पा भोसले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांचेसह इतर अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

भेटी दरम्यान पालकमंत्री आबिटकर यांनी प्रत्येक विभागाला भेट देवून कामकाजाविषयक माहिती जाणून घेतली. उपस्थित 10 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मुलांशी संवाद साधून त्यांनी मिळविलेल्या विविध प्राविण्याबद्दल माहिती जाणून घेतली.  अधिकारी पदाधिकारी तसेच कर्मचारी यांच्याशी संवाद साधत असताना संस्थेबद्दलची माहिती  कार्यवाह पद्मजा तिवले यांनी दिली. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा देत कामाची रूपरेषा सांगितली. यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी संस्थेमधील ज्या ज्या घटकासाठी मदत लागणार आहे त्यासाठी आवश्यक मदत करु असे सांगत येणाऱ्या अडचणीही सोडवू अशी ग्वाही दिली. सीपीआर रूग्णालयात संस्थेत दाखल होणाऱ्या मुलांचे आवश्यक मेडिकल करण्यासाठी खुप वेळ आणि त्रास सहन करावा लागु नये म्हणून विशेष गरज लक्षात घेवून एक खिडकी योजना किंवा समतुल्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी बैठक घेवून सूचना देवू असे सांगितले. तसेच राज्य शासनाकडून मिळत असलेले शिशुगृहासाठीचे अनुदान यावर्षीपासून मिळाले नाही. राज्यात सर्वांत चांगले शिशुगृह म्हणून नुकताच पुरस्कार मिळाला आहे. तरी याबाबत अनुदान पुर्ववत सुरू करण्यासाठी मागणी उपस्थितांनी केली. यावर त्यांनी सचिवस्तरावर असणाऱ्या याबाबच्या तांत्रिक अडचणी दूर करून ते पुर्ववत होईल यासाठी प्रयत्न करु असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे स्वागत उपाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह पद्मजा तिवले यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना श्रीमती तिवले म्हणाल्या, राज्य शासनाने या संस्थेला तसेच कर्मचाऱ्यांना यावर्षीचा बालस्नेही राज्यस्तरीय पुरस्कार दिला आहे. याठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे ती दूर व्हावी. संस्थेतील शिुशुगृह हा महत्त्वाचा घटक असून यासाठी आवश्यक अनुदान राज्य शासनाकडून मिळावे. या संस्थेत प्रत्येक कर्मचारी जन्मलेल्या मुलांपासून ते तरूण मुला मुलींसाठी त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी मनोभावी योगदान देत आहेत असे सांगितले.

आदिवासी लोककलेतून आदर्शवत संस्कृतीचे दर्शन – मंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर, दि. 1 : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हा तालुका राज्याच्या टोकावर असून हा भाग आदिवासीबहुल आहे. जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण करणाऱ्या आदिवासींमुळेच संस्कृती जिवंत राहिली आहे. त्यांच्या लोककलेतून एका आदर्शवत संस्कृतीचे दर्शन आपल्याला होते, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

कोरपना येथे सांस्कृतिक कार्य विभाग, आदिवासी विकास विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या विशेष सहकार्याने आयोजित आदिवासी लोककला महोत्सवात अध्यक्ष म्हणून मंत्री डॉ. उईके बोलत होते. यावेळी मंचावर सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, कोरपनाच्या नगराध्यक्षा नंदा बावणे, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, सांस्कृतिक विभागाच्या प्रज्ञा पाटील, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, आदिवासी कला आणि संस्कृती ही गौरवप्राप्त आहे. अशा संस्कृतीचे दर्शन राज्यात व्हावे, यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आदिवासी माणसाने कायम संस्कृती जपली आहे. देव, समाज, धर्म आणि संस्कृतीचे पालन करणारा हा समाज आहे. त्यांच्यामुळेच ही संस्कृती निरंतर जिवंत राहणार आहे. राज्याचा आदिवासी विकास मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदिवासीबहुल या क्षेत्राकडे 100 टक्के लक्ष राहील. आमदारांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या नक्कीच पूर्ण केल्या जातील, असे डॉ. अशोक उईके यांनी आश्वस्त केले.

आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेणार – ना.आशिष शेलार

आदिवासी लोककला महोत्सव एक पर्वणी आहे. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन अतिशय चांगले केले आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात आदिवासींचा आवाज बुलंद होईल, अशी त्यांची संस्कृती आहे. राज्याचा सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आदिवासी लोककलेचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिली.

पुढे ते म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व तालुक्यात आनंदाचाचा आलेख वाढविण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यक्रमातून लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. 1 ते 4 मे दरम्यान मुंबईत वर्ल्ड ऑडिओ – व्हिज्युएल समीट होत आहे. तेथे आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीजमध्ये सुध्दा आदिवासी संस्कृती आणि त्यांची कला रुजविण्यासाठी प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदिवासी समाज हा कष्टकरी आणि प्रामाणिक आहे. आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन महत्वाचे आहे. आदिवासींच्या विकासाच्या संकल्पाचा हा विषय आहे. सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये चंद्रपूर – गडचिरोलीतील आदिवासी खेळाडू झळकले पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार देवराव भोंगळे म्हणाले, कोरपना हा राज्याच्या शेवटच्या टोकावर आहे. माझ्या विधानसभा मतदार संघात कोरपना, जिवती आणि राजुरा हे तीन पेसा तालुके आहेत. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे तीन तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्ट शिखर सर करू शकले. कोरपना तालुक्यात आदिवासी सांस्कृतिक भवनासाठी 15 कोटी, माणिकगड किल्ला आणि विष्णु मंदिराचे जतन करण्यासाठी 10 कोटी, गडचांदूर आणि कोरपना तालुक्याच्या विकासाठी प्रत्येकी 10 कोटी तसेच या दोन्ही तालुक्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या इमारतीसाठी निधी द्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले. संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार मुख्याधिकारी यमाजी धुमाळ यांनी मानले.

या समुहांनी सादर केल्या लोककला : जय लिंगो जय जंगो गोंडी लोकनृत्य मंडळ, जयसेवा गोंडी नृत्य मंडळ लोहारा, कोयावनसी लंका पती राजा रावण ढेमसा मंडळ चनई, जय रावण जय हिरासकू ढेमसा मंडळ देवूबाई गुडा, गोंडी ऑक्रेस्ट्रा, फॅन्सी ड्रेस, जय लिंगो जय जंगो हिरासकू ढेमसा मंडळ खैरगाव, जय लिंगो जय जंगो ढेमसा मंडळ भेंडवी, गोंडी ढेमसा मंडळ राजूरा, गोंडी ढेमसा नृत्य मंडळ खरारपेठ, घाटराई माथा घुसाडी मंडळ हातलोनी, आदिवासी मुलींचे वसतीगृह गडचांदूर, आदिवासी मुलींचे वसतीगृह कोरपना, जिल्हा परिषद प्राथ. शाळा चनई, जि.प. प्राथ. शाळा आसन, फाल्गुनी मसराम यांनी विविध आदिवासी लोककला सादर केल्या.

भारत नेट टप्पा -२ प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्तम संपर्क यंत्रणा निर्माण करा – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

मुंबई, दि. ०१ : देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. भारत नेट टप्पा – १ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे. आता टप्पा -२ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातही उर्वरित प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. मुंबईतील बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्तांबाबत नगरविकास विभाग, बृहन्मुंबई महापालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्याच्या सूचना देत समितीने चार आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देशही केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी दिले.

सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबईतील बीएसएनएलच्या मालमत्ता आणि महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणाबाबत आयोजित बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सौनिक, केंद्रीय दूरसंचार सचिव नीरजकुमार, बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रावी आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री सिंधिया म्हणाले, भारत नेट टप्पा -२ अंतर्गत फोर जी नेटवर्कचे देशभरात एक लाख टॉवर उभारण्यात येणार आहे. हे टॉवर प्रामुख्याने संपर्क नसलेल्या भागात उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे राज्यात अतिदुर्गम भागातही चांगली संपर्क यंत्रणा निर्माण होईल. ग्रामीण भागात सांगली संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अती दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीवाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतीदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्यशासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितले.

गडचिरोलीसह अन्य ठिकाणी दुर्गम भागातही संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. भारत नेट टप्पा -२ अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये राज्यात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासन काम करेल. या टप्प्यातही राज्य देशात सर्वात पुढे राहून काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

बीएसएनएल व एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. यापैकी नियमानुसार काढणे शक्य असलेली आरक्षणे काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. या मालमत्तांवर नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन कार्यवाही करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

गडचिरोलीच्या अती दुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास नक्षलवादाचा संपूर्णपणे बीमोड करणे राज्य शासनाला शक्य होणार आहे. शासनाने नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीत संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास अधिक बळ मिळेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्ता, मोबाईल टॉवर उभारणी, प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारत नेटच्या अंतर्गत निर्माण होणारी संपर्क यंत्रणा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे २ मे २०२५ रोजी उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटनस्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्री दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवर वसलेले गिरीस्थान आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची महाबळेश्वर पूर्वी ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारे दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतींची आठवण करुन देतात. या ठिकाणी स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदिरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे.

पर्यटकांसाठी  पर्यटन महोत्सव कालावधीत विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असून येथे ५० निवासी टेंट पर्यटक आणि मान्यवरांसाठी उपलब्ध होणार आहेत. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभव समृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. ०१ : राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथून विमानाने नवी दिल्ली येथे प्रयाण झाले.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर -पाटणकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, व्हाईस एडमिरल डी. के. गोस्वामी, नेव्ही, तसेच ब्रिगेडियर ज्ञानेंद्र त्रिवेदी आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

मासेमारी नौकांसाठी मार्च महिन्यात १ लाख ६८ हजार कि.लि.डिझेल कोटा मंजूर

मुंबई, दि. ०१ : सन २०२५ – २६ कालावधीकरीता राज्यातील सागरी जिल्ह्यातील १३८ मच्छिमार सहकार संस्थेतील सभासदांच्या एकूण ७ हजार ७९६ यांत्रिकी मासेमारी नौकांना मार्च महिन्यासाठी १ लाख ६८ हजार १०९ कि.लि. इतका डिझेल कोटा मंजूर करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

मच्छिमार नौकांना डिझेल कोटा मंजूर करण्याविषयी स्थापन केलेल्या समितीने हा डिझेल कोटा मंजूर केला आहे. यामध्ये सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या रिअर क्राफ्ट ऑनलाईन प्रणालीनुसार नौका नोंदणी प्रमाणपत्र घेतलेल्या तसेच विधीग्राह्य मासेमारी परवाना असलेल्या अधिकृत मासेमारी नौकांनाच डिझेल कोटा अनुज्ञेय करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम १९८१ (सुधारित २०२१) च्या तरतुदींचा भंग करणाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तसेच गस्ती नौका व ड्रोन सर्वेक्षणामध्ये दोषी आढळलेल्या नौकांचा मासेमारी परवाना रद्द केला असून अशा नौकांना डिझेल कोटा देण्याचे प्रस्तावात समाविष्ट करण्यात आलेले नसल्याचेही मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई, दि. १ : भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा आहे. मजबूत बँकिंग प्रणाली, वित्तीय नवउपक्रम आणि ग्राहकांचा विश्वास कायम राखण्याच्या दृष्टीने याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असे प्रतिपादन राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

एनसीपीए नरिमन पॉईंट येथे आयोजित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९०व्या वर्धापन दिनाचा उत्सव आज साजरा करत  आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर ही देशातील सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. देशाची केंद्रीय बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या अद्वितीय विकास प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील  खडतर स्थितीपासून ते आजच्या जागतिक महासत्तेपर्यंतच्या प्रवासात आरबीआय हा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेहमीच देशाच्या विकासाच्या प्रवासापेक्षा एक पाऊल पुढे राहिली असून या प्रवासात देशाचे नेतृत्वही केले असल्याचे राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या.

आरबीआय केवळ केंद्रीय बँक नसून वित्तीय समावेशन व संस्थात्मक उभारणीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संस्थात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आरबीआय ने नाबार्ड, आयडीबीआय, सिडबी आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या शेती, लघु व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचा पाठिंबा देतात. ‘लीड बँक योजना’सारख्या उपक्रमांमुळे बँकिंग सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली आहे. आर्थिक समावेशनाच्या दिशेने आरबीआय ने प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण निर्माण केले आहे. विशेषतः, महिलांच्या मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होणे हा आर्थिक सक्षमीकरणाचा सकारात्मक बदल आहे.

Oplus_131072

डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात वाटा

भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआय चा मोठा वाटा आहे. युपीआय (UPI) सारख्या नाविन्यपूर्ण प्रणालींमुळे आर्थिक व्यवहार सहज, सुरक्षित आणि किफायतशीर झाले आहेत. याशिवाय, आरबीआय ने एक संपन्न वित्तीय-तंत्रज्ञान (Fin-Tech) पर्यावरण निर्माण करण्यासही मदत केली आहे. जसे-जसे भारत तंत्रज्ञानाधारित वित्तीय व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, तसे आरबीआय ग्राहक संरक्षण अधिक बळकट करत आहे आणि नव्या आव्हानांचा सामना करत आहे. आरबीआय ग्राहकांच्या विश्वासास प्राधान्य देत असून, ठेवीदारांसाठी विमा सुरक्षा, तसेच तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करत आहे. ‘एकात्मिक लोकपाल योजना’ (Integrated Ombudsman Scheme) द्वारे ग्राहकांना तक्रार निवारणाची सुलभ आणि पारदर्शक सुविधा मिळत आहे.

वित्तीय साक्षरता ही ग्राहक संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आरबीआयच्या विविध मोहिमा आणि प्रकाशने नागरिकांना वित्तीय व्यवहारांतील जोखीम समजावून सांगतात, फसवणुकीपासून वाचण्यास मदत करतात आणि सुज्ञ आर्थिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन देतात. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसोबतच सायबर सुरक्षेच्या जोखमीही वाढत आहेत. त्यामुळे आरबीआय डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. आरबीआय पर्यावरण पूरक धोरणांच्या दिशेने पावले उचलत आहे. हरित (ग्रीन) अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना आरबीआयने ‘ग्रीन डिपॉझिट फ्रेमवर्क’ आणि ‘प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठा’ (Priority Sector Lending – PSL) अंतर्गत हरित वित्तपुरवठा यासारख्या उपक्रमांद्वारे मोठे योगदान दिले आहे. आरबीआयने काळानुसार स्वतःला विकसित करत भारताच्या आर्थिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महागाई नियंत्रण, वित्तीय समावेशन, आर्थिक स्थैर्य आणि मजबूत वाढ यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्याची भूमिका निर्णायक ठरली आहे.

गेल्या ९० वर्षांत आरबीआयचा प्रवास सरकारच्या दृष्टीकोन आणि धोरणांशी सुसंगत राहिला आहे. आर्थिक सुधारणांपासून स्थिरतेपर्यंत, सरकार आणि आरबीआय यांचे सहकार्य देशाच्या आर्थिक वाढीसाठी उपयुक्त ठरले आहे.  केवळ एका स्वाक्षरीने आरबीआयच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीने एक साधे कागदाचे तुकडे चलन बनते. ही ताकद दुसऱ्या कोणाच्याही स्वाक्षरीला नाही. सर्वसामान्य नागरिकांना आरबीआय सोबत थेट संपर्क नसतो, परंतु त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये आरबीआयचा अप्रत्यक्षपणे प्रभाव असतो. गेल्या नव्या दशकांत आरबीआयने कमावलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे जनतेचा विश्वास. हा विश्वास कायम राखण्यासाठी आरबीआयने नेहमीच स्थिरता, आर्थिक प्रगती आणि वित्तीय सुरक्षेच्या उद्दिष्टांवर भर दिला आहे. १९९० च्या आर्थिक उदारीकरणापासून कोविड-१९ महामारीपर्यंत आरबीआयने वेगवान आणि प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. तसेच, जागतिकीकरणाच्या काळातही देशाच्या वित्तीय व्यवस्थेची सुसूत्रता कायम राखली असल्याचे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी रिझर्व्ह बॅंक व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.

यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करत जागतिक स्तरावर होत गेलेल्या गतीमान बदलांच्या पार्श्वभूमीवरही आरबीआयने आर्थिक बाबी नियंत्रित करण्यात  ठामपणे बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष स्टॅम्पचे अनावरण ही करण्यात आले.

0000

वंदना थोरात/विसंअ/

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

मुंबई, दि.३१: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राजभवन येथे आगमनप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. १ एप्रिल) रिझर्व्ह बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा होणार आहे.

President Murmu arrives in Mumbai; Governor welcomes President

President of India Droupadi Murmu arrived in Mumbai on an official visit. Maharashtra Governor C P Radhakrishnan welcomed the President at Raj Bhavan Mumbai.

The President will attend the 90th Foundation Day Commemoration of the Reserve Bank of India on Tuesday (1 April).

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि.३१ : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी स्थिती निदर्शनास येते त्या अहंकाराला दूर करण्याचे मार्ग आध्यात्मात मिळतात. शिवतांडव स्तोत्राच्या अशा पठणासारख्या कार्यक्रमातून आपण सकारात्मक ऊर्जा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

कामठीतील श्री महादेव घाट परिसरात आज शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, माजी आमदार टेकचंद सावरकर, राजे मुधोजी भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याबद्दल कामठीतील शिवराज्य प्रतिष्ठानचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांच्या स्वसंरक्षणार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासोबतच शिव तांडव स्तोत्र पठण यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपला आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. शिव तांडव स्तोत्र पठण या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुकोदगार काढले तसेच येत्या काळातही अशा प्रकारचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

 

*******

नागपुरात साकारणारे स्पोर्टस हब, आयुक्त कार्यालयासह इतर इमारती ग्रीन बिल्डींगच्या आदर्श वस्तुपाठ ठराव्यात –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ३१ : नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्टस हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्वीन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेच्या वापरासह ग्रीन बिल्डींग म्हणून नावारुपास आले पाहिजेत. यादृष्टीने इमारतीच्या बांधकामातील प्रत्येक टप्यांवर याचा विचार करुन काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात साकारणारे स्पोर्टस् हब व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारल्या जाणाऱ्या बारा मजली ट्वीन टॉवर्स आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बांधकामाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता अभिजीत कुचेवार, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपूरे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.

नागपूर येथील लॉ विद्यापीठातील इमारतीच्या रचनेत आपण ऊर्जेबाबत स्वयंपूर्णता अंगिकारली. शाश्वत विकास व पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विचार करता क्रीडा संकुल व आयुक्तालयाचे हे बांधकाम हे नेटझिरो अर्थात ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असले पाहिजे. या संकुलाला कार्यालयाला जी वीज लागेल ती वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण भागविण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या सर्व इमारती ग्रीन बिल्डींगच्या सर्व मानकांची पुर्तता करुन पाण्याच्या पुर्नवापराच्या दृष्टीने आदर्श मापदंड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्व इमारतींच्या उभारणीसाठी जो कालावधी निश्चित केला आहे त्या कालावधीच्या आत कोणत्याही परिस्थितीत बांधकाम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

*****

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...