शनिवार, ऑगस्ट 9, 2025
Home Blog Page 1517

देशात आदर्श ठरेल अशी गोवंश प्रजनन नियमावली तयार करण्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

मुंबई, दि. १३ :- गाय, म्हैस यांचे दूध वाढण्यासाठी आणि उच्च गुणवत्तेचे प्रजनन योग्य नर तयार करण्यासाठी गोवंश प्रजनन नियमावली राज्य शासन तयार करीत आहे. मात्र पशुपालक, गोपालकांच्या गैरसमजुती दूर करण्यासाठी आदर्श गोवंश प्रजनन नियमावलीबाबत ५ मे २०२३ पर्यंत हरकती मागविण्याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. शिवाय हरकतीनंतर देशाला आदर्श ठरेल, अशी गोवंश प्रजनन नियमावली तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात गोवंश प्रजनन नियमावलीसंदर्भात आयोजित बैठकीत मंत्री श्री. विखे – पाटील बोलत होते. बैठकीला पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, दुग्ध विकास आयुक्त डॉ. श्रीकांत शिरपूरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महाराष्ट्र पशु व मस्त्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, सहसचिव माणिक गुट्टू यांच्यासह गोशाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले की, राज्यात गोवंश प्रजननाबाबत पशुपालकांमध्ये जागृती नाही. योग्य आणि उच्च गुणवत्तेच्या प्रजननयोग्य नराचे गोठवलेले वीर्य विशिष्ट प्रदेशाच्या आवश्यकतेनुसार सुनिश्चित करून पुरवठा करावा लागतो. यासाठी राज्यात गोवंश प्रजनन (पैदास) नियमावली आवश्यक आहे. याची माहिती सर्वसामान्य पशुपालकांना होण्यासाठी प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. भारतीय वंशाच्या गोवंश (बोवाइन यामध्ये गाय, म्हैस  यांचा समावेश) प्रजातींचे संवर्धन करणे गरजेचे बनले आहे.  यामुळे दुग्धवर्गीय जनावरे गाय, म्हैस यांचे दूध उत्पादन वाढवणे पशुपालकाला फायदेशीर होणार आहे.

पशुपालक, गोशाळा मालकांना या नियमावलीची माहिती होण्यासाठी किंवा नियमावलीमध्ये काही सुधारणा सुचविण्यासाठी दुग्ध व पशुसंवर्धन विभागाने येत्या मंगळवारपर्यंत कच्चा गोवंश प्रजननचा कायदा (नियमावली) तयार करावा. यासाठी इतर राज्यातील कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून अंतिम करून २० एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध करावा. त्यानंतर ५ मे २०२३ पर्यंत या नियमावलीबाबत हरकती मागविण्याच्या सूचना मंत्री श्री. विखे-पाटील यांनी केल्या.

राज्यात म्हैस आणि गायी यांच्या नर वीर्याच्या केंद्राची निर्मिती करणे, त्याची साठवणूक करणे आणि उच्च प्रतीच्या वीर्यासाठी या नियमावलीद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. राज्यात वीर्य केंद्रांची स्थापना करून त्याद्वारे उत्पादन करणे, प्रक्रिया करणे, साठवणूक, विक्री आणि वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी तपासणी प्रयोगशाळा उभी करण्यात येणार आहे.

०००००

धोंडिराम अर्जुन/स.सं

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन

मुंबई, दि. 13 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक व उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील महत्त्वपूर्ण घटनांची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मंत्रालयातील हे प्रदर्शन आठवडाभर सुरु राहणार असून या प्रदर्शनास मंत्रालयातील कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांनी भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे करण्यात आले आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, भास्कर बनसोडे, सुभाष गवई, विजय नांदेकर, सी.आर. निखारे, सविता शिंदे, मंगल नाकवा, सुदिन गायकवाड, अंबादास चंदनशिवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रदर्शनातील छायाचित्रांचे संकलन नितीन पवार यांनी केले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

लोकहिताच्या निर्णयातून राज्याचा विकास सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 13 :- राज्यातील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत मांडली.

इंडिया टुडे समूहाच्या ‘मुंबई तक’ या ऑनलाईन वृत्तवाहिनीद्वारे आयोजित मुलाखतीत मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. इंडिया टुडे समूहाचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि व्यवस्थापकीय संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना सहकार्य केले पाहिजे. चाळी आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. मुंबईतील रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि दळणवळण व्यवस्था अशी विकासाची कामे झाली पाहिजेत याच दृष्टीने राज्य शासन काम करीत आहे. राज्याला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी, उद्योगवाढ, रोजगार निर्मिती यासोबत पायाभूत सुविधांची कामे राज्यात सुरु केली आहेत. मागील काळातील कोणतेही काम बंद केलेले नाहीत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यात सुरु असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, कोस्टल रोड, मुंबई-गोवा एक्सेस कंट्रोल रस्ता, मेट्रो प्रकल्प, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती विशद केली.यासोबत महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारचे पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यातील युवकांना कौशल्याभिमुख करुन रोजगारक्षम करण्यात येत असल्याचे देखील मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००००

पवन राठोड/ससं/

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा पूर्वतयारी वेगात; कार्यक्रमस्थळी आरोग्य व्यवस्थेची चोख व्यवस्था- पालकमंत्री उदय सामंत

नवी मुंबई, दि. 13 :- राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र भूषण-२२२ पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर कॉर्पोरेट पार्क येथे महाराष्ट्राच्या विविध भागांतून उपस्थित राहणाऱ्या जनसमुदायाच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात यावी. त्यासाठी शासकीय यंत्रणा आणि श्रीसदस्य यांनी परस्परांमध्ये समन्वय साधून कार्यक्रम स्थळी वैद्यकीय सेवेचे सुयोग्य व्यवस्थापन करावे, अशा सूचना राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज खारघर येथे केल्या.

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री श्री. सामंत यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार वितरण सोहळ्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरु आहे. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, मुख्यमंत्री कार्यालयाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, उपायुक्त तिरुपती काकडे, वास्तुविशारद योगेश वाजेकर, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारीया आदी मान्यवर तसेच श्रीसदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी दि. 14 एप्रिलपासून उपस्थित राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच आपत्कालीन परिस्थितीत आरोग्याविषयी उद्भवणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आवश्यक सेवा सुविधा, आवश्यक साधन सामग्रीबाबत पालकमंत्र्यांनी मुद्देसूद आढावा घेतला. यासाठी श्रीसदस्य हे शासन आणि प्रशासनाला सहकार्य करतील, अशा सूचना दिल्या.

यावेळी वैद्यकीय केंद्र आराखाडा, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिकांची उपलब्धता, औषध उपलब्धता, आरक्षित रुग्णालये, वैद्यकीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय विभागामार्फत ग्राफिक्सच्या माध्यमातून तपशीलवार माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण 55 वैद्यकीय केंद्रे असणार आहेत. खारघर मधील कार्यक्रमाच्या ठिकाणी एकूण 7 सेक्टर आहेत. त्यापैकी 5 सेक्टरमध्ये श्रीसदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेक्टर 1 मध्ये 4 ते 5 लाख लोकसंख्येसाठी 8 वैद्यकीय केंद्रे, सेक्टर 2 मध्ये 8 लाख लोकसंख्येसाठी 12 वैद्यकीय केंद्रे, सेक्टर 3 मध्ये 3 लाख लोकसंख्येसाठी 4 वैद्यकीय केंद्रे, सेक्टर 6 मध्ये 3 लाख लोकसंख्येसाठी 3 वैद्यकीय केंद्रे आणि सेक्टर 7 मध्ये 3 लाख लोकसंख्येसाठी 3 वैद्यकीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्टेजच्यामागे 1 वैद्यकीय केंद्र तर मैदानाच्या शेजारी असलेल्या आमराईत 1 वैद्यकीय केंद्र उभारण्यात आले आहे. प्रत्येक वैद्यकीय केंद्रासाठी 4 डॉक्टर, 2 नर्स, 2 औषध निर्माता, 10 स्वयंसेवक अशा प्रकारे एकूण 128 डॉक्टर, 64 नर्स, 64 औषध निर्माता, 320 स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेक्टर 5 येथे 10 तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. 32 वैद्यकीय केंद्रांवर औषधांचे 32 किट ठेवण्यात येणार आहेत. या प्रत्येक किटमध्ये आवश्यक अशा 80 प्रकारच्या औषधांचा साठा करुन त्यांचे संच करण्यात आले आहेत.

कार्यक्रमस्थळी एकूण 59 रुग्णवाहिका असणार आहेत. त्यापैकी 32 रुग्णवाहिका साध्या असून त्या 32 वैद्यकीय केंद्रांवर तैनात ठेवण्यात येतील. 2 रुग्णवाहिका पार्किंगच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. 14 रुग्णवाहिका कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. त्यापैकी 7 अतिदक्षता वैद्यकीय केंद्राच्या ठिकाणी आणि 2 आमराईच्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत. 5 कार्डियाक रुग्णवाहिका राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई आणि पनवेल मधील एमजीएम, रिलायन्स, फोर्टिस, अपोलो सारख्या मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये 100 साध्या आणि 10 आय.सी.यू खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच साध्या रुग्णालयांमध्ये 25 टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानातील उन्हाळ्याच्या झळांमुळे सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या जनतेला निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुबलक पाणी आणि ओआरएसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुखपट्टी (मास्क) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या आढावा बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी झाली की नाही याचा पालकमंत्री श्री. सामंत हे सकाळी व संध्याकाळी पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा स्वत: आढावा घेत आहेत. कार्यक्रम भव्य व लक्षात राहण्यासारखा होण्यासाठी सर्वांनी समन्वय साधून कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते न्हावरा ते चौफुला रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पुणे, दि.१३: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डीजीमधील न्हावरा ते चौफुला रस्त्याचे उन्नतीकरण व मजबुतीकरण कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार ॲड. राहुल कुल, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, न्हावरा ग्रामपंचायतीचे सदस्य अलका शेंडगे आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात सुमारे ४६ हजार १०९ कोटी रुपयांची रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यामध्ये आळंदी ते पंढरपूर दरम्यान संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग ७ हजार २९३ कोटी, देहू ते पंढरपूर दरम्यान संत तुकाराम पालखी मार्ग ४ हजार ४१५ कोटी, चांदणी चौक उड्डाणपूल ४०० कोटी, नाशिक फाटा ते राजगुरूनगर उड्डाणपूल ८ हजार कोटी, तळेगाव-चाकण-शिक्रापूर दुमजली उड्डाणपूल ११ हजार कोटी, पुणे-शिरुर दुमजली उड्डाणपूल १३ हजार ५०० कोटी, शिंदेवाडी-वरंधाघाट ७२३ कोटी, उंडवडी-बारामती-फलटण ५७८ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

या रस्त्याची कामे पूर्ण झाल्यावर रहदारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल लवकरात लवकर बाजारपेठेत पोहचण्यास मदत होणार आहे. रस्त्याची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.कामे नियोजनानुसार पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी न्हावरा येथील मल्लिकार्जुन देवस्थान परिसर विकासासाठी ५० लाख रुपये देण्याची घोषणा केली. तसेच शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिकेत पुस्तक खरेदी करणे, हनुमान मंदीर जीर्णोद्धार, उपजिल्हा रुग्णालय, उप जिल्हा सह निबंधक कार्यालय, पोलीस स्थानक, तालुका कृषि मंडळ मंजूर करणे आदी मागणीनिहाय प्रस्ताव सादर करण्याचा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी केल्या.

आमदार ॲड. कुल म्हणाले, न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा मोबदला देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हद्दीवाढच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्याची कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कार्यवाही सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

न्हावरा ते चौफुला रस्ता
या रस्त्याच्या कामावर सुमारे २५० कोटी ८९ लाख रुपये खर्च होणार आहे. रस्त्याची लांबी २४ कि.मी. असून पुढील दीड वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हा रस्ता चाकण, शिक्रापूर, न्हावरा, आढळगाव, जामखेड, अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८डी वर न्हावरा येथे सुरु होऊन पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील चौफुला येथे संपणार आहे.

न्हावरा ते चौफुला रस्ता रस्ता चाकण, शिक्रापूर, शिरुर, सुपा, कुरकुंभ आदी महत्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडण्यास उपयुक्त ठरतो व त्यामुळे औद्योगिक विकासास चालना मिळणार आहे. वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी निकालात निघणार आहे. रहदारीच्या रस्त्यावरुन कमी वेळात प्रवास करणे शक्य होणार आहे. इंधनाची बचत, सुरक्षित वाहतूक करणे, यामुळे शक्य होणार आहे.
0000

पालकमंत्र्यांकडून शिरूर तालुक्यातील विकासकामांचा आढावा

पुणे, दि.१३: पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिरुर पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला.

यावेळी आमदार अशोक पवार, पालकमंत्र्याचे विशेष कार्यकारी अधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, गट विकास अधिकारी अजित देसाई, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद बोरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, एमआयडीसी परिसरातील गुन्हेगारी प्रवृती रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. नगरपंचायतीअंतर्गत दशक्रिया घाटाभोवती असलेली अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही करावी. दूषित पाण्याचा प्रश्न पाणी पुरवठा विभागाने मार्गी लावावा. जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी. उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरे देण्याची कार्यवाहीला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शहरामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही पालकमंत्री म्हणाले.

महसूल विभागाअंतर्गत गौण खनिज उत्खनन, पाणंद रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत जिल्हा नियोजनमधून झालेली प्राप्त निधी; त्याअंतर्गत सुरु असलेली कामे, नगर परिषद कार्यालयांनी शहरात सुरु असलेली कामे, कृषि विभागाअंतर्गत कांदा अनुदान, अवकाळी पाऊस त्याअनुषंगाने देण्यात येणाऱ्या मदतीबाबत कार्यवाही, महाडीबीटीवरील योजना, शिक्षण विभागाअंतर्गत शाळा दुरुस्ती, नवीन खोल्या, संरक्षक भिंत, शौचालय, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य विभागाअंतर्गत कोविड-१९ अनुषंगाने सक्रिय रुग्ण, बरे झालेले रुग्ण, लसीकरण, औषध पुरवठाबाबत बैठकीचे आढावा घेण्यात आला.

एमआयडीसी परिसरातील गुन्ह्याचे प्रमाण, गुन्हे सिद्धतेचे प्रमाण, सीसीटीव्ही, उपलब्ध मनुष्यबळ, लम्पी आजार, लसीकरण, आजारी जनावरे, शेतकरी प्रबोधन, वृक्ष लागवड, सीएसआर फंडातून वृक्ष लागवडीसाठी प्राप्त अनुदान, सोलर पंप वितरण, कृषी पंप वीज जोडणी, पाणी पुरवठ्यासाठी नळ जोडणी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनेची अंमलबजावणी, धरणातील पाणीसाठा, पर्जन्यमान आदी विषयांचादेखील आढावा पालकमंत्र्यांनी घेतला.

बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते शिरुर पंचायत समिती येथील महाराणी येसूबाई सभागृह नूतनीकरण, सिमेंट काँक्रिट रस्ता, पेव्हींग ब्लॉक तसेच छत्रपती संभाजी महाराज सभागृह नुतनीकरण व पंचायत समिती सुशोभीकरण करणे या कामांचे उद्घाटन करण्यात आले.

पैठण व आपेगाव येथील विकासकामे जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री संदीपान भूमरे

         औरंगाबाद दि 13 (जिमाका): श्री क्षेत्र पैठण व आपेगाव येथे अनेक भाविक भेट देतात. पैठण व आपेगाव येथील विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेली विकासकामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी दिले.

            पालकमंत्री संदिपान भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण व आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत मंजुर आराखड्यातील विकास कामांची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, आमदार प्रदीप जैस्वाल, उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे तसेच संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांना सादरीकरणाव्दारे विकास कामांची माहिती देण्यात आली.

            पालकमंत्री म्हणाले पैठण येथील नाथ मंदिरातील विद्युत रोषणाईचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करावे तसेच मंदिरा शेजारी असणारे अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. आपेगांव येथील घाटाचे काम लवकर पूर्ण करावे. या प्राधिकरणासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

शिरुर तालुक्यातील ३२९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन

पुणे, दि.१३: जल जीवन अभियानांतर्गत शिरुर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि इतर १९ गावातील ३२९ कोटी ४५ लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात उद्धघाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार अशोक पवार, उप विभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नंदू भोई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद तसेच संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, केंद्र शासन प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी ७० हजार कोटी रुपयांचे जल जीवन अभियान राबवित आहे. याअंतर्गत महाराष्ट्रासाठी २० हजार कोटी रुपये तर पुणे जिल्ह्यासाठी २ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार  आहेत. शिरुर तालुक्यातील ३४ पाणी पुरवठा योजनेसाठी ५७१ कोटी ३८ लाख मिळाले आहेत.  ही कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण करावीत. त्यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

राज्य शासनाच्यावतीने नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. शिरुर-हवेली-दौंड तालुक्यातील गावांना जोडणारा भीमा नदीवरील पूल उभारणीबाबतची मागणी लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल. पुलाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकासकामांसोबतच रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे. त्यासाठी रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर केल्यास, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्याला प्राधान्य देऊ, ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.

आमदार श्री. पवार म्हणाले, तालुक्यात जल जीवन अभियानांर्गत मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर येथील समाधी स्थळाकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

३२९ कोटी ४५ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन:

यावेळी तळेगाव ढमढेरे पाणीपुरवठा योजना- १३ कोटी ४ लाख, शिक्रापूर रेट्रोफीटिंग ७ कोटी २३ लाख, इनामगाव व तीन गावे प्रादेशिक ४१ कोटी १७ लाख, निमोणे ७ कोटी ३ लाख, कोरेगाव भीमा वाडा पुनर्वसन प्रादेशिक २२ कोटी ७६ लाख, आंबळे ७ कोटी २९ लाख, निर्वी ६ कोटी ३६ लाख, रांजणगाव सांडस १० कोटी ७३ लाख, सादलगाव वडगाव रासाई रेट्रोफिटिंग १४ कोटी, नांगरगाव आंदळगाव प्रादेशिक २४ कोटी ७ लाख, कोंढापुरी ९ कोटी ७ लाख, गुनाट १० कोटी १९, निमगाव म्हाळुंगी १३ कोटी ९३ लाख, वढू बुद्रुक ११ कोटी ७५ लाख, करडे १३ कोटी ४५ लाख, सणसवाडी ३२ कोटी १९ लाख, ढोक सांगवी  ४९ कोटी ७७ लाख, आलेगाव पागा १५ कोटी ६८ लाख, उरळगाव ७ कोटी ७३ लाख रुपये अशा पाणी पुरवठा योजनांचे उद्घाटन करण्यात आले.

विठ्ठलवाडी पाणीपुरवठा योजना ११ कोटी ११ लाख रुपये खर्चाची असून या योजनेत विठ्ठलवाडी गावासोबत डाळवस्ती, वेगरेवस्ती, महानुभावमळा, चोरमाळवस्ती, भोसेवस्ती, मधलामळा, शिंदेवस्ती या वस्त्यांच्या समावेश करण्यात आला आहे. या योजनेत ५ हजार २७८ नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कांदा चाळ योजनेद्वारे बाजार दराच्या अनिश्चिततेवर मात

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी काही शेतकरी पर्यायी व्यवस्था करतात आणि संभाव्य नुकसानीपासून स्वतःची सुटका करून घेतात. यशवंत महात्मा माने त्यापैकीच एक.

श्री. माने यांचे गाव द. सोलापूर तालुक्यातील कंदलगाव असून 2 हेक्टर बागायत जमीन ते कसतात. एकूण जमिनीपैकी 1.20 हे. क्षेत्रावर मागील 10 वर्षापासून ते खरीप व रब्बी हंगामात ऊस आणि कांदा लागवड करतात. कांदा लागवड करुन उत्कृष्ट उत्पादन त्यांना मिळते. मात्र, गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा काढल्यानंतर बाजारामध्ये दर फारच कमी मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागले. कांदा साठवणूक करण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने नाइलाजाने मिळेल त्या दराने त्यांना कांदा विकावा लागत होता. बाजारातील कमी दर व उत्पादन खर्च वाढल्याने कांदा लागवड करणे परवडत नव्हते.

याच दरम्यान त्यांना कांदा चाळ योजनेची माहिती मिळाली. कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत 25 मेट्रीक टन कांदाचाळ योजनेसाठी श्री. माने यांनी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर दोन महिन्यांनी त्यांची निवड झाली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांना कांदाचाळ करिता पूर्वसंमती पत्र देण्यात आले.

याबाबत यशवंत माने म्हणाले, कांदाचाळ मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी 25 मेट्रिक टन कांदाचाळ मी तयार केली आहे. त्यासाठी एकूण 2 लाख 12 हजार खर्च आला असून मला 87 हजार 500 रू. अनुदान मिळाले. खरीप व रब्बी हंगामामध्ये 1.50 हे कांदा लागवड केली असून 38 टन कांद्याची मी कांदाचाळमध्ये साठवणूक केली. सन 2022-23 मध्ये सततचा पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे बाजारभावात कांद्याचे दर सारखे खाली-वर होत असून 2200 रु. प्रति क्विंटल एवढ्या चढ्या दराने 25 मेट्रिक टन कांदा मी विकलेला आहे. माझ्या घरी वडील, भाऊ व आमच्या दोघांच्या कुटुंबातील 12 सदस्य आहोत. आमची मुलं शिक्षण घेत असून, कांदा चाळीतून मिळालेला नफा आमच्या कुटुंबासाठी पूरक उत्पन्न ठरले आहे.

सदर कांदा चाळीस तालुका कृषि अधिकारी रामचंद्र माळी, मंडळ कृषि अधिकारी के. एम. लादे व कृषि सहाय्यक अशोक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. कांदा साठवणूक करण्यासाठी कांदाचाळ हे अत्यंत उपयोगी व फायदेशीर योजना आहे. कांदाचाळ उभारण्यासाठी कृषि विभागातील अधिकारी व सदर कांदा चाळीस तालुका कृषि कर्मचारी यांनी मार्गदर्शन व मदत केलेली आहे. यासाठी यशवंत माने यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

सर्व सुविधांनीयुक्त इनडोअर स्टेडियमची उभारणी करावी; तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करावे- पालकमंत्री

नंदुरबार : दिनांक 13 एप्रिल 2023 (जिमाका वृत्तसेवा) नंदुरबार शहरात सर्व सुविधांनीयुक्त वातानुकुलित इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री डॉ. गावित म्हणाले, मिशन संकुल अंतर्गत शासनाने जिल्हा क्रीडा संकुल या प्रकल्पास सध्याची अनुदान मर्यादा रु. 800.00 लक्ष वरुन सुधारित अनुदान मर्यादा रु.1500.00 लक्ष केलेली आहे.  या निधीतुन इनडोअर हॉल-अद्यावत करणे, 400 मी ट्रॅक सिंथेटिक करणे, वसतीगृह इमारत अद्यावत करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, नविन वसतीगृह इमारत नविन बांधणे, वसतीगृह इमारत अद्यावत करणे, मुलांमुलींकरीता स्वच्छता गृह बांधणे, विविध क्रीडांगणे तयार करणे, जलतरण तलाव अद्ययावत करणे ही कामे प्राध्यान्य क्रमाने हाती घेण्यात यावीत.

ते पुढे म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुल समितीने नियुक्त केलेल्या वास्तुविशारदाच्या  नियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरुन सुधारित शासन निर्णयान्वये जिल्हा क्रीडा संकुलातील विकसित करावयाच्या क्रीडा सुविधांचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करणे सोयीचे होईल.  जिल्हा क्रीडा संकुलातील शुटींग रेंज हॉल व वसतीगृह इमारत मागील संरक्षण भिंत पडलेली आहे. सदर भिंत पडलेली असल्यामुळे मोकाट गुरे संकुलात येतात त्यामुळे संरक्षण भिंत व मुख्य व्दार दुरुस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी रु.99.64 लक्ष व रु.99.77 लक्ष इतक्या रकमेचे असे दोन अंदाजपत्रक सादर केलेले होते. त्यापैकी जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्तर व पश्चिम बाजूची भिंतीचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलेली असुन उर्वरीत पुर्व व दक्षिण बाजूची संरक्षक भिंत दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

तालुका क्रीडा संकुलाच्या कामास प्राधान्य

 तालुका क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांचा कामे प्राधान्य क्रमाने हाती घेउन  बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत.  तालुका क्रीडा संकुलाच्या  उभारणीसाठी  रु.500.00 लक्ष इतकी अनुदान मर्यादा असुन आदिवासी विकास विभागातून त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात येईल. त्यात 200 मी. धावनपथ तयार करणे, इनडोअर हॉल वुडन सिंथेटीक फ्लोरिंगसह, चेजिंग रुम, स्टोअर रूम, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉनटेनिस, ऑर्चरी कार्यालयीन इमारत, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत इत्यादी क्रीडा सुविधा तसेच प्रेक्षक गॅलरी व गॅलरीच्या मागील बाजूस तालुका क्रीडा संकुलाच्या उत्पन्नाचा दृष्टीने रोडालगत दोन मजली दुकान गाळे तयार करण्यासाठी बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करावेत, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

0
ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या...

गोडोली तळे सातारच्या सौंदर्यात भर घालेल – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा, दि.8 : सातारा येथील गोडोली तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी करुन सातारा नगरपालिकेने अत्यंत चांगल्या...

ग्रामीण भागातील प्रत्येक भगिनी स्वयंपूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील – ग्राम विकास मंत्री जयकुमार...

0
सातारा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांना आज रक्षाबंधन सणानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय समुदाय निधी वितरण सोहळ्यामध्ये ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या...

शेतकऱ्यांचे हित आणि एपीएमसी आधुनिकीकरणासाठी केंद्र व राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक घ्यावी – मंत्री...

0
नवी दिल्ली, 8:- शेती उत्पादन व्यवस्थापन, शेतकऱ्यांना योग्य मोबदला, साठवणूक सुविधांचे आधुनिकीकरण आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (एपीएमसी) पायाभूत सुविधा विकासासाठी केंद्र-राज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय...

पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश; ८५९.२२ कोटी...

0
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जल सिंचनासाठी महत्वपूर्ण निर्णय मुंबई, दि. ८:- अमळनेर तालुक्यातील (जि. जळगाव) पाडळसे (निम्न तापी) सिंचन प्रकल्पाचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत...