रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 159

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

परभणी, दि. ३१ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या हस्ते थाटात पार पडले.

कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या सेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता येणार आहे, असे सांगितले.

परभणी विभागाअंतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगारांसाठी एकूण 70 बीएस-6 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारांसाठी प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. नवीन बीएस-6 मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे.

000

नागपूर येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे; शासन सर्वतोपरी मदत करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ३१ : भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. या वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशा अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

विश्व पुनर्निर्माण संघ संचालित भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज लिखीत वैदिक गणिताच्या दोन खंडांचे प्रकाशन झाले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते. विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्राचीन भारतीय संस्कृतीत अनेक महत्वाची शास्त्र विकसित झाली आहे. मात्र, प्राप्त परिस्थिती व परकीय आक्रमण आदींमुळे या शास्त्रांतील ज्ञान सर्वांपर्यंत पोहचू शकले नाही.  आद्य शंकराचार्य कृष्ण तीर्थ महाराज यांनी वेद ऋचांचा अभ्यास करून सोप्या पद्धतीने संपूर्ण गणिताची मांडणी वैदिक गणित खंडांमध्ये केली आहे. केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या इयत्ता पाचवी ते सातवी च्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. या खंडांच्या माध्यमातून वेदांमधील ज्ञानाचा साठा शंकराचार्यांनी शोधला आहे. वैदिक गणित ही भारताची महत्वाची मोठी ज्ञान संपदा आहे. त्याचे संशोधन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने भारती कृष्ण विद्या विहारामध्ये गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्याच्या शिक्षण विभागाद्वारे वैदिक गणित विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सकारात्मक विचार करू असेही त्यांनी सांगितले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, मानवी जीवनात अनेक प्रसंगांमध्ये गणना, आकडेवारीचे अनन्य साधारण महत्व आहे. सांख्यदर्शन, वक्ररचना निर्देशांक यांच्यासह नल-दमयंती आख्यान, महाभारत आदींमधील उदाहरणे देवून त्यांनी गणिताचे महत्व विषद केले. प्राचीन भारतीय परंपरेतून आलेल्या वैदिक गणिताचा विचार हा विश्व कल्याणासाठी आहे. जगात अध्यात्मावर आधारित  घडत असलेल्या विविध परिवर्तन आणि पुनर्रचनेमध्ये वैदिक गणितही महत्वाची भूमिका निभावू शकते आणि जगाला सुखी व समृद्ध बनविण्यातही मोलाचे योगदान देवू शकते असे त्यांनी सांगतिले.

विश्व पुनर्निर्माण संघाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी आभार मानले.

 

00000

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कमी पाण्यावर होणारी तुती लागवड ही  शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर, आणि आर्थिक पाठबळ देणारी शाश्वत शेती म्हणून उत्तम पर्याय समोर येत आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत आहे. त्यामुळे रेशीम शेतीला चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत .

केंद्र शासनकडून यासाठी जो निधी मिळतो त्याचा प्रस्तवा तातडीने तयार करून केंद्र शासनाकडे  पाठपुराव करावा अशा सूचनाही विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत

केंद्र सरकार आणि राज्यशासन तसेच खाजगी कंपन्या, सामाजिक संस्था यांच्या सामाजिक दायित्व निधीतून तुती व टसर उद्योगाचा एकात्मिक विकास करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार तातडीने बैठक घेऊन रेशीम शेती संचालनालयाचे कार्यालय नसलेल्या जिल्ह्यांमध्ये तुती व टसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन येथील बाएफ या संस्थेची मदत होत आहे. या संस्थेच्या मदतीने रेशीम उद्योग कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे .

बाएफ संस्थेने तुती लागवड ते कापड निर्मितीतील मूल्यवर्धित साखळी निर्माण करण्यासाठी रेशीम संचालनालयास मदत करण्याबाबतचे सादरीकरण केले. तुती लागवड, अंडीपुंज ते कोष निर्मिती, कोषोत्तर प्रक्रीया उद्योगास चालना देवून समूह पध्दतीने विकास, त्याद्वारे मुल्यवर्धीत साखळी निर्माण करणे,  रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे याबाबत बाएफ व रेशीम संचालनालय यांनी क्षेत्रे निश्चित करावी. ज्या क्षेत्राच्या साखळी विकासामध्ये तुट अशा क्षेत्रातील तज्ज्ञ, कार्यरत व्यक्तींनी  त्यासाठी बाएफ संस्थेने मुल्यवर्धीत साखळी निर्माण करुन स्थानिकांना रोजगार निर्मिती आणि रेशीम उद्योगाला चालना दिली आहे, अशा उरळी कांचन, जि. पुणे येथे प्रत्यक्ष भेट देवून पुढील दिशा व कार्यकक्षा निश्चित करण्यात येत आहे.

रेशीम शेती आणि वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशीम उद्योगासाठी आवश्यक  निधी संदर्भात पाठपुरावा आणि राज्यातील रेशीम संदर्भातील संबंधित विभागाचा समनव्य करून याला अधिक गती देण्यात येत आहे. तुती लागवड, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीसाठी वन विभागाची मदत आणि. झोमॅटो व झेप्टो या कंपनीच्या सामाजिक दायीत्व निधीतून आदिवासी जिल्हयामध्ये तुती, ऐन व अर्जुन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात येत अजून याबाबतच कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

टसर क्षेत्रामध्ये रेशीम अळीचे संगोपन करताना शेतकऱ्यांना  येणाऱ्या अडचणीसंदर्भात संबधित जिल्हयातील वनविभागाचे अधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने सहकार्य करण्याचे नियोजन करावे. निधीची आवश्यकता असल्यास किंवा प्रस्ताव प्रलंबीत असल्यास त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

तुती व टसर क्षेत्रातील विकासाकरिता विशेषतः महीला व अदिवासी घटकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 10 हजार लाभार्थ्यांसाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून रेशीम शेतीला प्रोत्साहन

राज्यातील तुती व तसर रेशीम शेतकऱ्यांना जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत 75 टक्के इतक्या सवलतीच्या दरात अंडीपुंज पुरवठा करण्यात येत आहे. तसेच राज्यांतर्गत रेशीम शेती नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी अभ्यास दौरा आयोजित करण्यात येतो. रेशीम शेतकऱ्यांना विद्या वेतनासह 15 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषांना उत्पादनावर आधारित प्रोत्साहन पर अनुदान, सूत उत्पादन अनुदान योजना, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती रेशीम सुत उत्पादनासाठी आर्थिक साह्य आधुनिक यंत्रसामुग्रीसाठी अनुदान, मल्टी अँड रेलिंग युनिट 100 प्रति किलो अनुदान, ऑटोमॅटिक रेलिंग युनिट 150 रुपये प्रति किलो, अनुदान टसर रीलींग युनिट 100 रुपये प्रति किलो अनुदान देण्यात येत आहे.

यासाठी  केंद्र व राज्य सरकारच्या  योजनांचा उपयोग करून,योग्य तंत्रज्ञान,शेकऱ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन  ग्रामीण,दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढीसाठी  त्यांना आर्थिक सक्षमता मिळू देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच बरोबर आदिवासी,ग्रामीण भागात तुतीची लागवड आणि रेशीम उत्पादनामुळे स्थानिक पातळीवर मोठया प्रमाणत  रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

.

0000

डिफेन्स क्लस्टरमुळे शिर्डी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना – राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी, दि.३१ – शिर्डी एमआयडीसीत होणाऱ्या डिफेन्स क्लस्टर प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या लौकिकात भर पडणार असून शिर्डी परिसराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळून रोजगारात वाढ होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सावळिविहीर खुर्द येथील शिर्डी औद्योगिक वसाहत येथे डिफेन्स क्लस्टरअंतर्गत निबे ऑर्डनन्स ग्लोबल लिमिटेड (शेल फोर्जिंग) कंपनीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, निबे प्रायव्हेट लिमिटेडचे गणेश निबे, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक गणेश राठोड आदी उपस्थित होते.

श्री.विखे पाटील, शिर्डी एमआयडीसीमधील डिफेन्स क्लस्टरमुळे नवीन औद्योगिक पर्व सुरू होत आहे. शिर्डी विमानतळावरून नाइट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. यामुळे शिर्डीतील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. एमआयडीसीने डिफेन्स क्लस्टरसाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी टाटा कंपनीच्या पुढाकाराने अडीचशे कोटींचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून यात उद्योगांना आवश्यक मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडील ३०० एकर जागा कोपरगाव औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

शिर्डीचा विकास व औद्योगिक विस्तारासाठी ग्रामस्थांनी विचार विनिमय व समन्वयाने निर्णय घ्यावा. शिर्डी साईबाबा संस्थानच्या माध्यमातून ११ नंबर चारीच्या विस्तारासाठी २२ कोटी व थीम पार्कसाठी ४० कोटी मंजूर करण्यात आले आहेत, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेमुळे अनेक तरुण स्टार्टअप स्वरूपात कंपन्या स्थापन करत असून आर्थिक उन्नतीसाठी तरुणांनी जागतिकीकरणामुळे प्राप्त संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शिर्डी एमआयडीसीमुळे आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे आमदार काळे यावेळी म्हणाले.

श्री.निबे म्हणाले, डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून पाच लाख बॉम्ब शेलची निर्मिती होणार असून या कंपनीच्या माध्यमातून तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

प्रास्ताविक मंगेश जोशी यांनी केले.

0000

रमजान ईदनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. ३०: राज्यात गुढीपाडव्या पाठोपाठ रमजान ईद हा सण उत्साहाने साजरा होत आहे. पवित्र अशा रमजान ईद सणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले की, मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना पवित्र मानला जातो. उपवासाच्या व्रतानंतर येणारा ‘ईद-उल-फित्र’ संयम, त्याग आणि समर्पण यांच्या कृतार्थतेची भावना निर्माण करतो. या दोन्ही सणांच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट होवून त्यांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, अशी मनोकामना व्यक्त करतानाच त्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईद-उल-फित्र हा केवळ उत्सव नाही, तर आपल्या जीवनातील चांगल्या मुल्यांचा उत्सव आहे. या दिवशी आपण सर्वजण एकत्र येऊन, एकमेकांशी प्रेम आणि आपुलकीने समाजात सौहार्द दृढ करूया, असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ३०: गुढीपाडवा व मराठी नववर्षा सोबत आलेली रमजान ईद सर्वांच्या जीवनात आनंद, सौख्य, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात प्रेम, सौहार्द, एकता आणि बंधुत्व अधिक दृढ व्हावे. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित, गरजू बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊया. यंदाची ईदही आपण सर्वांनी एकोपा, आनंद आणि उत्साहाने साजरी करुया. परस्परांप्रती सहकार्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक ऐक्य अधिक दृढ करुया. मानवकल्याण आणि विश्वबंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगाला देऊया… अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ईदनिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. मुस्लिम बांधवांसोबतच सर्वधर्मीय नागरिकही या सणाच्या आनंदात सहभागी होतात. गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षासोबत आलेली यंदाची रमजान ईद वैशिष्ट्यपूर्ण आहे. सध्याच्या काळात समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि बंधुत्व वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रमजान ईद हा सण समाजात परस्परांबद्दल प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवतो. महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक ऐक्य आणि प्रगतीसाठी ही बंधुत्वाची भावना अत्यंत आवश्यक आहे, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

०००

 

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि. ३० : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपूरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द केल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीचा मार्ग अधिक व्यापक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संस्थापक प्रशासक नियुक्ती सोहळ्यात ते बोलत होते. गुढीपाडव्याचे औचित्य साधून नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित या विशेष समारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, वित्त व नियोजन, कृषी व मदत पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, सहकार आयुक्त दिपक तावरे, प्रशासक विद्याधर अनास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार आशिष देखमुख यांनी प्रशासक पदाबाबत केलेल्या विनंतीचा विचार करुन आपण हा पहिला प्रयोग करत आहोत. सहकार आयुक्तालयाने यात यथायोग्य भूमिका निभावून येत्या दीड वर्षात नागपुरची जिल्हा सहकारी बँक आर्थिक फायद्यात येईल याची खात्री असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांनी गुढीपाडव्याच्या औचित्याने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेली ही अपूर्व भेट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रुपाने नागपूर जिल्हा सहकारी बँकेला आता एक शक्तीशाली जोड मिळाली आहे. येत्या दोन वर्षात ही बँक फायद्यात येण्यासह जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक भक्कम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आमदार आशिष देशमुख यांनी जिल्हा सहकारी बँकेत सर्वांनी मुदत ठेवी दाखल करुन आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी प्रास्ताविक केले. शिखर बँका, जिल्हा बँका व विविध कार्यकारी संस्था या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यावर्षी राज्य बँकेने 52 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला असून 650 कोटींपेक्षा अधिक नफा बँकेने प्राप्त केल्याचे अनास्कर यांनी सांगितले.

०००

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

मुंबई, दि. ३१: राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक नवीन वाहनांची खरेदी करीत असतात या वाहनांची नोंदणी संबंधित प्रादेशिक परिवहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत करण्यात येते. नागरिकांमध्ये वाहन खरेदीचा उत्साह दिसून येत असल्यामुळे यावर्षी वाहन नोंदणी मध्ये ३० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तब्बल २० हजार ०५७ वाहने मागील वर्षाच्या तुलनेत अधिक खरेदी करण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

चार चाकी कार प्रकारात २०२५ मध्ये २२ हजार ०८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून ही मागील वर्षीच्या तुलनेत ४ हजार ९४२ ने जास्त आहे. याची टक्केवारी २८.८४ टक्के आहे. तसेच मोटरसायकल, स्कूटर या दुचाकी वाहन प्रकारात २०२५ मध्ये ५१ हजार ७५६ नवीन वाहनांची खरेदी नागरिकांकडून करण्यात आली आहे. मागील वर्षी हीच खरेदी ४० हजार ६७५ एवढी होती. यामध्येही ११ हजार ०८१ ने वाढ नोंदविण्यात आली असून २७.१४ टक्के अधिकची नोंदणी झाल्याचे निदर्शनास येत आहे.

राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालय अंतर्गत ६ हजार ६४८, नाशिक अंतर्गत ३ हजार ६२६, मुंबई (मध्य) परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १५४ आणि ठाणे परिवहन कार्यालय अंतर्गत ३ हजार १०७ वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.

०००

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून गुढीपाडवा उत्साहात साजरा

मुंबई, दि. ३० : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुढीपाडव्यानिमित्त राजभवनातील आपल्या निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली. यावेळी त्यांनी सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना गुढीपाडवा व मराठी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.

०००

गुढीपाडवा सकारात्मकता, नवउत्साहाचा सण – सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला

नवी दिल्ली, दि. ३०: महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत, राजधानीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.

गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू असलेला नववर्ष स्वागताचा सण संपूर्ण देशभर मोठ्या श्रद्धेने आणि आनंदात साजरा करण्यात येतो. राजधानी नवी दिल्लीतही महाराष्ट्र सदनाच्या वतीने कोपर्निकस मार्ग आणि कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आर. विमला यांनी गुढी उभारली. त्यानंतर कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी गुढी प्रतिष्ठापना करून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी सुमनचंद्रा, भारतीय प्रशासकीय सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकारी, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सारिका शेलार, यांसह महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र सदनात स्नेहमिलन कार्यक्रमानिमित्त मराठमोळ्या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत, निवासी आयुक्त आर. विमला यांनी महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व यावेळी विशद केले. “गुढीपाडवा हा नवउत्साह, समृद्धी आणि सकारात्मकतेचा सण आहे. महाराष्ट्राबाहेरही तो मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, ही अभिमानास्पद गोष्ट आहे,” असे सांगत, त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धीचे आणि आनंददायी जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

०००

अमरज्योत कौर अरोरा

 

ताज्या बातम्या

सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा  वापर सुरू करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ :  राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे...

राज्यात काल मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक ४१ मिमी पाऊस

0
मुंबई, 8 : राज्यात मागील 24 तासांमध्ये (8 जून रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात सर्वाधिक 41 मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड 20.8 मिमी, धाराशिव 13.8 मिमी, ठाणे 7.9 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 6.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात कालपासून आज 8 जून  रोजी...

आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...